जुना भिडू, नवी विटी-नवं राज्य..

जुना भिडू, नवी विटी, नवं राज्य..

संपूर्ण निवडणुक काळात मी भाजपच्या आणि मोदींच्या मला न पटलेल्या मुद्द्यांवर जाहीर टिका करत होतो. लोकशाही व्यवस्थेत अशी टिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो;किंबहूना हेच लोकशाही व्यवस्थेचं सौंदर्य असतं.

आता निवडणूक संपली आहे आणि श्री. नरेन्द्र मोदी देशाचे नवीन पंप्रधान झालेले आहेत. ते देशाचे पंतप्रधान झालेले आहेत याचा अर्थ, आता ते देशातील १३० कोटी नागरीकांचे पंतप्रधान आहेत. यात त्यांच्या पक्षाचे, विरोधी पक्षाचे, कोणत्याही पक्षाचे नसलेले, त्यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या न पटलेल्या धोरणांवर टिका करणारे माझ्यासारखे, असे सर्व नागरीक येतात. त्यांच्यावर प्रेम करणारांचा जेवढा त्यांच्यावर अधिकार आहे, तेवढाच अधिकार त्यांच्या धोरणांवर टिका करणारांचाही आहे. लोकशाही राजव्यवस्था टिकून राहायची असेल तर आपल्यावर प्रेम करणारांपेक्षा, टिका करणारांचा थोडा जास्तच अधिकार मान्य करावा लागतो. विरोधाशिवाय लोकशाहीला अस्तित्व नाही.

सत्तेवर येणाऱ्या सरकारचे प्रमूख या नात्याने श्री. नरेन्द्र मोदी यांनी त्यांच्या व त्यांच्या मित्रपक्षांच्या नवनिर्वाचित खासदारांसमोर परवा संसदेच्या सेन्ट्रल हाॅलमधे भाषण केलं. मला ते भाषण पूर्णवेळ पाहाता आलं नाही, परंतु त्या भाषणाचा शेवटचा भाग मी पाहिला. मोदींनी आपल्या खासदारांसमोर व्यक्त केलेले ते मनोगत होतं. म्हणजे एका अर्थाने ते जनतेशी बोलत होते. येत्या पांच वर्षांच्या काळात त्यांचं सरकार कुठल्या दिशेने पावलं टाकणार आहे आणि तसं करताना खासदारांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे व्यक्त करणारं ते भाषण होतं. मी पाहिलेला व ऐकलेला त्यांच्या भाषणाचा शेवटचा भाग मला आवडला.

निवडणुकांच्या काळतले राष्ट्रवादाचा उघड आणि हिन्दुत्वाचा अघोषित पुरस्कार करणारे ते मोदी हे नव्हेत, असं मला त्यांचं भाषण ऐकताना जाणवत होतं. मी जे ऐकलं ते खरोखरंच प्रेरणादायी आणि लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असलेल्या माझ्यासारख्याच्या आशा पल्लवीत करणारं वाटलं. ‘सबका साथ, सबका विकास’ ही २०१४ ची निवडणूक जिंकण्यासाठी महत्वाची ठरलेली घोषणा, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत साफ अंतर्धान पावलेली होती आणि ती नव्याने ‘विश्वासा’ची साथ घेऊन काल पुन्हा एकदा श्री. मोदींच्या तोंडून ऐकली आणि मला बरं वाटलं.

मोदींच्या परवाच्या भाषणात कुठेही प्रचारी आक्रस्ताळेपणा किंवा नाटकीपणा नव्हता. एवढंच काय प्रचारातले मुद्देही नव्हते. बऱ्याच वर्षांनी मला आवडणारे २०१४तले मोदी काल मी पाहिले. कालच्या मी ऐकलेल्या भाषणात मोदी अत्यंत संयतपणे बोलताना मला जाणवले. नव्याने निवडून आलेल्या जुन्या व नवीन खासदारांना जे सल्ले त्यांनी दिले, ते त्या खासदारांनी मनावर घेऊन जर खरोखरंच अंमलात आणले(हे अवघड वाटतं, पण बदल घडेल अशी आशा ठेवू.) तर, भारत देश येत्या काही वर्षात पृथ्वीवरचं नंदनवन होईल यात मला शंका नाही.

नवीन सरकार येत्या गुरुवारी आपला कार्यभार सांभाळेल. नवीन सरकार इतर कुणाही इतकंच माझंही असल्याने आणि लोकशाहीत आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याने, मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर हे माझं मत नसून, पुढच्या पांच वर्षात या सरकारकडून माझ्या काय अपेक्षा राहातील, हे पंतप्रधानांच्या भाषणाचा आधार घेऊन मला सांगावसं वाटतं.

मी भाषण पाह्यलं तेंव्हा मोदी व्हिआयपी कल्चर संपावा असा सल्ला खासदारांना देत होते. त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून गेल्या पाच वर्षांत महत्वाच्या व्यक्तींच्या मोदींनी गाडीवरचा लाल दिवा काढून घेतला आणि चांगली सुरुवात केली. परंतु गाडीवरचा लाल दिवा गेला आणि त्याच गाड्यांवर ‘अमुकतमूक अध्यक्ष’ किंवा ‘आमदार/खासदार’ अशा पाट्या आल्या. मोठपणा मिरवायची सवय लागली की मग असे मार्ग शोधून काढले जातात. हा मोठेपण ज्या जनतेने आपल्याला दिलाय, तो तिच्यासमोर मिरवायचा नसतो किंवा त्याचा धाक त्या जनतेला दाखवायचा नसतो, हे जेंव्हा या प्रतिनिधींच्या मनातून जाईल, तेंव्हाच तो नष्ट होऊन हे लोक सामान्य माणसांच्या पातळीवर येऊन विचार करु लागतील आणि सामान्यांच्या समस्या त्यांना कळतील. काल मोदींनी दिलेला सल्ला या नवनिर्वाचीत लोकप्रतिनिधींनी मनावर घेऊन आपल्या व आपल्यासोबतच्या सेक्रेटरी-बाॅडीगार्ड आदी लोंकांच्या वागण्यात खरंच बदल घडवून आणावा. बऱ्याचदा चहापेक्षा या किटल्यांच्या गरमपणाने भाजायला होतं.

