इंद्रजीत खांबे; निराकारातून आकाराकडे..!!

आता नक्की आठवत नाही, पण मार्च महिन्याची २० किंवा २२ तारीख असावी. ‘लोकसत्ते’त ‘कणकवलीच्या छायाचित्रकाराचं जगभरात कौतुक’ ही बातमी पाहिली. कणकवली म्हणजे माझ्या सिंधुदुर्गातलं. गांवची बातमी म्हटली, की मी ती वाचतोच. मी ती बातमी वाचली. कणकवलीतले छायाचित्रकार श्री. इंद्रजीत खांबे यांना ‘अॅपल’ या जगप्रसिद्ध अमेरीकन कंपनीकडून, त्यांच्यासाठी फोटो काढण्यासाठी करारबद्ध केल्याची ती बातमी होती. ‘अॅपलने करारबद्ध केलेले, ते देशातील एकमेंव छायाचित्रकार आहेत’ असाही गौरवोद्गार त्या बातमीत काढलेला होता.

मी कायमस्वरुपी मुंबईत मुक्कामाला असलो तरी, माझं मूळ असलेल्या सिंधुदुर्गातल्या कला जगताशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. मला मुळातच कलांची आवड असल्याने, एखाद्या कलावंताशी ओळख असणं, हा मी माझा बहुमान समजतो. कला याचा अर्थ माणसाला व्यक्त होण्यास वाव देणारं लेखन, कवीता, चित्र-शिल्प-नाट्य इत्यादी कोणतंही माध्यम. सिंधुदुर्गातल्या अशा बहुतेक क्षेत्रातल्या कलावंतांना मी ओळखतो, पण इंद्रजीत खांबे हे नांव मी प्रथमच ऐकलं होतं आणि ते ही फोटोग्राफी क्षेत्रातलं..!

सिंधुदुर्गात आमचा चारचौघांपेक्षा वेगळा विचार करणारा, ‘आम्ही बॅचलर’ हा एक व्हाट्सअॅप ग्रूप आहे. ‘दै. तरुण भारत’चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमूख श्री. विजय शेट्टी या कल्पक माणसाच्या डोक्यातून ह्या ग्रुपने जन्म घेतला आहे. या ग्रुपमधले बहुतेक सर्वच सदस्य कुठल्या न कुठल्या क्षेत्रात नांव राखून असलेले आहेत. प्रत्येकाचा पिंड एकमेंकांपासून अगदी भिन्न, मात्र दुसऱ्याच्या विचारांचा आदर करण्याचा स्वभाव मात्र सारखा. या समूहातील बहुसंख्य सदस्य काम-व्यवसायात विविध क्षेत्रात असले तरी कलागताशी नजिकचा संबंध ठेवून असणारे. म्हणून मी या समूहात ‘इंद्रजीत खांबे कोण’ अशी चवकशी केली. दुसऱ्या क्षणाला अॅडव्होकेट विलास परबांनी इंद्रजीत खांबेंची माहिती व खांबेंचा नंबर पोस्ट केला. इकडे त्याच ग्रुपातला, परंतु माझा जुना दोस्त बाळू मेस्त्रीने मला माझ्या वैयक्तिक नंबरवर इंद्रजीत खांबेंचा नंबर पाठवला. मी या ग्रुपवर इंद्रदीतना भेटायची इच्छा व्यक्त केली. अशाच स्वरुपाची इच्छा आमच्या ग्रुपमधील इतरांनीही व्यक्त केली आणि पुढच्या काही वेळातच अॅड. विलास परब आणि श्री. विदय शेट्टीनी, कणकवलीत विजय सावंतांच्या घरात १४ एप्रिलला इंद्रजीत खांबेंसोबत आमच्या गप्पा गोष्टींचा एक लहानसा कार्यक्रम आयोजित केला. आमच्या ग्रुपमधल्या अनेकांना या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती, पण त्यांच्या त्यांच्या काही अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत. शेवटी आम्ही पाच-सहाजण या कार्यक्रमास गेलो.

इंद्रजीत खांबे त्यांच्या पत्नीसह आले होते. इंद्रजीतशी गप्पांची सुरुवात झाली आणि उलगडत गेला इंद्रजीतचा सिंधुदुर्गातल्या केशरी आंब्यापासून सुरू झालेला लालबूंद अमेरीकन ‘अॅपल’ पर्यंतचा प्रवास..

कला जन्म घेते, ती मनाच्या अस्वस्थ अवस्थेत. इंद्रजीतची फोटोग्राफीची सुरुवातही अशीच अस्वस्थतेतून झाली. इंद्रजीतचा स्वत:चा व्यवसाय होता. चार पाच माणसं त्याच्या हाताखाली काम करत होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर, चांगलं बस्तान असलेला व्यवसाय असुनही, काही तरी वेगळं करायची उर्मी अधून-मधून त्याच्या मनात उसळी मारायची, पण ती तेवढ्यापुरतीच. पुढे पुढे ही उसळी त्याला स्वस्थ बसू देईना आणि मग काय करावं याचा विचार सुरु असतानाच, त्याच्या मनाने नाटक करायचा विचार केला. खरं तर लौकीकार्थाच्या दृष्टीने हा अविचारच. पण अविचाराने वागणार नाही, तो हाडाचा कलावंतच नाही, असं मी मानतो. विचार करुन कला प्रसन्न होत नसते. इंद्रजीतचंही तसंच झालं..!

इंद्रजीतने कणकवलीचं आचरेकर प्रतिष्ठान जाॅईन केलं आणि नाटकं सुरू झाली. काहा दिवस गेल्यावर, त्याला तिथेही स्वास्थ्य लाभेना. एखादं नाटक करायचं ठरलं, की त्याच्या फार तर महिनानाभर आधी स्क्रिप्ट शोधण्यापासून तयारी व्हायची. स्क्रिप्टही कमीत कमी स्त्री भुमिका असलेली पाहायची, कारण सर्वच हौशी कलावंत असल्यामुळे, ते आपापल्या सोयीने तालमींकरता येणार. त्यात स्त्रीयांच्या आणखीनच अडचणी. एवढं सगळ केल्यावर उगाच केल्यासारखं म्हणून नाटक घालायचं, हे काही इंद्रजीतला जमेना. त्याची स्वप्न मोठी होती. ‘अविष्कार’ किंवा अतुल पेठेंसारख त्याला नाटक जगायचं होतं, केवळ करायचं नव्हतं. पण ते शक्य होईना, काही दिवस झाल्यावर तो कंटाळला आणि नाटकाच्या मार्गाला गुडबाय केलं आणि पुन्हा आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागला..

पुन्हा तो व्यवसायात रमला तरी, त्यात मन काही रमत नव्हतं. काही तरी करायचं, पण काय ते सुचेना. असंच एकदा विचार करत मोबाईलशी खेळत असताना, त्याच्या डोक्यात फोटोग्राफी करायचं अचानक क्लिक झालं. फोटोग्राफीत आपण आपल्या मनाचे मालक. कुठला ग्रुप नको, की कुणी सवंगडी नको. कुणावर अवलंबत्व नाही, हा मोठा फायदा. आपल्या वेळेनुसार, सवडीनुसार फोटो काढावेत, मनाला वाटेल त्या ठिकाणी जाऊन फोटो काढावेत. बस्स, आता पक्क ठरलं, फोटोग्राफीच करायची आणि इंद्रजीत सुटला. अचानक मन शातं झालं. देवाने आपल्या बाजुने कौल दिला, की कसं वाटतं, तसंच इंग्रजीतला वाटलं. तनामनात आत्मविश्वास भरून आला आणि त्या नंतरच्या लगेचंच काही दिवसात इंद्रजीत कॅमेरा घेऊन निघाला, कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपलं स्वत:चंच मन टिपायला. साल होतं २०१२..!

इंद्रजीतने पहिला दोरा केला तो पंढरपूर, सोलापूर, बीड, म्हसवड ह्या दुष्काळी भागाचा. स्वत:च्या मनाने जगायचं, तर ‘दुष्काळा’चा सामना करावा लागतो, त्याचा हा जणू संकेत होता. ह्या दौऱ्यात इंद्रजीतने अनेक छायचित्र टिपली. पंढरपूरला त्याला वयाने जराजर्जर झालेले आजोबा भेटले. ‘पुता, आमच्या नशिबीच दुष्काळ लिवलेला हाय बग, आता त्या पांडुरंगाचाच आसरा’ असं म्हणत निराश झालेले. त्यांच्या नशिबातला दुष्काळ त्यांच्या भेगाळलेल्या कपाळावर स्वच्छ लिहिलेला इंद्रजीतला दिसला आणि त्याही परिस्थितीत त्यांचा ज्यावर दुर्दम्य विश्वास होता, तो त्यांचा त्राता पांडुरंगही तिथेच वास करुन असलेला दिसला. ‘अत्यंत बोलकं हे छायाचित्र सोबत दिलेलं आहे). दुष्काळाचे त्याने टिपलेले असे अनेक फोटो आम्हाला इंद्रजीतने दाखवले.

पुढे त्याने केलेल्या फोटोच्या अनेक सिरिज त्याने दाखवल्या. त्या त्या फोटोमागची त्याची कल्पना आणि भावनाही त्याने उलगडून दाखवली. स्वत:च्या पत्नीच्या गरेदरपणाच्या सातव्या महिन्यात उद्भवलेल्या अडचणींचा सर्व प्रवास इंद्रजीतने ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’ या शीर्षकाखाली कॅमेराबद्ध केलेला त्याने आम्हाला दाखवला..मला त्यातलं फार काही कळलं नसलं तरी, या सिरिजचं शीर्षक मात्र जाम आवडलं, ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’..! स्त्रिची प्रसूती म्हणजे प्रश्नचिन्हच असतं. कशी होईल इथपासून ते काय होईल आणि जे होईल, ते व्यवस्थीत असेल ना, इथपर्यंत अनेक प्रश्न या दरम्यान सतावत असतात. शिवाय पोटुशी स्त्री, एका बाजूनं पाहिली असता, दिसतेही प्रश्नचिन्हासारखी..! त्यात त्यांच्या पत्नीच्या गर्भारपणात काही अडचणी निर्माण झाल्याने, प्रश्नचिन्हाखाली असलेलं टिंब जरा जास्तच गडद झालेलं होतं. इंद्रजीतच्या पत्नीचा व त्यांचा स्वत:चाही ह्या गडद टिंबाच्या प्रश्नचिन्हामागे धावण्याचा प्रवास, कृष्न-धवल फोटोंत त्यांनी फार सुरेख पकडला होता..! रिझल्ट लागेपर्यंत त्यांच्या मनातही कृष्ण-धवल भावनाच होत्या, त्याचंच प्रतिबिंब ती छायचित्र होती..!

