दि. १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईच्या झालेल्या स्फोटाची कहाणी – भाग तिसरा (३/३)

लेखाच्या दुसऱ्या भागात आपण वाचलं की,

२४ फेब्रुवारी १९४४ रोजी इंग्लंडहून निघालेलंएस. एस. फोर्ट स्टांयकीनजहाज व्हाया कराची मुंबई बंदरात पोहोचलं होतं. १२ एप्रिल १९४४ या दिवशी सकाळी साधारण ११.३० वाजता, जहाज त्याला मिळालेल्या आदेशानुसार व्हिक्टोरिया डॉकचा धक्का क्रमांक (Berth No. 1) येथे लागलं. परंतु स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लहान बोटी आणि बार्ज १३ एप्रिलच्या दुपारपर्यंत आलेल्याच नव्हत्या आणि तो धोकादायक माल तसाच बोटीत पडून होता.

पुढे जी काही घटना घडायची होती, त्याची ही नांदी होती..!

पुढे….

शेवटी १३ एप्रिलला त्या दिवशी दुपारनंतर स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या त्या बोटी अवतरल्या. बोटी आल्या खऱ्या, परंतु त्या बोटींमध्ये समुद्राच्या बाजूने स्फोटकं उतरवून घेण्याऐवजी, बोटीवरील मजुरांच्या टोळ्या, बोटीवरील इमारती लाकडाचे मोठे ओंडके, विविध धातूचं भंगार उतरवून घेण्याच्या मागे लागलं. भंगार उतरवण्यासाठी आणलेली, क्रेन भांगाराचं वजन उचलण्यास असमर्थ होती. म्हणून नवीन, मोठ्या क्षमतेची क्रेन आणायची ठरलं, परंतु ती दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ एप्रिलच्या सकाळी येणार होती. आता क्रेनच नाही म्हटल्यावर, बोटीवर माल तसाच पडून राहिला आणि तो दिवसही फुकट गेला.

१४ अप्रीलचा दिवस उजाडला. व्हिक्टोरिया डॉक्मध्ये फोर्ट स्टायकीनसारख्याच आणखी १० बोटी लागलेल्या होत्या. शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये ९ बोटी लागलेल्या होत्या. त्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासूनच ह्या सर्व बोटींनी विविध ठिकाणांहून वाहून आणलेला विविध प्रकारचा माल उतरवून घेण्याची एकाच धांदल उडालेली होती. फोर्ट स्टायकीनवरचं सामानही उतरवून घेणं चालू होत. दुपारचे १२.३० वाजले आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली. माल उतरवून घेणारे हमाल आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या मुकादमानी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या आणि ते धक्क्यावरच जेवण घेऊन लागले. ही नेहेमीचीच बाब होती. १५-२० मिनिटात जेवून, ते तिथेच थोडीशी सावली पाहून लवंडले. अंगमेहेनत करणाऱ्या कामगारांना दुपारची अर्ध्या तासाची झोप आवश्यक असते. हे देखील रुटीन होतं.

एप्रिल महिन्यातला मुंबईतला उकाडा. उष्णतेने घाम अंगभर भरून राहिला होता. फोर्ट स्टायकीनपासून चारपाच जहाज सोडून, पुढे काही अंतरावर असलेल्या एका जहाजातले दोन अधिकारी, वारा खात त्यांच्या जहाजच्या डेकवर उभे होते. त्यांचाही जेवण नुकताच आटोपलं होतं आणि ते गप्पा मारायला डेकवर आले होते. बोलता बोलता आजूबाजूच्या परिसरावर सहज म्हणून नजर फिरवीत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष फोर्ट स्टायकीनवर गेल. फोर्ट स्टायकीनच्या दोन क्रमांकाच्या कप्प्यातून धूर येतोय, असं त्यांना वाटलं. त्यांनी अधिक काळजीपूर्वक पुन्हा तिकडे पाहिलं, पण आता धूर दिसत नव्हता. कदाचित असा भास झला असावा,म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून आपल्या गप्पा सुरूच ठेवल्या.

दुपारच्या १२.४५ च्या दरम्यान, धक्क्यावर उभय असलेल्या पोलीसानीही फोर्ट स्टायकीनच्या एका कप्प्यातून धूर येताना पहिला होता. परंतु बोटीवरची माणसं काय ते बघून घेतील, म्हणून त्यांनीही तिकडे दुर्लक्ष केलं. अशा लहान-सहान आगी तर लागतच असत. त्यापैकीच ही एक असावी, असं त्यांना वाटलं असावं. अशा लहान आगी विझवण्याची प्रत्येक जहाजावर व्यवस्था असते आणि त्या विझाव्ल्याही जातात. त्यामुळे त्या पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं नसावं.

दुपारचा दीड वाजला. जेवणाची सुट्टी संपली आणि कामगारांनी पुन्हा काम सुरु केलं. फोर्ट स्टायकीनवरचं, काल क्रेन न आल्यामुळे भंगार उतरवायचं काम तसंच राहिलं होतं, ते करायला घेतलं. नव्याने आलेल्या मोठ्या क्षमतेच्या क्रेनचा हुक बोटीवर सोडण्यात आला, पण तो त्या भंगार ठेवलेल्या दोन नंबरच्या कप्प्यात जाईनासा झाला. तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर, तो एकदाचा दोन नंबरच्या कप्प्याच्या आत पोहोचला. हुकला भंगाराचा गठ्ठा अडकवला आणि क्रेनच्या चालकाला, हुक वर घेण्याची सूचना केली. जसा तो भंगाराचा गठ्ठा क्रेनच्या हुकला अडकून कप्प्यातून वर आला, त्याबरोबर पांढऱ्या धुराचा एक मोठा लोट दोन नंबरच्या कप्प्यातून भसकन वर आला. प्रथम पांढरा आणि विरळ असलेला तो धूर, हळूहळू दाट काळपट होऊन बाहेर येऊ लागला. दोन क्रमांकाच्या नंबरच्या कप्प्यात, खाली कुठेतरी आग धुमसत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं.

लगेच बोटीवरचा फायर अलार्म वाजवला गेला. बोटीवर असलेल्या आग विझवण्याचे तीन पंप सुरु करून, दोन नंबरच्या कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. त्याचबरोबर, आग नेमकी कुठे लागली आहे ते तपासण्यासाठी बोटीवरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करू लागला, परंतु धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही. एव्हाना बोटीवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुढचा धोका लक्षात येऊ लागला. आग विझवण्यात दंग असलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि धक्क्यावरील इतर फायरमनना, बोटीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आहेत हे माहित नव्हतं. म्हणून ते धूर येत असलेल्या ठिकाणी पाणी फवारण्याचा कामात लागले होते. तरीही आग म्हटल्यावर माणूस घाबरतोच. त्याप्रमाणे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल बोटीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. आणि तेवढ्यातच कुणीतरी ‘फायSSSर’ म्हणून जोरात ओरडलं. एकाच धावपळ सुरु झाली. जो तो बोटीपासून लांब पाळण्याच्या मागे लागला.

बोटीपासून दूर पळणारी माणसं..!

बोटीच्या आत कुठेतरी लागलेली आग बोटीवरच्या पंपाने विझत नाही, हे लक्षात आल्यावर धक्क्यावर असलेले मोठ्या क्षमतेचे पंपं सुरु करण्यात आले. पुढची ४५ मिनिटं आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. तरीही आग आटोक्यात येत नाही हे पाहून, मुंबई फायर ब्रिगेडला कॉल दिला गेला. फायर ब्रिगेडच्या गाड्या दुपारी २.२५ मिनिटांनी पोहोचल्या. गोदीमध्ये तशा साधारण आगी लागतच असत. त्यापैकीच ही एक असावी, म्हणून फायर ब्रिगेडने फक्त दोनच गाड्या पाठवल्या होत्या. नेमकी किती मोठी आग लागली आहे आणि बोटीवर प्रचंड प्रमाणत स्फोटकं आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

अजून आग दिसत नव्हती, मात्र धूर येत होता. धुराचं प्रमाण आणि दाटपणा वाढत चालला होता. फोर्ट स्टायकीनच्या डेकवर, बोटीचा फर्स्ट ऑफिसर हेन्डरसन आग विझावणाऱ्या फायरमनशी, आग नेमकी कुठे लागली आहे त्याचा पहिला शोध घ्यावा म्हणून वाद घालत होता. आग नेमकी कुठे लागली आहे, याची काहीच माहिती नसताना, तो फायरमन आग नक्की विझेल याची खात्री देत होता. आत किती मोठा बॉम्ब आहे, याची त्याला कल्पना नव्हती,

दोन नंबरच्या कप्प्यात सर्वात तळाला सोनं होतं. त्याच्यावर दारूगोळ्याचे पेटारे आणि त्याच्याही वर कापसाच्या दाबून भरण्यात आल्या होत्या. हेन्डरसनला कापसाच्या गासड्यांना आग लागली असेल तर पुढचा विनाश अटळ आहे, हे ध्यानात आलं आणि म्हणून स्वत:च दोन नंबरच्या कप्प्यात आगीचा शोध घेण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. तो आत उतरला.

मुंबई फायर ब्रिगेडला दुसरा कॉल २ वाजून ३० मिनिटांनी केला गेला आणि मग मोठी आग लागल्याची शंका येऊन, डझनभर बंब पाठवून दिले. एकाचवेळी पाण्याचे २०-२५ पंप दोन नंबरच्या कप्प्यात पाणी मारू लागले. आगीच्या वर्दीमुळे जहाजावर उडालेल्या धांदलीत, हेन्डरसन कप्प्याच्या आत आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. तासाभरापूर्वी दोन नंबरच्या कप्प्यात लागलेली आग आता तिथेच मर्यादित राहिली नव्हती. ती खालच्या बाजूने आजूबाजूला झपाट्याने पसरत चालली होती. आणि पाणी तर फक्त दोन नंबरच्याच कप्प्यात फवारलं जात होतं. कापसाच्या गासड्यांना लागलेली आग, हळूहळू स्फोटकांच्या साठ्यापर्यंत पोहोचू लागली होती. आग विझण्याची शक्यता निर्माण झालेल्या धुरात विरून जात होती.

डेकवर चालेली गडबड लक्षात येऊन, बोटीचं इंजिन खोलून बसलेला चीफ ऑफिसर अलेक्स गो डेकवर आला. डेक धुराने आणि पाण्याने भरून गेल्याचं पाहून, झाली गोष्ट त्याच्या ध्यानात आली. कॅप्टन नायस्मिथ अलेक्सपाशी आल आणि, दोन नंबरच्या कप्प्यात आग लागल्याच वर्तमान त्याला दिलं. Fire & Salvage Department चे कमांडर जे. एच. लॉंगमायर (J. H. Longmire) आणि फायर ब्रिगेडचे एन. कुम्ब्स (N. Coombs) हे दोन अधिकारी त्या दोघांपाशी आले आणि दोन नंबरचा पूर्ण कप्पा पाण्याने भरून टाकता येईल का याची विचारणा केली. मात्र, बोटीला नोन-रिटर्न व्होल्व्स लावलेले असल्याने, बोटीतून पाणी बाहेर फेकता येईल, मात्र आत नेता येणार नाही, असं अलेक्सने त्यांना सांगितलं. म्हणजे हा ही उपाय करता येण्यासारखा नव्हता.

कॅप्टन नायस्मिथ आणि इतर अधिकाऱ्यांची उपायांसाठी चर्चा सुरू असतानाच Ordnance Service (Army) खात्याचै अधिकारी मेजर ओब्रास्ट ( Major Obrast) जहाजावर आले. बोटीतून येणारा धूर पाहून त्यांनी नायस्मिथकडे स्टोवेज प्लान मागितला. नेमक्या मोठ्या प्रमाणावर धूर येत असलेल्या दोन नंहरच्या कप्प्यातच स्फोटकांचा मोठा साठा असल्याचं पाहून, त्याने जहाजाला भोक पडून, त्यातून जहाजाच्या आत पाणी जाऊ देऊन जहाज बुडववणं शक्य आहे का, त्याची विचारणा केली. पण ते ही शक्य नव्हतं. कारण, व्हिक्टोरिया डॉकमधील ज्या बर्थ क्रमांक १ येथे जहाज उभं होतं, त्या ठिकाणी संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढी पाण्याची खोली नव्हती. शिवाय, संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढं पाणी जहाजात भरण्यासाठी एक भोक करून काम भागणार नव्हतं. अनेक भोकं करावी लागणार होती. तेवढा वेळ हातात नव्हता. परत, भोक पडण्यासाठी लागणारी मेटल कटींग मशिनरी वापरताना ठिणग्या पडणारच होत्या. त्या तर जास्त धोकादायक होतं. उद्याचं मरण आजच आणण्यासारखंच होतं ते. त्यामुळे रोगापेक्षा हा जालीम असणारा हा उपायही बाद करण्यात आला.

स्टोवेज प्लान

एव्हाना व्हिक्टोरीया डॉक्सचे जनरल मॅनेजर कर्नल सॅडलर (Colonel Sadler) बोटीवर पोहोचले. आता एकाच शेवटचा उपाय राहिला. जहाज धक्क्यापासून थोडं लांब, दूर समुद्रात सुरक्षित अंतरावर घेऊन जावं. पण बोटीचं इंजिन खोलून ठेवलेलं होतं. जहाज स्वतःच्या इंजिनाच्या मदतीशिवाय एक इंचही हलू शकत नव्हतं. बोटीला बंदरापासून लांब समुद्रात न्यायचं असेल तर ‘टग्स’ लागणार होते. ते ही मागवण्यात आले. आणखी एक उपाय होता. जहाजाच्या डेकवरून धक्क्यावर जहाज बांधण्यासाठी असलेल्या मजबूत पोलादी खांबाला दोरखंडाने बांधून, जहाजाला कुशीवर पाडून त्यात पाणी भरू द्यायचं. त्यामुळे ज्या कुठल्या ठिकाणी आग पसरली असेल, तिथपर्यंत पाणी पोहोचून होऊ शकणारं नुकसान टाळता येऊ शकेल. पण तिथे तर पाण्याला खोलीच नव्हती, जहाज आडवं पाडून काहीच उपयोग होणार नव्हता.

जहाजावर इतके जबाबदार अधिकारी उपस्थित असुनही त्यांच्यात, त्या क्षणाला नेमकं काय करावं, यावर निर्णय होत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी एकाने नियंत्रण हातात घेऊन निर्माण झालेली गंभिर परिस्थिती हाताळणं आवश्यक होतं. परंतु तसं न होता, त्यांच्यापैकी प्रत्येकजण वेगळा विचार करत होता. कॅप्टन नायस्मिथला आपलं जहाज वाचवायचं होतं. डॉक्स मॅनेजर सॅडलरला धक्क्याचं नुकसान व्हायला नको होतं. तर फायर ब्रिगेडच्या कुम्ब्सना जहाजाला लागलेली आग जहाज धक्क्यावर असतानाच विझवली जाऊ शकेल असं वाटत होतं.

कुणाला काहीच उपाय सुचत नव्हता. आग क्षणाक्षणाला पसरत चालली होती. नायस्मिथ, अलेक्स आणि फायर विभागाचे अधिकारी उपायांवर चर्चा करीत असतानाच, फोर्ट स्टायकीनवरचा एक अधिकारी धावत त्यांच्यापाशी आला आणि जहाजाचा धक्क्याच्या बाजूकडील एक भाग आतील उष्णतेमुळे वितळायला लागल्याची बातमी त्याने दिली. आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हत.

एव्हाना दुपारचे २.५८ झाले होते. जहाजच्या आतल्या बाजूला आग वेगाने पसरत चालली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून जहाजाच्या पत्र्यांना भोकं पाडून त्यात पाणी भरू द्यायचा, हा सुरुवातीला सुचलेला उपाय करून पहायचं सर्वांनी एकमताने ठरवलं. तो यशस्वी होईल की नाही, याची काहीच शाश्वती नव्हती; पण काही इलाजच उरला नव्हता. मशिनरी बोलावण्यात आली. पत्रा कापायची ती अवजड मशिन आली आणि बॅड लक, ती मशिन काही केल्या चालूच होईना. म्हणजे हा उपायही सरला.

एव्हाना दुपारचे सवा तीन वाजले होते. आता पुढे काय होणार, याची वाट पाहत असतानाच, जहाजातून घट्ट कल्पाद धुराचा मोठा ढग बाहेर आला आणि त्यासोबत पेटत्या कापसाच्या लडी आकाशात उडू लागल्या. हा इशारा होता, आतल्या स्फोटकांनी आग पकडल्याचा. प्रचंड प्रमाणात झालेल्या धुरामुळे श्वास घेणं अवघड होऊ लागलं आणि परिणामी जवळपास २४-२५ पंपांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करणारे फायरमन आणि इतरजन अपोआप जहाजापासून दूर जाऊ लागले.

आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हतं. आत पुढे काय होतं, याची वाट पाहणं एवढंच त्यांच्या हाती होत. दुपारचे ३ वाजून ५० मिनिटं झाली आणि आणि सबंध जहाज व्यापून राहील इतका मोठा आगीच्या लखलखत्या ज्वाळांचा लोळ जहाजातून बाहेर पडला. तो जसा बेहेर पडला, तसाच क्षणात दिसेनासाही झाला. आत स्फोट होण अटळ असल्याच, कॅप्टन नायस्मिथच्या लक्षात आल. आता करण्यासारखं काहीच शिल्लक उरलं नव्हतं. त्याने जहाजावरच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना, त्वरित जहाज सोडण्याचे आदेश दिले आणि तो ही धक्क्यावरच्या एका इमारतीच्या आश्रयाला निघून गेला. आग विझवण्यास आलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी-अधिकारीही मागे सरले.

गोदीच्या आसपासच्या आणि बाहेरच्या परिसरात लोकांचे नेहेमीचे व्यवहार सुरु होते. व्हिक्टोरिया गोदीत आग लागली आहे, हे त्यांना एव्हाना समजलं होतं, गोदीत आगी लागणं ही काही नवीन घटना नव्हती. तशा लहान मोठ्या आगी लागणं आणि त्या विझाव्ल्याही जाणं नित्याचंच होतं  ही तशीच एखादी आग असावी, असं त्यांना वाटलं. व्हिक्टोरिया आणि शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये नांगरलेल्या इतर जहाजांवरचे खलाशी ते दृश्य पाहत होते. गेली पाच-एक वर्ष युद्ध साहित्यांनी भरलेल्या बोटी, खुल्या समुद्रात शत्रू बोटींनी केलेल्या टोर्पेडोच्या हल्ल्यात, आगी लागून नष्ट झालेल्या त्यांनी पहिल्या होत्या. त्यामुळे त्यानाही त्याचं काहीच वाटलं नव्हतं. नेहेमीप्रमाणे त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून आपापल्या कामात लक्ष घातलं. फोर्ट स्टायकिनवर खच्चून भरलेली स्फोटकं आहेत, याची, अर्थातच, त्यांना कलपना नव्हती.

दुपारचे चार वाजून गेले. घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता. दुपारचे ४.०६ मिनिटं झाली, आणि कानाचे पडदे फाटवणारा प्रचंड मोठा आवाज करत बोटीवरील स्फोटकांचा स्फोट झाला. स्फोट होताच फोर्ट स्टायकिनचे दोन तुकडे झाले. एक तुकडा समुद्रातच राहिला, तर जवळपास १०० टन वजनाचा दुसरा तुकडा उडून थेट अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीवर जाऊन पडला. धक्क्यावर असलेल्या इमारती जमीनदोस्त झाल्या. पाण्याचे पाईप्स फुटले. गटारं तुटली. आग विझवण्यासाठी आलेले बंब लांब उडाले. स्फोटामुळे समुद्रात प्रचंड मोठी लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत आजूबाजूची १०-१२जहाजं बुडाली. फोर्ट स्टायकिनच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका तीन हजार टनी मालवाहू जहाजाचे तर अनेक तुकडे होऊन, ते गोदीच्या परिसरात विखरून पडले. त्या तुकड्यांखाली कित्येक माणसं मेली. इमारती पडल्या. अनेक जहाजांना आगी लागल्या. गोदीच्या परिसरातल्या आकाशात सर्वत्र काळाकुट्ट धूर भरून राहिला.

काय होतंय ते कुणाला समजण्याच्या आताच, ४ वाजून २० मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. हा स्फोटाची तीव्रता पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. ह्या स्फोटाबरोबर बोटीतला कापूस जळून उंच आकाशात उडाला आणि जवळपास एक किलोमीटरच्या परिसरात जणू काही पेटत्या कापसाचा पाऊस पडू लागला. त्या पेटत्या कापसामुळे गोदीतल्या आणि गोदीच्या बाहेरच्या इमारतींना आगी लागल्या. जपानने मुंबईवर आक्रमण केल ह्या समजुतीने लोक घर-दर सोडून आपापला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. केवळ कापूसच नव्हे, तर जहाजात असलेल्या भंगाराचे तुकडेही आकाशात उडून वितळलेल्या स्वरुपात पडू लागले. त्या तप्त पोलादी तुकड्यांखाली सापडून कित्येक लोक मरण पावले. गोदीचा परिसर तर संपूर्ण बेचिराख झाला होता. गोदीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच्या एका पारशाच्या घराचं छप्पर फाडून धुरामुळे काळवंडलेला धातूचा एक मोठा तुकडा पडला. तो तुकडा जर डोक्यावर पडला असता तर, कवटी फुटून आपला जीव गेला असता, ह्या विचाराने हादरलेल्या तो पारशी, थिजलेल्या नजरेने जमिनीवर पडलेल्या त्या तुकड्याकडे काही क्षण पाहत राहिला. काही काळाने भानावर आल्यावर, त्याच्या घरात पडलेला तो धातूचा मोठा तुकडा लोखंडाचा नसून, सोन्याचा आहे हे लक्षात आले. २८ पाउंड वजनाची सोन्याची वीट होती ती.

स्फोटानंतर फोर्ट स्टायकिनच्या पंख्याचे (प्रॉपेलर- propeller. पाणी कापण्यासाठी बोटीच्या तळाशी असलेला मोठा पंखा) तुकडे होऊन आकाशात भिरकावले गेले. त्यातील एक तुकडा क्रॉफर्ड मार्केटनजीकच्या सेंट झेवियर शाळेच्या आवारात पडला होता. तो तुकडा त्या शाळेच्या आवारात ज्या ठिकाणी पडला होता, त्याच ठिकाणी अजूनही जपून ठेवण्यात आला आहे.

सेंट झेविअर शाळेच्या पआवारात जाऊन पडलेला बोटीच्या प्रॉपेलरचा तुकडा

मुंबईतली सर्व फायर इंजिन्स आणि अँम्ब्युलन्स गोदीमध्ये आणण्यात आल्या. ह्या अँम्ब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे, ह्या गाड्या स्त्रिया चालवत होत्या. अख्खी मुंबई एकोप्याचं दर्शन घडवीत रस्त्यावर उतरली होती. केवळ गोदीमधेच नव्हे, तर मस्जिद, भायखळा, माजगाव इत्यादी गोदीपासून जवळच्या परिसरातही लोकांना मदतीची गरज होती. पोलीस होतेच, परंतु स्वत:चं दु:ख बाजूला सारून लोकही इतराच्या मदतीसाठी पुढे आले होते. . मुंबईचे गव्हर्नर सर जोन कोलव्हील यांनी जातीने गोदी परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने मदतीच्या सूचना दिल्या.

ह्या स्फोटामुळे, गोदीच्या परिसरात असलेल्या लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारींनी पेट घेतला. रेल्वे वाहतूक बंद पडली. ट्रामच्या तर तुटून ट्राम वाहतूकही बंद पडली. मुंबईतला पाणीपुरवठा विस्कळीत झाला गोदीच्या परिसरातील स्फोटामुळे मोडकळीला आलेली अनेक गोदामे रिकामी करण्याच्या कामासाठी लष्कराची अख्खी पलटण जुंपली होती. काळबादेवी, मस्जिद, मोहम्मद अली मार्ग इत्यादी ठिकाणी असलेल्या इमार्तीतील व्यापाऱ्यांची कार्यालयं जमीन दोस्त झाली होती. त्यात असलेल्या त्यांच्या हिशोबाच्या चोपड्या, रोकड, सोनं-नाणं यांची जपणूक करणं आणि ज्याची त्याची ओळख पटवून देण्याचं काम मोठाच होतं. पोलिसांनी ते काम लीलया पेललं हे काम पुढे अनेक दिवस सुरु होत. मस्जिद येथील इथल्या बरोडा स्ट्रीट ( आताचा के. एन. पाटील रोड) इथल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे ८०० लहान –मोठे हिरे सापडले. त्यातला एक हिरा सुमारे १० हजार रुपये किमतीचा होता. ह्या हिऱ्यांचे मालक शा. देवजी रतनसी असल्याचं शोधून काढून ते हिरे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. एका इमारतीत्च्या ढिगाऱ्यात ५५ हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याही ज्याच्या होत्या त्याची ओळख पटवून त्याला परत देण्यात आल्या. इमारतींना लागलेल्या आगीत किती रुपये भस्मसात झाले, त्याचा कधीच पत्ता लागू शकला नाही. अनेक अर्धवट जळलेल्या नोटा व्यापारी भागात पसरलेल्या दिसून येत होत्या. ह्या स्फोटामुळे शहरात लागलेल्या आगींमध्ये सुमारे ५५ हजार टन अनन्धान्य आगीत स्वाहा झाले. लोकांवर उपासमारीची पाळी आली होती.

हिरे सापडल्याची बातमी.

स्फोटामुळे कोसळलेल्या इमारतीत ते ढिगारे हलवून ती जागा मोकळी करण्याचं काम, म्युनिसिपालीटीचे सिटी इंजिनिअर मोडक यांच्या देखरेखीखाली चालू होते. अर्धवट कोसळलेल्या इमारती पडण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या आवाजांमुळे, मुंबईकर घाबरेघुबरे होत होते. त्यातच बोटीत झालेल्या स्फोटानंतर, न उडालेले बॉम्ब्स आणि बंदुकीच्या गोळ्याही सर्वत्र पसरल्या होत्या. इमरात अर्धवट पडलेल्या इमारती पाडताना, त्याच्या दगड विटा त्यावरच्या काही बॉम्ब्सवर पडून स्फोट होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळेही घबराट पसरली होती. अशा स्फोटांचे आवाज आले तरी घाबरू नका, असं आवाहन मुनिसिपालीटीला करावे लागत होते. पडलेल्या घरांचा राडा-रोडा वरळीला रेसकोर्सच्या परिसरात नेऊन टाकण्यात येत होते. पडझड झालेल्या इमारतीतील भाडेकरू अक्षरक्ष: रस्त्यावर आले होते. अनेक लोक बेघर झाले होते. तर अनेक बालकं अनाथ..!

ह्यात नेहेमीप्रमाणे संकटात संधी शोधणारे लोकही आपले हात धुवून घेत होते. कोसळलेल्या घरातून चीजवस्तू, पैसे चोरण्याचं प्रमाण वाढलं होत. पोलिसांना ते नवीनच काम लागलं होत. विमा कंपन्यांनी भरपाई देताना नेहेमीप्रमाणे हात वर केले होते.

पुढचे सतत तीन दिवस व्हिक्टोरिया गोदितली आग विझवण्याचं काम सुरु होत. गोदीतल्या जवळपास सर्वच इमारती नष्ट झाल्या होत्या. ह्या स्फोटामुळे अदमासे २ कोटी पौंडाची मालमत्ता नष्ट झाली असावी, असा अंदाज लावला गेला. माणसं किती मेली, त्याचा कोणताही नक्की आकडा उपलब्ध नाही. काही माणसं पार नाहीशीच झाली. त्यांची प्रेतही मिळाली नाहीत. पुढचे अनेक दिवस मुंबईच्या समुद्रात तरंगणारी प्रेतं सापडत होती. तरीही एक अंदाज म्हणून ५०० ते ७०० माणसं ह्या स्फोटात मेली असावीत. बोटीवरचा कुणीही अधिकारी-कर्मचारी वाचला नव्हता.

एस. एस. फोर्ट स्टायकिन बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ याने घेतलेल्या हरकतीनंतरही विध्वंसक स्फोटकाबरोबरच कापूस, तेल इत्यादी शीघ्र ज्वालाग्राही वस्तू जहाजावर लादण्यात आल्या होत्या. कॅप्टन नायस्मिथ या स्फोटात मरण पावला. त्याचं प्रेतही सापडलं नाही. जहाज वाचवण्यासाठी त्याने अखेरपर्यंत केलेल्या धडपडीचा सन्मान म्हणून त्याला मरणोपरांत गौरवण्यात आलं. जहाजातून बाहेर पडणारा धूर नेमका कुठून येतो हे पाहण्यासाठी, जीवाची परवा न करता, जहाजाच्या समान कक्षात शिरलेला जहाजाचा फर्स्ट ऑफिसर हेन्डरसन यालाही त्याने दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल गौरवण्यात आलं होतं.

फोर्ट स्टायकिनला आग लागल्यानंतर बोटीवर गेलेले मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सॅडलर या स्फोटात मरण पावले. त्यांच्यासोबतच डॉक आणि रेल्वे मॅनेजर जॉन निकोलसन, डॉक मास्टर मार्तेझ, डेप्युटी मॅनेजर जॅक्स, मि. स्कॅली, सुपरींटेडेंट सेल्व्हेजकोर, फोर्ट फायर स्टेशनचे प्रमुख रुस्तम पालमकोट हे अधिकारी जागीच मरण पावले. त्यांच्या मृत शरीराचाही पत्ता लागला नाही.

