गिरणगांवातल्या गिरण्या-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-

प्रस्तावना-

मुंबईची जडण-घडण कसकशी होत गेली याचा अभ्यास करतना, असं लक्षात आलं की, मुंबईला ‘मुंबई’ नांवाचं जगद्विख्यात शहर, जिथे सकाळी उपाशी आलेला कुणीही रात्री झोपताना मात्र उपाशी झोपत नाही, अशी सार्थ ख्याती असलेलं शहर बनवण्यामागे, ज्या तीन मुख्य गोष्टींचा हातभार लागला, त्या म्हणजे, एक, मुंबईचं जगप्रसिद्ध बंदर, दुसरी, सन १८५३ मधे मुंबईत प्रथमच धावलेली प्रवासी रेल्वे आणि तिसरी सन १८५४(१८५६) मधे मुंबईत प्रथमच सुरू झालेली कापडाची गिरण..! यातील बंदर (हे एकच नसून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर बंदरांची माळका होती;पण सोयीसाठी ‘बंदर’ असा एकवचनी शब्द वापरला आहे) वगळता, मुंबईची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो, रेल्वेचा आणि गिरण्यांचा. रेल्वे आणि गिरणी, या दोघींना तर मुंबईच्या गतकाळातल्या अभ्यासकांनी, जगभरातील उद्यमींन्ना आणि देशभरातील कामगारांन्ना आपल्याकडे आकर्षीत करुन घेणाऱ्या ‘हिरॉईन्स’ची’ उपमा दिलेली आहे. त्यातही सहान-मोठं करायचं तर, बंदर आणि रेल्वेच्या मागून आलेल्या ‘गिरणी’बाईंचा वाटा खूप मोठा आहे..!

या गिरणबाईंचं मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यातलं महत्व, मालवणी बोलीतल्या एका म्हणीत सांगायचं तर, ‘आगासली ती मागासली नि पाठसून ईली, ती गुरवार ऱ्हवली’ एवढं आहे..! म्हणजे रेल्वेबाई जरी मुंबईत पहिल्या अवतरलेल्या असल्या तरी, मुंबईची खरी भरभराट झाली, ती तिच्या मागोमाग मुंबईत आलेल्या गिरणबाईंमुळे..! मालवणी बोलीतल्या म्हणतील ‘गुरवार’ या शब्दाचा अर्थ ‘गरोदर’ असा आहे. स्त्रिच्या गर्भार राहाण्याला ‘भरभराट’ असाही एक अर्थ गतकाळात होता आणि मुंबईल्या गिरणधंद्याचा अभ्यास करताना, तो किती योग्य होता, हे देखील माझ्या लक्षात येत गेलं..! मुंबईत गिरण्या आल्या नि पुढच्याकाळात, तिच्या पूर्वी अवतरलेल्या बंदर आणि रेल्वेनी तिला पुरक अशी भुमिका घेतली. १८५४(१८५६) ते १९८२ या जवळपास सवाशेवर्षाच्या कालावधीत, मुंबईच्या नि पर्यायाने देशाच्याही अर्थसत्तेवर अधिराज्य गाजवलं ते गिरण्यांनी, निर्विवाद हे मला समजलेलं सत्य आहे..!

मुंबईत अजुनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत असताना, मुंबईच्या जडण-घडणीत अत्यंत महत्वाचं स्थान असलेल्या गिरणधंद्याकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं होतं. कीं बहूना, मीच तिकडे लक्ष दिलं नव्हतं. मला तो विषय थोडा किचकट वाटत होता. त्याच माझ्या स्मृती साधारण १९७०-७५ नंतरच्या, आणि त्याही मुख्यत्वेकरून संप-दंगली-जाळपोळीच्या असल्याने, मला तो विषय अभ्यासावा, असं मात्र वाटलं नव्हतं. माझ्या या दृष्टीकोनात बदल झाला तो, मला गुरुस्थानी असलेल्या, ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षक, आठ पुस्तकांचे लेखक आणि जागतिक सिनेमावर अधिकारवाणीने भाष्य करणाऱ्या श्री. अशोक राणे यांच्यामुळे..!

त्याचं झालं असं, अशोकजींनी दोन वर्षांपूर्वी ‘एक होतं गिरणगांव’ या विषयावर डॉक्युमेंटरी तयार करण्याचा संकल्प सोडला नि कामाला सुरुवात केली. काम तसं आव्हानात्पक..! म्हणजे किती, तर एक वेळ पुराणकाळातील रामाला शिवधनुष्य पेलवणं तुलनेनं सोपं गेलं असावं, पण राणेसाहेबांनी स्वीकारलेलं हे आव्हान पेलणं अतिशय कठीण आणि घाडसाचं. प्रचंड आणि काटेकोर संशोधन त्यासाठी आवश्यक. ते काम राणेसाहेबांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने सोपवलेलं. त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली. अर्थात, राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीचा विषय ‘गिरणगांव’ हा असला तरी, ते ‘गांवं’ वसायला निमित्त झालेल्या ‘गिरणी’धंद्याचा कालावधी जवळपास सवाशे वर्षांचा आणि मला तर त्यातलं काहीच माहित नाही. त्यामुळे त्याचा मला अभ्यास करणं आलंच. अगदी ‘अ, ब, क, ड,…’ पासून सुरूवात..!

