आभाळागत माया तुमची
माझ्यावरी राहू दे..!
काल-परवाच झालेल्या माझ्या वाढदिवसानिमित्त मला तुम्हा सर्वांच्या प्रचंड प्रमाणात शुभेच्छा मिळाल्या. अजुनही शुभेच्छा येतच आहेत. भारावून जाणं म्हणजे नक्की काय असतं, हे मी गेले दोन दिवस अनुभवतोय..माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांचा मी ऋणी आहे. हे माझं मनोगत तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आहे..
समाजातील सुप्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली, सत्ताकारणी नेते, अभिनेते इत्यादी व्यक्तीमत्वांना विविध कारणांसाठी जाहीर शुभेच्छा देण्यासाठी मी पुढे की तू पुढे अशी झुंबड उडते. नाक्या नाक्यांवर शुभेच्छांचे मोठमोठाले बॅनर्स लागतात. त्यांना या शुभेच्छा देणाऱ्यांतल्या सर्वांचंच काही त्या त्या व्यक्तींवर प्रेम असतंच असं नव्हे. बऱ्याचशा शुभेच्छा त्यांची कृपादृष्टी स्वत:वर राहावी, त्यांच्याकडून काहीतरी कंत्राट किंवा जिंदगी बनानेवालं एखादं काम मिळावं किंवा गेला बाजार एखादा पुरस्कार मिळतो का ते पाहावं, अशा अपेक्षा असतात असं माझं निरिक्षण आहे.
या उलट समाजासाठी तळमळीने काही काम करणारांना शुभेच्छा देण्यासाठी कधी झुंबड उडालेली माझ्या ऐकीवात नाही किंवा बॅनर्स लागल्याचं पाहाण्यात नाही. मुळात समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्ती मुळातच आता फार कमी आहेत आणि आहेत त्यांना या दिखावूगिरीची गरज नाही. त्यांचं काम बॅनरबाजी न करताही सुरु असतं. त्यांनाही शुभेच्छा देणारा एक मोठा वर्ग असतो आणि त्यांचं काम शांतपणे सुरू असते. वरील व्यक्तींप्रमाणे कोणताही दिखावू कर्कशपणा त्यात नसतो.
मी वरील दोन्ही प्रकारात बसत नाही. राजकारणात किंवा अति वरिष्ठ पदावर नसल्याने माझ्याकडून कुणालाही काहीही भौतिक लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. तसंच मी प्रकाश आमटेंसारखी स्वत:ला वाहून घेऊन समाजाची सेवा करतोय आणि त्या मुळे समाजाचं काही भलं होतंय, अशातलाही भाग नाही. मी एक साधं, सामान्य माणसाचं जीवन जगणारा माणूस आहे. चार शब्द लिहिता येतात हिच काय ती माझी जमेची बाजू. पुन्हा त्यात काही कवतुकही नाही. कारण आजवरच्या माझ्या आयुष्यात वाचन ही एकच गोष्ट आवडीनं केलेली असल्यानं , मी लिहू शकलो तर त्यात काही विशेष नाही. बरं माझं हे लेखन काही कुणात स्फुल्लिंग वैगेरे जागवणार किंवा अलम समाजाला दिशा देणारं असामान्य असतं असंही नाही. रोजचं जीवन जगताना येणारे अनुभव, समाजात दिसणारा उणेपणा, वागण्यातला दुटप्पीपणा, गतायुष्यातल्या काही आठवणी इत्यादी साध्या शब्दांत मांडणं हिच काय ती माझी कला. माझं हे लिखाण जर तुम्हाला भिडत असेल, तर ते त्यातल्या अनुभवांमुळे. कारण माणूस लहान असो की मोठा, रोजचं जिवन जगताना त्याला अनुभवायला लागणारे प्रसंग किंवा प्रापंचिक जिवनातले अनुभव साधारणत: सारखेच असतात. माझ्या लिखाणात येणारे असे अनुभव तुम्हाला आपले वाटतात, याचं श्रेय माझं नव्हे, तर त्या अनुभवांचं..
२० डिसेंबर रोजी मला प्रचंड प्रमाणात शुभेच्छा आल्या. मेसेज आले, यशवंत सावंतभोसले भर दुपारी गुलाबपुष्प घेऊन भेटायला आले, फोनवर बोलताना तर उसंतच नव्हती. इतक्या साऱ्यांना आभाराची उत्तरं देताना माझ्या फोन सारखा आचके देऊ लागला. हे कठीण होतं सारं, पण गोडंही वाटत होतं, हे खरंच..! स्तुती कुणाला आवडत नाही हो, मलाही आवडते. उगाच ताकाला जाऊन भांड लपवणं मला आवडत नाही. मी खुश झालो होतो.