या स्फोटात फायर ब्रिगेडचे हेरॉल्ड पाल्मर, रोबर्ट अन्द्र्युज, आर्थर रेनोल्ड्स इत्यादी १३ अधिकारी आणि ५३ कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यापैकी अनेकांची प्रेतं सापडली नाहीत. ७१ जवान जखमी झाले होते. स्फोटात आपलं बलिदान देणाऱ्या फायर ब्रिगेडच्या ह्या अधिकारी आणि जवानांच्या मृत्यार्थ, दर वर्षी १४ एप्रिलला त्यांना मानवंदना दिली जाते आणि १४ एप्रिल ते २० एप्रिल हा आठवडा ‘अग्नी सुरक्षा साप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

फायर ब्रिगेड जवान शहिद बातमी

स्फोटात शहिद झालेल्या अग्नीशमन दलातील जवानांची यादी

दिनांक १४ एप्रिल १९४४ या दिवशी दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान झालेले दोन महाप्रचंड स्फोट होते, ज्यांची नोंद दोन-एक हजार किलोमीटर अंतरावरच्या सिमला वेधशाळेच्या भूकंपमापन यंत्रावर झाली होती. जगात तेवढ्या क्षमतेचा स्फोट तोवर झालेला नव्हता. मुंबईच्या गोदीत झालेल्या ह्या स्फोटाला मागे टाकणारा नंतरचा स्फोट, अमेरिकेने हिरोशिमा- आणि नागासकीवर टाकलेल्या अणुबॉम्बचा झाला होता. ह्या स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच शिल्लक उरले नव्हते. वर स्फोटाचं जे वर्णन केलं आहे, ते अनेकांनी अनेकांकडून आणि सरकारी कागदपत्रांवरून माहिती घेऊन नंतर केलेलं आहे.

दुसरं महायुद्ध सुरु होतं. अगदी निकरावर आलं होतं. अशा परिस्थितीत झाल्या परिस्थितीतून मार्ग काढणं आवश्यक होत. स्फोट झाल्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून सैन्याने गोडीचा ताबा घेतला आणि जे जे नष्ट झालं होतं, ते ते नव्याने उभारण्याचं कार्य जोमाने सुरु केल. सतत सहासात महिने अविश्रांत कष्ट करून व्हिक्टोरिया आणि प्रिन्सेस गोदीचं कामकाज पूर्वपदावर आणलं गेलं.

गोदीत झालेल्या ह्या स्फोटाची आठवण म्हणून, स्फोटामुळे उंच आकाशात उडालेल्या सोन्याच्या विटा गोदीपासून दोन-एक किलोमीटर्स अंतरावरच्या घरांची छपरं फाडून घरात पडल्याचं आवर्जून सांगितली जाते. अगदी, त्या दिवशी सोन्याचा पाऊसपडला, असं त्याचं वर्णन केलं जातं. पण ते अतिशोयाक्त वर्णन असावं. १४ एप्रिल १९४४ रोजी स्फोट झाल्यापासूनच्या पुढच्या चार दिवसांच्या मराठी वर्तमानपत्रांतील बातम्यांमध्ये, केवळ एक बातमी पारशाच्या घरात पडलेल्या सोन्यासंबंधातली आहे. ती वर दिली आहे.

पेटत्या कापसाचा आणि तप्त लोखंडाच्या तुकड्यांचा वर्षाव अनेक इमारतींवर झाल्याने, त्या अग्निवर्षावात अनेक चाळींना आगी लागून मुंबईकर दगावल्याच्या अथवा बेघर मात्र अनेक बातम्या आहेत.सोन्याच्या साठा होता तो जहाजावरच्या दोननंबरच्या कप्प्यात अगदी तळाला. त्यावर स्फोटकं, स्फोटकांवर कापूस आणि त्याच्यावर भंगारचे तुकडे, अशी रचना होती. शिवाय सोनं प्रथम लाकडांच्या पेट्यांमध्ये भरून, त्या पेट्या मजबूत पोलादी आवरणात सील बंद होतं. त्यामुळे स्फोट झाल्यावर काही पेट्या उघडल्या जाऊन काही सोनं उडालंही असेल, पण बाकी सोनं त्याच्या वर ठेवलेल्या स्फोटकांच्या धमाक्यामुळे समुद्राच्या तळात खोलवर रुतून पडलं असण्याचीच शक्यता जास्त.

त्याला पुष्टी देणारी बातमी सन २००९ च्या ‘The Daily Mirror’ ह्या मुंबईच्या वृत्तपत्रात आलेली होती. फेब्रुवारी महिन्यात व्हिक्टोरीया डॉकमधील गाळ काढण्याचं काम सुरु असताना, गाळ काढाणाऱ्या कमालखान नांवाच्या एका कामगाराला, त्याने उपसलेल्या गाळात १०० आणि ५० ग्राम वजनाची सोन्याची दोन बिस्कीटं सापडली होती. ती त्यांने पोलिसांच्या ताब्यात दिली होती. त्या बिस्कीटांची तपासणी केली असता, ती १९४४ च्या स्फोटतलीअसल्याचं सिद्ध झालं होतं.

‘मुंबई मिरर’मधील बातमी..

दुसरा पुरावा माझे मित्र व सामाजिक कार्यकर्ते श्री. जगदीश आडवीरकर यांच्याकडे आहे. त्यांचे वडील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला होते. सन १९८० मध्ये बंदारातला गाळ काढताना, त्या गाळात त्यांना १० किलो वजनाची सोन्याची वीट सापडली होती. सदर वीट त्यांनी सरकारच्या ताब्यात दिल्यावर त्यांना रोख १ हजार रुपयांचं बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, त्याचा फोटो सोबत जोडला आहे.

सदानंद मारुती आडविरकर यांनी, त्यांना समुद्रात मिळालेली सोन्याची वीट पोर्ट ट्र्स्ट अधिकाऱ्यींच्या ताब्यात दिल्यानंतर, पोर्ट टर्सकडून त्यांना मिळालेलं प्रमाणपत्र..

कुणास ठाऊक, या स्फोटातलं असं कित्येक किलो सोनं व्हिक्टोरीया आणि प्रिन्सेस डॉकच्यासमुद्रात रुतून बसलेलं असेल. काही न फुटलेले बॉम्ब्सही असतील, हे ही कुणास ठाऊक..!

उपसंहार –

एस. एस. फोर्ट स्टायकीन हे जहाज मुंबई बंदरात आल्यावर झालेल्या चुका टाळल्या असत्या तर, तर हा स्फोट झाला नसता, असा निष्कर्ष ह्या स्फोटासंबंधी लिखाण करणाऱ्या काही लोकांनी काढलेला आहे. स्फोटकं आणि ज्वालाग्राही साहित्य वाहून नेणाऱ्या जहाजांवर ‘रेड फ्लॅग’ लावायला हवा असा दंडक आहे. ह्या जाह्जावर तो लावलेला नव्हता. हा झेंडा लावलेला असता तर, ह्या जहाजावर स्फोटकं आहेत, हे सर्वाना समजले असते. विशेषत: बोटीतून समान उतरवणाऱ्या हमालांना, त्यातील स्फोटकं तातडीने उतरवून घेण्याची तातडी लक्षात येऊन त्यांनी ती त्वरित उतरवून घेण्यास सुरुवात केली असती. तसंच जहाजातून धूर येताना दिसताच, परिसरातले सगळे सावध झाले असते आणि आजूबाजूच्या जहाजांना खोल समुद्रात नेता आले असते, आणि त्यांचं नुकसान टाळता आलं असतं.

बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ याने प्रथम स्फोटकं उतरवून घ्यावीत असं संबंधित अधिकाऱ्यांना परोपरीने सांगूनही, त्याच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं, ही दुसरी चूक झाली होती. स्फोटकं उतरवून घेण्यासाठी लागणाऱ्या लहान बोटी त्याला तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. बंदर अधिकाऱ्यांकी कॅप्टनच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर, स्फोटकं वेळीच उतरवून घेता आली असती आणि मग कापसाच्या गासड्यांना आग जरी लागली असती, तरी स्फोट झाला नसता.

जहाजाचा चीफ इंजिनिअर अलेक्सला इंजिन दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात आली होती. वासाताविक जहाजावरील स्फोटकं उतरवून होईपर्यंत जहाजाचं इंजिन खोलण्याची परवानगी देता कामा नये होती. जर बोतीच्म इंजिन कार्यरत असलं असतं तर, बोटीतून धूर येताना दिसताच, बोट दूर समुद्रात सहज नेता आली असती आणि जरी स्फोट झाला असता तरी, त्यामुळे झालेली वित्त आणि जीवितहानी टाळता आली असती किंवा तिची तीव्रता बरीच क्षीण करता आली असती. ही चौथी चूक झाली होती.

बोटीवर समान ठेवण्यासाठी असलेला कप्पा क्रमांक एक आणि दोन यांना डेकवर जोडणारा एक चिंचोळा मार्ग होता. हा मार्ग तसा जा-ये करण्यासाठी फारसा वापरात नव्हता. बोटीवर असणाऱ्या किंवा बंदरात थांबल्यानंतर कुणाला सिगारेट ओढण्याची तलफ आल्यास, ती गपजूप भागवण्यासाठी हा आडोसा अतिशय सोयीचा होता. याची कॅप्टन नायस्मिथ आणि बोटीवरच्या इतर अधिकाऱ्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी त्या गँगवेमध्ये ‘No Sominkg’, ‘Smoking Strictly Prohibited’ अशी मोठ्या अक्षरातली पोस्टर लावली असावीत. परंतु, त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून, बंदरात बोट उभी असताना, सामान उतरवण्यासाठी आलेल्यांपैकी कुणीतरी दुपारच्या जेवनानंतर झुरका मारायची तल्लफ आल्यावर तिथे सिगरेट/विडी शिलगावली असावी आणि विडी ओढून झाल्यानंतर पेटती विडी चुकून तिथेच टाकली असावी. त्यामुळे कापसाच्या एखाद्या गासाडीने पेट घेतला असावा आणि मग पुढचा सर्व अनर्थ ओढवला असावा, असा अंदाज चौकशीत काढला गेला. तो बरोबर असेलच असं नाही. परंतु, तसं झालं असल्यास, जहाजावर असलेला तो अंधारा आडोसा ही तिसरी आणि सर्वात गंभिर चूक होती..

(भाग तिसरा व शेवटचा. तीन लेखांची मालिका इथे लमाप्त झाली)

– नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

महत्वाची टीप-

तीन भागांच्या या लेख मालिकेतील पहिल्या भागाच्या अगदी सुरुवातील जो ‘सिमला वेधशाळेचा’ उल्लेख आहे, ती वेध शाळा प्रत्यक्षात सिमला इथली नसून, पुणे इथली असावी. ‘पुणे वेधशाळा’ या नांवाने ती आपल्याला माहित आहे.

सिमला ही ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असल्याने, बऱ्याच सरकारी संस्था सिमला इथुनही कार्यरत होत्या. वेधशाळाही त्यापैकीच एक. ही वेधशाळा दिनांक २० जुलै १९२८ रोजी पुणे येथे हलवण्यात आली होती. ही वेधशाळा सिमल्याहून पुणे येथे हलवलेली असल्याने, तिला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हणत. किंबहुना ती सिमला ऑफिस या नांवानेच पुणेकरांना माहित होती/आहे. फोट झाला त्या वेळी सिमला येथे वेधशाळा कार्यान्वित नव्हती.

सदरची माहिती लेख लिहिल्यानंतर माझे स्नेही व महाराष्ट्राचे श्रेष्ठ कवी श्री. अशोक नायगांवकर यांनी माझ्या नजरेस आणून दिली आणि ‘सिमला ऑफिस’संबंधीची जास्तीची माहिती माझे पुणेस्थित स्नेही व मुंबई शहरावर नितांत प्रेम करणारे श्री. संभाजी भोसले यांनी पुरवली.

सदरची माहिती नंतर समजल्याने, ती मूळ लेखात न देता ‘महत्वाची टीप’ म्हणून देत आहे.

संदर्भ –

१. सदरचा लेख, मुख्यत्वेकरून, वॉरेन अर्मस्ट्रॉंग यांनी लिहिलेल्या ‘Fire Down Below’ या इंग्रजी पुस्तकातल्या ‘Fort Stikin’ या लेखावर आधारलेला आहे.

२.     लेख ‘Anatomy of a Disaster; The Bombay Docks Exploision’, लेखक – मायकेल महोनी मायकेल महोनी यांचे वडील डेनिस महोनी स्फोटाच्या दिवशी, स्फोट झालेल्या फोर्ट स्टायकिन जहाजाच्या शेजारी काही अंतरावर नांगरलेल्या S. S. Tinombo या मालवाहू जहाजावर ‘गनर’ म्हणून नोकरीला होते. स्फोट झाल्या दिवशी ते त्या जहाजावर हजार होते आणि सुदैवाने त्या अपघातातून वाचले होते. त्यांनी सांगितलेल्या आठवणींवरून मायकेल महोनी यांनी सदरचा लेख लिहिला आहे. 

३.     Dock Explosion in Bombay; How 66 Brave Fire Fighters Died Battling the Flames – लेखिका अंगारिका गोगोई. 

४.     ‘Major Industrial Disasters in India’ संपादक- प्रार्थना त्रिवेदी, दीपक पुरोहित आणि अॅनी सोजू. प्रकाशित – National Institute of Occupational Health, Meghani Nagar, Ahmedabad. 

५. वर्तमानपत्र ‘नवाकाळ’ची कात्रणं, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या, दादर येथील संदर्भ शाखेच्या सहकार्याने प्राप्त झाली.

१४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईच्या गोदीत झालेल्या स्फोटाची कहाणी – भाग दुसरा (२/३)

लेखाच्या पहिल्या भागात आपण वाचलं की,

२४ फेब्रुवारी १९४४ रोजी इंग्लंडहून निघालेलंएस. एस. फोर्ट स्टांयकीनजहाज ३० मार्चला कराची बंदरात पोहोचलं होतं. कराची बंदरात बोटीतलं काही सामान उतरवून झाल्यानंतर रिकामी झालेल्या जागेत, नव्याने भरल्या जाणाऱ्या सामानाकडे पाहून कॅप्टन नायस्मिथ प्रथम हतबुद्धच झाला. त्याच्या हतबुद्धतेची जागा नंतर चिडीने आणि मग असहाय्यतेने घेतली. चरफडत राहण्याखेरीज तो काहीच करू शकत नव्हता. असं काय होतं त्या सामानात?

पुढे

कराची बंदरात बोटीतलं काही सामान उतरवून झाल्यानंतर रिकामी झालेल्या जागेत, नव्याने भरल्या सामाना जाणाऱ्या सामानात कापसाच्या ८७ हजार गासड्या, ३०० टनापेक्षा जास्त कच्च गंधक (Raw Sulphar), १० हजारापेक्षा जास्त इमारती लाकडाचे मोठे ओंडके, मोठ्या प्रमाणावर राळ (Resin), १०० पिंप भरून तेल, विविध धातूचं भंगार आणि तांदळाच्या पोती. हे कमी की काय म्हणून मासळीपासून बनवलेलं खत. ह्याची तर प्रचंड दुर्गंधी सुटली होती. हे सर्व समान भरलं गेलं बोटीतल्या दारूगोळ्याच्या आसपास. कापसाच्या गासड्या तर नेमक्या स्फोटकं असलेल्या कप्प्यातच ठेवल्या गेल्या.

आधीच प्रचंड प्रमाणावर दारूगोळ्याचा साठ असलेल्या बोटीत, कापूस, तेल, रेझिन, लाकूड इत्यादी अतिशीघ्र ज्वालाग्राही समान भरले जात असल्यचे पाहून नायस्मिथ खवळला. त्याने त्याचा विरोध प्रकट केला. त्याचा विशेष विरोध होता, तो कापसाच्या ८७ हजार गासाड्यांना. नेमक्या दारूगोल्यांच्या साठ्यावर ठेवल्या गेलेल्या ह्या गासड्या, एप्रिल-मे महिन्यामधल्या कडक उन्हामुळे आणि बोटीच्या इंजिनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने पेट घेण्याची मोठी शक्यता होती. त्यात बोटीचं इंजिन वाफेवर चालणारं कुरकुरत होतंच. त्याचा स्फोट झाला तर, कापूस आणि दारुगोळा एकदम पेट घेऊन, खणात होत्याचं नव्हतं होण्याची दाट शक्यता होती. बोटीवरचा एकहीजण वाचणार नव्हता. सर्व माहित असूनही ही आत्महत्या करण्यास भाग पाडण्यासारखंच होतं हे. बोटीवर आधीच असलेल्या तीव्र ज्वालाग्राही सामानची संपूर्ण माहिती असताना, तुम्ही कापूस, तेल आणि लाकूड ह्या बोटीवर कसं काय भरू शकता, असा सवाल त्याने कराचीतील अधिकाऱ्यांना केला. नायस्मिथच्या विरोधाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून कराचीतील अधिकाऱ्यांनी त्याला, युद्ध काळातल्या त्याच्या जबाबदारीची आठवण करून दिली. त्याच्या समाधानासाठी बोटीवर दिवस-रात्र पहारा देण्यासाठी गार्डस देण्यात आले आणि त्याला कराची बंदर सोडण्याचा आदेश दिला गेला.

३० मार्चला कराचीत पोहोचलेली बोट, ९ एप्रिलच्या सकाळी मुंबईच्या दिशेने निघाली. बोटीवरचं स्फोटक वातावरण कमी होतं म्हणून की काय, फोर्ट स्टायकीनला ज्या ताफ्यासोबत मुंबईपर्यंत जायचं होतं, तो ताफा होता इराणच्या आखातातून तेल घेऊन आलेल्या तेलवाहू जहाजांचा (Oil Tankers). आता हा चालता बॉम्ब, सोबतच्या तेलवाहू जहाजासोबतं, कडक उन्हातून, खुल्या समुद्रातून दीड-दोन हजार मैलावरच्या मुंबईकडे घेऊन जाणं, म्हणजे कोणत्याही क्षणी मृत्यूला कवटाळण्याची तयारी ठेवण्यासारखंच होतं. त्यात शत्रू बोटींकडून होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता होतीच. पण ही जोखीम पार पडावीच लागणार, याची सर्वाना खात्री झाली. त्यात बोटीवरच्या मच्छीच्या खताचा कुजलेला वास सर्वत्र भरून राहिला होता. तो प्रकारही कमी जीवघेणा नव्हता. त्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या उलट्यांनी जहाजावरचे सर्वच अधिकारी-कर्मचारी हैराण झाले होते. मुंबईपर्यंतचा प्रवास सुखरूप पार पडो, यासाठी जहाजावरील सर्वांनी आपापल्या दैवताचा धावा सुरु केला.

सुदैवाने वाटेत काही विघ्न न येता, १२ एप्रिलच्या पहाटे फोर्ट स्टायकीन मुंबई बंदरच्या बाहेर दाखल झालं आणि नांगर टाकून त्याला बंदरात ओढून नेणाऱ्या ‘पायलट’ बोटीची वाट पाहू लागलं.

मुंबई बंदर. (फोटो प्रातिनिधिक आहे)

खरं तर, जहाज मुंबई बंदरात पोहोचल्यापासूनच एकामागोमाग एक चुका होऊ लागल्या होत्या. चुकांची मालिकाच सुरू झाली. काहीतरी चुकतंय, हे कॅप्टन नायस्मिथच्या ध्यानात येत होतं, पण तो ही फारसं काही करु शकत नव्हता.

ज्या बोटीवर दारुगोळा आणि स्फोटकं असतात, त्या बोटींनी बंदरात पोहोचल्यावर लाल रंगाचा झेंडा (Red Flag किंवा Bravo Flag) फडकवायचा असतो, असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. ह्या लाल निशाणाचा अर्थ असतो, ‘I am taking on, discharging, or carrying Dangerous Cargo’. जहाजावर लाल रंगाचा झेंडा दिसला की, जहाजावर धोकादायक समान आहे, असा संकेत (Signal), बंदरातील अधिकाऱ्यांना मिळतो आणि त्या जहाजातलं साहित्य रिकामी करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. फोर्ट स्टांयकिनवर असा लाल झेंडा नसल्याने, पहाटेच मुंबई बंदराच्या बाहेर नांगर टाकून उभ्या असलेल्या फोर्ट स्टांयकिनची तत्काळ दखल बंदर अधिकाऱ्यांकडून घेतली गेली नाही. ही पहिली चूक.

बोटीत भरलेल्या सामानाच्या प्रकारानुसार, बोट बंदरात येताच जे झेंडे लावले जातात, त्यांचा तक्ता. यातील दुसऱ्या क्रमांकावरचा झेंडा म्हणजे Red Flag किंवा Bravo Flag, जो स्टायकीनवर लावला गेला नव्हता.

सकाळी १०-१०.३०च्या दरम्यान जेंव्हा बंदरावरील अधिकारी फोर्ट स्टायकिनची कागदपत्र तपासण्यासाठी पोहोचले, तेंव्हा त्यांना ह्या जहाजात स्फोटकं असल्याचं लक्षात आलं आणि मग मात्र त्यांनी, कॅप्टन नायस्मिथला ‘Grave Urgency’ प्रमाणपत्र दिलं आणि त्याचं जहाज धक्क्याला लावायची परवानगी दिली. Grave Urgencyप्रमाणपत्राचा अर्थही साधारण तोच असतो, जो Red Flag चा असतो, परंतु, ह्या जहाजावरील समान त्वरित उतरवून घेणं गरजेचं आहे, असा जास्तीचा अर्थ ह्या प्रमाणपत्राचा होतो. हे प्रमाणपत्र प्राप्त होताच, फोर्ट स्टायकिनला लगेच ‘व्हिक्टोरिया डॉक’मधील, क्रमांक १ च्या धक्क्यावर आणण्याचे आदेश दिले गेले. मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर जवळपास चार-पांच तासांनी, सकाळी साधारण ११.३० वाजता, जहाज त्याला मिळालेल्या आदेशानुसार व्हिक्टोरिया डॉकचा धक्का क्रमांक १ (Berth No. 1) येथे लागलं.

व्हिक्टोरीया डॉक

फोर्ट स्टायकीन धक्क्याला लागलं खरं, पण बराच वेळ त्याच्याकडे कुणीच फिरकलं नाही. बोटीवरचं सामान त्वरीत उतरवणं गरजेचं होतं, हे माहित असुनही त्या दिशेने कोणतीच हालचाल होताना दिसेना. धक्क्यावर कुणीही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. कॅप्टन नायस्मिथ आणि त्याचा क्रू जहाजावरच असहाय्यपणे ताटकळत उभे होते. जहाजातली जोखीम जास्तीत जास्त लवकर उतरवून घेणं आवश्यक होतं. जसाजसा वेळ जात होता, तसतसा त्यांचा धीर सुटत चालला होता. जहाजावर ‘रेड फ्लॅग’ नसल्याने, शेजारी उभ्या असलेल्या जहाजांतील माल उतरवून घेणाऱ्या हमालांसाठी ते नेहेमीसारखंच एक जहाज होतं. त्यांच्या हाततलं चालू काम आटोपल्यानंतरच ते फोर्ट स्टायकीनकडे वळणार होते.

शेवटी एकदाचे बंदरावरचे जबाबदार अधिकारी फोर्ट स्टायकीनवर पोहोचले. धक्यावरच्या अजस्त्र क्रेन्स हलवून, त्या जहाजाच्या शेजारी आणून ठेवण्यात आल्या. बोटीवरच्या सामानाचे स्टोवेज प्लान्सची तपासणी करुन, बोटीतलं कोणतं सामान पहिलं उतरवायचं, त्याची नायस्मिथसोबत चर्चा केली. बोटीवर असलेल्या कापसाच्या गासड्या आणि तेलाची पिंप पहिली उतरवून घ्यायचं ठरवण्यात आलं. त्याचवेळी बोटीच्या समुद्राकडील बाजूकडून बोटीतली स्फोटकं आणि दारुगोळा उतरवून घेण्याचंही ठरलं.

इथे थोडसं विषयांतर करुन, बोटीवरील स्फोटकं समुद्राकडील बाजूने उतरवून घेण्याचं का ठरलं, ते पाहू. सन १९३९ मधे जेंव्हा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली, तेंव्हा कोणत्याही प्रकारचा दारुगोळा आणि स्फोटकं, कोणत्याही परिस्थितीत बंदरावर उतरवून घेण्यासाठी मनाई हुकूम जारी करण्यात आला होता. त्याऐवजी, अशी स्फोटकं घेऊन येणाऱ्या बोटी, दूर समुद्रात उभ्या कराव्यात आणि त्या बोटींवरील दारुगोळा लहान लहान बोटींमधे (Lighters) उतरवून घ्यावा आणि मग तो टप्प्या टप्प्याने, त्याच लहान बोटींतून गरज लागेल तसा बंदरावर आणला जावा, असा नियम करण्यात आला होता. ह्या नियमातं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. मोठ्या बोटींवरील सर्वच दारुगोळा बंदरात उतरवला आणि त्याचा स्फोट झाल्यास अथवा बंदरावर शत्रूने हल्ला केल्यास, मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी असलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन, बंदराचं आणि त्या परिसरात असलेल्या इतर जहाजांचं नुकसान होऊ नये, यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. ह्या नियमामूळे काही वेळ वाया जात असला तरी, सुरक्षिततेसाठी तो आवश्यक होता. पण जसजसं युद्ध जवळ येत गेलं, तस तसा हा नियम शिथिल करण्यात आला होता. वेळ महत्वाचा होता. म्हणून स्फोटकं आणणाऱ्या मोठ्या बोटीना धक्क्यापर्यंत येण्याची परवानगी देण्यात आली होती. फक्त स्फोटकं उतरवताना, ती धक्क्यावर न उतरवता, बोटीच्या समुद्राकडील बाजूला उतरवून घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

तर, फोर्ट स्टायकीनवरील दारुगोळा समुद्राकडील बाजून उतरवून घेण्याचं मात्र त्यासाठी ज्या लहान बोटी आणि बार्ज लागणार होते, ते दुसऱ्या दिवशीच, म्हणजे २४ तासांनंतरच उपलब्ध होऊ शकणार होते. कॅप्टन नायस्मिथ आणि जहाजाच्या फर्स्ट ऑफिसरने स्फोटकं लगेच उतरवून घेणं गरजेचं असल्याने, ती पहिली उतरवावीत असं बंदर अधिकाऱ्यांना परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिकडे साफ दुर्लंक्ष करण्यात आलं आणि २४ तास थांबावंच लागेल, असं शांतपणे सांगण्यात आलं.

बोटीवरची स्फोटकं उतरवून घ्यायला उशिर होत होता, ही दुसरी चूक घडली..! ही चूक अत्यंत गंभीर होती.

दरम्यानच्या काळात बोटीवरील इतर सामान उतरवून घेण्यास सुरुवात झाली होती. बोटीत सामान ठेवण्यासाठी असलेल्या पांच कप्प्यांपैकी, पहिला आणि दुसरा कप्पा रिकामा करण्याचं काम सुरु झालं. सर्वात पाहिलं तेलाने भरलेली पिंप धक्क्यावर उतरवण्यास सुरुवात झाली. त्याच्यासोबतच मासळीचं, भयानक दुर्गंधी येणारं खत उतरवण्यास सुरुवात झाली.

इकडे माल उतरवून घेण्याची घाई चालली असतानाच, तिकडे बोटीचा चीफ इंजिनिअर अलेक्स गो ला भेटायला Ministry of War Transport चा अधिकारी फोर्ट स्टायकीनवर आला. बोटीच्या इंजिनाच्या दुरुस्तीबाबत त्याची आणि अलेक्स्ची चर्चा झाली आणि त्याने अलेक्सला इंजिनाची दुरुस्ती करून घेण्यास परवानगी दिली. परवानगी मिळताच अलेक्स आणि त्याची टीम बोटीचं इंजिन दुरुस्तीच्या कामासाठी इंजिनरूम मध्ये पोहोचली आणि इंजिनाचा एक एक भाग सुटा करू लागली. इंजिनच खोलल्यामुळे, बोटीचा आणि इंजिनाचा संबंध तुटला आणि बोट एक इंचही पुढे-मागे हलू शकण्याची शक्यता मावळली. ही चौथी आणि गंभीर चूक झाली होती. पण ह्याला चुक म्हणताही येत नव्हती. अलेक्स त्याचं काम करत होता. पुढच्या मोठ्या प्रवासाला निघण्याआधी बोतीच्म इंजिन तंदुरुस्त असणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याने रीतसर परवानगी घेतली होती. असं असलं तरीही, पुढे जे काही घडणार होतं, त्यासाठी, बोटीचं इंजिन कार्यरत नसणं, ही बाब देखील कारणीभूत ठरणार होती.