या व्यतिरिक्त मातीतून जन्म घेणारे आणि त्याच मातील पाठ लागू नये याची काळजी घेणारे कोल्हापूरच्या तालमीतले मल्ल, दापोली नजिकच्या बुधल गांवातल्या, घरबांधणीपासून मासेमारी करणाऱ्या महिला, ‘हिरवी’ गांय अशा अनेक सिरिज, त्यांच्या जन्मकथा आम्हाला इंद्रजीतने दाखवल्या, उलगडून सांगितल्या. शेवटी ती त्याची प्रसिद्ध सिरिज आली. आमच्या सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत श्री. ओमप्रकाश चव्हाण यांच्यावर केलेली..

ओमप्रकाश चव्हाण हे सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत. स्त्री भुमिका करणारे. यांच्यासोबत इंद्रजीत सतत २-२.५ वर्ष सावलीसारखे वावरले. त्यांचेअसंख्य फोटो काढले. नेहेमीचं आयुष्य जगताना काढले, तसंच भुमिकेत शिरल्यानंतर त्यांच्यात झालेला अमुलाग्र बदलही त्यांनी नजाकतीने टिपला. जातीवंत पुरुषाचं रुपांतर, तेवढ्याच जातीवंत स्त्रीमधे होतानाचे इंद्रजीत साक्षिदार आहेत. ओमप्रकाश चव्हाण एकदा का स्त्रिवेशात शिरले, की त्यांच्यातला पुरुष जणू लुप्त व्हायचा. इतका की, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या वावरण्यात, कपडे बदलण्यात एक स्त्रीसुलभ सहजता यायची. ‘हा पुरूष आहे’ हे सांगुनही तिऱ्हाईताने ते मान्य केलं नसतं, एवढे ओमप्रकाश अमुलाग्र बदलून जायचे. ओमप्रकाशजींचं हे एका क्षणात होणारं ट्रान्सफाॅर्मेशन इंद्रजीतने अनेकदा अनुभवलं आणि आलेला प्रयेक अनुभव पहिल्यापेक्षा अद्भूत होता..

ओमप्रकाशजींचा पुरु-स्त्री-पुरुषात होणारा प्रवास उलगडून दाखवणारा एक आणि एकमेंव फोटो इंग्रजीतना त्यांच्यासोबतच्या दोन-अडीच वर्षांत टिपता आला. तसा फोटो पुन्हा मिळाला नाही. तो फोटो सोबत देतोय.

ह्या फोटोत भुमिकेतून बाहेर आल्यानंतर ओमप्रकाश साडी सोडताना दिसतो. अंगावरचे दागीने अद्याप उतरवलेले नाहीत. अंगात ब्लाऊज नाही. ह्या फोटोतील ओमप्रकाशजींची साडी बदलताना जी सावली भिंतीवर पडलीय, त्यात या फोटोचं आणि ओमप्रकाशजींच्या जगण्याचं अवघं मर्म इंद्रजीतने नेमकं पकडलं आहे. इद्रजीतच्या एकूणच फोटोंत सावल्यांचा खेळ जास्त बोलका आहे. पण ओमप्रकाशजींची अवघी कहाणी सांगणारा हा फोटो मला जास्त बोलका वाटला..साडी सोडता सोडता, त्यांच्यातली स्त्री हळुहळू झाड सोडत असताना त्या स्टील फोटोत मला दिसली..साडी सोडतानाच्या ओमप्रकशजींच्या भिंतीवरच्या सावलीत, स्त्री शरिराची सगळी वळणं उतरलीयतं. नुसती सावली पाह्यली असता, ती स्त्रीच आहे असं कुणालाही वाटेल. परंतु फोटोतल्या ओमप्रकाशजींच्या छातीवरचं जावळ त्यांची स्त्री असण्यापासूनची फारकत दिसतेय..

विज्ञानातलं एक महत्वाचं तत्व या फोटोत मला दिसलं. पुरुषात x आणी y क्रोमोझोन्स असतात आणि स्त्रीमधे दोन x, असं विज्ञान सांगते. याचा अर्थ सर्व पुरषांत एक सुप्त स्त्री असतेच, असा मी घेतो आणि नेमकं तेच इंद्रजीतने टिपलेल्या ओमप्रकाशजींच्या या फोटोत मला दिसलं. पुरुषांत स्त्री असते म्हणूनच अर्धनारी-नटेश्वर होतो, सिता-राम होतो, राधा-कृष्ण होतो, उमा-महेश होतो. ही नांव उलटी वाचली जाऊ शकत नाहीत. ओमप्रकाशींचं हे स्त्री आणि पुरुषामधलं, दोघांचाही आब राखूनचं, जगण दाखवलेला हा इंद्रजीतने टिपलेला फोटो, मला सर्वात जास्त आवडला..!!

त्या दोन-तीन तासांत काही तरी वेगळं करु पाहाणाऱ्या, कणकवलीसारख्या कोकणतील एका छोट्या शहरातील एका अस्वस्थ माणसाचा जगप्रसिद्ध छायाचित्रकारापर्यंत झालेला प्रवास उलगडला. निराकाराकडून आकाराकडे झालेला हा प्रवास सोपा नव्हता. वर कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, स्वत:च्या मनाला न्याय द्यायचा, तर जीवनात दुष्काळ सदृष परिस्थितीला तोंड द्यायची तयारी लागते. तशी तयारी इंद्रजीतने ठेवली, आणि त्याला लहान-लहान गोष्टीतला आनंद दिसू लागला. मग कणकवलीतल्या गडनदीतील दगडांत त्याला कन्याकुमारीचं शिल्प दिसलं आणि सावंतवाडीच्या नरेन्द्र डोंगरात त्यांना कांचनगंगा दिसलं. अशी दिव्य दृष्टी प्रत्येक संवेदनशील कलावंताला आपोआप लाभत असते आणि मग दुष्काळाचा सदैव सुकाळ होतो. इंग्रजीतला अशी दृष्टी लाभलीय..!

सच्ची अस्वस्थता योग्य मार्ग सापडला असता माणसाला किती उंचीवर घेऊन जाऊ शकते, ह्याचं इंद्रजीत हे उत्तम उदाहरण..! काहीतरी करु पाहाणाऱ्या इंद्रजीतचा प्रवास, आणखी छान करु कडे सुरू झाला आहे..

बहुतेक सर्व फोटो त्याने मोबाईलने टिपलेत, हे आम्हाला त्यांने वारंवार सांगुनही खरं वाटेना. यापुढे जाऊन जेंव्हा इंद्रजीतने सांगितलं, की त्याला ‘अॅपल’चं मिळालेलं प्रतिष्ठेचं काम, त्याने मोबाईलवर काढलेल्या फोटोमुळेच मिळालंय, तेंव्हा मला फक्त झीट यायची बाकी होती. इंद्रजीतचं पुढचं म्हणणं, मला अधिक पटलं. तो म्हणाला, की डोक्यात पक्का झालेला विचार जेंव्हा नजरेत उतरतो, तेंव्हा तंत्र आणि साधन दुय्यम ठरतं. तुमचा विचार पक्की असेल, तर तुम्ही साध्या कॅमेऱ्यानेही विष्य स्पष्टपणे मांडणारा फोटो काढू शकता आणि तोच पक्की नसेल, तर मग कितीही महागडा कॅमेरा घ्या, तुम्ही फक्त फोटो काढू शकाल, त्यात मॅटर असेलच असं नाही.

चित्रकार नामानंद मोडक यांनी रेखाटलेलं इंद्रजीतचं फ्रेमबद्ध केलेलं केलेलं अर्कचित्र आम्ही या भेटीची आठवण म्हणून इंद्रजीतला नजर केलं..!

इंद्रजीतने गप्पांचा शेवट अगदी सोप्या भाषेत गहन तत्व सांगून केला. इंद्रजीत म्हणाला, विचार आणि महत्वाचा, तंत्र आणि साधन दुय्यम..! हेच तत्व सर्व कलांना आणि कलावंतांना सारखंच लागू होतं. मला तुरुंगातल्या भिंतींवर महाकाव्य लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आठवले उगाचंच..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

22.04.2019

खांबेने तस नाटक सोडलेले नाही. आचरेकर प्रतिष्ठान या नामवंत संस्थेत काम करतोय.

‘नोटा’;लोकशाहीच्या बाळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल- (उत्तरार्ध)

(उत्तरार्ध)

‘नोटा’;लोकशाहीच्या बाळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल –

‘नोटा’ वापरणारे कोण असतात? माझं मत..!

ज्यांना जो पक्ष आवडतो, त्याना मतदार मतदान करत असतो. काहीजण पक्ष कुठलाही असे, आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करत असतो. अशांना देशापेक्षा जात महत्वाची वाटते. काही आपल्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो. काही पक्षांची पारंपारीक मतं असतात, ती काही झालं तरी त्या पक्षाच्या उमेगवारालाच जातात . पक्षाची ध्येय-धोरणं काय आहेत, त्या ध्येय-धोरणांवर पक्ष चाललाय का, पक्षाचं नेतृत्व कोण आहे, ते कार्यक्षम आहे किंवा नाही, याचा हे मतदार अजिबात विचार करत नाहीत. हे त्या पक्षाच्या आंधळ्या प्रेमात असतात.

विकले गेलेले मतदार हा एक अलीकडच्या काळात उदयाला आलेला मतदारांचा वर्ग. ज्या पक्षाने त्यांना विकत घेतलेलं असतं, त्या पक्षाला मतदान करतात(करतातच असंही नाही). पण ते मतदान करतात. काही लोक काहीच विचार न करता एकदा या पक्षाला, तर दुसऱ्या निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षाला मतदान करत असतात.

या व्यतिरिक्त मतदारांचा आणखी एक वर्ग असतो. हा कुंपणावर बसलेला मतदार. हा हवा पाहून मतदान करतो. हा कोणत्या वेळेला कुठे उडी मारेल हे काही सांगता येत नाही. पैशाने किंवा कुठल्याही किपकोळ आमिषाला बळी पडून मतदान करणाराही हा मतदार असतो. यात पूर्वी अशिक्षित, गरीब वस्त्यांत राहाणारे लोक असत, पण गेल्या काही निवडणुकांतून, अगदी पैसे घेत नसले तरी, सोसायटीत पेव्हर ब्लाॅक्स बसवणाऱ्या किंवा चाळींच्या गल्ल्या सिमेंट-काॅम्क्रिटच्या करुन देणाऱ्या उमेदवाराला सुशिक्षित-उच्चशिक्षित लोकांच्या सोसायट्याही एकगठ्ठा मतदान करताना दिसून येत आहेत. हे समजून-उमजून तत्कालिक स्वार्थाच्या लोभाने केलेलं मतदान.

मग ‘नोटा’ ला मतदान करणारे कोण असतात?

