अशोक राणे यांनी गेल्या ५० वर्षात देशविदेशात भरपूर प्रवास केला आहे. तरूणपणी जेव्हा मुंबईतल्या लोकलचा पास काढायची बोंब होती, तेव्हा त्यांनी रेल्वेचं सर्क्युलर तिकिट काढून (तेव्हा तोी२७५/- रूपये होती) देशभर भटकंती करण्याचा प्रस्ताव मित्रांसमोर ठेवला. त्यांच्यासकट कुणाकडेच एवढे पैसे नव्हते म्हणून त्यांनी सुधारीत प्रस्ताव मांडला – ट्रक्सवाल्यांकडून फुकट लिफ्ट मागत भटकायचं”. मित्रांनी चेष्टा केली. पण यांनी पुढचंच सुचवलं की, मुंबई ते रोम विमानाचं स्वस्त तिकिट मिळतं ते घ्यायचं आणि रोमपासून सुरू करून सर्व युरोपियन देशात हिंडायचं. मित्र म्हणाले, हा वेडा आहे.
पण पुढे सिनेमाचं बोट धरून हा जगभर इतका हिंडला की, अभिनेता विजय कदम ज्याला त्याला सांगू लागला की, “अधुनमधून भारतात येण्यासाठी याच्याकडे भारताचा व्हिसा आहे” म्हणून.. ! विजय तेंडुलकरांनी तर याला एकदा विचारलंच की, “तुझी बॅग उचलायला कुणी सोबत लागत नाही का?”.
अशोक राणे जगभर हिंडले, पण त्यांनी क्वचितच टुरिस्ट पोईंटस पाहिले असतील. त्यांनी जे जग पाहिलं ते विलक्षण आहे. त्यांनी एकदा लिहिलं होतं की, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी आपल्या डिक्शनरीतून ‘महत्वाकांक्षा’ हा शब्द काढून टाकला. त्यांचा एक पत्रकार मित्र अस्वस्थ झाला. अशोक राणे यांनी त्याला सांगितलं की, तशी एक महत्वाकांक्षा आहे आणि ती म्हणजे जगातल्या एकूण एक देशात जायचं आहे आणि तिथल्या माणसांशी त्यांच्या भाषेत बोलायचं आहे…
…’ सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक लिहिणारे राणे, ‘जग पाहणारा माणूस ‘ हे पुस्तक कधी लिहिताहेत याची आता प्रतिक्षा आहे..!
आपण वाचायलाच हवा आणि संग्रहीही असायला हवा असा एक महत्वाचा ग्रंथ-
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांचं आणि पैलूंचं परखड विश्लेषण करणारा आणि भारताच्या भविष्यातील वाटतालीची निश्चित दिशा दाखवणारा द्विखंडात्मक महाग्रंथ.
‘बदलता भारत’
साठ नामवंत लेखकांच्या निरिक्षण आणि चिंतनातून कागदावर उतरलेली साठ विषयांची सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी.
संपादक – दत्ता देसाई.
प्रकाशक- मनोविकास प्रकाशन, पुणे.
दोन खंड. एकूण पृष्ठसंख्या- १२००.
किंमत -रु. ३,०००/- (रुपये तीन हजार मात्र) प्रकाशनपूर्व नोदणी -दि. १८ जानेवारी २०२३ पर्यंत.
सवलतीची किंमत- १,८००/- (रुपये एक हजार आठशे) अधिक रु.१३०/- पोस्टेज/कुरीअर शुल्क.
महत्वाचं – दि. १८ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदणी करणारांना दि. २६ जानेवारीपासून ग्रंथ उपलब्ध होत जाईल. १८ डिसेंबर नंतर नोंदणी करणारांना १८ फेब्रुवारी २०२३ नंतर ग्रंथ मिळेल.
किंमत अदा करण्यासाठी- सदर ग्रंथाची नोंदणी तुम्ही माझ्याकडेही करु शकता. 9321811091 (नितीन साळुंखे) या क्रंमाकावर आपण आवश्यक ती रक्कम जमा करु शकता.
‘मनोविकास प्रकाशन, पुणे’ यांनी प्रकाशित केलेल्या, माझ्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकाला तुम्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
हे पुस्तक आता खालील ठिकाणी उपलब्ध आहे-
१. मनोविकास बुक सेंटर, आकाशवाणी आमदार निवास आवार, चर्चगेट, मुंबई-३२.
२. मॅजेस्टीक ग्रंथ दालन, शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई -२८.
३. आयडीयल बुक डेपो- दादर पश्चिम
४. मॅजेस्टीक बुक डेपो – राम मारुती रोड, भवानी बिल्डींग, ठाणे – ४०० ६०२.
मुंबई-ठाणे येथील वरील सर्व दुकानांत व महाराष्ट्रातील पुस्तकांच्या सर्व प्रमूख दुकानांतून हे पुस्तक उपलब्ध आहे.
(एकापेक्षा जास्त प्रती असल्यास पोस्टेज खर्चात त्याप्रमाणे वाढ होईल)
आजच नोंदणी करा
सदर पुस्तकाची नोंदणी आपण खालील प्रमाणे करू शकता-
9321811091 या क्रमांकावर पोस्टेज खर्चासह सवलत मूल्य ‘गुगल पे’ करा,
किंवा –
NITIN ANANT SALUNKE Axis Bank Ltd., Dadar East Br., Mumbai 14, SB A/C 124010100345477 IFSC CODE – UTIB0000124 या बँक खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम आपण जमा करून पुस्तकाची नोंदणी करा.
मात्र आपला पत्ता, फोन नंबर आणि पैसे जमा झाल्याची पावती salunkesnitin@gmail.com वर पाठवावी.
मेलच्या विषयाच्या जागी (Sub field मधे) “पुस्तक नोंदणी- आपले नांव’ असे स्पष्ट लिहावं.
माझं आजवरचं संपूर्ण आयुष्य मुंबईतच गेलंय. मुंबईत सर्वच आधुनिक सुखसोयी (त्या त्या काळातल्या) सुरुवातीपासूनच उपलब्ध असल्याने, मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या कोणत्याही मुंबईकराला मुंबई सोडून इतर प्रांतात जायची पाळी फारशी कधी येत नाही;त्यामुळे मुंबई बाहेरचं जग आणि तिथे राहाणाऱ्या माणसांचं जगणं, त्यांचं सांस्कृतिक, सामाजिक व भाषाविश्व त्याला फारसं अनुभवायला मिळत नाही. इतर मुंबईकरांचं माहित नाही, पण मला मात्र ही उणीव सातत्याने जाणवत राहाते.
मला विविध प्रांतातल्या भाषा आणि बोलींचं लहानपणापासून आकर्षण आहे. मुंबईत जन्म झाल्याने, कानावर सातत्याने पडत आलं ते मराठी. त्यातही मालवणी बोली प्रामुख्याने मी ऐकत आलो. त्यानागचं कारणही अगदी उघड आहे. १८५३ च्या एप्रिल महिन्यात मुंबईतली पहिली प्रवासी रेल्वे धावली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईतली पहिली कापड गिरणी सुरू झाली. ह्या दोन महत्वाच्या घटनांनी भविष्यातल्या औद्योगिक मुंबईचा पाया घातला, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं आणि त्यात तथ्यही आहे. प्रवासाची स्वस्त सोय आणि रोजगाराची हमी मिळाल्यानंतर देशभरातल्या श्रमिकांनी मुंबईचा रस्ता सुधरला. त्यातही सुरुवात झाली, ती कोकणातून..!
