भाषिक संमेलने – एक सामाजिक गरज

भाषिक संमेलने – एक सामाजिक गरज

रविवार, २३ जून २०१९ रोजी मुंबईतल्या दादर येथे ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’ संपन्न झालं. मालवणी बोलीसाठी वाहिलेलं हे सहावं आणि सलग साजरं झालेलं दुसरं संम्मेलन. यापूर्वीची पांच संम्मेलनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरी झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर, मुंबईत झालेलं हे पहिलंच संम्मेलन. मागच्या वर्षीच्या मे महिन्यात कणकवलीच्या प्रख्यात आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पांचवं संमेलन साजरं झालं होतं, त्या संमेलनाला मी उपस्थित होतो. यंदाचं संमेलन तर माझी कर्मभूमी मुंबईत असल्यानं, मी ते चुकवणं शक्यच नव्हतं. लागोपाठच्या दोन वर्षी सलग साजऱ्या झालेल्या दोन्ही संमेलनाला उपस्थित राहाण्याची संधी मला लाभली.

मुंबईतल्या संमेलनाच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी माझे मित्र श्री. प्रकाश सरवणकर अध्यक्ष असलेल्या, मुंबंईच्या ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या नोंदणीकृत संस्थेने घेतली होती. त्यांच्या साथीला होती ‘मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग’ ही लळीत बंधुद्वयांनी मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी चालवलेली संस्था. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भोगले. प्रसिद्ध साहित्यिक श्री. गंगाराम गवाणकर माजी अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते, तर मालवणचो झील आणि मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डाॅ. सुहास पेडणेकर संमेलनाचे उद्घाटक होते. हा झाला संमेलनाचा तांत्रिक तपशील.

मी या संमेलनाला उपस्थित राहाण्याची आतुरतेने वाट पाहात होतो. तीन महिन्यांपूर्वीच संमेलनाची तारीख व ठिकाण जाहिर झालं होतं. त्यानंतरच्या काळात सोशल मिडिया, वर्तमानपत्रं, फोन, वैयक्तिक गाठी-भेटी इत्यादी जमेल त्या सर्व माध्यमांतून संमेलनाची जोरदार जाहिरात सुरू होती. यापूर्वीची पांच संमेलनं सिंधुदुर्गात होऊनही रसिकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने, ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ला मुंबईतल्या संमेलनाला कितपत लोक येतील याचीच चिंता असणं नैसर्गिक होतं त्यात संमेलनाचा दिवस होता रविवार. मुंबईत लोकल ट्रेन हेच प्रवासाचं स्वस्त आणि वेगवान साधन असलं तरी, रविवारी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर ‘मेगाब्लाॅक’ नांवाच्या शनीची वक्री दृष्टी असते. अगदी नाईलाज असेल तरच या दिवशी मुंबईकर प्रवासाला बाहेर पडणार. त्यात साहित्य वैगेरेसाठी इतका त्रास कुणी घेतंही नाही हल्ली. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडलेली. बरं जेवणंही पूर्ण शाकाहारी. काळ्या वाटाण्याची उसळ, वडे, बटाट्याची पिवळी भाजी, भात आणि वरण. हिंवसान काहीच नाही. रविवार असून हिॅवसान नाही म्हणजे मालवण्याला जरा कठीणच. म्हणजे ते ही आकर्षण नाहीच. आयोजकांची चिंता काही अगदीच चुकीची नव्हती..!

शेवटी तो दिवस उजाडला आणि अहो आश्चर्यम..! संमेलनाला गर्दी कशी होईल याची चिंता पडलेल्या प्रतिष्ठानला, आता या गर्दीला आवरावं कसं, याची चिंता लागून राहिली. रविवारचा दिवस, मेगाब्लाॅक, शाकाहारी जेवण इत्यादी साऱ्या अडचणींवर मात करुन मुंबई उरलासुरला आणि उपनगरात विखुरलेला अख्खा मालवणी मुलुख’ संमेलनाच्या ठिकाणी लोटांनी येऊ लागला, तो ही कुटुंबासहीत. त्या दिवशी सकाळच्या दोन तासांत, दादर स्टेशन पूर्व ते संमेलनाचं ठिकाण, या एकूण दोनेकशे मिटरच्या अंतरात फक्त मालवणी भाषा ऐकू येत होती. ‘सायबानू ह्यो पत्तो सांगतास काय जरा’ असं म्हणून पत्ता विचारणारी किंवा समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरचं मालवण बरोबर ओळखून, ‘तुमी पन संमेमलनास इलास की काय?’ ही व अशीच लाल मातीतली बोली बोलणारी मालवणी माणसं दिसत होती. गर्दी होणार नाही, ही आयोजकांची चिंता, मालवणी रसिकांनी साफ फोल ठरवली.

मी या संमेलनाला जाण्यासाठी अत्यंत उत्सूक होतो. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, फेसबुकवरच्या अनेक मित्रांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेटता येणार होतं. त्यांच्याशी गप्पा मारता येणार होत्या, त्यांच्यासोबत फोटो काढून घेऊन ते फोटो फेसबुकवर मिरवता येणार होते. याच उत्साहात संमेलन ठिकाणी पोचलो नि कसलं काय, माझ्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळाल्या. तुडंब गर्दी झालेली. हाॅलमधे शिरायला हवेलाही जागा नाही. बाहेरही तेवढीच गर्दी. त्याचा परिणाम बाहेर आधीच गरम असलेल्या वातावरणात कमालीची वाढ होऊन, हॉल मध्ये निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि त्यामुळे घामाच्या धारा. त्यातही थ्री पीस सुटातले आणि जाकीटातले विचारपीठावरील पाहुणे पाहून, गर्मीची जाणिव अंमळ जास्तच होत होती. मी सरळ गच्चीची वाट धरली आणि संध्याकाळी चार-पांचपर्यंत तिकडेच बसून होतो. मधेच माझाही एक कार्यक्रम होता, तेवढा तासभर फक्त मी आत गेलो होतो आणि माझा कार्यक्रम आटोपल्यावर घामाचं सचैल स्नान करून पुन्हा गच्चीची वाट धरली होती. माझ्या अपेक्षेप्रमाणे फारसं कुणाला भेटणं झालं नाही की, काही नवीन ओळखी झाल्या नाहीत.

मी हॉलमध्ये प्रत्यक्ष हजर नसल्याने, तिथे प्रत्यक्षात काय कार्यक्रम झाले आणि त्याच फलित काय, यावर मला काहीच भाष्य करता येणार नाही. मात्र संमेलनाला एवढी अभूतपूर्व गर्दी का झाली, याचा विचार करावासा मला वाटला. माझ्या मनात उमटलेले विचार आपल्याशी बोलावेत असं वाटल्याने हा लेखाचा प्रपंच.

सहाव्या ‘मालवणी बोली साहित्य संमेलना’चे मुंबईतील आयोजक असलेल्या ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या संस्थेने, या संमेलनाची प्रचंड जाहिरात केली होती. अशी जाहिरात करण्यामागे, लोक संमेलनाला येत नाहीत, हा त्यांच्या पूर्वसुरींच्या पूर्वानुभव कारणीभूत असावा. दहाजणांपर्यंत आपले निमंत्रण पोहोचले तर, त्यातील तीन जण येतील अशी शक्यता त्यांनी गृहीत धरली असावी. आणि तशी शक्यता गृहीत धरून तेवढ्याच क्षमतेचा हॉल बुक केला असावा. प्रत्यक्षात काय घडलं, तर सिंधुदुर्ग प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी निमंत्रण दिलेले दहाजण तर आलेच, वर येताना ते आणखी तीन जण जास्तीचे घेऊन आले. मी ही तसंच केलं होतं. जेमतेम तीस टक्के रसिक येतील अशी शक्यता गृहीत धरली होती, तिथे १३० टक्के लोक आले. मग जे व्ह्यायच होत तेच झालं. जेमतेम दोनशे जणांच्या क्षमतेच्या हॉलमध्ये सहाशेहून अधिक रसिक आले आणि त्याचा ताण संपूर्ण व्यवस्थेवर आला. अर्थात त्याही परिस्थितीत प्रतिष्ठानच्या स्वयंसेवक/कार्यकर्त्यांनी आपलं मानसिक संतुलन न ढळू देता सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळी पार पडतील आणि जेवणादि व्यवस्था चोख राहील याची काळजी घेतली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

संपूर्ण संमेलनात गच्चीवर बसून राहिलेल्या मला या गर्दीच मात्र भारी कौतुक वाटलं. त्याहीपेक्षा कौतुक, खिशात तांदूळ ठेवले असते तर घामाच्या धारांत मुरून खमीसाच्या खिशातच त्याचा भात तयार होईल इतक्या प्रचंड उकाड्यात हॉलमध्ये बसून, सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेणाऱ्यांचं वाटलं. कुणीही आपली जागा सोडायला तयार नव्हतं. त्यामागे एकदा उठलो तर पुन्हा जागा मिळणार नाही ही भीती होतीच, त्याहीपेक्षा समोर चाललेले देखणे आणि श्रवणीय कार्यक्रम हुकतील ही भीती जास्त होती. घामातून अंगातील पाण्याचा आपोआप निचरा होत असल्याने, कुणाला बहिर्दिशेला जाण्याची निकडही भासत नव्हती. सबब, आतले आत आणि बाहेरचे बाहेर अशी परिस्थिती होती.

हाडाच्या मुंबईकराला गर्दीच तसं काही कौतुक नाही आणि भीतीही नाही. जन्मल्यापासूनच उभा जन्म दहा बाय दहाच्या खोलीत सात-आठ माणसांसोबत घालवल्यामुळे, गर्दीत अॅडजस्ट होण्याची कला त्याच्याकडे उपजतच असते. त्यात जेमतेम शंभर माणसं मावतील इतक्याच लोकलच्या डब्यात कोंबलेल्या तीनचारशे माणसांसोबत सकाळ संध्याकाळ प्रवास करण्याचीही त्याला सवय असते. जीवघेण्या गर्दीतून रोज प्रवास करत असताना, मुंबईकर त्यातही आनंद शोधात असतो. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात दोन माणसं भांडू लागली, की त्यांना भांडण्यासाठी त्या प्रचंड गर्दीत पुरेशी जागा करून देण्याची उदरताही तो दाखवत असतो. गर्दीत स्वतःच शारीरिक आणि मानसिक व्यवस्थापन कसं करायचंआणि जे काही समोर चाललंय, त्याचा निमूटपणे आनंद कसा घ्यायचा, ह्याच चोख व्यवस्थापन त्याच्याकडे असतं. हाच मुंबईकर परवाच्या संमेलनात आलेला असल्याने, प्रचंड गर्दी आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेला तोंड देत सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेत आनंदाने बसलेला पाहून मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. मला आश्चर्य वाटलं ते ‘साहित्य संमेलन’ ह्या फारश्या आकर्षक नसलेल्या सोहळ्याला एवढी गर्दी जमली कशी, याचं..!