तर, एकंदर राजकारणाला कंटाळलेल्या, सर्वच राजकीय पक्षांबद्दल उदासीन असणारे लोक, काहीच बदल होणार नाही अशा निराशेने घेरलेले लोक, जे पूर्वी मतदानालाच जायचे नाहीत, त्यातले बहुसंख्य मतदार आता मतदानाला आवर्जून जातात, पण ते ‘नोटा’ला मतदान करतात..! असं करून ते देशातील सर्वच रादकीय पक्षांचा आणि ते राबवीत असलेल्या ध्येय-धोरणांता निषेध व्यक्त करत असतात. यापूर्वी राजकीय पक्षांचा निषेध व्यक्त करायचा झाल्यास, आपापसांत बोलून ‘सर्व सारखे’ आहेत असं म्हणत, राजकारण्यांना शेलक्या शिव्या द्यायचं काम खाजगीत चालायचं, ते आता ‘नोटा’च्या माध्यमातून सार्वजनिकरित्या होत आहे. ‘नोटा वापरून आपला राग काढण्यासाठी का होईना, लोक मतदानाला जातात हे महत्वाचं आहे. हा सकारात्मक बदल आहे.

‘मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ठरवून ‘नोटा’ चावापर करणारे दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, जे बहुसंख्येने सत्ताधारी पक्षाचे समर्थक असतात. ह्या प्रकारच्या लोकांत मी आणि माझ्यासारखे लोक येतात. यंदाच्या निवडणुकांतून मी नोटा का वापरणार’, याची माझी कारणं खाली स्पष्ट करत आहे.

सांप्रत सत्तेवर असणाऱ्या सरकारने २०१४ साली सत्तेवर येताना संपूर्णपणे विकासाचा जयघोष करत सत्ता काबीज केली होती. नुसती काबीज केली नव्हती, तर ह्या देशातील सर्वजाती-धर्माच्या, पंथाच्या, भाषेच्या, प्रांताच्या जनतेने त्यांच्या पदरात भरभरून मतांचं दान घातलं होत. जनता विकासाला किती आसुससलेली होती, तेच त्या मतदानातून दिसून आलं होत. मला मी या पक्षाचा समर्थक असल्याचा अभिमान होता. सत्तेवर आल्यानंतरच्या काही वर्षांत, सध्याच्या सरकारने काही चांगल्या योजना आणल्या. नोटाबदली(नोटबंदी) आणि जीएसटीसारखे धाडसी निर्णयही घेतले. नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांत अमलबजावणीतून अक्षम्य चूक होऊनही, त्यावेळी मी सरकारचा उद्देश चांगला असल्याचे सांगत, सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देणारे काही लेखही लिहिले होते. काळा पैसे भारतात परत आणण्याचा निर्णय आणि त्यासाठी स्थापन केली गेलेली स्वतंत्र टीम आणि त्यांनी केलेले प्रयत्न मला सुखावून गेले होते. ( त्यातून प्रत्येकाला १५ लाख मिळतील असं पंतप्रधान कधीही म्हणाले नव्हते. हा विरोधी पक्षांचा आरोप, मी आज सत्ताधारी पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात जाऊनही मी कधीही मान्य करणार नाही.). ‘अच्छे दिन आयेंगे” याविषयी माझ्या मनात जराही शंका नव्हती.

पण आज पांच वर्षानंतर जे चित्र दिसतंय, ते निराशाजनक आहे. सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांच्या योजनांच्या यशापयशाबद्दल प्रचार सभांत चकार शब्द नाही. त्यामुळे किती लोकांचं जीवनमान सुधारलं, किती व्यवसाय नव्याने सुरु झाले, किती जाणं नोकऱ्या मिळाल्या, शौचालय बांधली, परंतु त्यातील पाण्याच्या व्यवस्थेचं काय, आताच्या निवडणुकांत फिरणाऱ्या प्रचंड काळ्या पैशांचा आणि नोटबंदीचा नेमका संबंध काय, देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, बेरोजगारी, शेतकऱ्यांना आश्वासन दिलेला किमान हमी भाव आणि अशाच इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल हे लोक प्रचार सभांतून ब्र ही काढताना दिसत नाहीत. यातील. यातील किती योजना सफल झाल्या, किती असफल झाल्या, त्याची कारणं देऊन लोकांना प्रचारातून विश्वासात घेणं अपेक्षित होत. लोक शहाणे असतात आणि पाच वर्षात एवढ्या मोठ्या देशाचं चित्र कोणतंही सरकार बदलू शकत नाही, हे त्यांना समजत असतं. परंतु त्यावर काहीच बोललं जात नाही, हे अनाकलनीय आहे. या उलट सर्व प्रचार केंद्रित झालेला दिसतोय, तो पाकिस्तान या नगण्य शत्रूच्या उभ्या केलेल्या बागूलबूवावर. जनतेच्या देशभक्तीच्या भावनांना जागृत करून, सैनिकांच्या बलिदानावर मतांचा जोगवा मागण्यांवर. पाकिस्तानच्या आडोश्याखाली, मुसलमानांची भीती दाखवून हिंदू मतांचं करण्यात येणाऱ्या ध्रुवीकरणावर. याचा अर्थ सरकारने सुरु केलेल्या काही किंवा सर्वच योजना फसल्या आहेत असा घ्यायचा का?

भ्रष्टाचार निर्मूलनाचा जयघोष करत, सत्तेवर आलेल्या या सरकारच्या काळात सरकारवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही हे जरी खरं असलं तरी, सरकारं बनतात आणि बिघडतात, ते त्या ठिकाणी असलेल्या बेहिशोबी पैशांसाठीच, हे न जाणण्याइतकी जनता काही आता दूधखुळी राहिलेली नाही. सत्तेत जायची सर्वांचीच जी चढाओढ असते, ती समाजसेवेसाठी नसून, समाजसेवेच्या नांवाखाली भ्रष्टाचार करण्यासाठीच असते हे सर्वाना समजतं. आरोप झालेला नाही याचा अर्थ भ्रष्टाचार नाही, असा नाही. तो असतोच. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी तो होतच राहतो. मग तो पक्षनिधीच्या नांवाखाली का झालेला असेना..! भ्रष्टाचाराची जर एवढी चाड असती, तर पक्षाला मिळणाऱ्या निधीची माहिती, माहितीच्या अधिकाराखाली का आणत नाहीत, याच उत्तर कुणी देत नाही. मला म्हणायचंस, ते निम्न स्तरावरील भ्रष्टाचारासंबंधी. खालच्या स्तरावरच्या सरकारी आस्थापना, ज्याच्याशी सामान्य लोकांचा रोजचा संबंध येतो, त्या सरकारी आस्थापनातील भ्रष्टाचार किती कमी झालेला आहे, हे ठामपणे सांगता येत नाही. उलट वाढलाय. जे काम हजार रुपयांत व्हायचं, ते आता दोन हजारच्याखाली होत नाही, हा सामान्य लोकांचा अनुभव आहे. जनतेला कमी होणं अपेक्षित असतो, तो हा भ्रष्टाचार. गेल्या पांच वर्षात एकही भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा झाल्याचे (श्री. छगन भुजबळ सोडून. परंतु तो भ्रष्टाचारापेक्षाही राजकीय बळी होता, असं माझं मत आहे.) उदाहरण नाही, उलट भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना निवृत्तीपश्चात मुदतवाढ दिली जात असल्याची उदाहरणं दिसतात. जे भ्रष्टाचारी गत पाच वर्षांत तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे राहीलेले दिसणं अपेक्षित होते, तेच उजळमाथ्याने निवडणुकीची तिकटं घेऊन मतं मागण्याच्या रांगेत उभे असल्याचंही दिसतं. भ्रष्टाचारावर या प्रचारात काहीच बोललं जात नाही, हे मला तरी न पटण्यासारखं आहे.

वरील काही महत्वाचे मुद्दे सोडून सध्या प्रचारात असलेल्या मुद्द्यावर माझा आक्षेप आहे. भारतासारख्या जागतिक महाशक्ती होऊ पाहणाऱ्या खंडप्राय देशाच्या केंद्रीय सरकारच्या निवडणुकीत, केवळ आणि केवळ विकासाचे मुद्दे हवेत. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे हे स्पष्ट होण्यासाठी विकासाचे मुद्दे महत्वाचे असतात. त्यावर जनमत बनवणं आणि त्यासाठी मतदान मागणं गरजेचं असतं. २०१४ सालच्या निवडणुकीत हे झालं होतं आणि सर्व जनतेने बहुमताचं दान सरकारच्या पदरात टाकलं होतं, हे विसरून चालणार नाही. राममंदिर, गोमांस भक्षण, त्या नांवाखाली केलं जाणार मॉब लिंचिंग, कालचाच श्रीमती प्रज्ञा सिंहाचं हेमंत कारकरेंबद्दल काढलेलं अत्यंत आक्षेपार्ह्य बोलणं, पंतप्रधानांची जात हे काही निवडणुकांचे मुद्दे होऊ शकत नाहीत. साधू संन्याशांचा, सर्वच धर्मातील कट्टरपंथीयांचा राजकारणातील वाढता वावर, स्त्रियांविषयीचा सर्वपक्षीय अनादर हे चिंता करण्यासारखे मुद्दे आहेतच. मला हे पटत नसल्याने, मी कायद्याने उपलब्ध करून दिलेल्या नोटा’ च्या सनदशीर मार्गाने जाण्याचं निश्चित केलेलं आहे. .

दुसरा विषय समाजात निर्माण झालेली अस्वस्थतता. समाजात कधी नव्हती एवढी अस्वस्थात सध्या अनुभवायला येत आहे. जातीवरून, धर्मावरून, खाण्याच्या पद्धतीवरून माणसा-माणसांमध्ये द्वेष भावना निर्माण झालेली अनुभवायला येते. अशी अस्वस्थात मी या पूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती. समाजमाध्यंमावर आपली मतं आजही मांडता येतात, परंतु आपली मत मांडली आणि ती प्रस्थापितांच्या विरुद्ध जाणारी असली, की त्या मतांचा प्रतिवाद मर्यादशील शब्दांत करण्याच्या भानगडीत न पडता, समाजमाध्यमातल्या विशिष्ट’ट्रोळ्या’ असंसदीय

भाषेत त्या मतांवर तुटून पडतात. देशद्रोही, कम्युनिस्ट, अर्बन नक्षल इत्यादी आरोप त्या वेगळी मतं मांडणाऱ्या व्यक्तीवर केले जातात. सध्या सत्तेवर असलेल्या पक्षापासून माझ्यासारख्या लोकांना दूर नेण्याचं महत्वाचं कार्य ह्या ‘ट्रोळ्या’ करत आहेत. मी ‘नोटा’ पर्याय स्वीकारण्यामागे हे देखील एक महत्वाचं कारण आहे.