डॉक्युमेंटरीची सुरुवात करताना त्गिरणगांव पाहिलेल्या, अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखतीतून. त्यात प्रत्यक्ष गिरण्यांमधे काम केलेले काही कामगार, काही कामगार नेते, त्याकाळातल्या कामगार संघटनना नि त्यातून जन्मलेल्या राजकीय पक्षांचा उदयास्त अनुभवलेले-अभ्यासलेले काही अभ्यासक, गिरणगांवतले दुकानदार, ज्वेलर्स, खानावळवाल्या स्त्रिया, डॉक्टर्स, तसेच गिरणागांवात ज्यांचा जन्म आणि पुढचा उत्कर्ष झाला असे खेळाडू, नेते, अभिनेते असे सर्व प्रकारचे लोक होते. त्या मुलाखतींच्या दरम्यान माझ्यासमोर गिरण्या, गिरणगांव आणि गिरणगांवकर, त्यांचे आपापसातले संबंध, संघर्ष नि संकर उलगडत गेले आणि राणेसाहेबांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचं मला खऱ्या अर्थानं भान आलं.

ज्या गिरण्यांमुळे गिरणगांव वसलं आणि अगदी इंग्लंडातल्या मॅंचेस्टर, लॅंकेशायरसोबत स्पर्धा करु लागलं आणि त्यातून मुंबई नांवाचं लहानसं बेट जगद्विख्यात झालं, त्याचा कॅनव्हास किती प्रचंड मोठा नि असंख्य कंगोरे असलेला आहे, याची मला जाणीव झाली आणि मी भानावर झालो..! जो विषय मला कधीच आकर्षित करुन घेऊ शकला नाही, त्याचा इतिहास एकाचव्ळी इतका रोमांचक, रोचक, मनोरंजक नि थरारकही असेल असं वाटलं नव्हतं..!

आता मात्र मी मांड ठोकून अभ्यासाला बसलो..! ‘कोविड-१९’च्या लाटांमुळे एप्रिल २०२० ते अगदी आताआतापर्यंतच्या कालावधीत, आम्ही, राणेसाहेबांची टिम, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन शुटींग करण्यामधे फारशी काही प्रगती करु शकलो नव्हतो. त्यामुळे आयताच उपलब्ध झालेला वेळ मी गिरण्याचा अभ्यास करण्यात घालवला.

अभ्यास करायचा, तर समोर पुस्तकं हवीत. मराठीत काही थोडकी पुस्तकं आणि गिरणगांवच्या पार्श्वभुमीवर बेतलेल्या काही कादंबऱ्या वगळल्या, तर गिरण्या आणि त्यामुळे गिरणगांव कसं वसत गेलं याचा वास्तव तपशिल देणारी पुस्तकं नाहीतच;किंवा असल्यास त्याची माहिती माझ्यापर्यंत किंवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मराठीतली मला उपलब्ध झालेली ती सर्व पुस्तकं/कादंबऱ्या मी वाचून काढली. इंग्रजीत मात्र गिरण्या, गिरणगांव, गिरणगांवातली लोकवस्ती व त्यातून उदयाला आलेली तिकडची वैषिष्ट्यपूर्ण संस्कृती इत्यादी विषयांवर, विषयवार केलं गेलेलं बक्कळ लिखाण उपलब्ध आहे. अर्थात यासाठी सर्वविश्वव्यापी इंटरनेटला शरण जावं लागलं. इंटरनेटवर तर ‘अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील दो करांने’ अशी अवस्था व्हावी एवढं विपूल ज्ञानभांडार उपलब्ध आहे. त्यातलीच काही पुस्तकं निवडून ‘ग म भ न..’ गिरवायला सुरुवात केली..!

मी वाचनाची सुरुवात करताना, मुंबई शहरात गिरण्या कसकश्या जन्माला येत गेल्या, त्या कोणत्या परिस्थितीत जन्माला आल्या, त्या कुठे जन्माला आल्या आणि त्यामागची कारणं काय होती इत्यादी विषयाला प्राधान्य दिलं. मुंबईतल्या गिरण्यांचा विविध अंगानी अभ्यास शब्दांकित केलेली शेकडो पुस्तकं आहेत. त्यातली काहीच माझ्या वाचनात आली आणि माझ्या त्या वाचण्यातून मला आकलन झालेला त्यातलाच काही भाग, जो केवळ गिरणगावाशी संबंधित आहे, मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे..!

