दिनांक १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईच्या ‘व्हिक्टोरिया डॉक’ मध्ये उभ्या असलेल्या जहाजात झालेल्या स्फोटाची संपूर्ण कहाणी- एकूण ‘तीन (३)’ भागात )– भाग १

एस. एस. (सप्लाय शिप) फोर्ट स्टायकिन’ – भाग १ /३

शुक्रवार दिनांक १४ एप्रिल १९४४ ची नेहेमीसारखीच शांत दुपार. स्थळ सिमला*, वेधशाळा. वेधशाळेतील नेहेमीची काम चालू होती. दिवसभरात काही विशेष घडलेलं नव्हतं. दुपारचे चार वाजलेले होते. पुढच्या दोनेक तासात, दिवसभराची नेहेमीची काम आटोपून घराकडे जायची वेळ होणार होती. कर्मचाऱ्यांची लगबग चालली होती. सवयीने तिथे लावलेल्या असंख्य यंत्राच्या तबकड्यांवर कर्मचारी अधून मधून नजर टाकून, सर्व आलवेल असल्याची खात्री करत होते. एकुणात रुटीनमधे काही वेगळं घडलेलं नव्हतं.

चार वाजून सहा मिनिट झाली आणि अचानक वेधशाळेत बसवलेल्या भूकंपमापक यंत्राचा (Seismograph) काटा जोरात हलू लागला. वेधशाळेतले अधिकारी सावध झाले. कुठेतरी दूर अतिशय तीव्र भूकंप झाला होता. अधिक तपशिलात गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की यंत्रावर नोंद झालेल्या त्या भूकंपाचं केंद्र, सिमल्यापासून दूर साधारण दीड-दोन हजार किलोमीटर अंतरावर कुठेतरी असावं. ते जमिनीवर किंवा समुद्रातही असू शकत होतं. पण नेमकं कुठे, ते कळण्याची त्या यंत्रात सोय नव्हती. कळलं फक्त एवढचं की, तो अतिशय तीव्र असा भूकंप असावा.

पुढच्या दहा-पंधरा मिनिटात, वेधशाळेचे कर्मचारी यंत्रावर नुकत्याच नोंद झालेल्या  भूकंपाची माहिती वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये नोंदवण्यात गुंतले. तेवढ्यात पुन्हा, सहा वाजून वीस मिनिटांनी, आणखी एका मोठ्या भूकंपाची नोंद यंत्र घेऊ लागलं. हा भूकंप पहिल्यापेक्षा कितीतरी मोठ्या तीव्रतेचा असावा. सेस्मोग्राफचा काटा अंगात आल्यासारखा घुमू लागला होता. यंत्राच्या डायलवरचे आकडे त्याला अपुरे पडत होते. वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना भयंकराची चाहूल लागली. हे भूकंपापेक्षा काहीतरी वेगळ घडतंय हे आणि एवढंच फक्त सिमला वेधशाळेला समजलं. आता जी नोंद झाली, ती भुकंपाची आहे की धरणीभंगाची, याता त्यांना अंदाज येत नव्हता. आणि ते जे काही झालं आहे, ते नेमकं कुठे, याचा काहीच अंदाज त्यांना येत नव्हता. साधारण २ हजार किलोमीटर परिघात काहीतरी मोठी घटना घडली असावी, एवढं आकलन त्यांना झालं.

वेधशाळेतल्या जुन्या कर्मचाऱ्यांना १९३५ साली क्वेट्टात झालेल्या ( सध्या पाकिस्तान) भूकंपाची आठवण झाली. रिश्टर स्केलवर ७.७ दाखवणाऱ्या त्या भूकंपात साधारण ५०-६० हजार माणसं मृत्यू पावली होती. त्याहीपुर्वीचा मोठा भूकंप झाला होता, तो जपान मध्ये. तो ८.८ रिश्टर स्केलचा होता. पण त्यापेक्षा आता जे काही घडत होतं, ते जास्त भयानक असल्याची आशंका त्यांच्या मनात आली. कारण आता जे दोन धक्के त्यांच्या वेधशाळेने नोंदवले, ते, तोवर नोंदवलेल्या रिश्टर स्केलच्या पुढे जाणारे होते. म्हणजे जे काही झालं आहे, ते महाभयंकर असलं पाहिजे. पुन्हा, क्वेट्टाचा भूकम जेमतेम दीड-पावणेदोन मिनिटांचा होता. तर आता १५-२० मिनिटांच्या कालावधीत जे काही घडत होत, त्याने किती विध्वंस झाला असावा, ह्याची कल्पनाही ते करू शकत नव्हते.

नेमकं काय घडलं असावं, त्याचा अंदाज येत नव्हता. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. इंग्लंड युद्धात सामील होते. भारत ब्रिटीशांची वसाहत. एखादा मोठ्या क्षमतेचा बॉम्ब टाकला गेला, की दुसरं काही घडलं, हे त्या दूर एका कोपऱ्यात असलेल्या वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना समजेना.

१९४४ चा फेब्रुवारी महिना. स्थळ इंग्लंड. लिव्हरपूलमधील ‘मेर्सी (Mersey)’ नदीवरील ‘बर्कनहेड (Birkenhead)’ बंदरात, ७१४२ टनी, ४२४ फुट लांबीचं, ‘एस. एस. फोर्ट स्टायकीन ( S. S. Fort Stikin)’ नांवाचं मालवाहू जहाज उभं होतं. कॅनडामधील (ब्रिटीश कोलंबिया) ‘प्रिन्स रुपर्ट ड्राय डॉक’ मध्ये बांधण्यात आलेल्या ह्या जहाची नोंदणी लंडनमध्ये झालेली होती. ह्या जहाजाची मालकी ब्रिटीश सरकारची होती. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्याने, हे जहाज युद्धोपयोगी साहित्याच्या वाहतुकीसाठी, दोस्त राष्ट्रांच्या War Shipping Administration द्वारा आरक्षित करण्यात आलं होतं.

‘एस. एस. फोर्ट स्टांयकीन’ जहाज

जहाज व्हाया कराची मुंबईला जायला निघालं होतं. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. भारतावर जपानच्या आक्रमणाचं सावट घोघावत होतं. युद्ध इंफाळपर्यंत येऊन ठेपलं होतं. त्यामुळे बहुतेक जहाजं युद्धसाहित्याची ने-आण करण्यात गुंतलेली होती. फोर्ट स्टायकीन जहाजातही विविध युद्धोपयोगी साहित्य भरण्याची लगबग चालली होती. लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग, वेगवेगळ्या क्षमतेचे बॉम्ब्स, बंदुकांच्या गोळ्या, हत्यारं, भू आणि पाणसुरुंग, गंधक आणि अतिशय संहारक क्षमतेचा, जवळपास १४०० टन वजन भरेल इतका दारुगोळा ह्या जहाजावर चढवला जात होता.

दारुगोळ्याव्यतिरिक्त जहाजावर १० लाख पौंड (१९४४ चे १० लाख पाउंड्स बरं का..!) किमतीच्या आणि जवळपास ३८२ किलो वजनाच्या अस्सल सोन्याच्या विटाही (खरं तर १०० आणि ५० ग्रामची बिस्किटं) चढवल्या जात होत्या. हे सोनं बँक ऑफ इंग्लंडकाढून भारताच्या रिझर्व बँकेत जमा करण्यासाठी पाठवलं जात होत. सोनं पॅकिंग करताना विशेष काळजी घेतली होती. १२ किलो ७०० ग्राम वजन सोन्याच्या विटांची एक पेटी, अशा एकूण ३० लाकडाच्या पेट्यांमधे सोनं ठेवलं होतं. जास्तीची काळजी म्हणून ह्या लाकडी पेट्या, पोलादाच्या ३० मजबूत पेट्यांमध्ये पॅक करून, त्या पेट्या वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आल्या होत्या.

 समान ठेवण्यासाठी बोटीत एकूण पाच मोठे कप्पे होते. जहाजात ठेवण्यात येणाऱ्या सामानाचं वजन विभागलं जाऊन, जहाजाचा तोल सांभाळला जावा ह्या हेतून ती विभागणी केलेली होती. सोन्याच्या पोलादी पेट्या दोन क्रमांकाच्या कप्प्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्याच कप्प्यात २०० टनाचा दारुगोळा ठेवण्यात आला. ज्याची विध्वंसक क्षमता जास्त आहे, असा १२० टन वजनाचा दारुगोळा पहिल्या आणि आणखी एक हजार टन दारुगोळा चौथ्या कप्प्यात ठेवण्यात आला. बाकीचे बोंब, बंदुका, गोळ्या, लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग कप्पा क्रमांक एक ते पाच मध्ये विखरून ठेवण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कप्प्यात, शिल्लक असलेल्या जागेत इतर समान लादण्यात आले.

एस. एस. फोर्ट स्टायकीन जहाजाचा ४५ वर्षाचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ (A. J. Naismith) जहाजावर लादल्या जाणाऱ्या सामानावर काळजीपूर्वक लक्ष ठेवून होता. जहाजाच्या स्टोवेज प्लानमधे (कुठे काय सामान ठेवलंय ते दर्शवणारा नकाशा) त्याची नोंद करत होता. जहाजात भरल्या जाणाऱ्या सामानाचं स्वरुप आणि प्रमाण पाहून त्याला थोडी चिंता वाटत होती. अर्थात, स्फोटकं आणि दारुगोळा लादलेलं जहाज घेऊन दूर दूरच्या बंदरांत जायची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती. परंतु या खेपेस दारुगोळा, अति विध्वंसक स्फोटकं मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली होती. शिवाय ४०० किलोच्या आसपास भरेल एवढं शुद्ध सोनंही जहाजावर लादण्यात आलं होतं. ही मोठीच जोखीम होती.

यापुर्वीही त्याने फोर्ट स्टायकीनसोबत, जगभरातल्या बंदरात चार वाऱ्या केल्या होत्या. ह्या जहाजाची त्याला खडानखडा माहिती होती. अतिशय सर्वसाधारणसं दिसणारं ते जहाज, होतं मात्र अत्यंत विश्वासार्ह. ज्यावर अगदी बिनधास्त विसंबून राहावं असं, त्याचं लाडकं जहाज होतं ते. आजवरच्या प्रवासात जहाजाने कधीही धोका दिल्याचा त्याचा अनुभव नव्हता. निर्जीव मशिन असलं म्हणून काय झालं, तिच्यावर जीव लावला, की ते मशिनही आपल्यावर जीव लावतं, हा अनुभव आपण आजही घेतोच. मग नेहेमीच प्राणाशी गाठ असणाऱ्या समुद्रावर बाराही महिने संचार करणाऱ्या त्या लोकांचा, ज्या मशिनच्या आधारे ते समुद्रावर जातात, त्या मशिनवर जीव असणं स्वाभाविकच म्हणायला हवं.

परंतु दिवस युद्धाचे असल्याने. जर्मन यू-बोटींचा आणि जपानी विनाशिकांचा आणि पाणबुड्यांचा महासागरात संचार होता. त्यापासून सावधगिरी बाळगत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याने ठासून भरलेलं आणि सोनं असलेलं ते जहाज, जवळपास ४ हजार नॉटिकल्स मैलाच्या अंतरावर असलेल्या मुंबंईपर्यंत घेऊन जायचं म्हणजे काळजी वाटणं सहाजिकच होतं..

दारुगोळ्याची वाहतूक नायस्मिथसाठी नेहेमीचीच होती. मात्र या वेळेला जहाजावर केवळ दारुगोळाच नव्हता, तर मोठ्या प्रमाणावर सोनं होतं. अर्थात, ह्या जहाजावर सोनं जातंय, हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहिती होतं. पण न जाणो, ती बातमी शत्रुच्या गोटाला कळली तर, शत्रू काही करुन नायस्मिथच्या जहाजावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. युद्धाच्या दिवसात एखाद्या देशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं नष्ट करण्याने, युद्धाचं पारडं फिरवता येणं शक्य होतं. शत्रू ती संधी कधीही सोडणार नाही. फोर्ट स्टायकीनचा कॅप्टन नायस्मिथ या काळजीने जास्त घेरला होता.

जहाजाचा चीफ इंजिनिअर होता अलेक्स गो ( Alex Gow). जहाजाच्या राक्षसी इंजिनवर ह्याची हुकुमत होती. प्रचंड मोठ्या आकाराचीआणि असंख्य पायपांचं गुंतागुंतीचं जंजाळ असणाऱी इंजिन रुम म्हणजे अलेक्सचं साम्राज्य. इंजिन सतत खेळतं (म्हणजे धावतं) ठेवण्याची जबाबदारी अलेक्सची होती. केवळ इंजिनच नव्हे तर, जहाजाला लागणारं इंधन, विजेसाठी लागणारा डायनामो, रेडीओ सिस्टीम इत्यादीची जबाबदारीही अलेक्स आणि त्याच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची होती. मात्र तो ही ह्या खेपेला जरा चिंतेत होता. युद्ध साहित्याची सातत्याने वाहतूक करावी लागल्यामुळे, इंजिनाची आवश्यक ती देखभाल (सर्व्हिसिंग) करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नव्हता. काही किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याने बोटीच्या कप्तानाला आणि इतर संबंधीत अधिकाऱ्यांना तसं सांगणाचा प्रयत्न केला, परंतु बोटीवरचं सामान तातडीने ठिकाणावर पोहोचवणं गरजेचं असल्याने, अलेक्सला सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. सल्ला कसला, आदेशच तो. बोटीची धुरा युद्धखात्याकडे असल्याने, त्या काळात त्यांचे सल्ले म्हणजे आदेशच असायचे. पर्यायच नसल्याने अलेक्सने, लिव्हरपूल ते मुंबई, व्हाया कराची ह्या ट्रिपमधेच जेंव्हा केंव्हा संधी मिळेल, तेंव्हा इंजिनाची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याचं त्यांने ठरवलं होतं. शक्त झाल्यास पोर्ट तौफिकमधे, एडनला, कराचीत, नाहीतर मग मुंबईत पोहोचल्यावर..!