दुसरा दिवस उजाडला. १२ एप्रिलला बंदरात आलेल्या बोटीवरचा बराचसा माल अजून बोटीवरच पडून होता. बोटीच्या २ क्रमाकाच्या कप्प्यात असलेल्या सोन्याच्या पोलादी पेट्यांना मात्र अजून हात लावलेला नव्हता. जो पर्यंत रिझर्व बँकेचे अधिकारी बोटीवर येऊन, त्याची तपासणी करत नाहीत, तोपर्यंत सोन्याने भरलेल्या ३० पेट्या खाली उतरवता येणार नव्हत्या. काही वेळात रिझर्व बँकेचे अधिकारी बोटीवर पोहोचले. त्यांनी सर्व पेट्या जहाजावर खोलून तपासणी केल्याखेरीज उतरवून घेणार नाही, असं जाहीर केलं. आता पंचाईत झाली. रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलादाच्या पेट्या जहाजावरच उघडायच्या तर, त्यासाठी वेल्डिंग मशीन आणावं लागणार होतं. आणि जहाजावर प्रचंड प्रमाणात स्फोटकं असल्याने, वेल्डिंग मशीनचा वापर करता येणार नव्हता. रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची मागणी मान्य करण्यास, कॅप्टन नायस्मिथ आणि बंदर अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. वेल्डिंग मशीनमुळे जहाजावर असलेल्या स्फोटकं आणि दारुगोळ्याचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे, त्यांच्या निदर्शनास आणून दिले. म्हणून बोटीवरची स्फोटकं उतरवून झाल्यानंतर, सोन्याचा साठा असलेल्या सीलबंद पेट्या, रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष उघडायच्या असं ठरवलं गेलं

परंतु स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लहान बोटी आणि बार्ज १३ एप्रिलच्या दुपारपर्यंत आलेल्याच नव्हत्या आणि तो धोकादायक माल तसाच बोटीत पडून होता.

पुढे जी काही घटना घडायची होती, त्याची ही नांदी होती..!

(क्रमश:)

-नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

टीप-

या लेखमालेतील तीनही भागांचे संदर्भ आणि स्फोट झाल्यानंतरच्या दिवसांत तेंव्हाच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणं, लेखाच्या तिसऱ्या, म्हणजे शेवटच्या भागात वाचायला मिळतील. तिसरा भाग येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होईल.

दिनांक १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईच्या ‘व्हिक्टोरिया डॉक’ मध्ये उभ्या असलेल्या जहाजात झालेल्या स्फोटाची संपूर्ण कहाणी- एकूण ‘तीन (३)’ भागात )– भाग १

एस. एस. (सप्लाय शिप) फोर्ट स्टायकिन’ – भाग १ /३

शुक्रवार दिनांक १४ एप्रिल १९४४ ची नेहेमीसारखीच शांत दुपार. स्थळ सिमला*, वेधशाळा. वेधशाळेतील नेहेमीची काम चालू होती. दिवसभरात काही विशेष घडलेलं नव्हतं. दुपारचे चार वाजलेले होते. पुढच्या दोनेक तासात, दिवसभराची नेहेमीची काम आटोपून घराकडे जायची वेळ होणार होती. कर्मचाऱ्यांची लगबग चालली होती. सवयीने तिथे लावलेल्या असंख्य यंत्राच्या तबकड्यांवर कर्मचारी अधून मधून नजर टाकून, सर्व आलवेल असल्याची खात्री करत होते. एकुणात रुटीनमधे काही वेगळं घडलेलं नव्हतं.

चार वाजून सहा मिनिट झाली आणि अचानक वेधशाळेत बसवलेल्या भूकंपमापक यंत्राचा (Seismograph) काटा जोरात हलू लागला. वेधशाळेतले अधिकारी सावध झाले. कुठेतरी दूर अतिशय तीव्र भूकंप झाला होता. अधिक तपशिलात गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की यंत्रावर नोंद झालेल्या त्या भूकंपाचं केंद्र, सिमल्यापासून दूर साधारण दीड-दोन हजार किलोमीटर अंतरावर कुठेतरी असावं. ते जमिनीवर किंवा समुद्रातही असू शकत होतं. पण नेमकं कुठे, ते कळण्याची त्या यंत्रात सोय नव्हती. कळलं फक्त एवढचं की, तो अतिशय तीव्र असा भूकंप असावा.

पुढच्या दहा-पंधरा मिनिटात, वेधशाळेचे कर्मचारी यंत्रावर नुकत्याच नोंद झालेल्या  भूकंपाची माहिती वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये नोंदवण्यात गुंतले. तेवढ्यात पुन्हा, सहा वाजून वीस मिनिटांनी, आणखी एका मोठ्या भूकंपाची नोंद यंत्र घेऊ लागलं. हा भूकंप पहिल्यापेक्षा कितीतरी मोठ्या तीव्रतेचा असावा. सेस्मोग्राफचा काटा अंगात आल्यासारखा घुमू लागला होता. यंत्राच्या डायलवरचे आकडे त्याला अपुरे पडत होते. वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना भयंकराची चाहूल लागली. हे भूकंपापेक्षा काहीतरी वेगळ घडतंय हे आणि एवढंच फक्त सिमला वेधशाळेला समजलं. आता जी नोंद झाली, ती भुकंपाची आहे की धरणीभंगाची, याता त्यांना अंदाज येत नव्हता. आणि ते जे काही झालं आहे, ते नेमकं कुठे, याचा काहीच अंदाज त्यांना येत नव्हता. साधारण २ हजार किलोमीटर परिघात काहीतरी मोठी घटना घडली असावी, एवढं आकलन त्यांना झालं.

वेधशाळेतल्या जुन्या कर्मचाऱ्यांना १९३५ साली क्वेट्टात झालेल्या ( सध्या पाकिस्तान) भूकंपाची आठवण झाली. रिश्टर स्केलवर ७.७ दाखवणाऱ्या त्या भूकंपात साधारण ५०-६० हजार माणसं मृत्यू पावली होती. त्याहीपुर्वीचा मोठा भूकंप झाला होता, तो जपान मध्ये. तो ८.८ रिश्टर स्केलचा होता. पण त्यापेक्षा आता जे काही घडत होतं, ते जास्त भयानक असल्याची आशंका त्यांच्या मनात आली. कारण आता जे दोन धक्के त्यांच्या वेधशाळेने नोंदवले, ते, तोवर नोंदवलेल्या रिश्टर स्केलच्या पुढे जाणारे होते. म्हणजे जे काही झालं आहे, ते महाभयंकर असलं पाहिजे. पुन्हा, क्वेट्टाचा भूकम जेमतेम दीड-पावणेदोन मिनिटांचा होता. तर आता १५-२० मिनिटांच्या कालावधीत जे काही घडत होत, त्याने किती विध्वंस झाला असावा, ह्याची कल्पनाही ते करू शकत नव्हते.

नेमकं काय घडलं असावं, त्याचा अंदाज येत नव्हता. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. इंग्लंड युद्धात सामील होते. भारत ब्रिटीशांची वसाहत. एखादा मोठ्या क्षमतेचा बॉम्ब टाकला गेला, की दुसरं काही घडलं, हे त्या दूर एका कोपऱ्यात असलेल्या वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना समजेना.

१९४४ चा फेब्रुवारी महिना. स्थळ इंग्लंड. लिव्हरपूलमधील ‘मेर्सी (Mersey)’ नदीवरील ‘बर्कनहेड (Birkenhead)’ बंदरात, ७१४२ टनी, ४२४ फुट लांबीचं, ‘एस. एस. फोर्ट स्टायकीन ( S. S. Fort Stikin)’ नांवाचं मालवाहू जहाज उभं होतं. कॅनडामधील (ब्रिटीश कोलंबिया) ‘प्रिन्स रुपर्ट ड्राय डॉक’ मध्ये बांधण्यात आलेल्या ह्या जहाची नोंदणी लंडनमध्ये झालेली होती. ह्या जहाजाची मालकी ब्रिटीश सरकारची होती. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्याने, हे जहाज युद्धोपयोगी साहित्याच्या वाहतुकीसाठी, दोस्त राष्ट्रांच्या War Shipping Administration द्वारा आरक्षित करण्यात आलं होतं.

‘एस. एस. फोर्ट स्टांयकीन’ जहाज

जहाज व्हाया कराची मुंबईला जायला निघालं होतं. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. भारतावर जपानच्या आक्रमणाचं सावट घोघावत होतं. युद्ध इंफाळपर्यंत येऊन ठेपलं होतं. त्यामुळे बहुतेक जहाजं युद्धसाहित्याची ने-आण करण्यात गुंतलेली होती. फोर्ट स्टायकीन जहाजातही विविध युद्धोपयोगी साहित्य भरण्याची लगबग चालली होती. लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग, वेगवेगळ्या क्षमतेचे बॉम्ब्स, बंदुकांच्या गोळ्या, हत्यारं, भू आणि पाणसुरुंग, गंधक आणि अतिशय संहारक क्षमतेचा, जवळपास १४०० टन वजन भरेल इतका दारुगोळा ह्या जहाजावर चढवला जात होता.

दारुगोळ्याव्यतिरिक्त जहाजावर १० लाख पौंड (१९४४ चे १० लाख पाउंड्स बरं का..!) किमतीच्या आणि जवळपास ३८२ किलो वजनाच्या अस्सल सोन्याच्या विटाही (खरं तर १०० आणि ५० ग्रामची बिस्किटं) चढवल्या जात होत्या. हे सोनं बँक ऑफ इंग्लंडकाढून भारताच्या रिझर्व बँकेत जमा करण्यासाठी पाठवलं जात होत. सोनं पॅकिंग करताना विशेष काळजी घेतली होती. १२ किलो ७०० ग्राम वजन सोन्याच्या विटांची एक पेटी, अशा एकूण ३० लाकडाच्या पेट्यांमधे सोनं ठेवलं होतं. जास्तीची काळजी म्हणून ह्या लाकडी पेट्या, पोलादाच्या ३० मजबूत पेट्यांमध्ये पॅक करून, त्या पेट्या वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आल्या होत्या.

 समान ठेवण्यासाठी बोटीत एकूण पाच मोठे कप्पे होते. जहाजात ठेवण्यात येणाऱ्या सामानाचं वजन विभागलं जाऊन, जहाजाचा तोल सांभाळला जावा ह्या हेतून ती विभागणी केलेली होती. सोन्याच्या पोलादी पेट्या दोन क्रमांकाच्या कप्प्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्याच कप्प्यात २०० टनाचा दारुगोळा ठेवण्यात आला. ज्याची विध्वंसक क्षमता जास्त आहे, असा १२० टन वजनाचा दारुगोळा पहिल्या आणि आणखी एक हजार टन दारुगोळा चौथ्या कप्प्यात ठेवण्यात आला. बाकीचे बोंब, बंदुका, गोळ्या, लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग कप्पा क्रमांक एक ते पाच मध्ये विखरून ठेवण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कप्प्यात, शिल्लक असलेल्या जागेत इतर समान लादण्यात आले.

एस. एस. फोर्ट स्टायकीन जहाजाचा ४५ वर्षाचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ (A. J. Naismith) जहाजावर लादल्या जाणाऱ्या सामानावर काळजीपूर्वक लक्ष ठेवून होता. जहाजाच्या स्टोवेज प्लानमधे (कुठे काय सामान ठेवलंय ते दर्शवणारा नकाशा) त्याची नोंद करत होता. जहाजात भरल्या जाणाऱ्या सामानाचं स्वरुप आणि प्रमाण पाहून त्याला थोडी चिंता वाटत होती. अर्थात, स्फोटकं आणि दारुगोळा लादलेलं जहाज घेऊन दूर दूरच्या बंदरांत जायची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती. परंतु या खेपेस दारुगोळा, अति विध्वंसक स्फोटकं मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली होती. शिवाय ४०० किलोच्या आसपास भरेल एवढं शुद्ध सोनंही जहाजावर लादण्यात आलं होतं. ही मोठीच जोखीम होती.

यापुर्वीही त्याने फोर्ट स्टायकीनसोबत, जगभरातल्या बंदरात चार वाऱ्या केल्या होत्या. ह्या जहाजाची त्याला खडानखडा माहिती होती. अतिशय सर्वसाधारणसं दिसणारं ते जहाज, होतं मात्र अत्यंत विश्वासार्ह. ज्यावर अगदी बिनधास्त विसंबून राहावं असं, त्याचं लाडकं जहाज होतं ते. आजवरच्या प्रवासात जहाजाने कधीही धोका दिल्याचा त्याचा अनुभव नव्हता. निर्जीव मशिन असलं म्हणून काय झालं, तिच्यावर जीव लावला, की ते मशिनही आपल्यावर जीव लावतं, हा अनुभव आपण आजही घेतोच. मग नेहेमीच प्राणाशी गाठ असणाऱ्या समुद्रावर बाराही महिने संचार करणाऱ्या त्या लोकांचा, ज्या मशिनच्या आधारे ते समुद्रावर जातात, त्या मशिनवर जीव असणं स्वाभाविकच म्हणायला हवं.

परंतु दिवस युद्धाचे असल्याने. जर्मन यू-बोटींचा आणि जपानी विनाशिकांचा आणि पाणबुड्यांचा महासागरात संचार होता. त्यापासून सावधगिरी बाळगत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याने ठासून भरलेलं आणि सोनं असलेलं ते जहाज, जवळपास ४ हजार नॉटिकल्स मैलाच्या अंतरावर असलेल्या मुंबंईपर्यंत घेऊन जायचं म्हणजे काळजी वाटणं सहाजिकच होतं..

दारुगोळ्याची वाहतूक नायस्मिथसाठी नेहेमीचीच होती. मात्र या वेळेला जहाजावर केवळ दारुगोळाच नव्हता, तर मोठ्या प्रमाणावर सोनं होतं. अर्थात, ह्या जहाजावर सोनं जातंय, हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहिती होतं. पण न जाणो, ती बातमी शत्रुच्या गोटाला कळली तर, शत्रू काही करुन नायस्मिथच्या जहाजावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. युद्धाच्या दिवसात एखाद्या देशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं नष्ट करण्याने, युद्धाचं पारडं फिरवता येणं शक्य होतं. शत्रू ती संधी कधीही सोडणार नाही. फोर्ट स्टायकीनचा कॅप्टन नायस्मिथ या काळजीने जास्त घेरला होता.

जहाजाचा चीफ इंजिनिअर होता अलेक्स गो ( Alex Gow). जहाजाच्या राक्षसी इंजिनवर ह्याची हुकुमत होती. प्रचंड मोठ्या आकाराचीआणि असंख्य पायपांचं गुंतागुंतीचं जंजाळ असणाऱी इंजिन रुम म्हणजे अलेक्सचं साम्राज्य. इंजिन सतत खेळतं (म्हणजे धावतं) ठेवण्याची जबाबदारी अलेक्सची होती. केवळ इंजिनच नव्हे तर, जहाजाला लागणारं इंधन, विजेसाठी लागणारा डायनामो, रेडीओ सिस्टीम इत्यादीची जबाबदारीही अलेक्स आणि त्याच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची होती. मात्र तो ही ह्या खेपेला जरा चिंतेत होता. युद्ध साहित्याची सातत्याने वाहतूक करावी लागल्यामुळे, इंजिनाची आवश्यक ती देखभाल (सर्व्हिसिंग) करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नव्हता. काही किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याने बोटीच्या कप्तानाला आणि इतर संबंधीत अधिकाऱ्यांना तसं सांगणाचा प्रयत्न केला, परंतु बोटीवरचं सामान तातडीने ठिकाणावर पोहोचवणं गरजेचं असल्याने, अलेक्सला सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. सल्ला कसला, आदेशच तो. बोटीची धुरा युद्धखात्याकडे असल्याने, त्या काळात त्यांचे सल्ले म्हणजे आदेशच असायचे. पर्यायच नसल्याने अलेक्सने, लिव्हरपूल ते मुंबई, व्हाया कराची ह्या ट्रिपमधेच जेंव्हा केंव्हा संधी मिळेल, तेंव्हा इंजिनाची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याचं त्यांने ठरवलं होतं. शक्त झाल्यास पोर्ट तौफिकमधे, एडनला, कराचीत, नाहीतर मग मुंबईत पोहोचल्यावर..!

जहाजाचा प्रवास फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजिक असलेल्या बास्कच्या आखातातून (Bay of Biscay किंवा Basque) खाली दक्षिणेला जाऊन, युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणाऱ्या आणि अटलांटींक आणि भुमध्य समुद्राला जोडणाऱ्या जिब्राल्टर स्ट्रेट (जिब्राल्टर रॉक) पार करुन, पुढे सुएझच्या कालव्यातून निघून, लाल समुद्रातील येमेन-ओमानच्या आखातात जायचं आणि तिथून पुढे प्रथम कराची आणि मग मुंबई बंदरात शेवट, असा होणार होता.

त्याकाळच्या पद्धतीनुसार फोर्ट स्टायकीन एकटं जाणार नव्हतं, तर अनेक मालवाहू जहाजांचा एक काफिला सोबतच निघणार होता. सोबत संरक्षक बोटीही असणार होत्या. त्या काफिल्यातली फोर्ट स्टायकीनची जागा नक्की होती. फक्त फोर्ट स्टायकीनने एका रांगेत न जाता, रांगेपासून फटकून थोडं डाव्या अथवा उजव्या बाजूने पोहायचं होतं. जहाजांचा हा बेडा जाताना, जर्मन यू-बोटींना फोर्ट स्टायकीनवरील विध्वंसक मालाचा सुगावा लागून, त्यांना त्याच्यावर हल्ला केलाच, त्याच्यात ठासून भरलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन इतर जहाजांना नुकसान पोहोचू नये, ह्यासाठी फोर्ट स्टायकीनने रांगेत न जाता, रांगेपासून काही अंतर राखून प्रवास करायचा होता.

फोर्ट स्टायकीन आणि बेड्यातली इतर जहाजं जिब्राल्टर स्ट्रेटपर्यंत एकत्रच प्रवास करणार होती. जिब्राल्टर पासपाशी पोहोचल्यानंतर, काफिल्यातल्या काही बोटी उजवीकडे वळून, दक्षिण दिशेला असलेल्या आफ्रिकेतल्या काही बंदरांवर जाणार होत्या, तर फोर्ट स्टायकीन आणि उर्वरीत बोटी आशिया खंडाच्या दिशेने कूच करणार होत्या..!

२४ फेब्रुवारी, १९४४ या दिवशी सकाळी काफिला आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी एकत्रच निघाला. हवामान चांगलं नव्हतं. पाऊस पडत होता. कडाक्याचा गारठा होता. पाऊस आणि धुक्यामुळे दृष्यमानताही कमी होती. वास्तवीक अशा वातावरणात सामुद्री प्रवास करत नसत. पण युदंधकाळात अशा गोष्टींचा विचार केला जात नाही. इंग्लंड लढाईत उतरलेलं होतंच. विविध आघाड्यांवर लढत असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला वेळेत रसद पोहचवणं गरजेचं असतं. म्हणून खराब हवामानाचा धोका पत्करुन जहाजांच्या कप्तानांनी आपापली जहाजं समुद्रात लोटली होती.

पुढचे दोन दिवस हवामान खराबच होतं. जहाजांचा बेडा सावधगिरीने पुढे चालला होता. जर्मन बोटींवर नजर ठेवावी लागत होती. पाऊस, धुकं आणि थंडीमुळे ते अवघड होत होतं. समुद्रही खवळलेला होता. पण त्यातूनही मार्गक्रमणा सुरु होती.

निघाल्यापासून तिसऱ्या दिवशी थोडी उघडीप मिळाली. पुढे तीन-चार दिवस सर्वच शांत होतं. आकाश निरभ्र झालं होतं समुद्रही शांत होता. समुद्रात काही जर्मन बोटी संचार करत नाहीत ना, यावर नजर ठेवणं एवढाच काम उरलं होतं. जहाजावर सारे निश्चिंत होते.

पण हा निश्चिंतपणा फार काळ टिकला नाही. वर आकाशात लांबून विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. विमानं नजरेस पडत नव्हती, तरी सगळेच सावध झाले.  एवढ्यात विमानं दिसू लागली. एकूण सहा विमानं घिरट्या घालताना दिसु लागली. नक्की कोणाची विमानं आहेत, ते कळत नव्हतं. तरीही सावधगिरी म्हणून संरक्षक बोटीवरील विमानविरोधी तोफा आकाशाच्या दिशेने रोखल्या गेल्या. परंतु काहीच झालं नाही. त्या विमानांनी काही वेळ घिरट्या घातल्या आणि ती आकाशात गडप झाली. बोटीवरील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बोटींचा ताफा पुढच्या प्रवासाला निघाला.

इंग्लंडहून निघतानाच ठरल्याप्रमाणे, जिब्राल्टर स्ट्रेटपाशी जहाजांचा ताफा दोन गटांत विभागला गेला. इथून काही जहाजं आफ्रिका खंडातल्या देशांतील बंदरात जाण्यासाठी वळल्या, तर फोर्ट स्टायकीन आणि उर्वरित इतर जहाज, सुवेझ कालव्याच्या दिशेने निघाली.

सुवेझ कालव्यापर्यंतचा पुढचा टप्पा जवळपास हजार मैलांचा आणि बारा-पंधरा दिवसांचा होता. हा टप्पा मात्र निर्विघ्नपणे पार पडला. जर्मन बोटींची अथवा पाणबुड्यांची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. डोक्य्वर घिरट्या घालणारी विमानंही नजरेश पडत नव्हती. ह्या हजार मैलांच्या प्रवासात, बाहेर युद्ध सुरु आहे की काय, याची शंका यावी, असंच वातावरण होतं. तरीही फोर्ट स्टायकीनवरील अधिकारी आणि कर्मचारी सावध होते आणि बेचैनही होते. आपण एक प्रचंड मोठ्या बॉम्बवर बसून प्रवास करीत आहोत, याचा विसर पडलेला नव्हता. चीफ इंजिनिअर अलेक्स गो, बोटीचं इंजिन मधेच बंद पडू नये यासाठी मनातल्या मनात येशूची आळवणी करत होता. परंतु मनातली घालमेल आपल्या चेहेऱ्यावर दाखवत नव्हता. जिथे पहिली संधी मिळेल, तिथे इंजिनाची बारीक-सारीक सुरुस्ती करयची त्याने ठरवलं होतं.

आणखी काही दिवसांनी ‘पोर्ट सैद’ आलं आता हा काफिला सुवेझ कालव्यात प्रवेश करणार होता. सुवेझ कालवा पार करण्यासाठी, जहाजांच्या बेड्याला, त्यांचा नंबर येईपर्यंत काही काळ वाट पहावी लागली. जेवढा वेळ जात होता, तेवढा वेळ अलेक्स अस्वस्थ होत होता. बोटीचं इंजिन त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं.

पोर्ट सैद

थोड्याच वेळात जहाजांच्या ताफ्याला सुवेझ कालव्यात प्रवेश करण्याची वर्दी मिळाली. सुवेझ कालवा पार करून जहाजं, कालव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या ‘पोर्ट तौफिक’ येथे आली. इथे काही काळ फोर्ट स्टायकीन इंधन घेण्यासाठी थांबणार होतं.

बोट पोर्ट तौफिक येथे पोहोचली. बोटीवर इंधन भरून होईपर्यंत, कॅप्टन नायस्मिथने बोटीवरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतेय की नाही, याची तपासणी केली. अलेक्सने बोटीच्या इंजिनावर नजर फिरवली. अजून पर्यंत तरी सर्व आलवेल असल्याचं दिसत होतं. परंतु मोठी दुरुस्ती आणि इंजिनाची सर्व्हिसिंग करावीच लागणार होती. इथून पुढे बोट, लाल समुद्र पार करून, येमेन देशातल्या ‘एडन’ बंदरात थांबणार होती. पुढचा थांबा होता कराची बंदराचा. या प्रवासात फोर्ट स्टायकीन सोबतीला, आणखी एक ब्रिटीश मालवाहू जहाज असणार होतं. बाकीची जहाजं इथेच थांबणार होती. एडनवरून कराची जवळपास ५०० मैलांवर होतं. ह्या प्रवासात काही विघ्न आलं नाही तर, हा प्रवास एकूण सहा-सात दिवसांचा होता.

पोर्ट तौफिक मध्ये इंधन घेऊन निघालेल्या फोर्ट स्टायकीनने, दिनांक २४ मार्चला एडनला स्पर्श केला. त्याच दिवशी तिने एडन सोडलं आणि ती कराचीच्या दिशेने निघाली. कराचीचा थांबा मोठा होता. फोर्ट स्टायकीन दोन-तीन दिवस कराची बंदरात थांबणार होती. बोटीमधलं बरचसं समान कराचीला उतरवण्यात येणार होतं.

३० मार्चला बोट कराची बंदरात पोहोचली. धक्क्यावारचे अधिकारी बोटीवर आले. बोटीत ठेवलेल्या सामानाचा आराखडा (Stowage Plan- बोटीमध्ये कोणतं समान कुठे ठेवलं आहे, ते दर्शवणारा आराखडा) त्यांनी तपासून, कराची बंदरात उतरवण्यात येणाऱ्या मालाची पडताळणी केली आणि धक्क्यावर उभ्या असलेल्या मजुरांना, समान उतरवून घेण्याचा इशारा केला.

कराची बंदर

मजुरांची टोळी कामाला लागली. इंग्लंडहून आलेले लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे लहान मोठे सुटे भाग उतरवण्यात आले. बोटीवरील दारुगोळा, स्फोटकं आणि सोनं वगळता, बाकी इतर सर्व समान कराची बंदरात उतरवण्यात आलं. बोट बरीचशी रिकामी झाली. चीफ इंजिनिअर अलेक्स गो, बोटीच्या इंजिनाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता, परंतु त्याला कराची बंदरातील अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. कारण काही कारणाने दुरुस्ती रखडली, तर ते चालण्यासारखं नव्हतं. बोटीतला दारुगोळा आणि सोनं मुंबईला वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. म्हणून बोटीच्या इंजिनाच्या देखभालीसाठी परवानगी देण्यास बंदर अधिकाऱ्यांनी नकार दिला होता.

बोटीवरील बरचसं समान उतरवून, धक्क्यावर उभ्या असलेल्या ट्रक्स आणि रेल्वेच्या वाघीणींमध्ये भरून युद्ध आघाडीवर रवानादेखील केलं गेलं. बोटीवरील जवळपास निम्म्याहून अधिक बोजा कमी झाल्यामुळे, कॅप्टन नायस्मिथ थोडा निश्चिंत झाला होता. वजन कमी झाल्याने, बोटीचा वेग वाढणार होता आणि मुंबईला लवकरात लवकर पोहोचता येणार होतं. अलेक्स गोला देखील मुंबईला कधी एकदा पोहोचतो आणि जहाजाचं इंजिन खोलून त्याची दुरुस्ती करतो, असं झालं होतं.

आता फक्त दीडहजार मैलांचा प्रवास शिल्लक होता आणि मग एकदम आराम. गेले पावणेदोन महिने समुद्रावर असलेले जहाजावरील खलाशी, अधिकारी आणि कर्मचारी मुंबईची वाट पाहत होते. त्याशिवाय त्यांची मोकळीक होणार नव्हती.

परंतु, ३० मार्चला कराची बंदरात पोहोचलेलं फोर्ट स्टायकीन, पुढचे तब्बल १० दिवस कराची बंदरातच होतं. इतके दिवस कराची बंदरात थांबावं लागण्यामागे एक कारण होतं आणि ते होतं, कार्चीत उतरवल्या गेलेल्या सामानामुळे, बोटीवर निर्माण झालेली मोकळी जागा.

बोटीवरचं बरचसं समान उतरवलं गेल्यामुळे, बोटीवर जवळपास ३ लाख घनफूट जागा मोकळी झाली होती. त्यामुळे मुंबईपर्यंतच्या प्रवासात बोटीचा वेग वाढून आपण लवकर मुंबईला पोहोचणार याचा सर्वाना आनंद होत होता. अर्थात प्रत्येकाच्या आनंदाची करणं वेगळी होती. कॅप्टन नायस्मिथ बोटीवर असलेली सोन्याच्या आणि मोठ्याप्रमाणावर असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याच्या जबाबदारीतून मोकळा होणार होता. चीफ इंजिनिअर अलेक्स बोटीच्या इंजिनाची दुरुस्ती आणि देखभाल निवांतपणे करता येईल म्हणून खुशीत होता. खलाशी ‘जीवाची मुंबई’ करता येईल म्हणून खुश होते. बोटीवर स्फोटके असल्याने, गेले पावणेदोन महिने त्यांना साधी सिगारेटही ओढता आली नव्हती. कप्तानाने सिगारेट आणि दारूवर सक्त बंदी घातली होती. मुंबईत पोहोचल्यावर त्यांना ते करता येणार होतं, म्हणून ते खुश होते. तिकडे रिझर्व बँकेचे अधिकारी सोन्याचा साठा येणार म्हणून खुश होणार होते, तर सैन्य अधिकारी त्यांना मोठ्याप्रमाणावर बंदुका, दारुगोळा आणि स्फोटकं, विमानांचे व जहाजांचे सुटे भाग मिळणार म्हणून ते खुश होणार होते. पण ही ख़ुशी फार काळ टिकणार नव्हती.