ह्या सर्व गर्दीला सिंधुदुर्गातल्या लाल मातीचा चेहेरा होता. मालवणी माणूस, त्याच्या गावोगावी असलेल्या स्वयंभू रामेश्वरासारखा किंवा रावळनाथासारखा स्वयंभू. सगळेच स्वयंभू म्हटल्यावर ते सगळे एकत्र येणं तसं कठीणच. सिंधुदुर्गात आणि सिंधुदुर्गवासीयांमध्ये त्यामुळेच सहकाराची चळवळ फार तग धरत नसावी. एकाच गावातली मुंबईतली चार माणसं पूर्वी एकत्र येत, ती पाचव्याला खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत पोचवण्यासाठी. हल्ली मयतंही अँब्युलन्समधून वैकुंठास जाऊ लागल्यामुळे, ते एकत्र येणंही संपलं. आता ती आता एकत्र येतात ती मोबाईलमधला ल्युडो गेम खेळण्यासाठी. नाही म्हणायला एकत्र येऊन नाटकं घालणं हा आणखी एक छंद, परंतु टीव्हीचं आक्रमण आणि मुंबईतली जागेची कमतरता, ह्यामुळे ते एकत्र येणंही संपलंच जवळपास.

तर मग परवाच्या संमेलनाला एवढी गर्दी का झाली असावी, याचा आणखी विचार करताना माझ्या लक्षात येऊ लागलं की, घर आणि कार्यालय अश्या चक्रात आयुष्य अडकलेल्या मालवण्याला, कुठेतरी त्याच्या एकटेपणाची जाणीव होऊन, त्या जाणिवेतून आपल्या मुलखातील माणसं काहीतरी निमित्ताने एकत्र येतायत, ह्याच त्याला अप्रूप वाटून, त्या एकत्र येण्यात आपलाही त्यात सहभाग असावा ह्या हेतूने तो परवाच्या कार्यक्रमाला आला असावा. त्याच्या मनात आणखीही एक भावना असावी. पूर्वी कधीतरी आपल्या कष्टाने आणि घामाने या मुंबईनगरीला वैभवशाली बनवणारा मराठी माणूस, आज त्याच मुंबईत उपरा ठरलाय. मुंबईला आजची दिमाखदार मुंबई बनवणाऱ्या मराठी माणसात मालवणी कोकण्यांची संख्या लक्षणीय होती. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, मुंबईचं हृदय असलेल्या दादर ते लालबाग ह्या पट्ट्यात फिरताना, हमखास मालवणी भाषा कानावर पडत असे. आज जिथे मराठीच ऐकू येईना झालीय, तिथे मालवणी बोली तर फार लांबची गोष्ट.

मुंबईतलं कोकणी माणसाचं आणि एकूणच मराठी माणसाचं अस्तित्वच आज संपत चाललंय. तो फेकला गेलाय मुंबईच्या उंबरठ्याबाहेर कुठेतरी विरार-बदलापूर किंवा त्याहीपुढे. त्या उंबऱ्याबाहेरच त्याच घर म्हणजे उरलंय केवळ लॉगिंग बोर्डिंगसारखं. त्याला रात्री झोपायला फक्त घर हवं असत किंवा मग मोबाईल सिमला लागणाऱ्या पत्त्याच्या पुराव्यासाठी म्हणून. जिथे त्याला स्वतःच्या कुटुंबालाच भेटणं अवघड झालाय, तिथे गाववाल्याना-शिववाल्याना भेटण्याची बात तर बहोत दूरची. मुंबईत अल्पसंख्य झालेला मालवणी समाज, आपण एकत्र आलो नाही तर आपलं अस्तित्वच संपून जाईल या सुप्त भावनेनं कालच्या संमेलनात मोठ्या संख्येने एकत्र आला असावा, असं मला कालच्या संमेलनाला झालेल्या उत्स्फूर्त गर्दीकडे पाहून वाटलं. कोणताही समाज जेंव्हा अल्पसंख्य होतो, तेंव्हा तो समाज आपल्या समाज बांधवाना जातीच्या-धर्माच्या आणि भाषेच्याही आधाराने धरून राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतो, हेच यातून अधोरेखित होतं. मुंबईत गेली पाच-सहा किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष भरवल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल कोकण’ या भव्य प्रदर्शनाला सातत्याने होणारी कोकण्यांची प्रचंड गर्दीकडे पाहून मला हेच वाटत आलंय. मुंबईतल्या ‘मालवणी जत्रां’ना मिळणार भरघोस प्रतिसादही मला हेच सांगतो. आणि परवाच्या मालवणी बोली साहित्य संमेलनातली गर्दीही मला मूकपणे हेच सांगत होती. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीत प्रत्येक माणूस एकटा आहे. त्या माणसाचा हा दर्द समजला म्हणजे, अशा कार्यक्रमांना गर्दी का होते, याचं कारण लक्षात येईल.

माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे असं विज्ञान सांगते. हे समूह अनेक प्रकारचे असतात, तसेच ते भाषिकांचेही असतात. आपल्या समुहापासून तुटलेपण येऊ नये अशी सगळ्याच माणसांची असोशी असते आणि एकत्र येण्यासाठी वाटेल तो त्रास सहन करायची त्यांची तयारीही असते. दादरला परवाच पार पडलेल्या सहाव्या ‘मालवणी बोली साहित्य संमेलना’त, संमेलनातील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेणं हे कारण जरी असलं तरी, होणाऱ्या सर्व त्रासाकडे सपशेल दुर्लक्ष करून, मालवणी रसिकांनी केलेल्या अलोट गर्दीकडे मी, एकटेपणाच्या जाणीवेमूळे एकत्र येण्याची ‘सुप्त भावना’ या भावनेने पाहत होतो. यावेळी या सर्व मालवण्यांना एकत्र येणाचं कारण होतं, आपली मालवणी बोली.

जाती-धर्मापेक्षा भाषेवर आधारीत अशी संमेलनं दरवर्षी व्हायला हवीत. भाषेने जोडलेली माणसं जात आणि धर्माच्या पलिकडची असतात. अनेक वाटांवर एकटी पडलेली महानगरातल्या गर्दीतली माणसांची बेटं एकत्र याचला ‘भाषा’ हा सांस्कृतिक धागा जास्त चिवट असतो आणि म्हणून अशी संनेलनं आवश्यक असतात. ही एक सामाजिक गरज आहे.

-नितीन साळुंखे

9321811091

26.06.2019

-लेख शीर्षक कृतज्ञता – सौ. प्राजक्ता सामंत.

प्रसिद्धी – ‘दै. तरुण भारत’, सिंधुदुर्ग आवृत्ती, दिनांक २९.०६. २०१९ शनिवार

टीप- तरुण भारत मध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख, जागेच्या मर्यादेमुळे एडिट करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी.

एक आवाहन- An Appeal..

एक आवाहन-

आपल्या धाकट्या भावंडांच्या शिक्षणासाठी

चिमूटभर किंवा मुठभर मदतीचं..

समर्थ रामदास स्वामी एकदा प्रवासात असताना एका घराकडे थांबतात.घरातली स्त्री त्याचं चांगलं आगत स्वागत करते.थोड्या गप्पा गोष्टी होतात आणि मग समर्थ जायला निघतात.

काहीश्या अपराधी भावनेने ती स्त्री समर्थांना नमस्कार करते आणि म्हणते की,स्वामी क्षमा असावी आज आपल्या झोळीत टाकायला माझ्याकडे काहीच नाही.

तेव्हा समर्थ तिला सांगतात, “काही नाही असं कसं? तू तुझ्या तुळशीतली चिमुटभर माती माझ्या झोळीत टाक”

तेव्हा आश्चर्याने ती म्हणते, “महाराज ‘माती’ हे दान कसं असू शकतं?”

समर्थ, “आज तुझ्याकडे माती आहे, उद्या सोनं असेल. तू काय देतेस हे फारसं महत्वाचं नाही, पण तू काहीतरी देतेस हे महत्वाचं.”

ही गोष्ट आठवायचं खास कारण म्हणजे, आपल्या ‘दै. तरुण भारत’चा सुरु झालेला ‘यांचा आनंद १००%’ हा उपक्रम..!

गेली १३ वर्षे ‘दै. तरुण भारत’ हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्रतिष्ठीत वर्तमानपतून, ‘परिस्थिती गंभीर, पण मन खंबीर’ असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना समाजापुढे आणण्याच काम सातत्यानं करत आहे.

त्यानंतर गेल्या सात वर्षापासून ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने या उपक्रमाशी स्वत:ला जोडून घेतलं आणि अश्या हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांना, ठाण्याच्या ‘विद्यार्थी विकास निधी’चे प्रमुख श्री.रविंद्र कर्वे यांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा उपक्रम सुरु केला.

दोन वर्षांपूर्वी *’आम्ही बॅचलर’* या ग्रुपची याच उद्देशाने स्थापना झाली आणि आम्ही बॅचलर, तरुण भारत, भगीरथ प्रतिष्ठानने या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परिणामी पहिल्या वर्षी एक लाखाहून अधिक आणि गेल्या वर्षी दोन लाखाहून अधिक आर्थिक सहाय्य यासाठी जमा होऊन, ते विद्यार्थ्यांना वितरीत केलं गेलं.

या उपक्रमाचं आपण ‘आम्ही बॅचलर गृप स्कॉलरशिप’ असं नामकरण केलेलं असून, या उपक्रमाचे पूर्ण व्यवस्थापन सांभाळणाऱ्या *भगीरथ प्रतिष्ठान’च्या नांवाने यासाठी बँकेत एक खास खातं उघडण्यात आलेलं आहे. या उपक्रमाची प्रत्येक वर्षीची सांगता करताना, हे खातं ‘झिरो ब्यालंस’ करण्यात येतं आणि दरम्यान जमा होणारा संपूर्ण निधी ‘यांचा आनंद १००%’ या ‘दै.तरुण भारत’च्या सदरातुन प्रकाशात येणाऱ्या विद्यार्थ्यांना *’स्कॉलरशिप’* म्हणून वितरीत केला जातो.

मी मुंबईत राहाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या सहृदय मित्रांना, जिल्ह्यातील आपल्या धाकट्या भावंडांना मदत करण्याचं आवाहन करतो. ज्यांना चिमूटभर देण शक्य आहे त्यांनी चिमूटभर आणि ज्यांना मुठभर देणं शक्य आहे त्यांनी मुठभर अवशॅय द्यावं.

