देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आपण..

देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आपण..

आपल्या देशाने ब्रिटिशांशी लढून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळवलं, याचा आपल्याला कोण अभिमान असतो, नाही? पण या लढ्याविषयी, त्यात भाग घेतलेल्या व प्रसंगी प्राणाचं बलिदान दिलेल्यांविषयी आपल्याला फारच कमी माहिती असते.

आपण भारतीय फारच उत्सव प्रेमी असतो. अनेक उत्सव आपण साजरे करत असतो. त्यापैकीच ‘स्वातंत्र्यदिन’ हा देखील एक उत्सव बनून राहिला आहे. त्यातलं गांभिर्य पार हरवलं आहे..स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करताना, ते स्वातंत्र्य, १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या काळात किती जणांच्या बलिदानावर आधारलेलं आहे, हे मात्र आपण विसरतो.

आपल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती नेहरु, गांधी, मौलाना आझाद आणि अशीच काही आणखी नांवं या पलिकडे जात नाही. पण या लढ्यात अनेक सामान्य माणसांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, हे आपल्या गांवीही नसतं..!

हे लिहिण्याचं कारण म्हणजे, कालच मला अचानक सापडलेली, १८५७ ते १९४७ या दरम्यान झालेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या विरांची माहिती असलेली डिक्शनरी..!

सहज म्हणून ही डिक्शनरी चाळताना जी माहिती माझ्या समोर आली, ती आश्चर्य कारक होती. आपल्याला, दिनाॅक १२ डिसेबर १९३० साली परदेशी मालाच्या ट्रकखाली स्वतःला झोकून देऊन, हुतात्मा झालेल्या ‘बाबु गेनुं’विषयी ऐकून का होईना, पण माहिती असते. परंतु, आणखी एका बाबु गेनुंने, ‘छोडो भारक’ आंदोलनात दिनांक १३ सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांची गोळी छातीवर झेलून हौतात्म्य पत्करलेलं असतं, हे कुठे आपल्याला माहित असतं..!

या डिक्शनरीतील नांव A या इंग्रजी अक्षरापूसून सुरू होऊन Z या अक्षराने संपतात. A अक्षराने सुरू होणाऱ्यी नांवात साधारणतः दिड-दोनशे नांवं आहेत आणि त्यातली अर्धी अधिक अब्दुल, अबिद, अली, अहमद इत्यादी मुसलमानांची नांवं आहेत. देशात सध्या मुसलमानांविषयी जी द्वेषभावना जाणूनबुजून निर्माण केली जात आहे आणि देशवासीय त्या विखारी भावनेच्या आहारी जात आहेत, हे चांगलं नाही. ह्या देशाच्या स्वातंत्र्यात सर्वांचा समान वाटा आहे, हे अशी पुस्तकं वाचताना समजत जातं. म्हणून अशी पुस्तकं वाचायला हवीत.

अक्कल गहाण ठेवून ‘राजकीय धर्मांध’ बनत चाललेल्या ह्या आपल्या देशबांधवांनी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुसलमानांसहित सर्व धर्माच्या लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, याची माहिती करुन घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक हुतातम्याचं नांव, त्यीचं राहाण्याचं ठिकाण, बलिदानाचं ठिकाण व कारण इत्यादी माहिती ८-१० ओळीत यात दिलेला आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली ही डिक्शनरी, एकूण पांच खंडात आहे. त्यातला तिसरा खंड महाराष्ट्र, गुजरात आणि सिंध प्रांतातील स्वातंत्र्य विरांची माहिती देणारं आहे. सर्वांनी हे उत्सुकतेपोटी वाचणं आवश्यक आहे.

माझ्याकडे या तिसऱ्या खंडाची पीडीएफ आहे. कुणाला हवी असल्यास त्यांनी आपल्या व्हाट्सॲप क्रमांकावरुन, माझ्या व्हाट्सअॅप 9321811091 या क्रमांकावर मेसेज पाठवल्यास, त्यांना मी ही प्रत त्वरीत पाठवू शकेन.

