गिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-

(भाग चौथा)

देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी

सन १८५४ मधे, ताडदेव येथील कावसजी नानाभॉय दावर यांच्या व मुंबईतल्याही पहिल्या गिरणीची, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ची, पायाभरणी झाली आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं, हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता पुढे-

मुंबईत गिरणी उभी करणं, हे कावसजींच धाडसंच होतं. कारण संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटीश/युरोपीयन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या, ५ लाख रुपयांच्या भाडवलाची उभारणीही मुंबईतल्या ५० धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वत:ला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही. पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नविन उपद्व्याप उताणा पडला तर, थेट रस्त्यावरच यायची पाळी, अशी सर्व परिस्थिती..! या परिस्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडसं नव्हे तर काय..! धाडसी तर कावसजी होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे होता, तो दुर्दम्य आत्मविश्वास..! त्या आत्मविश्वासातूनच धोका पत्करणं हे कदाचित त्यांच्या स्वभावात उतरलं असावं आणि त्यातूनच त्यानी या व्यवसायात शिरकाव केला असावा. नफा होईल की तोटा, तोटा झाल्यास, पुढे काय करायचं, याचा फारसा विचार त्यांनी केला नसावा..! धाडसी माणसं परिणामांचा असा विचार करत बसत नसतात, जे होईल ते नंतर पाहू, असा विचार करुन ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतात, मग त्यातून जे होईल ते होवो..! कावसजींनी त्यांच्या कृतीतून हेच दाखवून दिलं..!!

आणि पुढच्या वर्षभरातच कावसजींना त्यांनी पत्करलेल्या धोक्याचं भरभरून फळ मिळालं. कावसजींची ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ ही गिरणी कल्पनेपलिकडे यशस्वी झाली. त्याने कावसजींचा आत्मविश्वास दुणावला व लगेचंच त्यांनी, ताडदेव येथे आपल्या पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण, ‘दी बॉम्बे थ्रॉस्टल मिल(The Bombay Throstle Mill)’ उभारण्याचं जाहीर करुन कामास सुरुवात केली. सन १८५७ मधे ‘बॉम्बे थ्रॉस्टल (उच्चार-थ्रॉटल) मिल’ कार्यान्वित झाली. कावसजींची आणि मुंबई शहरातलीही ही दुसरी गिरणही जोमात सुरू आणि ‘पारशी तिकडे सरशी’ ही म्हण खरी झाली.

कावसजींच्या मुंबईतल्या या दोन गिरण्यांनी मुंबईत व देशात भविष्यात फोफावलेल्या गिरणी धंद्याचा पाया घातला. नविन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की, सन १८५४(१८५६) ते १८५७ मधे कावसजींच्या दोन गिरण्या सुरू झाल्यानंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १८६० पर्यंत, खुद्द मुंबईत ९ गिरण्यांची यंत्र धडधडायला लागली. हिच संख्या ४० वर्षांत ८४ इतकी झाली तर त्यापुढच्या पंचवीस वर्षात, म्हणजे १९२५ सालापर्यंत ती ९७ एवढी झाली. याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या ३३७ एवढी प्रचंड होती. सन १८५४ ते १९२५ पर्यंतच्या साधारण ७० वर्षांत देशभरात एकूण ३३७ कापड गिरण्या सुरू झाल्या याचा अर्थ, दर वर्षाला ४ गिरण्या होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांमागे एक गिरणी देशभरात कुठे न कुठे सुरू होत होती..!

शहरात ६ आणि उपनगर कुर्ला येथे १, अशा ७ गिरण्या सुरू झाल्या. सन १८६० सालात, मुंबई शहर व कुर्ला येथे मिळून एकूण ९ असलेल्या गिरण्यांची संख्या, पुढच्या १५ वर्षांत वाढून २८ झाली आणि तिच संख्या, एकोणीसावं शतक संपताना, म्हणजे सन १९०० सालात वाढून ८४ इतकी झाली. सन १९२५ मधे मुंबई व कुर्ला मिळून एकूण ९७ गिरण्या मुंबईत सुरू झाल्या. हे श्रेय, अर्थातच, सन १८५४ साली मुंबईतली पहिली गिरण काढणाऱ्या कावसजी नानाभॉय दावर यांचं..!

कावसजींनी सुरू केलेल्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ नंतर देशात गिरणीधंदा फोफावला असला तरी, कावसजींच्यापुर्वीही काही उद्योगी लोकांनी देशात कापड गिरणी सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्या बहादूर लोकांचे प्रयत्न फसले असतील किंवा त्यांना परिस्थितीने हवी तशी साथ दिली नसेल, पण त्यांचे प्रयत्न निश्चितच महत्वाचे होते. त्यांच्या त्या प्रयत्नांची गाथा आपल्याला थोडक्यात का होईना, पण माहित असणं आवश्यक आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय मुंबईत सुरु झालेल्या गिरण्यांच महत्व आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे कावसजींच्या व त्यानंतर मुंबईत सुरू झालेल्या गिरण्यांचा प्रवास कसकसा होत गेला, ते पाहाण्यापूर्वी आपण, देशात कापड गिरणी स्थापन करण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्याची थोडक्यात माहिती घेऊ..!

