गिरणगांवचं मुख्य ठाणं असणारं लालबाग आणि त्याचं ‘लालबाग’ हे नांव आणि सर्वच सण-समारंभात, विशेषत: गणेशोत्सवात ओसंडून वाहाणारा लालबागकरांचा (पक्षी:गिरणगांवकरांचा) उत्साह हा माझ्या कुतुहलाचा विषय.
उद्याच्या गणेशोत्सवानिनित्त, माझ्या मनात लालबागविषयी असलेल्या माझ्या लहानपणापासूनच्या ह्या दोन कुतूहलांचा शोध घेणारा माझा हा लेख दोन भागात..
#भाग_पहिला-
लालबाग; कुतूहल ह्या नांवाचं..
लालबाग. मुंबईतल्या ह्या भागाचं मला लहानपणापासूनच कुतूहल आहे. मुख्य मुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेला हा भाग हृदयासारखाच धडधडणारा असलेला मी पाहिलेला आहे. त्यात हृदयाचा संबंध रक्ताभिसरणाशी. एकेकाळच्या, म्हणजे गिरणी संपाच्या पूर्वीच्या लालबागचा, मुंबईच्या हृदयस्थानी असलेल्या लालबागच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणाशी असलेला, हृदयाच्या रक्ताभिसरणाशी दाखवणारा थेट संबंध, माझं हे कुतूहल आणखी गडद करायचा. लाल रंग हे दृष्टीस पडणारं रक्ताचं मुख्य वैशिष्ट्य, मग ते रक्त कुणाही जाती-धर्माच्या व्यक्तीच असो. हा लाल रंग आपल्या नांवाच्या सुरुवातीच्या अक्षरात धारण करणाऱ्या ह्या विभागाच्या ‘लाल’बाग ह्या नांवांपासूनच माझं कुतूहल सुरु होतं
पुढे थोडासा जाणता झाल्यावर मुंबईच्या एकूणच इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि त्यातून वाचन सुरु झालं. ह्या वाचनात मला भायखळा सांपडलं, परेल सापडलं, माझगांव सापडलं. ह्या त्याकाळच्या मुख्य शहरांचा इतिहास सापडला. परंतु लालबाग काही सापडलं नाही. बर, लालबागला जवळ असलेलं रेल्वेचं स्टेशन म्हणजे चिंचपोकळी. स्टेशन चिंचपोकळी आणि प्रत्यक्षात त्या गावांचं नांव मात्र लालबाग, हे समीकरण मला लहानपणापासूनच पटत नव्हतं. पुढे ह्या नावांचा शोध घेताना, चिंचपोकळी आणि लालबाग ही दोनही नांव, त्या परिसरात कोणे एके काळी असलेल्या दोन बंगल्यांच्या नांवावरून पडलेली आहेत, असं लक्षात आलं.
ब्रिटिश नेव्ही मधले एक अधिकारी बुखानन यांचा ‘चिंट्झ पुगली’ नांवाचा एक बंगला स्टेशन परिसरातच कुठेतरी होता, त्यावरून ‘चिंचपोकळी’ हे येथील स्टेशनाचं नांव आलंय, असं डॉक्टर अरुण टिकेकरांनी त्यांच्या ‘स्थल-काल’ ह्या पुस्तकात लिहून ठेवलेलं मला आढळलं. ह्यातील ‘चिंट्झ’ ह्या शब्दाचा अर्थ ‘रंगीत छापाचं कापड’ असा होतो. त्याकाळी प्रचलित असलेलं ‘चिटा’चं कापड अनेकांना आठवत असेल, ते चिट हे कापडाचं नांव ह्या चिंट्झचा अपभ्रंश आहे. ‘पुगली’ ह्या शब्दाचा अर्थ मात्र मला लागत नाहीय.
चिंचपोकळी हे नांव जर तिथे असलेल्या बंगल्यावरून पडलं असेल, तर तो बांगला निश्चितच ह्या परिसरात कापड गिरण्या सुरु झाल्यानंतरच्या काळात तिथे बांधलेला असलेला पाहिजे, असं तर्काने म्हणता येत. ते खरंही असावं. कारण मुंबईतली पहिली कापड गिरणी १८५४ ला सुरु झाली आणि नंतर हां हां म्हणता, ह्या परिसरात मोठ्या संख्येने कापड गिरण्या सुरु झाल्या होत्या. चिंचपोकळी स्टेशन बांधण्यात आलं ते, ह्या परिसरात कापड गिरण्या सुरु होऊन स्थिरावल्यानंतर १८७७ सालात. त्यामुळे डॉक्टर टिकेकरांच्या म्हणण्यात मला तथ्यांश वाटतो. बाकी इथे विपुल संख्येने असलेल्या चिंचेच्या आणि पोफळीच्या झाडांवरून चिंचपोकळी हे नांव पडलंय, असं बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतं, परंतु ते काही मला पटत नाही.