मोदींनी जो सल्ला त्यांच्या खासदारांना दिला तोच सल्लावजा आदेश या सरकारी नोकरांन्, विशेषत: राजपत्रित आणि सनदी अधिकाऱ्यांनाहा द्यावा. या अधिकाऱ्यांची ऐट व देहबोली ते कुणीतरी विशेष आहेत अशी असते. त्यांच्या कार्यालयात काही कामानिमित्त गेलं असता, त्यांची सामान्य नाहरिकांकडे पाहण्याची दृष्टी तुच्छतेची असते. सर्वच असे नसतात हे बरोबर असलं तरी, बहुसंख्यांना त्यांच्या अधिकारपदाचा अहंकार असतो असा माझा अनुभव आहे. पूर्वी कामानिमित्त मुंबईच्या ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या कार्यालयात जायचो. म्हाडाचे भा.प्र.से.मुख्याधिकारी कार्यालयात येताच, कार्यालयातले अधिकारी-कर्मचारी त्यांना उठून उभं राहून अभिवादन करायचे. यात गैर काहीच नाही. आपल्या वरिष्ठांचं कार्यालयात आगमन होताना कनिष्ठानी उभं राहून त्यांना सन्मान देणं हा शिष्टाचार आहे. मात्र हा शिष्टाचार पाळणं, त्या कार्यालयात कामासाठी गेलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसांवरहही सक्तीचा केला जातो हे मी अनुभवलं आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत सामान्य माणूसच ‘अती महत्वाची व्यक्ती’ असते आणि अन्य कोणी नाही, हे लोकप्रतिनिधींच्या आणि अधिकाऱ्यांच्याही वागण्यांतून दिसू दे ही माझी अपेक्षा आहे. मोदींनी या संदर्भात संबंधीतांना योग्य ती समज द्यावी अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

मोदींचं दुसरं मनोगत मला आवडलं ते बोलभांड नेत्यांना त्यांनी दिलेल्या सल्ल्याचं. महात्मा गांधी व हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य करणाऱ्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर, अली आणि बजरंग बली असा वाद निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयसिंग बिश्त उर्फ योगी अादित्यनाथ, खासदार सच्चिदानंद हरी साक्षी उर्फ साक्षीमहाराज आदीं सारख्या भडक आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर वचक बसेल अशी कारवाई ते करतील अशी मोदींच्या कालच्या भाषणावरून अपेक्षा आहे. त्यांनी तसं न केल्यास त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल (माझ्याच मनात)शंका उत्पन्न होऊ शकते. प्रज्ञा ठाकुरांना ते माफ करणार नाहीत (आणि करुही नये) असं त्यांचं निवडणूक काळातलं वक्तव्य त्यांच्या मनापासूनचं होतं आणि ते प्रचारी नव्हतं, हे त्यांनी प्रज्ञा ठाकुरांवर तातडीने कारवाई करून दाखवून द्यावं.

काल बऱ्याच काळाने मोदींनी ‘सबका साथ, सबके विश्वास के साथ, सबके विकासचा’ राग आळवला. निवडणूक काळात ही घोषणा कुठेही नव्हती, ती पुन्हा ऐकायला आली. आता मात्र फक्त हिच घोषणा या सरकारचा बिजमंत्र व्हावा ही माझी अपेक्षा आहे. जात, धर्म, पंथ या भेदभाव न करता फक्त त्या व्यक्तीची व कुटुंबाची ‘गरज’ हाच एक निकष असावा.

कालच्या भाषणात श्री. नरेन्द्र मोदींनी असपसंख्यांक समाजाच्या सर्वकष उन्नतीसाठी ते प्रयत्न करणार असल्याचं आवर्जून सांगितलं. भारताचे पंतप्रधान व सरकार हे अल्पसंख्यांकासहीत सर्व भारतवासीयांचे असतात अशा अर्थाचा उल्लेखही त्यांनी केला, हे छान झालं. मोदींच्या ह्या अत्यंत महत्वाच्या वक्तव्याता भाजपाच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मुख्य म्हणजे समाजमाध्यमातल्या त्यांच्या (अती)उत्साही पाठीराख्यांनी(यांना ‘भक्त’ असंही म्हणतात) यांनी पुढच्या पांच वर्षात जराही विसर पडू देता कामा नये. पंतप्रधानांनीही अति उत्साही गोरक्षक, विरोधी मतं मांडणारांना देशातून चालते व्हा सांगणारे स्वयंघोषित राष्ट्रभक्त, विरोधकांवर अश्लाघ्य शब्दांत तुटून पडणारे मोदीप्रेमी यांनाही या संदर्भात समज द्यावी. सर्वधर्मसमभावाच्या नांवाखाली काॅन्ग्रेसने अल्पसंख्य समाजाचे लांगुलचालन केले होते, तसं लांगुलचालन विद्यमान पंतप्रधांनानी बहुसंख्यांकांचंही करू नये, ही माझी अपेक्षा आहे. खुशामत कुणाचीही नको, अल्पसंख्यांकांची नको, तशीच हिन्दुंचीही नको. हिन्दुत्व आणि हिन्दू राष्ट्रवादाचा अतिरेक होता कामा नये याची दक्षता घ्यावी. चुकीचं वागणाऱ्याची धर्म किंना जात न पाहाता त्याला कायद्यानुसार कठोर शासन होईल असे पाहावे. कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही याची जाणीव देशातल्या सर्वांनाच करून द्यावी अशीही माझी अपेक्षा आहे. परवाच ‘सनातन’च्या काही दोषी सदस्यांना सीबीआयकडून झालेली अटक ही चांगली सुरुवात आहे. असे लोक दोषी असतील तर त्यांना शासन व्हायलाच हवं.

तुर्तास येवढंच. भिडू जुनाच, परंतु नवी विटी- नवं राज्य घेऊन आलेल्या नवीन सरकारचं मनापासून स्वागत करताना, सरकारवरच्या चांगल्या कामांचं कौतुक आणि सरकारच्या न पटलेल्या कामांवर वा निर्णयांवर टिका करण्याचा माझा अधिकार मी राखून ठेवत आहे.

लोकशाही म्हणजे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं सरकार’ असं कुणीतरी म्हटलंय. यातील ‘लोक’ या शब्दांचा वारंवार होणारा उच्चार, ते ‘दुसऱ्याचं सरकार’ असा अर्थ ध्वनित करतं. लोकांचं म्हणजे दुसऱ्यांचं, आपलं नव्हे. नवीन सरकारचा उल्लेख ‘माझ्या लोकांसाठी, माझ्या लोकांनी चालवलेलं, माझं सरकार’ असा उल्लेख करायला मला आवडेल, पण काही काळ गेल्यावरच..

-©️नितीन अनंत

9321811091

27.05.2019

देशाची प्रकृती बदलतेय..