देशात कापड गिरणी सुरू करण्याचा सर्वात पहिला प्रयत्न झाला, तो सन १८१७-१८ मधे, आजच्या पश्चिम बंगालमधील (तेंव्हाचा Bengal Province), कलकत्त्यातहून (आजचा कोलकाता) २०-२५ किलोमिटर दूर असलेल्या, हुबळी नदीच्या काठावर असलेल्या ‘बावरीया’ या गांवात..! भारतातून कच्चा कापूस इंग्लंडला जातो व त्याचं कापड तयार होऊन पुन्हा भारतात परत येतो. त्यापेक्षा इथेच गिरणी टाकून तसं कापड तयार करण्याचा प्रयत्न केला, अगदी त्यासाठी गिरणी व त्यातील यंत्रसमुग्रीचा खर्च धरला तरी, ते प्रकरण २०-२५ टक्के स्वस्त ठरू शकते, असा हिशोब काही ब्रिटीश व्यावसायिकांनी केला आणि ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ या देशातल्या सर्वात पहिल्या कापड गिरणीची स्थापना केली..!

देशातल्या या पहिल्या गिरणीची माहिती घेण्यासाठी थोऽऽडं मागं जावं लागेल. ‘फोर्ट ग्लॉस्टर’ हा नांवाप्रमाणे किल्लाच. मुळातली ही डच इस्टेट. ‘युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ईन इंग्लंड’ (हे ‘ब्रिटीश ईस्ट कंपनीचं’ भावंड) या कंपनीच्या कॅप्टन अलेक्झांडर काईड (Kyd) या अधिकाऱ्याने दिनांक १ जुलै, १७९० मधे ही इस्टेट खरेदी केली. ही इस्टेट पुढे काही ब्रिटीश व्यापाऱ्यांनी गिरणी सुरू करण्यासाठी म्हणून खरेदी केली आणि त्यात असलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर’ या किल्ल्याचं रुपांतर, सन १८१७-१८ मधे, कापड गिरणीत करुन, तिला ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ असं नांव दिलं.

किल्ल्याचं रुपांतर गिरणीत केल्यामुळे, या गिरणीची बांधणी कारखान्यासारखी नसून, युरोपातल्या एखाद्या किल्ल्यासारखीच, परंतु घडीव दगडांच्या ऐवजी भाजक्या विटांची होती. भिंती तीन-तीन फूट जाडीच्या. शिवाय भिंतींना बाहेरून मजबूत कॉलम्सचा आधार. विचित्र पद्धतीची बांधणी असलेली ही गिरणी सुरू झाली अन् पुढच्या आठ-दहा वर्षातच बंदही पडली. ही गिरणी बंद होण्याचं कारण मात्र मजेशीर आहे. ते कारण म्हणजे, या गिरणीला जो परवाना (लायसन्स किंवा चार्टर) बंगाल सरकारने दिला होता, त्यात कापड गिरणी सोबतच, कॉफीचा मळा, डिस्टीलरी (फक्त रम तयार करण्याचा कारखाना), फाऊंड्री, तेलाचं गाळप आणि पेपर मिल सुरू करण्याचीही अट घालण्यात आली होती. त्यातला कॉफीचा मळा तर अगदी मस्टच होता. गिरणी धंद्याच्या अगदी विरुद्ध स्वरुपाचे व्यवसाय करणं भाग पडल्याने(च) असेल, पण तो द्राविडी प्राणायम न झेपल्याने सदर गिरणी बंद पडली, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे..!

ही गिरणी बंद होण्याची आणखीही काही कारणं काही अभ्यासक देतात. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे, ही गिरणी सुरू करण्यासाठी निवडलेलं चुकीचं ठिकाण. हे ठिकाण मुख्य शहर असलेल्या कलकत्त्यापासून २०-२५ किलो मिटर लांब होतं, शिवाय नदीच्या पलिकडे होतं. कलकत्त्याहून इथं यायचं म्हणजे पहिला रस्त्याने प्रवास व नंतर ‘डींगी’तून (लहान होडी) नदी ओलांडायची आणि तेव्हा गिरणी दिसणार. त्यावर तोडगा म्हणून जवळपासच्या गांवातले कामगार घ्यावेत, तर त्या शहरापासून दूरच्या गांवात योग्य ते कामगार मिळण्याची वानवाच असावी. त्यावर तोडगा म्हणून, ह्या गिरणीच्या मालकांनी आपला मायदेश इंग्लंड आणि स्कॉटलंड येथून तंत्रज्ञ, सुपरवायझर आणि कामगारही आणले. गिरणीत काम करायचं आणि तिथेच राहायचं. असं बरेच दिवस चाललं, पण कलकत्ताचं हवामान त्या थंड प्रदेशातील कामगारांना न झेपल्याने, ते मृत्युमुखी पडले आणि (कदाचित) तज्ञ कामगार नसल्याने, शेवटी गिरणीचीही तिच गत झाली.

या मिलच्या आवारात एक ख्रिश्चन दफनभुमी आहे. त्यात १५ थडगी आहेत. त्यातील १३ कबरींवरच्या पाट्या गहाळ झाल्या आहेत, मात्र दोन थडग्यांवरच्या पाट्या शाबूत असून, त्या वाचता येतात. त्यातील एका पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिल्समधील एक असिस्टंट जेम्स लॅंग याला, १४जुलै १८३५ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यू समयी त्याचं वय ३६ होतं; तर दुसऱ्या पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिलनधले अन्य एक असिस्टंट मिस्टर जास स्टिवनसन यांती पत्नी एलेन आणि त्यांची लहान मुलगी या दोघांनाही दिनांक १७ ऑगस्ट १८३७ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यूसमयी एलेनचं वय २३ वर्ष, तर तिच्या मुलीचं वय अवघ्या ५ दिवसांचं होतं..!

‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ आठ-दहा वर्षातच बंद पडली. पुढे तिच गिरणी, सन १८३२-३३ मधे ‘बावरीया कॉटन मिल्स (Bowreah Cotton Mills)’ या नांवाने सुरू झाली. ही गिरणी मात्र पुढे व्यवस्थित चालू राहिली.

भारतात सुरू झालेली ही सर्वात पहिली कापड गिरणी काही काळातच बंद पडलेली असली तरी, ती सुरू करण्याचं धाडस करणाऱ्या आणि त्यात काम करण्यासाठी आपला मायदेश सोडून इथे आलेल्या व आपल्या कर्मभुमीतच तरुण वयात देह ठेवणाऱ्या त्या कामगारांप्रती आपल्याला कृतज्ञ राहायला हवं..!

आणि हो, एक सांगायचंच राहिलं..! भारतात सुरू झालेल्या, ‘फोर्ट ग्लॉस्टर मिल्स’ या सर्वात पहिल्या कापड गिरणीत, युरोपियन का होईना, महिला कामगार पहिल्या दिवसापासून कामाला होत्या. त्या अर्थानेही ही गिरणी पहिली ठरते..!

या नंतरचा, देशात कापड गिरणी सुरू करण्याचा दुसरा प्रयत्न झाला, तो सन १८२८ मधे थेट देशाच्या दक्षिण टोकावर, पॉंडेचेरीमधे..!

त्याची कहाणी पुढच्या पाचव्या भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

17.06.2021

टिपा-

1. लेखात माहिती दिलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल्स’ बाबत फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. जी काही त्रोटक माहिती मिळाली, त्यातही संगती लागत नाही. पुन्हा, ‘फोर्ट ग्लॉस्टर’ पहिली की, ‘बावरीया’ पहिली यात तज्ञांमधे मतभेद आहेत. पण वरीलपैकी कोणतीही गिरणी पहिली असली तरी, देशातील पहिली गिरणी स्थापन करण्याचा मान बंगाल प्रांताला जातो, यावर मात्र तज्ञांचं एकमत आहे. आपणही तेवढंच ध्यानात घ्यावं, ही विनंती.

2. ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन’ मिल्सच्या जागेतच ‘बावरीआ’ गिरणी सुरु झाली, कि त्याच मिलच्या आवारात दुसर्या इमारतीत सुरु झाली, ह्या विषयी संभ्रम आहे. परंतु ‘बावरीआ’ मिलची इमारत स्वतंत्र असावी असा कयास करता येतो. फोर्ट ग्लॉस्टरच्या किल्ल्यासारख्या इमारतीत नव्याने गिरणी स्थापन करण्याचा वेडेपणा कुणी करणार नाही. म्हणून कदाचित ह्या दोन इमारतींना, काही ठिकाणी, ‘नॉर्थ मिल’ आणि ‘साऊथ मिल’ अस म्हटलं असावं.

3. ”फोर्ट ग्लॉस्टर’ गिरणीचे व्यवस्थापक/मालक ‘मे. फर्गसन ॲंड कंपनी’ हे होते आणि त्यांना ती गिरणी व सोबतची कॉफी मळा, डिस्टीलरी, तेलाची व पेपरची गिरण व्यवस्थित सांभाळता न आल्याने, देशातली ही पहिली गिरण दिवाळखोरीत गेली, असं भारतातील कापड गिरण्यावर अभ्यास केलेले मान्यवर तज्ञ मॉरीस डेव्हीड मॉरीस यांनी म्हटलंय.

संदर्भ-

1. Bombay Industries;The Cotton Mills- A review of the progress of the textile industries in Bombay from 1850-1928 & the present constitution- S. M. Rutnagur, 1928, pages- 8 to 10, 22 & 23;

2. The Emergence of An Industrial Labour Force in India; A Study of Bombay Cotton Mills, 1854-1947 – Morris David Morris, pages-22-26; notes on pages 22 & 23;

3. The Indian Textile Journal; Special Souvenir Number to mark the Centenary of the Cotton Textile Industry in India- 1854-1954; Edited by Jal S. Rutnagur, Pages – 6, 7, 108-110, 117-121, 125, 126; या लेखातले फोटो याच पुस्तकातून घेतले आहेत.

4. The Indian Textile Journal; Jubilee Souvenir-1890 to 1940; pages- 18,19;

5. Cotton Mill Industry in Bengal- Mukul Gupta. Issued by Government of Bengal, Department of Industries, Bulletin No. 75; year 1937; Pages-2 to 4, 12,13 & 67;

6. The Cotton Industry of India;Prospect & Retrospect- K. L. Govil -1937.

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा)

मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-

सन १८५१ सालात, मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीचे डोहाळे लागले, ते कावसजी नानाभॉय दावर या पारशी उद्योजकाला. मुंबईतले एक बडे पारशी व्यापारी असलेल्या कावसजी दावर यांच्या मनात मुंबईत एक कापड गिरणी सुरु करावी, हा विचार मूळ धरू लागला होता. असा विचार त्यांच्या मनात का यावा, या मागे कारणही तसंच होतं. पुढे जाण्यापूर्वी आपण त्या कारणाचा धावता आढवा घेऊ;कारण ते कारणंही तेवढंच महत्वाचं आहे..!