चिमुटभर असो वा मुठभर, त्याची पावती मात्र मिळणारच..!

माझ्या मित्रांच्या दातृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे.

-नितीन साळुंखे

9321811091

#बॅंक_खात्याचा_तपशील

खात्याचे नाव- भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान

खाते क्रमांक _- 149410110002217

बँकेचे नाव – Bank of India, झाराप शाखा

IFSC कोड – BKID0001494

इमेल आयडी – bhagirathgram@gmail.com

जिल्ह्यातले प्रतिनिधी – श्री. प्रभाकर सावंत.

(9422373855).

वेल डन मित्रहो, जिंकलास भावांनो..

#मालवणी_बोली_साहित्य_संमेलन

वेल डन मित्रहो, जिंकलास भावांनो..

काल मुंबईतल्या दादरमधे सहावं ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’ ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भोगले यांच्या अध्यक्षतेखाली साजरं झालं. सलग वर्षी संपन्न झालेलं हे दुसरं संम्मेलन. गत वर्षी साधारण याच सुमारास पांचवं संम्मेलन कणकवलीत साजरं झालं होतं आणि त्याही संम्मेलनाला उपस्थित राहाण्याचं भाग्य मला लाभलं होतं.

कालचं संम्मेलन अनेक अर्थांनी वेगळं होतं. मुंबईत मालवणी भाषा साहित्य संम्मेलन भरवण्याचं आव्हान, नव्यानेच स्थापन झालेल्या ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या संस्थेनं स्वीकारलं होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव नसताना प्रतिष्ठानच्या अधर्व्यूंनी हे आव्हान स्वीकारणं हे मोठंच वेगळेपण. दुसरं वेगळेपण म्हणजे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना चहा-अल्पेपहार-जेवण इत्यादी संपूर्ण नि:शुल्क देण्याचं आव्हान. तिसरं वेगळेपण म्हणजे या संम्मेलनात कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींची नसलेली लुडबूड. हे सर्वात महत्वाचं वेगळेपण. मालवणी भाषेवर प्रेम करणाऱ्या सामान्य मालवणी माणसाने, सामान्य मालवणी माणसाचं, असामान्यपणाने केलेलं हे प्रेमाचं आदरातिथ्य होतं..!!

सतत तीन महिने अनेक माध्यमांतून या संम्मेलनाची जाहिरात करण्यात येत होती. त्या शिवाय अगत्याची वैयक्तिक निमंत्रणंही जात होती. येवढं करुनही कितपत रसिक हजेरी लावतील याची शंकाच होती. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे यापूर्वी झालेल्या पाचंही संम्मेलनात रसिकांचा फारसा प्रतिसाद नव्हता, ते ही ही पाचंही संम्मेलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली असताना. त्यातल्या कणकवलीत झालेल्या गेल्या पांचव्या संम्मेलनात मी ही उपस्थिती लावली होती आणि न-गर्दीचा अनुभव घेतला होता. त्या अनुभवाची भिती मनात होतीच, वर संम्मेलनाचा दिवस रविवार, म्हणजे मुंबई लोकलच्या मेगाब्वाॅकचा दिलस. लोक या दिवशी घराबाहेर पडायलाच घाबरतात. म्हणून जास्तित जास्त मालवण्यांनी मुंबईतल्या संम्मेलनात यावं, याचा सर्वबाजूने प्रयत्न सुरू होते.

आणि काल मुंबईच्या पावसाप्रमाणेच, सर्वांचे अंदाज चुकवत मुंबईतला मालवणी माणूस बायका-पोरासहित (स्वत:च्याच), कुठल्यातरी रवळनाथाच्या किंवा आंगणेवाडीच्या जत्रेला नटून-थटून श्रद्धेनं जावं त्याच उत्साहाने मालवणी माणूस कालच्या आपल्या भाषा उत्सवाला आला आणि थेंब पावसाचे पडल्यावर अत्तराचे भाव जसे कोसळतात, तसेच पावलांच्या पडलेल्या अमाप ठशांनी आयोजकांचे सर्व अंदाज कोसळवले..

दोन-अडीचशे लोक येतील न येतील या अंदाजाने एअर कंडिशन्ड हाॅल बुक केलेला, तिथे सहाशेच्यावर मालवणी रसिक आले. जवळपास तिप्पट. ऐन मिरगाचा वखत असुनही पवासाच्या धारांत भिजणं काही झालं नव्हतं, परंतु प्रचंड गरमीने घामाच्या धारा लागलेल्या. बसायला जागा नाही. एसीने कधीच राम म्हटलेला. तरीही आयोजक उत्साहाने कार्यक्रमाचं संचालन करत होते आणि कोट-जाकीटं घातलेले पाहुणे त्साच उत्साहाने भाषणही करत होते. मालवणी रसिकही घाम पुसत पुसत ते आनंदाने ऐकत होते. सर्वचजण समान पातळीवर होते. कुठेही कुणाची तक्रार नाही की हुल्लडबाजी नाही. घरचं कार्य असताना काही अडचणी आल्याच तर, तर एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं, अशा समजूतदारपणाने सर्व सोहळा चालू होता. सर्वच एकरुप झालेले असतात, तेंव्हा कुठेही अडचणी जाणवत नाहीत, याच उत्तम उदाहरण म्हणजे कालचा ‘मालवणीचा गोंधळ’..!

गोंधळ या शब्दाचा मराठी अर्थ विस्कळीतपणा असा असला तरी, मालवणीत तो श्रद्धा असा आहे..त्या अर्थाने मी ‘मालवणीचा गोंधळ’ असा शब्दप्रयोग केला आहे..!

संम्मेलनातली उतू जाणारी मालवणी गर्दी पाहून, मला गृहप्रवेशाच्या वेळी केला जाणारा एक पारंपारीक विधी आठवला. नवीन घरात प्रवेश करताना, त्या घरातील नवीन चुलीवर(आपण गॅसवर म्हणू) दूध मुद्दामहून उतू घालवतात. नवीन घरात सुख-समृद्धी भरून वाहो, ही भावना त्यामागे असते. कालचं सम्मेलन हे मुंबईत नव्यानेच आयोजित केलं होतं. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या नूतन कार्यात भरून वाहात असलेल्या कालच्या गर्दीकडे पाहून, मला ते उतू जाणारं समृद्धीचं प्रतिक असलेलं दूध आठवत होतं. कालची उतू जाणारी माणसांची समाधानी गर्दी, मला मालवणीच्या भविष्यातील समृद्धीसाठी शुभसंकेत वाटला..

काल संपन्न झालेलं मालवणी भाषा संम्मेलन सर्वच अर्थानी यशस्वी झालं. सिंधुदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश सरवणकर, पदाधिकारी श्री. नितीन, श्री. राजेश राणे, श्री. राम साळुंके, सल्लागार व माझे मित्र हेमंत पवार, दर्शन नेवरेकर, वैभव परब, अभिषेक कांबळी, प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी /कार्यकर्ते यांनी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं..पहिलंच एवढं मोठं सार्वजनिक कार्य असुनही त्यांनी ते कल्पनेबाहेर यशस्वी करुन दाखवल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन..! (मला कृपया सर्व कार्यकर्त्यांनी आणि नऊवारी धारण केलेल्या कार्यकर्तींनीही, आपापले फोटो व नांव माझ्या नंबरवर व्हाट्सअॅप करावीत, म्हणजे सर्वांची नांवं लिहिता येतील, ही विनंती)

काल माझा एक मित्र संम्मेलनात मला भेटायला आला. गर्दी पाहून मला म्हणाला, “नितीनजी, पुढचं संम्मेलन तुम्हाला शिवाजी पार्कातच घ्यावं लागणार बहुतेक, आतापासूनच बुक करुन ठेवा..!” माझ्या गैरमालवणी मित्राने काढलेले हे उद्गारचं कालच्या संमेलनाच्या यशस्वीततेची पावती आहे, असं मी मानतो..

वेल डन मित्रहो, जिंकलास भावांनो..

-नितीन साळुंखे

9321811091

24.06.2019

*हा कालच्या संम्मेलनाचा वृत्तांत नव्हे, तर मी या संमेलनात काय अनुभवलं आणि त्याकडे कसं पाह्यलं, त्याची कथनी आहे.

मुंबईत २३ जून २०१९ रोजी होऊ घातलेल्या सहाव्या ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलना’च्या निमित्ताने..

मुंबईत २३ जून २०१९ रोजी होऊ घातलेल्या सहाव्या ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलना’च्या निमित्ताने..

माझी मा’लवणी’..

मालवणी माणसा ही अशीच रवतली,

फसली गेली तरी नाय म्हनतली,

हसणाऱ्याक रडयतली,

रडणार्‍याक हसवतली,

गुणगान करता करता

मधीच गाळीय घालतली..

कवितेच्या या ओळीचा कवी कोण ते माहित नाही मात्र या ओळीत मालवणी माणसाच्या स्वभावाच चपखल वर्णन आलेलं आहे..माझ्या अवीट गोडीच्या मालवणी भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, या भाषेत असलेला रांगडेपण किंवा सरळसोट सहजपणा. सहजपणे ओव्या गुणगुणाव्यात त्याच सहजतेने आमच्या मालवणीत बोलीत शिव्या, म्हणी येतात. शिवी आणि असभ्य शब्दांचं अस्तित्व हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो, तसा तो आमच्या मालवणीचीही आहे. शिव्या आणि असभ्य शब्दांवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. आमच्या सिंधुदुर्गात तर असभ्य समजली जाणारी ‘शिवी’, ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणाऱ्याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काही वाटत नाही. इथे प्रत्यक्ष बाप स्वत:च्या पोराला ‘रांडीच्या’ किंवा ‘भोसडीच्या’, अगदी त्याच्या आईसमोर बिनदिक्कत म्हणतो (आईही म्हणते अधे-मधे). येथे शब्दाचा अर्थ विचारात घेतला जात नाही, तर त्यामागील भावना पाहिली जाते. या शब्दांचा आमच्या मनातला अर्थ इंग्रजी ‘माय डियर’च्या जवळ जाणारा असतो..

व्यक्की जेवढी जवळची, तेवढी शिवी तिखट. मालवणीत शिवी हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. भांडणात दिल्या जाणऱ्या शिव्या त्याच किंवा तशाच असल्या, तरी ‘टोन’चा फरक असतो. शिव्यांच्या टोनवरुन प्रेम, लटका राग, सात्विक संताप किंवा भांडण चालू आहे हे हाडाच्या मालवण्याला लगेच कळतं, पण ऐकणाऱ्या बाहेरच्या एखाद्याला मात्र झीट येऊ शकते.