देशाची प्रकृती बदलतेय..

भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएचं खुल्या दिलाने अभिनंदन..!

भाजपने त्याला एकट्याला पुन्हा एकदा बहुमत मिळवून दाखवलं त्याबद्दल भाजपचं दुप्पट अभिनंदन..!!

२०१४ साली झालेल्या निवडणुकीतील एकही मुद्दा ह्या निवडणुकीत प्रचाराचा प्रमूख मुद्दा नसूनही, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए २०१४ सालच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या परिस्थितीत आहे आणि हे खरोखरंच अभिनंदनीय आहे..!

भाजप सोडून इतर प्रमुख पक्षांमधे असलेल्या जातीय समिकरणांना आणि घराणेशाहीला लोकांनी नाकारलेलं आहे, हे येत असलेल्या निकालावरून स्पष्ट होतंय आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी अती उजवा राष्ट्रवाद आणि हिन्दुत्वाचं होणारं ध्रुवीकरण ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय समाजावर याचा परिणाम उद्या कसा होईल हे आता तरी सांगणं अवघड आहे. राष्ट्रवादाच्या आणि हिन्दुत्वाच्या आकर्षणाने जातीवर मात केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. परंतु हिन्दुत्वाच्या लेबलाखालील उद्याच्या छुप्या जातीयतेचा धोका जनतेच्या लक्षात आलाय की नाही हे समजत नाहीय. त्यामूळे हेच चित्र उद्याही असंच राहील की अधिक चांगलं होईल की आणखी बिघडत जाईल, त्याबद्दलही आताच काही सांगता येत नाही. देशाची प्रकृती बदलतेय हे स्वागतार्ह आहे, परंतु संस्कृतीच्या आडोश्याखाली ती विकृतीत बदलता कामा नये याची काळजी घेणंही आवश्यक आहे आणि ही जबाबदारी आपली आहे, हे देखील मी आग्रहाने सांगू इच्छीतो

ही निवडणूक भाजपने पूर्णपणे भावनांच्या मुद्द्यावर लढवली. पुलवामाचा अतिरेकी हल्लाआणि त्यानंतर केलेला बालाकोट एअरस्ट्राईक भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमूख मुद्दा बनला आणि त्यातून जनतेच्या मनावर बिंबवल्या गेलेल्या राष्ट्रवादाच्या भावनांचा हा विजय आहे, असा याचा अर्थ. हिन्दुत्वाची राष्ट्रवादाशी खुबीने घातली गेलेली सांगड, त्यातून मतदारांच्या चेतवल्या गेलेल्या भावना आणि त्या भावनांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, काळा पैसा इत्यादी जनतेच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्याआणि जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर केलेली मात भाजपच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षही ह्या मुद्द्यांवर भाजप-एनडीएला घेरण्यात अयशस्वी ठरले आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला नेत्रदीपक यश मिळत असल्याचं दिसतं.

हा विजय प्रभावी प्रचाराचा आहे. सोशल मिडीया, इलेक्ट्राॅनिक मिडीया, डिजिटल आर्मी यांचा भाजपने फार कौशल्याने वापर करुन घेतला आणि त्यात काहीच गैर नाही. हे मार्ग तर विरोधी पक्षांनाही उपलब्ध होते, परंतु त्यांना याचा वापर करुन घेता आला नाही. हे विरोधकांचं अपयश आहे. सर्व विरोधी पक्ष स्वार्थापायी एकत्र आलेत, कोणत्याही विरोधी पक्षाकडे मोदींइतका सक्षम उमेगवार पंतप्रधानपदासाठी नाही हे वास्तव आहे. हे वास्तव अधोरेखीत करण्यात एनडीए यशस्वी झाला. भाजप आणि एकूणच एनडीएला मिळालेल्या यशामागे हे देखील एक कारण आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील गेल्या पाच वर्षात सत्तेवर असलेल्या सरकारने विकासाच्या क्षेत्रात उत्तम काम केलंय यात माझ्या मनात काहीच शंका नाही. फक्त त्यांनी या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी होती असं माझा आग्रह होता. माझा विरोध भाजपच्या हिन्दुत्वाच्या ध्रुवीकरणाला होता आणि पुढेही राहील. भारतासारख्या विकसनशील देशाच्या निवडणूकांचा सर्वच पक्षांचा प्रमूख मुद्दा विकास हाच असायला हवा, न की राष्ट्रवाद आणि धर्म..! पण तसं झालं असतं तर आताएवढं यश मिळालं असतं की नाही याची आता शंका येते, कारण भारतीय समाजमन भावनांवर चालत नाही आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या भारी यशामूळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. धर्म आणि राष्ट्रवादाच्या तुलनेत विकास पुन्हा एकदा मागे पडला..!

पण कारणं असली तरी विजय हा विजयच असतो. त्यामुळे भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करायलाच हवं..!!

पंतप्रधान नरेन्द्र मोदी, भाजपचे व एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते, जिंकलेले उमेदवार यांचं मनापासून अभिनंदन..!

फक्त एकच अपेक्षा,

उतू नका, मातू नका,

धर्माच्या आग्रहात,

विकासाचा वसा टाकू नका..!!

-©️नितीन अनंत

9321811091

23.05.2019

सुभाषितांचं खोटेपण..

सुभाषितांचं खोटेपण..

मी लहानपणापासून असं ऐकत आलोय की, ‘मनापासून केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळतं’. कर्मयोगात ‘काम करत राहा, फळाची इच्छा धरू नका’ असा उपदेश केलेला आहे. ही दोन विरुद्ध अर्थ ध्वनीत करणारी सुभाषितं, वेगवेगळ्या परिस्थितीत माणसाच्या मनाची समजूत घालण्यासाठी तयार केलेली आहेत, अशी माझी आजवरच्या माझ्या व इतरांच्याही अनुभवातून ठाम समजूत होत चाललेली आहे.

माणूस मनापासून काम करतो तेच मुळी मनोवांछीत फळ मिळावं म्हणून. घाम गाळण्याचं काम मरू दे, साधी बिन कष्टाची देवपुजाही मनात फळाची अपेक्षा धरून केली जाते, हे कुणी नाकारणार नाही. माणूस देवळात काय, ‘काय बाबा कसा आहेस, बरं चाललंय ना’ असं म्हणून देवाची विचारपूस करायला निश्चितच जात नाही. तो देवळात जातो तो, ‘इडा पिडा टळो आणि मी मागितलेलं मिळो’ ही इच्छा धरूनच. एकदा का मनापासून केलेल्या कामाचं मनाप्रमाणे फळ मिळालं, की पुढचं कर्म करायला त्याला आणखी बळ येतं, हे देखील सर्वांना मान्य होईल..

