नंदनवन-सोमनाथ-हेमलकसा-ताडोबा-दीक्षाभूमी..
गेला आठवडा, म्हणजे दिनांक १६ डिसमेंबर ते २१ डिसेम्बर असे ७ दिवस मी सपत्नीक विदर्भात होतो. विदर्भात बाबा आमटेंनी उभारलेले आणि त्यांचे दोन्ही पुत्र समर्थपणे पुढे नेट असलेले नंदनवन, सोमनाथ आणि हेमलकसा हे प्रकल्प पाहायचे आणि शेवट ताडोबाच्या वाघोबाच्या दर्शनाने पावन व्हायचं, असा आमचा कार्यक्रम होता.
इथे जाण्याचं ठरलं, त्यांच्या काही दिवस अगोदरपासून आपल्या देशात जे काही सरकारी उपद्व्याप तेंव्हा सुरु होते आणि वेगवेगळ्या अद्याक्षरी रजिस्टरांवरून जो काही गोंधळ माजला (किंवा माजवला गेला) होता आणि त्यामागे, मी ज्या संविधानाला माझा पवित्र ग्रंथ मानतो, त्याला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत की काय, ह्या शंकेने मी फार अस्वस्थ होतो. या देशातलं माझं अस्तित्वच धोक्यात येणार असल्याची माझी भावना होत होती. मी या देशाचा नागरिक आहे की नाही किंवा ठरवला जाईन की नाही, नसेन तर मग मला काय करावं लागेल (किंबहूना ‘ते’ माझं काय करतील), या व अशा अनेक भयग्रस्त प्रश्नांची मालिका मनात उभी राहीली होती. या प्रश्नांमुळे मिर्माण झालेल्या माझ्या सांभाव्य अस्तित्वहीनतेच्या चिंतेने मला ग्रासलं होतं. इकडे डिटेन्शन कॅम्प्सची चर्चा सुरू झाली असल्याने, दुसऱ्या महायुद्धाच्या चित्रपटांतून पाहिलेल्या हिटलरच्या शुद्ध रक्ताच्या वेडेपणातून निर्माण झालेल्या कान्सन्ट्रेशन कॅम्प्सची दृष्य डोळ्यासमोर यायची. तसलाच काहीतरी करायची ‘त्यांची’ योजना आहे की काय, असे विचार मनात येत होते. मी अधिकच अस्वस्थ होत होतो. देशात काही विधायक घडताना दिसत नव्हतं. काय करावं आणि काय नाही, हे लक्षात येत नव्हतं.
अशातच एके दिवशी माझ्या पत्नीने विदर्भात बाबा आमटेंच्या प्रकल्पात जाण्याची कल्पना मांडली. सुरुवातीला मी तयारच नव्हतो, पण तिचा फारच आग्रह झाला, तेंव्हा म्हटलं जाऊन येऊ. देशात सर्वच विघातक गोष्टी घडत असताना, काही विधायक कामं पाहून त्यातून मनाला शांती लाभावी आणि ताजंतवानं यासाठी, मी माझ्या पत्नीच्या आग्रहाला मान देऊन तिथे जाण्याचा निर्णय घेतला.
आमची ही सहल विलेपार्ल्याच्या ‘अव्हेन्यूस अराऊंड द वर्ल्ड’ ह्या श्रीमती सुप्रिया लिमये ह्यांनी आयोजित केली होती. ह्या टूरमध्ये आमची नांव नोंदवली आणि दुसरीच धाकधूक माझ्या मनात सुरु झाली. ती होती सहप्रवासी कोण असतील आणि त्यांचं आमचं जमेल का, याची. संपूर्ण अनोळखी माणसासोबत जायचं म्हणजे अवघडच असते. त्यात ओळख होऊनही विचार जमले नाहीत तर ती शिक्षाच असते. असं झाल्यास त्या ग्रुपमध्ये आपण एकटेच असतो आणि सहा-सात दिवस असे काढायचे म्हणजे आणखी कठीण शिक्षा. पण काही काळाने लिमयेबाईंनी पाठवलेली सहप्रवाशांची नाव वाचली, आणि अंदाज आला की आपला ह्यांच्याशी चांगलं जमणार म्हणून;आणि खरंच आमचं उत्तम जमलं. गोरेगांवच्या पांचाळ आणि मेस्त्री कुटुंबातलली पांच माणसं, माहिमचं नाडकर्णी दाम्पत्य आणि पुण्याचे सुधाकर भावे काका. भावेकाका एकटेच, शिडे आले होते. वयाने आमच्यात सर्वात मोठे, पण उत्साह लहान मुलाचा. भावेकाका आणि पांचाळांची तरुण कन्या सोडली, तर आम्ही इतर आठजण आम्ही साधारण सारख्याच, उंबरठ्यावरील वयातले. आमचा ग्रुपलीडर समीर दोडेकर वयाने अगदी धाकटा, पण संपूर्ण दौऱ्यामध्ये आमची काळजी त्यांनी थोरल्याच्या मायेने घेतली..
