चौपदरीकरणाच्या राजमार्ग –

आज दिनांक २६. ०२. २०२०.. रोजी  ‘दै. लोकमत’-सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झालेला माझा लेख –

चौपदरीकरणाच्या राजमार्ग –

“तुला समजलं का, त्या अमुक तमुकला एवढे पैसे मिळाले..!,”. मला काहीच बोध येईना. माझ्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचून, माझा मित्र मला पुढे स्पष्टीकरण करायला लागला, ” अरे तो आपला हा आहे ना, त्याची खारेपाटणात हायवेच्या शेजारी मोठी जागा होती. जागा पडिकच होती, पण त्याची ती जागा बोंबे-गोवा रोडच्या रुंदीकरणात गेली आणि त्याचा मोबदला म्हणून त्याला भरपूर कोटी मिळाले” आता माझ्या लक्षात आलं. माझ्या मित्राच्या मित्राची हायवेच्या जागा गेली आणि त्याला भरपूर पैसे मिळाले. माझा मित्रही सिंधुदुर्गातील असल्याने, तो हे आनंदाने सांगत होता की असूयेने, हे माझा लक्षात येईना. असूया त्याच्या मित्राला भरपूर पैसे मिळाले याची नाही, तर आपल्या वाड वडिलांनी हायवेच्या शेजारी जागा का घेऊन ठेवली नाही, याची..! (खोटं कशाला सांगा, असं मलाही वाटलं)

अश्याच प्रकारचा संवाद पुढे आमच्या जिल्ह्यातील अनेकांच्या मुखातून अनेकांबद्दल ऐकायला मिळाला. एकंदरीत ह्याच सार एवढंच, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या माध्यमातून कोकणात (इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात) भरपूर पैसा आला. पण ह्या पैशांची गुंतवणूक त्या लोकांनी कशी आणि कुठे केली या बद्दल कुणाला माहिती नव्हती. तशी माहिती असण्याची काही गरजही नव्हती कारण तो संपूर्णपणे खाजगी मामला असतो. मी कोकणातला, म्हणजे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कायमचा रहिवासी नाही, त्या मुले तिथली लोक कितपत अर्थसाक्षर आहेत, ते मला माहित असण्याची शक्यता नाही. पण माझ्याही अंगात तेच कोकणी रक्त खेळात असल्याने, कोकणी जनता काटकसरीने वागणारी आहे, हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. पण, अशा प्रकारे अनपेक्षितपणे मिळालेल्या पैशांचं करायचं काय, हा प्रश्न तुलनेने कमी पैसा पाहिलेल्या माणसाच्या समोर उभा राहातोच. मग पैसे खर्च करण्याचे सोपे मार्ग सुचू लागतात. सोनं, गाड्या, नवनविन घरं, घराची पुनर्बांधणी आणि मुंबईसारखं इंटेरिअर यावर प्रचंड पैसा खर्च करण्याची इच्छा मूळ धरू लागते. हे सर्व झालं, की मग घरातल्या तरुणाला राजकारण खुणावू लागतं आणि सोन्याने लगडलेल्या एखादा भावी युवा नेत्याला नाक्या नाक्यावर (आपल्याच पैशानं) लागलेलं दिमाखदार बॅनर मनातल्या मनात दिसू लागतं. पैसे आला आहे म्हटल्यावर, चार खुशामतखोर टाळकी जवळ येतात आणि ‘सायबा’ला चढवून स्वतःच्या खाण्यापिण्याची सोया करून घेतात. युवा नेत्याचं स्वप्न बॅनरच्या रूपाने (फक्त)नाक्यानाक्यावर झळकू लागतं आणि मग एका वाटेने चालत आलेली लक्ष्मी,  दहा मार्गाने धावत कधी निघून जाते, हे लक्षातही येत नाही. ते लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि युवा नेता पुन्हा कार्यक्रता बनून निवडणकांच्या मांडवात जेवणाच्या अपेक्षेने आशाळभूतपणे घुटमळताना दिसतो. हे कोकणात होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. 

कोकणच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे, पण तरीही सावध राहायला हवं. आलेला पैसा, गेल्या जमिनीतून आलेला आहे आणि तो आयुष्यभर पुरवायचा आहे, ह्या विचाराने वागायला हवं. योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी, जेणेकरून त्या पैशातून नियमित उत्पन्न मिळत राहील मला हे सांगावंसं वाटतं, या मागे काही कारणही आहे. काही वर्षांपूर्वी ठाण्यानजिकच्या भिवंडीचं भाग्यही इसंच फळफळलं आणि तिथल्या लोकांच्या जमिनीला सोन्याचं मोल मिळालं. सुरुवातीच्या काळात तिथल्या लोकांनी मिळालेल्या पैशांतून पहिली आपली स्वप्न पूर्ण केली. स्त्री-पुरुष अशा दोघांनाही, शरीराच्या ज्या ज्या अवयवात सोनं अडकवता येईल, त्या त्या अवयवात सोनं अडकवून ते पिवळे धमक झाले. देशी-परदेशी गाड्या घेतल्या. साध लिटरभर  दुध आणायलाही परदेशी बनावटीची गाडी लागायची. पार्ट्या तर काय रोजच्याच होत्या. झालं, अनप्रोडक्टीव्ह गोष्टीवर पैसे खर्च झाला आणि पुन्हा आपल्याच विकलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी धरायची वेळ आली. कोकणात हे होता कामा नये. पुण्याजवळच्या मुळशी गावातही हेच घडलं. त्यावर आधारलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा आपण आवडीने पाहीलाही असेल. त्यातून यथोचित बोधही घेतला असेल. कोकणात हे घडू नये. कोकणातली माणसं तशी शहाणी आहेत. पण पैसा भल्या भल्यां शहाण्यांना वेडं करतो, म्हणून सावध राहायला हवं.

कोकणाचं बलस्थान हे तेथील अनाघ्रात  निसर्ग आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. शहरात राहणाऱ्या माणसांना ह्याचाच भारी अप्रूप आहे. आजही रेल्वे तुडुंब भरून वाहताना आणि महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असतानाही, पुण्य-मुंबईकडचे लोक ह्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद लुटायला जीव धोक्यात टाकून कोकणात येत असतात.  सटी-समाशी कधीतरीच गावी जाणारा पुणे-मुंबैकर कोकणी, आता जवळपास दर आठवड्याला किंवा जोडूनची सुट्टी असल्यास, कोकणच्या दिशेने प्रस्थान ठेवतो, तो ह्या निसर्गाच्या ओढीने. सुट्टी साली की  कोकणाकडे जाणारे चहूदिशाचे रस्ते वाहनांनी तुंबून गेले, ह्या बातम्या आता नेहेमीचेच झाल्या आहेत. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणानंतर ही वर्दळ अधिक वाढणार आहे. हिच संधी असणार आहे, पर्यटन वाढीची. कोकण म्हणजे निसर्गसौंदर्याची खान आहे, असं नुसतं म्हणून चालणार नाही, तर ह्या खाणीतली बहुमोल रान, म्हणजे निर्मल स्मुद्रकिनारे, गार्ड झाडीत, सह्याद्रीच्या कुशीत वसलेली निवांत गावे, सह्याद्रीतील जैव विविधता, कोकणी खाद्य संस्कृती, लोककला इत्यादी, नजकतीने जगासमोर ठेवण्याची गरज आहे.  गुजरात सारख्या राज्याने अमिताभ बच्चनना घेऊन जगात वाळवंटही विकून दाखवलंय. आज ते वाळवंट पाहण्यासाठी, वाळवंटातच जन्मलेले, मोठे झालेले आणि आयुष्यभर वाळवंताशिवाय काही न पाहिलेले मध्यपूर्व देशातले लोकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. मग कोकण तर मग कोकणचं अनाघ्रात गूढ निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्र किनारे, महाराजांचे गड किल्ले, लोकजीवन- लोककला- खाद्य जीवन, सह्याद्रीतील जैवविविधता, घनदाट जंगलं यांचा दृष्टीनुभव घेण्यासाठी जग आलं तर मला नवल वाटणार नाही. गरज आहे ती फक्त कल्पकता वापरण्याची. आपल्याकडे असलेल्या खुबाईंचा कल्पक्तेने वापर करून पर्यटन उद्योगासारखा उद्योग विकसित करायचा विचार कोकणी जनतेने करावा आणि ह्यासाठी सरकारी अवतारावर अजिबात अवलंबून राहू नये. अवतार ह्या कल्पनेने आपलं खूप नुकसान केलाय. कुणीतरी अवतार जन्म घेईल आणि आमचं भलं करेल, अश्या कथा पुराणात वाचायला छान वाटतात. प्रत्यक्षात मात्र आपल्या उद्धारासाठी आपल्यालाच अवतार घ्यावा लागतो, ही वास्तवता आहे. तर सरकारी मिथ्या वातारावर अवलंबून न राहता. कोकणातल्या छोट्या छोट्या गटांनी एकत्र येऊन, आपापल्या गावातील खुब्यांचं मार्केटिंग सुरु करावं. सोशल मीडियामुळे जगासमोर जण खूप सोपं झालाय, ह्याचा लाभ जरूर उठवावा. हे करताना आपापसातलं विविध पातळ्यांवरच राजकारण निक्षून बाजूला ठेवावं आणि पक्षीय राजकारणापासून तर अंतर राखूनच राहावं. 

जगभरची प्राचीन मानवी वस्ती ज्या प्रमाणे नद्यांच्या काठी फुलली, फळली आणि बहरली, त्याचप्रमाणे अर्वाचीन अथवा आधुनिक मानवी वस्ती रेल्वेमार्ग आणि रस्त्यांच्या काठाने फुलताना, फलटण आणि भरताना दिसते. रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग ह्या आधुनिक काळातल्या नद्याच आहे. म्हणून तर त्यावरून वाहतूक होते व ते दुथडी भरून वाहताना दिसतात, असे शब्द प्रयोग जन्माला आले. कोकणातूनही येत्या काही काळात मुंबई-गोवा महामार्गाची ‘गंगा’ दुथडी भरून वाहू लागणार आहे. ही गंगा समृद्धी घेऊन येणार आहे. ह्या गंगेला प्रसन्न करून घेण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पवित्र व्यवसाय नाही. पवित्र ह्यासाठी की, अतिथीची सेवा करण्याचं भाग्य ह्या उद्योगात मिळत शिवाय सोबत हायवेच्या रूपाने आलेल्या गंगेची पूजा केल्याने, लक्ष्मीही प्रसन्न होते, हा दुसरा फायदा.  