फळ अपेक्षित नसेल तर, माणसानं काम करावंच कशाला? समजा केलंच, तर काम करण्यासाठी पोटातून जी उर्जा यावी लागते आणि ती उर्जा येण्यासाठी त्यात काहीतरी जे ढकलावं लागतं, ते फुकट मिळत नाही. काम करायचं, ते मुळात पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी, जो प्रश्न काम करुन फळ मिळालं तरच सुटू शकतो. अशा परिस्थितीत फळाची अपेक्षा न धरता केलेल्या कामात, पोटाचं काय करायचं, हे कुठे कोणी सांगितलेलं माझ्या वाचनात आलेलं नाही. पुन्हा त्या वचनावर विश्वास ठेवून कृती केली आणि पुढे बऱ्याच काळाने फळ मिळालं(च) तर मधल्या काळाची भरपाई कुणी आणि कशी करायची, हा प्रश्न आहेच. दात असताना चणे मिळायला हवेत, बोळकं झाल्यावर मिळून काय उपेग?

मनापासून केलेल्या कामाचं फळ मिळालं नाही, की मग हे वरचे सगळे उदेश प्रसंगानुरूप आठवून स्वत:च्या मनाची समजूत घालत बसायची, एवढ्यासाठीच ह्या उपदेशांचं प्रयोजन असावं असं मला आताशा वाटत चाललंय..! या पार्श्वभुमीवर खरं सुभाषित ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ हेच असावं.

मनापासून केलेल्या कामाचं मधूर फळ मिळतंच मिळतं, हे सुभाषित आठवत मन लावून काम करायचं आणि ते ‘मन’भर काम समाप्त झाल्यानंतर मिळणारं कणभर फळ पाह्यलं, की मग दुसरं सुभाषित, ‘करम किये जा फल की इच्छा मत कर ऐ इन्सान’ असं म्हणत, स्वत:च्या मनाची समजूत घालून, ‘मनापासून केलेल्या कामाचं फळ मिळतं’ हे पहिलं सुभाषित आठवत स्वत:ला पुन्हा नवीन कामाला जुंपून घ्यायचं आणि पुन्हा काही काळाने दुसरं सुभाषित आठवत, पुन्हा मनाची समजूत घालायत बसायचं, हेच चक्र चालू असताना आजुबाजूला दिसतं. मी चुकत असेन कदाचित, पण माझा अनुभव मात्र असाच आहे.

व्यवहारी जगात सुभाषितांप्रमाणे वागणारांच्या नशीबी सोटाच येतो. सुभाषितं ही कालनिर्णयप्रमाणे भितीवरीच शोभतात, हा वागण्यात नाही. वरची दोन्ही सुभाषितं, स्वार्थी माणसांनी भोळ्या माणसांच्या मनाच्या समजुतीसाठी तयार केलेली असावीत, असं माझ्या वाटण्यावरची माझी श्रद्धा अधिक पक्की होऊ लागते..!

-नितीन अनंत

9321811091

14.05.2019

मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा –

मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स-

मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता. ‘४ मर्यादित’चा तो संपूर्ण रूट माझा पाठ झाला होता. आजही मी कधी संधी मिळाल्यास, त्या रुटवरून प्रवास करतो. फक्त बसच्या ऐवजी मोटरसायकलने. आता हा रूट आपलं रुपडं बदलत चाललाय, पण तो अजूनही मला माझं लहानपण काही क्षणांसाठी मिळवून देत असतो.

पुढे मी जेंव्हा एकट्याने प्रवास करायला सुरुवात केली, तेंव्हा मग बसच्या ऐवजी ट्रेनने प्रवास करू लागलो. लालबागला मामाकडे जाताना दादरला उतरून मार्ग बदलायचा आणि करी रोड किंवा चिंचपोकळीला उतरायचं. मामाच्या घरापासून चिंचपोकळी स्टेशन अगदी जवळ, पण कधीतरी मामाकडे ‘भारतमाता’ समोरच्या कोपऱ्यावरच्या ‘श्रीकृष्ण दुग्धालया’तून काहीतरी खाऊ घेऊन जाण्याची आईची आज्ञा असे, तेंव्हा करी रोडला उतरायचं आणि श्रीकृष्णला भेट देऊन पुढे मामाच्या घरी जायचं..! आता ‘भारतमाता’ तिथेच असली तरी, ‘श्रीकृष्ण’ मात्र किटायर झालंय..

तेंव्हापासूनच चिंचपोकळी आणि करी रोडचं एक वैशिष्ट्य माझ्या मनात ठसलं होतं, ते म्हणजे त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून वरच्या रस्त्यावर बाहेर पडण्यासाठी असलेले रॅम्प्. असा रॅम्प दादरच्या मध्य रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवरही होता. आहे. गम्मत म्हणजे दादर स्टेशन बाहेरच्या पश्चिमेच्या बाजूला, दक्षिण टोकाला असलेल्या फुलबाजाराच्या दारात असणाऱ्या पुलावर लोकांना चढण्यासाठीही रॅम्प होता. आता हा अस्तंगत होऊन तिथे जिना आलाय.

पुढे माझ्या फिरण्याची कक्षा रुंद झाल्यावर, तसाच रॅम्प, पश्चिम रेल्वेवरच्या माटुंगा रोड स्टेशनावरही आत आणि बाहेरच्या रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी असलेला माझ्या लक्षात आलं होत. हार्बर रेल्वेवेवर जाण्याचा प्रसंग आजवरच्या आयुष्यात अगदीच कमी आला, त्यामुळे तिकडच्या स्टेशनांवर असे रॅम्प आहेत की नाही याची मला माहित नाही, परंतु हार्बर आणि मध्य रेल्वेला वरच्या मजल्यावर काटकोनात सांधणाऱ्या सँडहर्स्ट रॉड या दुमजली स्टेशनावरही असा रॅम्प असल्याचं मला पुढे कधीतरी दिसलं. कुर्ल्याला आणि लोअर परेललाही असावा कदाचित, माहित नाही. . ही मोजकी स्टेशन वगळता मला इतरत्र कुठल्याही स्टेशनवर असे रॅप्स दिसलेले नाहीत किंवा असल्यास ते मी पाहिलेले नाहीत.