कावसजी दावर, त्या काळातल्या बहुतेक सर्वच पारशांप्रमाणे, सुखवस्तू घरात जन्माला आले. वडील नानाभाई यांचा देशातील कापूस उत्पादकांना भांडवल उपलब्ध करुन देणे आणि त्यांनी पिकवलेला कापूस इंग्लंडला निर्यात करणं आणि इंग्लंडहून तयार कपडा आयात करण्याचा ब्रोकींग पद्धतीचा व्यवसाय होता. ते दोन इंग्लिश फर्मसाठी भारत व चीन देशांत ब्रोकींग करत असत. वयाच्या १६ व्या वर्षी, म्हणजे सन १८३० सालात कावसजींनी वडीलांसोबत त्यांच्या व्यवसायात उमेदवारी करायला सुरुवात केली. शिक्षणाने कमी, परंतु व्यापारात तेज बुद्धी लाभलेल्या कावसजीनी लवकरच वडीलांच्या व्यवसायातले बारकावे शिकून घेतले. सन १८३७ मधे झालेल्या वडीलांच्या निधनानंतर, आपल्या मोठ्या बंधूंना, म्हणजे दिनशा दावर यांना, भागिदारीत घेऊन कावसजींनी वडीलांचा ब्रोकिंगचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. कावसजींच्या आता वाढू लागल्या होत्या. वडील बंधूंसवेत लवकरच त्यांनी वडील नानाभाई यांच्या नांवाने ‘नानाभाई फ्रामजी ॲंड कंपनी’ नांवाची स्वतंत्र फर्म काढून व्यवसायास सुरुवात केली. दुर्दैवाने लगेचंच त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्वच जबाबदार कावसजींवर येऊन पडली. अर्थात, त्याचा कावसजींना फायदाच झाला.

व्यापारात व्यवस्थित बस्तान बसल्यानं, जात्याच महत्वाकांक्षी आणि धाडसीही असलेल्या कावसजींना आता नवीन क्षितीजं खुणावू लागली होती. ब्रोकींगचा व्यवसाय सुरूच होता. त्यांनी बॅंकींग व्यवसायात उडी मारली. त्यानेळेस मुंबईतून होणाऱ्या व्यापारासाठी भांडवल पुरवणाऱ्या बॅंक ऑफ बॉम्बे, फोर्ब्स, रेमिन्ग्टनसारख्या काही खाजगी संस्था होत्या. पण मुंबईच्या भरभराटीला आलेल्या सर्वच व्यापारास त्या पुरे पडत नव्हत्या. म्हणून कावसजी आणि कामांसारख्या काही इतर बड्या व्यापाऱ्यांनी बॅंकींग क्षेत्रात सन १८४२ मधे स्थापन झालेल्या ‘ओरिएन्टल बॅंक कॉर्पोरेशन(जुनी ‘बॅंक ऑफ वेस्टर्न इंडीया’)’, ‘कमर्शिअल बॅंक ऑफ इंडीया (१८४५)’, ‘चार्टर्ड मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडीया, लंडन ॲंड चायना’ इत्यादीसारख्या वित्तीय संस्थांच्या स्थापनेत, इतर पारशी व ब्रिटीश व्यापाऱ्यांसमवेत कावसजींचा सहभाग होता.

कावसजींचं मुंबईतल्या व्यापारात होणाऱ्या बदलावर बारीक लक्ष असे व त्यातून आपल्याला काही नवी संधी मिळतेय का, याच्या ते सतत शोधात असत. त्यात त्यांच्या लंक्षात येऊ लागलं की, पूर्वी जी भारतीय कापसाला आणि भारतातील कुशल विणकरांनी हातमागावर विणलेल्य् सुती व रेशमी कपड्यांना जेवढी इंग्लंड आणि इतर काही पाश्चिमात्य देशांकडून जेवढी मागणी होती, तेवढी आता राहीलेली नाही. त्यामागे, इंग्लंडमधे अठराव्या शतकाच्या सहाव्या-सातव्या दशकातच सुरू झालेल्या यांत्रिक गिरण्या हे कारण असल्याचं, हुशार कावसजींनी नेमकं हेरलं होतं. त्याचा परिणाम त्यांना, त्यांच्या मूळच्या कॉटन ब्रोकींगच्या व्यवसायातही जाणवू लागला होता. इंग्लंडनेही केवळ भारतातून आयात होणाऱ्या कापसावरचं अवलंबित्व कमी करत आणलं होतं, त्यामुळे भारतातून होणारी कापसाची निर्यातही कमी कमी होऊ लागली होती. उलट इंग्लंडहून आपल्या देशात येणाऱ्या सुतात व सुती कपड्यात वाढ होऊ लागली होती. सन १८००-१८१० सालात इंग्लंडहून भारतात आलेल्या सुती मालाची किंमत, जी केवळ ७२ हजार रुपये होती, ती वाढून १८५० च्या सुमारास दिड कोटी रुपयांपर्यंत वाढली. मशिनच्या सहाय्याने इंग्लंडमधे सुबक कापड कमी वेळात, पण जास्त प्रमाणात तयार होऊ लागलं होतं. त्यामुळे इंग्लंडात तयार झालेला कपडा व मशीनवर कातलेलं सूत, इंग्लंडहून भारत व इतर देशात निर्यात करणं इंग्लंडला शक्य होऊ लागलं होतं. त्याचा (दुष्प)रिणाम भारतावर आणि इथल्या व्यापारावर, तसेच कारागिरांवरही होऊ लागला होता.

