बाप्पा, विवेकबुद्धी दे अम्हाला..
इसवी सनाच्या साधारण सहाव्या शतकापासून पुढे लोकप्रिय झालेली ही देवता आज जवळपास अखिल विश्वातील हिंदू जनांचे लाडके दैवत झालेले आहे. तो आद्यदेव, मंगलमूर्ती, विघ्नविनाशक, विविध कलांचा अधिपती, उत्तम पुत्र आहे. पट्टीचा योद्धा, लेखनिक, विचारवंत, मुत्सद्दी असे अनेक गुण त्याच्या ठायी एकवटले आहेत आणि म्हणूनच त्याला ‘गुणपती’ असंही म्हटलं जातं. बुद्धिदाता म्हणूनही गणपती बाप्पा मोठाच आहे. अर्थात बुद्धीचा नि माझा फारसा कधी संबंध आला नाही किंवा जी काही जन्मजात मिळाली होती ती पुरेशी असल्यामुळे मी काही गणपतीकडे बुद्धिदाता म्हणून पाहिलेलं नाही. पुन्हा जास्त बुद्धी घेऊनही तिचं नेमकं करायचं काय, हा ही प्रश्नच होता. म्हणून मी गणपतीला ‘सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची न उरवी’ म्हणून पुजलं.
हे झालं माझं. माझ्या पिढीचं. आता काळ बदलला. आता सुखाचा संबंध पैशाशी, पैशांचा संबंध ज्ञानाशी, ज्ञानाचा संबंधं शिक्षणाशी, शिक्षणाचा संबंध मार्कांशी आणि मार्कांचा संबंध बुद्धीशी जोडला गेल्यामुळे, हल्ली ‘बुद्धिदाता गणेश’ स्वरुपालाच जास्त मागणी आहे. पूर्वी लोक सुखी ठेवायची मागणी करत, कुणी संकटातून सोडवायची मागणी करत, एखाद-दुसरा प्रेमात यश मिळू दे म्हणूनही मागणी करत असे आणि अशाच काहीबाही मागण्या असत. बाप्पाही विविध मागण्या आनंदाने पुरवत असे. आता मात्र केवळ बुद्धिचीच जास्त मागणी असल्याने बाप्पावर लोड येऊ लागला आणि मग त्याने बुद्धीची प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी एक स्पेशल दूत नेमून पृथ्वीवर (पक्षी: फक्त भारतात. ते ही महाराष्ट्रात जास्त) पाठवायचं ठरवलं आणि पृथ्वीवर ‘संगणपती’ अवतरला..
गणरायांचा हा दूत ‘संगणपती’ डिट्टो गणपतीच. हा ‘माऊस’ घेऊनच अवतरला. आई-वडिलांना पृथ्वी समजून एका क्षणात त्यांच्या सभोवती प्रदक्षिणा घालणारा बाल गणेशाचा वेग आणि एका क्षणात 7G स्पीडने पृथ्वीवरच्या यच्चयावत सर्व्हर्सना भेट देऊन येणाऱ्या या दुताचा स्पीडही सारखाच. गणपतीची सोंड, सुपासारखे कानाच्या जागी य दुताने मोडेम-राऊटर आणि मोठाल्या डिश ॲंटेना आणल्या. आधुनिक जगात जायचं म्हणजे कसं अप टू डेट जावं, तसाच हा गणपतीचा दूत ‘संगणक’या भारत भूवर अवतरला.
पण एक या गडबीत एक मिस्टेक गलतीसे झाली. बुद्धिदात्या गणरायाने आपल्या या दुताला आपल्या वाहनासकट सारी अवजारं दिली, मेमरीत बुद्धीही ठासून भरली, मात्र त्यात विवेकबुद्धी भरायचं गणोबा विसरले. अर्थात पृथ्वीवरची मागणी बुद्धीची असल्याने आणि विवेकबुद्धीची नसल्याने ही गडबड कुणाच्या लक्षात आली नाही.
विवेकबुद्धी नसल्याचा पहिला घोटाळा असा झाला, की गणपतीच्या या दुतालाच भारतवासी साक्षात बुद्धीदाता गणेश समजले आणि त्याला शरण गेले. ‘आमका उद्धारुक आता अवतार येतलो’ असं म्हणत पिढ्यान पिढ्या अवतारांची वाट पाहात आकाशाकडे दृष्टी लावून बसलेल्या निष्क्रिय भारतवासीयांना बुवा, बापू, महाराज, माॅ, अम्मा आदी देवांच्या एजंटलाच देवावतार समजून त्यांना शरण जाण्याची प्राचीन अध्यात्मिक सवय असल्याने असं झालं नसतं तरच नवल..! गणपतीचा हा बुद्धीमान दुतही या बुवा-बापुंसारखा हवेतून अनेक गोष्टी काढून समोर हजर करू लागला. असं झालं की मग विवेक हरवलेल्या भक्तांचं जे काही अध:पतन होऊ शकतं, तेच या गणपतीच्या दुतालाच बुद्धीची देवता गणपती मानूण चालणाऱ्या आधुनिक भक्तांचं होऊ लागलं.