‘तुझ्या आवशीचो घोव’, ‘फटकेचो वाको इलो’, ‘भंगलो मेलो’, ‘खंय मराक गेल्लय’, ‘वशाड पडो मेल्याच्या त्वांडार’, हे तर खुपच सौम्य शब्दप्रयोग. परंतू काही शिव्यांचे उच्चार फारच अशिष्ट आहेतही ! उदा. ‘आंवझंवारो’, ‘मायझंया’ हे असेच काही शब्द. वय-नातं वैगेरेकडे न बघता कोणही कोणाला आणि कोणाच्याही समोर हे शब्द प्रसंगानुरुप बिनदिक्कत देत-घेत असतात. या शब्दांचा अर्थ घेतला जात नाही. आईसमोर लहान पोरंही भांडताना हे शब्द बिनधास्त उच्चारत असतात, तरी कुणालाच त्याचं काही वाटत नाही, एवढे हे शब्द मालवणी जिवनाचे अविभाज्य अंग बनले आहेत. शहरी सभ्यतेच्या कपड्यात गुंडाळलेल्या ऐकणाराच्या मात्र मेंदूला झिणझिण्या येऊ शकतात..!!

एका रांगडा सह्याद्री आणि दुसऱ्या कुशीत अथांग सागर घेऊन हयात घालवणाऱ्या आम्हा मालवणी माणसात आणि मालवणी भाषेत, सह्याद्रीचा रांगडेपणा आणि दर्याचा गूढ विक्षिप्तपणा पुरेपूर उतरला आहे आणि हे आमचं व्यवच्छेदक लक्षण आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी जाणत्याच्या लगेच लक्षात येतं. माणूस कुठला, हे ओळखण्याचं प्राथमिक साधन त्याची भाषा असते. ऐकणाराला शिवराळपणामुळे वरवर विचित्र वाटणारी भाषा आहे मात्र चविष्ट. खर तर हा शिवराळपणापेक्षा ‘चावट’पणा जास्त असतो आणि ‘चावट हा शब्द ‘चव’ या शब्दाचं एक रुप आहे आणि सह्याद्रीच्या रांगड्या मालवणीतला हा चवदारपणा, तिला तिच्या दुसऱ्या कुशीतल्या ‘लवणी’ दर्याने बहाल केला आहे असं म्हणता येईल. म्हणून तर आम्हाला आणि आमच्या भाषेला मा-‘लवणी’ असं नांव मिळालं असावं. ‘मिठा’चा हिन्दी अर्थ ‘गोड’ असा आहे, हे लक्षात घेतलं, तर मालवणी माणसातल्या आणि मालवणी भाषेतल्या गावरान ‘मिठाळ गोडव्या’चं रहस्य उलगडतं..

सह्याद्री आणि समुद्राच्या नैसर्गिक रोखठोकपणाचं वैशिष्ट्य लेवून मालवणी भाषा सजली आहे.निसर्ग नागडाच असतो आणि नैसर्गिक नागडेपणा हाच मालवणीचा अलंकार असल्याने, उगाच भाषीक अलंकार मालवणी वापरत नाही. नागडेपणा नैसर्गिक आणि म्हणून अस्सल असतो आणि कपडे काहीतरी लपवत असतात. मालवण्याला आणि त्याच्या भाषेला लपवा छपवी मंजूर नाही आणि म्हणूच हे मालवणीचं लक्षण मालवणीतल्या शिव्या, म्हणी-वाक्प्रचारांमधे स्पष्टपणे उतरलेलं दिसतं.

अशी आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. उगाच करंगळी वर करणार नाहीत, की दोन बोटं दाखवणार नाहीत. ‘अडचणीत देव मार्ग दाखवेल’ किंवा ‘शोधा म्हणजे सापडेल’ अशी भारदस्त वाक्य उच्चारण्यापेक्षा, मालवणी सरळ ‘चोळणो शिवतलो तो मुताक वाट ठेयतालो’ असं म्हणेल. जावयाचं वर्णन ‘जामातो दशम ग्रह:’ असं न म्हणता, सरळ ‘खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच’ असंच म्हणणार, वर ‘मायझंयाक खांद्यार बसयलो, तर कानात मुतता’ असंही म्हणून दाखवणार..शहरी सभ्यतेच्या निकषावर या अशिष्ट समजल्या जाणाऱ्या शब्दांचं मालवणी शब्दांचं एक वैशिष्ट म्हणजे, त्यांचा अर्थ ऐकणाराला थेट कळतो आणि बोलणाराला काय म्हणायचंय ते चटकन लक्षात येत..कुडाळकडच्या माझ्या एका मित्राची आई ‘विनाकारण कुठलीही गोष्ट होत नाही’ हे सांगण्यासाठी ‘बॉट घालून पॉट येयत, तर xx कित्याक व्हयो’ असं थेट सुनवायची. ‘काही केल्याशिवाय काही घडत नाही’ हे सभ्य भाषेतलं तत्वज्ञान ती अशा रांगड्या शब्दांत सांगायची की, ते कायमचं डोक्यात फिट्ट बसलं..!!

मालवणीत व्यवहारात जातीभेद नाही, मात्र बोलताना भटाला भटच म्हणणार आणि धनगराला धनगर. मराठ्याला मराठा आणि वाण्याला वाणीच म्हणणार. ह्यात कुणाचा अपमान करायची भावना नसते, तर हे उच्चार मालवणी माणसाच्या निरमळ सहजतेने आलेले असतात. बोलावणाऱ्याची प्रेम भावना ऐकणाऱ्या बरोबर कळते आणि म्हणून तर इथं ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे… आश्चर्य म्हणजे बोलण्यात जातीचा उल्लेख सहजपणे करणारा हाच मालवणी, व्यवहारात मात्र जातीभेद पाळत नाही, हे ही आम्हा मालवण्यांचं वैशिष्ट्य. ‘गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?’ किंवा ‘कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी’ किंवा ‘चव नाय रव धनगरा पोटभर जेव’ किंवा अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो’ ह्या काही म्हणी वानगीदाखल सांगता येतील

नग्नतेत पावित्र्य असतं, तसं सभ्यतेच्या कपड्यात नसतं..मुळात कपड्यांचं प्रयोजनच काहीतरी गुप्त ठेवण्याचं आहे. मालवणी माणसाला लपवाछपवी मान्य नाही, तो त्याचा पिंड नाही आणि त्याच्या या स्वभावाचं प्रतिबिंब त्याच्या भाषेत, शिव्यांत, म्हणी-वाक्प्रचारात स्वच्छ पडलेलं दिसतं. हे त्याचं नागडेपण त्याच्या मानाच्या निरमळतेतून आलेलं असतं. कणकवलीचे ‘भालचंद्र महाराज’ आता ‘भालचंद्र महाराज’ म्हणून प्रसिद्ध असले तरी ते मालवणीत ‘नागडे बाबा’ म्हणूनच प्रसिद्ध होते. महाराज असले म्हणून काय झाल, ते नागडे असल्याने आम्ही त्यांना नागडेच म्हणणार असा सारा रोख ठोक व्यवहार. हे आम्हा मालवण्यांचं आणि आमच्या मालवणी भाषेच हे वैशिष्ट्य आहे..

पण आता मात्र शहरी करणाच्या नादात आणि इंग्रजीच्या आक्रमणात मालवणीतील हे वैशिष्ट्य नाहीस होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे. ही गोड बोली टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि यासाठी ती रोजच्या व्यवहारात सर्वांनी वापरली पाहिजे..’मालवणी बोली साहित्य संमेलना’च्या निमित्ताने हेच सांगावस वाटतं..!!

-नितीन साळुंखे

9321811091

शिक्षणाचं असं करता येईल काय?

शिक्षणाचं असं करता येईल काय?

विषय अर्थातच शिक्षणाचा. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही. तरीही शिक्षण हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि म्हणूनच सद्यपरिस्थितीत काळजीचा विषय जी व्यक्ती किंवा वस्तू किंवा गोष्ट अत्यंत जिव्हाळ्याची असते, तिचीच काळजी आपल्याला जास्त असते, तसं काहीतरी माझं शिक्षणाच्या बाबतीत होतं. सध्या शिक्षणाचा जो खेळ खंडोबा चाललाय, तो कुठेतरी थांबावा असं सारखं वाटत असतं. माझ्यापरिने मी माझ्या परिघातल्या माणसांना मी समजावूनही देत असतो, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे असं जाणवत नाही.

आज आपण शालेय शिक्षणाचा ४+३+३+२ असा आकृतीबंध स्विकरालाय. इयत्ता ४ थी पर्यंत पूर्व प्राथमिक, पुढे ५ वी ते ७वी प्राथमिक, इयत्ता ८वी ते १०वी माध्यमिक आणि अकरावी-बारावी उच्च माध्यमिक अशी विभागणी ही आहे. इंग्रजांच्या लाॅर्ड मेकाॅले नांवाच्या शिक्षण तज्ञाने बनवलेला हा ढांचा, आपण किचितसा बदल करून आजही तसाच्या तसा वापरतोय. हा किंचितसा बदल म्हणजे पूर्वी ११ वी मॅट्रीक होतं, ते आपण दशमान पद्धतीला साजेसं १० वीवर आणून ठेवलं. आणखी एक ‘क्रूर’ बदल आपण केलाय, तो म्हणजे, या आकृती बंधाच्या अलिकडे ‘ज्युनिअर केजी’ आणि ‘सिनिअर केजी’ अशा आणखी दोन यत्ता आणून ठेवल्यात. मुलांचं बाल्य असं निष्ठूरपणे चिरडून आपण नेमकं काय साध्य करू पाहातोय टाकतोय असा प्रश्नही मला छळतोय.

मेकाॅलेला ब्रिटीशकाळात त्यांची भाषा शिकलेला, परंतू फारसा विचार न करणारा ‘होयबा’ नोकरवर्ग त्यांचा राज्यकारभार हाकण्यासाठी हवा होता. त्याचं उद्दिष्ट तेवढंच होतं. आपण मात्र जराही विचार न करता, राॅबर्ट मेकाॅलेची तिच पद्धती, आजही तशीच चालू ठेवली आहे आणि ध्येयही इंग्लिश शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळवण हेच. आपण आजही फाडफाड इंग्रजी बोलू शकणारे होयबा नोकर वर्गच जन्माला घालतोय याचं वैषम्य कुणालाच वाटत नाही, कारण तसं वैषम्य वाटण्यासाठी विचार करावा लागतो आणि इथल्या लोकांनी विचार करूच नये हे मेकॅलेचं ध्येय. आज शिक्षण क्षेत्रात जे काही सुरु आहे, ते पाहता हे राॅबर्ट मेकाॅलेला चांगलाच यास मिळालंय असं खात्रीने म्हणू शकतो.