-नितीन साळुंखे
9321811091

मला उमजलेले दत्त..

आज श्री दत्त जयंती..

मी जेव्हा आपल्या दैवतांचं चार हस्ती शंख-पद्म-चक्र-गदा किंवा तत्सम काहीतरी धारण केलेल्या पारंपारीक रुपाचा अर्थ शोधायचा जेंव्हा प्रयत्न करतो, तेंव्हा बरंच काहीतरी सापडतंय किंवा ती मुर्ती सांगू पाहातेय असं मला नेहेमी वाटतं. कारण ती केवळ एक ठराविक स्वरुपातली मुर्ती किंवा साचेबद्ध प्रतिमा नसून, आपल्या प्राचिन पुर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला त्यांचा काहीतरी महत्वाचा संदेश आहे, असं मला नेहेमी वाटतं. मुर्ती केवळ प्रतिक असतं. त्या प्रतिकामागचा अर्थ आपण घ्यायचा असतो. होतं नेमकं उलटं. आपण मुर्तीत(च) अडकतो, ती काय सांगू पाहातेय याकडे लक्ष देत नाही.

श्री अक्कलकोट स्वामींच्या ओवीरुप चरित्रात श्री दत्त महाराजांचं वर्णन, “चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।” असं केलंय. या श्लोकातील पहिल्या दोन ओळी दत्तगुरुंच्या तसबिरीत प्रत्यक्ष पाहाता येतात. आणि या दोन ओळीच मला ‘श्री दत्तां’चा खरा अर्थ सांगतात असं वाटतं.

चार वेद म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे ज्ञानाचं प्रतिक. पुस्तकांचं वाचन आपल्याला जगभराचंच कशाला, तर ब्रम्हांडाचंही ज्ञान देतं हे मी काही नव्यानं सांगायला नको. ‘चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन ।’ या ओळीत ग्रंथांना ‘श्वान’, म्हणजे कुत्र्याची उपमा दिली आहे. ज्याला एकदा जवळ केलं, की तो आपल्याला कधीच अंतर देत नाही.

कुत्रा हा प्रामाणिकपणाबद्दल प्रसिद्ध आहे. जर, वेद म्हणजे ग्रंथ, ग्रंथ म्हणजे ज्ञान असेल तर, ज्ञान म्हणजे श्वान, जे, ते प्राप्त करणाराशी प्रामाणिक राहातं, त्याच्या रात्रंदिन समिप राहातं, असा अर्थ लावला तर चुकणार नाही. म्हणून त्या मुर्तीला शरण जाऊन कर्मकांडात अडकणं म्हणजे केवळ दगडावर डोकं आपटणं आहे. तसं केल्यानं ‘मोक्ष’ प्राप्त होईल हा आपला गैरसमज आहे. त्यातून हाती लागेल, तो केवळ कपाळमोक्ष(च)..! म्हणून मुर्तीऐवजी ज्ञानाला शरण जाणं आवश्यक आहे. ते ज्ञान आपल्याला कधीच अंतर देणार नाही. ते ‘वसेल समीप रात्रंदिन’..! ज्ञानामुळे अज्ञानापासून मुक्ती मिळते आणि तोच खरा मोक्ष..!

आता खुद्द ‘दत्त’ महाराजांबद्दल. दत्त हा शब्द इंग्रजीत लिहिला असता, तो ‘DATTA’ असा लिहावा लागतो. ह्या इंग्रजी शब्दाकडे नीट पाहा. तो सध्याचा परवलीचा शब्द, ‘DATA’ सारखा वाटतोय का? वाटतोय का म्हणजे काय, तो आहेच तसा. सध्याच्या अंतराळ युगात, ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..!.