मला अनेकजण ‘नोटा’ वापरण्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ऐवजी कुठल्यातरी इतर पक्षाला मत द्या, असा मित्रत्वाचा सल्लाही देत आहेत. परंतु मी जसा सध्याच्या सरकारवरच्या सध्याच्या धोरणांवर, वक्तव्यांवर नाराज आहे, तसाच मी इतर पक्षात माजलेल्या घराणेशाहीचाही विरोधक आहे, त्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचाही विरोधक आहे. जातीच्या, धर्माच्या आधारावर मतं मागणारांचा मला तिटकारा आहे. मी या पक्षांना मत द्यायचा कधीही विचार करू शकत नाही. अशा परिस्थितीत, मला ‘नोटा’ पर्याय वापरण्याखेरीज अन्य पर्याय असल्यास दाखवून द्यावं.

मला मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून भाजप समर्थक राहिलेलो आहे. तरीही वरील मुद्द्यानावर मी ठरवून ‘नोटा वापरणार आहे. मीच कशाला, माझ्या घरातली इतर तीन मतं, त्यातला एक नवं-मतदार, जो भारतीय सशस्त्र सेनादलात जाऊ इच्छितो आणि त्या दृष्टीने त्याची तयारीही सुरु आहे, तोही सध्याच्या प्रचारात सेनादलांच्या बलिदानाचा होणार दुरुपयोग पाहून, ‘नोटा’ला मतदान करणार आहे. ‘मला या लोकांनी चालवलेलं सैन्याची डिग्निटी घालवण्याचं काम मंजूर नाही’ हे त्याच मत आहे आणि माझा त्याला पाठिंबा आहे.

‘नोटा’ वापरून काय होणार, तुमचं मत फुकट जाणार असा सर्वांचाच सूर असतो. परंतु नोटा वापरून आपल्याला आपल्या आवडत्या किंवा सर्वच राजकीय पक्षांच्या न पटलेल्या ध्येय धोरणांचा निषेध व्यक्त करता येतो. मी ‘नोटा’ पर्याय वापरणार आहे, तो असा निषेध व्यक्त करण्यासाठीच. ‘नोटा’ वापरून काहीच होण्यासारखं नसेल, तर मग हा पर्याय उपयोगाचा नाही, असं काहीजण घसा फोडून का सांगतायत, ते ही लक्षात येत नाहीय.

‘नोटा’ची वाढती संख्या लोकांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीबदल किती अस्वस्थता आहे, हेच दाखवते. कालपर्यंत या पर्यायाचा फारसा काही उपयोग नाही असं काही जणांना वाटत होत, परंतु आज आणि उद्या मात्र ‘नोटा’ची दाखल सर्वानाच घ्याची लागणार आहे. या पुढच्या काळात ‘नोटा’ला दुर्लक्षून चालणार नाही. राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराच्या निवडीबाबत आणि स्वतःच्या ध्येय-धोरणांबाबत अधिक सतर्क रहावे लागणार आहे आणि मतदारही मतदान टाळण्यासाठी काही युक्तिवाद करू शकणार नाही. ‘नोटा’ मुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे अशी चिन्ह आहेत. शिवाय नकारात्मक मतदानाचा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीही उपयोग होणार आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे, असं मी समजतो

-नितीन साळुंखे

‪9321811091‬

20.04.2019

(या निवडणुकांच्या निनित्ताने गेल्याच तीन-चार महिन्यांत केलेल्या राजकीय लिखाणातला माझा हा शेवटचा लेख. या पुढचं माझं सर्व लेखन राजकारणविरहीत माझ्या आवडीच्या विषयांचं असेल)

‘नोटा’; लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..! – (पूर्वार्ध)

(पूर्वार्ध)

‘नोटा’; लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पांऊल..!

‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..! राजकीय पक्षांच्या मनमानीवर, ध्येयधोरणांवर आणि मुजोरीवर आळा घालून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कायद्याने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला हा एक सशक्त पर्याय आहे. ‘नोटा’ची ताकद काय आहे, याची चुणूक गतवर्षीच झालेल्या पांच राज्यांच्या निवडणूकांतून दिसून आलेली आहे. जनतेच्या हिताची धोरणं राबवण्यापासून ढळलेल्या सर्वच राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी ‘नोटा’ हे मतदारांच्या हाती कायद्याने दिलेलं एक प्रभावी अस्त्र आहे.

आपल्या बहुपक्षीय लोकशाहीत, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाने आपला एक उमेदवार दिलेला असतो. काहीजण अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवत असतात. पक्षाने कोणता उमेदवार द्यावा, यावर नागरीकांचं काही नियंत्रण मसतं. तरीही त्या त्या मतदारसंघात काम करणारा त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता, त्या त्या मतदारसंघात उमेदवार म्हणून द्यावा असा एक सभ्य संकेत असतो. बऱ्याचदा तो संकेत पाळलाही जातो. पण अलिकडे, कुठल्याही पक्षात कार्यकर्ता राहीलेला नाही, जे आहेत ते पेड वर्कर्स आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वच पक्षांना निवडणुकांच्या तोंडावर बाहेरून उमेदवार आयात करावे लागतात. उमेदवार आयात करताना, कोणताही पक्ष, त्या उमेदवाराची पात्रता पाहाण्यापेक्षा, साम-दाम-दंड-भेद आदी आयुध वापरून निवडून येण्याची क्षमता पाहिली जाते आणि मग एखाद्या मतदारसंघात असा बनेल माणूस आपल्याला उमेदवार म्हणून मिळतो. जो पक्ष निवडून येण्याची जास्त शक्यता असते, त्या पक्षाकडून आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी अशा व्यक्तींना भरपूर मागणी असते..

आपण आपल्या आवडत्या पक्षाने दिलेला उमेदवार कसाही असला तरी त्याला मत देतो. आपण त्या माणसाला मत देत असलो तरी, प्रत्यक्षात आपण त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या आवडत्या पक्षाला मत देत असतो. कोणताही पक्ष सत्तेवर येण्यासाठीच निवडणूक लढवत असतो आणि आपल्याला आवडत असलेला पक्ष सत्तेवर यावा म्हणूनही आपण मत देत असतो..! आपल्यापैकी सर्वचजण कुठल्या ना कुठल्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या आवडत्या आणि आपल्याला सत्तेवर यावा असं वाटत असलेल्या पक्षाला मतदान करत असतो.

मग मतदारांना ‘नोटा’चा पर्याय का उपलब्ध करुन द्यावा लागला, हा प्रश्न उरतो. त्याला कारण आहे, गेल्या काही वर्षांपासून मतदारांना गृहीत धरलं जाण्याची राजकीय पक्षांची बळावलेली प्रवृत्ती. एकदा का मतदारांनी एखाद्या व्यक्तीला आणि त्या माध्यमातून पक्षाला निवडून दिलं, की पुढची पांच वर्ष त्यांनी चालवलेला तमाशा निमूट बघत बसण्यापलिकडे मतदारांच्या हातात काहीच नसतं. राजकीय पक्षांच्या अशा प्रवृत्तीतून बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकारणाचं झालेलं टोकाचं गुन्हेगारीकरण, तत्वांशी घेतलेली फारकत, निष्ठेशी केलेली प्रतारणा या सर्व प्रकारांनी चिडलेल्या जनतेला आपला रोष व्यक्त करावासा वाटला, तर कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता. जनतेची ही कुचंबणा ओळखून एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, २३ सप्टेंबर २०१३ साली, मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असा निर्णय दिला आणि जनतेच्या हातात, ‘तुमच्यापैकी कुणीगी माझा देश चालवण्यास लायक नाहीत’, हे बजावून सांगण्याचा ‘नोटा’ हा एक प्रभावी पर्याय मिळाला..!

कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा नोटाचा वापर २०१३ मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता. यानंतर नोटाबद्दल लोकजागृती होऊन ‘नोटा’कडे अधिकाधिक मतदारांचा कल होऊ लागला आणि नोटाचा प्रभाव २०१७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. गुजरात विधानसभेच्या या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी (जवळपास दोन टक्के मतदारांनी) ‘नोटा’ हा पर्याय निवडला, ज्यातून आपली नाराजी व्यक्त केली आणि कोणत्याच राजकीय पक्षावर आपला विश्वास उरला नसल्याचे दाखवून दिले. या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आणि यात तब्बल ३० विधानसभा जागांच्या निकालांवर ‘नोटा’चा थेट परिणाम झाला. त्यानंतर झालेल्या २०१८ मधील कर्नाटक निवडणुकांतही मतदारांनी मोठ्याप्रमाणावर ‘नोटा’चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला. गत वर्षाच्या शेवटाला झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांतही लाखो मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांत ‘नोटा’ने अनपेक्षीतरित्या सत्ताबदल करुन निर्माण केलेली दहशत आपल्या सर्वांना माहित असेलच.

‘नोटा’ची सर्वात जास्त दहशत असते, ती सत्तेवर असलेल्या पक्षाला. कारण सत्तेवर येताना जी आश्वासनं जनतेला दिसेली असतात, त्या आश्वासनाचा पाच वर्षातील हिशोब देण्याची वेळ आता आलेली असते. ती आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत, असं जर जनतेला वाटलं किंवा दिलेल्या आश्वासनांपेक्षा भलतंच काही तरी होतंय असं जरी जनतेला वाटलं, तर एकतर ती विरोधी पक्षाला मतदान करण्याचा किंवा मग सरळ ‘नोटा’ वापरण्याचा विचार करते. अशावेळी सत्तेवर असलेल्या पक्षाचे पाठीराखे किंवा त्यांनी उपकृत केलेले त्यांचे पेड कार्यकर्ते, समाजमाध्यमांतून ‘नोटा’ला मत देणे म्हणजे मत वाया घालवणे येथपासून, ते ‘नोटा’ला मत देणारे देशद्रोही आहेत, अशा निखालस खोट्या बोबा मारत सुटतात आणि स्वत:चा उघडेपणा अधिक स्पष्टपणे दाखवत सुटतात. ‘नोटा’ पर्यायामूळे राजकीय पक्षांची आणि त्यांच्या लोंबत्यांची दुकानं आणि त्यांच्या खोटेपणाचा तमाशा बंद व्हायची पाळी आली असल्याने, हे लोक ‘नोटा’सारख्या संपूर्ण कायदेशीर पर्यायाला बदनाम करत सुटतात.

-©️नितीन साळुंखे

9321811091

19.04.2019

(उत्तरार्ध)

पण सत्ताधारी पक्षावर नाराज असणारे सरसकट सर्वच जण नोटा वापरतात का?

तर तसं नसतं.

तर मग ‘नोटा’ वापरणारे कोण असतात?

हे दोन दिवसांनी उत्तरार्धात वाचा..!!

इतिहासाच्या खांद्यावरचं वेडं वर्तमान..!!