जहाजाचा प्रवास फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजिक असलेल्या बास्कच्या आखातातून (Bay of Biscay किंवा Basque) खाली दक्षिणेला जाऊन, युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणाऱ्या आणि अटलांटींक आणि भुमध्य समुद्राला जोडणाऱ्या जिब्राल्टर स्ट्रेट (जिब्राल्टर रॉक) पार करुन, पुढे सुएझच्या कालव्यातून निघून, लाल समुद्रातील येमेन-ओमानच्या आखातात जायचं आणि तिथून पुढे प्रथम कराची आणि मग मुंबई बंदरात शेवट, असा होणार होता.

त्याकाळच्या पद्धतीनुसार फोर्ट स्टायकीन एकटं जाणार नव्हतं, तर अनेक मालवाहू जहाजांचा एक काफिला सोबतच निघणार होता. सोबत संरक्षक बोटीही असणार होत्या. त्या काफिल्यातली फोर्ट स्टायकीनची जागा नक्की होती. फक्त फोर्ट स्टायकीनने एका रांगेत न जाता, रांगेपासून फटकून थोडं डाव्या अथवा उजव्या बाजूने पोहायचं होतं. जहाजांचा हा बेडा जाताना, जर्मन यू-बोटींना फोर्ट स्टायकीनवरील विध्वंसक मालाचा सुगावा लागून, त्यांना त्याच्यावर हल्ला केलाच, त्याच्यात ठासून भरलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन इतर जहाजांना नुकसान पोहोचू नये, ह्यासाठी फोर्ट स्टायकीनने रांगेत न जाता, रांगेपासून काही अंतर राखून प्रवास करायचा होता.

फोर्ट स्टायकीन आणि बेड्यातली इतर जहाजं जिब्राल्टर स्ट्रेटपर्यंत एकत्रच प्रवास करणार होती. जिब्राल्टर पासपाशी पोहोचल्यानंतर, काफिल्यातल्या काही बोटी उजवीकडे वळून, दक्षिण दिशेला असलेल्या आफ्रिकेतल्या काही बंदरांवर जाणार होत्या, तर फोर्ट स्टायकीन आणि उर्वरीत बोटी आशिया खंडाच्या दिशेने कूच करणार होत्या..!

२४ फेब्रुवारी, १९४४ या दिवशी सकाळी काफिला आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी एकत्रच निघाला. हवामान चांगलं नव्हतं. पाऊस पडत होता. कडाक्याचा गारठा होता. पाऊस आणि धुक्यामुळे दृष्यमानताही कमी होती. वास्तवीक अशा वातावरणात सामुद्री प्रवास करत नसत. पण युदंधकाळात अशा गोष्टींचा विचार केला जात नाही. इंग्लंड लढाईत उतरलेलं होतंच. विविध आघाड्यांवर लढत असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला वेळेत रसद पोहचवणं गरजेचं असतं. म्हणून खराब हवामानाचा धोका पत्करुन जहाजांच्या कप्तानांनी आपापली जहाजं समुद्रात लोटली होती.

पुढचे दोन दिवस हवामान खराबच होतं. जहाजांचा बेडा सावधगिरीने पुढे चालला होता. जर्मन बोटींवर नजर ठेवावी लागत होती. पाऊस, धुकं आणि थंडीमुळे ते अवघड होत होतं. समुद्रही खवळलेला होता. पण त्यातूनही मार्गक्रमणा सुरु होती.

निघाल्यापासून तिसऱ्या दिवशी थोडी उघडीप मिळाली. पुढे तीन-चार दिवस सर्वच शांत होतं. आकाश निरभ्र झालं होतं समुद्रही शांत होता. समुद्रात काही जर्मन बोटी संचार करत नाहीत ना, यावर नजर ठेवणं एवढाच काम उरलं होतं. जहाजावर सारे निश्चिंत होते.

पण हा निश्चिंतपणा फार काळ टिकला नाही. वर आकाशात लांबून विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. विमानं नजरेस पडत नव्हती, तरी सगळेच सावध झाले.  एवढ्यात विमानं दिसू लागली. एकूण सहा विमानं घिरट्या घालताना दिसु लागली. नक्की कोणाची विमानं आहेत, ते कळत नव्हतं. तरीही सावधगिरी म्हणून संरक्षक बोटीवरील विमानविरोधी तोफा आकाशाच्या दिशेने रोखल्या गेल्या. परंतु काहीच झालं नाही. त्या विमानांनी काही वेळ घिरट्या घातल्या आणि ती आकाशात गडप झाली. बोटीवरील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बोटींचा ताफा पुढच्या प्रवासाला निघाला.

इंग्लंडहून निघतानाच ठरल्याप्रमाणे, जिब्राल्टर स्ट्रेटपाशी जहाजांचा ताफा दोन गटांत विभागला गेला. इथून काही जहाजं आफ्रिका खंडातल्या देशांतील बंदरात जाण्यासाठी वळल्या, तर फोर्ट स्टायकीन आणि उर्वरित इतर जहाज, सुवेझ कालव्याच्या दिशेने निघाली.

सुवेझ कालव्यापर्यंतचा पुढचा टप्पा जवळपास हजार मैलांचा आणि बारा-पंधरा दिवसांचा होता. हा टप्पा मात्र निर्विघ्नपणे पार पडला. जर्मन बोटींची अथवा पाणबुड्यांची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. डोक्य्वर घिरट्या घालणारी विमानंही नजरेश पडत नव्हती. ह्या हजार मैलांच्या प्रवासात, बाहेर युद्ध सुरु आहे की काय, याची शंका यावी, असंच वातावरण होतं. तरीही फोर्ट स्टायकीनवरील अधिकारी आणि कर्मचारी सावध होते आणि बेचैनही होते. आपण एक प्रचंड मोठ्या बॉम्बवर बसून प्रवास करीत आहोत, याचा विसर पडलेला नव्हता. चीफ इंजिनिअर अलेक्स गो, बोटीचं इंजिन मधेच बंद पडू नये यासाठी मनातल्या मनात येशूची आळवणी करत होता. परंतु मनातली घालमेल आपल्या चेहेऱ्यावर दाखवत नव्हता. जिथे पहिली संधी मिळेल, तिथे इंजिनाची बारीक-सारीक सुरुस्ती करयची त्याने ठरवलं होतं.

आणखी काही दिवसांनी ‘पोर्ट सैद’ आलं आता हा काफिला सुवेझ कालव्यात प्रवेश करणार होता. सुवेझ कालवा पार करण्यासाठी, जहाजांच्या बेड्याला, त्यांचा नंबर येईपर्यंत काही काळ वाट पहावी लागली. जेवढा वेळ जात होता, तेवढा वेळ अलेक्स अस्वस्थ होत होता. बोटीचं इंजिन त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं.

पोर्ट सैद

थोड्याच वेळात जहाजांच्या ताफ्याला सुवेझ कालव्यात प्रवेश करण्याची वर्दी मिळाली. सुवेझ कालवा पार करून जहाजं, कालव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या ‘पोर्ट तौफिक’ येथे आली. इथे काही काळ फोर्ट स्टायकीन इंधन घेण्यासाठी थांबणार होतं.

बोट पोर्ट तौफिक येथे पोहोचली. बोटीवर इंधन भरून होईपर्यंत, कॅप्टन नायस्मिथने बोटीवरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतेय की नाही, याची तपासणी केली. अलेक्सने बोटीच्या इंजिनावर नजर फिरवली. अजून पर्यंत तरी सर्व आलवेल असल्याचं दिसत होतं. परंतु मोठी दुरुस्ती आणि इंजिनाची सर्व्हिसिंग करावीच लागणार होती. इथून पुढे बोट, लाल समुद्र पार करून, येमेन देशातल्या ‘एडन’ बंदरात थांबणार होती. पुढचा थांबा होता कराची बंदराचा. या प्रवासात फोर्ट स्टायकीन सोबतीला, आणखी एक ब्रिटीश मालवाहू जहाज असणार होतं. बाकीची जहाजं इथेच थांबणार होती. एडनवरून कराची जवळपास ५०० मैलांवर होतं. ह्या प्रवासात काही विघ्न आलं नाही तर, हा प्रवास एकूण सहा-सात दिवसांचा होता.

पोर्ट तौफिक मध्ये इंधन घेऊन निघालेल्या फोर्ट स्टायकीनने, दिनांक २४ मार्चला एडनला स्पर्श केला. त्याच दिवशी तिने एडन सोडलं आणि ती कराचीच्या दिशेने निघाली. कराचीचा थांबा मोठा होता. फोर्ट स्टायकीन दोन-तीन दिवस कराची बंदरात थांबणार होती. बोटीमधलं बरचसं समान कराचीला उतरवण्यात येणार होतं.

३० मार्चला बोट कराची बंदरात पोहोचली. धक्क्यावारचे अधिकारी बोटीवर आले. बोटीत ठेवलेल्या सामानाचा आराखडा (Stowage Plan- बोटीमध्ये कोणतं समान कुठे ठेवलं आहे, ते दर्शवणारा आराखडा) त्यांनी तपासून, कराची बंदरात उतरवण्यात येणाऱ्या मालाची पडताळणी केली आणि धक्क्यावर उभ्या असलेल्या मजुरांना, समान उतरवून घेण्याचा इशारा केला.

कराची बंदर

मजुरांची टोळी कामाला लागली. इंग्लंडहून आलेले लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे लहान मोठे सुटे भाग उतरवण्यात आले. बोटीवरील दारुगोळा, स्फोटकं आणि सोनं वगळता, बाकी इतर सर्व समान कराची बंदरात उतरवण्यात आलं. बोट बरीचशी रिकामी झाली. चीफ इंजिनिअर अलेक्स गो, बोटीच्या इंजिनाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता, परंतु त्याला कराची बंदरातील अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. कारण काही कारणाने दुरुस्ती रखडली, तर ते चालण्यासारखं नव्हतं. बोटीतला दारुगोळा आणि सोनं मुंबईला वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. म्हणून बोटीच्या इंजिनाच्या देखभालीसाठी परवानगी देण्यास बंदर अधिकाऱ्यांनी नकार दिला होता.

बोटीवरील बरचसं समान उतरवून, धक्क्यावर उभ्या असलेल्या ट्रक्स आणि रेल्वेच्या वाघीणींमध्ये भरून युद्ध आघाडीवर रवानादेखील केलं गेलं. बोटीवरील जवळपास निम्म्याहून अधिक बोजा कमी झाल्यामुळे, कॅप्टन नायस्मिथ थोडा निश्चिंत झाला होता. वजन कमी झाल्याने, बोटीचा वेग वाढणार होता आणि मुंबईला लवकरात लवकर पोहोचता येणार होतं. अलेक्स गोला देखील मुंबईला कधी एकदा पोहोचतो आणि जहाजाचं इंजिन खोलून त्याची दुरुस्ती करतो, असं झालं होतं.

आता फक्त दीडहजार मैलांचा प्रवास शिल्लक होता आणि मग एकदम आराम. गेले पावणेदोन महिने समुद्रावर असलेले जहाजावरील खलाशी, अधिकारी आणि कर्मचारी मुंबईची वाट पाहत होते. त्याशिवाय त्यांची मोकळीक होणार नव्हती.

परंतु, ३० मार्चला कराची बंदरात पोहोचलेलं फोर्ट स्टायकीन, पुढचे तब्बल १० दिवस कराची बंदरातच होतं. इतके दिवस कराची बंदरात थांबावं लागण्यामागे एक कारण होतं आणि ते होतं, कार्चीत उतरवल्या गेलेल्या सामानामुळे, बोटीवर निर्माण झालेली मोकळी जागा.

बोटीवरचं बरचसं समान उतरवलं गेल्यामुळे, बोटीवर जवळपास ३ लाख घनफूट जागा मोकळी झाली होती. त्यामुळे मुंबईपर्यंतच्या प्रवासात बोटीचा वेग वाढून आपण लवकर मुंबईला पोहोचणार याचा सर्वाना आनंद होत होता. अर्थात प्रत्येकाच्या आनंदाची करणं वेगळी होती. कॅप्टन नायस्मिथ बोटीवर असलेली सोन्याच्या आणि मोठ्याप्रमाणावर असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याच्या जबाबदारीतून मोकळा होणार होता. चीफ इंजिनिअर अलेक्स बोटीच्या इंजिनाची दुरुस्ती आणि देखभाल निवांतपणे करता येईल म्हणून खुशीत होता. खलाशी ‘जीवाची मुंबई’ करता येईल म्हणून खुश होते. बोटीवर स्फोटके असल्याने, गेले पावणेदोन महिने त्यांना साधी सिगारेटही ओढता आली नव्हती. कप्तानाने सिगारेट आणि दारूवर सक्त बंदी घातली होती. मुंबईत पोहोचल्यावर त्यांना ते करता येणार होतं, म्हणून ते खुश होते. तिकडे रिझर्व बँकेचे अधिकारी सोन्याचा साठा येणार म्हणून खुश होणार होते, तर सैन्य अधिकारी त्यांना मोठ्याप्रमाणावर बंदुका, दारुगोळा आणि स्फोटकं, विमानांचे व जहाजांचे सुटे भाग मिळणार म्हणून ते खुश होणार होते. पण ही ख़ुशी फार काळ टिकणार नव्हती.

दिनांक ३ एप्रिलच्या सकाळी ९ वाजता, पुन्हा कराची बंदारावारचे अधिकारी बोटीवर पोहोचले आणि बोटीवर रिकाम्या झालेल्या जागेत आणखी काही समान लादून ते मुंबईला पाठवण्यात यायचं आहे, याची वर्दी त्यांनी कॅप्टन नायस्मिथला दिली. कप्तानाने हे ऐकताच, त्याचा आनंद कुठल्याकुठे गायब झाला. त्याची जागा संतापाने घेतली. इंग्लंडहून निघताना त्याला, कराची बंदरात नव्याने माल घ्यायचं आहे, हे कुणीच सांगितलं नव्हतं. त्याने त्याचा निषेध कराची बंदरातील अधिकाऱ्यांकडे नोंदवला आणि समान चढवून घेण्यास नकार दिला. परंतु त्याच्या विरोधाला न जुमानता, कराची बंदरातील अधिकाऱ्यांनी बोटीत माल चढवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरु असल्याने, कुठल्याही बोटीवरची एक फुट जागादेखील मोकळी जाऊ द्यायची नाही, अशी वरून आज्ञा असल्याचे आणि त्याचं पालन बोटीच्या काप्तनालाही करावे लागेल, असे नायस्मिथला सांगितले.