आणखी एका प्रकारचे लहान रॅम्प जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्मवर असायचे. प्लॅटफॉर्मच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना, आठ-दहा फुटांवर रुळांच्या पातळीत उतरणारे रॅम्प सगळ्याच स्टेशनांवर असायचे, ते आता नष्ट झाले आहेत. हे रॅम्प नष्ट झाल्याने, पूर्वी मला सुताराच्या फरशीच्या धारे सारखे वाटणारे प्लॅटफॉर्म आता लांब जास्त आणि रुंद कमी असणाऱ्या

आयताकार चौकोनी ठोकळ्यांसारखे दिसतात.

जिने बांधण्याचा साधा सोपा पर्याय असूनही, हे असे चढते आणि उतरते रॅम्प का बांधले असावेत, हा प्रश्न माझ्या मनात तेंव्हा पासून मुक्कामाला होता. असे अनेक बिनकामाचे (म्हणजे पैसे मिळवण्यास अगदीच निरुपयोगी असणारे) प्रश्न माझ्या मनात भाड्याने राहत असतात. माझ्या मनात अश्याच भाडेकरूंनी अधिकृत घर बांधलेली आहेत. परवाच त्यापैकी एक भाड्याने राहायला असलेला प्रश्न – ‘चहा; ‘तो’ कि ‘ती’ – हा माझ्यापुरता सोडवून त्याला त्याच हक्ाकच घर मिळवून दिल होत. त्याचा प्रश्न सुटला आणि ‘काही मोजक्याच स्टेशनांवरच्या ह्या रॅम्प्सचं प्रयोजन कायं’, हा प्रश्न, ‘माझीही अडचण सोडावं म्हणत’ हट्टाला पेटला. हा प्रश्न हट्टाला पेटला त्याला कारण असं झालं की, मी हल्ली माझ्या कामानिमित्त माटुंगा रोड स्टेशनला जवळपास दररोज उतरतो. ह्या स्टेशनवर उतरण्यासाठी आणि बाहेरच्या रस्त्यावरही जाण्यासाठी दोन स्वतंत्र रॅम्प्स होते. होते म्हणजे अजूनही आहेत. परंतु ह्या स्टेशनवर नवीन ब्रिज बांधल्याने, प्लॅटफॉरवरून वरच्या पुलाजकडे जाणारा वांद्रे टोकाकडचा रॅम्प प्रवाश्यांसाठी बंद करण्यात आला आहे. हा मजबूत रॅम्प काही दिवसांत आपल्या नजरेआड होऊन, त्याजागी भविष्यात कधीही पडू शकणारा जिना बांधला जाण्याची शक्यता आहे. माटुंग्याला बाहेरच्या पश्चिमेकडल्या रस्त्यावर उतरणारा रॅम्पवमात्र अजून वापरात आहे.

भविष्यात वर उल्लेख केलेल्या स्टेशनांवरचे रॅम्पही असेच नजरेआड होऊ शकतात. हे ऐतिहासिक रॅम्प नजरेआड होण्याच्या पूर्वी, अपंगांची सोय पाहाणं आतासारखं कायद्याने आवश्यक नसतानाही, ते त्याकाळात बांधण्याची आवश्यकता मुळात का पडली असावी, ह्या माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधणं मला आवश्यक वाटलं.

हा असा प्रश्न पाडण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ते काही मोजक्याच स्टेशनांवर आहेत. दादर-करी रॉड-चिंचपोकळी-सँडहर्स्ट रॉड या चौकोनाटाळ्या स्टेशनवर हे रॅम्प्स दिसतात. बाकी उर्वरित सर्व स्टेशनांवर आपल्या नेहेमीच्या परिचयाचे जिने आहेत

कुठल्याही वाहतुकीच्या मार्गावरचे रॅम्प्स, वाहनात सामानाची चढ उत्तर करणे सोयीचे जावे यासाठी असतात, त्याचसाठी ती इथेही असावेत, हे याचं सोप्प उत्तर. वर उल्लेख केलेली ठिकाण पूर्वीच्या गिरणगावातली आहेत. त्यामुळे तिथे सामानाची चढ उत्तर होत असणारच. परंतु यातील सँडहर्स्ट रॉड आणि दादर ही स्टेशन वगळता, करी रोड, चिंचपोकळी आणि माटुंगा रोड ही स्टेशन काही मालाची चढ उत्तर करण्यासाठी फारशी प्रसिद्ध नव्हती. मग इथे रॅम्प्स का, ह्या प्रश्नाचं उत्तर, वरच्या सोप्या उत्तरापलीकडे जाऊन शोधण्याखेरीज पर्याय उरत नाही.

मुंबईचा अभ्यास करताना (पक्षी;मुंबईवरील वाचन करताना. मी अभ्यास करतो हे अनेक तज्ञांच्या पचनी पडत नसल्याने, ‘वाचन करताना’ असा या कंसात खुलासा केला आहे), एक ही सर्व जुनी स्टेशन्स. सुरुवातीच्या काळात बांधली गेलेली. आणखी एक गोष्ट माझ्या सतत लक्षत येत होती, ती ही, की हा सर्व भाग बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या, श्रीमंत पारशी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या आणि एतद्देशीय कामकऱ्यांच्या निवासाचा भाग होता. सर्व व्यापार मुंबई फोर्टमध्ये मर्यादित असल्याने, मोकळी जागा म्हणावी असा हाच परिसर होता. मुंबईच्या गव्हर्नरनेही आपला प्रासाद फोर्टातुन परळला हलवला होता. ब्रिटिश मरिनमधल्या बुखानन नांवाच्या एका बड्या अधिकाऱ्याचा ‘चिंट्झपुगली’ नांवाचा भव्य बंगला चिंचपोकळी स्थानकाच्या परिसरात होता आणि त्यावरूनच ‘चिंचपोकळी’ ह्या स्टेशनचं नामकरण झालं आहे, अशी माहिती डॉ. अरुण टिकेकरांनी त्यांच्या ‘स्थल-काल’ या पुस्तकात दिली आहे. ब्रिटिश गव्हर्नरच एक वीकएंड हाऊस सायनच्या किल्ल्यासमोरच्या डोंगरावर होत, अशीही माहिती डॉ. टिकेकरांनी दिली आहे. माटुंगा स्टेशनच्या पश्चिमेला डेव्हिड ससूननी बांधलेली ब्रिटिशकालीन उद्योग शाळा आहे. चिंचपोकळीच्या पश्मिमेला आर्थर रोडचा तुरुंग तर पूर्वेला भायखळ्याच्या डोंगरीच्या तुरुंग, ह्याच परिसरात हॉस्पिटल्सही मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यातली बरीचशी ब्रिटिशकालीन आहेत. बड्या अधिकाऱ्यांचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा निवासी भाग असल्याने, त्या अधिकाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आपल्या घरापासून फोर्टमधल्या आपल्या कार्यालयात जाण्यासाठी किंवा फोर्टातल्या अधिकाऱ्यांना या परिसरात जाण्या-येण्यासाठी रेल्वे सोयीची असावी आणि रेल्वेत बसण्यासाठी जाताना, आपल्या घरापासून रेल्वेच्या डब्यापर्यंत आपला आणि आपल्या पदाचा आब सांभाळत घोड्यावरून किंवा पालखी-मेण्यांतून थेट प्लॅटफाॅर्मवर जाणं येणं शक्य व्हावं यासाठी, ह्या मोजक्याच स्टेशनांवर ते रॅम्प बांधले असावेत, असं उत्तर मला विचारांती सापडत. ह्या सर्व स्टेशनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे सर्व प्लॅटफार्म्स दुहेरी आहेत. एकाच प्लॅटफाॅर्मवर दोन बाजुंना अप आणि डाऊनला जाणाऱ्या गाडीत बसणं सोयीचं आहे. दोन्ही दिशांना जाणाऱ्या गाड्यांपर्यंत जाण्याचा उद्देश एकाच रॅम्पमधे साध्य होतो.