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

इतिहासाच्या खांद्यावरचं वेडं वर्तमान..!!

काल बऱ्याच वर्षांनी मुंबई-गोवा रस्त्यावरून प्रवास केला. चार-पांच वर्षांपूर्वी या रस्त्यावरून अनेकदा प्रवास करत असे. तेंव्हा रस्त्याचं काम सुरु झालं होतं. सुरु झालं होतं म्हणजे पेपरमधे बातम्या वाचल्या होत्या. काही ठिकाणी, म्हणजे मुंबईच्या उंबऱ्यावरची रस्त्याच्या आजुबाजूच्या काही इमारती तोडलेल्या दिसतंही असत. रस्त्याला काही कळणारी आणि अनेक न कळणारी डायव्हर्जन्स काढली होती. सुखरुप प्रवासापेक्षा अपघाताचीच शक्यता जास्त होती. हे सर्व लक्षात घेता, कधी गांवी जायचंच झालं तर, पुणे-सातारा-कोल्हापूरमार्गे जाणं, थोडं लांबचं पडलं तरी, सोयीचं नि सुरक्षित होतं..!

काल मात्र अगदी ठरवून खालच्या रस्त्याने गेलो. अगदी अमुलाग्र बदल झालाय. ओळखीच्या खुणा अनोळखी झाल्यासारख्या वाटतायत. रस्ता पूर्ण व्हायला तरी आणखी दोनेक वर्ष तरी जातील, अजून रस्ता अगदी नजर लागेल आणि नजर ठरणारही नाही अशा पद्धतीने तयार होतोय. हे श्रेय नि:संशय श्री. नितीन गडकरींचं. गडकरी हे चवीने खाण्याचे शौकीन असल्याचं अनेकदा त्यांच्या मुलाखतीत ऐकलंय. ते त्यांच्या प्रकृतीतही दिसतं. ‘रस्ता’ आणि ‘पूल’ हे शब्द, रस्सा आणि पुलाव शब्दांशी साम्य राखणारे असल्याने असेल कदाचित, पण गडकरी यात कमालीचा रस घेतात आणि ते पूर्णब्रम्ह असल्यासारखे पूर्णही करतात, हा आजवरचा अनुभव आहे. मोदी सरकारच्या काळात देशात रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली किंवा सुरू आहेत हे मात्र खरंच आहे.

नवीन तयार होणारा चार लेनचा मुंबई-गोवा हायवे ही काही पूर्णपणे नवीन निर्मिती नाही. नवीन हायवे इतिहास बनण्याच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जुन्याच दोन लेनच्या हायवेच्या आधारानेच कात टाकतोय, त्यामुळे काही जुन्या खुणा अद्याप शिल्लक आहेत. फक्त त्या नवीन साज चढवून उभ्या असल्याने चटकन ओळखता येत नाहीत, एवढंच..! माझी इतिहासात रुची असल्याने, माझा अशा जुन्या खुणा शोधायची खोड आहे. कारण नवीन जे काही नव्या रुपात उभं असतं, ते त्या जुन्याच्या खांद्यावरच उभं राहात असतं. इतिहास असा सहजासहजी पुसता येत नसतो. थोडं शोधक नजरेने पाहिलं तर काही ओळखीच्या खुणा अजुनही शिल्लक असलेल्या दिसून येतात..

रस्त्याचा असो वा एखाद्या ठिकाणाचा किंवा अगदी एखाद्या व्यक्तीचाही, इतिहास पूर्णपणे खोडून काढता येत नाही, हे सत्य आहे. इतिहासाच्या खांद्यावर वर्तमान उभं असतं आणि ते भविष्याच्या दिशेने कुतुहलाने पाहात असतं. ‘विकासा’चंही तसंच असतं. विकास काही एका दिवसांत किंवा काही वर्षांत होत नाही. वर्तमानातला जो काही काळा-गोरा विकास दिसतोय, तो असाच त्याच्या इतिहासाच्या खांद्यावर उभा आहे. त्यामुळे आजची प्रगती छाती फुगवून सांगताना, गत काळात काहीच झालं नाही असं म्हणणं, खोटेपणाचं तर आहेच, परंतु कृतघ्नपणाचं जास्त आहे. नवीन बनत असलेला मुंबई-गोवा हाचवे असाच ७० वर्ष किंवा त्याहीपूर्वी इतिहासातील कुणी गरजूने तयार केलेल्या जुन्या रस्त्याचा आधार घेत आकाराला येत आहे..! नवीन असेल, तर त्याचं रुपडं..!!

तशीच विलक्षण सुधारणा रेल्वेतही दिसते. माझा संबंध उपनगरी रेल्वेशी जास्त आणि अगदी दैनंदिन येत असल्यामुळे, मला हा फरक नुसता दिसतोच असा नाही, तर अनुभवायलाही येतो. योगायोगाने आज १६ एप्रिल. बरोबर १६६ वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या १८५३ मधे आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली, ती अजुनही धावत आहे. आजची रेल्वे आणि सुरुवातीच्या काळातली रेल्वे यात जमीन अस्मानाचा फरक असला तरी, आजची रेल्वे त्याच ऐतिहासिक मार्गावरून धावत आहे. आजच्या रेल्वेत झालेल्या सुधारणा त्याच इतिहासातल्या, १६६ वर्षांपूर्वी इंग्रजांनी भारतात आणलेल्या फलाटांवर आणि रुळांवर झालेल्या आहेत, हे इतर सर्व विसरत असले तरी मला विसरता येत नाहीत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या, गत ७० (या अटल बिहारी वाजपेयींची ६ व मोदी सरकारची ३-४ वर्ष धरलेलेली आहेत) वर्षांतल्या प्रत्येक सरकारने आपापल्या कुवतीनुसार आणि वेगानुसार त्या सुधारण घडवत आणलेल्या आहेत. हे श्रेय सर्वांचं आहे. सध्याच्या सरकारचा सुधारणांचा वेग मोठा आहे, हे त्यांचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं आणि मोदी सरकारचं अभिनंदन करायला हवं. ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला द्यायलाच हवं. ते नाकारण्याचा कोतेपणा किंवा खोटेपणा करु मये असं मला वाटतं. आपल्याला सर्वात जास्त चीड कशाची यायला हवी, तर ती खोटेपणाची..!

दोन-तीन वर्षांपूर्वी एका कट्टर राष्ट्रवादी (काॅग्रेस नव्हे, तर राष्ट्रभक्त किंवा नुसतं भक्त ) विद्वानाने माझ्याशी चर्चा करताना, त्या काळची आठवण काढून ‘रेल्वे हिन्दूंनी आणली म्हणून आपण आज प्रगती करु शकलो’ असं सद्गदीत उद्गार काढलेले मला आठवतात. वर माझ्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह पाहून ‘त्या काळी ब्रिटिश हिन्दूस्थानवर राज्य करत असल्याने, ते हिन्दूच नव्हते काय’ असंही स्पष्टीकरण दिलं. ‘मग त्याच न्यायाने अनेक मुसलमान राजवटींनी शेकडो वर्ष हिन्दूस्थानवर राज्य केलं होतं, मग त्यांना हिन्दू का म्हणू नये’ असा प्रश्न त्यांना विचारण्याचं माझ्या ओठांवर आला होता, पण सोयिस्कर राष्ट्रवादावर वाद घालायचा नसतो, हे मला माहित असल्याने मी वाद घालायच्या भानगडीत पडलो नाही. भक्ती, मग ती कुणाचीही असो, काही काळाने ती आंधळी आणि बहिरीही होत असते..!

हा लेख मी दोन दिवसांपूर्वीच लिहून ठेवला आहे आणि पोस्ट करायची वाट पाहात होतो. वाट पाहात होतो, कारण सिंधुदुर्र्गातल्या माझ्या गांवी माझ्या मोबाईलला डिजिटल रेंज नव्हती. रेंज हवी असली तरी ७-८ किलोमिटरचा प्रवास करुन मला फोडा किंवा वैभववाडीत येणं भाग पडतं. डिजिटल इंडीया माझ्या खेड्यात त्या ताकदीनं अद्याप पोचलेला नाही, परंतु तो निश्चितच पोहोचेल. कारण ‘जीओ’च्या लायनी टाकायचं काम जोरात सुरू आहे. कुणाच्या का आरवण्याने पाहाट होत असेल, तर तिचं स्वागत करायला हवं. पण हे स्वागत करताना, ह्या डिजिटल युगाचा पाया, सर्वांचा विरोध पत्करुन माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींनी घातला होता, हे मला विसरता येत नाहीय..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

१६.०४.२०१९

वैभववाडी.

‘मनातलं काही’ – माझं ई-बुक

“ज्या जगात आपण जन्माला आलो आहोत त्या जगाकडे आणि त्यातल्या नानाविध व्ववहारांकडे डोळ्यांत अखंड कुतुहल ठेऊन जगणं म्हणजेच सुसंस्कृतपणानं जगणं..!”. पु.ल. देशपांडेंनी चेतना चिंतामणीचं जगणं म्हणजे काय, ते या एका वाक्यात सांगितलंय.

पुलंनी दाखवलेल्या चेतना चिंतामणीच्या गांवाच्या दिशेने चालताना, मला वाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भेटत गेलेल्या असंख्य अनामीक ‘ज्ञानेश्वरां’ना माझं हे पहिलं पुस्तक अर्पण..!

-नितीन साळुंखे

9321811091

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

पुन्हा एक आनंदाची बातमी..

माझे पहिलेच ईपुस्तक #मनातलं_काही हे BRONATO.com तर्फे किंडल वर प्रकाशित झाले आहे.

#ई_पुस्तकाची_लिंक:

हे ईपुस्तक वाचण्यासाठी आवश्यक बाबी-

१. किंडल App

२. ऍमेझॉन अकाउंट

कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी BRONATO प्रतिनिधीला 9970051413 वर संपर्क करा.

-नितीन साळुंखे

@BRONATO

_माझे_ ईपुस्तक प्रकाशक

आठवलेली आणखी एक गोष्ट-

आठवलेली आणखी एक गोष्ट-

असाच एक गांव असतो. त्यात एक मल्ल राहात असतो. गोष्टीत काही नेहेमीच आटपाट नगर आणि चक्रम राजाच असायला हवा असं काही नाही. तर, गांव आणि मल्लही असू शकतो. तसा या गांवात एक मल्ल आहे. मल्ल म्हणजे पेहेलवान.