कॅप्टन नायस्मिथ संतापाने धुसमुसत असतानाच, बोटीतील रिकाम्या जागेत भरावयाच्या सामांच्या गाड्या धक्क्यावर येऊन उभ्या राहिला त्यातलं सामान बघून नायस्मिथ हतबुद्धच झाला. त्याच्या रागाची जागा, प्रथम चिडीने आणि नंतर असहाय्यतेने घेतली. तो काहीच करू शकत नव्हता. आता तो स्वतःवरच चिडला होता.

असं काय होतं त्या सामानात?

(क्रमश:)

-नितीन साळुंखे

९३२१८११०९१

salunkesnitin@gmail.com

*महत्वाची टीप-

या भागाच्या अगदी सुरुवातील जो ‘सिमला वेधशाळेचा’ उल्लेख आहे, ती वेध शाळा प्रत्यक्षात सिमला इथली नसून, पुणे इथली असावी. ‘पुणे वेधशाळा’ या नांवाने ती आपल्याला माहित आहे.

सिमला ही ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असल्याने, बऱ्याच सरकारी संस्था सिमला इथुनही कार्यरत होत्या. वेधशाळाही त्यापैकीच एक. ही वेधशाळा दिनांक २० जुलै १९२८ रोजी पुणे येथे हलवण्यात आली होती. ही वेधशाळा सिमल्याहून पुणे येथे हलवलेली असल्याने, तिला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हणत. किंबहुना ती सिमला ऑफिस या नांवानेच पुणेकरांना परिचित होती/आहे. स्फोट झाला त्या वेळी सिमला येथे वेधशाळा कार्यान्वित नव्हती.

सदरची माहिती लेख लिहिल्यानंतर माझ्या नजरेस आल्याने, मूळ लेखात न देता ‘महत्वाची टीप’ म्हणून देत आहे.

‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?


‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?

मुंबईच्या दक्षिण-मध्या विभागातील ‘माजगांव’ या भागाच्या नांवाच्या जन्माबद्दल माझ्या मनात सुरुवातीपासूनच कुतुहल होतं. हे नांव या विभागाला कसं प्राप्त झालं असावं, याचा मी मला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांच्या मदतीने, माझ्यापरिने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे नांव कसं पडलं त्या विषयी सध्या प्रचलित असलेल्या व्युत्पत्तींचाही या लेखात विचार केलेला आहे. नवीन व्युत्पत्ती मांडताना तर्काचा उपयोग केलेला आहे. त्यातून मला पटलेली नवीन व्युत्पत्ती आपल्यासमोर मांडलेली आहे. परंतु त्या विषयाकडे जाण्यापुर्वी, माजगांवच्या इतिहासातून एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे.

ह्या लेखात, वर म्हटल्याप्रमाणे, प्रथम माजगांवच्या इतिहासाची थोडक्यात उजळणी करुन, नंतर ते नांव कसं पडलं असावं, याची चर्चा केली आहे.

इतिहासातलं माजगांव दक्षिण मध्य मुंबईतलं एक महत्वाचं ठिकाण. एकेकाळी मुख्य मुंबई बेटाची उत्तर हद्द माजगांवला लागुनच होती. मध्ये फक्त उमरखाडीचं पात्र. आता ह्या ठिकाणी डोंगरी भाग असला तरी, त्या काळी हो माजगांवचाच भाग होता.

हळू हळू ह्या माजगांवचं महत्व कमी होऊ लागलं आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतले जुने मुंबैकर ‘वाडीया’तून अवतरले असले तरी, आद्य मुंबैकरांनी ‘भाऊच्या धक्या’वरून मुंबैत प्रवेश केला होता. भाऊचा धक्का आणि माजगांव म्हणजे आई-पोराचे नातं. भाऊच्या धक्क्याचा उंबरा ओलांडून पोटासाठी मुंबईत आलेल्या चाकरमान्यांनी पुढे मुंबैच्या औद्योगिक क्षेत्रात जान आणली आणि मुंबई देशाचं बडं औद्योगिक केंद्र बनवलं. ह्याचं बरचसं श्रेय माजगांवचं.

भाऊचा धक्का..

त्या काळात पैशाची निर्मिती ह्या भागात होत होती. ह्या संपत्ती निर्माणाचं मुख्या यंत्र होतं इथल्या गोद्या. मुख्य मुंबईच्या अगदी कुशीतला हा भाग गोद्यांचा. मुंबई शहरातल्या वाडी बंदर, फ्रिअर बंदर (लोकभाषेत ‘फेर बंदर’ ), प्रिन्सेस डॉक, विक्टोरिया डॉक, इत्यादी महत्वाच्या गोद्या अजूनही इथेच आहेत. देशाच्या काना-कोपऱ्यातून नाना तऱ्हेचा कच्चा माल मुंबईत यायचा, तो इथेच. आणि मुंबैतल्या गिरण्या-कारखान्यांचून पक्का होऊन पुन्हा परदेशी जायचा, तो ही इथुनच. मुंबईचा ‘माजगाव डॉक’ तर आपल्या नावातच ‘माजगांव’ मिरवतोय. एकेकाळी ह्या गोद्यांमध्ये जगभरातून माल इथे यायचा आणि मग तो मुंबईभर जायचा, मुंबई शहरची औद्योगिक चाकं फिरायची, ती इथून येणाऱ्या मालाच्या इंधनावर. तिथून पैशांची, संपत्तीची निर्मिती व्हायची. आज इथली आवक जावक मंदावलीय. एकेकाळी मुख्यत: गोदी आणि गिरणी कामगारांची वस्ती असलेला हा भाग आता हळूहळू उच्चभ्रू होऊ लागलाय.

माजगांव मला माहित होतं. तिकडे जाणं-येणंही होतं. तिथे अजुनही टिकून असलेल्या ‘म्हातारपाखाडी’ नावाच्या गांवात मी जाऊन आलो होतो. अजुनही सोळाव्या शतकातच थांबलेलं आहे, असं वाटायला लावणारं ते गांव, त्याच्या हद्दीत शिरताच आपल्यालाही त्या काळात आपसूकपणे घेऊन जातं. ताडवाडी, नारळवाडी, अंजीरवाडी, सिताफळवाडी अशी अस्तल देशी नांव धारण करणाऱ्या लहान-मोठ्या वाड्यांचं माजगांव, मुंबईसारख्या महानगराच्या पोटातलं एक शांत-सुंदर गांव होतं. होतं म्हणजे आता-आतापर्यंत होतं. आता विकासाच्या भस्मासूराची काळी छाया त्यावरही पडू लागलीय..!

म्हातारपाखाडी गांवातलं एक टुमदार घर

इतिहासाच्या पुस्तकात माजगांव मला पहिल्यांदा भेटलं ते, पोर्तुगिज आमदानीतील मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना. सन १५३३-३४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शाह यांने मुंबईची सात बेटं पोर्तुगिजांच्या ताब्यात दिली आणि तेंव्हापासून माजगांव मुंबईच्या इतिहासात सापडत जातं.

अर्थात त्यापुर्वीही माजगांव आता आहे तिथेच होतं, मात्र त्याचा उल्लेख सापडत नाही. १३ व्या शतकातल्या राजा बिंबाच्या काळातल्या ‘महिकावतीची बखरी’त माहिमचा उल्लेख आहे. परळचा आहे, भायखळ्याचा आहे आणि वाळकेश्वराचाही आहे, मात्र माजगांवचा नाही. त्यांनतर मुंबईवर असलेल्या मुसलमानी अंमलातही माजगांवचा उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो ठळकपणे येतो, तो पोर्तुगिज आणि त्यानंतरच्या ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या काळात..!

मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेलं इतिहासातलं माजगांव जेंव्हा पोर्तुगिजांच्या ताब्यात आलं, तेंव्हा ते होतं मात्र अत्यंत टुमदार. समुद्रात पाय सोडून बसलेल्या छोटेखानी टेकड्या, खडकाळ समुद्रकिनारा, आंब्यांची आणि नारळीची घनदाट झाडी असं त्याचं साधारण स्वरूप होतं. मुंबईच्या सातही बेटांवरचे मूळ रहिवासी जसे कोळी, तसे माजगांवचे मूळ रहिवासीही कोळीच. राजा बिंबासोबत आलेले काही भंडारी, आगरी, तर तुरळक प्रमाणात मुसलमान. मुख्य धंदा मासेमारी. थोडीशी भातशेती. आंब्या-नारळाची लागवड. माजगांवचे आंबे फार प्रसिद्ध होते असं म्हणतात. असंही म्हणतात की, एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर अशी वर्षातून दोनदा फळं देणारी आंब्यांची झाडं माजगांवात होती. अजुनही त्यातली काही टिकून असावीत.

पोर्तुगीजांच्या ताब्यात आलेल्या मुंबईच्या, कुलाब्याची दोन बेटं वगळता, पांचही बेटांवरची जमिन पोर्तुगीज राजाने, पोर्तुगीज कुटुंबांना, चर्चना अथवा सैन्यात विशेष मर्दुमकी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना वार्षिक अथवा त्रैवार्षिक भाडे पट्ट्याने दिलेली होती. तसंच माजगावबाबतही झालं होतं. मात्र मुंबईची इतर बेटं आणि माजगांवचं बेट, यात दोन मोठे फरक होते. पहिला म्हणजे इतर बेटांवरची जमीन अनेक जणांमध्ये विभागून भाड्याने दिली होती. तर माजगावचं संपूर्ण बेटच सन १५४७-४८ मधे कॅप्टन अंतोनिओ पेसो (Antonio Pessoa) या सैन्याधिकाऱ्याला भाड्याने दिलेलं होत. दुसरा फरक म्हणजे, इतर बेटांवरच्या जमिनी सारखी माजगांव बेटाची भाडेपट्टी वार्षिक अथवा ठराविक मुदतीची नसून, ती वंशपरंपरागत मालकीने अंतोनिओ पेसो ला दिलेली होती. संपूर्ण बेटच वंशपरंपरागत भाड्याने दिलेलं मुंबईतलं माजगाव हे एकमेंव बेट.

अंतोनिओ पेसोने या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्याच्या आवारात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या दैनिक पूजेसाठी लहानसं ‘चॅपल’ बांधलं. सण १५४८ पासूनचा पुढच्या काळात माजगांवात असलेल्या कोळी, भंडारी आणि आगरी लोकांबरोबरच इथे पोर्तुगिजांचीही भर पडली. ते संख्येने फार नव्हते, पण ‘ख्रिश्चन’ होते. राज्यकर्ते असल्यामुळे त्यांची हुकूमत बेटावर चालत होती. इथे असलेल्या स्थानिक कोळी-भंडारी आणि आगरी यांचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचं काम या काळात सुरू झालं. माजगवतल्या त्या काळातल्या प्रजेवर हळूहळू पोर्तुगीज प्रभाव वाढू लागला. राज्यकर्त्यांचा प्रभाव प्रजेच्या सर्वच अंगावर पडतो. तसा तो हळूहळू इथेही पडला. धर्मांतरं घडली, धर्म बदलल्याने इथल्या रहिवाशांना नवीन पोर्तुगीज पद्धतीची नावं -आडनावं मिळाली. तिथल्या मूळ रहिवाशांच्या खाण्यात आणि पेहेरावातही त्या अनुषंगाने बदल झाला, क्रॉस-चर्च उभी राहू लागली.

‘ख्रिश्चनां’ची संख्या जशी वाढू लागली, तशी पेसोच्या घराच्या आवारातलं चॅपल पूजेसाठी अपुरं पडू लागलं. म्हणून त्या ठिकाणी सन १५९६ मध्ये चर्च बांधण्यात आलं. १५४८ मध्ये बांधलेलं चॅपल आणि त्याच जागी १५९६ मध्ये बांधलेलं चर्च म्हणजे, आज भायखळ्याला दिसणाऱ्या ‘सेंट ग्लोरिया चर्च’चं मूळ स्थान. सन १९११-१२ च्या दरम्यान भायखळ्याला सध्या दिसणाऱ्या जागी ‘सेंट ग्लोरिया चर्चचं स्थानांतर झालं त्यालाही १०० वर्ष होऊन गेलीत.

माजगांवचं मूळ ग्लोरिया चर्च..
भायखळ्याचं ग्लोरीया चर्च

मूळच्या चॅपलची जागा १९१० मध्ये पोर्ट ट्रस्टने ताब्यात घेतली आणि त्या जागेवर १९२४ साली ठिकाणी ‘अँडरसन हाऊस’ नांवाचं पोर्ट ट्रस्ट अधिकाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात आली. आजही ही इमारत तिथे उभी आहे. तिच्या सोबतीला ‘सागर-दर्शन’, ‘सागरिका’ आणि तृष्णा १ व २ अशा इमारती कालांतराने बांधल्या गेल्या. अंतोनिओ पेसोने बांधलेल्या चॅपलमधला ‘क्रॉस’ सध्या, ‘अँडरसन हाऊस’पासून जवळच असलेल्या ‘चर्च स्ट्रीट’ या रस्त्यावर उभा आहे. हा क्रॉस १९२६ साली या ठिकाणी हलवला गेला.

मुंबईच्या इतर बेटांच्या तुलनेत माजगावचा इतिहास फार मोठा आहे. इतका मोठा आणि महत्वाचा आहे की, १९७६ साली आणल्या गेलेल्या ‘दी बोंबे सीटी लँड रेव्हेन्यू अॅक्ट’ मध्ये ‘माजगाव इस्टेट’ आणि तिची वंशपरंपरागत मालकी यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलेलं आहे. या मोठ्या इतिहासाचा संपूर्ण आढावा या लेखात घेता येणं शक्य नाही आणि या लेखाचा तो उद्देशही नाही.

इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर, ‘माजगांव’ हे नांव या बेटाला/भागाला कसं प्राप्त झालं असावं, ते सांगणं आहे. आता तिकडे वळू.

या भागाला ‘माजगांव’ नांव कसं मिळालं, त्याबद्दल दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पहिली म्हणजे, इथे मिळणाऱ्या विपूल माश्यांमुळे या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ म्हणत आणि या मत्स्य ग्राम शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे ‘मच्छ ग्राम’, ‘मासे गांव’ आणि शेवटी ‘माजगांव’ असं नांव रुढ झालं, ही..!

दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते, ती म्हणजे ‘माझं गांव’ या शब्दप्रयोगापासून या बेटाला ‘माजगांव’ हे नांव पडलं. वर वर पाहाता या दोन्ही व्युत्पत्ती पटण्यासारख्या आहेत आणि त्या जनमाणसात रुढही झाल्या आहेत. मात्र थोढा अधिक विचार केला असता, त्या तेवढ्याशा बरोबर नाहीत, असं लक्षात येते. मला असं का वाटतं, ते एक एक करुन सांगतो.

पहिली व्युत्पत्ती सांगते की, या बेटावर मासे मुबलक मिळत किंवा हा कोळ्यांचा गांव म्हणून या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ म्हणत आणि तेच नांव कालांतराने ‘माजगांव’ म्हणून प्रचलित झालं. ही व्युत्पत्ती विचारांती पटण्यासारखी नाही. कारण मुंबईच्या सर्वच बेटांवर मूळ वस्ती कोळ्यांचीच होती आणि मुख्य धंदा मासेमारी होता. मग त्या बेटांनाही ‘मत्स्य ग्राम’ किंवा तत्सम नांव न पडता मुंबई, परळ, माहिम, वरळी अशी वेगवेगळी नांव का पडली, ह्याचं उत्तर सापडत नाही.

ही व्युत्पत्ती न पटण्याचं दुसरं कारण म्हणजे, कोणत्याही ठिकाणाला नांव कशावरुनही प्राप्त होवो, ते असतं तिथल्या रहिवाशांच्या भाषेतलं किंवा बोलीतलं. मग ते त्या ठिकाणच्या एखाद्या वैशिष्ट्यावरून पडलेलं असो किंवा आणखी कशावरुनही. ‘मत्स्य ग्राम’ हा शब्द संस्कृत. माजगांवातली मूळ वस्ती जर कोळ्यांची असेल (आणि ती होतीच) तर ते संस्कृत कसं बोलत असतील, हा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणच्या कोळ्यांची स्वतःची अशी बोली आहे. आजही ती बोली बोलली जाते. मग त्यांनी स्वतःच्या गांवाला स्वतःच्या भाषेतला शब्द न योजता, त्यांना ज्या भाषेचा गंधही नाही, त्या भाषेतला शब्द आपल्या गांवाला का दिला असावा, असाही प्रश्न उभा राहातो.

बरं, अन्य कुणी या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ असा शब्द दिला असं गृहित धरलं तर, मग कुणी, असाही प्रश्न निर्माण होतो. संस्कृत ही शिक्षित लोकांची भाषा आणि १३ व्या शतकात जे शिक्षित लोक राजा बिंबासोबत माहिमला आले, त्यांची वस्ती होती ती मुख्यत्वे माहीम आणि परळ बेटावर. या बेटांवरही कोळी आणि मासेमारी होतीच. मग या बेटांना त्यांनी ‘मत्स्य ग्राम’ असं नांव का दिलं नाही, या प्रश्नाचंही उत्तर मिळत नाही.

माहिमचा राजा बिंबाची कथा सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या पुस्तकात परळचा उल्लेख आहे. भायखळ्याचा आहे. वाळकेश्वरचा आहे. साष्टीतल्या वांद्र्याचा आहे. जुहू-वेसाव्याचाही आहे. मात्र माजगांवचा नाही. नाही म्हणायला या बखरीत मुंबई, ठाणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील एकूण ३९६ गांवांची नावं दिली आहेत, त्यात २६३ व्या क्रमांकावर ‘माजगांव’चा उल्लेख आहे. पण ते माजगांव नेमकं कुठलं, ते दिलेलं नाही.

वरच्या परिच्छेदात ‘ते माजगांव नेमकं कुठलं’ असं जे म्हटलंय, त्वामागे कारण आहे. कारण महाराष्ट्रात ‘माजगांव’ नांव धारण करणारी एकूण ‘चार गांवं आहेत. सातारा जिल्ह्यातल्या चाफळ नजिक एक माजगांव आहे. , कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात दुसरं माजगांव आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातही एक माजगांव आहे. रत्नागिरी जिल्हा-तालुका यातंही एक माजगांव आहे. महिकावतीच्या बखरीत उल्लेख केलेलं माजगांव, हे मुंबईतलं की या चार गावापैकी, ते नक्की करता येत नाही.

‘माजगांव’ हे नांव ‘मत्स्य ग्राम’ या शब्दापासून आलं, असं क्षणभर गृहित धरलं तर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांतील तीनही ‘माजगांवां’चा समुद्राशी आणि म्हणून त्यात मिळणाऱ्या मासळीशी दुरान्वयेही संबंध नाही. मग ती नांवं कशी काय पडली, या प्रश्नावर निरुत्तर व्हावं लागतं. नाही म्हणायला रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘माजगांवा’ला संशयाचा फायदा देता येईल. पण तिथेही ‘मत्स्य ग्राम’ ते ‘माजगांव’ हा प्रवास पटत नाही. सबब, मुंबईतल्या माजगा्वचं नांव ‘मत्स्य ग्राम’ या शब्दापासून आलंय, हे मला पटत नाही.

माजगांव या नावाबद्दल दुसरी व्युत्पत्ती समोर येते ती, ‘माझं गांव’ या शब्दाची. पण हे अजिबातच पटण्यासारखं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापला गांव प्रिय असतो आणि दर वेळी आपण आपल्या गांवाचा उल्लेख ‘माझं गांव’ असाच करत असतो. म्हणून काही आपल्या गांवाचं नांव ‘माझ गांव’ असं होत नाही. त्यामुळे ह्या व्युत्पत्तीकडे समशेल दुर्लक्ष करणं योग्य..!

मुंबईतल्या ‘माजगांव’ हे नांव कसं प्राप्त झालं असावं, याचा शोध घेताना, ते नक्कीच ‘मत्स्य ग्राम’, ‘माझा गांव’ या शब्दांवरून आलेलं नसून, त्यामा काही तरी वेगळी गोष्ट वा गोष्टी कारणीभूत आल्या असाव्यात याबद्दल माझी खात्री पटत चालली, ती मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या वाचनामुळे.

मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांतून ‘माजगांव’चा उल्लेख यायला सुरुवात होते, ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरु झाला त्या काळापासून. म्हणजे सन १५३४ पासून मुंबईच्या इतिहासात माजगांव ठळकणे येत जातं. ह्या बहुतेक सर्वच पुस्तकांचं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं असल्याने, ती अर्थातच, इंग्रजी भाषेतलू आहेत. त्या पैकी एखाद-दुसऱ्या पुस्तकाता अपवाद वगळता, इतर साऱ्या पुस्तकांतून ‘माजगाव’ या शब्दाची स्पेलिंग, ‘MAZAGON ( मराठी उच्चार माझागॉन, माझागोन, माझगोन असे होऊ शकतात)’ अशी केली गेलेली आहे. ही पुस्तकं वाचताना, त्यात आलेल्या ‘माजगांव’च्या स्पेलिंगकडे सुरुवातीला माझं लक्ष गेलं नाही. ती सवयीने मी ‘माझगाव’ किंवा ‘माजगाव’ अशीच वाचत होतो. पण पुढे पुढे ही स्पेलिंग माझं लक्ष वेधून घेऊ लागली.

सुरुवातीला ही स्पेलिंगची चूक असावी असा वाटत होतं. पण जेंव्हा माझ्या वाचनात १९१४ साली डी. आर. वैद्य यांनी लिहिलेलं ‘दी बोंबे सीटी लँड रेव्हेन्यू अक्ट’ हे १८७६ साली आणल्या गेलेल्या जमीन महसूल कायद्यावरचं पुस्तक आलं, आणि त्या पुस्तकातला माजगावचा उल्लेख ‘MAZAGON’ असा केलेला दिसला, तेंव्हा मात्र माझं कुतूहल अधिक जागृत झालं. इतर पुस्तकातलं ठिक आहे. तिथे चूक झालेली असू शकते आणि पुढे त्या चुकीची पुनरावृत्तीही झालेली असू शकते. पण हे पुस्तक कायद्याचं आहे. त्यातली माहिती अधिकृत आहे आणि म्हणून ती गांभीर्याने घ्यायला हवी आहे. कायद्याचं पुस्तक लिहिताना, अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून, प्रत्येक शब्दाची काटेकोरपणे तपासणी आणि योजना केली जाते. ह्या पुस्तकातही ‘माजगांव’ची स्पेलिंग MAZAGON अशी केलेली पाहून, मला त्या स्पेलिंगमधेच ‘माजगांव’ या नावाचं उगमस्थान असावं असं वाटू लागलं आणि मी त्या दृष्टीने विचार करू लागलो.

अधिकची खात्री करावी म्हणून मी भारत सरकारच्या ‘माजगाव डॉक लिमिटेड’ या उक्रमाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि माजगांव शब्दाची स्पेलिंग तिथे तशी केली आहे, ते तपासलं. तर तिथेही MAZAGON हिच स्पेलिंग आढळली. ही भारत सरकारची संस्था आहे. तिच्या नावातही अशी चूक असूच शकत नाही. ‘माजगाव’ या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल गूढ वाढतच चाललं. म्हणून वरच्या दोन उदाहरणातील MAZAGON ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, हे इंटरनेटच्या माध्यमातून शोधायला सुरुवात केली.

आणि जसजसा मी हो शोध घेत गेलो, तसतसा mazagon ह्या शब्दाचा उगम आणि त्याचा पोर्तुगीजांशी असलेला घट्ट संबंधही उलगडत गेला. असा संबंध असणं अगदीच शक्य होतं. कारण पोर्तुगिजांची आपल्यावर काही काळ सत्ता होती. राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पेहेरावाचा, खाद्य संस्कृतिचा प्रभाव प्रेजेवर पडतच असतो. नवीन वसाहत केल्यास, त्या वसाहतीस आपली नांवं देणं किंवा तिकडची जुनी नांवं बदलून आपल्या भाषेतील वा संस्कृतितील नांव देणं, हे जगभरात घडत आलंय. उत्तरेत मुघल सत्तेचा प्रभाव तिकडच्या शहरा-गांवांच्या नांवावर पडलेला आपल्याला दिसतो. आपल्या शेजारच्या गोव्याच्या भाषेवरही पोर्तुगिज संस्कृतीचा प्रभाव आपल्याला आजंही जाणवतो. गोव्यातलं ‘वास्को’ शहराचं नांव पोर्तुगिजांनीच ठेवलेलं आहे. तसाच Mazagon या ‘माजगांव’च्या नांवावरही पोर्तुगिजांशी असलेला संबंध मला शोधाअंती उलगडत गेला.

हा संबंध पाहण्यासाठी आपल्याला आफ्रिका खंडाकडे मोर्चा वळवावा लागेल. उत्तर आफ्रिकेत मोरोक्को नावाचा एक देश आहे. ह्या देशाच्या उत्तर-पश्चिम भागात एक प्रदेश आहे. हा प्रदेश मुळचा ‘बर्बेर (Berber)’ नामक तिथल्या जमातींचा. तिकडचे आदिवासीच ते. त्या जमातींना ‘बर्बर’ हे नांव ग्रीकांनी बहाल केलेलं होतं. बर्बर या शब्दाचा साधारण अर्थ ‘जे ग्रीक नाहीत ते’ किंवा ‘Non Greek’ असा होतो. कोणत्याही आदिवासींप्रमाणे, ह्या बर्बरच्याही अनेक टोळ्या होत्या आणि त्यापैकी प्रत्येकाला वेगळी नावही होती.ग्रीकांच्या प्रभावामुळे त्यांचा सामुहीक उल्लेख ‘बर्बर’ असा केला जाई. आपण नाही का आपल्या देशातल्या दक्षिणेकडच्या राज्यांतील लोकांचा सरसकट उल्लेख ‘मद्रासी’ म्हणून करतो, तसा. ग्रीकांप्रमाणे इतर काही परकीय लोकांनीही ह्या बर्बरना वेगवेगळी नांवं दिलेली होती. त्यापैकी Amazigh, Mazyes, Maxyes, Mazaces, Mazax ही त्यापैकी काही. ह्या परदेशी प्रभावाखाली येऊन बर्बर लोकही स्वतः:चा उल्लेख Imazighen किंवा Mazigh असा करीत. बर्बर असो वा वर दिलेली चार-पांच नांवं असोत, त्याचा अर्थ ‘आदिवासी’ किंवा ‘मूळ निवासी’ असा आपण घेऊ.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी, म्हणजे साधारण १५०२ मध्ये युरोपातील पोर्तुगीज दर्यावर्दी जेंव्हा व्यापारासाठी नवीन भुमीच्या शोधात भारताच्या दिशेने निघाले होते, तेंव्हा त्यांनी त्यांना वाटेत लागलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशातील पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशावर आपला पहिला कब्जा केला. इथे राहणाऱ्या आणि स्वतःचा उल्लेख Imazighen असा करणाऱ्या बर्बराची भुमी त्यांनी ताब्यात घेतली हे लोक आपल्या स्वतःची ओळख Maziyen किंवा Mazighen अशी करुन देतात, हे लक्षात घेऊन त्या जागेचं नामकरण पोर्तुगिजांनी Mazighen असे केलं. हे नांव लिहितांना मात्र Mazagan, Mazagao असं केलं.