लक्ष्मी प्रसन्न होते, ती पूजा करणार्यापेक्षा नम्रतेने वागणाऱ्या माणसांवर. ‘ह्यो काय माका शिकयतलो’ हे हा कोकणी बाणा थोडा दूर ठेवण्याची गरज आहे. कोकणी माणसे, इथल्या गावातील विविध देवळातील महादेवासारखी स्वयंभू आहेत, ह्याची मला कल्पना आहे. मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा कोणत्याही स्वयंभू माणसांत असतोच. तसा तो कोकण्यांतही आहे. पर्यटनासारख्य किंवा कुठल्याही उद्योगात, एकदा नव्हे शंभर वेळा वाकावे लागते. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाहेरून इथे चार दिवसांसाठी आलेला पाहुणा, इथल्या निसर्गाचा, लोकजीवनाचा, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आलेला आहे, काही शिकवायला नाही. झालाच तर तो काहीतरी शिकवूनच जाणार आहे. त्यामुळे त्याच्याशी शक्य तेवढ्या नम्रपणे वागावं आणि त्याची होता होईल तेवढी मर्जी राखावी, हे मला आवर्जून सांगावस वाटत. ह्या बाबतीत मारवाड-गुजराती समजला आपला आदर्श मानावं.     मुंबई-गोवा महामार्गाची गंगा ज्याप्रमाणे कोकणात समृद्धी आणणारा आहे, त्याचप्रमाणे ती सोबत विकृतीही आणणारी आहे. नदीच्या प्रवाहासोबत जसा सुपीक गाळ येतो, तसाच दूरच्या गावातील केरकचराही येतो. ही विकृती मोठमोठ्या प्रकल्पांच्या आकर्षक स्वरुपात असेल. मोठमोठे प्रकल्प आणून, स्थानिकांच्या जमिनी घेऊन, कुटुंबातील कुणाला तरी नोकरी देण्यातं आमिष देणारांपासून कोकणवासियांनी कायम सावध राहायला हवं, कारण यापुढे तुमच्या जमिनींना सोन्याचा नव्हे, तर प्लॅटिनमचा भाव येणार आहे. मोठमोठे राक्षसी प्रकल्प आणू इच्छिणारांची वक्र दृष्टी, कोकणवासीयांच्या उन्नतीपेक्षा, जमिनींकडे असणायचीच शक्यता जास्त आहे. मोठ मोठे प्रकल्प आणण्याची स्वप्न दाखवून, प्रकल्पांना लागणाऱ्या जमिनी स्थानिकांकडून विकत घ्यायच्या आणि त्याच दाम दुपटीने प्रकल्पांना विकायच्या हे देशात सर्वंकडेच  झालंय, ते कोकणात घडणारच नाही, असं मुळीच समजू नका. स्वप्न दाखवणारांपासून सावधान राहायला हवं. आणि अशी स्वप्न दाखवणारे राजकीय नेते असतील, तर अधिकच सावध राहायला हवं. ह्या संदर्भातही मी पुन्हा भिवंडीचंच उदाहरण देईन. 

ठाण्यानजीकच्या भिवंडीच्या जमिनींना अचानक भाव आल्यानंतर, तिथल्या आदल्या पिढीने जमिनी फुंकून टाकल्या. आलेल्या पैश्यांवर मौजमजा कशी केली हे आपण ह्या लेखातल्या तिसऱ्या परीच्छेदात पाहिलं. पण पहिल्या पिढीकडून नकळत घडलेली तशी चूक, त्यांच्या दुसऱ्या पिढीने मात्र केली नाही. नवीन पिढी शहाणपणाने वागली. ह्या नवीन तरुण पिढीने आपल्या उरल्या सुरल्या जमिनी न विकता त्या विविध उद्योगांना भाड्याने दिल्या. काही जमीन मालकांनी आपल्या जमिनी भांडवल म्हणून नव्याने त्या भागात येऊ पाहणाऱ्या उद्योगातून गुंतवल्या, तर काहींनी स्वतःचे उद्योग सुरु केले. अशा प्रकारे हातची जमीन जाऊ न देता, आपल्या तहहयात उत्पन्नाची सोय केली. आज भिवंडी परिसरातील हि नवीन पिढी, हातच काहीही न गमावता, जुन्या पिढीसारखच सर्वप्रकारचा सुखोपभोग घेत आहे. हे शहाणपण कोकणातील तरुणांनी दाखवावं आणि दाखवतील असा माझा विश्वस आहे.  हायवेवरून धावत येणाऱ्या विकृतीला काही झालं तरी कोकणी माणसाने बळी पडू नये. देशाची लक्ष्मी असलेल्या मुंबईला घडवणारा कोकणी माणूसच होता, पण केवळ ह्याबाबतीत धोरणीपणाने न वागल्यामुळे आज मुंबईचा शिल्पकार असलेला मुंबईकर, मुंबईतून पार हद्दपार झालेला आहे. ते कोकणात होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. 

मुंबई गोवा महामार्गाचा रुंदीकरण, भविष्यात नव्याने होणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग, हे कोकणात होऊ घातलेल्या अर्थक्रांतीची चाहूल आहे. ह्या होऊ घातलेल्या अर्थक्रांतीला भानावर राहून सामोरं जायला हवं. क्रांती आपल्याच पिलांना खाते, हे वाचन खोटं ठरवण्याची जबाबदारी आता कोकणवासीयांची आहे. त्याचसोबत कोकणी जनतेला मार्गदर्शन करण्याची, तेथील जनतेला अर्थसाक्षर करण्याची जबाबदारी कोकणातील विविध संस्था, वर्तमानपत्र आणि राजकीय नेत्यांचीही आहे. ह्या सर्व घटकांनी आपापला स्वार्थ बाजूला ठेवून केवळ कोकणी जनतेच्या भल्याचा विचार करण्याची गरज आहे. 

-नितीन साळुंखे 

9321811091

26.02.2020

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने..

महाराष्ट्र, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी;एक वास्तव-

वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यासाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा मराठी माणूस आणि महाराष्ट्र जास्त ‘राष्ट्रीय’ असतो आणि म्हणून तर प्रांतीय आंदोलने महाराष्ट्राच्या मातीत दीर्घकाळ यशस्वी होवू शकत नाहीत. ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले’ ही भावना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजतागायत उराशी जपलेली आहे. आणि जेंव्हा जेंव्हा राष्ट् अडचणीत येतं, तेंव्हा तेंव्हा राष्ट्राच्या हाकेला प्रथम ‘ओ’ जातो तो महाराष्ट्राचाच.

अश्या ह्या कडव्या राष्ट्राभिमानी महाराष्ट्राचा मानभंग केलेला मात्र महाराष्ट्राची माती कधीच खपवून घेत नाही. याचा अर्थ असा नाही, की ती उठसुट आपल्या हक्कासाठी पेटून उठते. मराठी माती वाट पाहाते, अन्याय झाला असल्यास, करणाराला तो निवारणाची संधी देते. अगदी शिशुपालासारखे शंभर अपराध भरल्यानंतरच ती प्रतिकाराला सिद्ध होतो, ती मात्र सोक्षमोक्ष लावायचाच या जिद्दीने. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रास्त मागणीत दुजाभाव होतो आहे हे लक्षात येताच मराठी माणसाने स्वत:चे प्राण देऊन त्याचा प्रतिकार केला आणि स्वत:वर अन्याय होऊ दिला नाही.

असा हा कडवा राष्ट्राभिमानी मराठी माणूस आपली मातृभाषा मराठीसाठी आग्रही का होत नाही हेच कळत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत, मराठीजनच आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यामाच्या शाळेत घालण्यासाठी वाटेल ते करत आहेत. मुलांना इंग्रजी संभाषण यावं यासाठी घरी-दारी त्याच्याशी आग्रहाने इंग्रजीत संवाद करत आहेत. इंग्रजीच का, सर्वच भाषा बोलायला आल्या पाहिजेत असं माझंही ठाम मत आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की त्यासाठी मातृभाषा मराठीचा त्याग करायला(च) हवा. हल्ली तर अशी परिसिथिती आहे, की घरी मुलाला किंवा मुलीला जेंव्हा शाळेत घालायची वेळ येते, तेंव्हा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालावं यावरून छोटेसे वाद होतात. फार कमी घरं याला अपवाद असतील. वाद कोणत्या शाळेत, म्हणजे कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं यावरून होतात. इथे आश्चर्याची गोष्ट अशी, की मातृभाषेच्या माध्यमात मुलाला घालण्यास बहुतेक घरात ‘मातृ’पक्षाचाच विरोध असतो. यालाही अपवाद असतील, पण ते ही औषधापुरतेच..!

“केवळ काॅन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून मुलं ‘आपली’ भाषा विसरत नाहीत, तर त्या भाषेचे जिवंत प्रेम त्यांना घरी कुठेच दिसत नाही व म्हणून ती भाषा मुलं त्याज्य ठरवतात. ‘आम्ही आपल्या भाषेचे प्रेमी आहोत’ असं उठ-सूट बोलण्यापेक्षा, त्या भाषेचे प्रेम मुलांना आपल्या आई-वडीलांच्या जगण्या-वागण्यातून आपसूक जाणवायला लागते आणि ते तसे जाणवले तरच ते पुढे मुलांकडून जोपासले जाते; मग ती कोणत्या का माध्यमातून शाळा शिकेनात.!!” पुलंचं हे म्हणणं केवळ मराठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीय भाषेला लागू आहे. म्हणून वर केवळ ‘आपली’ भाषा असा उल्लेख केला आहे..! मराठी, गुजराती, मारवाडी अशा सर्वच देशी भाषांबद्दलची त्या त्या भाषीक समाजातील अनास्था वाढत चालली असल्याचे समाजात वावरताना लक्षात येते. इंग्रजी शिकणे म्हणजे स्वत:ची भाषा कमी लेखणे किंवा विसरणे नव्हे, हे कोणी लक्षात घ्यायला मागत नाहीय..! त्यात या अनास्थेत ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी परिस्थिती आहेच..।!

मराठी माणसाचा आपला जो कडवा देशाभिमान, जी वैभवशाली सांस्कृतिक आणि महान सामरीक परंपरा आहे ना, ती आपसुकपणे आणि सहजतेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मातृभाषा हे एकमेंव उपलब्ध साधन आहे, हे आपल्याला समजत का नाहीय? आपली ‘मराठी’भाषा मेली तर तो देशाच्या बरोबरीने कोणतही संकट झेलण्यासाठी छाती पुढे ताणून उभा राहीलेला महाराष्ट्र पुन्हा दिसणार नाही, अशी मला चिंता वाटते. मुलांना मराठी भाषाच समजली नाही तर नसानसांत स्फुल्लिंग चेतवणाऱ्या कविता, रक्त सळसळवणारे शाहीरांचे पोवाडे, स्फुर्ती देणारी भाषणे-व्याख्याने मराठी मुलांच्या मनाला कशी भिडणार? भाषा संस्कृतीची वाहक असते आणि भाषा संपली की ती भाषा बोलणारी संस्कृती, ही साधी गोष्ट आपल्याला कधी समजणार? आपणच आपल्या मुळावर उठलोय याचं तरी भान आपल्याला आहे का?

‘खबरदार जर टांच मारूनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या’ या कवितेतील त्या लहान मुलाचा जोश आणि शत्रुप्रतीचा त्वेष किंवा ‘काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी’ या पोवाड्यातील शौर्य त्या ओळींतून आपल्या मुलांच्या मना-अंगात भिनण्यासाठी, त्या शब्दांचा अर्थ तर मुलांना कळायला हवा..! आणि मराठी भाषाच मुलांना आली नाही, येऊ दिली नाही, तर त्यांना तो कळायचा कसा. मग त्याच्या तो जाश निर्माणच कसा व्हायचा..? नविन पिढीला दोष देऊन काहीच उपयोग नाही, हा दोष त्या पिढीला घडवणाऱ्यांचा म्हणजे आपला आहे.