ह्या मल्लाला आपल्या ताकदीचा प्रचंड अभिमान असतो. गेल्या काही वर्षात याने आपल्या ताकदीच्या जोरावर आजुबाजूच्या परिसरातल्या सर्वच मल्लांना स्पर्धेत हरवलेलं असतं आणि माझ्यासमोर एकही मल्ल टिकता कामा नये, असा पणच त्याने केलेला असतो. कुठेही स्पर्धा असली, की आपला लंगोट कसून हा धावलाच तिथे. काही अपवाद वगळता बहुतेक सर्व स्पर्धा याने जिंकलेल्या होत्या. हरलेल्या दोन-चार स्पर्धांही ‘पंचां’मुळे तो हरला असं आपलं त्याचं म्हणणं होतं. पण तो म्हणतो ते नाकारायची कुणाची बिशादच नव्हती. बरं, या स्पर्धा काही फक्त कुस्तीच्याच असायच्या असं नाही, तर ताकदीवर आधारीत कुठलीही स्पर्धा या नरसिंहाला चालायची. याला आता कुणी स्पर्धकच उरला नाही की काय, असं वाटायला लागावं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती खरी..!

अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार? पण त्या तोडण्यातही मजा शोधावी, असं आपल्या त्या गांववाल्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी केली स्पर्धा जाहीर. गांवची आपली एक तेवढीच करमणूक. ह्या स्पर्धेची मात्र एक अट असते, की हे झाड एका घावात तोडायचं. स्पर्धा जिंकणाराला भरघोस बक्षिस मिळणार असतं.

आपले पेहेलवान रेशमी लंगोट कसंत स्पर्धेच्या दिवशी त्या गांवात पोहोचतात. आणखीही स्पर्धक आलेले असतात. पण ह्याला पाहून आणि ह्याच्या ताकदीच्या कथा ऐकलेल्या असल्यामुळे, कुणीच ते झाड एका घावात तोडायला पुढे येत नाही. त्या सर्वांकडे तुच्छतेने पाहात, मांड्यां थोपटत (स्वत:च्याच), “माझ्यासमोर ताकद दाखवायची कुणाची हिंमत असेल तर त्याने पुढे यावं आणि ते झाड एका घावात तोडून दाखवावं”, असं तो मल्लेन्द मोठ्या गर्वाने गर्दीला आव्हान देतो..

एक कृश प्रकृतीचा, सदरा- लेंगा-गांधी टोपी परिधान केलेला गोरा मध्यमवयीन माणूस उठतो आणि त्याला ते झाड तोडायची संधी मिळावी, अशी विनंती तो ह्या मर्दाला करतो. त्याच्याकडे तुच्छतेने पाहात आपला मल्ल त्याला मोठ्या उदारपणे झाड तोडायची संधी देतो.

तो माणूस कुऱ्हाड उचलतो. झाडाभोवती प्रदक्षिणा घालून खोडाचं नीट निरिक्षण करतो. एका जागी थांबतो आणि अंगात असेल नसेल तेवढा जोर काढून खोडाच्या त्या जागेवर घांव घालतो. पण हाय रे दैवा, झाड काही तुटत नाही. तो निराश होऊन बाजुला जाऊन बसतो. मल्ल खीं खीं हसत त्याला खिजवायला सुरुवात करतो. पण तो माणूस शांत बसतो.

आपल्या मल्लाला चेव चढतो. ‘और कोई है माय का लाल’ असं तो त्या गर्दीला आव्हान देतो. ह्या मर्दाला आनंदाच्या वेळी राष्ट्रभाषेत बोलायची सवय असते. बराच वेळ कुणी उठत नाही. ह्या मर्दाची आधीच फुगलेली छाती गर्वाने आणखी फुगते. एवढ्यात आणखी एक माणूस हात वर करतो. गोरटेलासा, पातळ केसांचा, सौम्य-स्निग्ध चेहेऱ्याचा, मध्यमवर्गीय प्रकृतीचा हा माणूस पाहून ह्या माणसाला पाहून आपले मर्देश चेकाळतातच. “तो क्या तुम यह पेड एकही झटके मे तोडोगे’”, आपला मल्ल त्याला तुच्छतेने सवाल करतो. “हमने हात उपर किया हा नही था, किसीने पिछेसे मेरा हात पकड के उपर किया. हम इस पेड कटाईं के बारे मे कुछ नहा जानते हैं. हम तो यंहाॅ से गुजर रहे थे और ये मुकाबला देखने रुक गये थे”, असं तो म्हणू लागला. आपल्या मल्लाला वाटलं, की तो घाबरला म्हणून असं म्हणतोय. आता ह्या मल्लाला चेंव चढला. “बहाना मत बनाव”, मल्ल म्हणाला, “अब तुमको इस पेड पर घांव डालना ही पडेगा”. आता आपल्याला यात पडल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं म्हणत, तो माणूस कुऱ्हाड उचलतो, निशाणा साधतो आणि झाडावर घांव घालतो. पण झाड तिथेच.

आता मात्र आणखी कुणीही पुढे येत नाही. बराच वेळ जातो. कुणीही स्पर्धक पुढे येत नाही असं पाहून, शेवटी आजुबाजूला गर्वाने पाहात आपले मल्लेश्वर छाती पुढे काढून झाडाजवळ येतात. झाडाला वाकून नमस्कार करतात. कुऱ्हाड उचलतात, तेहेतीस कोटी देवांपैकी एका देवाचं नांव घेतात आणि घालतात घांव त्या वठलेल्या वृक्षाच्या खोडावर. त्या बरोबर झाड उजव्या बाजूला जाऊन कोसळतं.

मल्ल महाराज आजुबाजूला जमलेल्या गर्दीकडे मोठ्या अभिमानाने पाहातात. जे ही दोन माणसं करु शकली नाहीत, ते मी केलं अशी दर्पोक्ती करतात. लोकंही टाळ्या वाजवतात आणि त्याचा जयजयकार करतात. लोकांचं काय, कशालाही टाळ्या पिटतात.

आता बक्षिस समारंभाची वेळ येते. आता आपलंच नांव पुकारलं जाणार म्हणून मल्ल सावरून बसतो, तोच एक अनपेक्षित घटना घडते. स्पर्धेचा विजेता म्हणून तिनही स्पर्धकांना बक्षिस दिलं जातं. झाडावर शेवटचा घांव घातलेला मल्ल पहिला अचंबित होतोआणि मग चिडतो. ‘मी एका घावात झाड तोडलं असल्याने, ह्या बक्षिसावर माझाच हक्क आहे. ह्या दोन माणसांना संधी मिळूनही ते हे वठलेलं झाड तोडू शकले नाहीत. मी मात्र एका घावात हे झाड तोडलं. ह्या दोघांचा बक्षिसावर काहीच हकक नसताना, गांवाने ह्यांना बक्षिस दिलं हा माझ्यावर अन्याय आहे” असं म्हणत तो चिडून थयथयाट करु लागतो. वेड्यासारखं बरळू लागतो.

सरपंच शांत असतो. तो म्हणतो, “मल्ल महाराज, आपण एका घांवात हे झाड तोडलं हे खरंय. पण तुम्ही ते तोडू शकलात कारण, त्या दोघांनी प्रथम घातलेल्या घांवावरच तुम्ही तुमचा घांव घातलात. सर्वात महत्वाचा पहिला घांव होता, कारण तो घांव घालणाऱ्या त्या शहाण्या माणसाला, तो घांव नेमका कुठे घालायला हवा हे बरोबर माहित होतं, दुसऱ्याला काही माहित नसल्याने, त्याने पहिल्याच्या घावावरच घांव घातला आणि दोन नेमक्या जागेवरच्या घांवांनी कमकुवत झालेलं ते झाड, तुमच्या शेवटच्या घांवाने तुटलं. खरा बक्षिसपात्र तो पहिला इसम आहे. तो शांत आहे, कारण एका घांवात हे झाड तुटणार नाही याची त्यांला कल्पना होती आणि तुम्ही मात्र मीच सर्व केलं असं सांगत आहात. आमच्या गांवची जनता सुज्ञ आहे आणि आम्ही विचार करुनच तुम्हा सर्वांना श्रेय देण्याचं ठरवलं आहे”

आपल्या मल्लाला गांवच्या जनतेच्या वतीने सरपंचाने दिलेलं हे उत्तर पटलं की नाही ते माहित नाही.

गोष्ट तूर्तास समाप्त..!

-नितीन साळुंखे

9321811091

03.04.2019

कुंकू;हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता..

कुंकू;हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता..

लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात जुन्या काळातल्या टिका, मळवट, कुंकवापासून ते अगदी काल-परवापर्यंत स्त्रीया-मुलींच्या कपाळावर दिसत असलेली आणि आता ती ही दिसेनासी होत चाललेल्या टिकली, बिंदी वैगेरे पर्यंतच्या, स्त्रीयांच्या भालप्रदेशी विराजमान असलेल्या कुंकवाच्या प्राचिन-अर्वाचिन अशा सर्व पिढ्या अपेक्षित आहेत. लि हिण्याच्या सोयीसाठी मी त्या सर्वांचा उल्लेख ‘कुंकू’ किंवा ‘टिकली’ असा करणार आहे.

एक हिन्दू संस्कृती (आता हा धर्म म्हणून मान्यता पावलाय..!) सोडली तर, स्त्रीयांनी कपाळावर काहीही लावण्याची अन्य कोणत्याही धर्मात प्रथा नाही, नसावी. हिन्दूंनी या कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातलेली असल्याने, कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारा हिन्दू हा जगातील एकमेंव धर्म असावा..! म्हणून या लेखात फक्त हिन्दू स्त्री तिच्या कपाळावर धारण करत असलेल्या कुंकवाबद्दल लिहिणार आहे. हिन्दू पुरुषांतही कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे, मात्र त्यावर मी या लेखात लिहिणार नाही.

हा कुंकवाचा इतिहास नाही, तर माझ्या नजरेतून मला स्त्रीयांच्या भाळीचं कुंकू कसं दिसतं, ते लिहणार आहे. या लेखाला मी गतवर्षी आणि त्यापुर्वी तीन वेळा हरिद्वार-ऋषिकेषच्या गंगातटावर हिन्दू संस्कृतीचं जे विराट दर्शन घेतलं, त्यातून मी जे अनुभवलं त्याची पार्श्वभुमी आहे. या लेखाचं सार सांगायचं तर, हिन्दू संस्कृती किंवा धर्म शांतपणे आणि चिवटपणे जिवंत ठेवण्याचं काम हिन्दू स्त्रीयांनी मोठ्या चिकाटीने केलेलं आहे. या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या खेड्यातील वा शहरातील, कोणत्याही जाती-प्रान्त-पंथाच्या स्त्रीयांच्या कपाळी विराजमान असलेल्या एवढ्याश्या कुंकवा-टिकलीने हिन्दुत्वाला, ते मानणाऱ्या लोकांशी घट्टपणे चिटकवून ठेवलंय, असं मला सारखं वाटतं.