एखाद्या जागेच्या प्रत्यक्ष नांवात आणि ते नांव लिहिण्यात परतीयांकडून फरक पडतच असतो. नांवाचा उच्चार ऐकण्यात झालेल्या फरकामुळे लिखाणात बदलतो. आपल्याकडचं ‘शिव’चं नाही का पोरंतुगिजांनी ‘सायन’ केलं. पुढे सायन म्हणूनच प्रचलीत झालं, ते आजतागायत तसंच आहे. तसलाच हा प्रकार उत्तर आफ्रिकेतही घडला आणि जगाच्या नकाशावर पहिलं ‘Mazagao’ किंवा ‘Mazagan’ अवतरलं ते पुढची २६७ वर्ष टिकलं. पोर्तुगीज भाषेत Mazagao किंवा Mazagan या शब्दाचा स्वीकारला गेलेला अर्थ म्हणजे, बार्बाराची किंवा मूळ निवासींची भूमी.

या प्रदेशावर पोर्तुगिजांनी सन १७६९ पर्यंत, म्हणजे साधारण २६७ वर्ष राज्य केलं. सन १७६९ मधे ही पोर्तुगिज वसाहत मोरोक्कोचा सुलतान मोहोम्मद बिन अब्देल्ला (Mohommad Bin Abdallah ) ह्यांने पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतल्यावर, ह्या शहरचे नांव ‘Al Jadida” असे करण्यात आले. तोवर, म्हणजे तब्बल २६७ वर्ष तो भाग Mazagao किंवा Mazagan म्हणून ओळखला जात होता.

खरी गंमत पुढेच आहे. १७६९ मध्ये मोरोक्कोतून झालेल्या हकालपट्टीनंतर पोर्तुगीजांनी, शेजारीच खाली दक्षिणेस असलेल्या ब्राझीलची किनारपट्टी जवळ केली आणि तिथल्या अमेझॉन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर आपली नवीन वसाहत थाटली. त्यांनी या नवीन वसाहतीचं नांव ठेवलं ‘Nova de Mazagao’. म्हणजे ‘नवीन माझगाव’. आहे ना गंमत? ब्राझीलच्या ‘अमापा (Amapa)’ या राज्यात हे शहर आहे. आपण ते नकाशावर पाहू शकता.

मधल्या मोरोक्कोमधे आपली वसाहत थाटल्यानंतर, पोर्तुगीजांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे गोवा, कालिकत असे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर, इसवी सन १५३४ मधे मुंबईची बेटं त्यांच्या ताब्यात आली. ह्

या सात बेटांपैकी आकाराने वरळीच्या बेटाखालोखाल असलेलं माजगाव बेट, माहीमच्यासोबतीने त्यांचं मोठं प्रभाव क्षेत्र बनलं. ह्या छोटेखानी बेटावरचे मूळ निवासी कोळी, भंडारी, आगरी लोक पाहून, त्यांना मोरोक्कोच्या Maziyen किंवा Mazighen लोकांसोबत साम्य जाणवलं असावं आणि म्हणून त्यांच्या समजुतीप्रमाणे ह्या बेटालाही त्यांनी Mazagan, Mazagao. फक्त या शब्दातला ‘a’ जाऊन कधीतरी त्याजागी ‘o’ आला असावा आणि त्यातून Mazagon शब्द तयार झाला असावा. तोच शब्द पुढे मुंबईवरच्या इंग्रजी पुस्तकांतून कायम झाला असावा आणि मराठीत तो ‘माझगांव’ म्हणून आला असावा.

‘माजगांव डॉक’ मधला ‘Mazagon’ काय किंवा आपण लिहित असलेला ‘Mazagao (माजगांव)’ काय, दोघांचाही अर्थ एकच, इथल्या मूळ लोकांचा प्रदेश..!

मोरोक्को, मुंबई आणि ब्राझील या तिन्ही ठिकाणची, समुद्राच्या सानिध्यात वसलेली, शहरं किंवा ठिकाणं ‘माझगाव’ या एकाच नांवाची असावीत, हे त्या नांवांचा आणि पोर्तुगिजांचा असलेला संबंध दाखवीत नाहीत काय?

मुंबईच्या ‘माझगांव’चं नांव अशा पद्धतीने पोर्तुगिजांकडून बहाल केलं गेलेलं असून, त्या नावाचा आणि संस्कृत ‘मत्स्य ग्राम’ किंवा ‘मच्छ गाम’ किंवा ‘माझा गांव’ या शब्दाशी काहीच संबंध नाही, असं मला वाटतं.

©️नितीन साळुंखे

9321811091

19.03.2022

महत्वाच्या टीप-

1. माजगांवचं नांव जर पोर्तुगीजांनी दिलं असेल तर, मग मुंबईच्या इतर बेटांवरही त्यांचं राज्य होत. मग त्या बेतानं त्यांनी आपली नावं का दिली नाहीत, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि तो पडायलाच हवा. या प्रश्नाचंही समाधानकारक उत्तर देता येतं..!

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या सात बेटांपैकी मुंबई, माहीम आणि माजगांव अशा फक्त तीन बेटांवर पोर्तुगिजांचा जास्त वावर होता. त्यातल्या माजगांवच्या नांवाची कथा आपण वर पहिलीच आहे.

दुसरं महत्वाचं बेट होतं माहीम. माहिममधेच त्यांनी १५३३-३४ मध्ये बांधलेलं, मुंबईतलं सर्वात पाहिलं ‘सेंट मायकेल’ चर्च आहे. मोहीमच नांव न बदलण्यामागे किंवा माहीमला त्यांचं नाव न देण्यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे, माहीम हे इसवी सनाच्या तेरा-चोदाव्या शतकापासूनच प्रस्थापित झालेलं नांव होत.

राजा बिंबाची तर माहीम ही राजधानीच होती. त्यानंतर आलेल्या मुसलमानी राजवटीतही माहीम महत्वाचं ठिकाण होतं. हिंदू कालखंडातलं ‘श्रीप्रभादेवी’ मंदिर आणि त्यानंतरच्या मुसलमान राजवटीतला ‘माहीमचा दर्गा’ ह्या त्या प्राचीन राजवटींच्या खुणा आहेत. आजही त्या पाहाता येतात. पूर्वीपासून प्रस्थापित असलेल्याठिकाणाचं नांव बदलण्याचं किंवा नव्याने आपलं नांव देण्याचं काहीच कारण नव्हतं.

तिसरं बेट म्हणजे मुख्य मुंबई बेट. मुंबईचं मुंबईचं मराठीतलं ‘मुंबई’ हे नांव मुंबईची ग्रामदेवता ‘श्रीमुंबादेवी’च्या नांवावरुन आलं असलं तरी, तिचं जुनं इंग्रजी नांव ‘Bombay’ ही पोर्तुगीजांची देणगी आहे, हे एव्हाना सर्वमान्य झालेलं आहे.

मुंबईच्या सुरक्षित बंदराकडे पाहूनत्यांनी ह्या बेटाला ‘Bom Baia’ असं त्यांच्या भाषेत म्हटलं. पोर्तुगीज भाषेत ‘Bom’ म्हणजे ‘उत्तम’ आणि ‘Baia’ म्हणजे ‘बे’ किंवा ‘खाडी’ किंवा ‘बंदर’.माजगांवप्रमाणे Bombay हे नांव देखील पोर्तुगीजांनी दिलेलं आहे.

2. लेखात उल्लेख असलेल्या अंतोनिओ पेसो या माजगांवच्या जमिनदारांच्या वंशवृक्षाची एक फांदी आजही आहे आणि ती आपल्या मुळांचा विविध बाजुने शोध घेत असते. त्यांच्या शोधकार्याची माहिती जिज्ञासूंना Miguel of Mazagon: A merchant from 18th-century Bombay who negotiated an Anglo-Portuguese deal या ठिकाणी वाचायला मिळू शकेल.

3. ‘Berbers’, मोरोक्को आणि ब्राझिल या दोन देशातल्या ‘Mazagao’ बाबत पुष्कळ माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आपण ती जरूर वाचावी.

4. आता यातून एक नवीन प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील ‘माजगांव’ नांवाची ती तीन-चार गांव आहेत, ती कशावरुन आली? मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर तिकडे जाऊनच शोधावं लागेल..प्रत्येक ‘माजगांव’ची व्युत्पत्ती वेगळी असू शकते.

संदर्भ – 

1. Gazetter of Bombay City & Island, Volume II, Section History;Portuguese Period- S.M. Edwards- Published in 1909-

2. Origin of Bombay- 1900- J. Garsan Da Kunha.

3. Bombay Mission History; with a special Study of the Padroado Question.-by BY ERNEST R. HULL, S. J.(Society of Jesus).

4. Bombay in the Days of Queen Anne, Being an Account of the Settlement- by John Burnell

5. Website- History of Gloria Church.

6. विशेष आभार- श्री. डेनिस बाप्टीस्टा, म्हातारपाखाडी-माजगांव आणि श्री. विद्याधर राणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट.

‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने..

‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

‘मुलाच्या जडणघडणीत आईचं स्थान काय?’ असा प्रश्न जर का कुणी मला विचारला, तर विचारणाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय, अशी शंका आपल्याला येईल. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे, ज्या मुलाचं अस्तित्वच जिच्यामुळे शक्य झालं, तिचं त्या मुलाच्या जडणघडणीत स्थान काय हा प्रश्नच मुर्खपणाचा आहे असं आपल्याला वाटलं तर त्यात नवल नाही..।

आई नसती तर मुलंही नसतं, एवढं हे सरळ आहे. जडणघडण हा जन्माला आल्यानंतरचा विषय आहे. जन्म महत्वाचा. तो देणारी स्त्रीच असते. जडणघडण हा नंतरचा विषय. त्यातही स्त्रीचा वाटा मोठा.

कोणत्याही जीवनात्राच्या बाबतीत हे जेवढं सत्य आहे, तेवढंच ‘मुंबई शहरा’च्या बाबतीतही सत्य आहे, असं मी म्हटलं तर पटेल तुम्हाला?

नाही ना?

मग हा लेख वाचा. अगदी शेवटपर्यंत वाचा आणि मग ठरवा.

‘मुंबईच्या जडणघडणीत महिलांचे योगदान’ या विषयावर जेंव्हा मला लेख लिहावासा वाटला, तेंव्हा नेमकं काय लिहावं, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आणि त्याहीपेक्षा गहन प्रश उभा राहिला, तो म्हणजे, कोणत्या काळातील महिलांच्या योगदानावर लिहावं हा..! या पैकी कोणत्या काळातील महिलांच्या योगदानावर लिहावं, ह्या प्रश्नच उत्तर सापडलं की मग काय लिहावं हा प्रश्न आपोआप सुटतो.

मुंबई शहराची काय किंवा आपली काय, जडण-घडण हा विषय इतिहासाशी संबंधित. त्यात आपल्या सर्वसामान्यांचं इतिहासच ज्ञान आणि त्याची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरु होते आणि १९४७ साली प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीपाशी येऊन संपते. या काळाच्या अगेमागेही इतिहास घडलेला असतो, हे माझ्यासहित बहुसंख्य लोकांच्या लक्षातही येत नाही. अर्थात, छत्रपतींचा कार्यकाल ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातही अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. इतिहासाने त्यांची नोंदही घेतली आहे आणि त्यांच्यापैकी अनेकजणींविषयी आपल्याला माहितीही असते. परंतु त्या सर्व महिलांच्या कर्तुत्वाच्या केंद्रस्थानी, केवळ ‘मुंबई’ अशी कुठेही नसते. आणि मला तर फक्त मुंबई शहरा आणि महिला यांच्यातल्या ‘आई-मुला’सारख्या नात्यावर लिहायचं आहे. म्हणजे माझ्या लिखाणात येणाऱ्या इतिहासाचा काळ, छत्रपतींच्या अगोदरचा काही काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा बराचसा काळ येणार हे ओघानेच येतं. कारण मुंबई जगाला माहित होऊ लागली, ती या कालावधीतच. म्हणून माझ्या लिखाणासाठी कालनिश्चिती झाली, आणि काय लिहावं हा माझ्यासमोर उभा ठाकलेला प्रश्न सुटला.

मुंबई शहर आणि त्याच्या घडणीत महिलांचं योगदान या विषयावर लिहायला सुरुवात करताना, मी विचारात घेतलेला काळ १६६० ते १९६०, असा तीनशे वर्षाचा आहे. त्यातही ताजी घटना प्रथम आणि जुन्या घटना नंतर, अशा पद्धतीने लिहिणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचला, तरच महिला आणि मुंबई शहर, यांचं आई-मुलाचं नातं समजून येईल..!

मुंबईच्या इतिहासातली तुलनेने ताजी घटना मला आठवते, ती म्हणजे, १९५५ ते १९६०च्या दरम्यानचा ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’. हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील जनतेने दिला, पण या लढ्यात मुंबईतील सामान्य महिलांनी जो पुढाकार घेतला होता, त्याला इतिहासात तोड नाही..

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. परंतु, सत्ताधाऱ्यांशी होणारा महाराष्ट्राचा संघर्ष काही संपला नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या काही काळात देशाने भाषावार प्रांतरचना स्वीकारली. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला अन्याय आला. गोवा, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर इत्यादी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील, परंतु, मराठी भाषक जनता बहुसंख्येने असलेले प्रदेश, कर्नाटकच्या हवाली करण्यात आले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आणि पैसेवाल्या शेठजींना मुंबई नामक दुभती गाय आपल्या दावणीला बांधलेली हवी होती. आणि या कारणासाठी मुंबई महाराष्ट्राला नाकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. प्रथन गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करुन त्यांचं एकच द्विभाषिक राज्य करावं असा प्रस्ताव आला. नंतर मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवून, गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या ‘त्रिराज्य योजने’च्या प्रस्तावाचं घोडं पुढे दामटण्यात आलं. पुढे तर मुंबई केंद्रशासित करण्याच्या हालचाली दिल्ली दरबारी सुरु झाल्या. काही झालं तरी मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, असा चंगच दिल्लीश्वरांनी बांधला होता.