नेमकी हिच बाब कावसजीं दावर यांनी बरोबर हेरली आणि आपला कापूस व सूत इंग्लंडात जाऊन, तिथल्या गिरण्यांमधून कपडा बनून इथे येतो व त्यावर इंग्लिश व्यापारी व कारखानदार बक्कळ माया कमावतात, मग आपणच इकडे एखादी गिरणी स्थापन करुन तसा नफा का कमवू नये;शिवाय इथल्या बरोजगार असलेल्या कापूस उत्पादकांना आणि कुशल विणकरांनाही त्यायोगे रोजगार का मिळवून देऊ नये, असा विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागला.

पण मनात विचार येणं नि तो प्रत्यक्षात आणणं, यात प्रचंड फरक आहे. त्या काळात तर हे फारच अवघड. गिरणी उद्योगातलं देशात कुणीही माहितगार नाही. गिरणीच्या इमारतीचा आराखडा, गिरणीचं तंत्रज्ञान, त्यातील यंत्रसामग्री, ती चालवण्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ, गिरणीचं व्यवस्थापन इत्यादी अगदी प्राथमिक, परंतु अत्यंत महत्वाच्या गोष्टींसाठी परदेशावर, म्हणजे अर्थातच इंग्लंडवर अवलंबित्व होतं. पुन्हा इंग्लंडातले माहितगार मदत करतीलच हे कशावरून, ही शंका..! पुन्हा ती मदत मिळालीच, तर गिरणीची अजस्त्र यंत्र चालवण्यासाठी लागणारी उर्जा, कोळसा व लाकूड यांपासून मिळवायची आणि या गोष्टी मुंबईत आणायच्यात, तर समुद्रमार्गाने आणाव्या लागणार. ती मदत वेळेत मिळेल की नाही, ही देखील शंकाच होती. गिरणी धंद्यासाठी दोनच दोष्टी मुंबईत अनुकूल होत्या. भरपूर कापूस आणि सूत व कापडासाठीची मोठी बाजारपेठ..!!

पण समोर दिसणाऱ्या अडचणींचाच विचार करत बसलं, तर काहीच हाती लागणार नाही. काही नविन करायचं तर, धोका तर पत्करावा लागणारच. कावसजींनी सर्व शंका-कुशंका बाजुला ठेवत, इंग्लंडमधील गिरणी उद्योगातील तज्ञांसोबत पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांशी संपर्क साधल्यावर, त्यांना इंग्लंडमधील ओल्डहॅम शहरातील ‘मे. प्लॅट ब्रदर्स ॲंड कं. लिमिटेड(M/s. Platt Brothers & Co. Ltd.)’ या गिरण्यांसाठी मशिनरी उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रतिसाद दिला. मुंबईत गिरणी उद्योग सुरू केल्यास, तो भरभराटीला येऊ शकतो, हे त्यांना पचवून देण्यात कावसजी यशस्वी झाले आणि प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना गिरणीसाठी लागणाऱ्या इमारतीचे आराखडे आणि मशिनरी पुरवण्याचं मान्य केलं. एवढंच नव्हे, तर भविष्यात मुंबईतला गिरणीधंदा भरभराटीला येऊ शकतो, हे अचूक ओळखून, प्लॅट ब्रदर्सनी, कावसजींना त्यांचे मुंबईतले ‘एजंट’ म्हणूनही नेमून टाकलं..! हे साल होतं, सन १८५१..!!

सन १८५१ मधे कावसजींनी गिरणीचं ‘प्रॉस्पेक्टस’ वितरीत केलं आणि गिरणीसाठी योग्य अशी जागा पाहाण्यास सुरुवात केली. कावसजींनी आपल्या व मुंबईतल्या पहिल्या वहिल्या गिरणीसाठी जागा मुक्रर केली ती, आताच्या ग्रान्ट रोड नजिकच्या ताडदेव येथील. त्याला कारणंही तशीच होती. एकतर ही जागा तेंव्हा तशी बऱ्यापैकी मोकळी होती. तेंव्हाची लोकवस्ती एकटवली होती, ती किल्ल्याच्या आत किंवा बाहेरच्या बाजूला फार तर माजगांव-भायखळ्यापर्यंत. त्यामुळे ही जागा मुख्य लोकवस्तीपासून फार लांब व फार जवळही नव्हती. त्याने गिरणीत काम करण्यासाठी भविष्यात लागणाऱ्या मनुष्य बळाचा पुरवठा होऊ शकत होता. दुसरं कारण म्हणजे, त्यावेळच्या बहुतेक सर्व देशा-परदेशी श्रीमंत आसामींचा निवास असलेल्या ‘कंबाला हिल’च्या पायथ्याशी होती. त्यामुळे कारखान्यात जाणं-येणं सोयीचं होणार होतं.

सर्वात महत्वाचं कारण होतं ते, इथून जवळच असलेला ‘कुलाबा’ येथला मोठा कापूस बाजार किंवा कॉटन एक्स्चेंज. कुलाबा कॉजवेचं बांधकाम नुकतंच, म्हणजे १८३८ साली पूर्ण झाल्याने, मुंबईतलं, आताच्या हॉर्निमन सर्कलमधे कोंदटलेला कापसाचा बाजार-कॉटन ग्रीन-, सन १८४४ मधे, कुलाबा कॉजवेच्या बांधकामामुळे उपलब्ध झालेल्या प्रशस्त जागेत हलवण्यात आला होता. तिथून विपूल प्रमाणात गिरणीसाठी कापूस उपलब्ध होऊ शकत होता. गिरणीच्या बॉयलरसाठी लागणारं लाकूड तारवांतून गिरगांवच्या चौपाटीवर येत असे, तेंव्हा ते ही ठिकाण कुलाब्यापासून नजिकच होतं. कोळसातर मुंबईतल्या अनेक बंदरात उतरत होता व ती बंदरं ताडदेवपासून जवळच होती. एकुणात काय तर, इंधन, मालकांचा निवास व भविष्यात लागणारा कामगार वर्ग ताडदेवपासून हाकेच्या अंतरावर असल्याने, कावसजींनी आपल्या गिरणीसाठी ताडदेवची जागा निवडली.