हिन्दू स्त्रीयांच्या कपाळावरची टिकली हा या धर्मातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच माझ्या कुतुहलाचा विषय. कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी देशाच्या ज्या ज्या भागात जाणं झालं, तेथील सर्व स्तरातील हिन्दू स्त्रीयांमधे कपाळावर कुंकू असणं आणि ते मोठ्या अभिमानाने (वा श्रद्धेने म्हणा हवं तर..!) भाळी धारण करणं हे समान लक्षण मला दिसलं. जात कोणतीही असो, पंथ कोणताही असो, प्रांत कोणताही असो अथवा भाषा कोणतीही असो, उभ्या-आडव्या पसरलेल्या आपल्या देशातील हिन्दू स्त्रीयांत समान धागा आहे, तो त्यांच्या कपाळावर त्यांनी धारण केलेल्या कुंकवाचा वा सध्या टिकलीचा..!

आपल्याकडे कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातली गेली आहे. हिन्दू स्त्रीच्या सौभाग्याची ठसठशीत अशी ती खुण आहे. ती तशी असली तरी, परंतू मला ती स्त्रीयांच्या कपाळावरची हिन्दुत्वाची अभिमानाने मिरवली जाणारी ध्नजा आहे असं जास्त वाटते. कारण आपल्या देशातील विविध प्रांतात, हिन्दू स्त्रीयांमध्ये सौभाग्य दर्शवणारी अलंकार चिन्ह वेगवेगळी असली तरी, कपाळावरचं कुंकू सर्वांच्यात समान आहे. कपाळावरच्या या एवढ्याश्या ठिपक्याने अख्खा देश हिन्दुत्वाच्या धाग्याने नकळतच जोडून ठेवलाय असं मला जे वाटतं, ते यामुळेच. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, हिन्दुत्वाची सतत समोरच्याला नकळतची जाणिव हा एवढासा ठिपका करून देत असतो, असं मला तरी वाटतं. म्हणून हिन्दुत्व असं कपाळावर राजरोस आणि अभिमानाने मिरवणाऱ्या स्त्रीया आणि त्यांचं कुंकू माझ्या कौतुकाचा आणि निरिक्षणाचाही विपय आहे.

कुंकवाची सांगड सौभाग्याशी घालून आपल्या पूर्वजांनी हिन्दू संस्कृती व पर्यायाने धर्म कसा जिवंत राहील, याची सोय करून ठेवली आहे, असं मला वीटतं..! कुंकवाचा संबंध त्यांच्या सौभाग्याशी घातल्यामुळे, स्त्रीया ते प्राणपणानं जपतात. माझ्या मते, त्या एका अर्थानं हिन्दुत्वाची जपणूक करतात. आपल्या महाराष्ट्रात तर एखादी स्त्री कुणाच्या घरी पहिल्यांदाच गेली असेल, तर तिला आवर्जून कुंकू लावलं जातं. एकमेंकीला कुंकू लावणं म्हणजे, मला तरी त्या एकमेकीला हिन्दुत्वाचं वाण देतायत असं वाटतं.

कुंकू, टिकली हा सौभाग्य अलंकार जरी मानला गेला असला तरी, हिन्दू धर्मिय सर्व वयातील मुली/स्त्रीया, सधवा वा विधवा, कुंकू-टिकली धारण करतातच, फक्त त्यांच्या रंगात फरक असतो. पोर्तुगिजांनी जेंव्हा गोवा काबिज करून त्यांच्या धर्माचा पाशवी वरवंटा गोव्यावर फिरवायला सुरूवात केली, तेंव्हा त्याची सुरुवात त्यांनी गोव्यातील हिन्दू स्त्रीयांच्या कपाळावरील कुंकू पुसण्यापासून केली, हे अनेक अभ्यासकांनी नोंदवून ठेवलं आहे. कपाळावर कुंकू दिसलं की कठोर शिक्षा पोर्तुगिज करत, कारण कपाळावरील कुंकू हिन्दुत्वाची ठळक निशाणी आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी पहिला घाव स्त्रीयांच्या कुंकवावर घातला. यासाठी श्री.महाबळेश्वर सैल यांचं ‘तांडव’ हे मराठी पुस्तक किंवा श्री. अ. का. प्रियोळकरांचं ‘The Goa Inquisition’ हे इंग्रजी पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावं.

या पार्श्वभुमीवर हल्लीच्या माॅडर्न कल्पनांमुळे कुंकू-टिकली न लावता कपाळ बोडकं ठेवण्याची जी फ्याशन आली आहे, त्यामागे हिन्दू संस्कृती शांतपणे नाहीशी करण्याची एक चलाख चाल असावी असं मला वाटतं. काॅनव्हेंट शाळांच्या नियमांत कपाळावर टिकली धारण करणं बसत नाही, त्या मागे हेच तर कारण नसेल ना असंही मला वाटतं. पोर्तुगिज, मुस्लीम वा परधर्मीय शासकांनी एके काळी आपल्या मुली-स्त्रीयांना जबरदस्तीने नाकारायला लावलेली गोष्ट, आज आपणंच पुढाकार घेऊन, आपल्या पोरी-बाळींना हौसेनं करायला लावतो आहोत हा काळजीचाही विषय आहे. यात आता मनाप्रमाणे वागण्याचं आणि राहाण्याची व्यक्ती स्वातंत्र्याची भावनाही येऊन मिसळल्यामुळे, यावर काही बोलायचीही सोय उरलेली नाही.

कुंकू-टिकलीचा सौभाग्याशी किंवा हिन्दुत्वाशी जसा संबंध आहे, तसा तो सौंदर्याशीही आहे. कपाळावरील तो एवढासा ठिपका स्त्रीच्या सौंदर्यात जेवणातल्या मिठाएवढी भर घालतो असं मला वाटतं. मिठाएवढी का, तर मिठाशिवाय जेवण अळणी, म्हणजे बेचव लागतं. कपाळावर कुंरू किंवा टिकली धारण न केलेली कोणत्याही वयाची स्त्री मला ती सुंदर असुनही तशी वाटत नाही. पुन्हा कोणत्या प्रकारच्या जेवणात मीठ कधी घालावं, याचे काही नियम आहेत (अशी माहिती काही सुगरणींनी दिली) आणि त्यामुळे जेवणाच्या चवीत फरक पडतो (हे ही त्यांनीच सांगीतलं). अगदी तसंच कुंकू किंवा टिकलीची जागा आणि आकार किंचित जरी रोजच्यापेक्षा इकडे-तिकडे झाला तरी, त्या स्त्रीच्या दिसण्यात बराच फरक पडतो, असंही माझं निरिक्षण आहे (हे सहजचं निरिक्षण आहे. मी येता-जाता स्त्रीयांच्या कपाळाकडे निरखून पाहातो असा याचा अर्थ घेऊ नये.). अर्थात कुंकू-टिकलीचा स्त्रीच्या सौंदर्याशी मी लावलेला संबंध प्रत्येकाला (आणि प्रत्येकीला) मान्य असेलच असं नाही.

आता थोडसं वेगळं. काही वर्षांपूर्वी मी एका दिवाळी अंकात एका चित्रकाराची कथा वाचली होती. कथा आता निटशी आठवत नाही, मात्र त्या कथेचा सारांश मात्र लख्ख आठवतोय. कथेतल्या त्या चित्रकाराला एका स्त्रीचं नग्न चित्र काढायचं असतं. तो माॅडेल म्हणून एका स्त्रीला निवडतो आणि त्या स्त्रीला निर्वस्त्र होऊन त्याच्या समोर पोज घेऊन बसायला सांगतो. तो तिच्या नग्न देहाची अनेक रेखाटनं करतो, पण काही केल्या त्तिचं त्याला हवं तसं चित्र त्या रेखाटनात उतरत नाही. हा समर्थ चित्रकार असुनही काहीतरी चुकतंय याची त्याला जाणीव होते, पण नक्की काय हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. तिची नग्नता काही केल्या त्याला त्याच्या चित्रात पकडता येत नव्हती. विचार करता करता अचानक त्याचं लक्ष तिच्या कपाळावरील कुंकवाकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की, त्या ती माॅडल म्हणून बसलेली स्त्री संपूर्ण नग्न असली तरी, तिच्या कपाळी असलेलं बारीकसं कुंकू मात्र तसंच आहे. तो चित्रकार तिला ते कुंकू काढायला लावतो आणि मग लगेच दुसऱ्या क्षणाला त्या स्त्रीची नग्नता चित्रात बरोबर उतरवतो. त्या स्त्रीच्या कपाळावरचं ते एवढंसं कुंकू, त्या स्त्रीला ती पूर्ण निर्वस्त्र असुनही नग्न होऊ देत नव्हतं. केवळ आणि केवळ त्या कुंकवामुळेच ती माॅडेल त्या चित्रकाराला नग्न वाटत नव्हती आणि म्हणून तिची नग्नता त्त्याच्या मनात आणि मनातून चित्रात उतरत नव्हती. एका ओळीत सांगायचं तर, स्त्रीच्या कपाळावरचं एवढसं कुंकू किंवा टिकली तिच्या संपूर्ण देहाच्या वस्त्राचं काम करतं. तुम्ही जर भारतीय न्युड पेंटींग्स पाहिली असतील तर, त्यातील बऱ्याच चित्रात, चित्रातील त्या नग्न स्त्रीच्या कपाळावर कुंकू नसतं. सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत खरं आहे असं म्हणण्यास हरकत नसावी. कुंकू स्त्रीच्या वस्त्राचं काम करतात..!

निर्वस्त्र स्त्रीची नग्नता लपवून तिला सौंदर्य बहाल कारयचं सामर्थ्य त्या एवढ्याश्या ठिपक्यात आहे. सौभाग्य चिन्हात कुंकवाचा समावेश करण्यामागे आपल्या पूर्वजांनी हा विचार केला असावा, असं मला सारखं वाटतं. नुकत्याच रिलिज झालेल्या ‘न्युड’ या मराठी चित्रपटाची पेपरातली जाहिरात तुम्ही पाहिली असेल. जाहिरातीतील स्त्रीयांच्या कपाळी रंगवलेलं ठसठशीत लाल रंगातलं कुंकू, न्युड म्हटल्यावर आपल्या मनात जे चटकन ‘नागडं’ चित्र उभं राहातं, त्या चित्राला छेद देतं असं मला वाटतं.

सौंदर्यवद्धी, धर्म आणि लज्जारक्षणाचं कार्य गेली अनेक शतक करणारं हे कुंकू किंवा टिकली आताशा मात्र वेगाने आपल्या जीवनातून फॅशनच्या नांवाखाली हळूहळू लोप पावत चाललं आहे. (गैर)सोय म्हणून म्हणा किंवा ग्लोबलायझेशनचा परिणाम म्हणून म्हणा किंवा टिकली लावणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे या समजुतीने म्हणा, कुंकू किंवा टिकली लावणं कमी कमी होत चाललंय. केश-वेशभुषेच्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा झालेला किंवा होत असलेला विपरीत अविष्कारही याला कारणीभूत असावा असं मला वाटतं. (अर्थात प्रत्येक व्यक्तीने आपण कसं राहावं हे ठरवण्याचा तिचा अधिकार मला मान्य आहे. हे लिहावं लागतं, नाही तर त्यावर उगाच वाद होतील.)