केवळ इंग्रजी उत्तम बोलता यावं यामागे त्याला चांगल नोकरी लागावी, परदेशात मुलाने जावं हाच मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा बहुतेकांचा उद्देश असतो, पण या संकुचित विचारापायी आपण आपल्या मुलाच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्याही भावविश्वाचा खुन करतोय हे आपल्या लक्षात का येत नाहीय? मुलांचं भावविश्व विकसित होण्यासाठी मातृभाषेची बैठक पक्की लागते. ही बैठक पक्की असली का जगातील कोणतीही भाषा असाध्य नसते, ही साधी गोष्ट ज्या दिवशी मराठी माणसाला समजेल तो मराहाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी गौरवाचा दिवस असेल आणि तो सुदिन लवकरच यावा अशी तुम्हा सर्वांप्रती प्रार्थना.

गतवर्षीच ‘मराठी भाषा’ दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या विधानमंडळात मान. राज्यपालांचं अभिभाषण मराठी भाषेत भाषांतरीत न केल्यामुळे राज्यपालांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केल्याची बातमी वाचली आणि मन विषण्ण झालं. आपण मराठी राज्याच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या मराठी राज्यकर्त्यांची राजभाषेविषयीची आस्था किती पोकळ आणि बेगडी आहे, हे या प्रसंगावरून लऱ्क्षात येते. पण यालाही कारणीभूत आपण जनताच आहोत. प्रजेतच आपल्या भाषेविषयी ममत्व नसेल, तर ते राजात कुठनं येणार?

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे.

माझ्या मराठी बांधवांनो, “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!” या ओळींचा महापूर फक्त मराठी भाषा दिनाच्या निनित्ताने येतो. एकदा का तो मराठीचा ‘दिन’ केला, की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील आपली भूमिका. परंतू कुसुमाग्रजांच्या काळात डोक्यावर राजमुकूट घालून मंत्रालयाच्या दाराशी फाटक्या कपड्यात उभ्या असेलेल्या माझ्या मराठी भाषेची ती फाटकी वस्त्रही आपण, तिचीच लेकरं म्हणवणारांनी, फिदीफिदी दात विचकत ओढून काढली आहेत आणि आपल्या लेकरांपासूनच स्वत:चं लज्जारक्षण व्हावं म्हणून आपली ती ‘माय’ मराठी मंत्रालयाच्या नव्याने बांधलेल्या उंचं पायऱ्यांच्या सांदीत कुठेतरी लपून बसली आहे..मराठीचा ‘दिन’ करण्यापेक्षा मराठी ‘दीन’ होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

मित्रांनो, अजुनही वेळ गेलेली नाही. आपणच ‘अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या’ आपल्या मराठी भाषेला आपल्या प्रेमाची संजीवनी देऊन जिवदान देऊ शकतो. मराठीवर प्रेम करा, आपल्या भाषेत कटाक्षाने व्यवहार करा, आपल्या मुलांना किमान इयत्ता ७वी पर्यॅत तरी मराठी माध्यमात शिकवा असं आवाहन सर्व मराठी भाषकांना करावसं वाटतं;नाहीतर तिचे दिवस करण्याची पाळी आपल्यावर लवकरच येईल..

-नितीन साळुंखे
9321811091

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी..

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी..
सफेद बालों की, ऐसी की तैसी..!!

या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, पण का कोण जाणे, मला ते जमलं नाही. अर्थात केस रंगवण्याचा प्रयत्न पत्नीच्या आग्रहास्तव केला होता, कारण माझे गेलेले आणि शिल्लक असलेल्यापैकी बहुतेक सर्व पिकलेले केस माझ्यापेक्षा तिलाच ‘कसेतरी’ वाटायचे..वयापेक्षा मोठा दिसतोस म्हणे..! (आता वयानं मोठं दिसण्याचे काय काय फायदे असतात तिला काय सांगणार..!)

मी केस रंगवायचे सोडले कारण तसं करणं मला खुप कटकटीचं वाटलं. केस कमी असले की अगदी एक एक केस पकडून रंगवावा लागतो आणि ते कल्पनेतही अवघड असतं तर प्रत्यक्षात काय उपद्य्वाप असेल याचा विचार करा.. सरसकट रंग फासला की तो रंग डोक्यावरील उरलेल्या केसांऐवजी नेमका केस नसलेल्या ठिकाणीच व्यवस्थित लागतो आणि मग ते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सिरीयलमधल्या गोकुळधाम सोसायटीचे एकमेंव सेक्रेटरी श्रीयुत आत्माराम तुकाराम भिडेंच्या रंगवलेल्या टकलासारखं काहीतरी विचित्र दिसतं. त्यापेक्षा केस न रंगवलेलेच बरे असं म्हणून आहेत तसे ठेवणे योग्य हा निर्णय मला (नाईलाजाने) घ्यावा लागला.

तरी अनेक लोक केस रंगवतात. मुंबईसारख्या धकाधकीचं जीवन जगायला लागणाऱ्या शहरात तर सततच्या टेन्शनने आणि निकृष्ट खाण्या-पिण्यामुळे अनेकांचे तरूण वयातच केस पिकतात. दुसरं म्हणजे, मुंबई हे व्यापारी शहर असल्यानं, इथं आतल्या वस्तुपेक्षा ‘पॅकिंग व वेष्टना’ला जास्त महत्व असतं. आतील वस्तू फालतू असली तरी चालेल परंतू पॅकींग मात्र आकर्षक हवं. हा व्यापाराचा नियम मुंबईसारख्या शहरात मानवी व्यवहारातही लागू होत असल्यामुळे इथं प्रत्येकाला प्रेझेंटेबल राहावं लागते. दिसण्यावरूनच इथं व्यक्तीची किंमत केली जाते मग ती व्यक्ती प्रत्यक्षात कशीही असेना का. त्यामुळे अकाली पिकलेले केस रंगवणं ओघानेच आलं.

माणसाचं सौंदर्य मुख्यत: नाक आणि डोळे यावर ठरतं. म्हणून तर ‘कानी-कपाळी सुंदर’ न म्हणता ‘नाकी-डोळी सुंदर’ असं महणतात. पूर्वी नाक धारदार (किंवा लिंगपरत्वे चाफेकळी) व डोळे पाणीदार (किंवा लिंगपरत्वे बोलके, भावूक) असले की माणूस सुंदर दिसायचा. आता त्यात आणखी दोन गोष्टींची भर पडली, त्या म्हणजे रंग आणि केस. हे टिव्हीमुळे कळलं..! नाक-डोळे-रंग-केस हवे तसे आणि हवे तिथं नसूनही केवळ साबणामुळे सौंदर्य खुलतं हा आणखी एक क्रांतिकारी शोधही अलिकडं लागलाय, हे ज्ञानही टिव्हीमुळे मिळालं..! टिव्ही नसता तर सुंदर कशाला आणि कुणाला म्हणावं कळलंच नसतं कधी बुवा..!!

थोड्याश्या विषयांतरानंतर पुन्हा माझ्या नसलेल्या आणि उर्वरीत पिकलेल्या केसांकडे वळू. केस रंगवाचा मला कंटाळा का येतो त्याचं मुख्य कारण मी वर सांगीतलंच आहे. मी माझे जाऊन उरलेले केस रंगवत नाही याला आणखी एक कारण आहे. निसर्गाने आपल्याला (वयानुरबप) जे जे दिलेलं असतं, ते ते आपल्याला शोभेसं असतं यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण सर्वच जर निसर्गाची (काही जण देवाची म्हणतील. हरकत नाही. दोन्ही एकच आहेत..!) युनिक निर्मिती असू तर ती सुंदरच असणार अशी माझी खातरी आहे. म्हणून जर त्यांने केस काढून घेऊन उरलेले पांढरे केले असतील तर ते आपल्याला शोभतच असणार. त्यांने पांढरे केलेले पुन्हा काळे करून त्या निसर्गाच्या कारागिरीत ढवळाढवळ आपण का म्हणून करावी..? अर्थात हे माझं मत झलं, इतरांना पटावं अशी बिलतूल अपेक्षा नाही.

टक्कल, अर्धटक्कल (पुढून असल्यास ‘भव्य कपाळ’ आणि मधेच असल्यास ‘श्रीमंत’, अशी त्या व्यक्तीला काॅम्प्लिमेंट दिल्यास, तिलाही बरं वाटतं), पूर्ण टक्कल आणि संपूर्ण पांढरे परंतू भरघोस केस (सुतरफेणी नजरेसमोर आणा) हे पुरूषांच्या माथ्यावरील केसांचे ढोबळ मानाने चार प्रकार. हे वेगवेगळे प्रकारही एकेकाला काय शोभून दिसतात..!! पिकलेल्या केसाचा अमिताभ अजूनही किती देखणा आणि भारदस्त दिसतो..पूर्ण टक्कल असलेला राकेश रोशन, विगपेक्षा टकलातच देखणा वाटतो अजुनही..! अनुपम खेर, विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्ना कुठं वाईट दिसतात? अरुण जेटली, मोदी काय कमी देखणे वाटतात? इंदीरा गांधींच्या केसातली ती ठसठशीत रुंद पांढरी बट तर नंतर नंतर त्यांची ओळख झाली होती. ही सर्वांना माहित असलेली काही उदाहरणं. अशी कुठलीही रंगरंगोटी किंवा लपवाछपवी न करता ‘दिधले अनंते’ वृत्तीने बिनधास्त राहाणारी कितीतरी आनंदी माणसं आपण आपल्या आजुबाजूला रोज पाहात असतो.

लपवाछपवीवरनं मला आठवतो तो सुपरस्टार रजनीकांत. आज भारतातल्या सर्वभाषिक चित्रपट नायकांमधे सर्वाधिक मानधन घेणारा आणि तेवढाच लोकप्रियही असणारा साऊथचा चित्रपट सितारा. पण चित्रपटाव्यतिरिक्त तो त्याच्या काळ्या रंगाच्या टकलासहीत लुंगीवर बिनधास्त वावरत असतो. चित्रपटातलं खोटं जग आणि प्रत्यक्ष जीवनातलं वास्तव यातील फरक समजणारा आणि कृतीतही उतरवणारा माझ्या माहितीतला हा एकमेंव सुपरस्टार. नो लपवाछपवी, जसा आहे तसा..!

स्वत:ला ते आहेत तशी प्रेझेन्ट करणारी खुप कमी माणसं असतात. बहुतेकांची धडपड आपण प्रत्यक्षात नसतो तसंच दाखवण्याची असते. त्यात काही चुकीचं असंही नाही कारण ती काळाची मागणी आहे. आतल्या वस्तूपेक्षा पॅकिंगला महत्व आल्यावर आणखी काय होणार? पण असं करून चालणार नाही. असं केल्याने तरूण वयातच डायबेटीस, ब्लड प्रेशर होणारच, हार्ट अॅटॅक येणारच. हे सर्व अनावश्यक स्ट्रेसचेच मेन इफेक्ट्स आहेत. त्यामानाने केस लवकर पांढरे होणं हे साईड इफेक्ट्स खुपच सौम्य आहेत. केस झाले तर झाले पांढरे, गेले तर गेले काळजी कशाला करायची.! “दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की, ऐसी की तैसी.. म्हणायचं” आणि दिलाचं जवाॅंपण जपायचं. ‘दिसणं’ नव्हे तर आहोत तसं ‘असणं’ महत्वाचं असतं हे उमजायचं आणि पांढऱ्या (अन् गेलेल्याही) केसांची ऐशी कि तैशी म्हणायचं आणि समोर येईल त्या परिस्थितीशी (आणि जमलंच तर ‘ती’च्याशी) जुळवून घेत ऐश करायची, काय?