पुढचेही विषय आहेत, जसे, गिरण्यामंधे काम करायला देशभरातून आलेले चाकरमानी, त्यांची इथे येण्यामागची कारणं, त्यांचं राहाणं-वागणं, त्यांनी आपल्यासोबत मुंबईत आणलेल्या, त्यांच्या त्यांच्या मूळ प्रांतातल्या संस्कृती, प्रथा-परंपरा-भाषा, जेवणा-खाण्याच्या पद्धती, त्यांचे खेळ आणि त्यांचा मुंबईतल्या गिरणगांवात झालेला मनोहारी संगम, त्यातून उगम पावलेले व पुढे जगभर प्रसिद्ध पावलेली ‘गिरणगावी संस्कृती’, त्यातूनच निर्माण झाले गिरणगांवातले गणेशोत्सव, दहिहंडी आदी सण, गिरणी कामगारांच्या युनियन्स, संप आणि त्यातून होणारे राजकारण, त्यांचे आपापसातले संघर्ष इत्यादी. त्याचाही अभ्यास सुरू आहे आणि हे विषय राणेसाहेबांच्या डॉक्यमेंटरीत अधिक विस्ताराने आणि राणेसाहेबांच्या ‘चित्रपटातून गोष्ट सांगण्याच्या’ कौशल्यामुळे अतिशय सुंदरपणे उलगडत जाणार आहे. आणि ते पुढच्या काही काळात आपल्यासमोर येणारच आहे. इथे मात्र या दोन-तीन भागांच्या लेखमालेत माझा मुख्य जोर राहाणार आहे तो, या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, मुंबईतल्या गिरण्या कसकश्या अस्त्तित्वात येत गेल्या, ते सांगण्यावर..!

कोणतीही कृती करण्यामागे काहीतरी निश्चित उद्देश असले पाहिजेत, असं म्हणतात;तसे ह्या माझ्या लिखामागेही माझे दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे, स्मरणरंजन..! मला स्वत:ला माझ्या भुतकाळातल्या स्मृतींमधे अधुनमधून रमायला आवडतं. त्यात गिरण्यांचं गिरणगांव बघत मी लहानाचा मोठा झालेलो. श्री. अशोक राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने, मला त्या गिरण्यांच्या जन्माची कहाणी अभ्यासण्यासाठी अनायासे भुतकाळात फेरफटका मारता आला आणि स्मरणरंजन करता करता, मला पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावं. दुसरा उद्देश म्हणजे, गिरण्यांचा वैभवशाली इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवता यावा. जी पिढी साधारण १९९० नंतर जन्मली आहे, जिला १९८२ साली झालेला गिरण्यांचा अखेरचा व अजुनही अधिकृरित्या मागे न घेतलेल्या संपाची तुटक कहाणी वगळता इतर काही माहिती असण्याची शक्यता नाही, तिला गिरणगांवचं वैभव समजावं, हा..!

माझ्या या देन-तीन भागांच्या लेखात काही माहिती सुटलेली असू शकते. काही पुस्तकं, जी मला उपलब्ध होऊ शकली नाहीत, ती माझ्या वाचनातून सुटलेली असू शकतात. पुढे-मागे ती पुस्तकं उपलब्ध झाल्यास, ती माहिती जोडून हेच लेख सुधारीत स्वरुपात पुन्हा लिहेन..! पण, त्यामुळे या लेखमालिकेतील लेखातल्या माहितीत फारसा फरक पडणार नाही;झालंच तर त्या लेखात जास्तीची माहिती येईल..!

आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर, मुख्य विषयाचं सुतोवाच करतो नि थांबतो.

तुम्हाला माहितेय, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत किती गिरण्या होत्या, ते? एकूण १०३..! होय. याच त्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवणाऱ्या १०३ तालेवार बहिणी. त्यातल्या तीन गिरण्या, मुंबईचं तेंव्हाच विकसित झालेलं एकुलतं एक उपनगर ‘कुर्ला’ येथे होत्या. म्हणजे मुख्य मुंबई शहरात, ज्याची पूर्वीपासून आतापर्यंतची ओळख, बॉम्बे(मुंबई) आयलंड सीटी’ अशीच आहे, एकूण १०० गिरण्या होत्या..!

त्या शंभर गिरण्यांमधल्या ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. गिरणगांव म्हणजे, साधारणत: पूर्वेला माजगाव-शिवडी ते पश्चिमेला महालक्ष्मी-वरळी आणि उत्तरेला परळ-लोअर परळ ते दक्षिणेला भायखळा, एवढा साधारणत: ३५-४० किलोमिटर चौरस क्षेत्रफळाचा भूभाग.

आणि ह्या गिरणगांचं धगधगत हृदय म्हणजे, लालबाग मध्य कल्पून काढलेल्या घोडपदेव, डिलाईल रोड परळ आणि शिवडीला स्पर्ष करत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघाच्या आतला परिसर. ह्या साधारण, उभ्या-आडव्या ४-५ किलोमिटर अंतराच्या व्यासात, म्हणजे ‘गिरणगांवाच्या हृदयात’, गिरणगांवातील एकूण ७० पैकी जास्तीत जास्त गिरण्या होत्या.

त्यांचीच कहाणी पुढील भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

29.05.2021

हिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती?

माझाच एक जुना लेख पोस्ट करतोय. त्यावेळी पुण्यात घडलेल्या श्रीमती घोलेबाई-यादव प्रकरणावरून व्यथित होऊन मी हा लेख लिहिला होता, हे लक्षात असु दे. विषय धर्मसंबंधीत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचावा ही विनंती. ही माझी मतं आहेत, ती आपल्याला स्विकारणं बंधनकारक नाहीत.

हिन्दू धर्म की हिन्दू संस्कृती?