प्लॅट ब्रदर्सनी इंग्लंडहून, एकूण २० हजार स्पिन्डल्स (टकळ्या किंवा चाती) मावतील एवढंया इमारतीचे आराखडे पाठवून दिले. सोबत त्यातले तज्ञही इंग्लंडहून आले. पिटर रश्कीन हा इंग्लंडातल्या लॅंकशायर (Lancashire) येथून, मुंबईतला गिरणी उद्योग उभारण्यासाठी आलेला सर्वात पहिला ब्रिटीश माणूस. गिरणीची पायाभरणी.

सन १८५२ मधे गिरणीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला नि जोरात काम सुरू झालं. पुढच्या दिड-दोन वर्षांत गिरण उभी राहिली आणि दिनांक ५ फेब्रुवारी १८५४ रोजी कावसजींच्या आणि मुंबईतल्याही पहिल्या गिरणीचं, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’उद्घाटन करण्यात आलं आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं आणि मुंबईच्या व देशाच्याही गिरणी उद्योगाची पायभरणी झाली..!

इथून पुढे मुंबईचा गिरणी उद्योग, या ना त्या कारणाने, देशातच नव्हे, तर जगभरात गाजत राहिला. गिरणी उद्योगावे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून जे स्थन मिळवून दिलं, ते अद्यापही तसंच शाबूत आहे..!!

पण एक सांगायचं राहिलंच, मुंबईतली कावसजींनी सुरू केलेली ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ मुंबईतली पहिली असली तरी, देशातली पहिली नव्हे बरं का..! या आधीही देशात गिरण्या उभारण्याचे उपद्व्याप काही उपद्व्यापी लोकांनी केले होते. कावसजींची गिरण देशातली पहिली नसूनही, देशातल्या गिरणी उद्योगाचे आणि एकुणच औद्योगिकरणाचं पितामह म्हणून कावसजींचा गौरव का केला जातो, आणि कावसजींच्या या गिरणीचं पुढे काय झालं त्याची कहाणी पुढच्या चौथ्या भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

08.06.2021

टीप- फोटो इंटरनेटवरून घेतलेले आहेत. कावसजी दावर यांच्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’चे फोटोही माझ्याकडे आहेत, पण ते पाहायला मिळतील मात्र राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीमधे.

संदर्भ-

1. The Gazetteer of Bombay City & Island- Nov. 2010 edition- S. M. Edwards, Vol. I -pages 434-436, 486;

2. Bombay Industries;The Cotton Mills- S. M. Rutnagur- 1927; page 9, 288;

3. The Emergence of An Industrial Labour Force in India; A Study of Bombay Cotton Mills, 1854-1947; Morris David Morris- 1965;pages-22-26;

4. Indian Textile Journal;Cetenary Souvenir- 1854-1954;pages-6-9, 124-127, 160-164,

5. Book – Parsi Lustre on Indian Soil- Vol I, 1939, H. D. Darukhanawala, page-426-427;

6. Bombay Industries;The Cotton Mills- S. M. Rutnagur- 1927;; Part II; Chapter- Cotton Trade of Bombay;page -456-457;

7. A Hundred Years of Cotton- M. L. Dantwala- Chapter VIII;

8. Shells from the sands of Bombay being my recollections & reminiscence- 1860 – 1875; Dinshaw E. Wachha; 1920; pages 435-438, 623;

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा)

कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-

मागच्या भागात आपण पाहिलं की, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत एकूण १०३ गिरण्या होत्या. आणि त्यातल्या जवळपास ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. मुंबईतल्या गिरण्यांनी मुंबईच्या नि देशाच्याही औद्योगिक विश्वाची पायाभरणी केली. मुंबंईकडे देशाच्या आर्थिक राजाधानीचा मान चालून आला, त्यानागे जी काही थोडकी कारणं होती, त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे, मुंबईतल्या कापड गिरण्या..!

मुंबईच्या पहिल्या गिरणीचा जन्म झाला, तो १८५४ सालात, कावसजी नानाभॉय दावर या पारशी उद्योजकाच्या कल्पनेतून. त्यासाठीच कावसजी दावर यांना मुंबंईतल्या आणि देशाच्याही गिरणी उद्योगाचे पितामह म्हटले जाते. त्याबद्दल आपण पुढे अधिक जाणून घेणारच आहेत, परंतु, पुढे जाण्यापुर्वी, म्हणजे मुंबईतली कावसजी दावर यांची पहिली गिरण अस्तित्वात येण्याच्या साधारणत: ७०-७५वर्ष अगोदरपासून, मुंबईच्या धरतीवर ‘गिरणी’ नांव धारण करणारा आणि कापसाशीच संबंध असणारा आणखी एक अर्ध-यांत्रिकी व्यवसाय अस्तित्वात होता, त्याची माहिती घेणं औचित्याचं ठरेल. औचित्याचं अशासाठी की, मुंबईतल्या गिरण्यांच्या जादुई विश्वात शिरण्यापूर्वी ओलांडावा लागणारा, प्रवेशद्वारावरचा तो उंबरठा आहे. त्यामुळे त्याला प्रथम नमन करणं आपलं कर्तव्य ठरतं..! हा व्यवसाय होता ‘कॉटन प्रेसिंग’चा. इंग्रजीत यासाठी ‘कॉटन स्क्रू’ असाही शब्द प्रयोग करत असत.