-नितीन साळुंखे
9321811091

दिल्ली डायरी; दिल्लीचं श्री.अरविंद केजरीवाल सरकार..

#दिनांक_३१_आॅक्टोबर_२०१८ रोजी मी श्री. अरविंद केजरीवाल यांच्यासंबंधात लिहिलेला लेख आज पुन:प्रकाशित करत आहे-

दिल्ली डायरी; दिल्लीचं श्री.अरविंद केजरीवाल सरकार..

गेले चार दिवस दिल्लीत राजकीय क्षेत्राशी संबंधीत कामं घेऊन मित्रांसोबत आलोय. माझा हा दिल्ली मुक्काम राजकीय दृष्ट्या वेगळे अनुभव देणारा ठरला. मी शक्यतो राजकारणावर लिहित नाही आणि लिहिलंच तर ते नकारार्थीच जास्त असतं. कारण ‘वेल्फेअर स्टेट’ किंवा ‘कल्याणकारी राज्य’ ही राजकारणाची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या आपल्या देशात राजकारण/ राजकारणी आणि ते ज्यांच्या कल्याणासाठी करायचं असतं ते सामान्य जन, यांचा काहीच संबंध उरलेला नाही असं मी अनुभवांती समजतो. राजकीय व्यक्तींना कोणत्याही कामासाठी भेटणं मी शक्यतो टाळतो. राजकारण किंवा राजकीय व्यक्ती, मग ती कोणत्याही पक्षाची असो, ती कोणाचीच नसते, असं मी माझ्या अनुभवाअंती समजतो. त्यातून आपल्याकडे लोकशाहीच्या नांवाखाली राजकारण्यांचा आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा जो तमाशा चालतो, त्यातून माझं हे मत अधिकच घट्ट होत गेलंय. असं असलं तरी माझा गत चार दिवसातला दिल्ली मुक्काम मला आश्चर्याचे धक्यांवर धक्के देणारा ठरला.

भाजप, काॅंग्रेस किंवा कोणताही राजकीय पक्ष किंवा त्या त्या पक्षांशी संबंधीत कोणत्याही व्यक्तींकडे मी जरा साशंकतेने पाहातो. मला या लोकांची साधार भिती वाटते. याचा अर्थ असं नव्हे, की सर्वच वाईट आहेत. काही चांगली माणसंही यात जरूर आहेत, परंतु ती आपल्या वाट्याला काही येत नाहीत हे मात्र खरं. पण जर असा चांगला अनुभव आलाच, तर तोही शेअर करणं मला आवश्यक वाटतं. काल-परवाचीच श्री. सुरेश प्रभू आणि श्री. गिरिराज सिंह या केंद्रातील मंत्री महोदयांच्या मला आलेल्या अनुभवावर मी लिहिलेली ‘मेरा देश बदल रहा है’ ही माझी पोस्ट याच भावनेने पोस्ट केलेली होती. जे चांगलं आहे त्याचं कौतुक व्हायलाच हवं, मग ते कुणाचही असो, या मताचा मी आहे. हा आताचा हा लेखंही ही त्याच भावनेने लिहित आहे.

मी कुठेही बाहेरगांवी गेलो, की शक्यतो सामान्य माणसांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो. यात हाॅटेलचे वेटर, रखवालदार, चहाचे ठेलेवाले, दुकानदार, फेरीवाले आणि रिक्शा-टॅक्सी चालवणारे असे हातावर पोट असलेले लोक असतात. त्यांचा दिवसभरात अनेक मानवी स्वभावाच्या नमुन्यांशी संबंध येत असतो. त्या माणसांच्या आपापसांतल्या गप्पांतून या कष्टकरी लोकांना बऱ्याच गोष्टी कळत असतात आणि अशा रोजगाराशी लग्न लागलेल्या लोकांशी आपण आपला शहरी एलिटपणा बाजूला ठेवून मारलेल्या गप्पांतून, त्यांच्या रांगड्या शैलीतून त्या आपल्यापर्यंत पोचत असतात. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून त्या त्या शहरातल्या लोकांच्या विचारसरणीचा आणि वागण्याचा अंदाज लावता येतो. अशा अतिसामान्य लोकांकडून समजलेल्या गोष्टी, त्या शहरात राहाणाऱ्यांच्या मतांचा आणि भावनांचा लसावि असतो असं मी समजतो. त्यांचं बोलणं त्या शहराची नाडी परिक्षेसारखं असतं. दिल्लीच्या या चार दिवसांतही मी माझ्या सवयीला जागून हेच केलं.

या चार दिवसांतही अशा लोकांशी भरपूर गप्पा मारल्या. दिल्लीच्या हवेतच राजकारण असल्याने, विषय कुठूनही सुरु केला तरी तो राजकारणावर यायचाच. किंबहूना मलाच दिल्लीच्या एकूणच राजकारणाविषयी कुतूहल होतं, म्हणून मीच त्या विषयवार आपोआप यायचो. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचा केंद्र सरकारच्या खात्यांशी संबंध येण्याची शक्यता तशी कमीच होता आणि सहाजिकच आमच्या गप्पा दिल्ली राज्य शासन आणि दिल्ली नगर निगमच्या कारभाराविषयी झाल्या. त्यांच्याकडून जे कळलं, ते ही दिल्लीच्या ‘आप’ सरकारविषयी आजवर असलेल्या माझ्या समजाला धक्का देणारच होतं..

श्री. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या दिल्ली सरकारविषयी मला आजवर जे काही माहित होतं, ते टिव्हीवरच्या बातम्या ऐकूनच. ते ऐकून श्री. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांविषयी ‘नौटंकी है’ असंच मत झालं होतं. केजरीवालांची एकूण वागण्याची पद्धती, त्यांची देहबोली टिव्हीवरुन पाहाताना माझं हे मत गडद होत गेलं होतं. पण गेल्या चार दिवसांत दिल्लीतील सामान्य माणसांकडून त्यांच्या कारभाराविषयी जे काही ऐकलं, ते ऐकून टिव्हीवर पाहून मनात उमटलेल्या त्यांच्या प्रतिमेला उभा छेद गेला. मिडियाने दाखवलेलं सर्वच खरं नसत, हे जुनं सत्य पुन्हा एकदा नव्यानं लक्षात आलं.

मला दिल्लीत भेटलेल्या या सामान्य लोकांचं दिल्लीच्या केजरीवाल सरकारबद्दल संमिश्र मत होतं. त्यात चांगलं बोलणारे अधिक, तर त्यांच्यात खोट काढणारे कमी होतं. तसं तर कोणत्याच सरकारबद्दल १०० टक्के चांगलं बोलताना कोणीच आढळणार नाही. इथंही दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या ‘आप’च्या सरकारबद्दल लोकांची वेगवेगळी मतं असली तरी, दोन बाबतीत मात्र सर्वांचं अत्यंत चांगलं मत होतं. जवळ जवळ एकमतच होतं म्हणा ना. या दोन गोष्टी म्हणजे सरकारी शिक्षण व्यवस्था आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. त्यांच्या सांगण्याचा सारांश होता, केजरीवाल सरकार शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम काम करतंय. सरकारी शाळांचा, त्यातील शिक्षणाचा दर्जा आणि शाळेतील अवांतर शिक्षणाचा दर्जा कोणत्याही उत्तम खाजगी शाळांच्या बरोबरीने आणला आहे. किंबहूना त्याहीपेक्षा वर नेऊन ठेवला आहे. लोक खाजगी शाळांकडून सरकारी शळांकडे वळू लागले आहेत. आरोग्याच्या क्षेत्रातही केजरीवाल सरकार अत्यंत सकारात्मक काम करतंय, असंही त्यांचे मत होतं. हाॅस्पिटलात थोडीशी गर्दी असते, मात्र उपचार आणि औषधोपचार मात्र अगदी उत्तम मिळतात. “केजरीवाल सरकार अच्छी काम कर रही है, मगर उसे विरोधी पक्षवाले काम करने दे नही रहे है” हे त्यापैकी बहुतेकांचं मत होतं. राज्यस्तरावरच्या भाजप आणि काॅंग्रेस या दो प्रमुख पक्षांबद्दल तिथल्या लोकांची नाराजी जाणवत होती.

अर्थात मी ज्यांच्याशी बोललो ते चार लोक म्हणजे संपूर्ण दिल्ली किंवा संपूर्ण देश नव्हे याची मला कल्पना आहे. तरी आवर्जून मतदान करणारे सामान्य लोक कशापद्धतीने विचार करतात याचा एक अंदाज येतोच..!

माझा दिल्लीतील मुक्काम चार-पांच दिवसाचीच असल्याने, दिल्लीच्या सामान्यजणांनी केजरीवाल सरकारबद्दल व्यक्त केलेल्या मतांची मला खातरजमा करता येत नव्हती. तसं करायची माझी इच्छा खुप होती, परंतु नाहीच जमलं शेवटपर्यंत. एखाददुसरा केजरीवालांचा भक्त असू शकेल, पण मला भेटलेली सर्वच माणसं काही त्यांचे भक्त असण्याची शक्यता नाही. मला दिल्लीत भेटलेली तिकडची माणसं केजरीवाल शासनाच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल असेच भरभरून बोलत होते. ‘साब आम आदमी को बच्चों की शिक्षा और परिवार का स्वास्थ्य यही दो चिजों की जादा जरुरत रहती है. और यह चिजे बैहतर करनेवाली कोई भी सरकार हमे अपनी लगती है” हे त्यांचं सांगणं मला मनापासून पटलं.

मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचं आरोग्य ह्या सामान्य माणसाच्या दोन जिव्बाळ्याच्या गोष्टी. या दोन्ही गोष्टी उत्तम सोडा, चांगल्या हव्या असल्यातरी कमाईतला बराचसा हिस्सा खर्च होतो. हातावर पोट असणाऱ्या कष्टकरीजनांना या दोन क्षेत्रात सरकारच्या फायद्या-तोट्याचा विचार न करता उत्तम काम करणारं कोणतंही सरकार त्यांचं स्वत:चं वाटतं. वेल्फेअर स्टेट किंवा कल्याणकारी राज्यात हे अपेक्षितच असतं. दिल्ली ‘आप’ सरकारने हे करुन दाखवलंय, हे तिकडची सामान्य माणसं अभिमानाने सांगत होता. असं खरंच आपल्याही राज्यात होतंय की करुन दाखवलंची फक्त जाहिरातबाजीच चालवलीय, हे प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या आणि जाती-धर्माच्या आंधळ्या प्रेमातून बाहेर येऊन तपासणं गरजेचं आहे. तसं होत नसेल तर मग त्या लोकशाहीतील नागरीकांना ‘सुजाण’ नागरीक म्हणता येत नाही व अशा लोकशाहीलाही मग काही अर्थ उरत नाही.