कोकण भौगोलिकदृष्ट्या मुंबईला जवळचं. किंबहुना मुंबई हा कोकणाचाच हिस्सा. त्यात रेल्वे अवतरणापूर्वीपासूनच कोकण मुंबईशी जलमार्नाने जोडलेलं असल्याने, मुंबईत पहिला कामगार अवतरला तो कोकणातून आणि मग त्यात सातत्याने वाढच होऊ लागली. हा कामगार येताना आपली भाषा तर घेऊन आलाच, परंतु संस्कृतीही घेऊन आला. आपापल्या गांव-शीववाल्यांच्या सोबतीने तो मुंबईत राहू लागला. त्यातून मालवणी, रत्नागिरीकर, चिपळूणकडचे बाले, आणि नंतर आलेले घाटावरचे घाटी अशा मराठी मातीतल्याच, परंतु विविध ठिकाणच्या लोकांच्या वस्त्या मुंबईत, त्यातही गिरणगांवात, होऊ लागल्या. माझं मूळ मालवणी मुलखातलं आणि मुंबईतलं आजोळ लालबागातलं असल्याने, माझ्या आजुबाजूला मालवणी बोलणारीच माणसं जास्त करुन होती आणि परिणामी लहानपणापासूच ती बोली कानावर पडू लागली व मला आपोआप बोलता येऊ लागली..! तेंव्हा मला मालवणी हीच मुंबईची भाषा आहे असं वाटायचं. म्हणजे हा पगडा एवढा होता की, एखादा घाटी स्वरात बोलू लागला की तो कुणीतरी वेगळा आहे, असं वाटायचं..!
पुठे थोडा मोठा झाल्यावर हिन्दीची ओळख झाली. याचं श्रेय, अर्थातच, हिन्दी सिनेमांचं. तरीही तोवर मुंबईतली सर्वसामान्य संपर्काची भाषा विविध बोलींतील, परंतु मराठीच होती. येता-जाता रस्त्यात, दुकानांतून, रेल्वे-बसमधून प्रवास करताना मराठी कानावर पडणं अगदी सहजचं होतं. अगदी गुजराती दुकानदार, फेरीवाले भैयाही मराठीतून बोलत असत. मराठीतून बोललेलं त्यांना व्यवस्थीत समजतही असे. मुंबईतल्या व्यवहाराची भाषा मराठीच होती. अगदी पारसी, गुजराती गिरणीमालक आणि गिरण्यांमधे काम करणारे इतर भाषक अधिकारीही मोडकं-तोडकं का होईना, ‘घाटी’भाषा बोलत असत (मराठीसाठी ‘घाटी’ असंच बोललं जाई तेंव्हा) . ही परिस्थिती गत शतकातल्या नवव्या दशकापर्यंत कायम होती.
९०च्या दशकात मुंबईतल्या कापड गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईचा मराठी तोंडवळा हळुहळू बदलू लागला. मुंबईतलं मराठीपण टिकवून ठेवण्याचं मोठं श्रेय गिरण्या आणि त्यात तीन पाळ्यांत राबणाऱ्या गिरणी कामगाराचं होतं. तोच विस्थापित होऊ लागला आणि मुंबईतलं मराठीपण हरवू लागलं. गिरण्यांच्या जागी रोजगाराची नवनवीन साधनं उपलब्ध होऊ लागली आणि मुंबईत देशातील विविध भागांतून रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. प्रवासाच्या अधिक चांगल्या सोयी, कोणत्याही राबत्या हाताला काम मिळण्याची खात्री, तंत्रज्ञानात वेगाने झालेली प्रगती यात मराठी माणूस स्वतःला बसवू न शकल्याने, तो हळुहळू मुंबईच्या बाहेर फेकला जाऊ लागला.
त्याचवेळेस मुंबईतील जागांचे भाव अस्मान छेदून जाऊ लागले. मुंबईतल्या लहान जागांना सोन्याचा भाव मिळू लागला आणि खोलीच्या एका खणात आपल्या मोठ्या कुटुंबासहीत राहाणारा मुंबईकर, मुंबईच्या बाहेर भाईंदर-विरार आणि ठाण्याच्या पलिकडील डोंबिवली-कल्याणच्या प्रशस्त ब्लॉकात स्थलांतरीत होऊ लागला. त्याच्या मुंबईतल्या एकखणी खोलीचा ताबा गुजराती-मारवाडी धंदेवाल्यांनी सहजपणे घेतला. मुंबई कॉस्मोपॉलिटन होऊ लागली आणि मुंबईतली आणि मुंबईची संपर्क भाषा हिन्दी होऊ लागली किंवा झाली.
एव्हाना मुंबईत गुजराती व्यापाऱ्यांसोबतच मारवाडी समाजाचा शिरकाव झाला होता. मुंबईत पुर्वीपासूनच असलेल्या उत्तरेतले भैये, गुजराती आणि काही मारवाडी व्यापाऱी यांची दुसरी-तिसरी पिढी व्यापारात उतरली होती. गिरण्यांच्या धुरांड्यांची जागा राक्षसी किंमतीचे टोलजंग टॉवर्स घेऊ लागले होते. यात फ्लॅट्स खरेदी करणारे बहुतेक सर्व परप्रांतीय धनाढ्य होते. त्यांना मुंबईशी आणि इथल्या मराठीशी फार काही देणं घेणं नव्हतं. पुर्वीसारखी मराठी गिऱ्हाईकही राहिली नव्हती. मुंबईतल्या शिल्लक मराठी जणांची परिस्थितीही काही फार वेगळी राहिली नव्हती. त्यांचीही कॉन्व्हेन्ट शिक्षित पिढी तरुण झाली होती. या पिढीचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असल्याने, त्यांना मराठीचं प्रेम होतं, पण या भाषेचा फार काही गंध नव्हता. त्यांची इंग्रजीही मार्क मिळवण्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघंही हिन्दीचाच आधार घेऊ लागले होते.
गुजराती भाषकांची संख्याही मुंबईत वाढू लागल्याने, गुजरातीही कानावर पडू लागली होती. गुजराती ही ‘व्यापाराची’ भाषा. मी काही काळ बॅंकेत नोकरी केली होती. बॅंकेचे बहुसंख्य ‘कस्टंबर’ गुजराती असत, पण बॅंकेचा कारभार (आणि धोरणही) शंभर टक्के मराठी भाषेत होता. गुजराती ग्राहक आमच्याशी मराठीच, परंतु गुज्जू टोनमधे बोलत. ते ‘गुर्जरी मराठी’ ऐकायला वाटेही छान. ते आपसांत मात्र गुजराती भाषेत बोलत. त्यांचं बोलणं कानावर पडत असे. अंधेरीचा माझा शेजारही बराचसा गुजराती भाषक होता. त्यांचं बोलणं-कम-भांडणं सातत्याने कानावर पडत असल्यामुळे, मला सवयीने गुजराती समजुही लागलं होतं. गुजराती शेजारी आमच्याशी संपर्क साधताना मात्र आवर्जून मराठीत बोलत असत. पण पुढे पुढे त्यांनी आणि आम्हीही हिंदीचा आधार घेऊ लागलो. मुंबईतल्या बऱ्याच मराठी माणसांना उत्तम गुजराती बोलता येते. असं असलं तरी, सर्वसमान्यपणे मुंबईतली संपर्कभाषा हिन्दी झाली होती.