साधारण अठराव्या शतकाच्या मध्याच्या आसपास मुंबईत बंदर सुरू झालं आणि त्या बंदरातून निर्यात सुरू झाली. कापूस हा या निर्यातीमधला महत्वाचा ऐवज होता. साधारण सन १७५० पासूनच मुंबईपासून दूर असलेल्या प्रदेशातून समुद्रमार्गाने, गलबतं भरूनच्या भरून कापसाच्या गासड्या(Cotton Bales) मुंबईच्या बंदरात येत व त्या पुढे मोठमोठ्या जहाजातून युरोप खंडात वा चीनच्या दिशेने रवाना होत असत.

जेंव्बा निर्यातीसाठी कापूस मुंबईत येई, तेंव्हा त्याची एक गासडी सुमारे १०-१२ फूट उंचं आणि ५-६ फूट रुंदही असे. मुंबईतल्या व्यापाऱ्यांना फायदा होत असे, ते जास्तीत जास्त वजनाचा कापूस जहाजात भरून पाठवल्याने. आणि कापूस तर वजनाने बराच हलका आणि कमी वजनासाठीही जास्त जागा व्यापणारा असल्याने, तो परदेशात रवाना करताना, कमी वजनाचा कापूस जहाजातली जास्त जागा व्यापत असे आणि परिणामी व्यापाऱ्यांचं ‘नफे मे नुकसान’ होत असे. तसंच जहाज कंपनीचं आणि ज्या ठिकाणी कापूस पाठवायचा असे, तिकडच्या आयात करणाऱ्या कारखान्यांचंही त्यात नुकसान होत असे. असे होऊ नये म्हणून ‘कॉटन प्रेस’ची कल्पना जन्मली.

कॉटन प्रेस किंवा कॉटन स्क्रू म्हणजे एक साधे लोखंडी यंत्र (सुरुवातीला लाकडी. विशेषत: चिंचेच्या लाकडापासून बनवलेलं असे) असे. त्या यंत्रात-अंदाज येण्यासाठी सोबत फोटो दिलाय- कापसाची गासडी टाकून, त्या यंत्रावर असलेला लांब लाकडी दांडा(किंवा दांडे) गड्यांच्या मदतीने कळ फिरवला जाई. जेणेकरुन यंत्रातली आडवी, चौकोनी वा आयताकृती लोखंडी फळी, तिच्याखाली असलेल्या कापसाच्या गासडीवर, प्रचंड दाबाने दाबली जात असे आणि त्यामुळे १०-१२ फूट उंच व ५-६ फूट रुंद असणाऱ्या कापसाच्या गासडीचं आकारमान, जवळपास निम्म्यावर येई;पुन्हा वस्तुमानात फारशी काहीच घट होत नसे. म्हणजेच तेवढ्याच वजनाच्या दुप्पट गासड्या जहाजात भरून रवाना करता येत असत. यात मुंबईतले कापसाच्या व्यापारात असणारे पारशी-गुजराती सेठीये, कापसाची वाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्या आणि कापूस मागवणारे परदेशातले कारखानदार, असा દરેકનો ફાયદો..!

फायदा म्हणजे किती, त्याचं अतिशय समर्पक वर्णंन पुन्हा गोविंद नारायण मडगांवकरांनीच त्यांच्या ‘मुंबईचं वर्णनं’ या पुस्तकात केलंय. मडगांवकर म्हणतात, “चवदा मण कापूस ह्या गिरणीत घालून दाबला म्हणजे तो दगडासारखा घट्ट होऊन, त्याचा हात-दिड हात उंच आणि अडीच हात रुंद, असा बेतवार गठ्ठा तयार होऊन बाहेर पडतो. त्यामुळे व्यापारी लोकांस नोराबद्दल हजारो रुपये नफा होतो. ज्या जहाजांमधे पूर्वी सुमारे तीन हजार गठ्ठे लादले जात होते, त्यामधे आता असे दाबलेले गठ्ठे पाच-सहाहजार राहू लागले. त्यामुळे जहाजाच्या धन्याचे उत्पन्न वाढले. गिरणीमधे गठ्ठे बांधून तयार करुन घेण्यासाठी गिरणीमालकाला दर गठ्ठ्यास दीड रुपया द्यावा लागतो. एवढा खर्च होऊनही ह्यापासून व्यापाऱ्यांस प्रतिवर्षी लाखो रुपये नफा होऊ लागला”. एवढं म्हणून मडगांवकर पुढे नोंदवतात की, “सन १८०० मधे लवजी फ्यामिली ह्या जहाजाच्या धन्यास असे गाठलेले गठ्ठे भरल्यामुळे एका वर्षात ३२ हजार रुपये नोर जास्ती आला. याच प्रमाणे दुसऱ्या जहाजांसही नफा झाला. तसाच व्यापारी लोकांस कोणांस पंधरा, तर कोणास वीस हजार रुपये नफा होऊ लागला.”