दिनांक ३ एप्रिलच्या सकाळी ९ वाजता, पुन्हा कराची बंदारावारचे अधिकारी बोटीवर पोहोचले आणि बोटीवर रिकाम्या झालेल्या जागेत आणखी काही समान लादून ते मुंबईला पाठवण्यात यायचं आहे, याची वर्दी त्यांनी कॅप्टन नायस्मिथला दिली. कप्तानाने हे ऐकताच, त्याचा आनंद कुठल्याकुठे गायब झाला. त्याची जागा संतापाने घेतली. इंग्लंडहून निघताना त्याला, कराची बंदरात नव्याने माल घ्यायचं आहे, हे कुणीच सांगितलं नव्हतं. त्याने त्याचा निषेध कराची बंदरातील अधिकाऱ्यांकडे नोंदवला आणि समान चढवून घेण्यास नकार दिला. परंतु त्याच्या विरोधाला न जुमानता, कराची बंदरातील अधिकाऱ्यांनी बोटीत माल चढवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरु असल्याने, कुठल्याही बोटीवरची एक फुट जागादेखील मोकळी जाऊ द्यायची नाही, अशी वरून आज्ञा असल्याचे आणि त्याचं पालन बोटीच्या काप्तनालाही करावे लागेल, असे नायस्मिथला सांगितले.

कॅप्टन नायस्मिथ संतापाने धुसमुसत असतानाच, बोटीतील रिकाम्या जागेत भरावयाच्या सामांच्या गाड्या धक्क्यावर येऊन उभ्या राहिला त्यातलं सामान बघून नायस्मिथ हतबुद्धच झाला. त्याच्या रागाची जागा, प्रथम चिडीने आणि नंतर असहाय्यतेने घेतली. तो काहीच करू शकत नव्हता. आता तो स्वतःवरच चिडला होता.

असं काय होतं त्या सामानात?

(क्रमश:)

-नितीन साळुंखे

९३२१८११०९१

salunkesnitin@gmail.com

*महत्वाची टीप-

या भागाच्या अगदी सुरुवातील जो ‘सिमला वेधशाळेचा’ उल्लेख आहे, ती वेध शाळा प्रत्यक्षात सिमला इथली नसून, पुणे इथली असावी. ‘पुणे वेधशाळा’ या नांवाने ती आपल्याला माहित आहे.

सिमला ही ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असल्याने, बऱ्याच सरकारी संस्था सिमला इथुनही कार्यरत होत्या. वेधशाळाही त्यापैकीच एक. ही वेधशाळा दिनांक २० जुलै १९२८ रोजी पुणे येथे हलवण्यात आली होती. ही वेधशाळा सिमल्याहून पुणे येथे हलवलेली असल्याने, तिला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हणत. किंबहुना ती सिमला ऑफिस या नांवानेच पुणेकरांना परिचित होती/आहे. स्फोट झाला त्या वेळी सिमला येथे वेधशाळा कार्यान्वित नव्हती.

सदरची माहिती लेख लिहिल्यानंतर माझ्या नजरेस आल्याने, मूळ लेखात न देता ‘महत्वाची टीप’ म्हणून देत आहे.

‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?


‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?

मुंबईच्या दक्षिण-मध्या विभागातील ‘माजगांव’ या भागाच्या नांवाच्या जन्माबद्दल माझ्या मनात सुरुवातीपासूनच कुतुहल होतं. हे नांव या विभागाला कसं प्राप्त झालं असावं, याचा मी मला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांच्या मदतीने, माझ्यापरिने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे नांव कसं पडलं त्या विषयी सध्या प्रचलित असलेल्या व्युत्पत्तींचाही या लेखात विचार केलेला आहे. नवीन व्युत्पत्ती मांडताना तर्काचा उपयोग केलेला आहे. त्यातून मला पटलेली नवीन व्युत्पत्ती आपल्यासमोर मांडलेली आहे. परंतु त्या विषयाकडे जाण्यापुर्वी, माजगांवच्या इतिहासातून एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे.

ह्या लेखात, वर म्हटल्याप्रमाणे, प्रथम माजगांवच्या इतिहासाची थोडक्यात उजळणी करुन, नंतर ते नांव कसं पडलं असावं, याची चर्चा केली आहे.

इतिहासातलं माजगांव दक्षिण मध्य मुंबईतलं एक महत्वाचं ठिकाण. एकेकाळी मुख्य मुंबई बेटाची उत्तर हद्द माजगांवला लागुनच होती. मध्ये फक्त उमरखाडीचं पात्र. आता ह्या ठिकाणी डोंगरी भाग असला तरी, त्या काळी हो माजगांवचाच भाग होता.

हळू हळू ह्या माजगांवचं महत्व कमी होऊ लागलं आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतले जुने मुंबैकर ‘वाडीया’तून अवतरले असले तरी, आद्य मुंबैकरांनी ‘भाऊच्या धक्या’वरून मुंबैत प्रवेश केला होता. भाऊचा धक्का आणि माजगांव म्हणजे आई-पोराचे नातं. भाऊच्या धक्क्याचा उंबरा ओलांडून पोटासाठी मुंबईत आलेल्या चाकरमान्यांनी पुढे मुंबैच्या औद्योगिक क्षेत्रात जान आणली आणि मुंबई देशाचं बडं औद्योगिक केंद्र बनवलं. ह्याचं बरचसं श्रेय माजगांवचं.

भाऊचा धक्का..

त्या काळात पैशाची निर्मिती ह्या भागात होत होती. ह्या संपत्ती निर्माणाचं मुख्या यंत्र होतं इथल्या गोद्या. मुख्य मुंबईच्या अगदी कुशीतला हा भाग गोद्यांचा. मुंबई शहरातल्या वाडी बंदर, फ्रिअर बंदर (लोकभाषेत ‘फेर बंदर’ ), प्रिन्सेस डॉक, विक्टोरिया डॉक, इत्यादी महत्वाच्या गोद्या अजूनही इथेच आहेत. देशाच्या काना-कोपऱ्यातून नाना तऱ्हेचा कच्चा माल मुंबईत यायचा, तो इथेच. आणि मुंबैतल्या गिरण्या-कारखान्यांचून पक्का होऊन पुन्हा परदेशी जायचा, तो ही इथुनच. मुंबईचा ‘माजगाव डॉक’ तर आपल्या नावातच ‘माजगांव’ मिरवतोय. एकेकाळी ह्या गोद्यांमध्ये जगभरातून माल इथे यायचा आणि मग तो मुंबईभर जायचा, मुंबई शहरची औद्योगिक चाकं फिरायची, ती इथून येणाऱ्या मालाच्या इंधनावर. तिथून पैशांची, संपत्तीची निर्मिती व्हायची. आज इथली आवक जावक मंदावलीय. एकेकाळी मुख्यत: गोदी आणि गिरणी कामगारांची वस्ती असलेला हा भाग आता हळूहळू उच्चभ्रू होऊ लागलाय.

माजगांव मला माहित होतं. तिकडे जाणं-येणंही होतं. तिथे अजुनही टिकून असलेल्या ‘म्हातारपाखाडी’ नावाच्या गांवात मी जाऊन आलो होतो. अजुनही सोळाव्या शतकातच थांबलेलं आहे, असं वाटायला लावणारं ते गांव, त्याच्या हद्दीत शिरताच आपल्यालाही त्या काळात आपसूकपणे घेऊन जातं. ताडवाडी, नारळवाडी, अंजीरवाडी, सिताफळवाडी अशी अस्तल देशी नांव धारण करणाऱ्या लहान-मोठ्या वाड्यांचं माजगांव, मुंबईसारख्या महानगराच्या पोटातलं एक शांत-सुंदर गांव होतं. होतं म्हणजे आता-आतापर्यंत होतं. आता विकासाच्या भस्मासूराची काळी छाया त्यावरही पडू लागलीय..!

म्हातारपाखाडी गांवातलं एक टुमदार घर

इतिहासाच्या पुस्तकात माजगांव मला पहिल्यांदा भेटलं ते, पोर्तुगिज आमदानीतील मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना. सन १५३३-३४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शाह यांने मुंबईची सात बेटं पोर्तुगिजांच्या ताब्यात दिली आणि तेंव्हापासून माजगांव मुंबईच्या इतिहासात सापडत जातं.

अर्थात त्यापुर्वीही माजगांव आता आहे तिथेच होतं, मात्र त्याचा उल्लेख सापडत नाही. १३ व्या शतकातल्या राजा बिंबाच्या काळातल्या ‘महिकावतीची बखरी’त माहिमचा उल्लेख आहे. परळचा आहे, भायखळ्याचा आहे आणि वाळकेश्वराचाही आहे, मात्र माजगांवचा नाही. त्यांनतर मुंबईवर असलेल्या मुसलमानी अंमलातही माजगांवचा उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो ठळकपणे येतो, तो पोर्तुगिज आणि त्यानंतरच्या ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या काळात..!

मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेलं इतिहासातलं माजगांव जेंव्हा पोर्तुगिजांच्या ताब्यात आलं, तेंव्हा ते होतं मात्र अत्यंत टुमदार. समुद्रात पाय सोडून बसलेल्या छोटेखानी टेकड्या, खडकाळ समुद्रकिनारा, आंब्यांची आणि नारळीची घनदाट झाडी असं त्याचं साधारण स्वरूप होतं. मुंबईच्या सातही बेटांवरचे मूळ रहिवासी जसे कोळी, तसे माजगांवचे मूळ रहिवासीही कोळीच. राजा बिंबासोबत आलेले काही भंडारी, आगरी, तर तुरळक प्रमाणात मुसलमान. मुख्य धंदा मासेमारी. थोडीशी भातशेती. आंब्या-नारळाची लागवड. माजगांवचे आंबे फार प्रसिद्ध होते असं म्हणतात. असंही म्हणतात की, एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर अशी वर्षातून दोनदा फळं देणारी आंब्यांची झाडं माजगांवात होती. अजुनही त्यातली काही टिकून असावीत.

पोर्तुगीजांच्या ताब्यात आलेल्या मुंबईच्या, कुलाब्याची दोन बेटं वगळता, पांचही बेटांवरची जमिन पोर्तुगीज राजाने, पोर्तुगीज कुटुंबांना, चर्चना अथवा सैन्यात विशेष मर्दुमकी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना वार्षिक अथवा त्रैवार्षिक भाडे पट्ट्याने दिलेली होती. तसंच माजगावबाबतही झालं होतं. मात्र मुंबईची इतर बेटं आणि माजगांवचं बेट, यात दोन मोठे फरक होते. पहिला म्हणजे इतर बेटांवरची जमीन अनेक जणांमध्ये विभागून भाड्याने दिली होती. तर माजगावचं संपूर्ण बेटच सन १५४७-४८ मधे कॅप्टन अंतोनिओ पेसो (Antonio Pessoa) या सैन्याधिकाऱ्याला भाड्याने दिलेलं होत. दुसरा फरक म्हणजे, इतर बेटांवरच्या जमिनी सारखी माजगांव बेटाची भाडेपट्टी वार्षिक अथवा ठराविक मुदतीची नसून, ती वंशपरंपरागत मालकीने अंतोनिओ पेसो ला दिलेली होती. संपूर्ण बेटच वंशपरंपरागत भाड्याने दिलेलं मुंबईतलं माजगाव हे एकमेंव बेट.

अंतोनिओ पेसोने या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्याच्या आवारात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या दैनिक पूजेसाठी लहानसं ‘चॅपल’ बांधलं. सण १५४८ पासूनचा पुढच्या काळात माजगांवात असलेल्या कोळी, भंडारी आणि आगरी लोकांबरोबरच इथे पोर्तुगिजांचीही भर पडली. ते संख्येने फार नव्हते, पण ‘ख्रिश्चन’ होते. राज्यकर्ते असल्यामुळे त्यांची हुकूमत बेटावर चालत होती. इथे असलेल्या स्थानिक कोळी-भंडारी आणि आगरी यांचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचं काम या काळात सुरू झालं. माजगवतल्या त्या काळातल्या प्रजेवर हळूहळू पोर्तुगीज प्रभाव वाढू लागला. राज्यकर्त्यांचा प्रभाव प्रजेच्या सर्वच अंगावर पडतो. तसा तो हळूहळू इथेही पडला. धर्मांतरं घडली, धर्म बदलल्याने इथल्या रहिवाशांना नवीन पोर्तुगीज पद्धतीची नावं -आडनावं मिळाली. तिथल्या मूळ रहिवाशांच्या खाण्यात आणि पेहेरावातही त्या अनुषंगाने बदल झाला, क्रॉस-चर्च उभी राहू लागली.

‘ख्रिश्चनां’ची संख्या जशी वाढू लागली, तशी पेसोच्या घराच्या आवारातलं चॅपल पूजेसाठी अपुरं पडू लागलं. म्हणून त्या ठिकाणी सन १५९६ मध्ये चर्च बांधण्यात आलं. १५४८ मध्ये बांधलेलं चॅपल आणि त्याच जागी १५९६ मध्ये बांधलेलं चर्च म्हणजे, आज भायखळ्याला दिसणाऱ्या ‘सेंट ग्लोरिया चर्च’चं मूळ स्थान. सन १९११-१२ च्या दरम्यान भायखळ्याला सध्या दिसणाऱ्या जागी ‘सेंट ग्लोरिया चर्चचं स्थानांतर झालं त्यालाही १०० वर्ष होऊन गेलीत.

माजगांवचं मूळ ग्लोरिया चर्च..
भायखळ्याचं ग्लोरीया चर्च

मूळच्या चॅपलची जागा १९१० मध्ये पोर्ट ट्रस्टने ताब्यात घेतली आणि त्या जागेवर १९२४ साली ठिकाणी ‘अँडरसन हाऊस’ नांवाचं पोर्ट ट्रस्ट अधिकाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात आली. आजही ही इमारत तिथे उभी आहे. तिच्या सोबतीला ‘सागर-दर्शन’, ‘सागरिका’ आणि तृष्णा १ व २ अशा इमारती कालांतराने बांधल्या गेल्या. अंतोनिओ पेसोने बांधलेल्या चॅपलमधला ‘क्रॉस’ सध्या, ‘अँडरसन हाऊस’पासून जवळच असलेल्या ‘चर्च स्ट्रीट’ या रस्त्यावर उभा आहे. हा क्रॉस १९२६ साली या ठिकाणी हलवला गेला.

मुंबईच्या इतर बेटांच्या तुलनेत माजगावचा इतिहास फार मोठा आहे. इतका मोठा आणि महत्वाचा आहे की, १९७६ साली आणल्या गेलेल्या ‘दी बोंबे सीटी लँड रेव्हेन्यू अॅक्ट’ मध्ये ‘माजगाव इस्टेट’ आणि तिची वंशपरंपरागत मालकी यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलेलं आहे. या मोठ्या इतिहासाचा संपूर्ण आढावा या लेखात घेता येणं शक्य नाही आणि या लेखाचा तो उद्देशही नाही.

इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर, ‘माजगांव’ हे नांव या बेटाला/भागाला कसं प्राप्त झालं असावं, ते सांगणं आहे. आता तिकडे वळू.

या भागाला ‘माजगांव’ नांव कसं मिळालं, त्याबद्दल दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पहिली म्हणजे, इथे मिळणाऱ्या विपूल माश्यांमुळे या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ म्हणत आणि या मत्स्य ग्राम शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे ‘मच्छ ग्राम’, ‘मासे गांव’ आणि शेवटी ‘माजगांव’ असं नांव रुढ झालं, ही..!

दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते, ती म्हणजे ‘माझं गांव’ या शब्दप्रयोगापासून या बेटाला ‘माजगांव’ हे नांव पडलं. वर वर पाहाता या दोन्ही व्युत्पत्ती पटण्यासारख्या आहेत आणि त्या जनमाणसात रुढही झाल्या आहेत. मात्र थोढा अधिक विचार केला असता, त्या तेवढ्याशा बरोबर नाहीत, असं लक्षात येते. मला असं का वाटतं, ते एक एक करुन सांगतो.

पहिली व्युत्पत्ती सांगते की, या बेटावर मासे मुबलक मिळत किंवा हा कोळ्यांचा गांव म्हणून या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ म्हणत आणि तेच नांव कालांतराने ‘माजगांव’ म्हणून प्रचलित झालं. ही व्युत्पत्ती विचारांती पटण्यासारखी नाही. कारण मुंबईच्या सर्वच बेटांवर मूळ वस्ती कोळ्यांचीच होती आणि मुख्य धंदा मासेमारी होता. मग त्या बेटांनाही ‘मत्स्य ग्राम’ किंवा तत्सम नांव न पडता मुंबई, परळ, माहिम, वरळी अशी वेगवेगळी नांव का पडली, ह्याचं उत्तर सापडत नाही.

ही व्युत्पत्ती न पटण्याचं दुसरं कारण म्हणजे, कोणत्याही ठिकाणाला नांव कशावरुनही प्राप्त होवो, ते असतं तिथल्या रहिवाशांच्या भाषेतलं किंवा बोलीतलं. मग ते त्या ठिकाणच्या एखाद्या वैशिष्ट्यावरून पडलेलं असो किंवा आणखी कशावरुनही. ‘मत्स्य ग्राम’ हा शब्द संस्कृत. माजगांवातली मूळ वस्ती जर कोळ्यांची असेल (आणि ती होतीच) तर ते संस्कृत कसं बोलत असतील, हा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणच्या कोळ्यांची स्वतःची अशी बोली आहे. आजही ती बोली बोलली जाते. मग त्यांनी स्वतःच्या गांवाला स्वतःच्या भाषेतला शब्द न योजता, त्यांना ज्या भाषेचा गंधही नाही, त्या भाषेतला शब्द आपल्या गांवाला का दिला असावा, असाही प्रश्न उभा राहातो.

बरं, अन्य कुणी या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ असा शब्द दिला असं गृहित धरलं तर, मग कुणी, असाही प्रश्न निर्माण होतो. संस्कृत ही शिक्षित लोकांची भाषा आणि १३ व्या शतकात जे शिक्षित लोक राजा बिंबासोबत माहिमला आले, त्यांची वस्ती होती ती मुख्यत्वे माहीम आणि परळ बेटावर. या बेटांवरही कोळी आणि मासेमारी होतीच. मग या बेटांना त्यांनी ‘मत्स्य ग्राम’ असं नांव का दिलं नाही, या प्रश्नाचंही उत्तर मिळत नाही.

माहिमचा राजा बिंबाची कथा सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या पुस्तकात परळचा उल्लेख आहे. भायखळ्याचा आहे. वाळकेश्वरचा आहे. साष्टीतल्या वांद्र्याचा आहे. जुहू-वेसाव्याचाही आहे. मात्र माजगांवचा नाही. नाही म्हणायला या बखरीत मुंबई, ठाणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील एकूण ३९६ गांवांची नावं दिली आहेत, त्यात २६३ व्या क्रमांकावर ‘माजगांव’चा उल्लेख आहे. पण ते माजगांव नेमकं कुठलं, ते दिलेलं नाही.

वरच्या परिच्छेदात ‘ते माजगांव नेमकं कुठलं’ असं जे म्हटलंय, त्वामागे कारण आहे. कारण महाराष्ट्रात ‘माजगांव’ नांव धारण करणारी एकूण ‘चार गांवं आहेत. सातारा जिल्ह्यातल्या चाफळ नजिक एक माजगांव आहे. , कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात दुसरं माजगांव आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातही एक माजगांव आहे. रत्नागिरी जिल्हा-तालुका यातंही एक माजगांव आहे. महिकावतीच्या बखरीत उल्लेख केलेलं माजगांव, हे मुंबईतलं की या चार गावापैकी, ते नक्की करता येत नाही.

‘माजगांव’ हे नांव ‘मत्स्य ग्राम’ या शब्दापासून आलं, असं क्षणभर गृहित धरलं तर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांतील तीनही ‘माजगांवां’चा समुद्राशी आणि म्हणून त्यात मिळणाऱ्या मासळीशी दुरान्वयेही संबंध नाही. मग ती नांवं कशी काय पडली, या प्रश्नावर निरुत्तर व्हावं लागतं. नाही म्हणायला रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘माजगांवा’ला संशयाचा फायदा देता येईल. पण तिथेही ‘मत्स्य ग्राम’ ते ‘माजगांव’ हा प्रवास पटत नाही. सबब, मुंबईतल्या माजगा्वचं नांव ‘मत्स्य ग्राम’ या शब्दापासून आलंय, हे मला पटत नाही.

माजगांव या नावाबद्दल दुसरी व्युत्पत्ती समोर येते ती, ‘माझं गांव’ या शब्दाची. पण हे अजिबातच पटण्यासारखं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापला गांव प्रिय असतो आणि दर वेळी आपण आपल्या गांवाचा उल्लेख ‘माझं गांव’ असाच करत असतो. म्हणून काही आपल्या गांवाचं नांव ‘माझ गांव’ असं होत नाही. त्यामुळे ह्या व्युत्पत्तीकडे समशेल दुर्लक्ष करणं योग्य..!

मुंबईतल्या ‘माजगांव’ हे नांव कसं प्राप्त झालं असावं, याचा शोध घेताना, ते नक्कीच ‘मत्स्य ग्राम’, ‘माझा गांव’ या शब्दांवरून आलेलं नसून, त्यामा काही तरी वेगळी गोष्ट वा गोष्टी कारणीभूत आल्या असाव्यात याबद्दल माझी खात्री पटत चालली, ती मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या वाचनामुळे.

मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांतून ‘माजगांव’चा उल्लेख यायला सुरुवात होते, ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरु झाला त्या काळापासून. म्हणजे सन १५३४ पासून मुंबईच्या इतिहासात माजगांव ठळकणे येत जातं. ह्या बहुतेक सर्वच पुस्तकांचं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं असल्याने, ती अर्थातच, इंग्रजी भाषेतलू आहेत. त्या पैकी एखाद-दुसऱ्या पुस्तकाता अपवाद वगळता, इतर साऱ्या पुस्तकांतून ‘माजगाव’ या शब्दाची स्पेलिंग, ‘MAZAGON ( मराठी उच्चार माझागॉन, माझागोन, माझगोन असे होऊ शकतात)’ अशी केली गेलेली आहे. ही पुस्तकं वाचताना, त्यात आलेल्या ‘माजगांव’च्या स्पेलिंगकडे सुरुवातीला माझं लक्ष गेलं नाही. ती सवयीने मी ‘माझगाव’ किंवा ‘माजगाव’ अशीच वाचत होतो. पण पुढे पुढे ही स्पेलिंग माझं लक्ष वेधून घेऊ लागली.

सुरुवातीला ही स्पेलिंगची चूक असावी असा वाटत होतं. पण जेंव्हा माझ्या वाचनात १९१४ साली डी. आर. वैद्य यांनी लिहिलेलं ‘दी बोंबे सीटी लँड रेव्हेन्यू अक्ट’ हे १८७६ साली आणल्या गेलेल्या जमीन महसूल कायद्यावरचं पुस्तक आलं, आणि त्या पुस्तकातला माजगावचा उल्लेख ‘MAZAGON’ असा केलेला दिसला, तेंव्हा मात्र माझं कुतूहल अधिक जागृत झालं. इतर पुस्तकातलं ठिक आहे. तिथे चूक झालेली असू शकते आणि पुढे त्या चुकीची पुनरावृत्तीही झालेली असू शकते. पण हे पुस्तक कायद्याचं आहे. त्यातली माहिती अधिकृत आहे आणि म्हणून ती गांभीर्याने घ्यायला हवी आहे. कायद्याचं पुस्तक लिहिताना, अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून, प्रत्येक शब्दाची काटेकोरपणे तपासणी आणि योजना केली जाते. ह्या पुस्तकातही ‘माजगांव’ची स्पेलिंग MAZAGON अशी केलेली पाहून, मला त्या स्पेलिंगमधेच ‘माजगांव’ या नावाचं उगमस्थान असावं असं वाटू लागलं आणि मी त्या दृष्टीने विचार करू लागलो.

अधिकची खात्री करावी म्हणून मी भारत सरकारच्या ‘माजगाव डॉक लिमिटेड’ या उक्रमाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि माजगांव शब्दाची स्पेलिंग तिथे तशी केली आहे, ते तपासलं. तर तिथेही MAZAGON हिच स्पेलिंग आढळली. ही भारत सरकारची संस्था आहे. तिच्या नावातही अशी चूक असूच शकत नाही. ‘माजगाव’ या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल गूढ वाढतच चाललं. म्हणून वरच्या दोन उदाहरणातील MAZAGON ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, हे इंटरनेटच्या माध्यमातून शोधायला सुरुवात केली.

आणि जसजसा मी हो शोध घेत गेलो, तसतसा mazagon ह्या शब्दाचा उगम आणि त्याचा पोर्तुगीजांशी असलेला घट्ट संबंधही उलगडत गेला. असा संबंध असणं अगदीच शक्य होतं. कारण पोर्तुगिजांची आपल्यावर काही काळ सत्ता होती. राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पेहेरावाचा, खाद्य संस्कृतिचा प्रभाव प्रेजेवर पडतच असतो. नवीन वसाहत केल्यास, त्या वसाहतीस आपली नांवं देणं किंवा तिकडची जुनी नांवं बदलून आपल्या भाषेतील वा संस्कृतितील नांव देणं, हे जगभरात घडत आलंय. उत्तरेत मुघल सत्तेचा प्रभाव तिकडच्या शहरा-गांवांच्या नांवावर पडलेला आपल्याला दिसतो. आपल्या शेजारच्या गोव्याच्या भाषेवरही पोर्तुगिज संस्कृतीचा प्रभाव आपल्याला आजंही जाणवतो. गोव्यातलं ‘वास्को’ शहराचं नांव पोर्तुगिजांनीच ठेवलेलं आहे. तसाच Mazagon या ‘माजगांव’च्या नांवावरही पोर्तुगिजांशी असलेला संबंध मला शोधाअंती उलगडत गेला.

हा संबंध पाहण्यासाठी आपल्याला आफ्रिका खंडाकडे मोर्चा वळवावा लागेल. उत्तर आफ्रिकेत मोरोक्को नावाचा एक देश आहे. ह्या देशाच्या उत्तर-पश्चिम भागात एक प्रदेश आहे. हा प्रदेश मुळचा ‘बर्बेर (Berber)’ नामक तिथल्या जमातींचा. तिकडचे आदिवासीच ते. त्या जमातींना ‘बर्बर’ हे नांव ग्रीकांनी बहाल केलेलं होतं. बर्बर या शब्दाचा साधारण अर्थ ‘जे ग्रीक नाहीत ते’ किंवा ‘Non Greek’ असा होतो. कोणत्याही आदिवासींप्रमाणे, ह्या बर्बरच्याही अनेक टोळ्या होत्या आणि त्यापैकी प्रत्येकाला वेगळी नावही होती.ग्रीकांच्या प्रभावामुळे त्यांचा सामुहीक उल्लेख ‘बर्बर’ असा केला जाई. आपण नाही का आपल्या देशातल्या दक्षिणेकडच्या राज्यांतील लोकांचा सरसकट उल्लेख ‘मद्रासी’ म्हणून करतो, तसा. ग्रीकांप्रमाणे इतर काही परकीय लोकांनीही ह्या बर्बरना वेगवेगळी नांवं दिलेली होती. त्यापैकी Amazigh, Mazyes, Maxyes, Mazaces, Mazax ही त्यापैकी काही. ह्या परदेशी प्रभावाखाली येऊन बर्बर लोकही स्वतः:चा उल्लेख Imazighen किंवा Mazigh असा करीत. बर्बर असो वा वर दिलेली चार-पांच नांवं असोत, त्याचा अर्थ ‘आदिवासी’ किंवा ‘मूळ निवासी’ असा आपण घेऊ.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी, म्हणजे साधारण १५०२ मध्ये युरोपातील पोर्तुगीज दर्यावर्दी जेंव्हा व्यापारासाठी नवीन भुमीच्या शोधात भारताच्या दिशेने निघाले होते, तेंव्हा त्यांनी त्यांना वाटेत लागलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशातील पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशावर आपला पहिला कब्जा केला. इथे राहणाऱ्या आणि स्वतःचा उल्लेख Imazighen असा करणाऱ्या बर्बराची भुमी त्यांनी ताब्यात घेतली हे लोक आपल्या स्वतःची ओळख Maziyen किंवा Mazighen अशी करुन देतात, हे लक्षात घेऊन त्या जागेचं नामकरण पोर्तुगिजांनी Mazighen असे केलं. हे नांव लिहितांना मात्र Mazagan, Mazagao असं केलं.

एखाद्या जागेच्या प्रत्यक्ष नांवात आणि ते नांव लिहिण्यात परतीयांकडून फरक पडतच असतो. नांवाचा उच्चार ऐकण्यात झालेल्या फरकामुळे लिखाणात बदलतो. आपल्याकडचं ‘शिव’चं नाही का पोरंतुगिजांनी ‘सायन’ केलं. पुढे सायन म्हणूनच प्रचलीत झालं, ते आजतागायत तसंच आहे. तसलाच हा प्रकार उत्तर आफ्रिकेतही घडला आणि जगाच्या नकाशावर पहिलं ‘Mazagao’ किंवा ‘Mazagan’ अवतरलं ते पुढची २६७ वर्ष टिकलं. पोर्तुगीज भाषेत Mazagao किंवा Mazagan या शब्दाचा स्वीकारला गेलेला अर्थ म्हणजे, बार्बाराची किंवा मूळ निवासींची भूमी.