दिल्लीच्या ‘आप’ सरकारबद्दल तेथील लोकांची इतर वेगवेगळी मतं होतीच, पण त्या मतांना काहीशी सहानुभुतीची किनार होती. ‘आप’चे लोक अनुभवी नाहीत, भाजप किंवा काॅंग्रेस त्यांना काम करु देत नाही, केजरीवाल थोडा सणकी है पर नोटंकी मनोज तिवारी(राज्य भाजप अध्यक्ष) और राहूल गांधीसे अच्छा है, इतर पक्षांमधे असलेले गुण-दोष ‘आप’मधेही आहेत वैगेरे वैगेरे मतंही होती. असं असलं तरी “केजरीवाल सरकार आम आदमी के लिये काम कर रही है” याबद्दल मात्र त्या सर्वांचं एकमत होतं. काॅंग्रेस अध्यक्ष श्री. राहूल गांधींच्या वैचारिक सक्षमतेबद्दल मात्र देशातील इतर बहुसंख्य माणसांसारखीच त्यांनाही शंका होती. मात्र “गर कांग्रेस नेत्ता बदलती है, तो मोद्दी को धोब्बीपछाड दे सकती है. ऐसा होना ना मुमकीन है, मगर हुआ तो लोग कांग्रेस के बारे मे सोच सकते है.” असंही त्यांचं खास दिल्ली-हरयाणवी टोनमधलं मत होतं. अर्थात हे होणं अशक्य कोटीतलं असल्याचंही त्यांनी त्यांच्या सांगीतलं. काहींना “राहूल को हल्के मे नही लेना चाहीये” असंही वाटत होतं. कसंही असलं तरी ‘आप’ सरकारबाबतीत मात्र त्यांच्या बोलण्यात जिव्हाळा जाणवत होता. ‘आप’ला मुख्यत्व्करुन काॅंग्रेस व भाजप काम करु देत नाहीत अशी त्यांचं तक्रारीच्या स्वरुपातलं मत होतं.

केंद्रातील मोदी सरकारच्या नोटबंदी किंवा जिएसटीबद्दल मात्र त्यांची काहीच तक्रार नव्हती, कारण त्यांना त्याची फारशी झळ बसलेली नव्हती. तरीही मोदी सरकारबद्दल त्यांच्या मनात सर्व काही आलवेल नाही, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. “अब दुसरा कोई नही है, इसलीये मोदी सही है” हे त्यांचं मत. दुसरा कुणीच नाही म्हणून मोदी, असा त्यांच्या म्हणण्याचा सारांश होता.दिल्लीतील असं लोकांना वाटू लागणं, ही केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपसाठी आणि सत्तेवर येवू पाहाणाऱ्या काॅंग्रेससाठी विचार करायची गोष्ट आहे.

दिल्लीच्या सामान्य माणसालाही राजकारणाची चांगली जाण असते आणि देशातील इतर प्रांतातील लोकांपेक्षा राजकारणाची ओळखंही जास्त असते. त्यांचं मत हे अनुभवावर आधारीत असतं. म्हणून मला वाटतं दिल्लीतील सामान्य माणसाने व्यक्त केलेल्या रांगड्या आणि रोकड्या शब्दातल्या भावनां या दिल्लीतील असल्या तरी त्या देशपातळीवरच्या आहेत असं समजून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने त्यांचा विचार करायला हवा..

देशभरातल्या सामान्य माणसांच्या गरजा समान असतात, तशीच त्यांची विचार करायची पद्धतीही समान असते व म्हणून त्यांची सरकारकडे बघायची दृष्टी समान असते असं म्हटलं तर चुकणार नाही. मोफत किंवा माफक दरांत शिक्षण आणि आरोग्य ह्या सर्वांसाठी आवश्यक बाबी. सामान्यांसाठी तर अत्यावश्यकच. ह्या दोन गोष्टी मोफत वा अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करुन देणारं कोणतंही सरकार सामान्यांना आपलं वाटतं. तिथे लोक पक्ष कोणता आहे याचा सामान्यजन विचार करत नाहीत. दिल्लीच्या ‘आप’ पक्षाने हे बरोबर ओळखलं आणि म्हणून तेथील लोकांना ‘आप’चं सरकार त्यांचं वाटतं. आज तरी अनेक कारणांनी दिल्ली पुरता मर्यादीत असलेल्या ‘आप’ पक्षाने जर योग्य नियोजन करुन पावलं टाकली तर आणि दिल्लीत केलेली कामं देशातील जनतेपर्यंत पोचवली तर भविष्यात हा पक्ष प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभं करु शकतो.

चांगलं, मग ते कुणाचही असो, अगदी आपल्या विरोधकाचंही असलं तरी, त्याचं कौतुक करावं हा माझा स्वभाव आहे व त्यास जागून मी काल मी मला दिल्लीत आलेल्या केंद्र शासनातल्या मंत्री पातळीवरचा सुखद अनुभव मी शेअर केला होता. तो माझा अनुभव सोशल मिडियावर तुफान व्हायरल ही झाला. या लेखात लिहिलेल्या ‘आप’ सरकारविषयी मी ऐकलेल्या दिल्लीतील लोकभावनाही असाच आश्चर्य जनक आहेत.

माझ्या पांच दिवसातल्यी दिल्ली मुक्कामावर मी लिहिलेला हा दुसरा लेख. चांगलं आहे ते लोकांसमोर ठेवावं, या भावनेनं मी मोदी सरकारातील मंत्र्यांनी मला केलेल्या सहकार्याविषयी तीन-चार दिवसांपूर्वी पहिला लेख लिहिलेला होता. ‘आप’सरकारवरचा प्रस्तुत लेखही त्याच भावनेनं लिहिलेला आहे. हे दोन्ही लेख जर कोणाला त्या त्या पक्षाच्या प्रसारचे वाटले, तर त्याला माझा काहीच इलाज नाही. मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, चांगल्याचा समर्थक मात्र नक्की आहे. जे भावलं, ते मांडायला मला आवडतं, मग ते कुणाच का असेना..! चांगल्याला दाद देणं हे माझं, तसंच हे वाचणारांचंही कर्तव्य आहे. माझी मोदी सरकारवरची पोस्ट वाचून त्यावर प्रचंड प्रतिसाद देणारे माझे नि:पक्ष मित्र, या पोस्टवरही तसाच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

मी दिल्ली सोडताना ज्या रिक्शाने निझामुद्दीन स्टेशनवर गेलो होतो, त्या रिक्शावाल्याने मला जो प्रश्न विचारला होता, त्याचं योग्य उत्तर आज तीन-चार दिवसांनीही मला सापडलेलं नाही. त्या प्रश्नाने मी अस्वस्थ आहे. आणि ती अस्वस्थता तुमच्यापर्यंत नेऊन सोडण्यासाठी तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याच प्रश्नावर आधारीत तीसरा व शेवटचा लेख येत्या काही दिवसांत मी इथे पोस्ट करेन.

-©️नितीन साळुंखे

9321811091

31.10.2018

(हा लेख लिहित असताना योगायोगाने श्री.अरविंद केजरीवाल यांची काही छायाचित्र मला कुणीतरी व्हाट्सअॅपवर पाठवली, तीच सोबत देत आहे. केजरीवालांचा पहिला फोटो मात्र नेटवरून घेतला आहे)

वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-(भाग तिसरा व शेवटचा )

मुंबईतील ऐतिहासीक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक ३६ वा.

(भाग तिसरा व शेवटचा )

आजच वयाच्या १५० व्या वर्षात पदार्पण करणारं, मुंबईच वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-

जॉनला केवळ हॉटेल बांधायचं नव्हतं, तर ते वेगळ्या पद्धतीनेही बांधायचं होत. सन १८६५ मध्ये जॉनने गासकाईनने (Gascoign) नावाच्या आर्किटेक्टला त्याच्या मनातल्या कल्पनेवरून त्या प्रकारचं हॉटेलचं डिझाईन करायला सांगितलं. गासकाईनने जॉनच्या कल्पनेतल्या पोलादी फ्रेमच्या सांगाड्यावर आधारलेलं ‘लोखंडी सांगाड्या’सारखं डिझाईन करून जॉनला दाखवलं. त्यावर चर्चा होऊन काम पुढे सरकण्याआधीच अचानक गासकाईन मरण पावला. गासकॉईनच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या कच्च्या डिझाईनवरून, मेसर्स ओर्डीश अॅन्ड ला फेबर (M/s Ordish & Le Febre) कंपनीचे सिव्हिल इंजिनिअर रोलँड मॅसन ओर्डीश (Rowland Mason Ordish) याने हॉटेलचं डिझाईन पूर्ण केलं. लंडनमध्ये १८५१ मध्ये भरलेल्या ‘द ग्रेट एक्झिबिशन’ मध्ये केवळ पोलाद आणि काचेचा वापर करुन तयार केलेल्या भव्य ‘क्रिस्टल पॅलेस’च्या डिझाईनचा आणि निर्मितीत सहभागी असल्याने, ओर्डीशला ताशा प्रकारच्या बांधकामाचा अनुभव होता ( १८५१ सालत लंडनला भरलेल्या ‘द ग्रेट एक्झिबिशन’ला जॉनने भेट दिली असण्याची शक्यता आहे आणि तिथेच त्याने पोलाद आणि काचेचा वापर करून बनवलेला क्रिस्टल पॅलेस पहिला असावा आणि त्यावरूनच जॉन वॅटसनला तशाच प्रकारची इमारत बांधण्याची कल्पना सुचली असावी. १८५१ मधे जाॅन लंडनलाच होता). ओर्डीशने हॉटेलचं डिझाईन बनवताना, हॉटेलचं छत, म्हणजे गच्ची, लंडनच्या सेंट पांक्रास (St. Pancras ) स्टेशनच्या छताच्या डिझाईनच्या धर्तीवर आखलं होत. बऱ्याच चर्चानंतर जॉन हडसन वॅट्सनने हॉटेलचा आराखडा मंजूर केला. लोखंडी फ्रेम्सवर आधारलेला पाच मजली आराखडा मंजुरीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला. पहिलं असं काही होऊ शकेल, हेच त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नव्हतं. जाॅनने चिकाटीने ते त्यांच्या गळी उतरवलं आणि अधिकाऱ्यांनी एकदाची परवानगी दिली, पण बांधकाम पूर्ण दोन वर्षांत पूर्ण करण्याची अटही टाकली..

दोन वर्षांची अट पाहून बहुदा जाॅन चरकला असावा, कारण त्याच्या मनात हाॅटेलात इंग्लंड दाखवायचं होतं. हाॅटेल बांधण्यासाठी लागणारं सारं साहित्य त्याने आपल्या मायदेशातून मागवण्याचं ठरवलं होतं आणि त्याकाळचं भारत आणि इंग्लंडमधलं अंतर, जहाजाने बांधकामासाठी वेगवेगळं साहित्य येण्यासाठी लागणारा वेळ, त्या साहित्याची जोडणी करण्यासाठी लागणारा काळ, याचं गणित दोन वर्षांत कसं बसवायचं, याची चिंता त्याला लागली असणारच. पण दोन वर्ष तर दोन वर्ष, मंजुरी मिळालीय, तर सुरुवात करु म्हणून जाॅनने कामाला सुरुवात केली.