कॉटन प्रेसची ही कल्पना तशी जुनीच, सन १६९४ मधली, पण तिने मुंबईत जोर पकडला, तो १७५० नंतर. सन १६९७ मधे मुंबईत असं, अगदी प्राथमिक स्वरुपाचं एकच लाकडी यंत्र होतं, पण ते लवकरच बंद पडलेलं होतं. नंतर ती संख्या हळुहळू वाढत गेली आणि यंत्रातही सुधार होत गेले. नंतर नंतर कॉटन प्रेस लोखंडाचे बनू लागले व वाफेवरही चालू लागले होते.

‘मुंबईचं वर्णन’ या आपल्या पुस्तकात, लेखक गोविंद नारायण मडगांवकर यांनी, या कॉटन प्रेस किंवा कॉटन स्क्रूसाठी ‘गिरण’ हा शब्द वापरात होता, असं म्हटलंय. अर्थात, हा शब्द त्या एका यंत्रासाठी होता आणि अशी कापूस दबाईची पाच-सहा यंत्र असलेल्या कारखान्यांना ‘गिरणींचा कारखाना’ असा समर्पक शब्द योजला होता.

मुंबईतला असा पहिला ‘गिरणींचा कारखाना’ सुरू झाला, तो सन १७७६ मधे. र्फोटमधे;आणि याचं श्रेयही, मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणी स्थापनेच्या श्रेयाप्रमाणेच, एका पारशी उद्योजकाकडेच जातं. त्यांचं नांव दादीभॉय नोशेरवानजी दादीसेठ..! मुंबईतली ‘दादीसेट अग्यारी’ स्थापन करणारे हेच ते दादीभॉय नोशेरवानजी..!

सन १८५४ साली मुंबईत जेंव्हा पहिली कापड गिरणी स्थापन झाली, तेंव्हा मुंबईत एकूण असे १३ ‘गिरणीचे कारखाने’ होते. एका कारखान्यात साधारण ५-६ गिरण्या, म्हणजे कॉटन स्क्रू किंवा प्रेस असत. एक गिरण चालवण्यासाठी साधारणत: ३० गड्यांची गरज असे. म्हणजे पाच-सहा गिरण्या असलेल्या एखाद्या कारखान्यात दोनेकशे गडी काम करत असत. हे गिरण्यांचे कारखाने जास्त करुन आताच्या कुलाबा कॉजवेच्या परिसरात व काही तुरळक फोर्ट विभागात होते.

पुढे पुढे कापूस ज्या महाराष्ट्रातील विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू इत्यादी प्रदेशात पिकत असे त्याच ठिकाणी असे कॉटन प्रेस स्थापन होऊ लागले. त्यामुळे त्यांचाही मुंबईपर्यंतचा वाहतूक खर्च कमी होऊ लागला आणि हळुहळू मुंबईतले कॉटन प्रेस कमी होऊ लागले आणि त्यांची जागा मुंबईतल्या कापड गिरण्यांनी घ्यायला सुरुवात झाली..!

त्यांची कहाणी पुढच्या भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

05.06.2021

टीपा-

1. कॉटन प्रेस कसे असत याची कल्पना यावी यासाठी इंटरनेटवरून घेतलेलं छायाचित्र सोबत दिलेलं आहे. त्यात दिसणारे आडवे दांडे गड्यांच्या मदतीने फिरवले जात असत व त्या प्रेसच्या खालच्या भागातल्या कापसाची गासडी दाबली जात असे.

2. मडगांवकरांनी ‘नोर’ असा शब्द वापरला आहे, तो भाडं या अर्थाने, की कमिशन या अर्थाने हे लक्षात येत नाही. नोरच्या शब्दाची स्पेलिंग नेमकी कशी करत ते ही समजत नाही.

3. मडगांवकरांच्या पुस्तकात मुंबईतला पहिला गिरणीचा कारखाना काढण्याचं श्रेय दादाभाई पेस्ननजी यांना दिलंय. ते बहुतेक दादीभॉय नौशेरवानजी हेच असावेत. कारण अन्य एका पुस्तकात मुंबईतला पहिला कॉटन प्रेस काढण्याचं श्रेय त्यांना दिलंय. पारशी माणसांच्या नावांतला गोंधळ, गोऱ्या साहेबांनी त्यांच्या स्पेलिंगमधे घातलेला आणि आपण काळ्या साहेबांनी इमानेइतबारे पुढे चालू ठेवलेला तो घोळ एवढा आहे की, आपणांस सापडलेला व आपण शोधत असलेला माणूस तोच आहे हे खात्रीने सांगता येत नाही. उदा. नौशेरवानजी म्हणजेच नुसेरवानजी की वेगळे, दादीभॉय व दादाभॉय एकच की वेगळे इत्यादी गोंधळ होतो.

संदर्भ-

1. ‘मुंबईचें वर्णन’-गोविंद नारायण मडगांवकर-आवृत्ती, सन २०१३-रिया प्रकाशन, कोल्हापूर-पृष्ठ संख्या २२७-२२८.

2. The Gazetteer of Bombay City & Island- Nov. 2010 edition- Vol. I -pages 32, 309, 332, 485, 497; Vol III-page 69.

3. Book – Parsi Lustre on Indian Soil- Vol I, 1939, H. D. Darukhanawala, page-34.

4. Handbook of the Bombay Presidency; With an account of Bombay City.-1881, Second Edition. -page-128.