हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती.
मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं?
सरकारने की मुख्यमंत्रांनी की श्री. देवेन्द्र फडणवीसांनी की….?
विषय जुनाच आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या निनित्ताने नव्याने मनात आला आहे. अर्थातच आरक्षण मिळावं की नाही किंवा मिळालं ते बरं झालं की वाईट, हा मुळात या पोस्टचा विषयच नाही. विषय आरक्षणाच्या निमित्ताने लिहिलेला असला तरी ह्याला एक वेगळा आयाम आहे आणि गेले साधारण वर्षभर तो माझ्या मनाला यातना देतो आहे. माझ्या मनाला झालेल्या वेदना मी या निमित्ताने समोर ठेवतो आहे. मला या पोस्टमधून जे म्हणायचंय, ते मी स्पष्ट म्हटलं आहे. वाचणारानी त्यातून काय अर्थ काढावा हे माझ्या ताब्यात नाही.
साधारण वर्षभरापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं व नंतर ते आरक्षण न्यायालयाने नाकारलं होतं, हे सर्वांना आठवत असेल. त्या दरम्यान मी एका व्हाट्सअॅप ग्रुपवर होतो. तो ग्रुप जाती विरहीत हिन्दूत्व मानणाऱा होता आणि ‘मराठी भाषा’ विषयाशी संबंधीत होता. सहाजिकच जाती-पातीच्या विषयाला तिकडे सक्त मज्जाव होता. अशातच एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळालं(पुढे ते कोर्टाने नाकारलं होतं) आणि त्या ग्रुपवर एक मेसेज येऊन थडकला. ‘एका ब्राह्मणाने मराठ्यांना मागास घोषित केलं आणि आरक्षण दिलं. त्यामुळे ब्राह्मणाचं महत्व आजही अबाधित आहे’ असा तो संदेश होता. वास्तविक ‘मुख्यमंत्र्यांनी किंबहूना सरकारने आरक्षण दिलं’ असं म्हणणं जास्त संयुक्तिक होतं. पण तसं न म्हणता मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उल्लेख केला गेला होता. एका उच्च विद्या विभुषीत व पेशाने (बहुतेक) शिक्षिका असलेल्या एका विदुषीने तो मेसेज पाठवला होता. खरं तर मराठी भाषा या विषयाशी संबंधीत ग्रुपवर तो मेसेज येण्याचं प्रयोजन मला समजलं नाही. मी स्वत: जात मानत नाही आणि माझ्या पुरतं जातीचं तथाकथीत उच्चनिचत्वही मानत नाही आणि म्हणून झाल्या प्रकाराचा निषेध केला होता. त्या ग्रुपमधल्या आणखीही चार-पाच जणांनी निषेध व्यक्त केला, पण तेवढंच. मी लगेच त्या ग्रुपमधून बाहेर पडलो व तेंव्हापासून त्या ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणणाऱ्या व्यक्तींपासूनही अंतर राखून वागू लागलो, त्यामुळे तिथे पुढे काय झालं ते मला समजलं नाही. अर्थात एका मेसेज वरुन सर्वांना जोखणं योग्य नाही हे मला समजतं. पण, एकाने मनातलं बोलून दाखवलं, इतरांच्या मनात तसं नसेल हे कशावरून, ही शंका मनात राहिली ती राहिलीच..!
आज हे आठवायचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण व त्यावर सोशल मिडियात उमटलेले याच अर्थाचे पडसाद. ह्या पडसादांच प्रमाण कमी आहे, पण आहे.
मला कुणालाही आरक्षण मिळाल्याचं दु:ख नाही आणि सुखही नाही. ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना समानतेच्या तत्वाच्या पालनासाठी जे जे करणं शक्य आहे, ते ते केलं पाहिजे यात दुमत नाही. जनतेचं जे काही भलं-बुरं करायचं ते सरकार करतच असतं. किंबहूना ‘सरकार करतं’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. मग आजच्या मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्याचं श्रेय अर्थातच सरकारचं असायला हवं आणि आहे. आपणही तसं म्हणायला हवं ही अपेक्षा झाली. सरकारचा मुख्य या नात्याने ते श्रेय मुख्यमंत्र्यांचं हा युक्तीवादही मान्य. मग असं असताना काहीजण तसं न म्हणता, काहीजण ते एका ‘ब्राह्मणाने दिलं’ किंवा ‘ब्राह्मण मुख्यमंत्र्याने दिलं’ असं का म्हणतात ते मला कळलं नाही..! काहीजण तसं थेट न म्हणता, हेच म्हणणं आडवळणाने म्हणतात.