आपल्या सर्वच देशात सध्या हिन्दुत्वाची चर्चा सुरु आहे. मी ही हिन्दुत्वाचा पुरस्कर्ता आहे. मात्र आज मी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि आज गोॅधळलेल्या मनस्थितीत असल्याने, उद्याचे हिन्दूत्वाबद्दलचे माझे विचार नेमके कसे असतील, हे आजच सांगणं अवघड आहे. मला कल्पना आहे, की माझा हा लेख वाचून माझे अनेक मित्र, परिचितांचं माझ्याबद्दल वेगळं मत होण्याची किंवा माझ्याकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी बदलण्याची शक्यता आहे. याची खरी-खोटी कल्पना असुनही माझ्या अल्पशा अभ्यासातून निर्माण झालेल्या विचारांशी मी प्रामाणिक राहाणाचं ठरवून हा लेख लिहित आहे. कृपया आपण माझं म्हणणं तटस्थ बुद्धीने समजून घ्यावं अशी विनंती मी सुरुवातीलाच करतो.

मला स्वत:ला हिन्दूत्व हे धर्मापेक्षा एका प्राचीन समृद्ध संस्कृतीशी संबंधीत विषय आहे असं वाटतं. हिन्दूत्व हे धर्मापेक्षा अधिक विशाल, व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. हिन्दू ही संस्कृती आहे, जीवनशेली आहे. संस्कृती म्हटली, की तिचं बदलतं राहाणं आणि म्हणूनच जिवंत राहाणं मान्य करावं लागतं. जगातील इतर प्राचीन संस्कृती परचक्राच्या वादळात पार नाहीश्या झाल्या, मात्र सर्वात जुनी असणारी त्हिन्दू संस्कृती ही अनेक परकीय/परधर्मिय आक्रमणं पचवून आजंही जिवंत आहे, ती केवळ कालानुरुप बदलल्यामुळेच. परधर्मियांची शेकडो वर्षांची आक्रमणं झेलत, पचवत, वर त्याला आपलंच नांव देत अद्यापही जिवंत असलेली ही जगातील एकमेंव संस्कृती. उदाहरणच द्यायचं झालं, तर मुसलमानी आक्रमकांकडून तिने बुरखा घेतला आणि त्याला ‘डोक्यावरील पदराचं’ आपलं असं खानदानी रुप दिलं, तर ख्रिस्त्यांच्या ‘माऊंट मेरी’ला ‘मोत माऊली’ बनवून आपल्या देवता मंडळात बसवलं. स्वतंत्र धर्म स्थापन करणाऱ्या गौतम बुद्धाला तिने चक्क विष्णूचा नववा अवतार मानलं. आज सरसकट सर्व देवांना लावत असलेली ‘भगवान’ ही उपाधी सर्वप्रथम गौतम बुद्धांसाठी जन्माला घातली गेली होती. ही लवचिकता, सहिषणूता आणि स्विकारर्हता संस्कृतीचा अंगभूत गुण असतो.

अशा आपल्या या महान हिन्दू ‘संस्कृती’ला ‘धर्मा’चा वेष हा नंतर कधीचरी, राजकीय गरज म्हणून चढवला गेला. ‘संस्कृती’चा ‘धर्म’ झाला आणि संस्कृतीचा प्रवाह हळू हळू सुरु संकोचू लागला. आता तर ‘हिन्दू धर्म’ अशी ओळख सर्वच स्तरावर दृढ होऊ लागली आहे. आणि एकदा का संस्कृतीचा धर्म झाला, की मग तिच्यातली लवचिकता संपून ती कठोर, हार्ड होते. तिच्यातली आदानप्रदानाची क्षमता संपून तिचं जीतेपण नाहीसं होतं. ती नियमांच्या कडक बंधनात आणि काटेकोर कृत्रीम आचरणात आवळली जाते. तिचं वाहत्या नदीचं स्वरूप लोप पावून, ती एक डबकं बनून राहाते. तिचा क्षय होणं हे क्रमप्राप्त होतं. हिन्दू संस्कृतीचा धर्म बनण्याच्या या टप्प्यावर मला हिच भिती वाटतेय.

एकदा का धर्म म्हणून एखादी संस्कृती मान्य पावू लागली, की धर्माचे म्हणून जे काही नियम असतात, ते तिला लागू होऊ लागतात. हिन्दूना धर्माची व्याख्या लावून, तो हिन्दू हा धर्म आहे का, हे तपासणं मग आवश्यक होऊ लागतं. मी तोच एक प्रयत्न या लेखात करणार आहे.

कोणत्याही धर्माचे ‘आचार’ आणि ‘विचार’ हे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. या दोन स्तंभांना ‘आचारधर्म’ आणि ‘विचारधर्म’ असं म्हटलं जातं. कोणत्याही धर्माची व्याख्या या दोन मुद्दयांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आचारधर्मात मुख्यत्वेकरून नजरेस दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. यात केशभुषा-वेषभुषा, लग्न-जन्म-मृत्यू समयीचे संस्कार आणि पद्धती, संपत्तीचे वाटप, वारस, प्रार्थनेच्या पद्धती व वेळा, उपासाच्या पद्धती आणि ते किती व कोणते करावेत याचे नियम वैगेरे वैगेरे आणि अशा अनेक गोष्टींचं नियमीकरण केलेलं असतं. थोडक्यात एखाद्या विवक्षित धर्माच्या लोकांनी समाजात कसं वागायला हवं, याची एक चौकट आखली गेलेली असते. या चौकटीला फारशी लवचिकता नसते.