मुंबईतली मराठी भाषा अंतर्प्रवाहाप्रमाणे टिकून राहीली, ती प्रामुख्याने सरकारी कार्यालयांतून, बीएस्टीच्या बसमधून आणि पोलिस खात्यातून. सरकारी मराठी म्हणजे, उत्तम मराठी येणाऱ्या माणसाच्याही काळजात घडकी भरण्याचा प्रकार. ते नस्ती, कार्यात्मक प्राधिकार, ज्ञापन आणि असे अनेक विचित्र शब्द कानावर पडले की नको ते मराठी, त्यापेक्षा इंग्रजीच बरं अशी परिस्थिती होते. पण ही झाली सरकारी कागदावरची भाषा. सरकारी कार्यालयातील बोली मात्र सामान्य मराठीच होती. अजुनही आहे. सरकारी कर्मचारी-अधिकारी बोली भाषेतली मराठी बोलतात. बीएस्टीच्या बसमधे अजुनही मराठीचंच राज्य आहे. पोलीस खात्याशी सामान्य माणसांचा फारसा संबंध येत नाही ( आणि येऊही नये. तिथे ‘खलरक्षणाय सदनिग्रहणाय’ हा प्रकार असतो), परंतु ‘खाकी’ची बोली मात्र अस्तल गावरान मराठीच (शिव्यांसहीत) आहे. पोलिसांबद्दल बोलायचं तर, मुंबैत राहाणाऱ्या आणि कोणतीही भाषा बोलणाऱ्या सामान्य माणसाचा संबंध येतो तो, वाहतुक पोलीसाशी. वाहतुक पोलीस तर मराठीत बोलतोच आणि समोरच्यालाही मराठीच बोलायला लावतो. कधी संधी मिळाली तर, वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यातला रस्त्यावरचा सं’वाद’ जरूर ऐकावा. अगदी ऐकण्यासारखाच असतो..!
रिक्षा-टॅक्सीचालक बहुसंख्य हिंदी भाषक आहेत. त्यांना मराठी समजते. काहीजण बोलायचा प्रयत्नही करतात. मात्र मराठी पॅसेंजर रिक्षा-टॅक्सीवाल्यांशी बोलताना, उगाच पत्त्याचा घोळ होऊन आपण भलत्याच मार्गाला जाऊ नये म्हणून, त्याच्याशी हिंदीतच बोलणं पसंत करतात.
वरील व्यवस्था वगळता मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे लोकल ट्रेन. ही धावती-‘बोलती’ लहानशी मुंबईच आहे. मुंबईच्या उत्तर दिशेला पश्चिम रेल्वेवर भाईंदर-विरार आणि मध्य रेल्वेवर कल्याण-डोंबिवली आणि त्याही पलिकडे एव्हाना बहुसंख्य मराठी माणूस विस्थापित झालेला आहे. ह्या मुंबैकारांच्या निवसाचं ठिकाण तिकडे असलं तरी, त्याला नोकरी-व्यवसायानिमित्त अजूनही यावं लागतं, ते प्रामुख्याने मुंबईतच. सकाळी दक्षिण दिशेला ऑफिसात जाण्यासाठी आणि संध्याकाळी उत्तरेतल्या घराकडे परतण्यासाठी त्याच्या प्रवासाचं मुख्य साधन म्हणजे लोकल. मुंबईची ही लोकल गाडी मुंबईची नाडी आहे. ती मुंबई(करांच्या)च्या ‘प्रकृती’चा अचूक अंदाज देते. मुंबई ओळखायची असेल, तर ह्या लोकल गाडीतल्या ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’चा कानोसा घ्यावा. ह्या लोकलमधले आपापसातले वाद-संवाद आणि मोबाईलवरचं संभाषण ऐकताना जगात काय घडतंय आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे इथे अगदी ‘लाईव्ह’ समजत.
ह्या लोकल ट्रेनमध्ये मुंबईत मराठी भाषा शिल्लक आहे की नाही आणि कितपत आहे, याचा अंदाज बरोबर मिळतो. माझं निरीक्षण आहे की, लोकल ट्रेनमध्ये अजुनही १० मधल्या ६ जणाच्या तोंडून मराठीच्या विविध बोली ऐकू येतात. लोकलमधला सह प्रवाशाशी होणारा संवाद आणि/किंवा वाद सुरु होताना हिन्दीतच होतो. पण बऱ्याचदा होतं काय की, समोरचाही मराठी आहे याचा काही वेळातच अंदाज येऊन तो वाद-संवाद पुढे मराठीत सुरू होतो. मला तर प्रवासात हे अनेकदा जाणवलेलं आहे. हा ‘प्रवासी मराठी माणूस’ मुंबईतील आपापल्या कार्यालयातूनही मराठीत बोलतना मला अनेकदा आढळलेला आहे. आपण मराठीतून संवाद साधायचा प्रयत्न केल्यास, आपल्याला मिळणारा प्रतिसादही मराठीत असतो, हे देखील अनुभवायला येत असतं. मला तरी हे आश्वासक वाटतं.
मुंबईत कायमचा राहाणाऱ्या मराठी माणसाचा टक्का घटला असला तरी, सकाळी साधारण १० ते संध्याकाळी ७-८ वाजपर्यंत मुंबईतला मराठी भाषेचा वावर बऱ्यापैकी असतो..! या वेळेव्यतिरिक्त ही मराठीची लेकरं लॉजिंग-बोर्डींगचंच स्वरुप आलेल्या वसई-ठाणे खाडीपलिकडील साष्टीत आपापल्या घरट्यात जाऊन तिकडचा मराठी टक्का टिकवण्याचा करत असतात..!
मुंबईत मराठी टिकून आहे, ते आणखी एका ठिकाणी जाणवतं. डॉक्टरकडे. डॉक्टर गुजराती, मारवाडी, पंजाबी की आणखी कुणीही असो, तो तपासणी करता आलेला रुग्ण जर मराठी असेल, तर त्याशाशी तो मराठीच बोलतो. आजारपणात संबंध (आणि गाठही) थेट जीवाशीच असल्याने, खास मराठी भाषेतच (किंवा त्या त्या भाषेतच) वर्णन करता येतात असे काही जे आजार किंवा लक्षणं असतात, ती नीट कळण्यासाठी डॉक्टर्स पेशंटच्या भाषेचाच आधार घेतात. मराठी पेशंट असेल तर डॉक्टर्स आवर्जून मराठीतच बोलतात. ह्यात तरुण-प्रौढ असे सगळेच डॉक्टर आले. वकीलबाबू मात्र इंग्रजीचा झगा उतरवायला सहसा तयार होत नाहीत. तरी कनिष्ठ न्यायलयात मात्र बऱ्यापैकी मराठीचा बोली कारभार चालतो. तिथले न्यायमपर्तीही मराठीत बोलतात आणि सामनेवाल्यालाही बोलू देतात..