दोष ब्राह्मणांचा नाही, तर आपल्या एकूणच समाजाच्या मानसिकतेचा आहे. इथे ब्राह्मणाऐवजी मुख्यमंत्री इतर कोणत्याही जातीचे असले असते तरी हेच झालं असतं, एवढी जात आपल्या अंगात आणि मनात भिनली आहे. इथे प्रत्येकजण आपल्या जातीला मोठ समजायला लागलाय. महाराज मराठा जातीत जन्माला आले म्हणून मराठ्यांना कोण अभिमान..! अभिमान असायलाही हरकत नाही, पण महाराजां एवढे जाऊद्या, त्यांच्या नखाच्या पासंगाला पुरेल एवढ तरी आपलं कर्तुत्व आहे का याचा विचार कोण करणार? हेच सर्व जातींमध्ये आहे. आपल्या समाजाचं एकूण वातावरणच केवढं कलुषित आणि म्हणून प्रदुषित झालंय, याचं हे एक उदाहरण. आपलं काहीच कर्तुत्व नसताना प्राप्त झालेल्या कोणत्याही जातीबद्दल एवडा अभिमान किंवा लाज बाळगण्यासारखं काय आहे, ह्याचा विचार कुणालाच का करावासा वाटत नाही..!
मुख्यमंत्री या नात्याने श्री. देवेन्द्र फडणवीसांची कामगिरी अत्यंत दमदार आहे यात मला कोणतीही शंका नाही. पण ती मुख्यमंत्री म्हणून आहे की ब्राह्मण म्हणून? मुख्यमंत्र्यांचं फक्त ब्राह्मणत्व पाहून त्यांना शाबासकी देणारे आपल्याच मुख्यमंत्र्यांचं अवमुल्यन करत आहेत, याचं तसं करणारांना भान नसावं असं वाटतं. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान वाटणाऱ्या त्यांच्या ब्राह्मणेतर चाहत्यांनी, त्यांचा अभिमान मुख्यमंत्री म्हणून बाळगावा की ब्राह्मण म्हणून, असंही अशा पोस्ट वाचल्यानंतर मनाशी वाटून जातं..!
मुख्यमंत्र्यांच्या जातीवरुन त्यांना डोक्यावर घेणारे आणि त्याच कारणाने त्यांना पाण्यात पाहाणारे, यांच्या मनात जातीवाद व जातीच्या उच-निचतेच्या कल्पना किती घट्ट रुजल्या आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे (यात सुशिक्षित आणि अशिक्षित असे दोघेही एकाच वैचारिक पातळीवर आहेत. जातीमुळे किमान या एका बाबतीत तरी आपल्यात समानता आली असं म्हणायला हरकत नाही.). अशी दुभंगलेली मनं आणि फूट पडलेला शिक्षित अडाण्यांचा समाज सोबत घेऊन, भारतमाता जागतिक महासत्ता कशी काय बुवा होणार, हा पुढचा प्रश्न माझ्या मनात उभा राहातो.
देशाला महासत्ता बनवायचं तर सर्वच समाजाने एकजुटीने प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी मनं जुळावी लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीचे सहकारी सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले;कारण त्यांचं व मावळ्यांचं ध्येय निश्चित होतं. जाती-पातीला अतोनात महत्व असणाऱ्या काळात महाराजानी हे करुन दाखवलं (महाराजांना आज जातीच्या चौकटीत बसवणारांचा मी नेहेमीच लेखी निषेध केला आहे.). महाराजांनंतर आज जवळपास ३५० वर्षांनी आपण पुढारलेले व जातीपातीच्या बुरसट कल्पना मागे सोडून पुढे येणं अपेक्षित असताना, आपण महाराजांच्याही काळाच्या मागे असल्यासारखं वागू लागलोय. आज प्रत्येकजण मनातून दुसऱ्यापेक्षा स्वत:ला मोठा समजतोय आणि दुसऱ्याला लहान, मग असा लहान-मोठ्यात मानसिक विभाजन झालेला समाज एकजुटीने पुढे कसा जाणार आणि ती हिन्दू एकता वैगेरे कशी होणार? ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा आपण देतो. पण अशा जातीयतेने बरबटलेल्या पोस्ट पाहिल्या, की त्या वसुधेचं काय होईल ते होऊ दे, पण ‘भारतैव कुटंबकम’ कसं होणार याची चिंता लागून राहाते. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे प्रतिज्ञेतील शब्द किती बेगडी आहेत, हे यातून समजतं.जातीचा उन्माद आपल्याला विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. उन्मादी समाज कधीच शहाणा नसतो..