इसवी सन १८६५ सरता सरता, जहाजाने बांधकामाचं साहित्य यायला सुरुवात झाली. आणि पुढची दोन वर्ष, म्हणजे १८६७ पर्यंत फक्त साहित्यच येत होतं. बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. जाॅनला सरकारने दिलेली मदत संपून गेली. जाॅनने सरकार दरबारी आपलं सर्व कौशल्य पणाला मुदत वाढवून घेतली आणि १८६८ येता येता सर्व साहित्य जुळणीला सुरुवात झाली..!

एस्प्लनेड हाॅटेलच्या बांधकामासाठी लागणारं एकही प्रकारचं साहित्य भारतातलं नव्हतं. ओतीव लोखंडाचे खांब, ज्यावर हाॅटेलचा सारा डोलारा पेलला आहे, ते इंग्लंडमधल्या डर्बी येथल्या फिनिक्स फांऊंड्रीतबन आणले होते. आतील बांधकामासाठी लागणारं सिमेंट आणि विटा थेम्सच्या काठवरच्या वाळुपासून बनवून आणल्या होत्या, लोखंडी पिलर्सना आधार देणारे पायचे दगड पेरिन्थहून आणले होते, तर आतल्या टाईल्स स्टॅफर्डशायरहून आणल्या होत्या. इथले बहुतेक मजूरही जाॅनने घेतले नसावेत, कारण लोखंडी पिलर्स आणि बिम्स एकमेकांना जोडण्याच्या कामाचं ज्ञान, त्यावेळी इथल्या लोकांना होतं की नाही, याबद्दल काही सांगता येत नाही..

हीॅटेलच्या प्लींटवक आलेल्या साहित्याची जुळणी सुरू झाली..हाॅटेलचा लोखंडी सांगाडा हळुहळू वर येऊ लागला आणि टिकाकार जागे होऊ लागले. एस्प्लनेडवर काहीतरी कुरुप असं जन्म घेतंय, पक्ष्याचा मोठा पिंजरा बांधायला काढलाय, मोकळ्या क्षितिजाच्या पार्श्वभुमीवर डोळ्यात खुपणारं असं काहीतरी, जे लोकांना अजिबात आकर्षित करु शकणार नाही, अशी टिका होऊ लागली. वेगळं काही तरी करु इच्छिणाऱ्यांवर अशी टिका सर्वच काळात होत असते. पण जाॅनने त्या टिकेला काहीच उत्तर दिलं नाही. त्याला आपल्या कामावर विश्वास होता.

पाहाता पाहाता हाॅटेल आकार घेऊ लागलं. जसं जसं हाॅटेलला रंग-रुप येऊ लागलं, तसं तसं लोकांच्या नजरेत आश्चर्य दिसून येऊ लागलं. दोन वर्ष सरली आणि १८७० च्या शेवटी शेवटी हाॅटेल संपूर्ण तयार झालं.

काय नव्हतं या हाॅटेलात..! त्या काळच्या युरोपीय सुखसुविधांच्या व्याख्येत बसण्यासाठी उपलब्ध असणारी प्रत्येक गोष्ट या हाॅटेलात हजर होती. तळ मजला व वरती चार, अश्या एकूण पाच मजल्यांचं भव्य बांधकाम. त्यातल्या तळमजल्याची उंजी वीस फूट होती. तर शेवटच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यांची उंची प्रत्येकी १४ फुटांची होती. हाॅटेलची लांबी १९० फूट, तर रुंदी ८० फुटाची होती. हे डायमेन्शन आजही तसंच असावं..!

तळमजल्यावर प्रशस्त दुरानं/शोरुम्स, राजेशाही डायनिंग हाॅल आणि बिलियर्ड रुम होती. पहिल्या मजल्यावरही आणखी भव्य डायनिंग हाॅल, ड्राॅईंग हाॅल आणि बिलियर्ड रुम होती. हाॅटेलाच्या वरच्या तीन मजल्यांवर सर्व मिळून एकूण १३० सेल्फ कन्टेन्ड, प्रशस्त खोल्या होत्या. त्यातल्या शेवटच्या चौथ्या मजल्यावरच्या खोल्या केवळ ‘बॅचसर्स’ आणि एकट्या-दुकट्या फिरस्त्यांसाठी रारखीव होत्या. लोखंडी खांबांवर आधारलेलं हाॅटेल असल्याने, लांब-रुंद खिडक्या ठेवणं शक्य झालं होतं. त्यामुळे, त्या काळात हाॅटेलच्या आजुबाजूला काहीच बांधकामं झालेली नसल्याने, हाॅटेलच्या खोल्यांमधे भरपूर मोकळी हवा, उजेड राखता येणं आपोआप शक्य झालं होतं. एवढं असुनही हाॅटेलच्या प्रत्येक खोलीत कापडाच्या लांब, आडव्या पंख्याची व्यवस्था केली होती. त्याकाळी वीज नसल्याने, ते पंखे छताला लटकवलेले असून, त्याची दोरी हलवण्यासाठी प्रत्येक खोलीच्या बाहेर ‘पंखवाले’ बसवलेले असत. असे पंखे आपण जुन्या काळातील ब्लॅक अंन्ड व्बाईट चित्रपटात पाहिले असतील. खोलीत युरोपिय पद्धतीचं फर्निचर व स्वच्छता गृहांमधे त्याच पद्धतीची फिटींग्स होती. एंकंदरीत वॅटसनचं हे एस्प्लनेड हाॅटेल म्हणजे, त्या काळातील युरोपिय ऐशारामाची परमावधी होती. फक्त ओर्डिशने डिझाईन केलेलं हाॅटेलचं देखणं छत प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. कदाचित पैशांची कमतरता भासली असावा..

१८७० साल संपता संपता तयार झालेल्या ह्या हाॅटेलचं उद्घाटन, १८७१ सालच्या आजच्याच दिवशी, म्हणजे ४ फेब्रुवारीला झालं आणि त्यावेळच्या ‘बाॅम्बे गॅझेट’ या वर्कमानपत्रात बातमी झळकली, “without doubt, the finest hotel in the city..built at enormous cost..on perhaps the best site in Bombay”.

त्या काळतल्या ह्या एस्प्लनेड हाॅटेलने अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान पटकावला होता. केवळ हाॅटेल म्हणून बांधण्यात आलेली ही देशातील पहिली इमारत. वाफेच्या सहाय्याने वर-खाली चालणारी लिफ्ट असलेलीही ही हाॅटेलची पहिलीच इमारत. हाॅटेलांत राहाण्यासाठा येऊ इच्छिणाऱ्या पाहुण्यांना बंदरावरुन किंवा स्टेशनातून नेण्या आणण्याकरीता, म्हणजे आजच्या भाषेत पिकअप आणि ड्राॅपची व्यवस्था असलेलं हे पहिलंच हाॅटेल. केवळ लोखंडी खांब आणि तुळयांवर आधारलेलं बांधकाम असणारा ही बहुमजली(त्या काळातल्या व्याख्येनुसार) इमारत, केवळ मानवी अधिवासाकरीता बांधलेली जगातलीही पहिली इमारत..! या पूर्वी अशा प्रकारचं बांधकाम केवळ प्रदर्शनात ठेवण्यासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी केलं गेलं होतं. न्युसाॅर्कच्या ‘सोहो’ (South of Houston Street) भागात अशा इमारती अजुनही निगुतीने राखण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती मीना प्रभूंच्या ‘न्यू याॅर्क न्यू याॅर्क’ पुस्तकात मिळते.

हाॅटेलच्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्यच नव्हे, तर आत काम करण्यासाठी वेटर आणि वेट्रेस, शेफ इत्याही कर्मचारीही युरोपातले होते. त्यावेळी गंमतीने म्हटलं जायचं, की ‘जाॅनला शक्य असतं तर त्याने युरोपातलं हवामानही ह्या हाॅटेलात आणलं असतं..’., इतकं हे हाॅटेल युरोपिय होतं..!

पण दुर्दैवाने, इतक्या मॅग्निफीशंट हाॅटेलचं स्वप्न पाहाणारा आणि ते साकारणाराही आपला जाॅन हडसन वॅटसन, हाॅटेलचा मालक, हाॅटेलचं उद्घाटन पाहू शकला नाही. १८७० सालातच त्याला तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे , सपत्निक लंडनला परत जावं लागलं होतं आणि त्या नंतरच्या दोनच वर्षात, १८७१ सालच्या मे महिन्यात तो त्याच्या कॅसल कॅराॅक गांवी मरण पावला. त्याची पत्नी हॅना पुढे चार वर्षांनी तिथेच मरण पावली. इथे भारतात त्याच्या हाॅटेलचं स्वप्न त्याचा भाऊ विल्यम वॅटसनने पूर्ण केलं. विल्यमनंतर एस्प्लनेड हाॅटेलचा व्यवसाय जाॅनचे मुलगे जेम्स प्राॅक्टर वॅटसन आणि जाॅन वॅटसन ज्युनियर पाहात होते..

पुढची पन्नास वर्ष, १९२० पर्यंत,  हे हाॅटेल, हाॅटेल म्हणून कार्यरत राहिलं. त्या काळातल्या अनेक नामवंत पाहुण्यांनी ह्या हाॅटेलचा पाहुणचार घेतला होता. १८९५-९६ च्य सुमारास जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन काही दिवस ह्या हॉटेलात मुक्कामाला होता. ह्या हॉटेलच्या प्रशस्त बाल्कनीत बसून त्याने तिथे येणाऱ्या कावळ्याचं निरीक्षण करून, भारतीय कावळ्यांवर एक सुरेख लेख लिहिला आहे, जो त्याच्या ‘फॉलोविंग द इक्वेटर’ ह्या १८९८ सलत लिहिलेल्या पुस्तकात आहे. हे पुस्तक इंटरनेटवर पीडीएफमध्ये वाचण्यासाठी उपलब्ध आहे. पुढे जगाला गवसणी घालणाऱ्या भारतीय सिने उद्योगाची सुरूवात ह्याच हॉटेलमध्ये ७ जुलै १८९६ मध्ये झाली. कारण चित्रपटाच्या तंत्राच्या शोध लावणाऱ्या साक्षात ल्युमिए बंधूनी, पॅरिसमध्ये त्यांनी चित्रपट तंत्राचा शोध लावल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात,  ह्याच हॉटेलात ७ जुलै १८९६ रोजी त्यांच्या एकूण सहा चित्रपटाचे खेळ दाखवले होते. ते चित्रपट होते, ‘Entry of Cinematographe’, ‘Arrival of a Train’, ‘The Sea Bath’, A Demolition’, Leaving the Factory’ आणि Soldiers on Wheels’.अगदी प्राथमिक अवस्थेतील प्रयोग होता तो, तरीही त्याकाळातील हे आश्चर्यच होत. हे खेळ पाहण्यासाठी प्रत्येकी १ रुपया तिकीटही लावण्यात आलं होत. 