मेकाॅले हा खरा द्रष्टा. इंग्रजी भाषेला भारताची सरकारी राज्यकारभाराची भाषा आणि शिक्षणाचं माध्यम बनवण्यात याच मेकाॅलेचा हात होता. राजकीय दृष्ट्या आपण स्वतंत्र झालो, परंतू मानसिकरित्या आजही आपण ‘काॅलनी’ काळातच आहोत हे आपण वारंवार सिद्ध करतोय. आजचे शिक्षणतज्ञ मेकाॅलेच्या त्याच सिस्टीममधून तज्ञ झालेत. त्यांच्या लांबलचक पदव्या असतीलही ‘आंतरराष्ट्रीय’ पातळीवरच्या, पण देशी शिक्षणाचा विचार करताना, त्या शिक्षणाबद्दलची आपुलकी मात्र अस्सल ‘देशी’ लागते, हेच ते विसरले असावेत अशी शंका घेण्यास जागा आहे. किबहूना तुमचा देशीपणा जागृत होऊच नये याची मेकॅलेने, अर्थात त्याकाळच्या सत्ताधारी ब्रिटीशांनी त्यानेळीच पुरेपूर काळजी घेतलेली होती. कोणत्याही काळातल्या सत्ताधाऱ्यांचं विचारी नागरिकांशी फारसं सख्य नसत;सबब आजही तेच शिक्षण त्याच पद्धतीने सुरु असलेलं दिसत.

मग काय करता येईल? नुसतं टिका करून चालणार नाही, तर काही उपायही सुचवायला हवेत. मी जे काही पुढे मांडणार आहे, त्याचा साधक-बाधक विचार शिक्षणाबद्दल आस्था असणारांनी करावा. हा एक विचार आहे व त्यावर चर्चा व्हावी, शिक्षणासंबंधी आस्था असणाऱ्यांनी त्यावर विचार करावा ह्या अपेक्षेने मी हा लेख लिहिला आहे.

सर्वात प्रथम ‘सिनिअर केजी’ आणि ‘ज्युनिअर केजी’ किंवा ‘छोटा शिशू’ आणि ‘मोठा शिशू’ हा वेडसर प्रकार पूर्णपणे थांबवावा. ‘शी ‘ आणि ‘शू’ हे शब्दच पुरेसे बोलके आहेत. या बेसिक गोष्टींचीही फारसी जाणीव ज्या मुलांना नसते, त्यांना आपण दोन-तीन तास एका ठिकाणी डांबून आपण नक्की काय मिळवतो, हेच मला कळत नाही. ह्या वयाच्या मुलांना मनसोक्त बागडू द्या, त्यांना आवडणाऱ्या गोष्टींत रमू द्या. त्यांना त्यांचं बालपण मनसोक्त उपभोगू द्या..मोठेपणी काय व्हायचं आहे, ह्या इच्छेची बीज ह्याच काळात त्यांच्या मनात त्यांच्या नकळत रुजत असतात. कुतूहल जागृत असण्याचं हे वय, त्याच कुतूहलाचा पुढे धुमारे फुटून एक आनंद देणारा वृक्ष पुढं बहरणार असतो, ह्याची जाणीव आपण तोडून टाकलेली आहे.

प्राथमिक शिक्षण, म्हणजे इयत्ता ४थी पर्यंतचं शिक्षण सक्तीने मातृभाषेतच असावं. पुढे ५ वी ते ७ वी माध्यमिकपर्यंत मातृभाषेप्रमाणे राष्ट्रभाषा शिकणं (हिन्दी ह्या भाषेला राष्ट्रभाषेचा कायदेशीर दर्जा नाही ह्याची मला कल्पना आहे, परंतु तास असला तरीही सर्वसाधारण संपर्कासाठी हिंदी हीच भाषा देशात बहुसंख्य ठिकाणी वापरली जाते.) ही सक्ती असावी. जोडीला इंग्रजी शिकवायलाही हरकत नाही, पण तो एक महत्वाचा विषय म्हणून. सायन्स माहीती होण्यापुरतं आणि गणित हिशोब करण्यापुरतं शिकवावं. बाकीचे विषय आतासारखेच असायला हरकत नाही. त्याच सोबत मुलांचा कल लक्षात घेऊन त्या कलानुसार मुलांना त्या त्या विषयाची तोंड ओळख करून द्यावी. आठवीपासून पुढे दहावीपर्यंत मात्र मुलाचा कल जिकडे असेल, त्या प्रमाणे शिक्षण द्याव व हा कल पुढे पदवीपर्यत कले कलेने वाढून त्यातील सफाईपर्यंत कसा येईल, असं शिक्षण द्यावं. एखाद्या मुलाला जर चित्रकलेची आवड असेल, तर त्याला चित्रकलेचं शिक्षण थेट पदवीपर्यंत मिळावं, तसंच ज्यांनी इतिहासात रुची असेल त्यांना इतिहासाचं किंवा ज्या मुलांना गणित, विज्ञानात किंवा इतर कोणत्याही विषयात रुची असेल अशा मुलांना त्या विषयाचं शिक्षण आठवीपासून पुढे पदवीपर्यंत द्यावं. सर्वच मुलांना सरसकट उगाच सायन्सची क्लिष्ट सुत्र किंवा गणितातली प्रमेयं पाठ करायला लावू नयेत. असं केलं तरच आपल्याला अनेक क्षेत्रात आवडीने काम करणारे त्या त्या क्षेत्रतातले तज्ञ, अभ्यासक मिळू शकतील.

शिकण्याचे विषय मुलांनाच निवडू द्यावेत व त्या त्या विषयाचं शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. हे खरंय, की असं केल्याने येणारा आर्थिक बोजा शाळांना परवडणारा नसेल. अशावेळी त्या त्या विषयाचं शिक्षण देणाऱ्या विशेष शाळा असाव्यात, ज्यात इयत्ता आठवीनंतर मुलं प्रवेश घेऊ शकतील, मग एकाच शाळेवर बोजा पडणार नाही. उदा. जे जे स्कुल आॅफ आर्टसारख्या काॅलेजप्रमाणेच शाळाची संख्या वाढली पाहीजे. इतिहास, भुगोल, गणित, गिर्यारोहन, पुरातत्व या व अशा इतरही विषयांचं विशेष शिक्षण देण्याची व्यवस्था इयत्ता आठवीपासूनच झाली पाहीजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा संबंध मार्कांशी न लावता गुणवत्तेशी लावावा. आणि गुणवत्तेत नंबर नसतात, तर वेगवेगळेपणा, विविधता असते. दोन शास्त्रज्ञ किंवा दोन शिल्पकार यांच्यात तुलना कशी करणार? पहिला-दुसरा कसा ठरवणार? कारण त्या दोघांची सारख्याच विषयीची अभिव्यक्ती भिन्न असणार आणि ती त्या त्या परिने उत्तमच असणार. कल लक्षात घेऊन दिलेल्या शिक्षणात ‘गुण’वंत निर्माण होतील, ‘मार्क्स’वादी नाही. मला वाटतं मंगळावर स्वारी करणाऱ्या आपल्या देशाला हे अशक्य नाही, प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आणि आस्थेचा आहे.

ह्यात सरकार बरंच काही करू शकतं. नव्हे, ही सरकारची(च) जबाबदारी असते. समाजातील सर्व थरातील सर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे शिक्षण मोफत मिळवून देणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असं समजून सरकारने काम करावं असं मला वाटतं. ज्यांना कशातच रुची नाही (असं होऊच शकच नाही) आणि नोकरीच करायचीय, त्यांच्यासाठी आहेच आताची व्यवस्था, पण ज्यांना काही वेगळं करायचंय, अशा मुलांना तसं शिक्षण मिळण हा त्यांचा हक्क व आपली जबाबदारी आहे.

मुलांना प्रश्न पडावेत याची आपल्या विद्यमान शिक्षण व्यवस्थेत कोणतीही सोय नाही, मग ते विचारणं तर दूरच..! आताच्या पद्धतीत शिक्षक वर्गात धडे शिकवतात आणि मग त्यावर विद्यार्थ्यांना प्रश विचारतात. मुलांना शिक्षकांनी प्रश्न जरूर विचारावेत. पण त्याचबरोबर मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारायांची पूर्ण मोकळीक मिळायला हवी. मग हे प्रश्न कसेही असतील, ते ते विचारायला त्यांना पूर्ण मुभा असावी. असे केल्याने मुलांची प्रतिभाशक्ती काय असते किंवा एकेका विषयावर प्रत्येक मूळ किंवा विष्यार्थी कसा विचार करू शकतो, काय विलक्षण विचारशक्ती असते हे लक्षात येईल. प्रत्येक मूळ हे वेगळं असत आणि त्या मुळातला हा वेगळेपणा जपणं हा शिक्षणव्यवस्थेचा मूलाधार असावा. तरच शिक्षणव्यवस्थेत आपल्याकडे रुजलेला ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ किंवा ‘मी सांगतो / सांगते ते ऐका’ हा प्रकार मात्र बंद होईल.

एक अनुभव सांगतो आणि थांबतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या ‘कौशल्य विकास योजने (Skill India)’साठीची पाठपुस्तकं इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याचं काम मी केलं. मराठीत झालेलं हे पहिलंच काम हे मी अभिमानाने नमूद करु इच्छीतो. जी मुलं या योजनेत सहभागी झालीत, अशा मुलांच्या एका वर्गावर दोन तास शिकवण्याची संधी मला माझे मित्र श्री. संदीप विचारे यांच्या माध्यमातून मिळाली. फर्ड्या इंग्रजीत असलेली ती पुस्तकं, स्कुल ड्रॉप आऊट ते बारावी पर्यंतच्या, ते ही ग्रामीण भागातील मुलांना समजेल अशा मराठीत मी भाषांतरीत, खरं तर भावांतरीत केलेली असल्यामुळे, मी ती अधिक चांगल्या रितीने मुलांना समजावून सांगू शकेन असा संदीपचा आग्रह पडला व मी भिडेस्तव तो मान्य केला.