एकुणात काय, तर मुंबईतला मराठी माणूस बऱ्यापैकी कमी झालेला आहे हे सत्य असलं तरी, त्याची भाषा असलेली मराठी मात्र अजुनही मुंबईत बऱ्यापैकी जम टिकवून आहे, असं माझं अनुभवांती झालेलं मत आहे. हा जम अधिक घट्ट करण्यासाठी आपण आवर्जून मराठीत बोलायला मात्र हवं
ही गोष्ट साधारण २०१८ साल संपता संपतानाची. एके दिवशी श्री. अशोक राणेंचा मला फोन आला. तसा आमचा एकमेकाला अधुमधून फोन असायचाच. ख्याली-खुशाली विचारणं, एकमेकांच्या आवडलेल्या लिखाणावर बोलायचं, नवीन काय वाचायला हवं, पाहायला हवं एवढं बोलण व्हायचं. आताचा फोनही तसाच होता. पण, मुंबईच्या ‘गिरणगांवा’वर एक डॉक्युमेंटरी तयार करायची मनात चाललंय, असं मला अशोकजीं जेंव्हा सांगितलं, तेंव्हा त्यांनी न विचारताच, ही डॉक्युमेंटरी तयार करताना मलाही त्यात सहभागी व्हायला आवडेल, असं सांगून टाकलं.
मी सांगितलं खरं, पण अशोकजींसारखी जागतिक सिनेमात वावरणारी मातब्बर व्यक्ती मला कितपत संधी देईल आणि दिली(च), तर मी ती निभावू शकेन की नाही, याची मला शंका होती. पुन्हा डॉक्युमेंटरी आणि चित्रपट यांची जातकुळी वेगळी असली तरी, या दोन्ही गोष्टी बनवण्याची प्रक्रिया एकच असते, हे अगदीच सामान्य म्हणावं एवढं(च) ज्ञान मला होतं. त्यात चित्रपट आणि नाटक पाहाणं या दोन्ही प्रकारांची मला तेवढीशी आवड नव्हती. पण, चित्रपट बनवणे आणि नाटक बसवणे, या दोन प्रकारांविषयी माझ्या मनात थोडं कुतुहल होतं. कुमार वयात मालवण्यांच्या काही हौशी नाटकांच्या तालमी आणि तरुणपणी काही चित्रपटांचं चित्रिकरण पाहिलेलं असल्याने, लहनपणीच्या त्या कुतुहलाचं रुपांतर आकर्षणात झालं होतं. पण ते तेवढंच. त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेण्याची संधी मिळाली नव्हती. आजवर करत आलेल्या खर्डेघाशीत तशी शक्यताही नव्हती. एखाद्या गोष्टीचं आकर्षण असणं आणि त्या गोष्टीविषयी थोडीतरी माहिती असणं, या दोन भिन्न बाबी आहेत, हे मला कळत होतं. तरीही माझे अत्यंत आवडते लेखक असलेल्या अशोकजींसोबत काम करण्याची संधी मिळावी आणि डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कामात अशोकजींनी मला सोबत काम करण्याची संधी द्यावी असं मात्र मला मनापासून वाटत होतं.
असं वाटण्यामागे आणखीही एक कारण होतं. डॉक्युमेंटरीचा विषय. गिरणगांव. पूर्वेला माजगांव-शिवडी ते पश्चिमेला वरळीपर्यंत आणि दक्षिणेला भायखळा ते उत्तरेला परळपर्यत विस्तार असलेला भाग म्हणजे ‘गिरणगांव’. गिरणगाव अस्तित्वास येण्यास सुरुवात झाली, ती साधारण एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकापासूनच. १८५४ साली मुंबईच्या ताडदेव भागात मुंबईतली पहिली कापडगिरणी सुरु झाली. सुरुवातीला सुरु झालेल्या चार कापडगिरण्या ताडदेव भागातच उदयाला आल्या होत्या. मुंबईतली पाचवी आणि गिरणगावातली पहिली कापडगिरणी, ‘Royal Spinning & weaving Co. Ltd.’ सुरु झाली, ती दिनांक ८ ऑगस्ट १८६० या दिवशी लालबागला. गिरणगावच्या जन्मास कारणीभूत झालेली ही पहिली गिरणी. इतर सर्व गिरण्यांप्रमाणे ही गिरणीही आता बंद झालेली असली तरी, ती आजही आपल्याला पाहाता येते. ती गिरणी म्हणजे, दादर टी.टी.हून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने फोर्टला जाताना, लालबाग मार्केटला अगदी लागून असलेली, ‘दिग्विजय मिल’. दिग्विजय मिलचं धुरांडं धूर ओकू लागलं नि पुढच्या ६०-७० वर्षात जवळपास पन्नासएक गिरण्या माजगांव-वरळी आणि परळ भायखळा भागात धडाधड सुरू झाल्या. दिग्विजय मिलने जन्म दिलेल्या गिरणगावाचं पालन पोषण केलं, नांवा-रुपास आणलं, ते ह्या गिरण्यांनी मिळून.
या गिरण्यांमधे काम करायला आलेला पहिला कामगार मुंबईत आला, तो कोकणातून. कोकण पूर्वीपासूनच जलमार्गाने आणि रस्त्याने मुंबईशी जोडलेलं असल्याने, इतरांच्या तुलनेत कोकण्यांना मुंबई गाठणं जास्त सोप होतं. त्यामुळे गिरण कामगारांची पहिली फळी मुंबईत अवतरली, ती कोकणातून. नंतरच्या काळात जसजसा खंडाळ्याचा घाट ओलांडून घाटावर रेल्वेचा विस्तार होत गेला, तसतसा घाटावरुन आणि देशाच्या इतर भागातुनही कामगार गिरणगांवात येऊ लागला. विविध भागातून आलेल्या अठरापगड जातींच्या कष्टकऱ्यांची गर्दी गिरणगांवात झाली. परंतु कोकणातून आलेल्या आद्य कामगारांमुळे गिरणगांवाचा चेहेरा प्रामुख्याने कोकणीच राहीला.
गिरण्यांमधे काम करायला आलेल्या ह्या कामगारांच्या पहिल्या दोन पिढ्या मुंबईबाहेर, आपापल्या मुलकात जन्मलेल्या होत्या. ते जन्माने मुंबईकर नव्हते. हे आद्य गिरण कामगार मुंबईत येताना आपापलं कुटुंब गांवाकडे ‘सौंसार’ करण्यास ठेवून, रोजगारासाठी शिड्यानेच मुंबईत आले होते. गिरणीत काम करायचं, मिरगाच्या टायमाला शेतीकामासाठी आणि होळी-गणपतीच्या सणांना माघारणीला आणि पोराबाळांना भेटण्यासाठी गावाकडे जायचं हा त्यांचा शिरस्ता.
सुरुवातीला वीज नसल्याने, गिरण्या सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत चालत. अंधार झाला, की गिरणीतलं कामकाज बंद होई. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने, जास्त तास काम चाले, तर हिवाळ्यात आणि पावसांत नेमकं उलट होत असे. दिनांक २ ऑगस्ट १९११ पासून मुंबईत ‘टाटा कंपनी’ची वीज उपलब्ध होऊ लागली आणि १९१२-१३ पासून ती वीज गिरण्यांपर्यंत पोहोचू लागली. विजेवर चालणारी पहिली कापड गिरणी होण्याचा मान लालबागच्या ‘फिन्ले मिल’ने मिळवला. त्यानंतरच्या काहीच काळात मुंबईतल्या एकूण २६ गिरण्या विजेवर चालू लागल्या. त्यातल्या बहुसंख्य गिरणगावातल्या होत्या. गिरण्या विजेवर सुरु चालू लागल्या आणि गिरण्यांमध्ये दिवसाचे २४ तास चालू राहणारी ‘पाळी’ पद्धती अवतरली. पहिली, दुसरी आणि तिसरी पाळी सुरु झाल्यामुळे, जादा कामगारांची गरज भासू लागली आणि कोकण आणि इतर ठिकाणाहूनही कामगार मोठ्याप्रमाणावर मुंबापुरीच्या दिशेने निघाले.