धर्माच्या विचारधर्म या दुसऱ्या व नजरेस न पडणाऱ्या भागात ईश्वर, त्याचं स्वरुप, स्वर्ग-नरक, मृत्यूनंतरचं जीवन, पुनर्जन्म, आत्मा आहे किंवा नाही, सृष्टीचं निर्माण व अंत इत्यादी पारलौकीक बाबींचा विचार केलेला असतो. कुठल्याही धर्माचा डोलारा उभा असतो, तो या विचारांवर. आचार हे त्याचे दृष्य स्वरुप मात्र असतं.

हिन्दु संस्कृतीचा धर्म होण्याच्या टप्प्यावर, मी या संस्कृतीचा पुरस्कर्ता असूनही, मला ती ‘धर्मा’च्या व्याख्येत बसते का, हे तपासावंसं वाटू लागलं. तशी सुरुवात केली आणि सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे मी आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. उद्या माझे या संदर्भातले विचार नक्की कसे राहातील, हे आत्ताच सांगणं मला अवघड आहे.

उभ्या आडव्या पसरलेल्या आपल्या या देशात बहुसंख्य हिन्दू असुनही धर्म म्हणून ‘आचारा’त इतर प्रमुख धर्मांप्रमाणे कुठेही युनिफाॅर्मिटी दिसत नाही. हिन्दूंमधील अनेक जाती-पंथानुसार लग्न-जन्म-मृत्यू यांच्या प्रथा व पद्धती यांत भेद आहे. सण कोणते साजरे करावेत याविषयी साधारण समानता असली, करी ते कसे साजरे करावेत याविषयी वेगवेगळेपण आहे. देशातील विविध प्रांतांनुसार/जातींनुसार वेषभुषेत आणि केशभुषेतही तर आश्चर्य वाटावं इतकं वैविध्य आहे. जगभरातले मुसलमान स्त्री-पुरुष जसे सारख्याच वेषात आणि केशरचनेत, सणांत आणि त्यांच्या साजरीकरणात व इतर धार्मीक प्रथांत सारखेच असतात, तसं काही हिन्दूंमधे आढळत नाही. उलट विविधता ही हिन्दूसंस्कतीची ओळख आहे व इतकी विविधता असूनही ती एकच म्हणून हजारो वर्ष ओळखली जाते. ‘आचारधर्म’ या कसोटीवर हिन्दूत्व हे धर्म म्हणून टिकत नाही असं मला वाटतं. मग हिन्दूत्वाला धर्म म्हणण्याच्या नादात, आचाराची बंधनं येणार का आणि आपण ती मानणार का, हा पुढचा प्रश्न मला पडतो आणि माझं गोंधळलेपण वाढतं.

धर्माचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे ‘विचार’. हा तर धर्माचा गाभा. जगातील इतर प्रमुख धर्मांमधे ‘ईश्वर’ किंवा ‘प्रेषित’ ही कल्पना सुस्पष्ट आहे, त्यात फारसे मतभेद नाहीत. धर्मग्रंथाबातही मतभेद नाहीत. ईश्वराला आणि धर्मग्रंथाला मानणं अनिवार्य असतं आणि कोणत्याही परिस्थितीत देवाची वा धर्मग्रंथाची अवहेलना वा समिक्षा खपवून घेतली जात नाही. हिन्दूंसंस्कृतीतली देवाची संकल्पना मात्र निराकार ते साकार आहे, आहे आणि मुळीच नाही, असल्यास कोणता देव, आस्तिक की नास्तिक, मृत्यूनंतरच जीवन या विषयांवर एकमत नाहीच. ईश्वर आहे असं मानण्याचं स्वातंत्र्य आपल्याला हिन्दू संस्कृती देते तसंच तो न मानण्याचंही स्वातंत्र्य हिच संस्कृती देते. देवाला मानणाराही हिन्दू म्हणून ओळखला जातो तसंच देवाला शिव्या देणाराही, तो नाहीच असं मानणाराही हिन्दूच असतो. तसाच हिन्दूंनी कोणता ग्रंथ ‘धर्मग्रंथ’ मानावा हा ही प्रश्नच आहे. मात्र हिन्दू हा एक धर्म आहे असं मान्य केलं, की मग एकच एक असा देव आणि एकच एक असा धर्मग्रंथ मानणं बंधनकारक होणार आणि मग नक्की कोणता देव आणि कोणता धर्मग्रंथ मानावा, देवाची पुजा पद्धती कशी असावी, याचे नियम अटी होणार का आणि ते कोण करणार आणि ते सर्वांना मान्य होणार का,असे अनेक प्रश्न, उपप्रश्न निर्माण होतात आणि माझा गोंधळ आणखी वाढतो.

थोडक्यात आचार आणि विचार या धर्माच्या मुख्य कसोंट्यांवर, इतर रुढं धर्मांप्रमाणे हिन्दुत्व ‘धर्म’ म्हणून माझ्यासारख्याला गोंधळात टाकतो असं मला वाटतं.