या स्टेशनांवरचे मोठे रॅम्प खाश्या स्वाऱ्यांसाठी आणि सर्वच फलाटाच्या दोन्ही बाजूंच्या टोकानावर असलेले लहान, रुळांमधे उतरणारे रॅम्पस सामानाची चढ उत्तर करण्यासाठी असावेत. रेल्वेच्या माल डब्यांचं प्रयोजन त्याचसाठी, गाडीच्या दोन बाजूच्या दोन टोकांवर, ड्राइव्हर आणि गार्डच्या निकट असत, ते त्याचमुळे असावं. आजही ते तसंच आहे.

आता घोडे-पालख्या गेल्या. आरामाचं महत्व जाऊन, व्यायमाचं(जबरदस्तीच्या) महत्व वाढलं. त्यामुळे रॅम्प्स संपत आले आणि जिने आले. पुन्हा कालचक्र फिरलं आणि आराम नसला तरी, सोय होणं महत्वाचं वाटलं आणि आता सरकते जीने आले. तरीही इतिहात तसं का होतं, ह्याची उत्सुकता मला होती. ‘बिना कारन कोई बात नही होती’ यावर माझा विश्वास असल्याने, त्याकाळात तसं का होतं ह्याचं उत्तर शोधण्याचा मी केलेला हा एक (माझ्यापुरता)प्रामाणिक प्रयत्न..!!

ही माहिती कुठे नोंदलेली आहे की नाही, त्याची मला माहिती नाही, परंतु ‘काही स्टेशनांवरच रॅम्प्स का’, या प्रश्नाचं माझ्या तर्कबुद्धीने दिलेलं हे उत्तर आहे. त्याचा खरे-खोटेपणा तरासायचं काम मी तुमच्या तर्कबुद्धीवर सोडतो आणि थांबतो..

-©️नितीन साळुंखे

9321811091

09.05.2019

फोटो सौजन्य-

1. इंटरनेट

2. माझा मित्र भरत लालगे

चहा ‘तो’ की ‘ती’?

चहा ‘तो’ की ‘ती’?

‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो, पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. मला ‘चहा; तो की ती’चं उत्तर मिळालं की नाही, ते माहित नाही, पण विचार करायला लावणारी बरीच माहिती मात्र मिळाली. बहुसंख्यांच्या मते चहा पुल्लिंगी आहे, तर चहाला स्त्रिलिंगी समजणारे अल्पमतात आहे.

माझ्या मनात हा प्रश्न उभा राहाण्याचं कारण म्हणजे, मी अगदी मला समजायला लागल्यापासून आमच्या मुंबईच्या घरी ‘ती चहा’ असंच ऐकत म्हणत आलोय. माझ्या मुंबईतल्या मित्र-परिवाराच्या, नातेवाईकांच्या घरातही मी चहाचा उल्लेख स्त्रिलिंगीच ऐकत आलोय. माझ्या मनात चहाचा लिंग बदल झाला, तो मी बॅंकेत नोकरीला लागल्यावर.

माझी बॅंक पुण्याची. मी जरी मुंबंईच्या शाखेत नोकरीला होतो तरी, बॅंकेतले बहुतेक अधिकारी आणि काही कर्मचारी पुण्यातले होते. बॅंकेत मी चहाचा उल्लेख पुल्लिंगी होताना ऐकला आणि माझ्या मनात हा गोंधळ सुरू झाला. मी अनेकांना हा प्रष्न विचारला. पण त्यातील बहुतेकांनी बहुतेकवेळा,”पी ना xxx गपचूप”, अशीच किंया याच अर्थाची उत्तरं दिलं. उरलेल्यांनी मी कामातून गेलेली केस आहे अशा नजरेने माझ्याकडे पाहिलं. मला वाटतं, मी आज हा प्रश्न विचारल्यावर आपल्यापैकी अनेकांनीही माझ्याबद्दल असाच विचार केला असेल आणि तो काही अगदीच चुकीचा आहे असं म्हणता येत नाही. मला असे रिकामटेकडे प्रश्न बरेच पडत असतात..असो. चहाला हे लोक ‘तो’ का म्हणतात हे मला समजलं नाही.

मग मी स्वत:च याचं उत्तर शोधायचा प्रयत्न सुरू केला. माझी आई देवगडची. मालवणी भाषेत बोलणारी. मालवणीत चहा स्त्रिलिंगी. आणखी एक, मालवणी मुलकात चहा बऱ्याचदा खाल्ला जातो, पिला जात नाही. ‘चाय खातं वायच’ हा कोणत्याही वेळी कोणीही कोणालाही विचारावा असा प्रश्न. या प्रश्नाला सहसा ‘नाही’ असं उत्तर मिळत नाही. तर, मालवणीत चहा स्त्रिचं रुप घेऊन येते. मग माझ्या आईच्या बोलण्यातून ती मराठीतही स्त्री होऊनच अवतरलू. मी ओळखत असलेल्या बहुतेक सर्वच मालवणी जनतेत मला चहा स्त्री रुपातच आढळली. काल माझ्या चतु:शब्दी प्रश्नावर आलेल्या कमेंटमधेही हेच आढळून आलं. थोडक्यात मी असं गृहीतक मांडलं, की मालवणीत बाईच्या जन्माला गेलेली चहा, मालवणीतून मराठीत येताना, स्त्री बनूनच आली असावी. हे बरचसं पटण्यासारखं होतं (अर्थात मलाच..!).