मुंबईत आलेल्या ह्या गिरण कामगारांनी मुंबईत राहण्यासाठी गावच्या मंडळाची अथवा त्यांच्यासारख्याच शिड्या गाववाल्याची, एक-दोन मजली लाकडी चाळीतील एका खणाची खोली जवळ केली. त्यात आपापल्या पाळीनुसार १५-२० जणांनी राहायचं. कोकणी-मालवणी लोक ह्या खोल्यांना ‘झिलग्यांची खोली’ म्हणत, तर घाटावरचे लोक ‘बैठकीची खोली’ म्हणत. एकट्याने राहणाऱ्या ह्या गिरणी कामगारांची पोटाची सोय भागवण्यासाठी, सुप्रसिद्ध ‘खानावळ’ ही संस्था ह्याच काळात उदयाला आली. खानावळ चालवणाऱ्या बाई ज्या भागातून मुंबईत आल्या, त्या भागातली चव तिच्या जेवणात उतरू लागली आणि ती चव भावणारी माणसं तिच्याकडे खानावळी म्हणून जेवायला जाऊ लागली. ‘कोकणे, भात बोकणे’ रत्नागिरी-मालवणकडची खानावळ बघत, तर ‘घाटी, बरबाट चाटी’ एखाद्या घाटणीने चालवलेली खानावळ जवळ करीत. चवबदल म्हणून अधूनमधून इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असंही होत असे.
मुंबईत आलेले हे कामगार एकेकटे आलेले असले तरी, ते येताना आपापली भाषा, आपापल्या प्रथा-परंपरा, नेसण्याच्या-जेवणाच्या पद्धती, सण-समारंभ-उत्सव घेऊनच आले होते. फावल्या वेळेत किंवा सुटीच्या दिवशी भजन-कीर्तन किंवा आपापल्या गावाकडच्या सवईनुसार लेझीम, भारुड, व्यायाम इत्यादी माध्यमातून स्वत:चं आणि सोबत्यांचं मनोरंजन करून घ्यायचं हा दिनक्रम. पुढच्या काळात ह्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांच वा सण-उत्सवांचा एक मनोहारी मिलाफ गिरणगावात झाला. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून गिरणगावातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहता येतं.
मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ सालात गिरगावतल्या केशवजी नाईक चाळीत साजरा झाला. त्यानंतरचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला तो थेट गिरणगावात १९२० सालात, लालबागच्या चिंचपोकळी सावजानिक गणेशोत्सव मंडळात. लालबागचा भाग मुख्यत्वेकरून कोकणी-मालवणी लोकांचा. आधीच कोणताही उत्सव उत्साहाने साजरा करण्यात पटाईत असलेल्या कोकणी-मालवण्यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला नसता तरच नवल..! केवळ सहभाग घेवून थांबतील तर ते कोकणी कसले, त्याला त्यांनी आपला चेहेरा दिला. सुरुवातीच्या काळात ते दहा दिवस भजन, कीर्तन, दशावतारी नाटकं, गावच्या मंडळाने बसवलेली हौशी नाटकं ह्यांची धूम असे. ह्या गणेशोत्सवात भाग घेण्यासाठी मग घाटावरची माणसंही त्यात सामील होऊ लागली. त्यांनी येताना त्यांच्या पट्टयातलं नमन-सोंगी-भारुड आणलं, लेझीम, लाठी-काठी-बनाती, दांडपट्टा इत्यादी मैदानी खेळ आणले. पुढे पुढे घाटावरच्या लेझीमला तर कोकण्यांचा पुढाकार असलेल्या गणपतीच्या मिरवणुकीत अग्रभागी मान मिळाला. अगदी आजही गिरणगावातल्या सार्वजनिक गणपतीच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझीम लागतेच. लाल मातीच्या आखाड्यात लंगोट लावून घुमने आणि गोटीबंद शरीर कमावणे हा खास देशावरच्या लोकांचा छंद. पुढे तोच ‘व्यायामशाळे’च्या माध्यमातून गिरणगावात स्थिरावला. ती गिरणगावाची ओळखही बनली. ‘चर्चा’ हा खास कोकणी गुण. तो गणेशोत्सवातल्या व्याख्यानाच्या माध्यमातून अख्ख्या गिरणगावाने आपलासा केला.
गिरण्यांमध्ये काम करायला आलेल्या ह्या कामगारांत मुसलमान, भैय्या, तेलुगु असे लोकही होते. त्यांचे त्यांचे सण-उत्सव ते उत्साहाने साजरे करीत असत. भय्यांचे ‘बिरहा’, ‘रामलीला’, ‘दंगल’, तर मुसलमानांच्या ‘कव्वाली’ असे कार्यक्रमही चालत. अर्थात भय्या आणि मुसलमान यांची संख्याही कमी असल्याने, त्या कार्यक्रमांचा तेवढा बोलबाला नसे. कसंही असो, उत्सव कोणाचाही असो, त्यात गिरणगावातील सर्व जाती-धर्मियांचा समान सहभाग असे. त्यातूनच एकमेकांच्या प्रथा-परंपरांचा सुरेख संगम ह्या उत्सवातून झालेला दिसे. तिच गिरणगांवाची ओळखही बनली. ‘ये बारा गावच्या, बारा व्हयवाटीच्या म्हाराजा, आज तुजा लेकरु तुज्यासमोर गारांना घालता हां…’ ह्या मालवणी गाऱ्हाण्याशिवाय परेल-लालबागच्या कोकण्यांचा गणपती तर ऐकायचाच नाही, पण ‘डीलाय रोड’च्या (हा शब्द चुकलेला नाही. नांव ‘Delisle Road’ असं असलं तरी ‘डीलाय रोड’च) घाटावरच्या लोकांचा गणपतीही ऐकत नसे. गणपती कोणाचाही असो, ‘गाराना व्हयाच’ हा आग्रह असायचाच. कोणत्याही दोन विभिन्न संस्कृतीतून आलेले समाज जेंव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्यांचा एकमेकांच्या संस्कृतींचा संघर्ष होतो आणि कालांतराने मिलाफ होतो. गिरणगावात संघर्ष झालाच नाही. झाला तो थेट देखणा मिलाफच. तीच गिरणगावची संस्कृती.