आमची ही सहल एकूण पांच पूर्ण दिवसांची होती. पहिल्या दिवशी सोमनाथ प्रकल्प पाहिला, दुसरा संपूर्ण दिवस आनंदवनात घालवला. तिसरा आणि चौथा दिवस डॉक्टर प्रकाश आमटेंच्या लोक बिरादरी प्रकल्पात हेमलकसा इथे होतो, तर पांचव्या दिवसातील सकाळ ताडोबातल्या वाघोबाच्या शोधात गेली आणि सायंका दीक्षाभूमीच्या दर्शनाने पावन झाली. याच आमच्या प्रवासाचा हा अनुभव, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा एकूण दोन भागात मी शब्दबद्ध केला आहे.. यातील पूर्वार्धात नंदनवन-सोमनाथ, तर उत्तरार्धात हेमलकसा-ताडोबा आणि दीक्षाभूमीच्या अनुभव कथन केला आहे..
#नंदनवन_सोमनाथ -(पूर्वार्ध)
गेल्या आठवड्यात, दिनांक १६ ते २१ डिसेम्बर दरम्यान विदर्भात होतो. बाबा आमटेंचं नंदनवन, त्यांचेच सोमनाथ आणि हेमलकसा असे दोन अन्य प्रकल्प आणि शेवटी ताडोबाच्या जंगलात एक दिवस, असा आमचा प्रवास होता.
प्रवासाची सुरुवात बाबा आमटेंच्या आनंदवनापासून केली. नंदनवनातल्या धुळीने मला पावन करण्याची ही दुसरी खेप. पहिल्यांदा नंदनवनात गेलो होतो, तो सन २००९ सालात. तेंव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या मिनित्ताने, तेंव्हा आमदार असलेल्या माझ्या एका मित्रासोबत १५ दिवसांसाठी मी नागपुरात मुक्कामाला होतो. अधिवेशनाच्या दरम्यान एके दिवशी काहीतरी फुटकळ कारणाने विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालेलं असताना, रिकाम्या वेळेचं काय करायचं म्हणून, नागपूरपासून शंभरेक किलोमिटर अंतरावर असलेल्या नंदनवनात जायचं ठरवलं आणि जाऊनही आलो. पण ती भेट तशी धावती होती. नेमके त्याच वेळेस डॉक्टर तात्याराव लहानेंनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं शिबीर नंदनवनात भरवलं होत, त्याचीही गडबड सुरु होती. त्यावेळेस साधनाताई उपाख्य ताई आमटे हयात होत्या. त्या सर्व व्यस्त कार्यक्रमांतूनही त्यांनी व डॉक्टर विकास आमटे यांनी त्यातल्या त्यात वेळ काढून आमच्याशी छानश्या गप्पाही मारल्या होत्या. डॉक्टर लहानेंशीही उभ्या उभ्या गप्पा झाल्या होत्या. डॉक्टर प्रकाश आमटे, मला आठवतं त्यानुसार, त्यावेळेस हेमलकसात होते आणि म्हणून त्यांची भेट होऊ शकली नव्हती.