त्या वर्गावर दोन तास त्या मुलांशी गप्पा मारल्यानंतर मी आपल्या शिक्षण व्यवस्थेविषयी खुप नर्व्हस झालो व देशाच्या भावी नागरिकांना आपण कशाप्रकारे घडवतोय हे लक्षात येऊन मी काहीसा निराशाही झालो. मी काहीवेळ शिकवून नंतर त्यांच्याशी फक्त गप्पा मारल्या आणि त्या गप्पांतून जे विदारक सत्य बाहेर आलं ते चिंताक्रांत करणारं होतं. थोडी मोकळी झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, त्या मुलांपैकी काही उत्तम चित्र काढणारी होती, काही गाणारी होती. काहींना विज्ञानात रस होता तर काहींना लेखक व्हायचं होतं. हे त्यांनीच मला सांगीतलं. मग ती इथं का आली, याचं उत्तर तर मला स्वत:चीच लाज वाटावी असं होतं. बहुतेकांच्या राहात्या ठिकाणी त्यांना हव्या असलेल्या विषयांच्या शिक्षणाची सोय नव्हती, तर काहींची आर्थिक परिस्थिती नव्हती. अशी स्वप्नांची राख झालेली ती मुलं नाईलाजाने झाडू कशी मारावी किंवा हाॅटेलच्या बेड वरील बेडशीट कशी बदलावी याचं ‘कौशल्य’ शिकण्यासाठी आली होती. मी बोलतोय म्हटल्यावर माझ्याकडून त्यांची आवड जोपासण्यासाठी मदतीची अपेक्षाही करत होती.

भारताच्या भावी नागरीकांचं हे प्रातिनिधीक चित्र भयाण होतं आणि आपण गप्पा मारतोय महासत्ता होण्याच्या. मला माझीच लाज वाटली. आणि दृष्टीआड सृष्टी म्हणून पुन्हा काही तिथं गेलो नाही. काय करणार होतो मी तरी त्यांच्या आशेची फुंकर मारून.? हा ग्रामिण भाग काही फार लांबचा नाही, तर महामुंबईच्या परिघावर वसलेल्या भिवंडी नजिकचा होता मग दुर्गम भागातील किती प्रज्ञावंत असेच करपून जात असतील याचा विचारच न केलेला बरा.

माझं वरील लेखन काहीना आवडेल तर काहीना आवडणारही नाही. काही त्यात त्रुटीही काढतील. मी काही शिक्षण तऱ्ज्ञ नव्हे आणि मला तसं व्हायचंही नाही परंतू शिक्षणाचं जे काही मातेरं सध्या चाललंय ते थांबाव असं मनापासूनची इच्छा मात्र आहे आणि त्याच तळमळीतून हे लिहीलं आहे.

-नितीन साळुंखे

9321811091

१७.०६.२०१९

प्रसिद्धी-

आजचा ‘दै. तरुण भारत’- (बेळगाव), सिंधुदुर्ग आवृत्ती.

मालवणी बोली साहित्य संमेलन..

मालवणी_बोली_साहित्य_संमेलन

मित्रानो आणि मैत्रिणींनो नमस्कार..

भाषा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. आपली प्राथमिक ओळख मुख्यतः: आपल्या भाषेमुळे होते. महाराष्ट्रात राहणारे आपण आपल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ओळखले जातो, त्यापैकी एक वैशिष्ट्य आहे आपली मराठी भाषा. मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे. ती आपली प्रमाण भाषाही आहे. ती आपली मातृभाषाही आहे.

आपल्या १३५ कोटी लोकसंख्येच्या आणि अनेक भाषांच्या देशांत, मराठी ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांत मराठीचा क्रमांक लागतो १८ वा. मराठी भाषा ही जगात १८ क्रमांकावर आहे. तर भारतातील आता तिसऱ्या क्रमांची भाषा आहे. ती आपल्या ‘मराठी’ आपल्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा ‘मराठी’ आहे. आपल्यापैकी बहुतेकांची ती मातृभाषाही आहे.

मराठीला हा मान काही आज मिळालेला नाही. अनेक स्थित्यंतरातून जात, अनेक आव्हान पेलून तिला आज हा मान मिळालेला आहे. मराठी हि देशातली आणि जगातली एक महत्वाची भाषा बनण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे मराठीच्या विविध बोली. मराठीला समृद्ध केलय, ते तिच्या विविध भागात, विविध जातीत बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक बोलींनी. बोली म्हणजे महाराष्ट्राच्या विविध प्रांतात, गावा-गांवांत रोजच्या बोलण्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा. जसे की वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, झाडीबोली, डांगी, कोकणी इत्यादी. अशा विविध प्रादेशिक बोली म्हणजे मायमराठीच्या लेकीसुनाच आहेत. या प्रादेशिक बोलींप्रमाणेच चित्पावनी, देशस्थ, कुणबी अशा विविध जातिनिविष्ट बोलींचाही वेगळेपणा मराठीच्या विविधतेशी संबंधित आहे. प्रमाण मराठीला शब्दांचा अविरत पुरवठा करून तिला समृद्ध करत असतात, त्या तिच्या या बोलीभाषा. अशाच बोलीभाषेतली बोली एक बोलीभाषा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी आपली ‘मालवणी’..!

सिंधुदुर्गात मालवणी आजही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. व्यक्ती कितीही मोठी असो, कोणत्याही उच्च पदावर असो, ती सिंधुदुर्गातील दुसऱ्या व्यक्तीशी बोलतां मालवणीचाच आधार घेते. दोन मालवणी माणसं आपसात बोलताना मालवणीचा वापर करताना तर आता मुंबईतही दिसतात. कोणतीही लाज बाळगली जात नाही आणि हे चांगलं लक्षण आहे. आपल्या आईची बोली बोलायला लाज कसली? त्यासाठी सर्व मालवण्यांना १०० टक्के मार्क्स..!

कोणतीही भाषा अभिमानाने तेंव्हाच बोलली जाते, जेंव्हा तिला प्रतिष्ठा लाभते. आपल्या भाषेला, आपल्या बोलीला प्रतिष्ठा देण्याचे काम कुणी बाहेरून येऊन करणार नाही, तर ते आपलं आपल्यालाच करावं लागत. मालवणीला जगात प्रतिष्ठा मिळवून देणारे असेच तिचे दोन पुत्र मालवणात जन्मले. श्री. गंगाराम गवाणकर आणि मच्छिन्द्र कांबळी. श्री. गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतून जन्मलेलं आणि तेवढ्याच ताकदीने मच्छिन्द्र कांबळी यांनी सादर केलेल्या ‘वस्त्रहरण’ ह्या मालवणी नाटकाणे मलावणीला जागतिक परिमाण मिळवून दिल. मालवणी ही मराठीची महत्वाची बोली समजली जाऊ लागली, ती तेंव्हापासून. त्यांचा हा वारसा पुढे त्याच जिद्दीने चालवणारे अनेक नाटककार, साहित्यिक नंतरच्या काळात निर्माण झाले आणि आजही हे काम अत्यंत धडाडीने सुरु आहे. एक मालवणी म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की माझे मालवणी झील आणि चेडवा ते काम अत्यंत उत्तम प्रकारे करत आहेत.

त्यादिशेने आणखी एक पुढचं पाऊल म्हणून ‘मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग’ आणि ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या दोन नोंदणीकृत संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून, मुंबईत पुढच्या रविवारी, म्हणजे दिनांक २३ जून २०१९ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या वेळेत, ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भोगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘मालवणी बोली साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आलं आहे. मालवणी भाषेचं हे सहावं संमेलन.

मालवणी बोलीतील विविध कलाप्रकार, साहित्य यावर या संमेलनात चर्चा होणार आहे. माल्वणींच्या वाढीसाठी काय करता येईल, या संबंधीची या संमेलनात चर्चा होणार आहे. मालवणी भाषेत साहित्य निर्मिती करणारे साहित्यिक, कवी त्याचप्रमाणे मालवणी मुलखातील कला, चित्र, शिल्प, नाट्य इत्यादी क्षेत्रातले दिग्गज या संमेलनात सहभागी होणार आहेत. या सर्वाना पाहण्याची, त्यांना ऐकण्याची, त्यांच्याशी बोलण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. संमेलनाची संपूर्ण माहिती सोबतच्या चित्रांमध्ये दिलेली आहे.

मला आपल्या देशातील सगळ्याच भाषा आवडतात. सगळ्या सारख्याच गोड आहेत. प्रत्येक भाषेला आपलं आपलं एक वैशीष्ट्य आहे. माझं त्या सगळ्याच भाषा/बोलींवर प्रेम आहे. परंतु मालवणी माझी मायबोली. तिच्यावर माझं काकणभर जास्तच प्रेम आहे. मावश्या आवडतात सगळ्यांनाच, तरीही रात्री आपल्याला कुशीत घ्यायला आईच लागतेनं, तसच काहीस आहे हे. हे सांगण्याचं कारण की आपल्या मायबोलीच्या या गौरव सोहळ्यासाठी, केवळ मालवणीत नव्हे, तर या भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वच भाषिक लोकांनी या सोहळ्यासाठी आवर्जून यावं.

येवा सगळ्यांनी, आमी तुमची वाट बघतव..

येशात मां ?

– नितीन साळुंखे

९३२१८११०९१

१५.०६.२०१९

#मालवणी_बोली_साहित्य_संमेलन

दिनांक २३ जून २०१९ रोजी

सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत.

संमेलनाच ठिकाण –

नायर सभागृह , स्वामीनारायण मंदिरामागे,

दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४.

सदर संमेलन सर्वांसाठी निःशुल्क असून प्रवेश, भोजन व चहा-पाणी ही पूर्ण व्यवस्था निःशुल्क ठेवण्यात आली आहे.

संपर्क –

१. प्रकाश सरवणकर – 98692 80660

2. हेमंत पवार – 90290 97975

#विनम्र_आवाहन

‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठानने तरीही एवढं मोठं कार्य पार पाडण्याच आव्हान स्वीकारला आहे. तरीही त्यासाठी पुढे मदतीच्या हातांची आवश्यकता आहे. .

कोणत्याही भाषेला जगवायचे, समृद्ध करायचं काय, ती भाषा बोलणाऱ्या किंवा त्या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या तिच्या पुत्र-पुत्रीच असत. मलावणीचीही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे.

मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी सिंधुदुर्ग प्रतिष्ठान करत असलेल्या या कार्यात आपणही आपला खारीचा वाटा उचलावा, असं प्रतिष्ठानने आवाहन करत आहे.

या उपक्रमासाठी स्वेच्छा देणगी देऊ इच्छित व्यक्तींनी ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’च्या पुढील नोंदणीकृत बँक खात्यावर आपली देणगी पाठवावी ही विनंती..देणगीदारांना रीतसर पोचपावती देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

धन्यवाद’

– सिंधुदुर्ग प्रतिष्ठान

कार्यकारी मंडळ

BANK A/C NAME: SINDHUDURG PRATISHTHAN

BANK A/C NO. 131100100101535

IFSC Code: SRCB0000131

THE SARASWAT CO-OPERATIVE BANK LTD

Branch: BORIVLI (EAST)

देवगडातलं माझं संचित..