सुरुवातीला एकट्याने येऊन गिरण्यांत राबणाऱ्या आणि गिरण्यांच्या आधाराने गिरणगावात स्थिरावलेल्या ह्या कामगारांनी पुढे आपापली गांवाकडची कुटुंब मुंबईत आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची मुलं गिरणगावातच जन्म घेऊ लागली. खऱ्या अर्थाने ज्यांना ‘मुंबैकर’ म्हणता येईल, ते हेच खरे मुंबंईकर..! सुरुवातीला ह्या आद्य मुंबईकरांना जन्म देणाऱ्या आवशींची बाळंतपणं होत, ती आपापल्या घरांतून. सुईणीच्या मदतीने. त्यात अनेकदा बाळ किंवा/आणि बाळंतीण अशा दोघांनाही जीव गमवावा लागत असे. कामगारांच्या गिरण्यांमध्ये दांड्या होत. कामगारांची (आणि गिरणीची) ही अडचण लक्षात घेऊन, ‘बॉम्बे डाईंग मिल’चे मालक सर नेस वाडीया यांनी, सन १९२६ मधे आपल्या दिवंगत आई-वडीलांच्या स्मृत्यर्थ, त्यावेळचं मुंबई राज्य सरकार आणि मुंबई नगरपालिका यांच्या सहकार्याने खास बाळंतपणाचं हॉस्पिटल सुरू केलं. हेच ते परळचं सुप्रसिद्ध ‘नौरोसजी वाडीया मॅटर्निटी हॉस्पिटल’. नांव लांबलचक असलं तरी ते मुंबैकरांमधे प्रसिद्ध होतं, ते ‘वाडीया हॉस्पिटल’ किंवा नुसतंच ‘वाडीया’ म्हणून..!
‘वाडीया’च्या उल्लेखाशिवाय गिरणगावच्या ‘संस्कृती’ला पूर्णत्व येत नाही. आपल्या पूर्वजांनी साकार केलेल्या त्या सर्वसमावेशक ‘गिरणगाव संस्कृती’चा वारसा, ‘वाडिया’ जन्म घेतलेल्या नवीन वंशजांनी पुढे ४०-५० वर्ष समर्थपणे सुरु ठेवला. केवळ सुरूच ठेवला नाही, तर त्यात वाढ करून तो अधिक समृद्ध केला.
१९३० सालापासुन पुढच्या ४-५ दशकांत जन्मलेल्या गिरणगावकरांनी, आपला पहिला श्वास गिरणगावातल्या ‘वाडीया’तच घेतलेला आहे. त्या पहिल्या श्वासातून, फुफ्फुसाच्या मार्गाने त्यांच्या मना-शरिरात घुसून बसलेलं ते गिरणगांव, पुढे अनेक कारणांनी, अनेक गांवाची हवा खाऊन आणि पाणी पिऊनही बाहेर पडायला तयार होत नाही. ! अस्मादिकाही त्यातलेच.
गिरणगावात जन्मलेला मुंबईकर ‘गिरणगाव’ हा शब्द ऐकताच, अगदी मेलेला असला तरी, तिरडीवरून उठून उभा राहील आणि जुन्या गजाली सांगायला लागेल, अशी त्या शब्दाची जादू आहे. मग मी तर जिता-जागता आहे. माझाही पहिला श्वास गिरणगावच्या गिरणगावातलाच आहे. वयाच्या ५ ते १० वर्षांपर्यंतचं, उतरत्या काळातलं गिरणगाव, न कळत्या वयातलं मी थोडसं पाहिलेलं आहे. आई-मामा-मावश्यांच्या गजालींतून ऐकलेलं आहे. त्यातून माझ्या मनात घर करून बसलेली गिरणगावची ती संस्कृती, गिरण्यांच्या १९८२च्या संपानंतर हळूहळू नामशेष होत गेल्याची वेदना माझ्यातही आहे. असा ‘मी’, राणेसाहेब ‘गिरणगावावर‘ डॉक्युमेंटरी तयार करताहेत हे ऐकूनच उत्तेजित झाला नसतो, तरच नवल. म्हणून लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, “गिरणगांवा’वर एक डॉक्युमेंटरी तयार करायची मनात पक्क होतंय”, असं मला अशोकजीं जेंव्हा सांगितलं, तेंव्हा त्यांनी न विचारताच, त्या डॉक्युमेंटरीच्या प्रवासात माझा सहभाग नोंदवून टाकला.
असेच काही दिवस गेले आणि २०१९च्या मध्यावर मला अशोकजींचा फोन आला. “मुंबईच्या गिरणगांवच्या लोकसंस्कृतीवर डॉक्युमेंटरी बनवायचं निश्चित केलेलं आहे आणि तुला या डॉक्युमेंटरीच्या कामात भाग घ्यायचा आहे, तुझ्यासाठी एक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तयारी कर. बाकी नंतर बोलू”, एवढं बोलून फोन संपला. अशोकजींनी मला डॉक्युमेंटरीच्या कामात सहभागी करुन घेतल्याचा, त्याच्यासोबत काम करायला मिळणार याचा आनंद, लठ्ठ रकमेची लॉटरी लागण्यासारखाच होता. पण त्याचबरोबर थोडं दडपणही आलं. दडपण अशासाठी की, माझ्यासाठी नेमकी काय जबाबदारी निश्चित केलीय, याबद्दल ते काहीच बोलले नव्हतं. ती काय असावी, या विचाराने तोडा ताण आला होता. डॉक्युमेंटरी/फिल्म कशी तयार होते त्याबद्दल आकर्षण असलं तरी, ती कशी तयार करतात याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण तशा तांत्रिक प्रकारची जबाबदारी अशोकजी काही मला देणार नाहीत, असं मला खात्रीने वाटत होतं. मग दुसरी कसली जबाबदारी असावी, याचा विचार मी करु लागलो.
ते लवकरच स्पष्ट झालं. अशोकजींनी माझ्यावर ‘संशोधना’ची जबाबदारी सोपवली होती. हे तर माझ्या आवडीचंच काम होतं. गिरणगावाविषयी हाती लागेल ती माहिती, लेख, कात्रणं मी वाचताच असतो. त्यामुळे अशोकजींनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मला सोपीच जाणार होती.
पण, ते तेवढं सोपं जाणारं नव्हतं, हे मला नंतर समजलं. त्याविषयी पुढील भागात..!
ज्येष्ठ चित्रपट समिक्षक, जागतिक सिनेमाचे अभ्यासक, उत्कृष्ट कथा-पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि माझे स्नेही श्री. अशोक राणे यांनी, मुंबईच्या गिरणगांवातील लयाला जात असलेल्या किंवा लयाला गेलेल्या समृद्ध संस्कृतीवर तयार केलेल्या ‘आणखी एक मोहेंजो दारो’, इंग्रजीत ‘Yet Another Mohenjo Daro’ या जवळपास तीन-साडेनीन तासांच्या डॉक्युमेंटरीत मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होतो. माझ्यासाठी जवळपास तीन-एक वर्षांचा प्रवास अत्यंत आनंददायी होता. ह्या तीन वर्षांनी मला जे काही दिलं, ते कधीही विस्मरणात जाऊ शकत नाही. गेल्या कितीतरी वर्षात एवढं समृद्ध जगणं मी अनुभवलेलं नव्हतं, ते या तीन वर्षांत अनुभवलं.
तीन वर्षांचा हा प्रवास आनंददायी असला तरी, सोपा नव्हता. अनेक अडचणीचा आम्हाला सामना करावा लागला. त्यात कोविड-१९ चा २०२० चा दीर्घ आणि २०२१ चा अंशतः लॉकडाऊन, त्यामुळे लोकांना भेटण्यावर, चित्रिकरणावर आलेली बंदी, कोरोनामुळे ज्यांचे अनुभव चित्रबद्ध करायचे, असे अनेक जाणते गिरणगांवकर जग सोडून गेलेले, अशा अनेक अडचणी सामोऱ्या येत गेल्या. तरीही त्यातून मार्ग काढत आम्ही पुढे जात राहीलो, ते केवळ अवघा गिरणगांव आमच्या सोबत समर्थपणे उभा राहीला म्हणूनच.