त्यानंतर आता जवळपास १० वर्षांनंतर तिथे पुन्हा जाण्याचा योग आला. गत १० वर्षांत नंदनवन आणि हे नंदनवन जिथे आहे, त्या वरोरा गांवाची रुपरेषा पार बदललेली दिसली. मी दहा वर्षांपूर्वी जेंव्हा तिथे गेलो होतो, तेंव्हा हे ठिकाण गांवकुसाच्या काहीसं बाहेर असल्यासारखं होतं, आता दहा वर्षांनंतर ते गांवच नंदनवनाच्या कुशीत वस्तीला आल्यासारखं वाटलं.
वरचे परिच्छेद वाचताना तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असेल. मी ‘आनंदवना’चा उल्लेख चुकून ‘नंदनवन’ केलाय की काय, असंही तुम्हाला वाटलं असे. पण तसं नाही. मी ते नंदनवनच लिहिलंय आणि ते ही मुद्दाम. कारण त्याच नांव आनंदवन असलं तरी, ते नंदनवनच आहे. आनंदवन म्हणायचा कितीही प्रयत्न केला तरी, माझ्या मनात आनंदवनासाठी नंदनवन हाच शब्द येतो. साधनाताई आणि बाबा आमटेनी फुलवलेलं आनंदवन नावाचं नंदनवन. नंदनवन म्हणजे स्वर्गातली बाग. इथे तर बाबानी ती पृथ्वीवर फुलवलीय. ती ही कुष्ठरोग झाल्यामुळे कटुंबातून, समाजातून बहिष्कृत करून कचऱ्यासारखं रस्त्यावर फेकल्यामुळे, जिवंतपणीच मरणाच्या यातना भोगणाऱ्या परंतु, भाव-भावना जिवंत असणाऱ्या माणसांना सोबत घेऊन फुलवलेली. बाबानी अशा महारोग्यांना आपलं मानून, त्यांना जवळ घेऊन आणि त्यांच्यातलाच एक होऊन इथे जो स्वर्ग निर्माण केला आहे, त्याला तोड नाही. समाजाने ज्या महारोग्यांना कचरा म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं होतं, त्यांनाच सोबत घेऊन जी आनंदाची स्वर्गासम बाग बाबानी फुलवली, ते आनंदवन.! ही बाग बाबांनी केवळ भरड जमिनीवरच फुलवली असं नाही, तर ती सामाजिक अवहेलना, उपेक्षेमुळे कुष्ठरोग झालेल्यांच्या भरड झालेल्या मनातही नंदनवन फुलवलं..! म्हणून तर आनंदवनासाठी माझ्या मनात ‘नंदनवन’ हाच शब्द येतो व लिहिलाही जातो..!!
ज्या काळात कुष्ठरोग म्हणजे गेल्या जन्मीचे पाप समजून, तो झालेल्या माणसाला चक्क रस्त्यावर फेकून दिल जायचं, थंडी, वर, ऊन-पाऊस यात रिकाम्या पोटी रस्त्यावर खितपत पडलेल्या अशा माणसांच्या वाऱ्यालाही उभा राहायचं नसत, नाहीतर देवाचा कोप आपल्यावर होऊन तो रोग आपल्यालाही होईल, अशी समजूत असण्याच्या काळात जाऊन पाहिलं, तर बाबाचं त्यांच्यात राहून त्यांच्यासाठी कार्य करण्याचा त्याकाळातला निर्णय समाजाच्या विरोधात जाणारा आणि म्हणून किती धाडसाचा होता हे लक्षत येईल. आनंदवन, साधनाताई-बाबा आमटे, त्यांचं कार्य पुढे नेणारे त्यांचे दोन्ही सुपुत्र यांच्या अकुणच कार्यावर प्रचंड लिखाण झालं आहे आणि पुढेही होणार आहे. मी त्यावर अधिक वेगळं काय लिहिणार? पण बाबानी जे केलं, त्यातलं एक महत्,व जे आता आनंदवनात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे, त्त्यावर मात्र मी इथे आवर्जून लिहिणार आहे.