असं हे अनेक बाबतीत ऐतिहासिक असणार आणि काही बाबतीत इतिहास घडवणारं हॉटेल, आता हॉटेल नसलं तरी, त्याच्या लोखंडी खांब आणि तुळयांच्या इमारतीच्या रूपात आजही ‘काळा घोडा’ चौकात  उभं आहे. तळ मजल्यावरचे त्याचे देखणे लोखंडी खांब अजूनही लक्ष वेधून घेतात. आज ४ फेब्रुवारी २०२० रोजी ह्या हॉटेलची इमारत आपल्या १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने ह्या हॉटेलवर ही तीन भागाची लेखमाला लिहून हॉटेल आणि ह्या हॉटेलचं स्वप्न पाहणाऱ्या जॉन हडसन वॅटसनप्रति कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली..!! 

प्रत्येक सच्च्या मुंबैकराने, ह्या वास्तूविषयी कृतज्ञ राहायला हवं..!!


-नितीन साळुंखे 

9321811091

04.02.2020

टीप-

मधल्या काळात टाटांचं ‘ताजमहल हॉटेल ’ सुरू झालं होतं,  ताजमहाल हॉटेल उभारणारे टाटा आणि जॉनच वॅटसन हॉटेल, यांची एक कथा नेहेमी सांगितली जाते, पण ती नांतर कधीतरी लिहीन. ताजमहाल नंतर रिगल जवळ ‘अपोलो हाॅटेल’ सुरू झालं होतं, गव्हर्नर विल्यम हाॅर्नबीचं निवसस्थान आणि त्यापूर्वी हायकोर्ट असलेल्या असलेल्या इमारतीत ‘द ग्रेट वेस्टर्न हाॅटेल’ सुरू झालं होतं. स्पर्धा वाढू लागली होती. जाॅनच्या एस्प्लनेड हाॅटलची मालकी ही एका हातांतून दुसऱ्या हातात जात राहिली होती. काही काळ ह्या हॉटेलची मालकी हैदराबादच्या जंग यार ह्या नवाब घराण्याकडेही होती ह्या इमारतीची नांवही नंतर दोन वेळ बदलण्यात आली होती. तो एक स्वतंत्र इतिहास असल्याने, त्यावर विस्तारभयास्तव इथे लिहिता येत नाही. त्यावर पुन्हा कधीतरी. 
आता ही इमारत पडून टाकावी की तिला तिच्या मूळ स्वरूपात आणून जातं करावी, ह्यावर दिरंगाई आणि बेपर्वाईसाठीच जास्त प्रसिद्ध असलेल्या सरकारी यंत्रणा आणि न्यायालयात लढाई सुरु आहे. ती संपेपर्यंत ही आगळीवेगळी इमारत टिकून राहो, हीच सदिच्छा..! 

संदर्भ-
प्राथमिक संदर्भ-

  1. मुंबईचे वर्णन- गोविंद मडगांवकर, १८६२
  2. मुंबईचा वृत्तांत – आचार्य आणि शिंगणे, १८८३
  3. स्थल-काल – ढाॅ. अरुण टिकेकर
  4. Fort Walk – शारदा द्विवेदी व रोहीत मेहरोत्रा
  5. Watson’s Hotel- Wikipedia

सखोल संदर्भ-

  1. वॅटसन हाॅटेल आणि हाॅटेलचा जन्मदाता जाॅन हडसन वॅटसन यांच्या माहितीचा स्त्रोत-

जाॅन हडसन वॅटसन याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतची आणि त्याने जन्माला घातलेल्या ‘एस्प्लनेड हाॅटेल’च्या निर्मिती बाबतची संपूर्ण माहिती, इंग्लंडमधल्या वॅटसनच्या Castle Carrok गांवात राहाणाऱ्या आणि तिथेच वॅटसनच्या मुलाने सन १८९६ मधे आपल्या वडीलांच्या नांवाने सुरू केलेल्या ‘वॅटसन इन्स्टीट्युट’शी संबंधीत असलेल्या मिस्टर टाॅम स्पाईट (Mr. Tom Speight) यांनी विना विलंब पाठवून दिली. त्यामुळे ती माहिती थेट वॅटसन इन्स्टिट्यूटमधून मिळालेली असल्याने, ती खरी आहे असं मानता येतं. ह्या माहितीला दुजोरा देणारी माहिती वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेलशी संबंधीत इतरही भरपूर वेबसाईटवर आहे.
वॅटसन हाॅटेलचा, कॅसल कॅराॅक गांवातील ‘वॅटसन इन्स्टिट्चूटमधे लावलेल्या मूळ पेंटीगचा फोटोही टाॅम यांनी मला मेलवर पाठवून दिला, तोच मी लेखात वापरला आहे.
अन्य वेबसाईट्स-

  • Finding Watson’s Hotel in a sleepy Cumbrian village- Deepa Krishnan
  • Indias most fragile World Heritage Building- Anshika Jain
  • Bombay Presidency- Rajesh Kapoor
  1. पहिल्या भागात आलेली मुंबईतील जुन्या हाॅटेल्सची नांवं व त्यांच्या स्थापनेच्या काळाची माहिती.
  2. Cultural Intermediaries in a Colonial City: Parsi of Bombay-c 1860 to 1921 (p 113 to p 151) written by Simin Patel, D. Phil. in Oriental Studies.
  3. Western india in 1838, Vol I (p.34-35) by Mrs. Mariana Postans- published in 1839.
  4. Gazetteer of Bombay City and Island-1909, Vol I (p33, p346) by Eduards S. .M.
  5. Handbook of Bombay Presidency with an account of Bombay City, Vol I, Second Edition (p113-114) by John Murray, 1881
  6. The Byculla Club- 1833 -1916, History by Samuel T. Shefard, 1916.
  7. Following the Equator (p345-p356) by Mark Twain, 1896.
  1. तिसऱ्या भागातला बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा उल्लेख- Indian Express, 07.10.2009,

मला आवश्यक ती माहिती मिळवून देण्यासाठी माझे मित्र व मुंबईतील इतिहास व पुरातन देवस्थानांचे अभ्यासक सईद बेग यांनी बहुमोल मदत केली आहे, त्यांचे आभार.

वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-भाग दुसरा

मुंबईतील ऐतिहासीक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक ३५ वा.

#वॅटसन्स_एस्प्लनेड_हाॅटेल..-

(एकूण दोन भागात असलेला हा लेख, अधिकच्या माहितीस्तव तीन भागात विभागावा लागला आहे. त्यातील हा दुसरा भाग )

भाग दुसरा –

#कापडाच्या_व्यापारात_असलेल्या_जॉन_हडसन_वॅटसनला_हॉटेल_बांधावं_असं_का_वाटलं_?

पूर्वी फोर्ट विभाग तिनही दिशांना मजबूत तटबंदीने बांधलेला होता. या तटबंदीतून आत-बाहेर येण्या-जाण्यासाठी तिनही दिशांना मुख्य दरवाजे होते. तटबंदीच्या आत ब्रिटिशांचं मुख्य ठाणं असलेला फोर्ट, गोदी, विविध सरकारी कार्यलयं, देशाी व ब्रिटीश व्यापाऱ्यांच्या पेढ्या-दुकानं आणि देवळं-चर्चही होती.

किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर पश्चिमेच्या समुद्राला भिडलेलं, दक्षिणोत्तर पसरलेलं लांबच्या लांब मोकळं मैदान, एस्प्लनेड होतं. समोर लांबवर पसरलेल्या मोकळ्या समुद्रातून येणाऱ्या स्थानिक व परकी शत्रुच्या जहाज-गलबतांवर सहज नजर ठेवता यावी आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर हल्ला करता यावा, यासाठी ही योजना असे. या मैदानात सैनिकांच्या पलटनीही कायम ‘अटेन्शन’मधे असत. म्हणून त्या काळच्या मराठी भाषेत या मैदानाला ‘कांपाचे(Camp) मैदान’ असंही म्हणत. आजच्या भाषेत सांगायचं तर, कुलाबा काॅजवे जिथून सुरू होतो, तिथपासून ते क्राॅफर्ड मार्केटपर्यंत हे मैदान(एस्प्लनेड) पसरलेलं होतं. आज आपल्याला माहित असलेली कुपरेज, ओव्हल, क्राॅस आणि आझाद मैदानं, हे या एस्पलनेडचेच आजचे तुकडे आहेत. इसवी सनाच्या १८६२ पर्यंत, मुख्य मुंबई ही इशी किल्त्साच्या तटबंदीच्या आत कोंडलेली होती..

आता थोडसं मागच्या काळात येऊ. १८५० पर्यंत मुंबईच्या सात बेटांमधल्या खाड्या भरून काढण्याचं काम जवळपास पूर्डीण झालं होतं. सायन नजिक चुनाभट्टी आणि माहिमच्या खाडीवरचा माहिम काॅजवे बांधून मुंबई उपनगरांशी जोडली गेली होती. १८६० च्मा दशकाच्या पहिल्या दोन-चार वर्षांतच मुंबईत रेल्वे आणि कापड गिरण्यांची पायाभरणी झाली होती. याच दशकात अमेरिकन सिव्हिल वाॅरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतने मुंबईचा कापसाचा व्यापार बहराला आला होता. व्यापार रोजगाराच्या संधींच्या शोधात मुंबईत ठिकठिकाणाहून लोकांचं स्थलांतर होण्यास सुरुवात झाली होती. बंदरातील बोटींची आवक-जावक वाढली होती. मुंबईचा गव्हर्नर परळच्या गव्हर्नमेंट हाऊसमधे राहायला गेला असला तरी, मुंबईचं मुख्य व्यापारी आणि प्रशासकीय केन्द्र अजुनही मुंबईचा किल्ला असल्याने, किल्ल्याचा तटबंदीच्या आत व्यापाऱ्यांची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची, बोटींवरच्या विविध दर्जाच्या अधिकाऱ्यांची आणि खलाशांची, सैनिकांची गर्दी वाढू लागली होती.

मुंबईत आलेल्या आणि येणाऱ्या लोकांची राहाण्याची सोय करणे, हाच मोठा प्रश्न होता. जे लोक एकटे-दुकटे येत, ते तटबंदी बाहेरच्या एस्प्लनेडमधे, म्हणजे मैदानात तंबू टाकून राहात. त्या काळी असे तंबू मुंबईत भाड्याने मिळण्याची सोय होती. काही लोक किल्ल्सातील आपल्या ओळखीच्यांच्या घरात आसरा घेत. परंतु हा मार्ग एकट्या-दुकट्याला, तो ही काही काळापुरताच शक्य होता. तंबूत किंवा कुणाच्या घरात फार काळ निवास करणं शक्य नसे. कुटुंबासाहीत येणाऱ्या लोकांची तर फारच अडचण होत असे. त्यात स्त्रियांचे हाल तर विचारूच नका, असे होत असत..!!