कोरोनामुळे लादली गेलेली बंधनं, त्या विक्षिप्त आजारामुळे प्रत्येकाच्या जीवाला निर्माण झालेला धोका, संशयाचं वातावरण इत्यादी सर्व बाजुला ठेवून गिरणगांवकर आमच्यासोबत पहाडासारखे उभे राहिले. म्हणूनच ही डॉक्युमेंटरी तयार होऊ शकली. डॉक्युमेंटरीचे निर्माते श्री. राजेश व गायत्री पेडणेकर, लेखक जयंत पवार आणि दिग्दर्शक अशोक राणे असले तरी, ही डॉक्युमेंटरी तयार होऊ शकली, त्यात सिंहाचा वाटा गिरणगांव आणि गिरणगांवकरांचा आहे.
ह्या डॉक्युमेंटरीच्या प्रवासात काही गोष्टी ओळखीने शेक्य झाल्या, तर काही मैत्रीने. काही गोष्टी होण्यासाठी आमची अगदी थेट ओळख नसली तरी मित्रांच्या ओळखीने शक्य होऊ शकल्या. मात्र डॉक्युमेंटरीचा बराचसा भाग ‘हरवलेल्या गिरणगांवावर अशोक राणे डॉक्युमेटरी बनवतायत’ हे ऐकूनच शक्य झाला. ‘अशोक राणे’ हे नांव परवलीच्या शब्दासारखं कामाला आलं. अनेक बंद दालनं त्यामुळे आपोआप उघडली गेली. तिथे मैत्रीची वा ओळखीची फार गरजच लागली नाही. आमच्या डॉक्युमेंटरीसाठी एखादी गोष्ट आवश्यक आहे असं म्हणायची खोटी, की काहीच वेळात आमच्यासमोर ती हजर होत असे. मग ती वस्तू असो, वास्तू असो की व्यक्ती असो. ती ही स्वतःची पदरमोड करुन. कुठेही ‘पैसे’ हा रुक्ष विषय आड आला नाही. किंबहुना कुणाची तशी अपेक्षाच नव्हती. गिरणगांवाने आपल्या घरचंच कार्य असल्यासारखं या प्रकल्पात भाग घेतला होता. हे घडलं, ते केवळ लोप होत चाललेल्या गत काळातल्या गिरणगांवाविषयी असलेल्या जिव्हाळ्यामुळे आणि आम्ही ते जपून ठेवू इच्छितोय, हे समजल्यामुळे..!
गिरणगांकरांनी, मग तो गिरणगांवात आता राहाणारा असो की नाईलाजाने गिरणगांव सोडून बाहेर राहायला गेलेला असो, डॉक्युमेंटरीच्या या प्रवासात आम्हाला केलेली मदत नसती तर, १८५४ ते १९८२ असा जवळपास १००-१२५ वर्षाचा गिरणगावाचा जन्म, उत्कर्ष आणि लोप आम्हाला चित्रबद्ध करता येणं अवघड होतं. त्यातील काहींच्या आठवणी पुढच्या काही लेखांतून जागवण्याचा माझा प्रयत्न आहे.
काय नाही या डॉक्युमेंटरीत. गिरण्यांत काम केलेल्या आणि आता हयात असलेल्या गिरणी कामगारांच्या, आता ज्यांचं वय वर्ष ६५ ते ८५ च्या दरम्यान आहे अशांच्या मुलाखती-आठवणी, हयात असलेले गिरणी कामगार नेते, गिरणी कामगारांचे संप आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष यांचा अभ्यास करणारे जागतिक कीर्तीचे अभ्यासक यांच्या मुलाखती, १९४७ च्या स्वातंत्र्यात आणि १९६० च्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात गिरणी कामगारांनी बजावलेली महत्वपूर्ण भुमिका, गिरणगांवात जपला जाणारा धार्मिक आणि जातीय बंधुभाव, तिकडचा कबड्डीसारखे (हुतुतु) लोकप्रिय खेळ. गिरणगांवने जन्माला घातलेली आणि पुढे जगभरात नांवारुपाला आलेली कामगार रंगभुमी, त्यातून पुढे आलेले मराठमोळे कलावंत, गिरणगांवातील नाटकांच्या तालमी, पडद्यावरचे पिच्चर आणि त्यात होणारी रडारड, राडे, दादागिरी, सुराबाजी, राजकारण, दिवाळीत सामुहीक फराळ करण्याचं दृष्य, चाळीतली प्रेमप्रकरणं, एकमेकांना निरोप देण्याची ती सांकेतीक भाषा, त्या काळातली लग्न इत्यादी इत्यादी.
शिवाय गिरणगांवातील त्या लाकडी एकमजली चाळी, तिथलं जीवन, ठराविक वेळी सार्वजनिक नळाला येणाऱ्या पाण्यासाठी होणारी बायकांची ‘नळावरची भांडणं’, नोकरीसाठी शिड्याने ‘हुंबय’ला येणाऱ्यांच्या मुक्कामाची ‘झिलग्यां’ची किंवा ‘बैठकी’ची खोली, त्यातल्या प्रत्येकाचा एका ट्रंकेत मावणारा सौंसार, या शिड्या झिलग्यांसाठी खानावळी चालवणाऱ्या स्त्रिया, त्यांच्याकडे खानावळीला असणाऱ्या बाप्यांनी तिला केलेली भावबीज, भावबीजेच्या साडीची वाजत गाजत त्यांनी काढलेली मिरवणूक, या शिड्या गिरण कामगारांनी मनोरंजनातून जन्मला घातलेले आणि पुढच्या काळात खास ‘गिरणगांवी संकृती’ म्हणून प्रसिद्धीस आलेले तमाशा, खेळे, भारुडं, नमन, दशावतार, भजनं, उभी भजनं, बाल्या डान्स, जात्यावरच्या पहाटेच्या ओव्या, पाळणा इत्यादी, ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सव, दहिहंडी, होळीसारखे सण-उत्सव इत्यादीप्रमाणे त्या काळातलं जे जे शक्य झालं ते ते दाखवण्याचा किंवा शब्दांतून उभं करण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या गिरणगांवाला रसरसून जगण्याला कंगोरेच इतके आहेत की, सुमारे सवाशे-दिडशे वर्षांचा हा प्रवास केवळ अडीच-तीन तासांच्या मर्यादीत डॉक्युमेटरीमध्ये उभा करणं, हे अत्यंत अवघड काम. परंतु, ते साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ह्या डॉक्युमेटरीत केला आहे. कृतकृत्यतेची भावना अंगभर भरून राहीलीय. तरीही काहीतरी सुटलं, ही भावना आहेच. पण कुठंतरी थांबावं लागतंच नाही का?
आता थोडं डॉक्युमेंटरीच्या नांवाविषयी.
ह्या डॉक्युमेंटरीचं नांव ‘आणखी एक मोहेंजो दारो’. इंग्रजीत ‘Yet Another Mohenjo Daro’.. हडप्पा आणि मोहेंजो दारो ह्या अदमासे साडेचार-पांच हजार वर्षांपूर्वी सिंधु नदीच्या खोऱ्यात नांदलेल्या दोन महान संस्कृती. अत्यंत प्रगत. इतक्या प्रगत संस्कृती अचानक लयाला कश्या गेल्या ह्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु त्या लयाला गेल्या, हे सत्य आहे.