‘आॅनर किलींग’च्या देशभरात घडणाऱ्या घटना असोत की नुकतंच घडलेलं पुण्यातलं खोलेबाई-यादव प्रकरण असो, या घटनांना व्यथित होऊन मला हिन्दूत्वाचा पुनर्विचार करावासा वाटला. हिन्दूंव्यतिरीक्त इतरांच्या दृष्टीने खोलेबाई आणि निर्मला यादव, या दोघीही हिन्दूच. मलाही असंच वाटत होतं. हे सर्व हिन्दूच असल्याचं मात्र ते त्यांनाच मान्य नसावं, असं त्यांनी उचललेल्या पावलांवरून दिसतं. त्या दोघी स्वत:ला हिन्दू समजतात की नाही हे कळायला काही मार्ग नाही, परंतू त्यांच्या त्यांच्या जातीच्या आहेत हे मात्र मान्य करतात. दोघी हिन्दू असूनही त्यांची झालेला जातीची ही विभागणी आणि उच्च-निचतेची भावना इतकी तीव्र आहे, की एकमेकांचा एकमेकांच्या नाईलाजाने झालेला वावरही त्या खपवून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी एकमेकांच्या उपास्य दैवतांतही उच्च-निचतेची समिक्षा केली असं पेपरमधे वाचनात आलं. मग धर्माचा गाभा असलेला ‘देव’ नक्की कोणता, याचंही सर्वांना मान्य होईल असं समाधानकारक उत्तर हिन्दू संस्कृतीला धर्म म्हनणारांनी दिलं पाहिजे.

हिन्दूत्वाला धर्म मानलं, की मग माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहातो तो म्हणजे, परधर्मातील काही लोकांना हिन्दू धर्म स्विकारावासा वाटला, तर ते हा धर्म कसा स्विकारणार, हा..! जेंव्हा असा एखादा हिन्दू धर्मात यायचं म्हणतो, तेंव्हा याला नेमक्या हिन्दूंच्या कोणत्या जातीत स्थानापन्न केलं जावं हे कसं ठरवणार, हा प्रश्न माझ्या मनात लगेच उभा राहातो. कारण जाती व्यवस्था ही हिन्दुंची ओळख आहे, हे आजही दिसणारं चित्र आहे. जातीव्यवस्था कायद्यातून गेली असली तरी, बहुतेकांच्या मनात दिवसें दिवस घट्ट होत चालली आहे, असंच चित्र दिसतं. समजा हिन्दू धर्मात यावसं वाटणाऱ्या त्या एखाद्याला ज्या जातीत स्थानापन्न केलं जाईल, त्या जातीतले लोक त्याला स्विकारतील का, त्यांनी स्विकारलं तरी त्या जातीतलं त्याचं आणि त्याच्या मुलाबाळांचं नेमकं स्थान काय राहील, इतर जातीतले हिन्दू त्याला कसं वागवतील आणि त्याच्याशी कसं वागतील, हे व असे असंख्य प्रश्न मनाला छळू लागतात. लांछनास्पद असली तरी नंतरच्या काळात कधीतरी उदयाला आलेली जातीसंस्था आपल्या संस्कृतीचा भाग झाली आणि तिने हिंन्दूंचं अतोनात नुकसान केलं. हिन्दूंमधेच भिंती उभ्या केल्या आणि हिन्दू म्हणवणाऱ्या धर्माचा एक मोठा हिस्सा डाॅ. बाबासाहेबांसोबत बाहेर पडला. पुन्हा तशी परिस्थिती येणार नाही असं सांगता येत नाही. जातीविरहीत हिन्दू धर्म हिन्दूंना मान्य आहे का, असल्यास मग हिन्दूत्वाला धर्म म्हणनारे जातीसंस्थेचं उच्चाटन, प्रत्यक्षातलं आणि मनातलंही, कसं करणार, असे पुढचे प्रश्नही लगेच समोर उभे ठाकतात.

हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने वर उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. या लेखाचं प्रयोजन केवळ यासाठीच आहे. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे..!

-नितीन साळुंखे
9321811091

आडनांवं आणि जात; ही जोडी फोडणं आवश्यक आहे-

आडनांवं आणि जात; ही जोडी फोडणं आवश्यक आहे-

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं काम असतं, त्याच्या नांवाची पाटी वाचली आणि तो जर नांवावरून आपल्यापैकीच्या जातीचा वाटला, तर कुठेतरी साॅफ्ट काॅर्नर मिळणार अशी आशा निर्माण होते. अर्थात सरकारी कामं नियम आणि ‘काय(तरी)द्या’नं होत असल्यामुळे, प्रत्येक जात कामास येतेच असं नव्हे, पण आपला काॅन्फिडन्स वाढतो किंवा जातभिन्नत्वामुळे कमी होतो नक्की.