पण मग माझ्या सासुरवाडीतही चहा स्त्रीलिॅगीच आहे. माझी सासुरवाडी रत्नागिरीतल्या देवरुखची. गांवातही शुद्ध मराठीतच बोलणारी. नाही म्हणायला त्यांच्यापैकी काहीजणांच्या बोलण्यात ‘नाही’ शब्दाला ‘न्हवं’ असा घाटाची जवळीक सांगणारा शब्द येतो आणि जुन्या स्त्रीया स्वत:साठी ‘येतो’, ‘जातो’, ‘खातो’ अशी पुरुषासाठीची क्रियापदं वापरताना मला दिसल्या, पण ते अपवादात्मकच. पण इकडेही चहा मात्र ‘ती’च होती. मालवणीत चहा स्त्रिलिंगी, म्हणून मालवणी माणसाच्या मुखातून मराठीतही चहा ‘ती’ म्हणूनच अवतरली, हे पटतंय न पटतंय तोच, शुद्ध मराठीत बोलणाऱ्या माझ्या सासुरवाडीच्या लोकांतही चा ‘ती’च का, असा प्रश्न माझ्या डोक्यात उभा राहीला आणि पुन्हा मी गोंधळलो.

माझ्या त्या पोस्टवर बऱ्याचजणांनी जरी ‘तो’च्या बाजूने मतदान केलेलं असलं तरी, व्यवहारीक जीवनात मला नेहेमी ‘ती’ चहाच भेटलेली (‘भेटणं’ हा शब्द अनेकजण सरसकट ‘मिळालं’ या अर्थाने वापरताना दिसतात. ‘भेटते’ती व्यक्ती, ‘मिळतं’ ती वस्तू किंवा हरवलेलं काही, अशा ढोबळ अर्थाने हे दोन शब्द आहेत. मी या लेखात ‘चहा’ला एक व्यक्ती मानतोय म्हणून ‘भेटलेली’ असा शब्द वापरलाय)आहे. मग मी याचं उत्तर स्वत:च शोधायचं ठरवलं..स्वत:च म्हणजे स्वत:ची कल्पनाशक्ती ताणून..!!

माझ्या मते चहा महिलाच असावी. चहा हे उत्तेजक पेय आहे असं सगळे म्हणतात आणि सर्वत्र सहज उपलब्ध असलेली सर्वच उत्तेजक पेयं स्त्रिलिंगीच आहेत. उदा. काॅफी, बियर, दारू इत्यादी. या पेयांचं नांव जरी उच्चारलं, तरी पुरुष, मग तो कोणत्याही वयाचा असो, उत्तेजीत होतो. तसाच तो स्त्रीयांचा उल्लेख जरी झाला, तरी उत्तेजीत होतोच. तसं स्त्रियांचं उत्तेजक पेयांच्या बाबतीत होत नसावं. पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांचं तसं होतं की नाही, ते मला सांगता येत नाही. होत असलं तरी पुरुषांइतकं सातत्य त्यात नसावं. तस्मात चहा स्त्रीच असावी.

आपला समाज पुरुषप्रधान असल्याने उत्तेजना किंवा स्फुर्ती, या चीजा पुरुषांना आवश्यक असतात, असं समजलं जातं. स्त्रियांच्या तुलनेत पुरूष असतातही जास्त चहाभोक्ते. मी स्वत: चहा कितीही वेळ आणि दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी सहज आणि आनंदाने पिऊ शकतो. पिऊ शकतो कशाला, पितोही. असेच अनेक चहाप्रेमी मला माहित आहेत.

मला केवळ चहाच नाही, तर चहाची वेळ झाल्यावर एक अनावर हुरहूर लागून राहाते. लहानपणी आई दुपारी ३-३.३० ला चहा करायची. दुपारी शाळेतून आल्यावर जेवून झोपायची माझी सवय अद्यापही कायम आहे. बॅंकेच्या नोकरीत असतानाही मी दुपारी तास-दोन तास झोपायचो(मीच कशाला सगळेच झोपायचे. कारण बॅंक सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन वेळात भरायची. मधले दोन-तीन तास जेवणाची सुट्टी..!) लहानपणी चहाची वेळ झाली की, आपसूक जाग यायची. आई स्टोव्ह पेटवण्याच्या आवाजाची चाहूल घेत अंथरुणात पडून राहायचं. स्टोव्ह पेटल्याचा फरफर आवाज आला की चहाची पहिली हाळी मिळायची. मग स्टोव्हवर अॅल्युमिनियमच्या लहानश्या ताटलीत तंबाखू भाजल्याचा उग्र दरवळ घरभर घुमायचा. (तंबाखूची मशेरी हे त्या काळच्या मालवणी स्त्रीयांचं व्यवच्छेदक लक्षण). आता पुढची पाळी चहाची ह्याची आता खात्री व्हायची. तोवर अंथरुणातच पडून राहायचं.

आईचं मुखमार्जन झालं, की मग चहाच्या पातेल्याचा तो चीरपरीचित आवज कानी पडायचा. अगदू त्याच आकाराचं किंवा त्याच प्रकारचं पातेलं असलं तरी, कानाला चहाचं पातेलं आणि तशाच प्रकारचं दुसरं पातेलं, यातला फरक ठळकपणे जाणवायचा. एकदा का तो स्वर्गीय आवाज ऐकली, की मग अंगभर जो काय उत्साह संचारायचा, त्याचं वर्नणं करणं केवळ अशक्य..! कितीही कोलाहल असू देत, आईच्या चहाच्या भांड्याचा तो कोलाहलाच्या मानाने क्षीण असलेला आवाज बरोबर माझ्या कानाचा वेध घ्यायचा. तो आवाज अजुनही कानात घुमतोय. तो आवाज ऐकला की आता लगेच चहा प्यायला मिळणार या आनंदाने मग अंथरुणातून उठून तडक चहाला बसायचं.

ही माझी बालपणाची सवय अद्यापही कायम आहे. नंतर काॅलेजच्या कॅंन्टीनमधल्या चहाची किणकीण इतर भांड्यांच्या आवाजातूनही मला स्पष्टपणे ऐकू यायची. आॅफिसात येणाऱ्या चहाव्ल्याच्या किटलीवरून तो रोजचा चहावाला की दुसराच कोणी हे देखील मला बरोबर ओळखता येतो. अर्थात हे फक्त चहाच्या बाबतीतच होतं, इतर बाबतीत नाही.