आपल्या गिरणगांवाचंही तसंच झालंय. १८५४ साली सुरु झालेल्या पहिल्या गिरणीनंतरच्या काही काळात, गिरण्यांत काम करणाऱ्या कामगारांनी वसवलेलं हे गिरणगांव. कोकण, घाट, देशाचा उत्तर भाग इथून गिरण्यामधे मिळणाऱ्या रोजगाराने तिथल्या लोकांना मुंबईत खेचून आणलं. विविध ठिकणांहून आलेले हे गरीब गिरण कामगार सुरुवातीला येतांना एकेकटे आले असले तरी त्यांनी येताना आपापल्या भागातील आपापली भाषा, प्रथा, परंपरा, संस्कृती, सण, उत्सवही सोबत आणले आणि पुढच्या काळात या सर्वांचं एक मनोहारी मिश्रण या गिरणगांवात नांदू लागलं. इथले लोक गरीब होते, पण सांस्कृतीक दृष्ट्या अत्यंत श्रीमंत होते. ही श्रीमंती सण-उत्सवांच्या काळात गिरणगांवात मुक्त हस्ते उधळली जायची. त्यात माझा-तुझा, आपला-परका असा भेदभाव नव्हता. त्यात सर्वांचा समान सहभाग असायचा.
सार्वजनिक गणेशोत्सव, धयकाला (दहीहंडी) हे कोकण्यांनी प्रथम गिरणगांवात आणले आणि मग ते अवघ्या मुंबईचे झाले. भारुडं, तमाशे, पवाडे इत्यादी घाटवरुन गिरणगांवात आले आणि सर्वच गिरणगांवाने ते आपले केले. एकेकाळी गिरणगांवात कव्वाली फार प्रसिद्ध होती. ही गिरणगांवात आणली उत्तर प्रदेशातून गिरणीत राबण्यासाठी आलेल्या कसबी मुसलमान विणकरांनी. मग ती सगळ्या गिरणगावाची झाली. अशी कित्येत उदाहरणं सांगता येतील. मुळच्या ह्या सण-उत्सवावर इकडच्या खास गिरणगांवच्या कामगार संस्कृतीचे संस्कार होत गेले आणि मग ते गिरणगांवचे म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
गरीबी हा इथे राहाणाऱ्या सर्वांसाठीच लघुत्तम साधारण विभाजक होता. श्रीमंत होते, ते ठेट टाटा नि बिर्लाच. मध्यमवर्गाचा उदय अद्याप व्हायचा होता. धर्म नि जात आपापल्या घरापुरतीच मर्यादीत होती. कोकणी असो, घाटी असो, भैया असो की मुसलमान, अकदा का तो मुंबयच्या गिरणीत कामाला लागला, की त्याचा धर्म नि जात एकच. कामगार. ह्या कामगारांनी वसवलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण गांव, गिरण्यांच्या १९८२ च्या अभूतपूर्व संपानंतर हळहळू लयाला जाऊ लागलं. तो संप गिरणगांचा काळ ठरला. त्या संपाने इथला कामगार विस्थापित झाला, संपला. गिरणगांवही संपू लागला. आता तर गिरणगांव केवळ जुन्या पिढीच्या स्मृतींतही पुसट होऊ लागलाय. नवीन पिढ्यांना तर या सुंदर गांवाची कितपत माहिती असेल, ते सांगताही यायचं नाही.
मोहंजो दारो संस्कृती का नष्ट झाली, त्याची कारणं अजुनही स्पष्ट झालेली नाहीत. पण एकेकाळी तिथे एक समृद्ध संस्कृती नांदत होती, हे मात्र माहित झालंय. गिरणगांवचंही तसंच झालंय. गिरणगांवच्या लयामागे १९८२ चा संप हे मोठं कारण असलं तरी, ते एकमेंव कारण नाही. अनेक कारणं त्यासाठी देता येतील. त्यातील काही स्पष्ट आहेत, तर अनेक अस्पष्ट आहेत. कसंही असलं तरी गिरणगांवात एकेकाळी गरीब गिरणी कामगारांनी उभी केलेली श्रीमंत संस्कृती नांदत होती, हे मात्र खरं आहे.
ही डॉक्युमेंटरी करायचं जेंव्हा ठरलं, तेंव्हा पटकथेसाठी अशोकजींच्या नजरेसमोर एकच नांव आलं. जयंत पवार. जयंत पवारांचं आयुष्य गिरणगांवाचं हृदय म्हणता येईल अशा लालबागमधे गेलेलं. शिवाय त्यांनी स्वतः काही काळ गिरणीत कामही केलेलं. गिरणगांवचे सर्व पैलू त्यांना माहित होते. किंबहुना ते स्वतः त्यांचा भाग होते. त्यामुळे ह्या विषयावरच्या डॉक्युमेंटरीला न्याय देण्यासाठी, उत्तम कथालेखक-नाटककार असलेल्या जयंत पवारांइतकी पात्र व्यक्ती असूच शकत नव्हती, असं अशोकजींना वाटलं तर त्यात नवल नाही.
पटकथेवर पहिली चर्चा करण्यासाठी अशोकजी जयंतरावांच्या ऑफिसात भेटले. डॉक्युमेंटरीत येणारं गिरणागांव आणि आणि त्याचा विस्तिर्ण पट लक्षात घेऊन जयंतरावांच्या तोंडून, “अशोक अरे हे आधुनिक मोहेंजो दारोच आहे रे आणि आपण याक्षणी जिथे बसून ही चर्चा करतोय, ते अशाच एका मिलच्या थडग्यावर बसून.।”असे उद्गार सहजपणे निघून गेले आणि त्याच क्षणी अशोकजींना डॉक्युमेंटरीचं झाली होती. नांव मिळालं. आणखी एक मोहेंजो दारो. ‘अशोकजींची आणि जयंतरावांची ती भेट कमला मिल कंपाऊंड ‘मधल्या जयंतरावांच्या ऑफिसात झाली होती. पुढे अशोकजींनी ह्या नांवाबद्दल ज्या अनेक जाणकारांशी चर्चा केली, त्या सर्वांना हे नांव आवडलं. त्याहीपेक्षा जास्त पटलं.
ह्या डॉक्युमेंटरीत गिरणगांच्या लयामागील कोणत्याही कारणांची चर्चा किंवा मिमांसा केलेली नाही. कधीकाळी गिरणगांवात अस्तित्वात असलेल्या त्या संस्कृतीच्या आठवणी जागवण्याचा मात्र निश्चितच प्रयत्न केलेला आहे..म्हणूनही या चं नांव ‘आणखी एक मोहेंजो दारो’ असं ठेवलंय..!!
आता ही डॉक्युमेंटरी जवळपास तयार होत आलीय. निर्मितीनंतरचे आवश्यक संस्कार सुरु आहेत. ते ही लवकरच संपतील. माझी ही लेखमाला पूर्ण होईपर्यंत आपली ही डॉक्युमेंटरी पूर्ण झालेली असेल. ते ही आम्ही सर्वांना कळवूच. आणि दाखवूही
२०१८ ते आता २०२२ पर्यंतच्या चार वर्षांचा , ह्या डॉक्युमेंटरीच्या ‘मेकींग’चा प्रवास मी काही लेखांमधून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण किती लेख होतील, ते आताच सांगता येणार नाही. आठवेल तसं लिहित जाणार आहे.