मुंबई ज्यांने आपल्या रक्ता-मांसानं घडवली होती, तो कामगार, जो गोऱ्या राज्यकर्त्यांशी दोन हात करताना घाबरला नव्हता, तो कामगार आता ‘संयुक्त महाराष्ट्र कृति समिती’च्या नेतृत्वाखाली आपल्याच सरकारविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या समितीचं नेतृत्व सेनापती बापट, एस.ए. डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी नेते करत होते आणि त्यांच्या जोडीला शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील यांची रक्त सळसवणाऱ्या बुलंद ललकाऱ्या मुंबईच्या गल्ल्या आणि महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत घुमू लागल्या होत्या..! नेत्यांची भाषणं आणि शाहीरांच्या तेज वाणीने, मुंबई आणि महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती पेटून उठली होती. त्यात पुरुष होतेच, पण स्त्रियाही मागे नव्हत्या..!!

दिनांक १६ जानेवारी १९५६ ला पंतप्रधान पंडित नेहरूंनी केंद्रशासित करण्याचा निर्णय आकाशवाणीवरून ऐकवला आणि त्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत सर्वत्र लोक रस्त्यावर उतरू लागले. मुंबईत बंद पाळला गेला. दादर, नायगाव, पोयबावडी(परळ), लालबाग, डिलाईल रोड, घोडपदेव, माझगांव इथला अवघा गिरणगाव आणि त्याच्या दक्षिणेकडच्या गिरगावमधले विद्यार्थी, कामगार, तरुण-वृद्ध, पुरुष आणि स्त्रियाही रस्त्यावर उतरल्या. महत्वाच्या नेत्यांची सरकारने धरपकड केली होती. लोक रस्त्यावरून हटेनात म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले. एक आठवडाभर हा पोलिसी अत्याचार मुंबईत सुरु होता. केवळ मुंबईच नाही तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, कारवार इकडेही लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या आठवडाभराच्या कालावधीत ७४ लोक गोळ्या लागून ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकूण १०६ लोक (काही ठिकाणी १०५, तर काही ठिकाणी १०७ असा उल्लेख येतो) हुतात्मा झाले.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

साधारणत: सन १९५४ ते १९६० अशी पांच-सहा वर्ष चाललेल्या या लढ्याला बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, श्रीपाद.डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील इत्यादींसारख्या कणखर नेत्यांच नेतृत्व लाभलं होत. त्यांना साथ होती शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील इत्यादी पहाडी आवाजाच्या शाहिरांची. एस.जी सरदेसाई, के. एन. जोगळेकर, गुलाबराव गणाचार्य, नाना पाटील, एस. जी. पाटकर. कृष्णा देसाई, दिनू रणदिवे, अशोक पडबिद्री इत्यादीही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची खिंड लढवत होते. इथपर्यंत हा सर्व पुरुषी लढा वाटतो.

पण तसं नव्हतं. या आंदोलनातला सर्वसामान्य आणि गरीब घरातील स्त्रियांचा सहभाग खूप मोठा होता आणि तो सुरुवातीपासूनच होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतलेल्या तारा रेड्डी, प्रमिला दंडवतेंच्या, कुसुम रणदिवे, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर इत्यादी रणरागीणीनी तर प्रसिद्धच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, तुलनेनं कमी माहित असलेल्या, मालती नगरकर, बायजी पाटील, यामिनी चौधरी, पार्वतीबाई भोर, इंदुताई कुळकर्णी, गिरीजा कदम, मनोरमा हंगल इत्यादीसारख्या इतरही मध्यमवर्गीय महिला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढल्या होत्या.

या व्यतिरिक्त, सर्वात कमाल केली होती, ती गिरगांव आणि गिरणगावातल्या सामान्य गृहिणीनी. गरीब, मध्यमवर्गातून आलेल्या या महिलानी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असामान्य धैर्य दाखवले होते. यांच्या नावांची नोंद इतिहासात असेल, नसेल. नसण्याचीच शक्यता जास्त. त्या नावासाठी लढल्या नव्हत्याच मुळी. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती काही झाल तरी महाराष्ट्राचीच राहील, या ध्येयाने ला अनामिक लढवय्या स्त्रिया लढ्यात उतरल्या होत्या. “निघाले मराठे वीर, संयुक्त महाराष्ट्राच्या वेडात..त्यांना देण्यास साथ, उतरल्या विरांगना मैदानात”, ही उक्ती अक्षरक्ष: त्या जगत होत्या. गिरगांव-गिरणगावातली प्रत्येक चाळ हा किल्ला बनला होता इथे केवळ त्यांची साथ नव्हती, तर मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यातील, चाळी चाळीतील किल्ले हा महिला जातीने लढल्या होत्या.. दादर-नायगावपासून ते थेट भायखळा-गिरगांवपर्यंतची एक एक चाळ समितीचा किल्ला बनली होती.

नायगावची इस्माइल बिल्डिंग, करी रोडची हाजी कासम चाळ, काळाचौकीतल्या चाळी, लालबागची गणेश गल्ली, काळेवाडी, आंबेवाडी, दाभोळकर अड्डा, कोंबडी गल्ली, बोगद्याची चाळ, गॅस कंपनी लेन अशी किती नावे सांगणार? येथून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची लढ्याची सूत्रे हलत होती.

१६ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान सरकारने केलेल्या गोळीबारात, विशेषत:, लालबाग परळच्या ‘लक्ष्मी कॉटेज’ व ‘कृष्णनगर’च्या महिलांनी आपल्या असामन्य धैर्याने आणि शौर्याने स्त्री-शक्तीची जाणीव करून दिली. या चाळींना गराडा घालून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला, लाठीचार्ज केला. स्त्रिया व मुले खोल्यांमध्ये बेशुद्ध पडू लागली. समोर स्त्री आहे की पुरुष, हे न पाहाता, पोलीस दंडुका चालवू लागले. यावेळी स्त्रिया तान्ह्या मुलांना कडेवर घेऊन बाहेर आल्या. पोलिसांना त्यांनी घेरले. ‘भेकडांनो असे कोंडून काय मारता, असे उघड्यावर मारा, आम्ही मुंबईसह महाराष्ट्रासाठी मरायला तयार आहोत’, असं म्हणत त्या पोलिसांचं कडं तोडून पुढे होऊ लागल्या. पोलिसांनी वेढा अधिकच आवळला. पण शेवटी त्या महिलांच्या हिमतीपुढे पोलिसांचा नाइलाज झाला. त्यांना कारवाई थांबवावी लागली. पोलिसांनी निघून जावे लागले.

शेवटी लोकांच्या मागणीपुढे सरकार झुकले. दिनांक १ मे १९६० या दिवशी, १०६ जणाच्या बलिदानाने बेळगाव, कारवर, निपाणी वगळून परंतु, मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई महाराष्ट्राची राहिली. महाराष्ट्राची राजधानी झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात या महिलांची कामगिरी कायम लक्षात राहील, अशी झाली. मुंबई शहरासाठी आणि पर्यायाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी, महिलांनी दिलेले हे अलीकडच्या इतिहासातील अमुल्य योगदान. मुंबई महाराष्ट्राची झाली, त्यात या स्त्रियांचा वाटा खूप मोठा आहे..!

हुतात्मा स्मारक

चर्चगेटच्या ‘हुताद्मा स्मारका’वर शेतकरी आणि कामगार असे दोन पुतळे आहेत. त्या जोडीला शेतकरीन आणि कामगारनीचे पुतळे असाचला हरकत नव्हती, असं आपलं मला वाटतं.

आता थोडं मागे जाऊ. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपूर्वी, मुंबई शहरातील कामगारांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता, तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात. आणि त्यांना तेवढीच समर्थ साथ लाभली होती, ती सर्वसामान्य स्त्रियांची..!

देशाच्या स्वातंत्र्यसाठी संपूर्ण देशातीलच जनतेने लढा दिला होता. प्रसंगी प्राणांचं बलिदानही दिलं होतं. परंतु, ब्रिटिशांच्या राजसत्तेला शेवटचा मोठा आणि निर्णायक धक्का दिला तो महात्मा गांधींनी. तो ही मुंबईतून. दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ह्या दिवशी, मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानातून ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ हे दोन स्फूर्तिदायक मंत्र स्वातंत्र्य लढ्याला दिले आणि अख्खा देश पेटून उठला. ह्या लढ्याचा केंद्रबिंदू मुंबई शहर होता. संपूर्ण देशातून कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकांचे थवेच्या थवे मुंबईत येऊ लागले होते. ग्रांट रोडचं ‘काँग्रेस हाऊस’ देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी फुलून गेलं होत. राहायची कोणतीही सोय नाही. पण, त्याची पर्वा होती कुणाला..! लोक मिळेल तिथे आपली पथारी टाकत होते. रोज नविन कार्यकर्ते सामील होत होते. जिथे राहायची काहीच सोय नाही, तिथे ह्या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याचे काय होत असेल, ह्याची कल्पनाच केलेली बरी. पण त्याचीही तमा होती कुणाला..!

अश्या वेळी मुंबईकर गृहिणी पुढे आल्या. चाळीतील, आणि ऐश्वर्यसंपन्न बंगल्यांतुनही अन्नपूर्णा मदतीला धावल्या. लालबाग-परळ भागातून मराठमोळ्या बायका पदर खोचून पुढे आल्या. मलबार हिल वरील उच्चभ्रू पारशींनी आणि भाटिया गुजराती बायका धावून आल्या. त्यांच्यातळे जात-पात, पंथ-धर्म-भाषा, गरीब-श्रीमंत हे सारे भेद आपोआप गाळून पडले. आता त्या फक्त माता होत्या. भरणं पोषण करणाऱ्या भारतमातेचं प्रतिकच जणू..! या माऊलींनी काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला. मशीद बंदरातून गाड्या भरभरून आटा, तांदूळ, साखर, गहू इत्यादी धान्य येऊन पडू लागलं. भायखळ्याच्या भाजी बाजारातून भाज्यांच्या गाड्याच्या गाड्या भरून येऊ लागल्या. कुणाला किंमत चुकवण्याचा किंवा विनंती करण्याची गरजच पडली नाही. सारी माणसे ‘चले जाव’ ह्या मंत्राने झपाटलेली होती.

‘चले जाव’ आंदोलनात निघालेला महिलांचा प्रचंड मोर्चा

काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघरात २४ तास चूल धगधगत होती. कानात हिऱ्याच्या कुडी घालणाऱ्या श्रीमंत पारशी मेहेरबाई, गुजराती कमलबेन, यांच्यासोबत, गिरगाव-गिरणगावातल्या कमलाबाई, सखुबाई आणि साळुबाई मांडीला मांडी लावून पोळ्या लाटत होत्या. अगणित कार्यकर्त्यांच्या स्वयंपाकाचा घाणा दिवसरात्र चालवत होत्या. उष्ट्या-खरकट्या भांड्यांचा रगाडा उचलत होत्या. सर्व भेदभाव गळून पडले होते. केवळ स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य ह्याच एकमेव ध्येयाने सर्व झपाटले होते होते. सैनिक लढत असले तरी त्यांच्या पोटाला घालणाऱ्या ह्या स्त्रियांची नोंद इतिहासात कितपत आहे कुणास ठाऊक. नसण्याचीच शक्यता जास्त..! मुंबई शहरातल्या स्त्रियांनी, अगदी मुंबईसाठी नसलं तरी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं हे अनामिक योगदान..!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्या स्वातंत्र्यासाठी देशभरातील स्त्री-पुरुषांनी आपलं योगदान दिलं. अनेकांनी बलिदानही केलं. त्या खेचून आणलेल्या स्वातंत्र्यात, मुंबई शहरातील या अनामिक स्त्रियांचंही अल्पसं का होईना, पण योगदान आहे..! रामसेतूतलं खारीचं महत्व नजरेआड कसं करता येईल?

आता आणखी थोडं मागे जाऊ. आणखी मागे म्हणजे, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जवळपास १०२ वर्ष मागे. या कथेच्या नायिका आहेत, पारशी समाजात जन्मलेल्या श्रीमती आवाबई जमशेटजी जीजीभाई..!

पारशी समजात जन्मलेल्या बहुतेक सर्व स्त्री-पुरुषांनी मुंबई शहराच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलेलं आहे. तरीही लेडी जमशेटजीं या पारशी महिलेचं महत्व थोडं वेगळं आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याच्या आधाराने, वांद्र्यापासून पुढे दहिसरपर्यंत वसत गेलेल्या, पश्चिम उपनगरांच्या जन्माला, लेडी आवाबई जमशेटजी त्यांच्याही नकळत कारणीभूत झालेल्या आहेत.माहिम हे मुंबईचं शेवटचं बेट आणि साष्टीतलं पहिलं बेट वांद्रे यांना एकमेकापासून माहिमची खाडी विभागत होती. आजही विभागते आहे. पण त्याकाळातलं खाडीचं पात्र आजच्या तुलनेत जास्त रुंद आणि खोल होतं. या दोन्ही ठिकाणच्या लोकांना, दोन्ही बेटांमधे ये-जा करण्यासाठी पूर्वी लहान होड्या वापरल्या जात. एरवी ही वाहतूक सुरळीत चालत असे, पण पावसाळ्यात मात्र परिस्थिती कठीण होत असे. आधीच मुंबईचा पाऊस आणि त्यात उधाणलेला समुद्र यामुळे ही खाडी ओलांडणाऱ्या बोटींना अपघात होऊन मनुष्य आणि जनावरांची हानी होणं हे ठरलेलंच असे. इथे पुल बांधण्याची लोकांची अनेक वर्षांची मागणी असुनही सरकार तिकडे दुर्लक्ष करत होतं. पुरेसा निधी नसल्याची कारणं देत होतं.