आपल्या देशातली आडनांवं हे जात ओळखण्याचं आधार कार्ड आहे असं माझं मत आहे. आडनांव सांगीतलं, की समोरच्याच्या चेहेऱ्यावरच बदललेले सुक्ष्म भाव, आपुलकीचे किंवा उच्च/नीचतेचे, बरंच काही सांगून जातात. अर्थात माझ्या निरिक्षणाशी सर्वजण सहमत असतील असं नव्हे किंवा मनातून सहमत असुनही उघडपणे तसं म्हणणार नाहीत याची मला कल्पना आहे. यात त्यांचा दोष नाही. आपल्याकडचं वातावरणच तसं आहे. उघडपणे एका तत्वाचा पुरस्कार करायचा आणि खाजगीत मात्र नेमकं त्या तत्वाच्या विरुद्ध वागायचं. सर्वजजण असं करतात असं मला म्हणायचं नाही, पण बहुतेकजण, त्यातही सवर्ण जास्त, असं वागतात, असं अनुभवायला येतं

स्वत:च्या जातीसहीत इतर कोणत्याही जातीला नाकारणारे नरपुंगव जर आपल्या देशात खरोखरंच असते, तर मग जातीच्या नांवाखाली लाखों लोकांची संम्मेलनं, निदर्शनं, मोर्चे यशस्वी होताना दिसले नसते. पण तसं होताना दिसतं, सातत्याने सर्वच जातीत होताना दिसतं, याचा अर्थ जात कोणालाच सोडायची नाही असाच होतो माझ्या मते. आडनांवं पाहून आपल्याला त्या त्या विवक्षित जातीच्या कार्यक्रमाची निमंत्रणं फेसुकसारख्या माध्यमांवर येताना म्हणून तर आढळतात. तरुण, उच्च शिक्षित पिढीचा यातील सहभाग हा आश्चर्यकारक आणि म्हणून समाजाच्या दृष्टीने चिंताजनक ठरतो असंही मला वाटतं. तरुणाचं जातीप्रती जागृत असणं हे आरक्षणाशी निगडीत आहे नक्की. आरक्षणही ठेवायचं आणि जाती निर्मुलनाच्या गप्पा मारयच्या, आणि ह्या दोन्ही विरोधी गोष्टी कशा काय एकत्र जमवायच्या ते मात्र सांगायचं नाही. अर्थात आरक्षण हा संपूर्ण वेगळा मुद्दा असल्याने याचा इथं केवळ उल्लेख केला आहे.

काही आडनांव एकापेक्षा अधिक जातीत सारखीच सापडतात. अशा आडनांवाच्या दोन अनोळखी व्यक्ती काही कारणाणं बोलताना आढळल्या, तर अशावेळी त्या एकमेंकाशी अत्यंत सावधगीरीने बोलताना आढळतात. दोन माणसं म्हणून त्या बोलतच नाहीत. समोरच्याचा जातीचा अंदाज घेत (कारण आपण जातीभेद मानत नाही ही आपली सार्वजनिक भुमिका असते ना..!) संभाषण चालू राहातं, पण त्यात जान नसते. पण एकदा का कळलं, की समोरची व्यक्ती आपल्याच जातीची आहे, की मग मात्र जीवाशिवाची गाठ पडल्यासारखं वाटतं आणि मग ते दोघं मिळून आपलं आडनांव इतर जातींनी ‘उचलल्यामुळ’ आपलं कोणं आणि परकं कोण हे कळतच नाही हो, असं चुकचुकत चर्चा पुढे रंगते. पण तेच जर आडनांव सारखं परंतू जात भिन्न असेल, तर मात्र ते संभाषण वेगळ्या पद्धतीनं होतं हे अनुभवणं माझ्याही वाटेला अनेकदा आलेलं आहे.

माझं काही कामानिमित्त अनेकांच्या घरी जाणं होतं. मला इथं कबूल करायला आवडेल, माझे काही मित्र खरंच जातीच्या पलिकडे जाऊन निखळ माणूस बनलेत किंवा ते तसे बनलेत म्हणून माझी त्यांच्याशी जमतं, हे कळत नाही. परंतू मला काही आणसं अशीही भेटतात, ती जातीच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. काही वेळा अश्यांच्या घरी जाणं झालं, तर घरच्या ज्या सदस्यांच्या परिचयाने मी त्यांच्या घरी गेलेलो असतो, ते त्यांच्या घरच्यांशी माझा परिचय करून देतात. या प्रसंगी सर्वांच्याच नसली, तरी माझं आडनांव ऐकल्यानंतरची काही सदस्यांची देहबोली ही पुरशी सुचक असते. शब्दांपेक्षा देहच जास्त बोलतो अशावेळी. अभावाने, परंतू हा अनुभव येतो हे नक्की. असाच एकदा मी माझ्या आॅफिसच्या सवर्ण वरिष्ठांच्या घरी गेलो असता, त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाने, “बाबा, हे xxx आहेत का” असं विचारलेलं मी माझ्या कानाने ऐकलं आहे. खुप वाईट वाटलं तेंव्हा मला, पण एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं, की लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात..वास्तविक माझे हे वरिष्ठ माझ्याशी अत्यंत आपुलकीनं वागायचे पण त्यांच्या घरचा अनुभव मात्र एकदम वेगळा होता.