शुभेच्छांचं एकवेळ मी समजू शकतो, पण माझ्यावर काही जणांनी लेख लिहिले. माझ्या वाढदिवसाला ‘झी २४ तास’ या वाहिनीचे स्टार वृत्त निवेदक व माझे मित्र ऋषी देसाई, दीपक पाटेकर, नकुल पार्सेकर, अशफाक शेख, प्रकाश सावसकडे, संजय कदम, भानुदास उकरांदे, मनोज करंजवणे-देशमुख, संदीप जाचक, मिलिंद खोत, चंदन विचारे यांनी माझ्याविषयी लिहिलेली लघु-दीर्घ मनोगतं, सिद्धहस्त कवयित्री श्रीमती वैशाली पंडीत यांनी केलेली कविता, स्वप्नीलराज म्हात्रे यांने खास माझ्यासाठी प्रथमच रचलेली चार कडवी व त्यासाठी सुशांत विश्वासरावानी काढलेलं माझं चित्र, जगदीश दळवी व सुभाष बांदिवडेकरांनी माझ्या फोटोंचे केलेले डेकोरेशन इत्यादी पाहून मी अवाक् होणं अगदी नैसर्गिक होतं. मी अवाक् झालो ते लेखा-कवितांमुळे नाही, तर त्यातील माझ्यासाठी असलेल्या विशेषणांमुळे. त्या मनोगत-कडव्यांमध्ये लिहिलेले कित्येक गुण माझ्यात आहेत की नाही हा विचार करणं मला आता भाग आहे. माझ्यात ते गुण नसतील किंवा अगदी अल्पांशाने असतील तर ते मला अंगी बाणवावे लागतील किंवा असल्यास त्यांची वृद्धी करावी लागेल. माझ्या मित्रांचं माझ्याबद्गलचं म्हणणं खरंच आहे हे सिद्ध करणं आता माझी जबाबदारी आहे असं मी कृतज्ञ भावनेनं समजतो..माझ्या केल्या गेलेल्या स्तुतीने मी खुष झालो असलो तरी, त्याने माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव मला नव्याने झाली. माझ्या वाढदिवसाच्या निनित्ताने मला माझ्या मित्रांकडून मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे असं मी समजतो..!!
आपल्या समाजात कोणाही व्यक्तीबद्दल सरसकट चांगलं बोललं जाण्याची प्रथा फक्त स्मशानात किंवा पांढरे कपडे घालून ‘साजऱ्या’ केल्या जाणाऱ्या शोकसभांतून किंवा मग जीवनगौरव पुरस्कार प्रदान प्रसंगी दिसते. मला तर जिवंतपणीच आणि चांगला कार्यरत असतानाच हे भाग्य प्राप्त झाले. हे भाग्य मला प्राप्त झालं, ते माझ्या शब्दांमुळे..!
मी अक्षरांच्या देवाची पुजा बांधली. शब्द हे त्या अक्षरांच्या देवाचं मूर्त स्वरुप आहे, तर तुम्ही वाचक हे त्याचं प्रकट स्वरुप..मी घातलेली पुजा अक्षरदेवापर्यंत पोहोचतेय व म्हणून कदाचित तुम्हा सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकट स्वरुपात मला दर्शन दिलं असेल. तुम्ही माझ्यासाठी भगवंतापेक्षा कमी नाहीत..भगवंत प्रसन्न झाला तरच आपल्याला प्रकट स्वरुपात दर्शन देतो, असं पुराणांत वाचलं होतं, परवा २० डिसेम्बरला ते अनुभवलं.
.
मी इथे मी पुजा बांधणारा याचकाच्या रुपात आहे तर तुम्ही वाचक माझ्या भगवंताच्या..माणूस कोणत्याही दैवताची पुजा बांधताना त्याला काही तरी प्राप्त व्हावं म्हणूनच बांधत असतो.
मी तुमचं प्रेम मिळावं या एकमेवं हेतून ही सरस्वतीची आराधना केली होती..
बहिणाबाईंच्या शब्दांत थोडा बदल करून व्यक्त व्हायचं तर,,
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात वाचकबापा दाये अरूपाच रूप !!
माझ्या तुमच्या आणि तुमची दिलेल्या शुभेच्छांप्रति नेमक्या याच भावना आहेत…
असच तुमचं प्रेम मला चिरंतन लाभो ही तुमच्याकडे प्रार्थना
अक्षरांच्या देवा तुला
शब्द शब्द वाहू दे,
आभाळागत माया तुमची
माझ्यावरी राहू दे
हीच काय ती मागणी…
धन्यवाद..!!
– नितीन साळुंखे
9321811091
(छायाचित्र श्री. त्रिकाल अडसड यांच्या वॉल वरून.. )