अशावेळीच आवाबाई यांना दरवर्षीच्या पावसाळ्यात नाहक होणारी मनुष्यबानी सहन न होऊन, माहिमच्या खाडीवर स्वखर्चाने पुल बांधण्यास त्या तयार असल्याचा प्रस्ताव सरकारला दिला. आवाबाईंशी चर्चा करुन सरकारने तसा पुल बांधण्याची मान्यता दिली आणि आवाबाईंनी १८४३ मधे मधे तो पुल बांधायला सुरुवात केली.

आवाबाईंनी स्वखर्चाने बांधलेला पुल, माहिम कॉजवे’, ८ एप्रिल, १८४५ रोजी लोकांसाठी खुला झाला. आता लोकांना वर्षभरातल्या कोणत्याही मोसमात माहिमची खाडी ओलांडून ये-जा करणं सोपं आणि सुरक्षित झालं. मनुष्यहानी थांबली.

माहिम कॉजवे

तत्पुर्वी सन १८०५ साली, सायन या मुंबई शहराच्या शेवटच्या ठिकाणाला साष्टीतल्या कुर्ल्याला जोडणारा ‘सायन कॉजवे’ तयार होऊन वापरातही आला होता. हा रस्ता त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर सर जोनाथन डंकन यांच्या प्रयत्नातून बांधला गेला होता. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ त्या रस्त्याचे नांव ‘डंकन कॉजवे’ असं देण्यात आलं होतं. माहिम कॉजवे बांधण्याच्या ४० वर्ष अगोदर हा रस्ता बांधल्यामुळे, कुर्ल्यापासून पुढची उपनगरं तेंव्हाच वसली होती. तिथला व्यापार उदीम, लोकवस्ती वाढू लागली होता. पुढच्या काळात साष्टीतील कुर्ल्यापासूनची पुढची ठिकाणं, मुंबईची पूर्व उपनगरं म्हणून ओळखली जाऊ लागली.

तसाच प्रकार आवाबाईंनी बांधलेल्या माहिमच्या कॉजवेमुळे झाला. त्यांनी माहिमच्या खाडीवर पूल बांधल्याने, लोकांना ये-जा करण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध झाला. लोकांची रहदारी वाढली आणि त्यामुळे वांद्र्यापासून पुढे हळहळू लोकवस्तीही वाढू लागली. व्यापार वाढू लागला. मुंबईची पश्चिम उपनगरं जन्मास येऊ लागली. वांद्रे, खार, सांताक्रुझ व पुढच्या परिसरातील वस्ती हळूहळू वाढू लागली..!

पारशी समाजाने जवळपास मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. परंतु आवाबाईंच्या कार्याचं वैषिष्ट्य म्हणजे, मुंबई शहराच्या पश्चिम उपनगराच्या वाढीसाठी, त्या नकळत कारणीभूत झाल्या. म्हणून त्यांनी मुंबई शहारतसाठी दिलेल्या या योगदानाचा विशेष उल्लेख या लेखात करणं मला आवश्यक वाटलं..!

आता या लेखाचा महत्वाचा भाग सुरु होतो. इतका महत्वाचा की, ही स्त्री नसती तर, कदाचित वर उल्लेख केलेल्या, सन १९५६ ते १९६० च्या दरम्यानचं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, त्या अगोदरचा सन १८५७ ते १९४७ हा ९० वर्षाचा भारताचा स्वातंत्र्य लढा, सन १८४५ चा आवाबाईचा ‘माहिम कॉजवे’ इत्यादी घटना घडल्याच नसत्या. मुळात मुंबई, आजच्या मुंबईसारखी झाली असती, की तिचं दुसरंच काहीतरी अधिक चांगलं किंवा अधिक वाईट घडलं असतं, हे सांगता येणं अवघड असलं तरी, तिचं आजचं स्वरुप मात्र निश्चितच दिसलं नसतॅ, एवढं मात्र नक्की सांगता येईल..!

ह्या स्त्रीया रुपाने, आताच्या ठाणे जिल्ह्यातील, वसई प्रांताचा, कुणाच्याही फारश्या खिजगणतीत नसलेला एक ओसाड, दुय्यम भुभाग असलेल्या मुंबईचं भाग्य फळफळलं. तिच्या निमित्ताने उजेडात आलेली मुंबई, पुढच्या दोन-अडिचशे वर्षात जगातील आघाडीच्या शहरांपैकी एक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आली.

कोण होती ही स्त्री..? आपली उत्सुकता फार न ताणता, प्रथम तिचं नांव सांगतो..!

ती होती कॅथरीन ब्रॅगान्झा. इन्फन्टा ऑफ पोर्तुगाल. अर्थात, पोर्तुगालचा राजा चौथ्या जॉनची कन्या. पोर्तुगालची राजकन्या आणि इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्ल्सची पत्नी:क्वीन ऑफ इंग्लंड..!!

कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा; क्वीन ऑफ इंग्लंड

मुळात मुंबई हे दुर्लक्षित बेट, शहर म्हणून इतिहासात पुढे येत, तेच १६६० साला नंतर. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांचा विवाह ठरतो. दिनांक २३ जून १६६१ मधे या दोघांच्या विवाहाचा करार होतो आणि त्या करारानुसार, मुंबई बेट आणि बंदर (Port and Island of Bombay) आंदण म्हणून इंग्लंडच्या ताब्यात देण्याचं ठरतं आणि त्याच क्षणी एक ओसाड बेट असलेल्या मुंबईचं भाग्य बदलण्याची सुरुवात होऊ लागते. जागतिक पटलावर मुंबईची ओळख होण्याचे सुप्त संकेत मिळू लागतात..!

कॅथरीन आणि चार्ल्सच लग्न होताना, मुंबई व इतर सहा बेटं पोर्तुगीज साम्राजाच्या हिस्सा होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीज अंमल सुरु झाला तो साधारण १५०५ च्या आसपास. १५३४ सालात मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात आली, पण त्या पूर्वीच त्यांचं बस्तान बसलं होतं, ते मुख्यतः वसईच्या परिसरात. वसई हे पोर्तुगीजांच्या प्रशासकीय आणि लष्करी कारभाराच मुख्य ठाणं होतं. मुंबई द्विप-कल्पातल्या सात बेटांपैकी, माहिम हे बेट वसईतल्या पोर्तुगिजांचं दुय्यम, परंतु महत्वाचं बेट होतं आणि या माहिमची मुंबई एक ‘डिपेन्डन्सी’ होती. बंदर म्हणून मुंबई उत्तम होती, हे पोर्तुगिजही जाणत होते. म्हणून तर त्यांनी, उत्तम नैसर्गिक बंदर असलेल्या ‘मुंबई’ या एकाच बेटाला, ‘Bom Baia’, म्हणजे उत्तम खाडी किंवा Bay असं नांव दिलं होतं. या नांवाचा पुढे अपभ्रंश होत, मुंबईचं नांव Bombay असं स्थिर झाल (मुंबादेवीवरुन प्राप्त झालेलं ‘मुंबई’ हे नांव आणि पोर्तुगिजांनी दिलेलं ‘बॉम बेईआ’ ह्या नांवात साधर्म्य असणं, हा योगायोगच..!). पण तरीही त्यांनी मुंबई बेटाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं. किंबहुना माहीम वगळता मुंबई व इतर पाच बेट, ही पोर्तुगीजांच्या दृष्टीने फारशी महत्वाची नव्हती.

जन्मजात उत्कृष्ट नाविक असलेल्या पोर्तुगिजांना मुंबई बंदरातं महत्व पुरेपूर समजलं होतं असलं तरी, त्यांचा व्यापार उदीम आणि राज्य वसई परिसरात सामावलेलं असल्यानं, त्यांचं मुंबई द्विपसमुहाकडे तसं दुर्लक्षच होत होतं. इथली सर्वच बेटांवरील जमिनी त्यांनी विविध पोर्तुगिज कुटुंबांना भाड्याने दिली होती. या लोकांनीच आपापल्या बेटांचं संरक्षण करण्याची अटं त्यांनी या भाडेकरुना घातली होती. त्यामुळेही असेल कदाचित, पोर्तुगिज सत्तेकडून मुंबई व तिची इतर सहा बेटं, इतकी दुर्लक्षित राहिली होती की, मुंबईच्या किल्ल्यावर, सन १६२६ च्या ऑक्टोबर महिन्यात, दिनांक १३ ते १५ असे तीन दिवस ब्रिटीश आणि डचांनी केलेल्या एकत्रित हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीही पोर्तुगिज सैनिक तिथे उपलब्ध नव्हता. सतत तीन दिवस ब्रिटिश आणि डचांनी मुंबई बेटावर लुटालुट आणि जाळपोळ करत अनिर्बंध धुमाकूळ घातला होता.

या हल्ल्यादरम्यानच पोर्तुगिजांनी फार लक्ष न दिलेलं मुंबई बेट आणि बंदर ब्रिटिशांच्या, विशेषतः ईस्ट इंडीया कंपनीच्या, नजरेत भरलं होतं. हे सुरक्षित बंदर काही करुन आपल्या ताब्यात असायला हवं, असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांनी त्या दिशेने खूप प्रयत्नही सुरू केले. अगदी नगद मोजून पैसे मोजून मुंबई आणि इतर सहा बेटं विकत घ्यायचीही तयारी दर्शवली, पण चतुर पोर्तुगिज त्यांना दाद देत नव्हते. परंतु शेवटी पोर्तुगाल आणि इंग्लंड यां दोन्ही देशांची परिस्थितीने अशी काही असहाय्यता निर्माण केली की, दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज भासू लागली आणि त्यातूनच सन १६६० मध्ये ब्रिटीश राजपुत्र-प्रिन्स ऑफ वेल्स-दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगिज राजकन्या कॅथरीन ब्रॅगान्झा यांचा विवाह करण्याचा घाट घातला गेला. या विवाहात पोर्तुगिजांकडून चार्ल्सला हुंडा म्हणून ५ लाखाची पोर्तुगिज चलनातली रोख रक्कम ( ही रक्कम काही पुस्तकातून वेगवेगळी दिलेली आहे), आफ्रिका खंडातल्या मोरोक्को या देशातलं ‘टॅंजिअर’ हे शहर आणि ‘मुंबई’ बेट देण्याचं ठरलं. या बदल्यात ब्रिटिशांनी पोर्तुगिजांना डचांविरुद्धच्या लढाईत सहाय्य करावं, अशा अटी असलेला कॅथरीन-चार्ल्सच्या विवाहाचा करार -Marriage Treaty – दिनांक २३ जून १६६१ रोजी करण्यात आला.

इंग्लंड आणि पोर्तुगीजांमध्ये झालेल्या विवाहाच्या करारनुसार, दिनांक २१ मे १६६२ या दिवशी चार्ल्स आणि कॅथरीन या दोघांचा इंग्लंडमध्ये विवाह संपन्न झाला आणि करारानुसार दिनांक १८ फेब्रुवारी १८६५ या दिवशी मुंबई ब्रिटिशांची झाली (अर्थात, पोर्तुगिजांनी मुंबई सहजासहजी ब्रिटिशांच्या ताब्यात दिली नाही. करार झाल्यापासून पुढची तब्बल चार वर्ष पोर्तुगिजांनी मुंबई ताब्यात देण्यासाठी ब्रिटिशांना झुंजवलं होतं) आणि इथून पुढे आज दिसणाऱ्या अत्याधुनिक मुंबईची पायाभरणी होण्यास सुरुवात झाली.

पुढच्या तीनच वर्षात, म्हणजे दिनांक २७ मार्च १६६८ रोजी, इंग्लंडचा राजा चार्ल्स याने मुंबई ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीला भाड्याने दिली. आणि पुढच्या काहीच काळात मुंबईत ब्रिटीश कायद्यानुसारचं प्रशासन आणि न्यायव्यवस्था सुरु झाली. गोदी सुरू केली. जमिनिंचं व्यवस्था लावली. टांकसाळ सुरु केली. ईस्ट इंडीया कंपनीची सुरतेतली वखार मुघल, पोर्तुगिज यांच्या सुरतेतल्या वावरामुळे असुरक्षित वाटू लागली होती. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील छाप्यामुळे त्या असुरक्षेत आणखीणच भर पडली. पुढच्या काळात आपलं हित आणि व्यापार सुरतेत धोक्यात येऊ शकतो असा विचार करुन, सन १६८७ मधे ईस्ट इंडीया कंपनीने आपले सुरतेचे मुख्यालय मुंबई इथे हलवलं. आणि पुढच्या काही दशकातच मुंबईचा प्रवास ब्रिटिश साम्राज्याची पूर्व्कडील राजधानी होण्याच्या दिशेने सुरु झाला.

ब्रिटिशांनी मुंबईच्या फोर्ट विभागाची आखणी, त्यांची राजधानी म्हणूनच केली होती. तिथल्या भव्य-देखण्या इमारती, लांब-रुंद रस्ते व फुटपाथ, रस्त्याच्या कडेची झाडं असं सार काही त्यामुळेच निर्माण झालं होतं. आपण अजुनही त्याचा उपभोग घेतो आहोत. मुंबईची ओळख म्हणून ‘गेट वे ऑफ इंडीया’चं चित्र आजदेखील दाखवलं जातं. हे गेट केवळ मुंबईत प्रवेशाचच प्रतिक नाही;तर भारत देशाकडे जायचाही तो मार्ग आहे, याचंही ते प्रतिक आहे. देशाच्या पोटात शिरायचा या इवल्याश्या मुंबैमधून जातो आणि त्यासाठी कारणीभूत ठरली ती, कॅथरीन..! कॅथरीन, द इन्फन्टा ऑफ पोर्कुगाल..!

म्हणूनच, मुंबई शहराच्या इतिहासातली कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा एकमेंव महत्वाची महिला. ‘एकमेंव महत्वाची महिला’ असं म्हणण्याचं कारण इतकंच की, जर तिचा विवाह ब्रिटिश राजाशी झालाच नसता, तर मुंबईची बेटं ब्रिटिशांकडे आलीच नसती आणि तशी ती आलीच नसती आणि ती तशी आलीच नसती तर..? तर कदाचित आजच्या स्वरुपातली, देशाची लक्ष्मी आणि मुंबैकरांची अन्नपूर्णा असलेली आपली मुंबई उदयाला आलीच नसती..!