या प्रदेशावर पोर्तुगिजांनी सन १७६९ पर्यंत, म्हणजे साधारण २६७ वर्ष राज्य केलं. सन १७६९ मधे ही पोर्तुगिज वसाहत मोरोक्कोचा सुलतान मोहोम्मद बिन अब्देल्ला (Mohommad Bin Abdallah ) ह्यांने पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतल्यावर, ह्या शहरचे नांव ‘Al Jadida” असे करण्यात आले. तोवर, म्हणजे तब्बल २६७ वर्ष तो भाग Mazagao किंवा Mazagan म्हणून ओळखला जात होता.

खरी गंमत पुढेच आहे. १७६९ मध्ये मोरोक्कोतून झालेल्या हकालपट्टीनंतर पोर्तुगीजांनी, शेजारीच खाली दक्षिणेस असलेल्या ब्राझीलची किनारपट्टी जवळ केली आणि तिथल्या अमेझॉन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर आपली नवीन वसाहत थाटली. त्यांनी या नवीन वसाहतीचं नांव ठेवलं ‘Nova de Mazagao’. म्हणजे ‘नवीन माझगाव’. आहे ना गंमत? ब्राझीलच्या ‘अमापा (Amapa)’ या राज्यात हे शहर आहे. आपण ते नकाशावर पाहू शकता.

मधल्या मोरोक्कोमधे आपली वसाहत थाटल्यानंतर, पोर्तुगीजांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे गोवा, कालिकत असे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर, इसवी सन १५३४ मधे मुंबईची बेटं त्यांच्या ताब्यात आली. ह्

या सात बेटांपैकी आकाराने वरळीच्या बेटाखालोखाल असलेलं माजगाव बेट, माहीमच्यासोबतीने त्यांचं मोठं प्रभाव क्षेत्र बनलं. ह्या छोटेखानी बेटावरचे मूळ निवासी कोळी, भंडारी, आगरी लोक पाहून, त्यांना मोरोक्कोच्या Maziyen किंवा Mazighen लोकांसोबत साम्य जाणवलं असावं आणि म्हणून त्यांच्या समजुतीप्रमाणे ह्या बेटालाही त्यांनी Mazagan, Mazagao. फक्त या शब्दातला ‘a’ जाऊन कधीतरी त्याजागी ‘o’ आला असावा आणि त्यातून Mazagon शब्द तयार झाला असावा. तोच शब्द पुढे मुंबईवरच्या इंग्रजी पुस्तकांतून कायम झाला असावा आणि मराठीत तो ‘माझगांव’ म्हणून आला असावा.

‘माजगांव डॉक’ मधला ‘Mazagon’ काय किंवा आपण लिहित असलेला ‘Mazagao (माजगांव)’ काय, दोघांचाही अर्थ एकच, इथल्या मूळ लोकांचा प्रदेश..!

मोरोक्को, मुंबई आणि ब्राझील या तिन्ही ठिकाणची, समुद्राच्या सानिध्यात वसलेली, शहरं किंवा ठिकाणं ‘माझगाव’ या एकाच नांवाची असावीत, हे त्या नांवांचा आणि पोर्तुगिजांचा असलेला संबंध दाखवीत नाहीत काय?

मुंबईच्या ‘माझगांव’चं नांव अशा पद्धतीने पोर्तुगिजांकडून बहाल केलं गेलेलं असून, त्या नावाचा आणि संस्कृत ‘मत्स्य ग्राम’ किंवा ‘मच्छ गाम’ किंवा ‘माझा गांव’ या शब्दाशी काहीच संबंध नाही, असं मला वाटतं.

©️नितीन साळुंखे

9321811091

19.03.2022

महत्वाच्या टीप-

1. माजगांवचं नांव जर पोर्तुगीजांनी दिलं असेल तर, मग मुंबईच्या इतर बेटांवरही त्यांचं राज्य होत. मग त्या बेतानं त्यांनी आपली नावं का दिली नाहीत, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि तो पडायलाच हवा. या प्रश्नाचंही समाधानकारक उत्तर देता येतं..!

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या सात बेटांपैकी मुंबई, माहीम आणि माजगांव अशा फक्त तीन बेटांवर पोर्तुगिजांचा जास्त वावर होता. त्यातल्या माजगांवच्या नांवाची कथा आपण वर पहिलीच आहे.

दुसरं महत्वाचं बेट होतं माहीम. माहिममधेच त्यांनी १५३३-३४ मध्ये बांधलेलं, मुंबईतलं सर्वात पाहिलं ‘सेंट मायकेल’ चर्च आहे. मोहीमच नांव न बदलण्यामागे किंवा माहीमला त्यांचं नाव न देण्यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे, माहीम हे इसवी सनाच्या तेरा-चोदाव्या शतकापासूनच प्रस्थापित झालेलं नांव होत.

राजा बिंबाची तर माहीम ही राजधानीच होती. त्यानंतर आलेल्या मुसलमानी राजवटीतही माहीम महत्वाचं ठिकाण होतं. हिंदू कालखंडातलं ‘श्रीप्रभादेवी’ मंदिर आणि त्यानंतरच्या मुसलमान राजवटीतला ‘माहीमचा दर्गा’ ह्या त्या प्राचीन राजवटींच्या खुणा आहेत. आजही त्या पाहाता येतात. पूर्वीपासून प्रस्थापित असलेल्याठिकाणाचं नांव बदलण्याचं किंवा नव्याने आपलं नांव देण्याचं काहीच कारण नव्हतं.

तिसरं बेट म्हणजे मुख्य मुंबई बेट. मुंबईचं मुंबईचं मराठीतलं ‘मुंबई’ हे नांव मुंबईची ग्रामदेवता ‘श्रीमुंबादेवी’च्या नांवावरुन आलं असलं तरी, तिचं जुनं इंग्रजी नांव ‘Bombay’ ही पोर्तुगीजांची देणगी आहे, हे एव्हाना सर्वमान्य झालेलं आहे.

मुंबईच्या सुरक्षित बंदराकडे पाहूनत्यांनी ह्या बेटाला ‘Bom Baia’ असं त्यांच्या भाषेत म्हटलं. पोर्तुगीज भाषेत ‘Bom’ म्हणजे ‘उत्तम’ आणि ‘Baia’ म्हणजे ‘बे’ किंवा ‘खाडी’ किंवा ‘बंदर’.माजगांवप्रमाणे Bombay हे नांव देखील पोर्तुगीजांनी दिलेलं आहे.

2. लेखात उल्लेख असलेल्या अंतोनिओ पेसो या माजगांवच्या जमिनदारांच्या वंशवृक्षाची एक फांदी आजही आहे आणि ती आपल्या मुळांचा विविध बाजुने शोध घेत असते. त्यांच्या शोधकार्याची माहिती जिज्ञासूंना Miguel of Mazagon: A merchant from 18th-century Bombay who negotiated an Anglo-Portuguese deal या ठिकाणी वाचायला मिळू शकेल.

3. ‘Berbers’, मोरोक्को आणि ब्राझिल या दोन देशातल्या ‘Mazagao’ बाबत पुष्कळ माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आपण ती जरूर वाचावी.

4. आता यातून एक नवीन प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील ‘माजगांव’ नांवाची ती तीन-चार गांव आहेत, ती कशावरुन आली? मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर तिकडे जाऊनच शोधावं लागेल..प्रत्येक ‘माजगांव’ची व्युत्पत्ती वेगळी असू शकते.

संदर्भ – 

1. Gazetter of Bombay City & Island, Volume II, Section History;Portuguese Period- S.M. Edwards- Published in 1909-

2. Origin of Bombay- 1900- J. Garsan Da Kunha.

3. Bombay Mission History; with a special Study of the Padroado Question.-by BY ERNEST R. HULL, S. J.(Society of Jesus).

4. Bombay in the Days of Queen Anne, Being an Account of the Settlement- by John Burnell

5. Website- History of Gloria Church.

6. विशेष आभार- श्री. डेनिस बाप्टीस्टा, म्हातारपाखाडी-माजगांव आणि श्री. विद्याधर राणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट.

‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने..

‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

‘मुलाच्या जडणघडणीत आईचं स्थान काय?’ असा प्रश्न जर का कुणी मला विचारला, तर विचारणाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय, अशी शंका आपल्याला येईल. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे, ज्या मुलाचं अस्तित्वच जिच्यामुळे शक्य झालं, तिचं त्या मुलाच्या जडणघडणीत स्थान काय हा प्रश्नच मुर्खपणाचा आहे असं आपल्याला वाटलं तर त्यात नवल नाही..।

आई नसती तर मुलंही नसतं, एवढं हे सरळ आहे. जडणघडण हा जन्माला आल्यानंतरचा विषय आहे. जन्म महत्वाचा. तो देणारी स्त्रीच असते. जडणघडण हा नंतरचा विषय. त्यातही स्त्रीचा वाटा मोठा.

कोणत्याही जीवनात्राच्या बाबतीत हे जेवढं सत्य आहे, तेवढंच ‘मुंबई शहरा’च्या बाबतीतही सत्य आहे, असं मी म्हटलं तर पटेल तुम्हाला?

नाही ना?

मग हा लेख वाचा. अगदी शेवटपर्यंत वाचा आणि मग ठरवा.

‘मुंबईच्या जडणघडणीत महिलांचे योगदान’ या विषयावर जेंव्हा मला लेख लिहावासा वाटला, तेंव्हा नेमकं काय लिहावं, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आणि त्याहीपेक्षा गहन प्रश उभा राहिला, तो म्हणजे, कोणत्या काळातील महिलांच्या योगदानावर लिहावं हा..! या पैकी कोणत्या काळातील महिलांच्या योगदानावर लिहावं, ह्या प्रश्नच उत्तर सापडलं की मग काय लिहावं हा प्रश्न आपोआप सुटतो.

मुंबई शहराची काय किंवा आपली काय, जडण-घडण हा विषय इतिहासाशी संबंधित. त्यात आपल्या सर्वसामान्यांचं इतिहासच ज्ञान आणि त्याची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरु होते आणि १९४७ साली प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीपाशी येऊन संपते. या काळाच्या अगेमागेही इतिहास घडलेला असतो, हे माझ्यासहित बहुसंख्य लोकांच्या लक्षातही येत नाही. अर्थात, छत्रपतींचा कार्यकाल ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातही अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. इतिहासाने त्यांची नोंदही घेतली आहे आणि त्यांच्यापैकी अनेकजणींविषयी आपल्याला माहितीही असते. परंतु त्या सर्व महिलांच्या कर्तुत्वाच्या केंद्रस्थानी, केवळ ‘मुंबई’ अशी कुठेही नसते. आणि मला तर फक्त मुंबई शहरा आणि महिला यांच्यातल्या ‘आई-मुला’सारख्या नात्यावर लिहायचं आहे. म्हणजे माझ्या लिखाणात येणाऱ्या इतिहासाचा काळ, छत्रपतींच्या अगोदरचा काही काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा बराचसा काळ येणार हे ओघानेच येतं. कारण मुंबई जगाला माहित होऊ लागली, ती या कालावधीतच. म्हणून माझ्या लिखाणासाठी कालनिश्चिती झाली, आणि काय लिहावं हा माझ्यासमोर उभा ठाकलेला प्रश्न सुटला.

मुंबई शहर आणि त्याच्या घडणीत महिलांचं योगदान या विषयावर लिहायला सुरुवात करताना, मी विचारात घेतलेला काळ १६६० ते १९६०, असा तीनशे वर्षाचा आहे. त्यातही ताजी घटना प्रथम आणि जुन्या घटना नंतर, अशा पद्धतीने लिहिणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचला, तरच महिला आणि मुंबई शहर, यांचं आई-मुलाचं नातं समजून येईल..!

मुंबईच्या इतिहासातली तुलनेने ताजी घटना मला आठवते, ती म्हणजे, १९५५ ते १९६०च्या दरम्यानचा ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’. हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील जनतेने दिला, पण या लढ्यात मुंबईतील सामान्य महिलांनी जो पुढाकार घेतला होता, त्याला इतिहासात तोड नाही..

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. परंतु, सत्ताधाऱ्यांशी होणारा महाराष्ट्राचा संघर्ष काही संपला नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या काही काळात देशाने भाषावार प्रांतरचना स्वीकारली. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला अन्याय आला. गोवा, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर इत्यादी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील, परंतु, मराठी भाषक जनता बहुसंख्येने असलेले प्रदेश, कर्नाटकच्या हवाली करण्यात आले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आणि पैसेवाल्या शेठजींना मुंबई नामक दुभती गाय आपल्या दावणीला बांधलेली हवी होती. आणि या कारणासाठी मुंबई महाराष्ट्राला नाकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. प्रथन गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करुन त्यांचं एकच द्विभाषिक राज्य करावं असा प्रस्ताव आला. नंतर मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवून, गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या ‘त्रिराज्य योजने’च्या प्रस्तावाचं घोडं पुढे दामटण्यात आलं. पुढे तर मुंबई केंद्रशासित करण्याच्या हालचाली दिल्ली दरबारी सुरु झाल्या. काही झालं तरी मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, असा चंगच दिल्लीश्वरांनी बांधला होता.

मुंबई ज्यांने आपल्या रक्ता-मांसानं घडवली होती, तो कामगार, जो गोऱ्या राज्यकर्त्यांशी दोन हात करताना घाबरला नव्हता, तो कामगार आता ‘संयुक्त महाराष्ट्र कृति समिती’च्या नेतृत्वाखाली आपल्याच सरकारविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या समितीचं नेतृत्व सेनापती बापट, एस.ए. डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी नेते करत होते आणि त्यांच्या जोडीला शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील यांची रक्त सळसवणाऱ्या बुलंद ललकाऱ्या मुंबईच्या गल्ल्या आणि महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत घुमू लागल्या होत्या..! नेत्यांची भाषणं आणि शाहीरांच्या तेज वाणीने, मुंबई आणि महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती पेटून उठली होती. त्यात पुरुष होतेच, पण स्त्रियाही मागे नव्हत्या..!!

दिनांक १६ जानेवारी १९५६ ला पंतप्रधान पंडित नेहरूंनी केंद्रशासित करण्याचा निर्णय आकाशवाणीवरून ऐकवला आणि त्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत सर्वत्र लोक रस्त्यावर उतरू लागले. मुंबईत बंद पाळला गेला. दादर, नायगाव, पोयबावडी(परळ), लालबाग, डिलाईल रोड, घोडपदेव, माझगांव इथला अवघा गिरणगाव आणि त्याच्या दक्षिणेकडच्या गिरगावमधले विद्यार्थी, कामगार, तरुण-वृद्ध, पुरुष आणि स्त्रियाही रस्त्यावर उतरल्या. महत्वाच्या नेत्यांची सरकारने धरपकड केली होती. लोक रस्त्यावरून हटेनात म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले. एक आठवडाभर हा पोलिसी अत्याचार मुंबईत सुरु होता. केवळ मुंबईच नाही तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, कारवार इकडेही लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या आठवडाभराच्या कालावधीत ७४ लोक गोळ्या लागून ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकूण १०६ लोक (काही ठिकाणी १०५, तर काही ठिकाणी १०७ असा उल्लेख येतो) हुतात्मा झाले.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

साधारणत: सन १९५४ ते १९६० अशी पांच-सहा वर्ष चाललेल्या या लढ्याला बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, श्रीपाद.डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील इत्यादींसारख्या कणखर नेत्यांच नेतृत्व लाभलं होत. त्यांना साथ होती शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील इत्यादी पहाडी आवाजाच्या शाहिरांची. एस.जी सरदेसाई, के. एन. जोगळेकर, गुलाबराव गणाचार्य, नाना पाटील, एस. जी. पाटकर. कृष्णा देसाई, दिनू रणदिवे, अशोक पडबिद्री इत्यादीही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची खिंड लढवत होते. इथपर्यंत हा सर्व पुरुषी लढा वाटतो.

पण तसं नव्हतं. या आंदोलनातला सर्वसामान्य आणि गरीब घरातील स्त्रियांचा सहभाग खूप मोठा होता आणि तो सुरुवातीपासूनच होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतलेल्या तारा रेड्डी, प्रमिला दंडवतेंच्या, कुसुम रणदिवे, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर इत्यादी रणरागीणीनी तर प्रसिद्धच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, तुलनेनं कमी माहित असलेल्या, मालती नगरकर, बायजी पाटील, यामिनी चौधरी, पार्वतीबाई भोर, इंदुताई कुळकर्णी, गिरीजा कदम, मनोरमा हंगल इत्यादीसारख्या इतरही मध्यमवर्गीय महिला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढल्या होत्या.

या व्यतिरिक्त, सर्वात कमाल केली होती, ती गिरगांव आणि गिरणगावातल्या सामान्य गृहिणीनी. गरीब, मध्यमवर्गातून आलेल्या या महिलानी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असामान्य धैर्य दाखवले होते. यांच्या नावांची नोंद इतिहासात असेल, नसेल. नसण्याचीच शक्यता जास्त. त्या नावासाठी लढल्या नव्हत्याच मुळी. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती काही झाल तरी महाराष्ट्राचीच राहील, या ध्येयाने ला अनामिक लढवय्या स्त्रिया लढ्यात उतरल्या होत्या. “निघाले मराठे वीर, संयुक्त महाराष्ट्राच्या वेडात..त्यांना देण्यास साथ, उतरल्या विरांगना मैदानात”, ही उक्ती अक्षरक्ष: त्या जगत होत्या. गिरगांव-गिरणगावातली प्रत्येक चाळ हा किल्ला बनला होता इथे केवळ त्यांची साथ नव्हती, तर मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यातील, चाळी चाळीतील किल्ले हा महिला जातीने लढल्या होत्या.. दादर-नायगावपासून ते थेट भायखळा-गिरगांवपर्यंतची एक एक चाळ समितीचा किल्ला बनली होती.

नायगावची इस्माइल बिल्डिंग, करी रोडची हाजी कासम चाळ, काळाचौकीतल्या चाळी, लालबागची गणेश गल्ली, काळेवाडी, आंबेवाडी, दाभोळकर अड्डा, कोंबडी गल्ली, बोगद्याची चाळ, गॅस कंपनी लेन अशी किती नावे सांगणार? येथून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची लढ्याची सूत्रे हलत होती.

१६ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान सरकारने केलेल्या गोळीबारात, विशेषत:, लालबाग परळच्या ‘लक्ष्मी कॉटेज’ व ‘कृष्णनगर’च्या महिलांनी आपल्या असामन्य धैर्याने आणि शौर्याने स्त्री-शक्तीची जाणीव करून दिली. या चाळींना गराडा घालून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला, लाठीचार्ज केला. स्त्रिया व मुले खोल्यांमध्ये बेशुद्ध पडू लागली. समोर स्त्री आहे की पुरुष, हे न पाहाता, पोलीस दंडुका चालवू लागले. यावेळी स्त्रिया तान्ह्या मुलांना कडेवर घेऊन बाहेर आल्या. पोलिसांना त्यांनी घेरले. ‘भेकडांनो असे कोंडून काय मारता, असे उघड्यावर मारा, आम्ही मुंबईसह महाराष्ट्रासाठी मरायला तयार आहोत’, असं म्हणत त्या पोलिसांचं कडं तोडून पुढे होऊ लागल्या. पोलिसांनी वेढा अधिकच आवळला. पण शेवटी त्या महिलांच्या हिमतीपुढे पोलिसांचा नाइलाज झाला. त्यांना कारवाई थांबवावी लागली. पोलिसांनी निघून जावे लागले.

शेवटी लोकांच्या मागणीपुढे सरकार झुकले. दिनांक १ मे १९६० या दिवशी, १०६ जणाच्या बलिदानाने बेळगाव, कारवर, निपाणी वगळून परंतु, मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई महाराष्ट्राची राहिली. महाराष्ट्राची राजधानी झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात या महिलांची कामगिरी कायम लक्षात राहील, अशी झाली. मुंबई शहरासाठी आणि पर्यायाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी, महिलांनी दिलेले हे अलीकडच्या इतिहासातील अमुल्य योगदान. मुंबई महाराष्ट्राची झाली, त्यात या स्त्रियांचा वाटा खूप मोठा आहे..!

हुतात्मा स्मारक

चर्चगेटच्या ‘हुताद्मा स्मारका’वर शेतकरी आणि कामगार असे दोन पुतळे आहेत. त्या जोडीला शेतकरीन आणि कामगारनीचे पुतळे असाचला हरकत नव्हती, असं आपलं मला वाटतं.

आता थोडं मागे जाऊ. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपूर्वी, मुंबई शहरातील कामगारांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता, तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात. आणि त्यांना तेवढीच समर्थ साथ लाभली होती, ती सर्वसामान्य स्त्रियांची..!

देशाच्या स्वातंत्र्यसाठी संपूर्ण देशातीलच जनतेने लढा दिला होता. प्रसंगी प्राणांचं बलिदानही दिलं होतं. परंतु, ब्रिटिशांच्या राजसत्तेला शेवटचा मोठा आणि निर्णायक धक्का दिला तो महात्मा गांधींनी. तो ही मुंबईतून. दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ह्या दिवशी, मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानातून ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ हे दोन स्फूर्तिदायक मंत्र स्वातंत्र्य लढ्याला दिले आणि अख्खा देश पेटून उठला. ह्या लढ्याचा केंद्रबिंदू मुंबई शहर होता. संपूर्ण देशातून कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकांचे थवेच्या थवे मुंबईत येऊ लागले होते. ग्रांट रोडचं ‘काँग्रेस हाऊस’ देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी फुलून गेलं होत. राहायची कोणतीही सोय नाही. पण, त्याची पर्वा होती कुणाला..! लोक मिळेल तिथे आपली पथारी टाकत होते. रोज नविन कार्यकर्ते सामील होत होते. जिथे राहायची काहीच सोय नाही, तिथे ह्या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याचे काय होत असेल, ह्याची कल्पनाच केलेली बरी. पण त्याचीही तमा होती कुणाला..!

अश्या वेळी मुंबईकर गृहिणी पुढे आल्या. चाळीतील, आणि ऐश्वर्यसंपन्न बंगल्यांतुनही अन्नपूर्णा मदतीला धावल्या. लालबाग-परळ भागातून मराठमोळ्या बायका पदर खोचून पुढे आल्या. मलबार हिल वरील उच्चभ्रू पारशींनी आणि भाटिया गुजराती बायका धावून आल्या. त्यांच्यातळे जात-पात, पंथ-धर्म-भाषा, गरीब-श्रीमंत हे सारे भेद आपोआप गाळून पडले. आता त्या फक्त माता होत्या. भरणं पोषण करणाऱ्या भारतमातेचं प्रतिकच जणू..! या माऊलींनी काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला. मशीद बंदरातून गाड्या भरभरून आटा, तांदूळ, साखर, गहू इत्यादी धान्य येऊन पडू लागलं. भायखळ्याच्या भाजी बाजारातून भाज्यांच्या गाड्याच्या गाड्या भरून येऊ लागल्या. कुणाला किंमत चुकवण्याचा किंवा विनंती करण्याची गरजच पडली नाही. सारी माणसे ‘चले जाव’ ह्या मंत्राने झपाटलेली होती.

‘चले जाव’ आंदोलनात निघालेला महिलांचा प्रचंड मोर्चा

काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघरात २४ तास चूल धगधगत होती. कानात हिऱ्याच्या कुडी घालणाऱ्या श्रीमंत पारशी मेहेरबाई, गुजराती कमलबेन, यांच्यासोबत, गिरगाव-गिरणगावातल्या कमलाबाई, सखुबाई आणि साळुबाई मांडीला मांडी लावून पोळ्या लाटत होत्या. अगणित कार्यकर्त्यांच्या स्वयंपाकाचा घाणा दिवसरात्र चालवत होत्या. उष्ट्या-खरकट्या भांड्यांचा रगाडा उचलत होत्या. सर्व भेदभाव गळून पडले होते. केवळ स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य ह्याच एकमेव ध्येयाने सर्व झपाटले होते होते. सैनिक लढत असले तरी त्यांच्या पोटाला घालणाऱ्या ह्या स्त्रियांची नोंद इतिहासात कितपत आहे कुणास ठाऊक. नसण्याचीच शक्यता जास्त..! मुंबई शहरातल्या स्त्रियांनी, अगदी मुंबईसाठी नसलं तरी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं हे अनामिक योगदान..!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्या स्वातंत्र्यासाठी देशभरातील स्त्री-पुरुषांनी आपलं योगदान दिलं. अनेकांनी बलिदानही केलं. त्या खेचून आणलेल्या स्वातंत्र्यात, मुंबई शहरातील या अनामिक स्त्रियांचंही अल्पसं का होईना, पण योगदान आहे..! रामसेतूतलं खारीचं महत्व नजरेआड कसं करता येईल?

आता आणखी थोडं मागे जाऊ. आणखी मागे म्हणजे, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जवळपास १०२ वर्ष मागे. या कथेच्या नायिका आहेत, पारशी समाजात जन्मलेल्या श्रीमती आवाबई जमशेटजी जीजीभाई..!

पारशी समजात जन्मलेल्या बहुतेक सर्व स्त्री-पुरुषांनी मुंबई शहराच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलेलं आहे. तरीही लेडी जमशेटजीं या पारशी महिलेचं महत्व थोडं वेगळं आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याच्या आधाराने, वांद्र्यापासून पुढे दहिसरपर्यंत वसत गेलेल्या, पश्चिम उपनगरांच्या जन्माला, लेडी आवाबई जमशेटजी त्यांच्याही नकळत कारणीभूत झालेल्या आहेत.माहिम हे मुंबईचं शेवटचं बेट आणि साष्टीतलं पहिलं बेट वांद्रे यांना एकमेकापासून माहिमची खाडी विभागत होती. आजही विभागते आहे. पण त्याकाळातलं खाडीचं पात्र आजच्या तुलनेत जास्त रुंद आणि खोल होतं. या दोन्ही ठिकाणच्या लोकांना, दोन्ही बेटांमधे ये-जा करण्यासाठी पूर्वी लहान होड्या वापरल्या जात. एरवी ही वाहतूक सुरळीत चालत असे, पण पावसाळ्यात मात्र परिस्थिती कठीण होत असे. आधीच मुंबईचा पाऊस आणि त्यात उधाणलेला समुद्र यामुळे ही खाडी ओलांडणाऱ्या बोटींना अपघात होऊन मनुष्य आणि जनावरांची हानी होणं हे ठरलेलंच असे. इथे पुल बांधण्याची लोकांची अनेक वर्षांची मागणी असुनही सरकार तिकडे दुर्लक्ष करत होतं. पुरेसा निधी नसल्याची कारणं देत होतं.

अशावेळीच आवाबाई यांना दरवर्षीच्या पावसाळ्यात नाहक होणारी मनुष्यबानी सहन न होऊन, माहिमच्या खाडीवर स्वखर्चाने पुल बांधण्यास त्या तयार असल्याचा प्रस्ताव सरकारला दिला. आवाबाईंशी चर्चा करुन सरकारने तसा पुल बांधण्याची मान्यता दिली आणि आवाबाईंनी १८४३ मधे मधे तो पुल बांधायला सुरुवात केली.

आवाबाईंनी स्वखर्चाने बांधलेला पुल, माहिम कॉजवे’, ८ एप्रिल, १८४५ रोजी लोकांसाठी खुला झाला. आता लोकांना वर्षभरातल्या कोणत्याही मोसमात माहिमची खाडी ओलांडून ये-जा करणं सोपं आणि सुरक्षित झालं. मनुष्यहानी थांबली.

माहिम कॉजवे

तत्पुर्वी सन १८०५ साली, सायन या मुंबई शहराच्या शेवटच्या ठिकाणाला साष्टीतल्या कुर्ल्याला जोडणारा ‘सायन कॉजवे’ तयार होऊन वापरातही आला होता. हा रस्ता त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर सर जोनाथन डंकन यांच्या प्रयत्नातून बांधला गेला होता. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ त्या रस्त्याचे नांव ‘डंकन कॉजवे’ असं देण्यात आलं होतं. माहिम कॉजवे बांधण्याच्या ४० वर्ष अगोदर हा रस्ता बांधल्यामुळे, कुर्ल्यापासून पुढची उपनगरं तेंव्हाच वसली होती. तिथला व्यापार उदीम, लोकवस्ती वाढू लागली होता. पुढच्या काळात साष्टीतील कुर्ल्यापासूनची पुढची ठिकाणं, मुंबईची पूर्व उपनगरं म्हणून ओळखली जाऊ लागली.

तसाच प्रकार आवाबाईंनी बांधलेल्या माहिमच्या कॉजवेमुळे झाला. त्यांनी माहिमच्या खाडीवर पूल बांधल्याने, लोकांना ये-जा करण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध झाला. लोकांची रहदारी वाढली आणि त्यामुळे वांद्र्यापासून पुढे हळहळू लोकवस्तीही वाढू लागली. व्यापार वाढू लागला. मुंबईची पश्चिम उपनगरं जन्मास येऊ लागली. वांद्रे, खार, सांताक्रुझ व पुढच्या परिसरातील वस्ती हळूहळू वाढू लागली..!

पारशी समाजाने जवळपास मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. परंतु आवाबाईंच्या कार्याचं वैषिष्ट्य म्हणजे, मुंबई शहराच्या पश्चिम उपनगराच्या वाढीसाठी, त्या नकळत कारणीभूत झाल्या. म्हणून त्यांनी मुंबई शहारतसाठी दिलेल्या या योगदानाचा विशेष उल्लेख या लेखात करणं मला आवश्यक वाटलं..!