तसंच, ‘लालबाग’ ह्या नावाचं आहे. ह्याच नावाचा एक महल सदृश बांगला ह्या परिसरात असलेला मी काही ठिकाणी वाचलेलं होत. नुकतंच मी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांचं श्री. बाबा भांड ह्यांनी लिहिलेलं जीवन चरित्र वाचत होतो. त्यात इंग्लंडचा राजा जेंव्हा मुंबई भेटीवर आला होता, तेंव्हा त्याकाळच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व संस्थानिकांचा दरबार मुंबईत भरवला होता असा उल्लेख आहे. देशभरातले सर्व संस्थानिक त्यावेळी मुंबईत आले होते. त्यांच्या त्यांच्या इतमामाप्रमाणे ब्रिटिशांनी त्यांची मुंबईत राहायची व्यवस्था केली होती. बडोदा संस्थान हे देशातलं एक अग्रगण्य संस्थान होतं. बडोद्याच्या वरती अग्रक्रमाने केवळ एकच संस्थान होत आणि ते म्हणजे हैदराबादच्या निजामाचा. साहजिकच देशात दुसऱ्या क्रमांकाचा मान असलेल्या बडोदा संस्थानाच्या अधिपतींची मुंबईतल्या निवासाची सोय, त्यांच्या इतमामाला शोभेल अशा घरात केली गेली होती आणि त्या घराचं नांव होत ‘लालबाग’, ह्या अर्थाचा उल्लेख सयाजीराव गायकवाडांच्या ह्या चरित्रात आहे. साहजिकच हे घर म्हणजे त्याकाळच्या एखाद्या पारशाचा अथवा यहुद्याचा महाल असावा ह्याच अनुमान बंधन काही अवघड नाही आणि पुढे ह्याच महालाच्या नांवावरून ह्या परिसराला ‘लालबाग’ हे नांव पडलं असावं, असं म्हणता येतं.
भायखळा, परेल, माझगांव हे भाग तेंव्हा तुरळक निवासी वस्तीचे. या भागातील वस्ती मुख्यत: बड्या इंग्लिश अंमलदारांची किंवा मग पारसी-गुजराती व्यापाऱ्यांची. या भागात अजुनही पारशी वस्तीच्या किंवा ब्रिटिशकालीन घरांच्या खुणा दिसून येतात, त्याकाही उगाच नव्हे. तेंव्हा तिथे ही दोन्ही घरं असणं सहज शक्य आहे.
घराच्या, एखाद्या बंगल्याच्या किंवा आधुनिक काळात एखाद्या सोसायटीच्या दारात असलेला बस थांबा त्या घराच्या, त्या बंगल्याच्या किंवा त्या सोसायटीच्या नांवाने ओळखला जातो व हळूहळू तो परिसरचं त्या नांवाने मशहूर होतो, हे आपल्याला माहित आहे. तसाच काहीस त्याकाळात लालबाग किंवा चिंचपोकळीच झालं असावं. आता हे दोन्ही बंगले नक्की कुठे होते हे शोधणं जरा अवघड आहे, परंतु अशक्य नाही. ते यथावकाश शोधूच. तूर्तास चिंचपोकळी आणि लालबाग ही दोन्ही नांवं, त्या परिसरात असलेल्या घरानावरून पडली आहेत, एवढं कुतूहल तरी शमलं.
-नितीन साळुंखे
9321811091
31.08.2019
दुसऱ्या भागाची ओळख.-
लालबागकरांनी एवढा उत्साह आणला कुठून?
माझं आजोळ लालबागचं. त्यामुळे सणासुदीला आणि एरवीही लालबागचं वेगळेपण माझ्या तेंव्हापासूनच लक्षात यायचं. सणासुदीच्या दिवसात तर लालबाग अधिक सुरेख दिसायचं. वाहत असणं हा रक्ताचा गुणधर्म, तसाच वाहत, अक्षरक्ष: रक्तासारखं सळसळणं काय असत, ते तेंव्हाच्या लालबागच्या लोकांकडे पाहून समजायचं. मुंबईतला हा भाग, सणासुदीच्या दिवसांत उर्वरित मुंबईपेक्षा काही वेगळाच भासायचा. इतका उत्साह हे लोक आणतात तरी कुठून, असा प्रश्न माझ्या तेंव्हाच्या बालमनाला पडायचा. आज ही परिस्थिती बदलत चालली आहे. लालबागच्या जमिनीला घट्ट चिकटून असलेल्या चाळी जमीनदोस्त होऊ लागल्या आणि विकासाचे भ्रष्ट प्रतीक असलेले टॉवर त्याजागी उभे राहू लागले. ह्या टॉवरात अस्सल मुंबईकर मराठी माणूस फक्त धनदांडग्यांची धुणी -भांडी करताना दिसतात आणि जे कोणी मराठी तिथे राहणारे आहेत, त्यांचं आणि ह्या मातीचा काही संबंध उरलेला असेल असं वाटत नाही. असं असूनही लालबागचा सणांमधला उत्साह, असे उत्साही लोक आणि लोकांतील उतसह कमी झालेला असला तरी, तो पार आटलेला नाही , असं अनुभवावरून म्हणता येत. ह्याच उत्साहाचं मूर्त स्वरूप म्हणजे लालबागचा गणेशोत्सव..!
#दुसरा_पूर्ण_भाग_उद्या..
-नितीन साळुंखे
31.08.2019