नेमकी या अटितटीच्वा परिस्स्तथितीत असलेली व्यापाराची संधी मुंबईतल्या उद्यमी, हुशार आणि प्रामाणिक म्हणून ख्याती असलेल्या पारशांनी ओळखली आणि मुंबईत हाॅटेल व्यवसायाची सुरुवात झाली. वरच्या काही परिच्छेदांतून उल्लेख केलेली हाॅटेलं फोर्ट, माझगांव आणि भायखळा भागात स्थापन झाली आहेत, ती नेमक्या १८४० ते १८६० या वीस वर्षांच्या काळातच आणि त्यापैकी बहुसंख्य हाॅटेलांची नावं विलायती असली तरी, त्यांची स्थापना पारशांनीच केलेली आहे. यात पालनजी पेस्तनजी पोचखानावाला हे नांव आघाडीवर होत. पोचखानावाला या नांवातला ‘पोचखाना’ हा शब्द मराठीतल्या ‘पोसखाना’ या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि पोसखाना म्हणजे जिथे माफक पैसे आकारून खाऊ-पिऊ घातलं जातं आणि राहायचीही सोय होते, अशी जागा. ‘मुंबईचे वर्णन’ या १८६२ सालात गोविंद मडगांवकरांनी लिहिलेल्या पुस्तकात हाॅटेलांसाठी ‘पोसखाना’ असा शब्द वापरलाय, तो याच अर्थाने..!! पालनजी पेस्तनजी यांचा मुख्य व्यवसाय हॉटेलांचा असल्याने, त्यांना हे आडनांव प्राप्त झालं होत.

साधारण १८६१-६२ पर्यंत मुंबईच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आतली वस्ती सहन होण्याच्या मर्यादेबाहेर गेली. किल्ल्यातल्या चिंचोळ्या गल्ल्या, माणसांची अतोनात गर्दी, मालवाहतूक करणाऱ्या बैलगाड्या, घोड्यागाड्या, स्वच्छतेचा अभाव आणि त्यामुळे होणारी रोगराई, कोलाहल गोंगाट यामुळे किल्ल्यातली घुसमट वाढली होती. एव्हाना मुंबईवरील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन, देश थेट इंग्लंडच्या राणीच्या अधिपत्याखाली आला होता. या काळात ब्रिटिशांनी त्यांच्या बहुतेक सर्व शत्रूंवर विजय मिळवला होता किंवा त्यांच्याशी करार विविध करून त्यांना दूर ठेवण्यात ब्रिटिशाना यश आलं होत. ब्रिटिशांना प्रबळ असा कुणी शत्रूच उरला नव्हता आणि म्हणून आता किल्ल्याच्या सभोवतालचा खंदक, तटबंदी आणि दरवाजे याची काहीच आवश्यकता उरली नव्हती. किल्ल्यातील वाढत्या वस्तीला आता पश्चिमेच्या तटबंदीच्या आणि उत्तरेच्या दिशेने वाट करून यायची आवश्यकता वाटू लागली होती.

अशातच दिनांक ‪२४ एप्रिल‬ १८६२ रोजी मुंबईचा गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रियर यांनी सूत्र हाती घेतली आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला तो ही तटबंदी तोडण्याचा. सर बार्टल फ्रिअर यांनी तटबंदी पाडायचा निर्णय लगेच अंमलात आणला, आणि किल्ल्यात कोंडलेली मुंबई तटबंदी बाहेरच्या अफाट मोकळ्या मैदानात आली. तटबंदी तोडल्यामुळे मोकळ्या झालेल्या मैदानाचे प्लॉट पाडून १८७० मध्ये सरकाने त्यांचा लिलाव पुकारला आणि त्यातलाच दोन एकराचा एक प्लॉट, ‘एस्पलनेड हाॅटेल’ची जन्मदाता जाॅन हडसन वॅटसन याने, ११० रुपये प्रति चौरस यार्ड ह्या भावाने विकत घेतला.

जाॅन हडसन वॅटसनचा जन्म सन १८१८ मधे इंग्लंडमधल्या कंब्रिया (Cumbria) काऊन्टीमधल्या कॅसल कराॅक या लहानशा गांवात, आई जेन हडसन व वडील जाॅन वॅटसन यांच्या पोटी झाला. आई-वजील शेतकरी होते. जाॅन त्यांचं पहिलं अपत्य. जॉनला दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. जॉनच सर्व शिक्षण त्या खेड्यातच झालं आणि शिक्षणानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत शेती करू लागला ओटा. १८४० सालात , त्याच्या वयाच्या २२ व्य वर्षी त्याच लग्न हॅना प्रोक्तर बरोबर झालं आणि कापडाचा (Drapery) व्यवसाय करावा म्हणून जॉनने पत्नी हॅना आणि धाकटा भाऊ विल्यमसोबत लंडनला निघून आला.

१८४० ते १८५३ मध्ये जॉनने लंडनमधे कापडाच्या व्यवसायात चांगलाच लैकिक आणि संपत्ती कमावली आणि अधिक पैसे कमावण्यासाठी त्याने १८५३ मधेच मुंबईला प्रयाण केलं. मुंबईत त्यावेळी देश-विदेशातून असे व्यापारी नांव आणि पैसे कमावण्यासाठी येत होते. मुंबईतला कापसाचा आणि पर्यायाने कापडाचा व्यापार तेजीत येईल अशी चिन्ह होती आणि त्याचा लाभ जॉनने घायचा ठरवलं आणि तो पत्नी आणि भावासोबत त्याच वर्षी मुंबईला निघून आला.

१८५३ ते १८६०-६१ पर्यंत जॉनने मुंबईत आपलं चांगलं बस्तान बसवलं. फोर्ट विभागातल्या मेडोज स्ट्रीट (आताचा नागिनदास मास्टर रॉड), चर्चगेट स्ट्रीट (आताचा वीर नरिमन रोड) आणि हमाम स्ट्रीटवर (आताचा अंबालाल दोशी मार्ग ) अशा तीन ठिकाणी त्याच्या तीन पेढ्या किंवा दुकानं/कार्यालय होती. ह्या परिसरातली बहुतेक दुकान/कार्यालयं बिरीतीश किंवा इतर देशातून आलेलय गोर्यांचीच असल्याने, त्या काळात हा परिसर ‘अंग्रेज बझार’ म्हणून ओळखला जायचा. जॉनने आपल्या हुशारीने आणि कल्पकतेने व्यवसायात चांगलंच बस्तान बसवलं होतं आणि तो आता एका मोठ्या, प्रशस्त जागेच्या शोधात होता. आणि अशातच १८६४ मध्ये किल्ल्याची तटबंदी पाडली गेली आणि एस्प्लनेडवर मोकळ्या झालेल्या जागेचे प्लॉट पडून सरकारने त्यांचा लिलाव पुकारला. त्यातलेच एक एक एकराचे दोन सलग प्लॉट, प्लॉट नंबर १० व ११, रुपये ११० प्रति चौरस यार्ड ह्या भावाने जॉनने लिलावात विकत घेतले. प्लॉट चार रस्त्यांच्या चौकातला असल्याने, त्यासाठी स्पर्धाही होती, पण जॉन प्लॉट घेण्यात यशस्वी झाला.

खरं तर जॉनने दोन एकराची आपल्या ड्रेपरीच्या व्यवसायासाठी म्हणून घेतला होता. पण वेगाने वाढणारी मुंबई त्याला दिसत होती. शेजारच्या जागेत आर्मी-नेव्ही इमारतीची आखणी झाली होती, रस्त्याच्या पलीकडे मुंबई विद्यापीठ आणि त्याच्या शेजारी हाय कोर्टाची इमारत येऊ घातली होती. मुंबईच्या एस्प्लनेडवर उभ्या राहू पाहणाऱ्या टोलेजंग इमारतीतून लोकांची ये-जा वाढणार होती. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आणि राहण्याचा व्यवसायात असलेली संधी हुशार जॉनने बरोबर हेरली.

पहिल्या भागात आपण पाहिलं, की त्याकाळच्या मुंबईत असलेली हॉटेल्स एकत्र भायखळा-माझगाव परिसरात होती किंवा किल्ल्याच्या तटबंदीच्या आड होती. भायखळा माझगाव भागातली हॉटेलं प्रशस्त असली तरी, मुंबईच व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या फोर्ट विभागापासून दूरच्या अंतरावर होती. तिथून किल्ल्यात ये-जा करणं गैरसोयीचे होत, त्यामुळे अगदी नाईलाज झाला तर किंवा मग जे परदेशी लोक कुटुंबासहित मुंबईत येत, तेच तिकडच्या हॉटेलांतून राहणं पसंत करीत. व्यापारी वर्ग, मुंबईत ड्युटीवर हजार होण्यासाठी आलेले ब्रिटिश अधिकारी, नौसैनिक, सैनिक इत्यादी मात्र फोर्टमधल्या दाटीवाटीने वसलेल्या हॉटेलांचा आधार घेत. ह्या हॉटेलांची उंची, सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्याच्या तटबंदीच्या उंचीपेक्षा जास्त असू शकत नव्हती, त्यामुळे त्यांना दोन किंवा तीन मजल्यांची मर्यादा होती. आडवं विस्तारू शकत नाही आणि उंचीही वाढू शकत नाही, अशी १८६२ पूवी तटबंदीच्या हॉटेलांची परिस्थिती होती. चिंचोळ्या बोळांतल्या, एकमेकांना खेटून असलेल्या दोन-तीन मजल्याच्या इमारती, माणसं-जनावराचा कोलाहल, गर्दी, अस्वच्छता इत्यादींच्या वातावरणात असलेल्या हॉटेलांचा नाईलाजाने लोक आधार घेत.

माझगाव-भायखळा आणि फोर्ट विभागातल्या हॉटेलांची आणखी एक अडचण होती. ह्या दोन्ही ठिकाणची हॉटेलं एकतर राहत्या घरात/बंगल्यात/इमारतीत किंवा कार्यालयात किरकोळ बदल करून तयार केलेली होती. केवळ हॉटेल म्हणून वापराकरिता यातील कोणतंही हॉटेल बनवलेलं नसल्याने, ती काहीशी गैरसोयीची होती. मग अशा हॉटेलांतून युरोपीय पद्धतीचं फर्निचर, युरोपीय नांव, आतल्या खोल्यांची युरोपीय लोकांना आवडेल अशी मांडणी केली जायची. तरीही इथे राहणाऱ्या लोकांना अडचण हि होतच असे. कापडाच्या व्यवसायात असलेल्या जॉन हडसन वॅटसनने ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून, हॉटेल व्यवसायात असलेली संधी बरोबर हेरली आणि लिलावात खरेदी केलेल्या जागेवर आपलं टोलेजंग दुकान न बांधता, तेवढच टोलेजंग हॉटेल बांधण्याचं ठरवलं आणि तो कामाला लागला…!

(पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात हॉटेल कसं बांधलं, त्यात काय काय सामग्री वापरली, हॉटेलमध्ये कोणत्या विशेष सुविधा दिल्या होत्या, कोणत्या गोष्टीत हॉटेल, मुंबई, देश आणि जगात पाहिलेपणाचा मन पटकावणारं ठरलं आणि त्याची आताची स्थिती, याबद्दल वाचायला मिळेल)

-नितीन साळुंखे

9321811091

01.02.2020

टीप- संदर्भ यादी शेवटच्या तिसऱ्या भागात वाचायला मिळेल.

फोटो सौजन्य इंटरनेट