आता या लेखाचा महत्वाचा भाग सुरु होतो. इतका महत्वाचा की, ही स्त्री नसती तर, कदाचित वर उल्लेख केलेल्या, सन १९५६ ते १९६० च्या दरम्यानचं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, त्या अगोदरचा सन १८५७ ते १९४७ हा ९० वर्षाचा भारताचा स्वातंत्र्य लढा, सन १८४५ चा आवाबाईचा ‘माहिम कॉजवे’ इत्यादी घटना घडल्याच नसत्या. मुळात मुंबई, आजच्या मुंबईसारखी झाली असती, की तिचं दुसरंच काहीतरी अधिक चांगलं किंवा अधिक वाईट घडलं असतं, हे सांगता येणं अवघड असलं तरी, तिचं आजचं स्वरुप मात्र निश्चितच दिसलं नसतॅ, एवढं मात्र नक्की सांगता येईल..!

ह्या स्त्रीया रुपाने, आताच्या ठाणे जिल्ह्यातील, वसई प्रांताचा, कुणाच्याही फारश्या खिजगणतीत नसलेला एक ओसाड, दुय्यम भुभाग असलेल्या मुंबईचं भाग्य फळफळलं. तिच्या निमित्ताने उजेडात आलेली मुंबई, पुढच्या दोन-अडिचशे वर्षात जगातील आघाडीच्या शहरांपैकी एक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आली.

कोण होती ही स्त्री..? आपली उत्सुकता फार न ताणता, प्रथम तिचं नांव सांगतो..!

ती होती कॅथरीन ब्रॅगान्झा. इन्फन्टा ऑफ पोर्तुगाल. अर्थात, पोर्तुगालचा राजा चौथ्या जॉनची कन्या. पोर्तुगालची राजकन्या आणि इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्ल्सची पत्नी:क्वीन ऑफ इंग्लंड..!!

कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा; क्वीन ऑफ इंग्लंड

मुळात मुंबई हे दुर्लक्षित बेट, शहर म्हणून इतिहासात पुढे येत, तेच १६६० साला नंतर. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांचा विवाह ठरतो. दिनांक २३ जून १६६१ मधे या दोघांच्या विवाहाचा करार होतो आणि त्या करारानुसार, मुंबई बेट आणि बंदर (Port and Island of Bombay) आंदण म्हणून इंग्लंडच्या ताब्यात देण्याचं ठरतं आणि त्याच क्षणी एक ओसाड बेट असलेल्या मुंबईचं भाग्य बदलण्याची सुरुवात होऊ लागते. जागतिक पटलावर मुंबईची ओळख होण्याचे सुप्त संकेत मिळू लागतात..!

कॅथरीन आणि चार्ल्सच लग्न होताना, मुंबई व इतर सहा बेटं पोर्तुगीज साम्राजाच्या हिस्सा होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीज अंमल सुरु झाला तो साधारण १५०५ च्या आसपास. १५३४ सालात मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात आली, पण त्या पूर्वीच त्यांचं बस्तान बसलं होतं, ते मुख्यतः वसईच्या परिसरात. वसई हे पोर्तुगीजांच्या प्रशासकीय आणि लष्करी कारभाराच मुख्य ठाणं होतं. मुंबई द्विप-कल्पातल्या सात बेटांपैकी, माहिम हे बेट वसईतल्या पोर्तुगिजांचं दुय्यम, परंतु महत्वाचं बेट होतं आणि या माहिमची मुंबई एक ‘डिपेन्डन्सी’ होती. बंदर म्हणून मुंबई उत्तम होती, हे पोर्तुगिजही जाणत होते. म्हणून तर त्यांनी, उत्तम नैसर्गिक बंदर असलेल्या ‘मुंबई’ या एकाच बेटाला, ‘Bom Baia’, म्हणजे उत्तम खाडी किंवा Bay असं नांव दिलं होतं. या नांवाचा पुढे अपभ्रंश होत, मुंबईचं नांव Bombay असं स्थिर झाल (मुंबादेवीवरुन प्राप्त झालेलं ‘मुंबई’ हे नांव आणि पोर्तुगिजांनी दिलेलं ‘बॉम बेईआ’ ह्या नांवात साधर्म्य असणं, हा योगायोगच..!). पण तरीही त्यांनी मुंबई बेटाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं. किंबहुना माहीम वगळता मुंबई व इतर पाच बेट, ही पोर्तुगीजांच्या दृष्टीने फारशी महत्वाची नव्हती.

जन्मजात उत्कृष्ट नाविक असलेल्या पोर्तुगिजांना मुंबई बंदरातं महत्व पुरेपूर समजलं होतं असलं तरी, त्यांचा व्यापार उदीम आणि राज्य वसई परिसरात सामावलेलं असल्यानं, त्यांचं मुंबई द्विपसमुहाकडे तसं दुर्लक्षच होत होतं. इथली सर्वच बेटांवरील जमिनी त्यांनी विविध पोर्तुगिज कुटुंबांना भाड्याने दिली होती. या लोकांनीच आपापल्या बेटांचं संरक्षण करण्याची अटं त्यांनी या भाडेकरुना घातली होती. त्यामुळेही असेल कदाचित, पोर्तुगिज सत्तेकडून मुंबई व तिची इतर सहा बेटं, इतकी दुर्लक्षित राहिली होती की, मुंबईच्या किल्ल्यावर, सन १६२६ च्या ऑक्टोबर महिन्यात, दिनांक १३ ते १५ असे तीन दिवस ब्रिटीश आणि डचांनी केलेल्या एकत्रित हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीही पोर्तुगिज सैनिक तिथे उपलब्ध नव्हता. सतत तीन दिवस ब्रिटिश आणि डचांनी मुंबई बेटावर लुटालुट आणि जाळपोळ करत अनिर्बंध धुमाकूळ घातला होता.

या हल्ल्यादरम्यानच पोर्तुगिजांनी फार लक्ष न दिलेलं मुंबई बेट आणि बंदर ब्रिटिशांच्या, विशेषतः ईस्ट इंडीया कंपनीच्या, नजरेत भरलं होतं. हे सुरक्षित बंदर काही करुन आपल्या ताब्यात असायला हवं, असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांनी त्या दिशेने खूप प्रयत्नही सुरू केले. अगदी नगद मोजून पैसे मोजून मुंबई आणि इतर सहा बेटं विकत घ्यायचीही तयारी दर्शवली, पण चतुर पोर्तुगिज त्यांना दाद देत नव्हते. परंतु शेवटी पोर्तुगाल आणि इंग्लंड यां दोन्ही देशांची परिस्थितीने अशी काही असहाय्यता निर्माण केली की, दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज भासू लागली आणि त्यातूनच सन १६६० मध्ये ब्रिटीश राजपुत्र-प्रिन्स ऑफ वेल्स-दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगिज राजकन्या कॅथरीन ब्रॅगान्झा यांचा विवाह करण्याचा घाट घातला गेला. या विवाहात पोर्तुगिजांकडून चार्ल्सला हुंडा म्हणून ५ लाखाची पोर्तुगिज चलनातली रोख रक्कम ( ही रक्कम काही पुस्तकातून वेगवेगळी दिलेली आहे), आफ्रिका खंडातल्या मोरोक्को या देशातलं ‘टॅंजिअर’ हे शहर आणि ‘मुंबई’ बेट देण्याचं ठरलं. या बदल्यात ब्रिटिशांनी पोर्तुगिजांना डचांविरुद्धच्या लढाईत सहाय्य करावं, अशा अटी असलेला कॅथरीन-चार्ल्सच्या विवाहाचा करार -Marriage Treaty – दिनांक २३ जून १६६१ रोजी करण्यात आला.

इंग्लंड आणि पोर्तुगीजांमध्ये झालेल्या विवाहाच्या करारनुसार, दिनांक २१ मे १६६२ या दिवशी चार्ल्स आणि कॅथरीन या दोघांचा इंग्लंडमध्ये विवाह संपन्न झाला आणि करारानुसार दिनांक १८ फेब्रुवारी १८६५ या दिवशी मुंबई ब्रिटिशांची झाली (अर्थात, पोर्तुगिजांनी मुंबई सहजासहजी ब्रिटिशांच्या ताब्यात दिली नाही. करार झाल्यापासून पुढची तब्बल चार वर्ष पोर्तुगिजांनी मुंबई ताब्यात देण्यासाठी ब्रिटिशांना झुंजवलं होतं) आणि इथून पुढे आज दिसणाऱ्या अत्याधुनिक मुंबईची पायाभरणी होण्यास सुरुवात झाली.

पुढच्या तीनच वर्षात, म्हणजे दिनांक २७ मार्च १६६८ रोजी, इंग्लंडचा राजा चार्ल्स याने मुंबई ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीला भाड्याने दिली. आणि पुढच्या काहीच काळात मुंबईत ब्रिटीश कायद्यानुसारचं प्रशासन आणि न्यायव्यवस्था सुरु झाली. गोदी सुरू केली. जमिनिंचं व्यवस्था लावली. टांकसाळ सुरु केली. ईस्ट इंडीया कंपनीची सुरतेतली वखार मुघल, पोर्तुगिज यांच्या सुरतेतल्या वावरामुळे असुरक्षित वाटू लागली होती. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील छाप्यामुळे त्या असुरक्षेत आणखीणच भर पडली. पुढच्या काळात आपलं हित आणि व्यापार सुरतेत धोक्यात येऊ शकतो असा विचार करुन, सन १६८७ मधे ईस्ट इंडीया कंपनीने आपले सुरतेचे मुख्यालय मुंबई इथे हलवलं. आणि पुढच्या काही दशकातच मुंबईचा प्रवास ब्रिटिश साम्राज्याची पूर्व्कडील राजधानी होण्याच्या दिशेने सुरु झाला.

ब्रिटिशांनी मुंबईच्या फोर्ट विभागाची आखणी, त्यांची राजधानी म्हणूनच केली होती. तिथल्या भव्य-देखण्या इमारती, लांब-रुंद रस्ते व फुटपाथ, रस्त्याच्या कडेची झाडं असं सार काही त्यामुळेच निर्माण झालं होतं. आपण अजुनही त्याचा उपभोग घेतो आहोत. मुंबईची ओळख म्हणून ‘गेट वे ऑफ इंडीया’चं चित्र आजदेखील दाखवलं जातं. हे गेट केवळ मुंबईत प्रवेशाचच प्रतिक नाही;तर भारत देशाकडे जायचाही तो मार्ग आहे, याचंही ते प्रतिक आहे. देशाच्या पोटात शिरायचा या इवल्याश्या मुंबैमधून जातो आणि त्यासाठी कारणीभूत ठरली ती, कॅथरीन..! कॅथरीन, द इन्फन्टा ऑफ पोर्कुगाल..!

म्हणूनच, मुंबई शहराच्या इतिहासातली कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा एकमेंव महत्वाची महिला. ‘एकमेंव महत्वाची महिला’ असं म्हणण्याचं कारण इतकंच की, जर तिचा विवाह ब्रिटिश राजाशी झालाच नसता, तर मुंबईची बेटं ब्रिटिशांकडे आलीच नसती आणि तशी ती आलीच नसती आणि ती तशी आलीच नसती तर..? तर कदाचित आजच्या स्वरुपातली, देशाची लक्ष्मी आणि मुंबैकरांची अन्नपूर्णा असलेली आपली मुंबई उदयाला आलीच नसती..!

मुंबईच्या बाबतीत कॅथरीनचं महत्व म्हणजे, तिच्या लग्नात तिचा हुंडा म्हणून मुंबईप्रमाणेच मोरोक्कोमधलं ‘टॅजिअर’ हे ठिकाणही पोर्तुगिजांकडून ब्रिटिशांना देण्यात आलं होतं. परंतु पुढे काही काळतच त्यांना हे बेट सोडून द्यावं लागलं होतं. तिच्या लग्नात पाच लाख क्रुसेडोंची रोख रक्कमही देण्याचं ठेरलं होतं. मात्र ती ही रक्कम पूर्ण दिली गेली नाही. पैशांच्या चणचणीत असलेल्या कॅथरीनच्या नवऱ्याला, म्हणजे दुसऱ्या चार्ल्सला लग्नानंतर काहीच काळात, त्यांच्या ताब्यात असलेलं ‘डंकर्क’ हे सुप्रसिद्ध ठिकाण फ्रेन्चांना विकावं लागलं होतं. म्हणून इंग्लंडमधे कॅथरीन-चार्ल्सच्या लग्नानंतरच्या काही काळातच, लंडनकरांनी हेटाळणीच्या सुरात, ‘Three sights to be seen Dunkirk, Tangier, and a Barren Queene’ अशा अक्षरात रंगवलेली कमान लावली होती.

यातला Barren Queen हे शब्द, कॅथरीनने हुंड्यात आणलेल्या इतर दोन गोष्टी ब्रिटिशांना मिळाल्याच नाहीत आणि मिळालेलं मुंबई हे ओसाड बेट होतं. म्हणजे राणीने कागदावर भरभक्कम हुंडा आणला असं दिसत असलं तरी, प्रत्यक्षात हातात काहीच मिळालं नव्हतं. या अर्थाने आले आहेत. म्हणून ती बॅरन क्वीन.

परंतु बॅरन क्वीन म्हणून प्रथम हेटाळलं गेलेलं ‘पोर्ट ॲंड आयलंड ऑफ बॉम्बे’ हे एकमेंव ठिकाण मात्र ब्रिटिशांकडे टिकून राहिलं. नुसतं टिकूनच राहिलं नाही, तर ते प्रथम ब्रिटिशांना आणि नंतर आपल्याला फळलं. त्याने दोघांनाही भरभरून दिलं. अजुनही देते आहे..!

कॅथरीनला उद्देशून लिहिलेले गेलेले बॅरन क्वीन हे शब्द, दुर्दैवाने भविष्यातही खरे ठरले. तीच वैयाक्स्तिक आयुष्य तेवढं सुखकर नव्हत. नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा, पोटी धरलेला गर्भ न टिकण ही तिची दु:ख होती. तिचे चार गर्भपात झाले. ती ब्रिटनच्या गादीला वारस देऊ शकली नाही..नवरा चार्ल्सच्या निधानंतर ती माहेरी पोर्तुगालला निघून गेली आणि तिथेच तिचा अंत झाला.

‘लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते’ ह्या बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळीसारखी, ‘आजच्या मुंबईसाठी, कॅथरीन सासरी गेली’ असं वाटावं अशी तिच्या ‘प्रेम विरहीत’ लग्नाची (होय. हे एक loveless marriage किंवा ‘राजकीय तडजोड’ होती.) कहाणी आहे. त्यामुळे, ‘मुंबईसाठी महिलांचं योगदान काय’, या प्रश्नाचं उत्तर, मुंबई उजेडात आली, तिच मुळी एका महिलेमुळे. असं असताना मुंबईतलं महिलांचं योगदान काय, हा प्रश्नच मला फिजूल वाटतो..!

आणि हो, एक गंम्मत सांगायचीच राहिली. आजचं आपलं लोकप्रिय पेय  ‘चहा’ हे प्रथम मुंबईत आणण्यासाठी आणि नंतर मुंबैसाहित देशभरात लोकप्रिय होण्यासाठी कॅथरीनच कारणीभूत झालेली आहे..!

कॅथरीन सोबतच तिला समकालीन असलेल्या आणखी एका स्त्रीचा उल्लेख मला टाळता येणार नाही. ती म्हणजे ‘दोना इग्नेस डी मिरांडा’ ही..! ही डोम रोड्रीगो डी मोन्सोन्टो याची विधवा. मोन्सोन्टो याचं निधन झाल्यावर, मुंबई बेट ही त्याची ‘प्रोपार्ती इग्नेस्च्या नांवे झाली. मालमत्तेच्या मालकीच्या कागदपत्रात इग्नेसचा उल्लेख, ‘लेडी ऑफ द आयलंड (Senhora da Illha) असा केलेला होता.

हिचं महत्व तसं काहीसं दुय्यम असलं तरी, महत्वाचं आहे. ही स्त्री तशी दुर्लक्षितच राहीली आहे. हिच्याविषयी फारशी माहितीही मिळत नाही. माझ्या दृष्टीने हिचं महत्व म्हणजे, पोर्तुगिजांची मुंब ब्रिटिशांच्या ताब्यात गेली, ती हिच्या साक्षीने आणि हिच्याच घरात. ही संपूर्ण मुंबई बेटाची त्या वेळची वंशपरंपरागत मालकीण होती आणि तिचं राहातं घर म्हणजे, मुंबईचा सुप्रसिद्ध ‘फोर्ट’. किल्ला. बॉम्बे कॅसल..!

दिनांक १८ फेब्रुवारी १६६५ रोजी दोना इग्नेस मिरांडा यांच्या या घरात, मुंबई बेटं पोर्तुगिजांकडून इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा समारंभ झाला(ह्या घराला इथे घर जरी म्हटलं असलं तरी, १६६१ मधे मस्कतच्या अरबांनी, मुंबई बेटावर केलेल्या हल्ल्यात हे घर उध्वस्त झालं होतं. नंतरच्या काळातही याची फार दुरुस्ती केली गेली नव्हती. वर छप्पर असलेल्या चार पडक्या भिंती, त्या भिंतीवरच्या चार जुनाट तोफा आणि खालची जमिन एवढाच ऐवज उरला होता). ‘मुंबई आता ब्रिटिशांची झाली’ याचं प्रतिक म्हणून, याच घराच्या आवारातले दगड आणि माती पोर्तुगिज अधिकाऱ्यांनी, मुंबईचा नवनियुक्त ब्रिटिश गव्हर्नर हंफ्रे कूकच्या हातात ठेवली.इग्नेस मिरांडाच्या त्या जुनाट घराचंच रुपांत पुढे ब्रिटिशांनी त्यांच्या जगप्रसिद्ध किल्ल्यात-फोर्टमधे-केलं. आज त्या फोर्टचे काही अवशेष, एशियाटीक लायब्ररीच्या मागच्या बाजूच शिल्ल्क आहेत. परंतु, तो भाग नौसेनेच्या ताब्यात असल्याने, ते कुणाला पाहाता येत नाहीत. असं असलं तरी, ‘फोर्ट, मुंबई ४००००१’ या त्या परिसराच्या पत्त्यात अजुनही अस्तित्वात आहे.

दोना इग्नेस मिरांडा यांचा उल्लेख करण्याचं कारण एवढंच की, मुंबई बेट आणि त्यावरचं मिरांडा बाईंचं घर ताब्यात घेण्यापुर्वी, पोर्तुगिजांनी ते घर तिच्या इच्छे विरुद्ध ताब्यात घेऊ नये अशी अट घातली होती. तिच्या मृत्युपर्यंत सदरचं घर तिच्या ताब्यात राहील आणि तिच्या पश्चात तिच्या वारसांकडून ते घर, त्या वारसांची इच्छा असल्यास, त्यांना योग्य तो मोबदला देऊनच ताब्यात घ्यावं, असंही त्या अटीत म्हटलं होतं. परंतु मिरांडाबांईंनी फारसे आढेनेढे न घेता किल्ल्यावरील आणि मुंबई बेटावरील आपला अधिकार आणि ताबा, ब्रिटिशांनी जो मोबदला दिला, त्या बदल्यात सोडून दिला.

हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे, मुंबईच्या इतर चार बेटांवरच्या नागरिकांनी, मुंबईची बेटं, पोर्तुगिजांकडून इंग्रजांकडे जाण्यास जितका कडवा विरोध केला होता, तितका मिरांडाबाईंनी केलेला दिसत नाही. तत्कालीन मुंबईकरांच्या त्या विरोधाची कारणंही होती आणि ती त्यांच्या आणि त्या काळाच्या दृष्टीने बरोबरही होती. मात्र प्रस्तुत लेखाचा तो विषय नसल्याने, त्यावर उहापोह करणं स्थानोचित होणार नाही..।

जर मिरांडाबाईंचं घर ब्रिटिशांना ताब्यात मिळालंच नसतं तर, मुंबईचा सुप्रसिद्ध ‘फोर्ट’ अन्यत्रच कुठेतरी उभा राहिला असता आणि कदाचित मुंबईच्या इतिहासाला वेगळंच वळण मिळालं असतं..! शेवटी स्थानमहात्म्यही असतंच की..!!

येताना थोडंसं वेगळं. स्त्री शक्ती बाबतचं . विशेषतः श्रद्धावान मुंबैकरांसाठी..!

ह्या लेखाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत उल्लेख केलेल्या स्त्रिया, त्यांच्या नांवांची इतिहासात नोंद असेल किंवा नसेल, प्रत्यक्षात होऊन गेलेल्या आहेत. या पुढच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या स्त्री शक्ती मात्र अजुनही अस्तित्वात आहेत, असं प्रत्येक श्रद्द्धावान मुंबईकरांना वाटतं. त्यांच्या मनात त्यांना असीम श्रद्धेचं स्थान आहे. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय, मुंबईच्या जडण घडणीत महिलांचं स्थान काय’ ह्या लेखाला पूर्णत्व येणार नाही.

असं मानतात की, समुद्राने वेढलेल्या या बेटांवर, किनारपट्टीच्या आधाराने पहिली वस्ती झाली, ती मासेमारी करुन उदर निर्वाह करणाऱ्या कोळ्यांची. मुंबईच्या सात बेटांमधलं, आकाराने मोठ असलेल बेट म्हणजे ‘मुंबई’. या मुंबई बेटावर वस्ती केलेल्या कोळ्यांचं दैवत असलेल्या ‘मुंबादेवी’वरून ‘मुंबई हे नांव प्राप्त झालं, अशी बहुसंख्य मुबैकरांची श्रद्धा आहे..!

श्रीमुंबादेवी

अतिशय प्राचिन असलेलं मुंबादेवी हे दैवत, समस्त मुंबईकरांचं ग्रामदैवत आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात तिच्या नांवाची ओटी आवर्जून भरली जाते. लग्न झाल्यानंतर मुंबईकर नवीन जोडपं मुंबादेवीच दर्शन घेतंच घेतं. मुंबादेवी मुंबईची रक्षणकर्ती आहे, पोषणकर्ती आहे, अशी बहुसंख्य मुंबईकरांची श्रद्धा आहे.

महाराष्टार्तील प्रत्येक ठिकाणी एकेका दैवताची सत्ता असते. तशी मुंबईवर सत्ता चालते, ती श्रीमुंबादेवीची. मुंबादेवी ही मुंबईची सम्राज्ञी. तिने तिच्या, महालक्ष्मी, प्रभादेवी, शितलादेवी या इतर बहिणींना, प्रत्येक बेटावर आणि बेटवासियांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी इलाखे वाटून दिले आहेत. महालक्ष्मीची हद्द प्रभादेवीला संपते आणि प्रभादेवीची हद्द शितलादेविला..!

या व्यतिरिक्त या चौघा बहिणींनी, त्यांच्या आणखी धाकट्या बहिणींना लहान लहान इलाखे वाटून दिले आहेत. त्यात काळबादेवी, वाळकेश्वरची गुंडीदेवी, गिरगावातली गांवदेवी, वरळी कोळीवाड्याची गोलफादेवी इत्यादी. स्त्री कुळात जन्म घेतलेल्या ह्या अयोनिज देवता मुंबईच्या रक्षणकर्त्या आहेत, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची श्रद्धा आहे. त्या आहेत म्हणून आपणही आहोत, असं बहुतेक सर्वच श्रद्धाळु मुंबैकर मानतात..!

तसे मुंबईत पुरुष कुळातले देवही आहेत. जसे घोडपदेव, ताडदेव, परळचा बारादेव इत्यादी. पण ते बिचारे, ह्या ‘देविराज्यात’ आपापल्या देवळातच शांत बसून आहेत. त्यांची सत्ता त्या रावळापुरतीच. अहो, महाराष्ट्रातली पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर इत्यादी मोठ्या शहरांच्या मांदियाळीत, ‘मुंबई’ ही एकमेंव ‘ती’ आहे. मुंबई घडली ती स्त्रियांमुळेच, या साठी दुसरा अन्य पुरावा कशाला हवा..!

मुंबईच्या काय किंवा भारताच्या काय किंवा जगाच्या काय, इतिहासाच्या बखरींमधे महत्वाचं स्थान दिलं गेलंय ते पुरुषांना. इतिहासासाठी असलेला इंग्रजी शब्द ‘His-story’ हा तेच दर्शवतो. इतिहास म्हणजे His Story असेल, तर त्यात Her ला स्थान नाहीच. असं असलं तरी, इतिहासावर आपला ठसा उमटवणाऱ्या त्या पुरुषांना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या स्त्रियाच होत्या, हे विसरुन कसं चालेल. त्या नसत्या तर, इतिहास घडवणारे म्हापुरुष जन्माला तरी आले असते काय?

शिवरायांचं अस्तित्व जिजाऊंमुळे(च) होतं, हे एकदा मान्य केल्यावर, मुंबईच्या इतिहासात काय किंवा जगातल्या इतर कुठल्याही प्रांताच्या इतिहासात काय, ‘स्त्रियांचं योगदान काय’ हा प्रश्न अप्पलपोटा वाटू लागतो नाही?

-नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

08.03.2022

छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत ठेवा..

छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन ३ एप्रिल १६८० या दिवशी झालं.
ही बातमी पुढच्या काही दिवसांतच ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या, सुरत येथील वखारीतल्या अधिकाऱ्यांच्या कानावर गेली.
त्यांनी त्या बातमीवर विश्वास ठेवण्याचं नाकारलं.
कदाचित, हा देखील शिवाजीच्या गनिमी काव्याचाच भाग असेल, असं त्यांना वाटलं असावं.
ते म्हणाले,
ज्या दिवशी शिवाजीच्या पराक्रमाच्या बातम्या येणं बंद होतील, तेंव्हाच त्यांचा मृत्यू झाला, असं आम्ही समजू..!

मित्रांनो, ह्यातून बोध एवढाच घ्यायचा की,
महाराज अजुनही जिवंत आहेत.
वर्ष ३४० उलटून गेली तरी, त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या अजुनही येतातच आहेत..
आणि त्या येतायत, तो पर्यंत महाराज जिवंतच आहेत..

पण, ते आता मात्र मरणपंथाला लागलेत..
आपणच त्यांची हत्या करत आहोत..
महाराजांच्या (फक्त) पराक्रमाच्या गाथा गाणारे आपण,
त्यांच्या न्यायप्रियतेच्या,
त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या
आणि त्यांच्या रयत सुखाच्या कल्पना
खरंच प्रत्यक्षात आणतोय का किंवा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय का?

तसं करत नसल्यास
त्यांचा वारसा सांगणारे आपण
महाराजांच्या मृत्युस कारणीभूत ठरत आहोत..
आजच्या शिवजयंतीच्या दिवशी आत्मपरिक्षण करणं खूप गरजेचं आहे..
अन्यथा, शिवजयंती हा फक्त एक ‘इव्हेन्ट’ बनून राहील,
आणि महाराजांना मारल्याचं पातक आपल्याला लागेल…!

महाराज त्यांच्या कितीतरी फुटी उंचं पुतळ्यात नाहीत,
राजकीय पक्षांच्या कार्यालयात तर नाहीच नाहीत..
ते माझ्यात आहेत.
तुमच्यात आहेत.
त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर,
त्यांच्या आदर्शावर चालणं आवश्यक आहे..
आपल्या वागणुकीतून महाराज जिवंत राहायला हवेत..
महाराजांचा वारसा सांगणारे आपण, त्यांच्या जिवंत प्रतिमा आहोत, त्या प्रतिमांना तडा जाईल असं वागणं आपल्याकडून चुकुनही होता कामा नये, हे सदोतीत ध्यानात ठेवायला हवं..
ही जबाबदारी माझी, तुमची आणि आपल्या सर्वांचीच आहे…

‘निमा पारेख’; मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

‘निमा पारेख’; व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी..!

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, असं आपण मानतो. मानतो म्हणजे, वस्तुस्थितीही तशीच आहे. मुंबईचं हे स्थान हिरावून घेण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी, तिचं स्थान देशाच्या आर्थिक जगतात अढळ होतं. आहे. आणि राहाणारच..! त्यामागे मोठं कारण आहे, इथल्या मातीत फार पूर्वीपासूनच असलेल्या सर्व समावेशक सामाजिक वातावरणाचं. मुंबईत असलेल्या धार्मिक आणि जातीय सहिष्णूतेचं. आणि या मातीतली ही बीजं पेरली गेलीत, आजपासून सुमारे साडेतीनशे वर्ष मागे..!

कहाणीची सुरुवात होते इसवी सन १६७० मधे.

इसवी सनाच्या १६६२ सालात इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस आणि पोर्तुगिज राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा यांचा विवाह होतो आणि पोर्तुगिजांकडे असलेली मुंबई, हुंड्याच्या रुपात ब्रिटिशांकडे येते. ते साल असतं १६६५. पुढे तीन वर्षांनी, म्हणजे १६६८ मधे मुंबईचा ताबा इंग्लंडच्या राजाकडून, ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीकडे येतो.