आपण लहानपणापासून सर्व माणसं, अगदी स्त्रीयाही (हे मी मुद्दाम नमूद करतोय. अनेकजण स्त्रीयांना कमअक्कल समजतात), बुद्धीने सारखीच आहेत असं शिकत असतो. तशी ती आहेतही हा अनुभवही आपण मोठं होत असताना घेत असतो. असं असताना अशा पोस्ट्स वाचायला मिळाल्या तर आपण लहानपणापासून जे शिकत आलो ते खोटं होतं की काय, असा विचार मनात येऊन मनाला यातनांशिवाय काहीही होत नाही.
ही पोस्ट मी लिहू की नको, यावर मी बराच विचार केला. जवळपास वर्षभर मला यावर निर्णय घेता येत नव्हता. विषय अत्यंत संवेदनशील. शिवाय लोक मला नेमकं काय म्हणायचंय हे समजून न घेता माझ्यावर तुटून पडणार किंवा माझी वाहवा करणार. माझे अनेक मित्र या पोस्टमुळे नाराज होण्याची दाट शक्यता (पण तसं झालं तर ते मला काय म्हणायचंय हे समजून न घेतल्यामुळे झालं असं मी समजेन). पुन्हा पोस्टची संवेदनशीलता व त्यातून येऊ शकणाऱ्या नाराजीचा विचार करुन न लिहावं तर माझ्याच मनाला यातना. शेवटी माझ्या मनाची शांती महत्वाची हा विचार केला, मनाचा हिय्या केला आणि ही पोस्ट लिहिली.
मला जे म्हणायचंय, ते मी स्पष्ट लिहिलंय. मी जातीपातीचा अभिमान किंवा लाज किंवा माजही बाळगणारा नाही आणि तसा अभिमान, लाज किंवा माज असणारांना काय वाटेल याचा विचार करायची मला या क्षणाला फार गरजही वाटत नाही. त्यामुळे कुणाला वाईट वाटेल किंवा कुणाला बरं वाटेल किंवा कुणाला आणखी काय वाटेल किंवा यातून कोण काय अर्थ काढेल याचा विचार न करता लिहिलं आहे. ज्यांना समजून घ्यायचंय त्यांनी ते घ्यावं, बाकीच्यांना मी काहीच बोलणार नाही.
पाहू आता माझी मित्र यादी किती रिकामी होते ती..!!
-©नितीन साळुंखे
9321811091
1. सोबत मला दिनांक १६.०८.१७ रोजी ग्रुपवर आलेल्या मेसेजचा स्क्रिन शाॅट.
2. काल फेसबुकवर आलेले काही संदेश उदाहरणादाखल. या अर्थाच्या पोस्ट आपणही फेसबुकवर वाचल्या असतील.
नांवं मुद्दाम खोडली आहेत. मला व्यक्ती नाही, तर वृत्ती दाखवायची आहे..
त्यांनी मारीला तुका,बुडविली गाथा,
फोडीला माथा ज्ञानाचाही।
येता जिजाऊ चे मुलं,
लागली स्वराज्याची चाहूल,
देऊनी विष अन भूल सम्पविले त्यांसी।
मग येता छत्रपतींचा छावा,
धरणीवर दूबारा न व्हावा,
मग तयांनी करोनि फितुरी,पाठीत छुरी मारुनीया,
करोनि औरंग्याची हुजुरी,
केले छिन्न विच्छिन्न शम्भूसी।
मग येता गोऱ्यांचा काळ,
दाखवावे एकीचे बळ,
तरी करिती अशस्पृशांचा छळ,
नाही आपुल्यातच मेळ,काय करू।
उगवता ज्योतिबा फुले,
शिकली गरिबांची मुले,
चिखल द्वेषाचा झेले ,
जाहला अपमान कर्मठाकडुन।
उजाडला आजचा दिवस,
तरीही चालु थोतांड,नवस-सायास,
म्हणती दगडातच वसे ईश्वर,
मग कोठे गेला ओंकरेश्वर,
का ना तारले दाभोळकरासी।
जरी उचलले हत्यार,आता थोपवा कट्टर,
कितीही दावा बंदूक,कट्यार अन तलवार,
आहे त्यासम धार लेखणीत माझ्या।
-विशाल यशवंत फटांगरे
https://www.facebook.com/tathyamarathi/
LikeLike