मुंबईच्या बाबतीत कॅथरीनचं महत्व म्हणजे, तिच्या लग्नात तिचा हुंडा म्हणून मुंबईप्रमाणेच मोरोक्कोमधलं ‘टॅजिअर’ हे ठिकाणही पोर्तुगिजांकडून ब्रिटिशांना देण्यात आलं होतं. परंतु पुढे काही काळतच त्यांना हे बेट सोडून द्यावं लागलं होतं. तिच्या लग्नात पाच लाख क्रुसेडोंची रोख रक्कमही देण्याचं ठेरलं होतं. मात्र ती ही रक्कम पूर्ण दिली गेली नाही. पैशांच्या चणचणीत असलेल्या कॅथरीनच्या नवऱ्याला, म्हणजे दुसऱ्या चार्ल्सला लग्नानंतर काहीच काळात, त्यांच्या ताब्यात असलेलं ‘डंकर्क’ हे सुप्रसिद्ध ठिकाण फ्रेन्चांना विकावं लागलं होतं. म्हणून इंग्लंडमधे कॅथरीन-चार्ल्सच्या लग्नानंतरच्या काही काळातच, लंडनकरांनी हेटाळणीच्या सुरात, ‘Three sights to be seen Dunkirk, Tangier, and a Barren Queene’ अशा अक्षरात रंगवलेली कमान लावली होती.

यातला Barren Queen हे शब्द, कॅथरीनने हुंड्यात आणलेल्या इतर दोन गोष्टी ब्रिटिशांना मिळाल्याच नाहीत आणि मिळालेलं मुंबई हे ओसाड बेट होतं. म्हणजे राणीने कागदावर भरभक्कम हुंडा आणला असं दिसत असलं तरी, प्रत्यक्षात हातात काहीच मिळालं नव्हतं. या अर्थाने आले आहेत. म्हणून ती बॅरन क्वीन.

परंतु बॅरन क्वीन म्हणून प्रथम हेटाळलं गेलेलं ‘पोर्ट ॲंड आयलंड ऑफ बॉम्बे’ हे एकमेंव ठिकाण मात्र ब्रिटिशांकडे टिकून राहिलं. नुसतं टिकूनच राहिलं नाही, तर ते प्रथम ब्रिटिशांना आणि नंतर आपल्याला फळलं. त्याने दोघांनाही भरभरून दिलं. अजुनही देते आहे..!

कॅथरीनला उद्देशून लिहिलेले गेलेले बॅरन क्वीन हे शब्द, दुर्दैवाने भविष्यातही खरे ठरले. तीच वैयाक्स्तिक आयुष्य तेवढं सुखकर नव्हत. नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा, पोटी धरलेला गर्भ न टिकण ही तिची दु:ख होती. तिचे चार गर्भपात झाले. ती ब्रिटनच्या गादीला वारस देऊ शकली नाही..नवरा चार्ल्सच्या निधानंतर ती माहेरी पोर्तुगालला निघून गेली आणि तिथेच तिचा अंत झाला.

‘लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते’ ह्या बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळीसारखी, ‘आजच्या मुंबईसाठी, कॅथरीन सासरी गेली’ असं वाटावं अशी तिच्या ‘प्रेम विरहीत’ लग्नाची (होय. हे एक loveless marriage किंवा ‘राजकीय तडजोड’ होती.) कहाणी आहे. त्यामुळे, ‘मुंबईसाठी महिलांचं योगदान काय’, या प्रश्नाचं उत्तर, मुंबई उजेडात आली, तिच मुळी एका महिलेमुळे. असं असताना मुंबईतलं महिलांचं योगदान काय, हा प्रश्नच मला फिजूल वाटतो..!

आणि हो, एक गंम्मत सांगायचीच राहिली. आजचं आपलं लोकप्रिय पेय  ‘चहा’ हे प्रथम मुंबईत आणण्यासाठी आणि नंतर मुंबैसाहित देशभरात लोकप्रिय होण्यासाठी कॅथरीनच कारणीभूत झालेली आहे..!

कॅथरीन सोबतच तिला समकालीन असलेल्या आणखी एका स्त्रीचा उल्लेख मला टाळता येणार नाही. ती म्हणजे ‘दोना इग्नेस डी मिरांडा’ ही..! ही डोम रोड्रीगो डी मोन्सोन्टो याची विधवा. मोन्सोन्टो याचं निधन झाल्यावर, मुंबई बेट ही त्याची ‘प्रोपार्ती इग्नेस्च्या नांवे झाली. मालमत्तेच्या मालकीच्या कागदपत्रात इग्नेसचा उल्लेख, ‘लेडी ऑफ द आयलंड (Senhora da Illha) असा केलेला होता.

हिचं महत्व तसं काहीसं दुय्यम असलं तरी, महत्वाचं आहे. ही स्त्री तशी दुर्लक्षितच राहीली आहे. हिच्याविषयी फारशी माहितीही मिळत नाही. माझ्या दृष्टीने हिचं महत्व म्हणजे, पोर्तुगिजांची मुंब ब्रिटिशांच्या ताब्यात गेली, ती हिच्या साक्षीने आणि हिच्याच घरात. ही संपूर्ण मुंबई बेटाची त्या वेळची वंशपरंपरागत मालकीण होती आणि तिचं राहातं घर म्हणजे, मुंबईचा सुप्रसिद्ध ‘फोर्ट’. किल्ला. बॉम्बे कॅसल..!

दिनांक १८ फेब्रुवारी १६६५ रोजी दोना इग्नेस मिरांडा यांच्या या घरात, मुंबई बेटं पोर्तुगिजांकडून इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा समारंभ झाला(ह्या घराला इथे घर जरी म्हटलं असलं तरी, १६६१ मधे मस्कतच्या अरबांनी, मुंबई बेटावर केलेल्या हल्ल्यात हे घर उध्वस्त झालं होतं. नंतरच्या काळातही याची फार दुरुस्ती केली गेली नव्हती. वर छप्पर असलेल्या चार पडक्या भिंती, त्या भिंतीवरच्या चार जुनाट तोफा आणि खालची जमिन एवढाच ऐवज उरला होता). ‘मुंबई आता ब्रिटिशांची झाली’ याचं प्रतिक म्हणून, याच घराच्या आवारातले दगड आणि माती पोर्तुगिज अधिकाऱ्यांनी, मुंबईचा नवनियुक्त ब्रिटिश गव्हर्नर हंफ्रे कूकच्या हातात ठेवली.इग्नेस मिरांडाच्या त्या जुनाट घराचंच रुपांत पुढे ब्रिटिशांनी त्यांच्या जगप्रसिद्ध किल्ल्यात-फोर्टमधे-केलं. आज त्या फोर्टचे काही अवशेष, एशियाटीक लायब्ररीच्या मागच्या बाजूच शिल्ल्क आहेत. परंतु, तो भाग नौसेनेच्या ताब्यात असल्याने, ते कुणाला पाहाता येत नाहीत. असं असलं तरी, ‘फोर्ट, मुंबई ४००००१’ या त्या परिसराच्या पत्त्यात अजुनही अस्तित्वात आहे.

दोना इग्नेस मिरांडा यांचा उल्लेख करण्याचं कारण एवढंच की, मुंबई बेट आणि त्यावरचं मिरांडा बाईंचं घर ताब्यात घेण्यापुर्वी, पोर्तुगिजांनी ते घर तिच्या इच्छे विरुद्ध ताब्यात घेऊ नये अशी अट घातली होती. तिच्या मृत्युपर्यंत सदरचं घर तिच्या ताब्यात राहील आणि तिच्या पश्चात तिच्या वारसांकडून ते घर, त्या वारसांची इच्छा असल्यास, त्यांना योग्य तो मोबदला देऊनच ताब्यात घ्यावं, असंही त्या अटीत म्हटलं होतं. परंतु मिरांडाबांईंनी फारसे आढेनेढे न घेता किल्ल्यावरील आणि मुंबई बेटावरील आपला अधिकार आणि ताबा, ब्रिटिशांनी जो मोबदला दिला, त्या बदल्यात सोडून दिला.

हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे, मुंबईच्या इतर चार बेटांवरच्या नागरिकांनी, मुंबईची बेटं, पोर्तुगिजांकडून इंग्रजांकडे जाण्यास जितका कडवा विरोध केला होता, तितका मिरांडाबाईंनी केलेला दिसत नाही. तत्कालीन मुंबईकरांच्या त्या विरोधाची कारणंही होती आणि ती त्यांच्या आणि त्या काळाच्या दृष्टीने बरोबरही होती. मात्र प्रस्तुत लेखाचा तो विषय नसल्याने, त्यावर उहापोह करणं स्थानोचित होणार नाही..।

जर मिरांडाबाईंचं घर ब्रिटिशांना ताब्यात मिळालंच नसतं तर, मुंबईचा सुप्रसिद्ध ‘फोर्ट’ अन्यत्रच कुठेतरी उभा राहिला असता आणि कदाचित मुंबईच्या इतिहासाला वेगळंच वळण मिळालं असतं..! शेवटी स्थानमहात्म्यही असतंच की..!!

येताना थोडंसं वेगळं. स्त्री शक्ती बाबतचं . विशेषतः श्रद्धावान मुंबैकरांसाठी..!

ह्या लेखाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत उल्लेख केलेल्या स्त्रिया, त्यांच्या नांवांची इतिहासात नोंद असेल किंवा नसेल, प्रत्यक्षात होऊन गेलेल्या आहेत. या पुढच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या स्त्री शक्ती मात्र अजुनही अस्तित्वात आहेत, असं प्रत्येक श्रद्द्धावान मुंबईकरांना वाटतं. त्यांच्या मनात त्यांना असीम श्रद्धेचं स्थान आहे. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय, मुंबईच्या जडण घडणीत महिलांचं स्थान काय’ ह्या लेखाला पूर्णत्व येणार नाही.

असं मानतात की, समुद्राने वेढलेल्या या बेटांवर, किनारपट्टीच्या आधाराने पहिली वस्ती झाली, ती मासेमारी करुन उदर निर्वाह करणाऱ्या कोळ्यांची. मुंबईच्या सात बेटांमधलं, आकाराने मोठ असलेल बेट म्हणजे ‘मुंबई’. या मुंबई बेटावर वस्ती केलेल्या कोळ्यांचं दैवत असलेल्या ‘मुंबादेवी’वरून ‘मुंबई हे नांव प्राप्त झालं, अशी बहुसंख्य मुबैकरांची श्रद्धा आहे..!

श्रीमुंबादेवी

अतिशय प्राचिन असलेलं मुंबादेवी हे दैवत, समस्त मुंबईकरांचं ग्रामदैवत आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात तिच्या नांवाची ओटी आवर्जून भरली जाते. लग्न झाल्यानंतर मुंबईकर नवीन जोडपं मुंबादेवीच दर्शन घेतंच घेतं. मुंबादेवी मुंबईची रक्षणकर्ती आहे, पोषणकर्ती आहे, अशी बहुसंख्य मुंबईकरांची श्रद्धा आहे.

महाराष्टार्तील प्रत्येक ठिकाणी एकेका दैवताची सत्ता असते. तशी मुंबईवर सत्ता चालते, ती श्रीमुंबादेवीची. मुंबादेवी ही मुंबईची सम्राज्ञी. तिने तिच्या, महालक्ष्मी, प्रभादेवी, शितलादेवी या इतर बहिणींना, प्रत्येक बेटावर आणि बेटवासियांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी इलाखे वाटून दिले आहेत. महालक्ष्मीची हद्द प्रभादेवीला संपते आणि प्रभादेवीची हद्द शितलादेविला..!

या व्यतिरिक्त या चौघा बहिणींनी, त्यांच्या आणखी धाकट्या बहिणींना लहान लहान इलाखे वाटून दिले आहेत. त्यात काळबादेवी, वाळकेश्वरची गुंडीदेवी, गिरगावातली गांवदेवी, वरळी कोळीवाड्याची गोलफादेवी इत्यादी. स्त्री कुळात जन्म घेतलेल्या ह्या अयोनिज देवता मुंबईच्या रक्षणकर्त्या आहेत, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची श्रद्धा आहे. त्या आहेत म्हणून आपणही आहोत, असं बहुतेक सर्वच श्रद्धाळु मुंबैकर मानतात..!

तसे मुंबईत पुरुष कुळातले देवही आहेत. जसे घोडपदेव, ताडदेव, परळचा बारादेव इत्यादी. पण ते बिचारे, ह्या ‘देविराज्यात’ आपापल्या देवळातच शांत बसून आहेत. त्यांची सत्ता त्या रावळापुरतीच. अहो, महाराष्ट्रातली पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर इत्यादी मोठ्या शहरांच्या मांदियाळीत, ‘मुंबई’ ही एकमेंव ‘ती’ आहे. मुंबई घडली ती स्त्रियांमुळेच, या साठी दुसरा अन्य पुरावा कशाला हवा..!

मुंबईच्या काय किंवा भारताच्या काय किंवा जगाच्या काय, इतिहासाच्या बखरींमधे महत्वाचं स्थान दिलं गेलंय ते पुरुषांना. इतिहासासाठी असलेला इंग्रजी शब्द ‘His-story’ हा तेच दर्शवतो. इतिहास म्हणजे His Story असेल, तर त्यात Her ला स्थान नाहीच. असं असलं तरी, इतिहासावर आपला ठसा उमटवणाऱ्या त्या पुरुषांना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या स्त्रियाच होत्या, हे विसरुन कसं चालेल. त्या नसत्या तर, इतिहास घडवणारे म्हापुरुष जन्माला तरी आले असते काय?

शिवरायांचं अस्तित्व जिजाऊंमुळे(च) होतं, हे एकदा मान्य केल्यावर, मुंबईच्या इतिहासात काय किंवा जगातल्या इतर कुठल्याही प्रांताच्या इतिहासात काय, ‘स्त्रियांचं योगदान काय’ हा प्रश्न अप्पलपोटा वाटू लागतो नाही?

-नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

08.03.2022