हल्ली तर स्त्रीच्या अंगावरील वस्त्रही, वरचं आणखी वर आणि खालचं आणखी खाली अशी, आखडत चाललीत, तिथे एवढीशी बिचारी टिकली कसली टिकणार? शक्य तेवढं ‘दाखवणं’ हाच समाजाचा स्थायीभाव आणि स्वभावही होत चाललेला आहे. कदाचित हे आधुनिकतेचं लक्षण असेलही परंतू माझ्यासारख्या ‘हमारे जमाने मे’वाल्यासाठी मात्र हे चिंतेचं कारण वाटतं.

हल्ली झाकण्याचा नाही तर दाखवण्याचा जामाना आहे, चालायचंच..सर्वच क्षेत्रातला नागडा निर्लज्जपणाच जिथे मोठा सद्गुण ठरतोय, तिथं लाजेनं मान खाली घालणं सहाजिकच आहे..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

सूचना-

१. ज्यांच्यात स्त्रीयांनी कुंकू वा टिकली लावण्याची प्रथा नाही, त्यांच्या कुंकू-टिकलीकडे पाहायच्या भावना आणि दृष्टी वेगळी असू शकते. मी हिन्दू संस्कृतीच्या दृष्टीने हा लेख लिहिलेला आहे, हे हा लेख वाचताना लक्षात घ्यावं.

(फोटो प्रातिनिधिक आहेत व इंटरनेटवरून घेतले आहेत.)

गोष्ट आठवणीतली..

गोष्ट आठवणीतली..

एक आटपाट नगर होतं.

तिथे एक राजा राज्य करत होता.

कोणताही राजा असतो, तसा हा राजाही थोडासा चक्रम होता, पण प्रजाहीतदक्ष होता. जगात असलेल्या नसलेल्या सगळ्या गोष्टी, मग त्या उपयोगी असोत वा नसोत, आपल्या राज्यात असाव्यात, असं त्याला वाटे. त्या प्रमाणे तो प्रयत्न करुन आपल्या राज्यात त्या आनणणयाचा प्रयत्न करत असे.

त्याने आणलेल्या गोष्टी प्रजेला आवडतात की नाही, ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची एक गुप्त पोलीस यंत्रणा असे.

म्हणजे गुप्त यंत्रणा असं त्या यंत्रणेचं नांव असलं तरी, त्यातले पोलीस सर्वांना माहित असत.

राजाने आणलेल्या सगळ्याच गोष्टी प्रजेला आवडल्या पाहिजेत असा त्या राजाचं म्हणणं नव्हतं.

पण राज्यातल्या त्या उघड असलेल्या गुप्त यंत्रणांचा तसा अलिखित नियम होता.

एके दिवशी त्या राज्यात एक शिंपी येतो.

तो असा तसा शिंपी नव्हता.

त्याच्याकडे खास धागे होते व त्याने तो देवाचे कपडे शिवायचा.

आता देवाचे कपडे शिवले जाणारे धागे आणि ते धागे जवळ असलेला शिंपी म्हणजे भारीच असणार.

राजाची देवावर खुप म्हणजे खुपच श्रद्धा होती. देवाला जो कपडे घालतो, त्या शिंप्याकडून आपणही कपडे शिवायलाच हवेत असं राजाने ठरवलं.

राजाने त्या शिंप्याला आपल्यासाठी कपडे शिवायची आज्ञा केली.

सेम टू सेम देवासारखे कपडे शिवले तर मोठं इनाम द्यायचं कबूल केलं.

शिंप्याने राजासाठी कपडे शिवायचं कबूल केल. पण एक अट घातली की, राजाचे कपडे शिवण्यासाठी त्याला दोन महिन्यांचा समय लागेल आणि तो जे कपडे शिवेल,

ते फक्त राजनिष्ठ लोकांनाच दिसतील.

राजाशी एकनिष्ठ नसनाऱ्यांना ते कपडे दिसणार नाहीत.

राजा खुश झाला.

मनात म्हणाला त्या निमित्ताने राज्यातील आपल्याशी एकनिष्ठ कोण हे कळेल

आणि बेईमान लोक कोण ही शोधता येईल. राजाने शिंप्याला एक खोली दिली आणि कपडे शिवायचं काम सुरू करायला सांगितलं.

शिंप्याने बंद दरवाजाच्या आड काम सुरू केलं. बरेच दिवस कपडे शिवायचं काम सुरू होतं.

बाहेर कापड कापल्याचा, मागावर कापड विणत असल्याचा आवाज यायचा.

राजाची अधिरता वाढू लागली. त्याला देवाच्या धाग्यांची कापडं घालायचे वेध लागले होते.

एक दिवस न राहावून त्याने प्रधानाला त्या शिंप्याकडे जाऊन कपडे शिवायचं काम कुठपर्यंत आलंय, ते पाहायची आज्ञा केली.

प्रधान शिंप्याच्या खोलीत गेला.

शिंप्याने त्याचं स्वागत केलं आणि शिवत असलेले कपडे दाखवू लागला. कपड्यांवरची नक्षी, कशीदा दाखवू लागला.

प्रधान गोंधळला.

त्याला काहीच दिसत नव्हतं.

अचानक त्याला शिंपी म्हणाला होता ते आठवलं शिंपी म्हणला होता की, देवाच्या धाग्याने शिवलेला राजाचा हा पोशाख, फक्त राजनिष्ठ लोकांनाच दिसेल, राजद्रोह्याना दिसणार नाही.

हे आठवताच प्रधानाला अचानक ते कपडे दिसू लागले. कपड्यांवरची नक्षी दिसू लागली.

त्याने कपड्यांची आणि ते शिवणाऱ्या शिंप्याची तारीफ केली आणि तो राजाकडे कपडे कसे झालेयत ते सांगण्यास निघाला.

प्रधान राजाकडे आला आणि त्याने शिंप्याने देवांच्या धाग्याने शिवलेल्या कपड्यांची तोंड भरून स्तुती केली.

राजाची उतकंठा आणखी वाढली.

राजाला आता राहावेना.

दोन दिवसांनी राजा शिंप्याच्या खोलीत जायला निघाला.

शिप्याला राजाची सवारी येत असल्याची आणि पोशाख तयार ठेवण्याच्या आज्ञा सुटल्या.

राजा शिंप्याकडे पोचला.

राजाला खोलीत काहीच दिसेना.

शिंपी मात्र कपड्यावरची डिझाईन राजाला दाखवण्यात मग्न.

राजाला शिंप्याचं म्हणणं आठवलं.

राजद्रोह्याना कपडे दिसणार नाहीत, असं तो म्हणाला होता.

आता आपल्यालाच आपले कपडे दिसत नाहीत, म्हणजे राज्याचा राजाच राज्यद्रोही ठरणार. हे राजाने विचार केला की, हे योग्य दिसणार नाही, आपल्याला कपडे दिसायलाच हवेत.

अचानक राजाला शिंप्याने शिवलेले कपडे दिसू लागले. त्यावरचं नक्काशीकाम दिसू लागलं.

राजा समाधानाने महालात परतला.

काही दिवसांनी पोषाख तयार झाला. देनेक दिवसांत येणाऱ्या राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो राजाने परिधान करायचा असं ठरवलं.

दवंडू पिटवली गेली.

देवाच्या धाग्याने शिवलेले राजवस्त्र ल्यालेला राजा पाहाण्यासाठी सर्व प्रजेला निमंत्रण गेलं. जो राजनिष्ठ असेल, त्यालाच ते दैवी धाग्यांनी विणलेलं वस्त्र दिसेल असंही दवंडीत सांगण्यात आलं.

वाढदिवस आला.

राजाला दैवी धाग्यांनी विणलेला सुरेख पोशाख नेसवण्यात आला. तो पोशाख घातलेल्या राजाची उघड्या रथातून मिरवणून निघाली. राजा अभिमानाने छाती फुलवून सर्वांकडे बघत होता.

राजा नागडा होता.

पण राज्यनिष्ठ असल्याने त्याला अंगावरचं दैवी वस्त्र जाणवत होतं.

राजाच्या उघडपणे गुप्त असलेल्या यंत्रणेलाही राजाचं नागडेपण दिसत होतं, पण ते राजनिष्ठ असल्याने, त्यांनाही नागडा राजा वस्त्र घातलेला दिसत होता.

प्रजा डोळे विस्फारून बघत होती.

राजाला त्या डोळ्यात स्वत:चं कौतुक दिसत होतं.

दोन-चार भोळे प्रजाजन होते, त्यांनी “महाराज आप नंगे हो” असं ओरडून सांगितलं.

काहीजण रथावर सवार झालेल्या नागड्या राजाकडे पाहून फिस्सकन हसले.

गुप्त पोलीसांनी लगेच त्यांना राजद्रोही ठरवून राज्याबाहेर जाण्याची शिक्षा ठोठावली..

देव ठरवलेल्या नागड्या राजाची मिरवणूक पुढे निघाली होती.

नसलेले कपडे दिसणाऱ्या राजनिष्ठांची मतलबी टोळी त्याच्या मागे भक्कमपणे होती.

ह्या टोळीत पुढेपुढे भर पडत चालली होती.

राजाचं नागडेपण दिसणाऱ्या राजद्रोह्यांचा बंदोबस्त करुन त्यांना सीमेपार पाठवण्याच्या आज्ञा सुटल्या होत्या.

राजाला नागडा म्हणायची आता कुणाची बिशाद नव्हती..

प्रजा टाळ्या वाजवीत होती.

राजाच्या नागडेपणाला की स्वत:च्या भाबडेपणाला,

ते मात्र समजत नव्हतं..

ही गोष्ट मी लहानपणी वाचली होती. रेळे गुरुजींच्या २४ पानी गोष्टीच्या पुस्तकात. अंधुकशी आठवत होती. तिचा शेवट मात्र लख्ख आठवत होता. हलकीशी आठवणारी गोष्ट थोडी फुलवून लिहिलीय. तात्पर्य मात्र तेच ठेवलंय.

रोज रोज उपदेश करणारे, टिका करणारे किंवा इतिहास सांगणारे लेख कशाला हवेत, कधीतरी गोष्टही सांगू की, म्हणून लिहिली. अन्य उद्देश काही नाही..!!

-नितीन साळुंखे

9321811091

31.03.2019

टिप-

ही पोस्ट राजकीय नाही. कुणाला ती राजकीय वाटल्यास आणि या गोष्टीतून कुणी काही अर्थ काढलाच, तर ती जबाबदारी माझी नाही..!!