देवगडातलं माझं संचित.. 
बऱ्याच वर्षांनी देवगडात गेलो होतो. वर्षातून दोनदा गांवी जाणं होतं. दोन्ही वेळेस मे महिन्यातच. एकदा कुटुंबाला गांवी सोडायला आणि दुसऱ्यांदा त्यांना मुंबंईला परत न्यायला. माझा गांवचा मुक्काम दोन रात्रींपेक्षा जास्त नसतो. या दोन दिवसांत किमान एक फेरी कणकवलीत असतेच. कणकवलीतल्या जुन्या मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने माझं कणकवलीत जाणं होतं. माझ्या गांवाहून कणकवलीत जाणंही तसं सोयीचं.

परंतु देवगडचं तसं नाही. देवगड हायवेपासून बरंच आतमधे. रस्ताही वळणवळणाचा. घाटाचा. गाडी चालवायलाही कंटाळा येतो. म्हणून देवगडात जवळचे मित्र असुनही तिकडे हल्ली बऱ्याच वर्षांत जाणं झालं नव्हतं.

पण ह्या वेळेस ठरवून गेलो. सोबत माझ्या मुलांना घेतलंमला भेटायचं होतं माझ्या चार मित्रांना. प्रमोद जोशी, मकरंद फाटक आणि चारू  सोमण. चौथे होते प्रमोद नलावडे. यातल्या प्रमोद जोशी, चारू सोमण आणि प्रमोद नलावडे, या तिघांना मी पूर्वी भेटलोय. आता मला ह्या चार व्यक्तिमत्वाना माझ्या मुलांना भेटवायचं होत. बापाचे दोस्त काय तोडीचे आहेत, ते त्यांना थोडं दाखवायचं होत

चारू तर अगदी जवळच म्हणावा असा मित्र, चारुला कधीही हाक द्यावी, चारू हजर नाही असं कधी घडलेलाच नाही. आताही चारुकडे अगदी आयत्यावेळेस गेलो. चारू आणि त्याच्या पत्नीने भरपेट आंबे खायला घातले. त्यांच्या मुलीही होत्या घरी. पण हा माणूस त्यांच्या हातात कसली तरी हत्यारं देऊन त्यांना कसले तरी स्क्रू पिरगाळायला किंवा ढिले करायला सांगत होता. चारू आहेच अवलिया, कधी काय करेल ते सांगता यायचं नाही, पण जे करेल ते भन्नाटच असेल, याची मात्र खात्री. चारू आणि त्याच ‘गॅलॅक्सी’ हॉटेल माझ्या लेखनातून पूर्वीही बऱ्याचदा तुम्हाला भेटला आहे. 
देवगडच्या प्रमोद जोशींबद्दल मी काही सांगायला हवं असं नाही. प्रमोद जोशींची ओळख करून देणं म्हणजे सूर्याची ओळख करून देण्यासारखं आहे. कोणत्याही विषयावर काव्यातून व्यक्त होऊ शकणारे प्रमोदजी म्हणजे एक अजब रसायन आहे. कावीळ काव्य वैगेरे करण्यासाठी स्फूर्ती वैगेरे यावी लागते असं मी लहान पणापासून वाचत आलो होतो.. पण जेंव्हा पासून प्रमोद जोशींची ओळख झाली, तेंव्हा पासून लहानपणी वाचलेल्या ते फारसं खार नसावं असं खात्रीने वाटायला लागलं. प्रमोदजी दिवसाच्या आणि रात्रीच्याहि कोणत्याही वेळेला कविता करू शकतात, ती ही अगदी अर्थवाही. उगाच आपला शब्दाला शब्द आणि यमकाला यमक नाही. प्रमोदजींच्या कोणत्याही कवितेत चोख अर्थ सापडणारच. प्रमोदजींना भेटलो, मुलांना त्यांचा आशीर्वाद घायला सांगितला. प्रमोदजींनी आशीर्वादही सुगंधी दिला. महाल प्रमोदजींनी चक्क ‘कस्तुरी’ भेट दिली. आजवर कस्तुरी, कस्तुरी मृगाच्या बेंबीत मिळते असं लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलं होत. आम्हाला ती देवगडात प्रमोद जोशींच्या मठीतही मिळते हे आता समजलं. 
त्यादिवशी देवगडचा बाजार असल्याने, प्रमोद नालावडेंच्या दुकानात काही जात आलं नाही. ती रुखरुख मनात राहिलंच. 
मकरंद फाटकांना मात्र मी पहिल्यांदाच भेटणार होतो. खार तर मला जास्त कुतूहल होतं ते मकरंदाजीचंच..!
गेल्या वर्षी याच मोसमात मला एक मेसेज आला. ‘आंब्याची पेटी पाठवतोय, पत्ता पाठवा’ असं सांगणारा. मला पुस्तकांच्या भेटी बऱ्याच येतात, पण चक्क आंबे, ते ही हापूस..! मला पहिल्यांदा आश्चर्यच वाटलं. मग साहजिकच मेसेज वाचून मला पहिल्यांदा वाटलं की, पाठवणाराने कदाचित चुकून मला मेसेज पाठवला असावा. असं अनेकदा घडतं, मेसेज पाठवायचा असतो एकाला आणि जातो दुसऱ्याकडेच. म्हटलं तसंच असावं, कारण मला कुणीतरी आंब्याची पेटी पाठवेल, असं कुणीही नाही. मला कुणीतरी काही भेट पाठवावी एवढा मी मोठा नाही की, कुठल्याही प्रभावशाली पदावर नाही. मला काही तरी देऊन माझ्या ओळखीने काही तरी काम करुन घेता यावं, इतक्या माझ्या मोठ्या ओळखीही नाहीत. मग असं असताना, अत्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्या मला कुणीतरी काहीतरी भारीसं पाठवेल, यावर मी विश्वास का ठेवावा..?

तो मेसेज माझ्यासाठीच पाठवलाय का याची खात्री करण्यासाठी, मेसेज आलेल्या नंबरवर मी फोन केला. म्हटलं मला चुकून मेसेज आलेला असायचा आणि ज्यांना तो मेसेज जाणं पाठवणाराला अपेक्षित असावं, त्यांना तो गेलेलाच नसायचा. असं होऊ नये म्हणून मी फोन केला. तो फोन होता मकरंद फाटकांचा आणि मेसेजही माझ्यासाठीच होता. आता दुसऱ्यांदा आश्चर्यचकीत होण्याची माझी पाळी होती..  

मकरंद फाटक. माझे फेसबुकरचे मित्र. फेसबुकवर आम्ही मित्र कधी झालो, फ्रेन्ड रिक्वेस्ट त्यांनी मला पाठवली, की मी त्यांना पाठवली हा तांत्रिक तपशील मला आठवत नाही. ते माझे आणि मी त्यांचा मित्र झालो, हे मात्र खरं..!

मी असं काय केलं होतं, की मकरंदजीना मला पाबे पाठवावेसे वाटले? मी कधीही त्यांना भेटलेलो नव्हतो, त्यांच्यासाठी काहीही काम केलेलं नव्हतं, त्यांच्या कधीही उपयोगीही  पडलेलो मला आठवत नव्हतं. आपल्याकडे प्रेमापोटी कुणाला काही करण्यापेक्षा, आपल्या फायद्याच्या ठरणाऱ्या किंवा ठरू शकणाऱ्या माणसांना काही ना काही भेटी देऊन उपकृत करण्याची प्रथा आहे. माणसाची ‘कमोडिटी’ झाली कि असं व्हायचंच. 

शंकानिरसनासाठी मी पुन्हा मकरंदजीना पुन्हा फोन केला आणि माझ्या मनातली शंका त्यांना विचारली. मकरंदीजीनी दिलेलं उत्तर मला अचंबित आणि माझ्यावरचे जबाबदारी अधिक वाढवणार होत. ते उत्तर काय होत हे सांगण्याआधी मी त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 
मी गेली चार-पांच वर्ष काही ना काही लिहित असतो. लिखाण करताना मी विषयाचं असं कोणतंच बंधन मी पाळलेलं नाही. मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या कोणत्याही विषयावर मी लिखाणातून व्यक्त होत असतो. मर्यादा सांभाळतो ती फक्त भाषेची आणि शब्दांची. न आवडलेल्या विषयावर व्यक्त होतानाही, माझी भाषा आणि शब्द समोरच्याला रक्तबंबाळ करणार नाहीत, याचं भान मी नेहेमी बाळगत आलो आहे. टीका करतानाही समोरच्या व्यक्तीची, त्याच्या पदाची, प्रतिष्ठेची हानी होणार नाही याचीही काळजी मी घेत असतो. माझ्या लिखाणातून मी व्यक्त करत असलेले विचार हे माझे असतात, ते कुणाला पटावे किंवा पटू नयेत यासाठी मी लिहीत नाही. हे माझं लिखाण माझ्या मनाशी मी केलेलं उघड, परंतु प्रामाणिक स्वगत असतं. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या या लिखाणावर भरपूर कमेंट्स किंवा लाईक्स येत असतात. माझ्या लेखांतून मी व्यक्त केलेल्या विचारांशी, ते वाचणारे सर्वच सहमत असतात असं नव्हे. माझी ती अपेक्षाही नसते. माझी अपेक्ष वाचणारानी त्यांचे विचार मांडावेत, व्यक्त व्हावं आणि चर्चेची घुसलं व्हावी एवढीच असते आणि मला सांगायला आनंद वाटतो, की ती बऱ्यापैकी पूर्ण होत असते. माझ्या मूळ लेखापेक्षा त्यावरच्या कमेंट्स, त्यातील संवाद आणि क्वचितप्रसंगी होणारे वाद-विवाद जास्त वाचनीय असतात, असं मला अनेकांनी खाजगीत सांगितलं आहे. माझ्या लेखांवर सातत्याने  कमेंट्समधून व्यक्त होणारी किंवा लाईक्स देणारी काही माणसं माझ्या चागलीच लक्षात राहातात. त्यातलेच एक श्री. मकरंद फाटक..
श्री. मकरंद फाटकांना माझं लेखन आवडतं, त्यातले विचार त्यांना पटतातच असं नव्हे, परंतु त्यांना त्यातून आनंद मिळतो असं मला त्यांनी फोनवरून सांगितलं. त्याच आनंदामुळे मला ते आंब्याची भेट पाठवत असल्याचं मला त्यांनी फोनवरून सांगितलं. कुठल्याही लिहिणाऱ्याला त्याच लेखन कुणाला तरी आवडत, यापेक्षा जास्तीचा आनंद असूच शकत नाही. मला तो आनंद मकरंद फाटकांनी मिळवून दिला. त्यांनी पाठवलेली आंब्याची भेट यथावकाश माझ्या घरी पोहोचली. हे म्हणजे माझ्या आनंदावर सोन्याचा वर्ख दिल्यासारखं झालं..
मकरंदजींच्या ह्या भेटीने माझ्या घरातल्यांच्या नजरेत माझी प्रतिमा वाढली, हा त्याचा दुसरा भाग. आपला मुलगा, नवरा किंवा आपला बाप मोबाईलवर सारखं काहीतरी बडवत असतो आणि त्या बडवण्यामुळे त्याला कुणीतरी मित्र अमूल्य अशी भेट पाठवतो ह्याचा आनंद माझ्या अनुक्रमे आई-वडिलांना, बायकोला आणि मुलांना झाला. हा आनंद मी बाजारातून आंबे आणून त्यांना खायला घातले असते, त्यापॆक्षा कैक पटीने मोठा आहे. नव्हे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही.  
हे झालं गेल्यावर्षीच. यंदाही तेच झालं. मकरंदाजीचं मेसेज आला, आंबे पाठवलेत, कृपया ताब्यात घ्या, सांगणारा. मकरंदजींच्या बागेतला, त्यांच्या घामाच्या फवारणीने पोसलेला आणि वर ‘उगाच एवढंसं म्हणून’ घातलेल्या प्रेमाच्या मात्रेच्या आंब्याची चव काही न्यारीच लागली मला. ‘उगाच एवढंसं म्हणून  म्हणजे नेमकं किती, हे फक्त प्रेमाने खाऊ घालणाऱ्या अन्नपूर्णांना माहित असत. माझं लिहिणं कृतार्थ झालं. भविष्यात आणखी जबाबदारही होईल. 
देवगडात मकरंदजींच्या घरी गेलो. मकरंदजीना उराउरी भेटलो. सौ. मनीषा वहिनींचा आपुलकीचा पाहुणचार घेतला. थंडगार पन्ह प्यायलो. पुन्हा मागूनही घेतले. त्यांनी ते तर दिलाच, वर घरी नेण्यासाठी बाटलीत भरूनही दिल. वर चवींचा समतोल साधावा म्हणून आंब्याचं लोणचंही दिल बाटलीत भरून, त्या लोणच्यासोबतच माझं साध्याच जेवण जातंय. किंबहुना ते लॉन्च आहे म्हणून मला सारखं जेवावंसं वाटत. मकरंदजींच्या सर्व कुटुंबाला भेटलो, त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि भरून पावून घरी आलो. 
-नितीन साळुंखे 
14.06.2019
(31.05.2019)
 