आपल्यापैकी ज्यांचा जन्म ६० -७० दशकात किंवा त्याच्या थोडा पुढे मागे झाला आहे, अशाना त्याकाळात रस्त्यावर नेहेमी दिसणार एक दृश्य आठवत असेल. रस्त्यावर एक पांगुळगाडा, त्यावर झडलेला नाकाचा शेंडा, हातापायांच्या झडलेल्या बोटांना जुनाट चिंध्या बांधून, झडलेल्या बोटांचे तेच हात पसरून भीक मागणारी एक व्यक्ती, तो पांगुळगाडा ओढणारी मळकट खाकी रंगाची अर्धी चड्डी घातलेली आणखी एक व्यक्ती, सोबत झांज आणि इतर वाद्य वाजवणारी इतर तशीच नाक, हात, पाय झाडलेली, झडलेल्या अवयवांना चिंध्या गुंडाळलेल्या दोन तीन माणसांचं एक टोळकं रस्त्यावर भिक मागताना त्याकाळात दिसत असे. ह्या सर्वांच्या डोक्यावर ‘HELP’ अशी इंग्रजी अक्षर लिहिलेली टोपी हमखास असे. ते एक गाणंही म्हणत, पण ते मला आता नेमकं आठवत नाही. भीक मागणाऱ्या ओंगळवाण्या माणसंच हे दृश्य त्याकाळात अनेकदा दिसत असे. त्यांना लोक पैसेही देत असत, पण ते दुरून फेकून. त्यांच्या जवळ कुणी जात नसे. स्पर्श करण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यांच्याबाबत मोठ्यांकडे विचारणा केली असता, ते लोक म्हणजे ‘महारोगी’ आहेत आणि ते त्यांच्या पूवजन्माचे पाप ह्या जन्मात भोगत आहेत’ अशी उत्तर त्या काळात मिळत असत. त्यामुळे ‘महारोगी’ म्हणजे पापी आणि त्याच्या वाऱ्यालाही उभा राहायचं नसत, अशी समजूत लहानपणी मनात बसली होती.
काल आनंदवनात गेल्यावर अचानक लक्षात आलं की, गेली अनेक वर्ष रस्त्यांवर हे दृश्य आपल्याला दिसलेलं नाही. नाही म्हणायला रेल्वे स्टेशनच्या परिसरात काही कुष्ठरोगी भिक मागताना दिसतात, पण त्याकाळच्या तुलनेत त्यांचं प्रमाण तुरळकच. एकूणात ‘ती’ माणसं इतकी उपेक्षित आणि दुर्लक्षित होती, की ती रस्त्यावर भिक मागताना अलीकडे जवळपास दिसेनाशी झालेली आहेत हे आताच्या खेपेला आनंदवनात जाईपर्यंत माझ्या लक्षातही आलं नव्हतं.
कालच्या आमच्या आनंदवनाला दिलेल्या भेटीत, कुष्ठरोगाचं भारतातून निर्मुलन झालं आहे का, हा प्रश्न आमच्यातल्या कुणीतरी डाॅक्टर विकास आमटेंना विचारला. त्यावर विकास आमटेंनी दिलेलं उत्तर म्हणजे बाबा आमटेंचं खरं कार्य होतं. डाॅक्टर म्हणाले, “हा रोग भारतातून नाहीसा झालेला नाही, ह्या रोगाची शिकार झालेल्या व्यक्ती आजही आहेत, पण हा रोग योग्य त्या औषधोपचारांनी संपूर्ण बरा होऊ शकतो आणि तो मुळीच संसर्गजन्य नाही, हे लोकांना पटलं आहे. म्हणून अशा रोग्यांना पुर्वीसारखं उकिररड्यावर टाकलं जात नाही, तर कुटुंबांकडून त्यांच्वार उपचार करुन घेतले जातात आणि कुणाही अन्य आजाराने ग्रस्त कुटुंब सदस्यांप्रमाणे त्यांचीही सुश्रूषा केली जाते”.