भक्त आपल्या कच्छपी लागल्यावर या दुताच्या करामती सुरू झाल्या. या दुताचं एक जगातलं काहीही शोधून भक्तासमोर हजर करण्याचं कसब म्हणजे भक्तांना चमत्कार वाटू लागला. बरं, हा संगणदूत हव्या त्या गोष्टींसोबत नको त्या गोष्टीही भक्कांसमोर हजर करु लागला. ‘पॅंट’ शब्द इंग्रजीत टायपला, की पॅटच्या माहिती सोबत ‘पॅंटी’ ते ‘पंत(दादरचे)’ पर्यंत सर्व काही देऊ लागला. ‘बॅंक’ शब्दाची माहिती मागितली, की बॅकेच्या माहितीसोबत विजय मल्ल्याच्या करामतीपासून ते नदीच्या किनाऱ्यापर्यंतची सर्व माहिती हवेतून काढून समोर हजर करू लागला. ‘डाॅन’ शब्दाचा अर्थ विचारला असता, ‘मालक’पासून दिल्ली व्हाया दुबईपर्यंतचे सर्व अर्थ आणि यच्चयावत माहिती क्षणात समोर येऊ लागली.
हव्या त्या माहितीसोबत नको ती माहितीही समोर येते म्हटल्यावर, बुद्धीमान परंतू विवेकबुद्धी नसलेल्या ह्याच्या भक्तांची मती फिरुन ते चेकाळले नसते तरच नवल..! लक्ष नेमकं नको त्या माहितीकडे जाऊन त्याचं आकर्षण वाटू लागलं आणि मग विवेकशुन्यतेचा अनुभव गल्ली ते दिल्ली असा देशभरात सर्वत्र येऊ लागला. सोशल मिडीयावर अवास्तव मेसेज येणं, त्या मेसेजेसना विवेकबुद्धिच्या कसोटीवर न तपासणं आणि विचार न करता असे समाज विघातक मेसेज पुढे पुढे पाठवत राहाणं, समाज विघातक साईटसच्या, पोर्नच्या आहारी जाणं, सायबर क्राईम, माॅब लिंचिंग होणं, प्रक्षोभक धार्मिक आणि जातीय उतारे लिहिणं इत्यादी गोष्टी घडू लागल्या. ही सर्व बुद्धी असल्याची मात्र विवेकबुद्धी नसल्याची लक्षणं गणपती बाप्पाच्या संगणकरुपी दूताच्या आशीर्वादाने घडू लागली.
समाजात बुद्धीमान, म्हणून उच्च शिक्षित, म्हणून पैसा असलेल्या आणि म्हणून प्रतिष्ठाही प्राप्त झालेल्या, परंतु हे सर्व असुनही सदसद्विवेकबुद्धी हरवलेल्या भक्तांमधे हे होणं अपेक्षितच होतं. बरं ह्यात तरुणांपासून अकलेनं श्रेष्ठ म्हणावेत अशा म्हाताऱ्यांपर्यत सर्वांचा हिरिरीने सहभाग. गणपतीच्या बुद्धीमान परंतू विचारशक्ती नसलेल्या संगणक दुताच्या नादी लागलेल्या आणि तेच गुण-अवगुण अंगात भिनलेल्या भक्तांचे पूर्वज कधीतरी माकडं होती यावरचा विश्वास ठाम व्हावा, अशा माकडांच्याही वरताण विचारशून्य मर्कटलीला भारत भुमिवर गल्ली ते दिल्लीत घडू लागल्या. ६४ कलांची देवता असलेल्या गणेशजींच्या या संगणक दुताची त्या ६४ कलांमधील ‘छलिक योग’ या कलेवर अंमळ जास्तच प्रेम असल्याचं आणि तेच जास्त या आधुनिक भक्तांना भावल्याचं दिसू लागलं. अशा परिस्थितीत आपल्या अनेक जाती-पंथ-भाषांनी आणि ताळतंत्र सोडलेल्या राजकीय पक्षांनी भरलेल्या देशातील निरक्षरता, दारिद्रय़, अनारोग्य, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि याहीपेक्षा भयानक अशी धर्मांधता आणि जातियता यांना ऊत येणं अगदी सहाजिकच होतं.
‘विघ्नहर्ता’ गणपती हा मुळात ‘विघ्नकर्ता’ होता, हे आता आठवू लागलं. हाती घेतलेल्या कार्यात त्याने विघ्न आणू नये म्हणून प्रथम त्याची आराधना करण्याची गरज त्या काळच्या लोकांना वाटू लागली आणि त्यातून त्याचं आजचं विघ्नहर्ता हे रुप साकारलं. सध्याच्या अनागोंदीच्या (‘अन’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘हत्ती’ असाच आहे. अनागोंदी हा शब्द कानडी आहे) समयी त्या विघ्नहर्त्यालाच साकडं घालून आता आपल्या बुद्धीदात्या ह्याना स्वरुपात या भुमिवर येऊन या सर्वांना आवर घालण्याची आणि चिमुटभर विवेकबुद्धी त्याच्या संगणक दुतासाठी आणि त्याच्या नादी लागलेल्या भक्तांचे कान उपटण्यासाठी येण्याची करुणा भाकावी लागण्याची घडी आली आहे. आम्हाला आता आधुनिक युगातील श्री विवेकबुद्धी गणेशाची आणि त्याच्या संगणक दुताची ‘डोळस आराधना’ करण्याची बुद्धी देण्याची प्रार्थना करावी लागणार आहे, यात दुमत नाही. बुद्धीदात्याचं विराट स्वरुप दाखवण्याची विनंती त्या गणपतीला करणं आवश्यक झालं आहे. संगणक हा फक्त विचारशुन्य दुत आहे, बुद्धीदाता विचारी गणेश नव्हे हे आता बाप्पानेच ओरडून सांगायची वेळ आलेली आहे.
बाप्पा, आम्हाला बुद्धी दिलीस तशी थोडीशी विवेकबुद्धीही दे, हेच तव चरणांशी मागणं..
-©️नितीन साळुंखे
9321811091
*फोटो सौजन्य इंटरनेट