चित्रकार प्रकाश कबरे-

चित्रकार प्रकाश कबरे-

आज प्रकाश कबरेंच्या चित्र प्रदर्शनात गेलो होतो. मला चित्रातलं फार काही कळत नाही, पण चित्र मनाला आनंद देतात हे कळतं. आणि आनंद देणाऱ्या कोणत्याही गोष्टींचं मी विश्लेषण करत बसत नाही. तर, तो आनंद घेण्यासाठी नेहेमीच चित्रकला प्रदर्शनं पाहायला जात असतो. प्रकाश कबरे तर काय कलावंतांची खाण असणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गातले. त्यांचं प्रदर्शन मी चुकवणं शक्यच नव्हतं. म्हणून जहाॅगिरला त्यांच्या चित्राकृती पाहाण्यासाठी मी गेलो होतो. दुसरं म्हणजे, मला प्रकाशजींना भेटायचंही होतं.

प्रकाशजींनी कृष्ण हा विषय घेऊन चित्र काढलीत. त्यांना कृष्ण जसा जाणवला, तसा त्यांनी तो चितारला. सर्वच चित्र सुरेख होती. तरही त्यातलं गोवर्धन उचलणाऱ्या कृष्णाचं चित्र मला विशेष वाटलं. ते चित्र काढण्यामागे प्रकाशजींची त्यांची म्हणून एक दृष्टी, कल्पना निश्चितच आहे, परंतु मला मात्र चित्रातला तो गोवर्धनधारी कृष्ण आपल्या देशातल्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा वाटला.

रागावलेल्या इंद्राने (हा इसम कायम रागावलेला किंवा आपलं पद जाईल म्हणून घाबरलेला असतो. अशी व्यक्ती(?)देवांनी आपला राजा म्हणून का निवडावी, याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत आलंय. याच्या आणखीही काही एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टीव्हिटीज आहेत, पण आता तो विषय नाही. तुर्तास तो रागावलेला आहे.) मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केल्यावर, त्यापासून संरक्षण व्हावे म्हणून कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन तोलून धरला व सर्व गोप-गोपींचे संरक्षण केले. कृष्णाने गोपांना आपापल्या काठ्याही त्या पर्वताला आधार म्हणून टेकवला सांगितल्या, ही कथा सर्वांना माहित आहे.

या कथेतल्या कृष्णाकडे मी आद्य लोकशाहीवादी म्हणून पाहातो. मी निमित्तमात्र, तुमचा सहभाग महत्वाचा, असं गोप गोपींना सुचवून त्यांना आपापल्या काठ्या, त्यांने उचललेल्या गोवर्धन पर्वताला आधार म्हणून लावायला सांगणारा कृष्ण मला लोकशाहीतल्या आदर्श नेत्यासारखाच(ही जमात फार पुर्वीच लोप पावलीय) वाटत आलाय. म्हणून कदाचित कृष्णाच्या अनेक नांवापैकी एक नांव ‘लोकाध्यक्ष’ असंही आहे. तिन्ही लोकांचा स्वामी या अर्थांने ते आलंय.

प्रकाशजींच्या चित्रातल्या विराट कृष्णानेही गोवर्धन स्वत:च्या करंगळीवर तोलून धरलेला आहे, मात्र त्या खालची ‘जनता’ खुजी होऊन निमूट खाली हात बांधून उभी असलेली दिसते. आपल्या सध्याच्या लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या मथुरेत सध्या अशीच परिस्थिती असलेली दिसते. एकटा ‘उप-इन्द्र’, तो ‘गो’वर्धन पर्वत तोलून ‘लोकाध्याक्षा’च्या विराट स्वरुपात उभा असलेला मला त्या चित्रात दिसला आणि आपल्या देशातली आजची स्थिती आठवली.

कलावंत ज्या समाजात राहातो, वारतो, त्या समाजाचा तो आरसा असतो असं म्हणतात. समाजात जे जे चालतं, त्याचं प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत त्याच्याही नकळत उतरत जातं, असंही म्हणतात. याला कोणीही जातिवंत कलावंत अपवाद नाही. प्रकाशजींच्या गोवर्धनधारी श्रीकृष्णाच्या चित्रातही समाजातलं वास्तव- त्यांची तसं चित्र काढण्यामागची दृष्टी वेगळी असली तरीही- त्यांच्याही नकळत उतरलेलं मला दिसलं. किंवा कदाचित माझ्या मेदूने त्या चित्राकडे त्या दृष्टीने पाहाण्याची प्रेरणा मला दिली असावी.

प्रकाशजींशी गप्पा मारताना मला एक वेगळीच गोष्ट समजली. जे.जे. कला महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘जी. एस. मेडीकल काॅलेज’मध्ये ‘आर्टीस्ट’ म्हणून नोकरी केली होती. जी. एस. मेडीकल काॅलेजला सामान्य लोक ‘केईएम’ किंवा ‘केम’ हाॅस्पिटल म्हणून ओळखतात.

मला हे काहीसं आश्चर्यकारकच वाटलं. “म्हणजे तुम्ही नक्की काय काम करायचेत?”, मी विचारलं.

प्रकाशजी म्हणाले, “मी काही एकटाच आर्टीस्ट नव्हतो, तर आम्ही एकूण सोळा लोक आर्टीस्ट म्हणून काम करायचो. फाडलेल्या प्रेतांच्या अवयवांची चित्र काढायचो. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासाठी शरीराच्या आतले अवयव कसे असतात आणि प्रकृतीत आणि विकृतीत कसे दिसतात हे समजण्यासाठी अशा चित्रांची आवश्यकता लागायची. तेंव्हा काॅम्प्युटर्स नव्हते, म्हणून हाती चित्र काढावी लागत असत. पोस्टमाॅर्टेम करताना, मेडीकोलिगल प्रकरणं असल्याने मात्र कॅमेरा वापरून फोटो काढायचो.”

प्रकाशजींनी दिलेलं उत्तर ऐकून मला थेट लिओनार्दो दा विंचीच आठवला ना राव. शरीराची आतली रचना कशी असते हे समजून घेण्यासाठी विंची प्रेतं फाडून त्यांचं निरिक्षण करत असे. त्यासाठी लागणारी प्रेत मिळवण्यासाठी त्या कर्मठ काळात त्यांने काय काय दिव्य केली होती, त्याची चित्तथरारक वर्णनं मी वाचली होती. चित्रकार असलेल्या प्रकाशजींचं, चित्रकार व इतरही बरंच काही असलेल्या विंचीशी असलेल्या साम्याचं मला आश्चर्यच वाटलं. प्रकाशजींच्या चितारलेल्या कृष्णाकृतींमधे दिसणारी प्रमाणबद्धता त्यांच्या तपस्येचं फळ आहेच, परंतु त्यामागे त्यांचे जीएस मेडीकलमधले दिवसंही कारणीभूत असावेत असं मला वाटून गेलं..प्रकाश कबरे आणि लिओनार्दो विंची यांची मूळं वेगळी असली तरी कुळ मात्र एकच आहे असं मला जाणवलं..!!

प्रकाशजींशी मारलेल्या गप्पांमधून जीएस मेडीकलमधली आणखी एक गंम्मत कळली. पोस्टमाॅर्टेम रुममध्ये किंवा शवागारात वावरताना, सुरुवातीला तिथल्या फाॅरमिलनच्या उग्र वासाने डोळे चुरचुरायचे. मग काही वेळाने बाहेर येऊन बसावं लागत असे. त्यावेळी सहाजिकच डोळ्यांतून पाणी वाहात असे. शवागाराच्या बाहेर डोळ्यात पाणी घेऊन बसलेला तो तरुण प्रकाश पाहून अनेकजण “कोण?” असं पाठीवरुन सांत्वनाचा हात फिरवून विचारायचे. सुरुवातीला तो खरं काय ते सांगायचा. पण पुढे पुढे तसं सांगण्याचा कंटाळा येऊन तो सरळ नातेवाईक म्हणून सांगायला लागला.

तसं बघायला गेलं, तर आज जाती-धर्मात वाटले गेलेलो आपण एकमेकांचे कुणीही नसलो तरी, मागच्या हजारो पिढ्यांचा हिशोब मांडायला गेलो, तर आपण एकमेकांचे नातेवाईक लागतोच. विश्वची माझे घर म्हटल्यावर तर हे नातं अधिक घट्ट होतं. त्या दृष्टीने प्रकाशजींचं म्हणणं बरोबरच होतं..!

-©️नितीन साळुंखे

9321811091

03.06.2019