कुष्ठरोग झालेली माणसं हल्ली रस्त्यावर भिक मागताना का दिसत नाहीत, याचं हे उत्तर होतं. बाबांनी आनंदवनात दोन-चार हजार कुष्ठरोग्यांना आश्रय दिला असेल, पण त्याने काही हा प्रश्न मिटणार नव्हता. अब्जावर लोकसांख्य असलेल्या ह्या देशात लाखोंनी कुहष्ठरोगी असतील. त्या सर्वाना काही एकटे बाबा आमटे कितीसे पुरे पडणार होते..! गरज होती ती ह्या रोगाबद्दलची भीती आणि किळस समाजाच्या मनातून नाहीशी करण्याची. बाबानी आपल्या कृतीतून तेच साध्य केलं. शेकडो व्याख्यानं व्याख्यान आणि करोडो रुपयांच्या प्रचार मोहीमा राबवून जे साध्य झालं नसत, ते बाबानी आपल्या कृतीतून साध्य करून दाखवलं. अर्थात त्यासाठी त्यांनाही त्या काळात कडवा संघर्ष करावा लागलं होता. स्वतःवर प्रयोग करून घ्यावे लागले होते, स्वतःला त्यात गाडून घ्यावं लागलं होत आणि नंतरच हे अवघड कार्य सोपं झालं आहे.
त्यांचं हे कार्य त्यांचे चिरंजीव डॉक्टर विकास आमटे अधिक व्यापक प्रमाणावर पुढे नेत आहेत. बाबा आमटेंनीच सुरु केलेला, आनंदवनापासून न नजीकच असलेला सोमनाथ प्रकल्प, डॉक्टर विकास आमटे यांनी, त्यांच्याकडे जन्मजात असलेलं इंजिनिअरिंगच ज्ञान वापरून अधिक अमर्थपणे पुढे नेला आहे. ह्या प्रकल्पाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. मलाही नव्हती. सुरुवातीला ऐकलं, तेंव्हा वाटलं की हे काहीतरी भगवं प्रकरण असावं, पण प्रत्यक्ष पाहिलं तेंव्हा ते चक्क हिरवंगार निघालं. तिथे असलेल्या शंकराच्या प्राचीन देवळावरून त्याला सोमनाथ हे नांव मिळालं आहे. हा प्रकल्प ज्या गांवात आहे, त्या गावाचं नांव ‘मूल’. आपले माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांचं हे मूळ गांव..!
व्याप्तीमध्ये आनंदवनापेक्षा जवळपास तीनपट मोठा असलेला हा शेती प्रकल्प, कुष्ठरोग्यांनी त्यांच्या कष्टाने हिरवागार केला आहे. या प्रकल्पासाठी बाबाना सरकारकडून मिळालेली जमीन ताडोबाच्या घनदाट जंगलाचा एक भाग होती. त्यामुळे वाघ-बिबळ्यादी जंगली प्राण्यांचा तिथे नित्य वावर होता.निवास-पाण्याची काहीच सोय तिथे नव्हती. बाबा आणि बांचे सहकारी, वेळोवेळी आयोजित केलेल्या श्रम-छावण्या, त्यातून दिलेलं अनेक लोकांनी त्यांचं योगदान आणि डॉक्टर विकास आमटे यांची कल्पकता यातून इथे आज हिरव्या सोन्याचा शेतीस्वर्ग फुलला आहे. इथेही कुष्ठरोग्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन केलं गेलं आहे.
आम्हाला हा संपूर्ण प्रकल्प तिथे निवासाला असलेल्या श्री. हरिभाऊ पाटील यांनी फिरून दाखवला. हा प्रकल्प इतका मोठा आहे, की हा वाहनातूनच फिरून पाहावा लागतो. वाघ-बाबल्या कधीही दत्त म्हणून इथे समोर येऊन उभा राहू शकतो, त्यामुळे हरिभाऊ आम्हाला त्यांच्या नजरेआड होऊ देत नव्हते. कुष्ठरोगाचे शिकार झालेले हरिभाऊ गेली ३५ वर्ष आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्पावर आहेत. इकडचे काळजीवाहकच आहेत ते. हरिभाऊ लक्षात राहिले ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे. पूर्वाश्रमीचे शिक्षक, त्यामुळे समजावून सांगण्याची हातोटी विलक्षण. झाड-पेडांची आणि त्यांच्या उपयोगाची सखोल माहिती हरिभाऊंनी होती.
सोमनाथविषयी बाबा सुरुवातीपासून म्हणत की, ‘सोमनाथ चालेल तर संस्था चालेल’, बाबांचं ते म्हणणं आज खरं ठरलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हा प्रकल्प पाहायला हवा.
-नितीन साळुंखे
9321811091
27.12.2019