प्रेयसीची चाहूल घेणं आणि चहाची ‘चा’हूल घेणं मला सारखंच हुरहूर लावणारं वाटतं. प्रेयसीचा आवाज किंवा पायरव कितीही कलकलातून ऐकायला येतोच. तो आवाज ऐकल्यावर लागणारी एक अनामिक हुरहूर, लवकरच आपली भेट होणार याच्या आनंदाने अंगभर दाटून येणारा उत्साह..! एवढं होऊन ती प्रत्यक्ष भेटल्यावरचा आनंद आणि न भेटल्यास होणारी चिडचीड मला चहाबाबतही अनुभवायला येते.

चहाच्या संदर्भातही माझी भावना प्रेयसीपेक्षा कमी नाही. ‘ती’च्याचहाच्या नुसत्वा उल्लेखानेही मन मोहरुन येते. एक वेगळीच तरतरी येते. चेहेरा लाल गोरा होतो. अगदी तस्संच मला चहामुळे होतं. फरक एकच. चहा सारखी प्यावीशी वाटते. प्यायला मिळतेही. (वयाने वाढलो तरी) प्रेयसीही सारखी यावीशी वाटते, पण येत नाही (बघतही नाही म्हणा कुणी हल्ली, येणं दूरच राहीलं). येवढा एक जालीम फरक सोडला, तर चहा आणि प्रेयसी सारखीच. म्हणून मला तरी चहा ‘ती’ असावी असं वाटतं..

-नितीन साळुंखे

9321811091

06.05.2019

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी;एक चिंतन-

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी;एक चिंतन-

वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा तो जास्त ‘देशीय’ असतो आणि म्हणून तर प्रांतीय आंदोलने महाराष्ट्राच्या मातीत दीर्घकाळ यशस्वी होवू शकत नाहीत. ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले’ ही भावना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजतागायत उराशी जपलेली आहे. आणि जेंव्हा जेंव्हा राष्ट् अडचणीत येतं, तेंव्हा तेंव्हा राष्ट्राच्या हाकेला प्रथम ओ जातो तो महाराष्ट्राचाच.

अश्या ह्या कडव्या राष्ट्राभिमानी महाराष्ट्राचा मानभंग केलेला मात्र महाराष्ट्राची माती कधीच खपवून घेत नाही. याचा अर्थ असा नाही, की ती उठसुट आपल्या हक्कासाठी पेटून उठते. मराठी माती वाट पाहाते, अन्याय झाला असल्यास, करणाराला तो निवारणाची संधी देते. अगदी शिशुपालासारखे शंभर अपराध भरल्यानंतरच ती प्रतिकाराला सिद्ध होते ती मात्र सोक्षमोक्ष लावायचाच या जिद्दीने. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रास्त मागणीत दुजाभाव होतो आहे हे लक्षात येताच मराठी माणसाने स्वत:चे प्राण देऊन त्याचा प्रतिकार केला आणि स्वत:वर अन्याय होऊ दिला नाही.

असा हा कडवा राष्ट्राभिमानी मराठी माणूस आपली मातृभाषा मराठीसाठी आग्रही का होत नाही हेच कळत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत, मराठीजनच आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यामाच्या शाळेत घालण्यासाठी वाटेल ते करत आहेत. मुलांना इंग्रजी संभाषण यावं यासाठी घरी-दारी त्याच्याशी आग्रहाने इंग्रजीत संवाद करत आहेत. इंग्रजीच का, सर्वच भाषा बोलायला आल्या पाहिजेत असं माझंही ठाम मत आहे पण याचा अर्थ असा नव्हे की त्यासाठी मातृभाषा मराठीचा त्याग करायला(च) हवा.

मराठी माणसाचा आपला जो कडवा देशाभिमान, जी वैभवशाली सांस्कृतिक आणि महान सामरीक परंपरा आहे ना, ती आपसुकपणे आणि सहजतेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मातृभाषा हे एकमेंव उपलब्ध साधन आहे हे आपल्याला समजत का नाहीय? आपली ‘मराठी’भाषा मेली तर तो देशाच्या बरोबरीने कोणतही संकट झेलण्यासाठी छाती पुढे ताणून उभा राहीलेला महाराष्ट्र पुन्हा दिसणार नाही अशी मला चिंता वाटते. मुलांना मराठी भाषाच समजली नाही तर नसानसांत स्फुल्लिंग चेतवणाऱ्या कविता, रक्त सळसळवणारे शाहीरांचे पोवाडे, स्फुर्ती देणारी भाषणे-व्याख्याने मराठी मुलांच्या मनाला कशी भिडणार?

‘खबरदार जर टांच मारूनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या’ या कवितेतील त्या लहान मुलाचा जोश आणि शत्रुप्रतीचा त्वेष कवितेच्या त्या ओळींतून मुलांच्या मना-अंगात भिनण्यासाठी, त्या शब्दांचा अर्थ तर मुलांना कळायला हवा..! आणि तो मराठी भाषाच मुलांना आली नाही, येऊ दिली नाही, तर त्यांना कळायचा कसा. मग त्याच्या तो जोश निर्माणच कसा व्हायचा..? नविन पिढीला दोष देऊन काहीच उपयोग नाही, हा दोष त्या पिढीला घडवणाऱ्यांचा म्हणजे आपला आहे.

केवळ इंग्रजी उत्तम बोलता यावं यामागे त्याला चांगली नोकरी लागावी, परदेशात मुलाने जावं हाच बहुतेकांचा उद्देश असतो पण या संकुचित विचारापायी आपण महाराष्ट्राच्या, देशाच्याआणि मुलाच्या भावविश्वाचा खुन करतोय हे आपल्या लक्षात का येत नाहीय? मुलांचं भावविश्व विकसित होण्यासाठी मातृभाषेची बैठक पक्की लागते. ही बैठक पक्की असली का जगातिल कोणतीही भाषा वा गोष्ट असाध्य नसते ही साधी गोष्ट ज्या दिवशी मराठी माणसाला समजेल तो मराहाराष्ट्रासाठी गौरवाचा दिवस असेल आणि तो सुदिन लवकरच यावा अशी तुम्हा सर्वांप्रती प्रार्थना..!!

जय हिन्द, जय महाराष्ट्र..!!

-नितीन साळुंखे

9321811091