बऱ्याच जणांना आपल्या आडनांवाचा विविध कारणांनी मोठा अभिमान असतो. उठसुट तो ते दाखवायलाही कमी करत नाहीत. आमचं हे घराणं आणि ते घराणं हे सांगायची एकही संधी अशी लोकं दवडत नाहीत. खरं तर हे आडनांव त्याच्या अनेक पिढ्यांपूर्वी कुणातरीमुळे आपल्याला मिळालेलं असतं. त्यानंतरच्या त्याच्या अनेक पिढ्या आहार, निद्रा, भय, मैथून व या सर्वांसाठी कुठेतरी चाकरी, या पलिकडे गेलेल्या नसतात, पण त्यांना आपल्या आडनांवाचा कोण अभिमान आणि इतरांविषयी तुच्छता वाटतानाही दिसते. असा अभिमान बाळगताना आपण नेमकं कसं वागतोय, याचंही त्यांना भान नसतं. तर काही जणांना आपलं आडनांव नकोसं झालेलं असतं. जातीच्या आधाराने शिक्षण घेऊन आणि पुढे चांगली सरकारी नोकरी मिळवून अनेकजण पुढे गेलेत. हे चांगलं किंवा कसं हा इथे मुद्दा नाही, पण पुढे जाऊन अशांची भोतिक भरभराट झाली, की मग त्यांना आपल्या आडनांवांची लाज वाटू लागते आणि मग असे काही जण त्यांना शोभेल/आवडेल अशी आडनांवं घेतानाही दिसतात.

आडनांव आपली जात चटकन सांगतात. आपलं एखादं आडनांव असणं यात आपलं कर्तुत्व वा आपल्याला लाज वाटण्यासारखं काय असतं, हेच मला कळत नाही. आडनाव पिढीजात चालतं आलं, पडलं, दिलं, मिळालं, रूढ झालं, घडलं, घेतलं, धारण केलं किंवा सोडलं, त्याग केला किंवा पुसून टाकलं याच पद्धतीनं प्राप्त होतं किंवा जातं. बहुसंख्य आडनांव ही पुर्वी कधीतरी आपले पुर्वज करत असलेल्या कामावरून पडली आहेत. पुढे कामाचं स्वरूप बदललं तरी आडनांवं मात्र कायम राहीली आणि ते मग जातवाचक निदर्शक झालं. पुर्वज करत असलेल्या कामावरून आताच्या आधुनिक काळात अभिमान किंवा लाज, स्वत:बद्दल गर्व आणि इतरांबद्दल तुच्छता बाळगण्यात काय अर्थ आहे हे माझ्या लक्षात येत नाही, परंतू हा प्रकार सर्रास घडताना दिसतो. उदा. माझं स्वत:चं आडनांव महाराष्ट्रावर राज्य करून घेलेल्या चालुक्य सम्राटांवरून आलंय असं इतिहास सांगतो. परंतू माझं काहीच कर्तुत्व नसताना मी जर त्याच्या आडनांवाची महत्ती इतरांना सागून जर बडेजाव करू लागलो किंवा इतरांना माझ्यापेक्षा कमी दर्जाचं मानू लागलो, तर ते हास्यास्पदच होईल (आणि त्या मुळ चालुक्याला अपमानास्पद). असंच प्रत्येकाचं असतं याचं भान प्रत्येक व्यक्तीविशेषाने बाळगायला हवं, अन्यथा समाजात आधीच असलेली विषमता आणखी वाढते हे कुणीही सुबुद्ध नागरीक नाकारणार नाही.

आडनांव असणं ही आपली कायदेशीर अपरिहार्यता आहे. पण जर कायद्यात व्यवस्थित सुधारणा करून जर आडनांवांची गरजच नाहीशी केली, तर जातीव्यवस्थेला काही आळा नक्की बसु शकेल. शिवशाहीत कुठे आडनांवं प्रचलित असायची? म्हणजे असावित परंतू ती फार कुणी लावत असावेत असं दिसत नाही. अष्टप्रधान मंडळात तर रामचंद्र नीलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, निराजीपंत रावजी, दत्तोजीपंत त्रिंबक, रामजी त्रिंबक आदी नांवातील दुसरा शब्द आडनांवापेक्षा वडीलांचं नांव असावा असं दिसतं. पेशवे ही पदवी/पद पुढे आडनांव झालं हे ही अनेकांना माहित असावं/नसावं. माहितगारांनी यावर जास्त प्रकाश टाकावा. दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावं वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचं नांव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव. अशाप्रकारे आपल्यालाही नाही का करता येणार याचा विचार करायला हवा. फेसबुकवर बरेच जण हल्ली स्वत:च्या पहिल्या नांवासोबत आडनांव न लिहिता, आईचं व वडीलांचं नांव लिहिताना आढळतात, हे खरंच स्वागतार्ह्य आहे. हेच नेहेमीच्या जीवनातही करता आलं तर जाती निर्मुलनाच्या दिशेने ते एक ठोस पाऊल असेल असं मला वाटतं.

मला कळतंय की हा बालीश विचार आहे, परंतू बालीश विचारातूनही पुढे फार काही घडू शकतं. वर उल्लेख केलेला ‘बाबा, हे xxx आहेत का?” ह्या प्रश्नामुळे माझ्या मनात अनेक वर्ष ठुसठुसत असलेला विषय आज आपल्यासमोर मांडलाय. कुणाला पटेल अथवा पटणार नाही, परंतू यावर निदान चर्चा तरी व्हावी या अपेक्षेनं इथे पोस्ट केलाय.

-नितीन साळुंखे
9321811091