इंग्रजी ‘डाटा’ला, मराठीत ‘विदा’ असा प्रतिशब्द आहे. हा ‘विदा’ शब्द पुन्हा ‘वेद’ या शब्दाशी साम्य सांगणारा आहे. म्हणजे पुन्हा, वेद म्हणजे ग्रंथाचं प्रतिक, ग्रंथ म्हणजे ज्ञानाचं प्रतिक आणि ज्ञान म्हणजे पुन्हा ‘डाटा’ म्हणजे दत्त, असा हा प्रवास होतो.

जेंव्हा आपण कंप्युटरसमोर बसून काही विषयांची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तेंव्हा तो एका क्षणात, विषय परस्पर विरोधी असले तरी, तो जगभरातून आपल्यासमोर आणून उभं करतो. या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदातील श्लोकातील नंतरच्या दोन ओळी, ‘ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।’ हेच तर सांगतात. मनासारखा प्रचंड वेग आणि मनासारखंच काही क्षणांत त्रिखंडात विहरुन, त्रिखंडातलं ज्ञान आपल्यासमोर सादर करणं, हे संगणकाला Dat(t)a मुळे शक्य होतं.

दत्तांचं वर्णन करणाऱ्या श्लेकातील आणखी काही ओळी,

“कामधेनू असोनि जवळी ।

हाती धरिली असे झोळी ।

जो पहाता एका स्थळी ।

कोणासही दिसेना ॥”

अशा आहेत. कामधेनू इच्छापूर्तीचं प्रतिक. ग्रंथ आपल्याला मनोवांछित विषयाचं ज्ञान करून देतात. जो ज्ञानाचा उपासक असतो, तो झोळी पसरूनच असतो. तो ज्ञानाचा याचक असतो. ‘याचक’ आणि ‘वाचक’ यातील साम्यही मला हेच सांगते. आणि ज्ञान कोणत्याही एका स्थळी कसं असेल, ते तर यत्र तत्र सर्वत्र पसरलेलं असतं. असं असुनही ते दिसत नाही, शोधावं लागतं, दत्तगुरूंची आळवणी ती हिच..!!

एकदा का ज्ञान प्राप्तीचं ध्यान लागलं, की मग आपण आपण उरत नाही. तना-मनाचं भान हरपतं. अवघ विश्व एकच होऊन, मी तू पणाचा लोप होतो. श्री दत्तांच्या आरतीत उगाच नाही म्हटलंय, की ‘डाटा डाटा ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ अशी समाधी लागायला वेळ लागत नाही आणि असं झालं की, मग आपण, आपोआप मुर्ती आणि कर्मकांडातून बाहेर पडतो आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग धरतो..!

थोडक्यात मला समजलेला दत्तांचा अर्थ म्हणजे ज्ञान.

आजच्या कंम्प्युटर युगात,’Datta’ म्हणजे ‘Data‘ ज्ञान..!

दत्त तारून नेतो की नाही, ते मला सांगता येणार नाही. माझ्या मते तो तसा तारुन नेत नाही. पण Data, Data असं ध्यान सागलं, तर ते मात्र निःसंशय तारुन नेतं. एकदा का Dataचा नाद लागला, की ‘संसारतापे अति शिणलो मी’ अशा निरुत्साही करणाऱ्या भावना कोसो दूर पळतात. काही थकलं भागलं जाणवत नाही. खऱ्या अर्थाने सतत काही तरी नविन समोर आणणारा, ताजंतवाना ठेवणारा गुरु म्हणजे ज्ञान, डाटा..!!

मला जाणवलेले श्री दत्तगुरू असे आहेत असं मी मानतो, तुम्ही मानावं असा माझा आग्रह नाही.

जय जय गुरुदेव dat(t)a..

-नितीन साळुंखे

9321811091

टीप- Data म्हणजे माहिती. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे मला समजतं. परंतु, माहिती म्हणजे ज्ञानाकडे जाणाऱ्या उन्नत मार्गावरची पहिली पायरी आहे, असं मी समजतो.