इस्ट इंडीया कंपनीनं मुंबई बेट भाड्याने घेतलेलं असतं, ते मुंबईला लाभलेल्या सुरक्षित नैसर्गिक बंदरामुळे. इकडचं बंदर कंपनीला अनेक दृष्टीने सोयीचं असतं. तसं कंपनीचं पश्चिम किनाऱ्यावरचं मुख्यालय सुरतेला असतं, पण तिथे मुघलांचं राज्य असतं. मुघलांची मर्जी सांभाळत व्यापार करावा लागत असे. शिवाय इतर युरोपिय सत्ताही व्यापारासाठी तिथे आलेल्या असल्यामुळे, त्यांच्याशीही अधुनमधून संघर्ष होत असे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मधे सुरतेवर हल्ला केल्यापासून, इंस्ट इंडीया कंपनीला त्यांच्यापासूनही धोका वाटू लागला होता. या सर्व अस्थिर राजकीय परिस्थितीतून सुटका होण्यासाठी कंपनीला पश्चिम किनाऱ्यावर एका सुरक्षित स्थानाची नितांत गरज होती आणि त्या दृष्टीने मुंबई बेट व बंदर कंपनीला अतिशय योग्य वाटत होतं. या व्यतिरिक्त मुंबई बेटांतून त्यांचा, त्यांच्या कारवार, जावा, सुमात्रा इथल्या व्यापारी बंदरांशी थेट संपर्क साधणं सोयीचं होणार होतं.

मुंबईची बेटं प्रत्यक्षात ताब्यात येण्यापूर्वीही कंपनीने ती मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते. अगदी दाम मोजून विकत घेण्याचीही तयारी ठेवली होती. परंतु, पोर्तुगिज काही कंपनीच्या प्रयत्नांना दाद देत नव्हते. पण शेवटी कंपनीची इच्छा बलवत्तर ठरली आणि ‘मुंबंई बेट व बंदर (Bombay Port & Island) इंग्लंडच्या राजाच्यामार्फत इस्ट इंडीया कंपनीच्या ताब्यात आलीच.

सुरतेच्या वखारीकडून जॉर्ज ऑक्झंडेनला (George Oxenden), कंपनीच्या वतीने मुंबईचा पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं गेलं आणि त्याने २३ सप्टेंबर १६६८ या दिवशी इंग्लंडच्या राजाच्या ताब्यातून मुंबंई बेटं ताब्यात घेतली. गव्हर्नर म्हणून ऑक्झंडनला फारच कमी कालावधी मिळाला आणि १४ जुलै १६६९ या दिवशी तो सुरत मुक्रामी मरण पावला. त्याच्या जागी, मुंबईच्या गव्हर्नरपदावर जेरॉल्ड ऑंजिए (Gerald Aungier) याची नियुक्ती झाली.

मुंबईचा गव्हर्नर म्हणून जेरॉल्ड ऑंजीएला १६६९ ते १६७७ एवढा दीर्घ कालावधी लाभला. मुंबईच्या वाढीचा पाया घातला गेला तो याच काळात. ऑंजिएला ‘The Maker Of Bombay’ असं गौरवाने म्हटलं जातं. मुंबईत तोवर लागू असलेले पोर्तुगिज कायदे रद्द करुन, इंग्लिश कायद्यांचा पाया घालणारा, मुंबईच्या बंदराचा विकास करणारा, मुंबईची सातही बेटं एकत्र जोडून एकसंध मुंबई निर्माण करण्याची योजना प्रथम आखणारा, मुंबईत न्यायालय आणि टांकसाळीचा पाया घालणारा, जमिनींशी संबंधीत नियमांची आखणी करणारा आद्य गव्हर्नर म्हणून ऑंजिएकडेच बोट दाखवलं जातं.

ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनी व्यापारी कंरनी होती. ती व्यापारासाठीच इकडे आली होती. लोक नाहीत तर भरभराट नाही. व्यापार करणं म्हणजे लोकसंख्या वाढवणं. यामुळे मुंबई बेटावर कंपनीचा ताबा येताच, कंपनीतर्फे जेरॉल्ड ऑंजिएने देशोदेशीच्या व्यापाऱ्यांना, कसबी कारागिरांना त्यांच्या कुटुंबकबिल्यासोबत मुंबईत येऊन स्थायिक होण्याचं व इथुनच व्यापार उदीम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. केवळ प्रोत्साहनच दिलं नाही तर, इथे येऊन वसणारांसाठी खास सवलती देऊ केल्या. ते इथ स्थीरसावर होई पर्यंत त्यांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या जान मालाच्या संरक्षणाची हमी घेतली. थोडक्यात एक सुसज्ज, संपन्न नगर वसवण्यासाठी ज्या ज्या बाबींची आणि संस्थांची आवश्यकता असते, त्या त्या बाबी आणि संस्था सुरु केल्या अथवा सुरु करण्याचं सुतोवाच ऑंजिएने केलं.

वास्तविक मुंबई बेटावरची लोकसंख्या वाढेल कशी, याचे प्रयत्न ऑंजिएच्या पुर्वीपासुनच करण्यात येत होते. इंग्लंडच्या राजातर्फे १६७५ ते १६६८ दरम्यान नेमल्या गेलेल्या गव्हर्नरांनीही तसे प्रयत्न केलेले होते. ऑंजिएचं वेगळेपण एवढंच, की त्यासाठी योजनाबद्ध आखणी केली.

या आखणीसोबतच ऑंजिएने घेतलेला एक निर्णय जास्त महत्वाचा होतं. त्याने मुंबईत धार्मिक सहिष्णूतेचं धोरण अंमलात आणायचं ठरवलं व तशी ग्वाहीही फिरवली. धार्मिक पगडा जास्त असण्याच्या त्याकाळात, लोकांसाठी हे अप्रुपच होतं. ऑंजिएचं हेच धोरण दुरदूरच्या प्रांतातील धडपड्या लोकांना मुंबईकडे आकर्षित करण्यास सर्वात जास्त कारणीभूत ठरलं. मुंबईची भरभराट करायची, तर लोक इथे याचला हवेत. लोक यायला हवेत, तर मग ते कोणत्या धर्माचे नि जातीचे आहेत हे पाहून चालणार नव्हतं.

ऑंजिएने जाहिर केलेल्या सुधारणा, व्यापाऱ्यांना देऊ केलेल्या सवलती, त्यांने आणलेलं कायद्याचं राज्य आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा यामुळे, मुंबईकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला. परिणामी पोर्तुगिजांकडून ब्रिटिशांकडे येताना अवघी १० हजार असलेली मुंबईची लोकसंख्या, ऑंजिएच्या कारकिर्दीत (१४ जुलै १६६९ ते ३० जून १६७७) सहा पटीने वाढून ६० हजारावर पोहोचली होती. अर्थात यामागे केवळ त्याने देऊ केलेल्या सवलती आणि लागु केलेलं कायद्याचं राज्य एवढ्याच गोष्टी कारणीभूत नव्हत्या. त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं कारण होतं, ते जाहीरपणे त्यांने स्वीकारलेलं धार्मिक सहिष्णूतचं धोरण..!

ऑंजिएच्या काळात परिस्थिती खुपच वेगळी होती. भारताचा बहुतेक भुभाग निरनिराळ्या धर्माच्या सत्त्ताधिशांच्या तब्यात होता. त्यातही मुख्य होते ते मुसलमान आणि ख्रिश्चन. त्याकाळी धर्माचा आणि जातींचाही पगडा जबरदस्त होता. शिवाय भारतातली हिन्दुंमधली जातीयताही प्रखर होती. प्रत्येकाला आपला धर्म आणि जात प्यारी होती. इतर धर्मिय सत्तांच्या राज्यात राहाणाऱ्या सामान्य प्रजेला आपापल्या धर्माने आखून दिलेल्या प्रथ-परंपरांचं पालन करण्यास अनंत अडचणी येत होत्या. अशा काळात ऑंजिएने इथे येऊन वसू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला, त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देऊ केली आणि इतरांच्या धर्मात ढवळाढवळ करण्याची मनाई केली. राज्य फक्त कायद्याचे असेल आणि कायद्यापुढे सर्वच समान असतील असं ठासून सांगितलं. सारखाच जात-धर्म असणाऱ्या लोकांचे आपासातले वाद त्यांनी आपसांत मिटवण्याची मुभा दिली. त्याने समाधान न झाल्यास कायद्याप्रमाणे निवाडा करण्याचं घोषित केलं. जास्त करून या आकर्षणामुळे मुंबईकडे लोकांचा ओघ वाढला. आणि  हिच पुढची साडेतीन शतकं मुंबईची ओळख बनून राहिली आहे.

ऑंजिएने सुरतेच्या व्यापऱ्यांनी मुंबईत यावं यासाठीही प्रयत्न सुरु केले. सुरतेत गुजराती व्यापाऱ्यांचं महत्व नेहेमीच राहीलं होतं (ह्या व्यापाऱ्यांना ‘बनिया’ असा शब्द वापरला जात असे. आपण मात्र त्यांना ‘व्यापारी’ असं म्हणू). यापैकी अनेकजण इंग्लिश इस्ट इंडीया कंपनी, डच कंपनीसाठी ‘मध्यस्थ (Broker)’ आणि ‘दुभाषे’ म्हणून काम करीत असत. स्थानिक असल्याने युरोपियन व्यापाऱ्यांना मालाच्या खरेदी-विक्रीसाठी मदत करत असत. स्थानिक वाहतुकदांशी नेहेमीचा संपर्क असल्याने, युरोपियन व्यापऱ्यांचा माल दूर पर्यंत पोहोचवण्यास मदत करत. कित्येकांनी स्वतःचे व्यवसायही सुरु केले होते. यापैकी बहुतेक मध्यसथांचे मुघल दरबारातही वजन असे आणि त्यातून ते युरोपियन व्यापारी आणि मुघल अधिकरी यांच्यात समन्वय साधून देत असत. सतराव्या शतकात तर ह्या मध्यस्थांशिवाय युरोपियन लोकांचं पानही हलत नसे. प्रत्येक व्यवहारात हे व्यापारी मध्यस्थ म्हणून त्यांना लागत. त्यांच्याशिवाय व्यवसाय अशक्यच होत असे. त्यांच्यापैकी कित्येकजण इस्ट इंडीया कंपनीच्या ‘पे-रोल’वर असतं. हे व्यापारी पुढे पुढे इतके गबर झाले की, इस्ट इंडीया कंपनी किंवा इतर व्यापाऱ्यांना मोठ्या रकमा कर्जाऊ म्हणून देत. थोडक्यात ह्या गुजराती मध्यस्थांशिवाय व्यापार अशक्य, अशी परिस्थिती सतराव्या शतकाच्या मध्यावर सुरतेत होती.

प्रचंड प्रभावी असलेल्या ह्या व्यापऱ्यांपैकी काहीजण मुंबईत यावेत, असा ऑंजिएचा प्रयत्न चालला होता. पण तसा उघड प्रयत्न करणं धोकादायक होतं. हे मध्यस्थ सुरतेतले होते. इस्ट इंडीया कंपनीची मुख्य वखारही सुरतेत होती. सुरत मुघल साम्राज्याचा हिस्सा असल्याने, त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यापारातून मुघलांना महसुल मिळत होता. सुरतेत काम करणारे हे व्यापारी मुंबईत गेल्यावर त्या महसुलावर विपरीत परिणाम होणार होता व त्यामुळे इस्ट इंडीया कंपनीवर, आधीच लहरी आणि संशयी असणाऱ्या मुघलांची खप्पा मर्जी होण्याची शक्यता होती. तसं होऊन चालणार नव्हतं. म्हणून ऑंजिए योग्य संधीची वाट पाहात होता. आणि तशी संधी लवकरच आली.

इस्ट इंडीया कंपनीच्या सुरतेतील वखारीसाठी जे अनेक मध्यस्थ काम करत होते, त्यापैकी एक होते तुलसीदास पारेख. तुलसीदास पारेख यांनी सन १६३६ ते १६६७ अशी जवळपास तीस वर्ष इस्ट इंडीया कंपनीच्या वतीने मध्यस्थाची भुमिका बजावलेली होती. त्यांच्यानंतर त्यांचे दोन मुलगे, कल्याण पारेख आणि भीमजी पारेख, कंपनीसाठी काम करु लागले होते. त्यातला भीमजी अधिक हुशार होता. त्याचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं आणि त्यामुळे इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांचं त्याच्यावाचून पान हलत नसे.

१६६८ मधे मुंबई बेटं इस्ट इंडीया कंपनीच्या ताब्यात आल्यावर, भीमजी पारेख मुंबईत जाऊ इच्छित होता. इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांशी त्याची जवळीक होतीच. त्याचा फायदा घेऊन मुंबईत त्याला नव्याने स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी मिळणार होती. भीमजी मुंबईत जाऊ इच्छित होता त्यामागे आणखीही एक कारण होतं. त्यावेळी सुरतेतलं धार्मिक असहिष्णूतेचं वातावरण होत. सुरत मुघल बादशाह औरंगजेबाच्या अधिपत्याखाली होती. त्याने सुरतेत नेमलेल्या अधिकाऱ्यांची मनमानी चाललेली होती. भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप होतं. अर्थात, असा प्रकार त्याकाळात कमी-अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी अनुभवण्यास येत असे. मुंबईचा सर्वात पहिला गव्हर्नर म्हणून मान मिळालेल्या हंफ्रे कूकला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिंक्षा झालेली होती. महाराजानी नेमलेल्या कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट तर सर्वांनाच माहित आहे. पोर्तुगिज गव्हर्नर्सही भ्रष्टाचार करत असत. सुरतेतल्या मुघल अधिकाऱ्यांमधे हे प्रमाण मात्र जास्त होतं. ते त्यासाठी धर्मासाठी वापर करत. विशेषतः सधन व्यापारी वर्गावर त्यांची नजर असे. ह्या व्यापाऱ्यांना ते इस्लाम कबूल करण्यास सांगत. जे नकार देत, त्यांच्याकडून जबरदस्तीने खंडणी वसुल करणं तर नित्याचंच होतं. शिवाय इतर धर्मियांना मुस्लीम धर्म स्वीकारण्याची बळजबरीही केली जात असे. त्याला कंटाळून अनेक व्यापारी व कारागीरांनी सुरतेस राम राम ठोकण्याची तयारी केली होती. भीमजीही त्यापैकीच एक होता.

त्याचवेळी १६६९ मधे सुरतेत धर्मांतराची एक घटना घडली. अगदी भीमजी पारेख याच्या घरात ती घडली. भीमजीच्या चुलत भावाला मुघल अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने इस्लामची दिक्षा दिली. त्याची सुंता केली. सुरतेतील एका मातब्बर व्यापऱ्याच्या घरात घडलेली ही घटना, सुरतेतील इतर गुजराती व्यापारी हिंदूंमध्ये भीतीची लहर उमटवण्यास पुरेशी होती. त्या सर्वांनी भीमजी पारेख यांना, त्यांनी मुंबंईत आश्रय मिळण्यासाठी कंपनीला विनंती करावी, अशी विनवणी केली.

भीमजीच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेच्या (संघटनेसाठी ‘महाजन’ असा शब्द त्याकाळी प्रचलीत होता) प्रमुख लोकांनी, सप्टेंबर १६६९ मधे सुरत मुक्कामी असलेल्या जेरॉल्ड ऑंजिएची भेट घेऊन, सुरतेच्या व्यापऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मुंबईत आश्रय देण्याची विनंती केली. मुंबईतला व्यापार वाढवण्यासाठी ही नामी संधी होती. पण संधी आली असली तरी, वेळ आली नव्हती, हे राजकारणात मुरलेल्या ऑंजिएने ओळखलं होतं. त्याने या व्यापाऱ्यांना मुंबंईत आश्रय दिला असता तर, मुघल बिघडले असते आणि त्याचा परिणाम कंपनीच्या सुरतेतील गोदामांमधे पडून असलेल्या लाखो रुपयांच्या मालाच्या जप्तीत झाला असता. तो धोका ऑंजिएला इतक्यातच पत्करायचा नव्हता. म्हणून या व्यापाऱ्यांना, तुर्तास मुंबईत येऊ नका असा सबुरीचा सल्ला दिला. मात्र, त्यांची नाराजी दर्शवण्यासाठी त्यांनी अहमदाबादला जावे, असा सल्ला ऑंजिएने दिला.

ऑंजिएच्या सल्ल्याप्रमाणे व्यापारी अहमदाबादला निघून गेले. सुरतेची आर्थिक नाडी ज्यांच्या हातात होती, ते सर्व व्यापारी सुरतेतून निघून गेल्यामुळे, सुरतेच्या व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला. मुघलांच्या महसुलात घट होऊ लागली. ही खबर औरंगजेबापर्यंत गेली. झाल्या गोष्टीची त्याने तात्काळ दखल घेऊन, सुरतेतील परांगदा व्यापाऱ्यांना, त्यांच्या धर्मात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही याचं आश्वासन दिल्यानंतरच ते सर्व व्यापारी, तब्बल तीन महिन्यांनी २० डिसेंबर १६६९ या दिवशी सुरतेत परतले. पण ते फार काळ तिथे राहणार नव्हते.

सुरतेत असलेलं मुघलांच लहरी राज्य, त्यांच्यात असलेली लाचखोरी ह्याला आधीच कंटाळलेले व्यापारी, अधिक भयभीत झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील चाप्यामुळे. १६६४ मध्ये महाराजांनी सुरतेवर छापा मारला होता आणि त्यानंतर लगेचच १६७० सालात पुन्हा दुसरा छापा मारला. व्यापाऱ्यांना सुरतेत सुरक्षित वाटेनासं झालं होतं. सुरतेच वातावरण अस्थिर झालं होतं. त्यामुळे त्यांना अन्य एका सुरक्षित स्थानाची आवश्यकता वाटत होती. परंतु सुरतेतल वातावरण निवळे पर्यंत सुरतेतच थांबण्याचा निर्णय ऑंजिएने घेतला होता. मुंबईचा कारभार हेन्री यंग (हेन्री यंग) या डेप्युटी गव्हर्नरकडे होता.

मुंबईत जाणं लांबतंय हे पाहून, १६७१-७२ मध्ये भिमजीने मुंबईला निघून जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान भीमजीला छपाईमधे (Printing) रस निर्माण झाला. (भीमजी पारेख यांनी, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांकडून जुनी प्रेस विकत घेतली असं म्हणतात, परंतु तसा पुरावा नाही) आणि तो मुंबंईला प्रिंटिंग प्रेस थाटण्यासाठी निघून गेला. त्याच्यासारखेच आणखही काही एकटे-दुकटे लोक गेले असण्याची शक्यता आहे.

१६७१ मध्ये सुरतेच्या व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा भीमजी पारेख यांच्या माध्यमातून सुरतेच्या वखारीशी संपर्क साधून, मुंबईत स्थायिक होण्याची इच्छा दर्शवली होती. तशी इच्छा दर्शवताना, त्यांनी, त्यांना कंपनीकडून कोणत्या सवलती मिळाव्यात याची यादी दिली होती. त्या सवलती मान्य झाल्यास, त्या इस्ट इंडिया कंपनीच्या सही-शिक्क्याने द्याव्यात अशी त्यांची मागणी होती. अशी मागणी करण्यामागे कारणही होतं. त्याकाळी राज्यकर्ता कोणीही असो आणि त्याची धोरणं काही असोत, ती राबवणाऱ्या स्थायिक अधिकाऱ्याच्या मर्जीवर ती राबवणं, अथवा न राबवणं बरचसं अवलंबून असे. सुरतेत नुकत्याच झालेल्या मुघल अधिकाऱ्यांबद्दलच त्यांचा अनुभव ताजा होता. म्हणून त्यांना आता कोणताही धोका पत्करायचा नव्हता. पण कंपनीने त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. कंपनी मुघलांची नाराजी इतक्यातच ओढवून घेऊ इच्छित नव्हती.

तिकडे मुंबईतही आलवेल नव्हतं. ऑंजिए १६७२ च्या उत्तरार्धात पुन्हा मुंबईत परतला होता. तेवढ्यात डच मुंबईवर चाल करुन येतायत अशी हुल उठली होती. पण पुढच्या काहीच काळात इंग्रजांबरोबर त्यांचा तह झाल्यानंतर डचांची भिती कमी झाली. या दरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दीने मुंबईला वेठीस धरलं होतं. पोर्तुगिजांच्या महिमावरून कुरापती चालुच होत्या. १६७६ मध्ये ऑंजिए स्वत:च आजारी पडला. या सर्व राजकीय अस्थिर परिस्थितीतून मार्ग काढत ऑंजिए पुढे चालला होता. व्यापारासाठी जगभरातून लोक मुंबईत यावेत यासाठी प्रयत्न सुरुच होते. त्याला यशही येत होतं मुंबईची लोकसंख्या वाढत होती, ती अशीच नवीन संधीच्या शोधात मुंबईत येणाऱ्या लोकांमुळे. आज जसे मुंबईत देशातील सर्वच प्रांताचे लोक दिसून येतात, तसेच त्याकाळी प्रत्येक देशाचे लोक इथे आढळून येत असत. त्यात इंग्रज होतेच. त्यांच्याबरोबर पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, मुसलमान, हिंदू, हिंदू आणि पोर्तुगीजांच्या संकरातून निर्माण झालेले ‘Topazes’ इत्यादींच मजेशीर मिश्रण मुंबईत पाहायला मिळत होतं.

आणखी काही वर्षांनी, म्हणजे १६७७ मध्ये, सुरतेतल्या नाही तर, पोर्तुगीज अमालाखालच्या दिवच्या (दीव-दमण मधलं दीव) व्यापाऱ्यांनी उचल खाल्ली. पोर्तुगीजही कमालीचे परधर्म द्वेष्टे होते. त्यांचा भर व्यापारावर कमी आणि धर्मांतरावर जास्त होता. ते इथे आलेच होते मुळी ‘ख्रिश्चनां’च्या आणि ‘मसाल्यां’च्या शोधात. मुंबईकरांनीही त्यांची चुणूक बघितली होती. दिवाचया कर्मठ वातावरणाला कंटाळून तिकडचे व्यापारी त्यांच्यासाठी योग्य ठिकाणच्या शोधात होते. आणि त्यासाठी मुंबई ही अगदी योग्य जागा होती. मुंबईत कायद्याचं राज्य आलं होतं. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक (Tolerance) देण्यात आली होती. साडे तिनशे वर्षांपूर्वी असलेल्या धार्मिकतेच्या  वातावरणात, इस्ट इंडीया कंपनीने मुंबंईत सर्वाना देऊ केलेली ही मोकळीक, त्यांना मुंबंईत आकर्षित करण्यास कारणीभूत ठरली, यात नवल नाही.


दिवमधल्या व्यापाऱ्यांच्या एका मोठ्या समुहाने मुंबईत स्थायिक होण्याचं ठरवलं. परंतु, धार्मिक मोकळेपणाबरोरच त्यांना कंपनीकडून आणखीही काही सवलती हव्या होत्या आणि त्या कंपनीच्या सही शिक्क्यानिशी लेखी हव्या होत्या. म्हणून  मार्च १६७७ मधे दिवमधल्या व्यापारी संघटनेचा प्रमूख, ‘निमा पारेख’ यांने कंपनीच्या सुरत वखारीला पत्र लिहून, त्याच्या मागण्या कंपनीसमोर ठेवल्या. त्या मागण्या होत्या;

1. कंपनीने त्याला त्याच्या घरासाठी आणि मालसाठवणुकीच्या गुदामासाठी आवश्यक तेवढी जागा मुंबईच्या किल्ल्यात अथवा किल्ल्याच्या जवळपास मोफत उपलब्ध करून द्यावी. त्या जागेसाठी त्याच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे भाडे आकारता कामा नये.

2. निमा पारेख आणि त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना आणि त्याच्या नोकर-चाकाराना, पुजाऱ्याना, त्यांचा वावर असलेल्या जागेत त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा असावी. त्यांच्या धार्मिक बाबतीत कुणाही इंग्लिश, पोर्तुगीज किंवा ख्रिश्चन अथवा मुसलमान धर्माच्या माणसांनी हस्तक्षेप करता कामा नये. त्याच्या राहत्या घराच्या अथवा गोदामाच्या परिसरात कुणीही व्यक्ती मुक्या जीवांची हत्या करणार नाही किंवा त्यांना कोणत्याही स्वरुपाची इजा करणार नाही याची हमी द्यावी. तसे कुणी केल्याचे आढळल्यास, आणि तशी तक्रार मुंबईच्या गव्हर्नरकडे आमच्याकडून केली गेल्यास, त्या व्यक्तीस कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करण्याची हमी द्यावी. त्यांच्या  धर्माच्या प्रथेनुसार त्यांना त्यांच्या घरात सर्वप्रकारची मंगलकार्य करण्याची पूर्ण मुभा असावी. तसेच, त्याच्या घरातील कुणाचा मृत्यू झाल्यास, त्या मृतास हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे विना आडकाठी दहन करण्याची मुभा मिळावी आणि त्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्यापैकी कुणालाही धर्म बदलून ख्रिश्चन व मुसलमान व इतर कोणताही धर्म स्वीकारण्याची बळजबरी करण्यात येऊ नये किंवा त्यांच्या मनाविरुद्ध इतर कोणत्याही धर्माच्या प्रथा पाळण्यास भाग पडले जाऊ नये.

इस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेटावर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा दिलेली होती. त्याच बरोबर इतरांच्या धर्मात ढवळाढवळ करण्यासही मनाई केलेली होती. असं असूनही प्रयेक ठिकाणी, कोणत्याही काळी, काही स्व-धर्मवेडाने पछाडलेले लोक असतातच. म्हणून निमा पारेख याने या मागणीचा आग्रह धरला असावा.

3. निमा पारेख किंवा त्याच्या संबंधातील कुणासही, शहराच्या रक्षणासाठी देण्यात येणारी रक्षकाचे काम करण्याची सक्ती करता कामा नये. तसेच त्याच्यावर खाजगी अथवा सार्वजनिक कामासाठी पैसे देण्याची सक्ती होता कामा नये.

ही मागणी करण्यामागची मानसिकता समजण्यासाठी, ३५० वर्षांपूर्वीची मुंबईतली परिस्थिती समजून घेण आवश्यक आहे. सैनिक होते, पण मोठ्या प्रमाणावर हल्ला झाल्यास किंवा होण्याची शक्यता असल्यास, मालमत्ता आणि जमीन जुमला बाळगणाऱ्या प्रत्येकाला शहराच्या रक्षणाची ड्युटी करावी लागत असे. त्यातून कुणाचीही सुटका नसे. पोर्तुगीज काळात तर जमीन लीजवर देताना, त्यात ही अट असेच. जे असे कर्तव्य बजावू शकत नसत, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात असत.

4. जर निमा पारेख किंवा त्याचा वकील किंवा त्याच्या जातीतील कुणाचाही, मुंबई बेटावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तींमध्ये काही वाद निर्माण झाल्यास अथवा कोर्टात जाण्याची वेळ आल्यास, गव्हर्नर अथवा इतर कुणीही अधिकारी यांनी प्रथम कायद्यानुसार चौकशी न करता आणि त्यात तो दोषी आढळल्यास, त्याला आगाऊ सूचना न देता त्याला किंवा त्याच्या संबंधित व्यक्तींना जाहीरपणे अटक केले जाऊ नये किंवा त्यांचा अपमान करू नये. तसेच निमा पारेख आणि त्याच्या जाती-धर्माच्या व्यक्तीमध्ये काही कारणांनी वाद झाल्यास, तो कोर्टासमोर नेण्याचा आग्रह धरू नये. आपसातले वाद अपसंतच सोडवण्याची पूर्ण मुभा असावी.

5. त्याला त्याचा माल, त्याच्या मालकीच्या जहाजांतून, मुंबईच्या गव्हर्नरच्या पूर्व परवानगीने, त्याला योग्य वाटेल त्या बंदरातून इतर कोणत्याही बंदरात विक्रीसाठी नेण्याची मुभा असावी, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर किंवा शुल्क आकारू नयेत.

6. जर एक वर्षाच्या मुदतीत त्याने बाहेरून मागवलेल्या संपूर्ण मालाची तो जर इथे विक्री करू शकला नाही तर, शिल्लक माल त्याला त्याच्या पसंतीच्या कोणत्याही बंदरात विक्रीसाठी पाठवण्याची मुभा असावी आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची जकात त्यावर आकारू नये.

7. जर त्याने आणि त्याच्या जाती-धर्मातील इतर कुणीही,  दुसऱ्या कुणा व्यक्तीला कर्जाऊ रक्कम दिली असेल आणि जर का ती व्यक्ती त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकली नाही, तर कायद्याने रक्कम वसूल करताना, निमा पारेख यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यास प्राथमिकता दिली जाण्याची हमी द्यावी.

8. अगर मुंबईत युद्धजन्य परिस्थिती अथवा जान-मालाला धोका उत्पन्न होईल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली तर, त्याच्या, त्याच्या कुटुंबियांच्या, त्याच्या संपत्तीच्या आणि त्याच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी मुंबईच्या किल्ल्यात  त्याच्यासाठी कायमस्वरूपी गुदाम उपलब्ध करून द्यावे.

9. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना, मुंबईच्या किल्ल्यात आणि तिथे असलेल्या गव्हर्नरच्या घरात कधीही येण्या-जाण्याची पूर्ण सूट मिळावी. तिथे गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं सन्मानाने स्वागत केलं जावं. तसेच त्यांच्या बसण्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी जागा तिथे उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्यांचा पूर्ण आदर राखण्यात यावा. मुंबईत त्यांच्या येण्या-जाण्यासाठी घोडा, पालखी, टांगा, छत्री वापरण्याची परवानगी मिळावी आणि ही साधने वापरण्याबद्दल कुणीही कोणत्याही प्रकारची हरकत घेता कामा नये. निमा पारेख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या नोकरांना तलवार आणि खंजिरासारखी शस्त्र बाळगण्याची मुभा असावी. अशी शस्त्रे बाळगल्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड अथवा शिक्षा होता कामा नये.  पारेख यांचे रक्षक त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर करणार नाहीत, मत्र त्यांनी त्या शस्त्रांचा गैरवापर केल्याचे आढळल्यास, ते शिक्षेस पात्र ठरतील. निमा पारेख यांना भेटण्यासाठी येणारे त्यांचे नातेवाईक आणि मित्र ह्यांना कोणत्याही प्रकारची आडकाठी करता कामा नये आणि त्यांच्याशीही कंपनीच्या लोकांनी आदराने वागावे.


10. निमा पारेख याला, मुंबई बेटावर नारळ, सुपारी, पान इत्यादी जिन्नस विकत घेण्याचे  अथवा विक्री करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे आणि त्यावर कुणीही हरकत घेता कामा नये.

निमा पारेख याने केलेल्या वरील १० मागण्या, सुरत वखारीने मुंबईतील अधिकाऱ्यांच्या विचारार्थ मुंबईत पाठवून दिल्या. मुंबईतल्या डेप्युटी गव्हर्नरने दिनांक ८ एप्रिल १६७७ रोजी या मागण्यांवरची त्याची मतं सुरत वखारीला कळवली. उप-गव्हर्नर लिहितो,

“निमा पारेख यांची पहिली मागणी मान्य करता येऊ शकते. निमा पारेखच कशाला, इथे येऊन वासण्याची इच्छा दर्शवणाऱ्या प्रत्येकाला आम्ही त्याच्या आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देत असतो. तशीच त्यालाही देऊ”.

“त्यांची दुसरी मागणी, त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक मिळावी ही. आहे. यात न मानण्यासारख काही नाही. आम्ही मुंबईत असलेल्या सर्वांनाच, इतरांच्या धर्मिकबाबतीत लुडबुड न करता, त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक दिलेली आहे. त्यात त्यांच्या बारश्यापासून ते अग्निसंस्कारापर्यंतचे सर्व प्रकारचे विधी ते ते आपल्या धर्मास अनुसरून करू शकतात. हे स्वातंत्र्य मुंबई बेटावर अनेक कारणांनी वास्तव्यास आलेल्या सर्वाना दिलं गेलेलं आहे. मुंबईत सध्या वास्तव्यास असलेले हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन त्यांच्यातल्या मृतांचं दहन किंवा दफन आजही त्यांच्या त्यांच्या रीतीप्रमाणे करत आहेत. मुंबईत एका धर्माच्या व्यक्तीला इतर कुठल्याही धर्माच्या व्यक्तीच्या घरी अथवा आवारात त्याच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. किंवा इतर धर्मियांना, त्या व्यक्तीच्या धर्मात सांगितलेल्या निषिद्ध गोष्टी, तिच्या घराच्या आवारात करण्यास बेटावर मनाई आहे. तसेच, मुंबई बेटावर कोणासही मुसलमान अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची बळजबरी केली जात नाही. निमा परेखानाही त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची पूर्ण सूट असेल.”

“निमा पारेख आणि त्याच्या सोबतच्या माणसाना शहराच्या रक्षणाची जबाबदारी देऊ नये ही त्यांची तिसरी मागणीही मान्य करता येण्यासारखी आहे. मुंबई बेटाच्या संरक्षणासाठी कंपनी समर्थ आहे. मात्र बेटावर ज्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे, त्यांनी त्या जागेव्यतिरिक्त आणखी जागा(प्रत्यक्षात नारळी-पोफळीची बाग अथवा वाडी) खरेदी केलेली आहे, त्यांना मात्र या बाबतीत सवलत देण्यात येत नाही. मुंबईवर कुणा परकीयांचा हल्ला झाल्यास अथवा धोक्याची परिस्थिती उत्पन्न झाल्यास, अशा लोकांना शहराच्या संरक्षणासाठी माणसं उपलब्ध करून देण्याचं बंधन आहे आणि निमा पारेख इथे आल्यास त्यानाही ते लागू होईल.”

“निमा पारेख यांची चौथी मागणी न्यायाच्याबाबतीत विशेषाधिकार मिळावा ही आहे. ही मागणी मान्य करता येणार नाही. इथे कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि त्याबाबतीत आम्ही कुणालाही विशेषाधिकार देऊ इच्छित नाही. मात्र कायद्याने जो न्याय केला जाईल, त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, याची पारेख यांनी खात्री बाळगावी. आणि त्यांच्या जातीधर्मातील वाद, कोर्टासमोर न आणता,आपापसात मिटवण्याची मुभा ह्या बेटावर राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला कंपनीने दिलेली आहे”

“त्यांच्या पाचव्या मागणीनुसार ते त्याच्या मालकीच्या जहाजांतून माल पाठवताना त्यावर कोणतेही शुल्क अथवा कर आकारू नये असे म्हणतात. वास्तविक मुंबईत १०० टनांसाठी मात्र १ रुपया शुल्क आकारले जाते, जे अगदी नगण्य आहे. ते देण्यास त्यांची हरकत नसावी. पण ते ही त्यांना मान्य नसल्यास, त्यावर नंतर विचार करता येईल.”

“निमा पारेख यांची सहावी मागणी कंपनीसाठी नुकसानकारक आहे. जर त्याचा माल उतरताना किंवा विकल्या न गेलेल्या वस्तूंची निर्यात करताना त्याला कोणतीही जकात भरायची नसेल तर, त्याने कंपनीचे खूप मोठे नुकसान होईल. त्याची ही मागणी मान्य केली तर, त्याचा मुंबईत येऊन स्थायिक होण्याचा कंपनीला कोणताही फायदा होणार नाही. फार तर दोन वर्ष अशी सूट देण्याचा विचार करता येऊ शकतो.”

“निमा पारेख यांनी केलेली सातवी मागणी कायद्याशी संबंधित आहे आणि तिचा निपटारा कायद्याप्रमाणे होईल. अशी वेळ त्यांच्यावर आलीच, तर माही त्यांचे प्रकरण कमीत कमी वेळात निकाली काढू आणि त्यांची रक्कम देण्याचा प्रयत्न करू. एवढेच आश्वासन या घडीला देता येईल.”

“युद्धजन्य परिस्थितीत मुंबईत मुक्कामाला असलेल्या कुणाही प्रतिष्ठित व्यक्तींना आणि त्याच्या कुटुंबियांना, रोकड रक्कम आणि इतर मूल्यवान चीजवस्तुंसहित किल्ल्यात आश्रयासाठी येण्याची परवानगी आहे. अशी परीस्त्जीती उद्भवल्यास, निमा पारेख यांचा विचार किल्ला मालाने भरून टाकण्याचा दिसतो, तो मान्य करता येणार नाही. तथापि त्यांची रोकड रक्कम आणि जडजवाहीरनच्या सुरक्षेसाठी ते किल्ल्यात एखादी लहानशी खोली किंवा गोदाम घेऊ शकतात. त्या गोदामात माल ठेवायचा की किमती वस्तू, हे त्यांनी ठरवावं”

डेप्युटी गव्हर्नर लिहितात, “निमा पारेख यांची नववी आणि दहावी मागणी हास्यास्पद आहे. मुंबईच्या किल्ल्यात, आगाऊ परवानगी घेऊन, कुणीही येऊ आणि जाऊ शकते. मुंबईत राहणाऱ्या कुणाही व्यक्तीला हे स्वातंत्र्य आम्ही दिलं आहे. कित्येक लोकांना तो आमचा वेडपटपण वाटतो, पण इथल्या एवढ स्वातंत्र्य त्यांना इतर कुठेही मिळत नाही. ते निमा पारेख आणि त्यांच्या कुटुंबियांनादेखील मिळेल. मुंबईत प्रत्येकाला हवे तेवढे घोडे, पालख्या आणि टांगे वापरायची परवानगी सर्वाना आहे. ज्याला जे परवडेल ते करावे. निमा पारेख यांनी केल्यास आमची काही हरकत नसेल. त्यांच्या रक्षकांनी हत्यारं बाळगण्यास कंपनीची हरकत नसेल. इथे काहीही विकण्याची आणि विकत घेण्याची मुभा आहे. इथे कायद्याचे राज्य असून, कायदा जी परवानगी देईल ते त्यांना सर्व करता येईल”.

या दहा अटीव्यतिरिक्त निमा पारेख याने आणखी एक अट स्वतंत्ररीत्या घातली होती. निमा पारेख याला, कंपनीने कोणतेही कर किंवा शुल्क न आकारता १० मण तंबाखू खरेदी करण्याची परवानगी द्यावी, असे त्याचे म्हणणे होते. ही अट मान्य करता येणार नाही, असे मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने सुरात वाखारीस कळवले. कारण हा तंबाखूचं उत्पादन शेतकरी करतात. त्याच्यावर कंपनीला करही भारतात. असे असताना निमा पारेखला कर कसा माफ करता येईल, असा प्रतीप्रश्न डेप्युटी गव्हर्नरने सुरात वखारीला विचारून, या बाबत आपणच काय तो निर्णय घ्यावा असे कळवले होते.

दिनांक १० एप्रिल १६७७ रोजी सुरतच्या वखारीने, मुंबईला निमा पारेख यांच्या मागण्या मान्य करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्याने मागणी केलेल्या १० मण तंबाखूच्या करमुक्त खरेदीसही परवानगी दिली आणि त्याचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा केला.

मुंबईला जागतिक दर्जाचं व्यापारी शहर बनवण्याचं स्वप्न पाहणारा आणि त्या दिशेने ठोस प्रयत्न करणारा, ३० जून १६७७ रोजी सुरात मुक्कामी मरण पावला. पण तत्पूर्वी त्याने दिवमधल्या व्यापाऱ्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतरच्या १० वर्षांनी, म्हणजे १६८७ मध्ये इस्ट इंडिया कंपनीचं सुरतेतील मुख्यालय मुंबईच्या किल्ल्यात हलवलं गेलं आणि मग मुंबईकडे व्यापऱ्यांचा, कसबी कारागिरांचा आणि कष्टकरी मजुरांचा ओघ आणखीनच वाढला आणि तो आज साडेतीनशे वर्षांनंतरही निरंतर सुरूच आहे. त्याचा पाया जेरॉल्ड ऑंजिएने घातला होता.

निमा पारेख पुढे मुंबईत आला. आणि हळूहळू आणखीही व्यापारी इकडे येऊ लागले. त्याशिवाय का १६६५ सालात अवघी १० हजार असणारी मुंबईची लोकसंख्या १६७७ पर्यंत ६० हजार झाली. मुंबईची निमा पारेखच्या अगोदरही काही व्यापारी इथे आले होते, पण ते बहुतेक सुटे सुटे आले असावेत. शिवाय त्यांनी कोणत्याही विशेष सवलतीं देणाऱ्या ‘पेटंट’ची मागणी केली नव्हती. मुंबईत त्या त्या वेळी जी जी परिस्थिती होती, ती स्वीकारून ते इथे आले होते. निमा पारेख मात्र आपला कुटुंब कबिला, नोकर चाकर, नातेवाईक, रक्षक आणि पुजाऱ्यांसहित १६७७ मध्ये मुंबईत स्थलांतरित झाला असावा, असा अर्थ त्याने इस्ट इंडिया कंपनीकडे केलेल्या आणि कंपनीने मान्य केलेल्या मागण्यांवरून दिसतो. निमा पारेख हा इस्ट इंडिया कंपनीकडून व्यापारासाठी सवलती आणि पेटंट घेऊन मुंबईत आलेला पहिला गुजराती व्यापारी. त्यानंतर तर अनेकानी स्थलांतर केले असावे, हे स्पष्ट आहे.

मुंबईत कामाला नेहेमीच महत्व राहीलेलं आहे. ते कुठल्या जातीची, धर्माची, प्रांताची आणि भाषेची व्यक्ती करतेय, याला कधीच महत्व दिलं जात नाही. म्हणून तर मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कुणाही मेहेनती व्यक्तीला, मग तिला इथली मराठी किंवा देशात बोलली जाणारी हिन्दी भाषा येवो, अथवा न येवो, पैसे कमवायला फार अडचण येत नाही. मुंबईत देशाच्या हर धर्माची, प्रांताची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं गेली साडेतीनशे वर्ष एकत्र नांदत आली आहेत. मुंबईची भरभराट झाली, ती त्यामुळे. ही माणसं मुंबई देशाचा आर्थिक गाडा हाकण्यात महत्वाची भूमिका बजावू लागली.

मुंबईच्या आणि देशाच्याही भरभराटीसाठी धार्मिक साहिश्नुतेचं वातावरण जपणं खूप आवश्यक आहे. मुंबईत ते सुरुवातीपासूनच होत. आजही आहे. उद्याही राहील. म्हणून मुंबईच ‘आर्थिक राजधानी’ हे बिरूद हिसकावून घेण्यासाठी कुणी कितीही प्रयत्न करो, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कुणालाही इतर ठिकाणी कितीही आधुनिक, अत्याधुनिक सोयी-सुविधा देवो, करात सवलत देवो, त्यात ते तात्पुरते यशस्वी झाले असं वाटेलही. मात्र कायम स्वरूपी यशस्वी होतील की नाही, याची शंका आहे. कारण सोयी-सुविधां आणि सवलतींपेक्षाही व्यापार उदीम करण्यासाठी जे सामाजिक सौहार्दाच, धार्मिक सहिष्णूतेच, जातभेद न पाळण्याचं, कामाला महत्व देण्याचं आणि ते काम कोण करतो याला नाही, यासाठी जे वातावरण लागतं ते फक्त आणि फक्त मुंबईतच आणि मुंबैकारांतच मुबलक उपलब्ध आहे. त्याचा पाया साडेतीनशे वर्षांपूर्वीच घातला गेला आहे.

आणि जो पर्यंत तो पाया मजबूत आहे, तो पर्यंत मुंबईचं स्थान घेण्याची कुणाचीही कुवत नाही.

-नितीन साळुंखे

9321811091
10.02.2022

टीप-

  • गुजराती व्यापाऱ्यांसाठी त्याकाळी ‘बनिया’ हा शब्द वापरत होता. ह्या लेखासाठी मात्र त्याचं भाषांतर ‘व्यापारी’ असं केलेलं आहे.
  • निमा पारेख याने केलेल्या मागण्या आणि त्यावर कंपनीने दिलेलं उत्तर आणि व्यापाराचं पेटंट इंटरनेटवर उपलब्ध आहे. जुन्या इंग्रजीत लिहिलेली ती कागदपत्र आपणही वाचण्याचा प्रयत्न करावा. इथे त्यांचं स्वैर मराठी भावांतर दिलेलं आहे.
  • लेखात उल्लेख असलेले भीमजी पारेख आणि निमा पारेख यांच्या ‘पारेख’ या आडनांवांची त्या काळातली इंग्रजी स्पेलिंग ‘Parrak’, Parrakh’ kina Parakh’ अशी लिहिलेली आहे.
  • निमा पारेख या नंवात्ल्म ‘निमा’ हे नांव नसून ती जात आहे. बनिया समाजात पोरवाड (पोरवाल?), खडायता, मेवाड, श्रीमाली इत्यादी १४ प्रकारचे भेद ‘Gazetteer of the Bombay Presidency- Volume VI – Rewa Khanta, Narukot, Cambay and Surat States’ या गॅझेटमध्ये नोंदलेले आहेत. त्यापैकी ‘निमा’ हा देखील एक भेद आहे.

संदर्भ – –
1. Materials Towards A Statistical Account of the Town and Island of Bombay (in Three Voulmes)– Volume –I History. Published under Government Orders in 1893.- Pages 38 to 82.

2. ‘The Printing Press in India; It’s beginning and early development’ by A. K. Priyolkar with foreward by C. D. Deshmukh.- Published in 1958 – Chapter The Printing Press in Bombay:1674-75;The Efforts of Bhimjiee Parekh.-Pages 28 to 35.

3. The Gazetteer Of Bombay City and Island, Volume – I, Published in 1909 Page 152(note-2).

4. Census of India- Volume –X, Published 1909- Page 53.

5. Maharashtra as a Linguistic Province- Statement Submitted to the linguistic Provinces Commission. –by Dr. B. R. Ambedkar -14.10.1948.

6. Surat in the Seventeenth Century- a study in urban history of pre-modern India- published in 1978- by Balkrishna Govind Gokhale- Pages 117-122.

घोडपदेव, व्हाया काळाचौकी आणि फेरबंदर..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

घोडपदेव, व्हाया काळाचौकी आणि फेरबंदर..!

घोडपदेव. मुंबईच्या माजगांव परिसरातला घट्ट लोकवस्तीचा एक भाग. आता बदलत चालली असली तरी, एकेकाळी ही वस्ती अंगमेहेनतीची कामं करणाऱ्या गिरणी कामगार, गोदी आणि रेल्वे कामगारांची. शेजारधर्म निष्ठेने पाळणाऱ्या एक-दोनमजली देखण्या लाकडी चाळींची. चिंचोळ्या गल्ल्यांची आणि हृदयाने श्रीमंत असलेल्या गरीबांची..!

असं हे घोडपदेव वसलंय, माजगाव ह्या पोर्तुगिज काळापासून प्रसिद्ध असलेल्या भागात. त्यामुळे घोडपदेवची माहिती सांगताना, त्यात माजगांवचं डोकावणं अपरिहार्यच. घोडपदेवची माहिती सांगताना, वाटेत लागणाऱ्या आणि मला माहित असणाऱ्या ठिकाणांचीही आपण थोडक्यात ओळख करून घेत घेत शेवटी घोडपदेवला जाऊ.

एकेकाळच्या श्रमिकांच्या वस्तीचा हा तुकडा, आज गगनचुंबी इमारती नि वेगळ्याच दिसणाऱ्या माणसांनी हा भाग भरून जाऊ लागलाय.

पूर्वेला माजगांव डॉक आणि समुद्र, दक्षिण दिशेला मांडवी, पश्चिमेला भायखळा तर उत्तरेला लालबाग ह्या माजगांवच्या हद्दी. उत्तरेकडची हद्द म्हणजे, चिंचपोकळी स्टेशनहून पूर्व दिशेच्या कॉटन ग्रीन स्टेशनला जाणारा ‘दत्ताराम लाड मार्ग’. म्हणजे पूर्वीचा ‘काळाचोकी रोड’. हे ‘काळाचौकी’ नांवं कसं पडलं असावं, याचं मला लहानपणापासून कुतूहल आहे. अद्याप याची समाधानकारक व्युत्पत्ती मला सापडलेली नाही. पण या विभागाचतली जुनी वैशिष्ट्य लक्षात घेऊन काही तर्क मात्र नक्की केलेला आहे.

इथून जवळच समुद्र किनाऱ्यावर लकडी बंदर, रेती बंदर अशी विविध बंदरं आहेत. त्या त्या बंदरावर उतरणाऱ्या त्या त्या प्रकारच्या मालावरुन ती नांवं आली आहेत. तसंच या ठिकाणी उतरणाऱ्या कोळशावरुन नांव पडलेलं ‘कोळसा बंदर’ही आहे. इंग्रजीत ‘कोल बंदर’. लालबागच्या पेरू कम्पाऊंडपाशी पूर्वी गॅस कंपनी होती. या कंपनीत कोळशापासून गॅस तयार केला जायचा आणि पाईपद्वारे पुरवलाही जायचा. गॅस कंपनीच्या जागेवर आता ‘गुंदेचा गार्डन’ नांवाचा निवासी वसाहत उभी आहे.

हा परिसर कापड गिरण्यांचा. ह्याचं नांवच गिरणगांव. ह्या गिरण्यांना कोळसा लागत असे. कोळशाचा घरगुती वापरही हेत असे. गॅस कंपनी, गिरण्या आणि घरगुती वापरासाठी लागणारा कोळसा ह्या कोल बंदरावर उतरत असे. बंदरावर येणाऱ्या कोळशाची नोंद करण्यासाठी, पूर्वी कधीतरी इथे चौकी असावी. सातत्याने काळ्या कोळशाशी येणाऱ्या संपर्कामुळे ती ‘काळा चौकी’ झाली असावी..! अर्थात हे मी तर्काने शोधलेलं उत्तर.

काळाचौकी हे नांव कसं पडलं ह्याची उकल करताना, एस. एम. एडवर्ड त्याच्या, ‘Bombay place-names and street-names; an excursion into the by-ways of the history of Bombay City ‘ ह्या पुस्तकात म्हणतो की, ह्या रस्त्यावर असलेल्या पोलीस स्टेशनबाहेरचा रस्ता डांबरी होता म्हणून तिला काळाचौकी म्हणत. ही व्युत्पत्ती पटण्यासारखी नाही. कारण डांबरी सडक आणखीही काही ठिकाणी होती असू शकेल, मग तिकडची नांव ‘काळा’ शब्दावरून सुरु होणारी का नाहीत, याचं उत्तर मिळत नाही. असो.

काळाचौकी पोलीस ठाणे

तर, जुन्या काळाचौकी रोडवरून, म्हणजे आताच्या दत्ताराम लाड मार्गावरून आपण पोलिस स्टेशनच्या दिशेने निघालो की, आपल्या उजव्या हाताला काही अंतरावर आपल्याला फेरबंदर भाग लागतो.

‘फेर बंदर’ ह्या नावात ‘फेर’ आणि ‘बंदर’ असे एक इंग्रजी आणि दुसरा ‘मराठी असे दोन शब्द आहेत. यातला ‘बंदर’ हा मराठी शब्द आहे, तर ‘फेर’ हा शब्द इंग्रजी. ‘फेर’ हा शब्द मुळात ‘फ्रिअर (Frere)’ असा आहे. सर बार्टल फ्रिअर (Sir Bartle Frere), जे सन १८६२ ते १८६७ अशी पाच वर्ष मुंबंई प्रांताचे गव्हर्नर होते, त्यांच्या स्मरणार्थ हे नांव दिलं गेलं आहे. मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी फोडून मुंबई शहराला (फोर्ट विभागाला) मोकळं केलं, ते या गव्हर्नरने. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर असलेली टेकडी, घेडपदेव हिल फोडून तिच्या दगडआणि मातीने माजगांव नजिकच्या समुद्रात भरणी घालून जी ‘माजगांव इस्टेट’ तयार करण्यात आली, तिला ‘फ्रिअर बंदर’ असं नांव देण्यात आलं. साधारणतः वाडी बंदरपासून ते दारुखान्यापर्यंतचा भाग म्हणजे फ्रिअर बंदर. सामान्यांच्या भाषेत फेर बंदर.

फेर बंदरचं देवालय. इथे पूर्वी तीन दिवसांची जत्र भरत असे. म्हाडाने बांधलेल्या गिरणी कामगारांच्या वसाहतीसमोरच हे मंदिर आहे.

तानाजी मालुसरे रोड (जुनं नांव अल्बर्ट रोड) आणि रामभाऊ भोगले मार्ग जिथे एकमेकाला मिळतात, तिथे कोपऱ्यावरच ‘नवीन बावन चाळ’ आहे. बावन चाळीच्या समोरच ‘छाप्रा मॅन्शन’ नांवाची अत्यंत देखणी, परंतु आता मोडकळीला आलेली जुनी वास्तू आहे. फेर बंदर विभाग इथून सुरू होतो, तो ‘न्यू हिन्द मिल’पाशी संपतो आणि घोडपदेव सुरु होतं. बावन चाळीपासून सुरु होणाऱ्या रामभाऊ भोगले रोडवरून, पलिकडे असलेल्या बॅ. नाथ पै मार्गावरच्या घोडपदेव मंदिरात जाता येतं. रामभाऊ भागले रोडचं जुनं नांव ‘घोडपदेव रोड’..!.

फेर बंदरवरुन घोडपदेवला जाताना वाटेत आपल्याला गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या उंच इमारतींचा समूह लागतो. या इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत, ती पुर्वीच्या ‘न्यू हिन्द मिल’ची जागा. न्यू हिन्द मिलचं खरं नांव ‘न्यू कैसर ए हिन्द मिल’. ‘न्यू कैसर ऐ हिन्द मिल’ हे लांबलचक नांव मिरवणाऱ्या गिरणीचं त्याही पुर्वीचं नांव होतं, ‘नरसी मिल’. नरसी मिलचं नांव न्यू कैसर ए हिन्द झालं तरी, या गिरणीत काम करणारे कामगार ह्या गिरणीला ‘नरसु मिल’ असंच म्हणायचे.’नरसी मिलचे’ मालक कोण होते तुम्हाला माहित आहे? नाही ना? नसण्याचीच शक्यता जास्त. तर, ह्या नरसी मिलचे मालक होते, केशवजी नाईक (नायक). हो. तेच ते. गिरगावला चाळी बांधलेले. केशवजी नाईकांच्या चाळीवाले. जिथे १८९३ सालात खुद्द लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. केशवजी नाईक आपल्याला माहित असतात, ते गिरगावच्या चाळीमुळे आणि किथे सुकु झालेल्या पहिल्या गणेषोत्सवामुळे. पण ते केवळ चाळवाले नव्हते, तर मुंबईच्या गिरणी धन्द्यातलं ते एक बडं प्रस्थ होतं.

न्यू हिन्द मिल, म्हणजे केशवजी नाईकांच्या ‘नरसी मिल’ची जागा. ह्या जागेत म्हाडाने गिरणी कामगारांसाठी इमारती बांधल्या आहेत.

केशवजी नायकांचा विषय निघालाच आहे तर, या परिसरातल्या त्याच्या मालकीच्या आणखी एका गिरणीची माहितीही देतो.

फेरबंदर परिसरातल्या, आताच्या तुकाराम भिमजी कदम मार्गावर (जुना ‘चिंचपोकळी रोड’ किंवा नुसताच ‘पोकळी रोड’) इंडीया युनायटेड मिल्स क्र. १ आणि २’ होत्या. होत्या म्हणजे, त्या इमारती आणि आवार अजुनही तिथे आहे. इथेच आता महानगरपालिकेतर्फे ‘गिरणी संग्रहालय’ उभारण्याचं काम सुरू आहे. तर, ह्या इंडीया युनायटेड मिलचं सर्वात पहिलं नांव होतं, ‘अलेक्झांड्रा मिल’. ही गिरणी १८६८ सालात जमशेटजी टाटांनी सुरु केली होती. अलेक्झांड्रा मिलच्या ठिकाणी ही अगोदर ‘चिंचपोकळी ऑईल मिल’ नांवाची तेलाची गिरण होती. टाटांनी ती जागा विकत घेतली आणि तेलाच्या गिरणीचं रुपांतर अलेक्झांड्रा मिलमधे केलं. . १८७२ मधे टाटांकडून ही केशवजी नायकांनी विकत घेतली. ही मिल चांगली चालवून मिळालेल्या नफ्यातून त्यानी, सन १८७६ सालात आपण वर वाचलेली नरसी मिल सुरू केली होती. नरसी हे त्यांच्या मुलाचं नांव.

गिरणी कामगाराच्या इमारती असलेल्या ‘न्यू हिन्द मिल’चा, म्हणजे नरसु मिलचा भाग ओलांडला, की आपण प्रवेश करतो घोडपदेव परिसरात. घोडपदेवाचं मंदिरही इथून जवळच असलेल्या ‘बॅ. नाथ पै मार्गा’वर आहे. ‘बॅ. नाथ पै मार्गा’चं जुनं नांव ‘रे रोड. या नांवाचं रेल्वे स्टेशनही त्या रस्त्यावर आहे.असं हे माजगांव एकेकाळी शांत सुंदर गांव होतं. पोर्तुगीज काळात हे गांव खूपच भरभराटीला आलेलं होतं. मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माजगांवात मुंबई बेटाच्या खालोखालची लोकसंख्या होती. ह्या बेटावरची मुख्य वस्ती, मुंबईतल्या इतर बेटांप्रमाणेच कोळी आणि भंडारी यांची. भंडारी ताडा-माडाच्या आणि भाताच्या लागवडीत, तर कोळी मासेमारीत गुंतलेले. माज्गावचे आंबेही फार प्रसिद्ध होते एके काळी.

माजगांव हे नांवच पडलंय मुळी ‘मच्छगाम’ या अर्थाच्या शब्दावरुन म्हणे. माजगांवच्या समुद्रात मासळी मुबलक मिळायची. फक्त मुंबंईतच मिळणारा मासा ‘बोंबील’ याच समुद्र किनाऱ्यावर गावायचा. केवळ ‘बॉम्बे’तच गांवणारा आणि लहान आकाराच्या ‘ईल’ माशासारखा दिसणारा म्हणून तो ‘बॉम्बे~ईल’, ‘बोंबिल’, अशी त्या नांवाची व्युत्पत्ती..!

माजगाव हे टेकड्यांचही गांव. माजगांव हिल, छिनाल टेकडी आणि नौरोजी हिल, या टेकड्या कधीकाळी उभ्या होत्या. या टेकड्या गेल्या कुठे? तर त्या तिथेच आहेत. फक्त उभ्याच्या आडव्या झाल्यात. या टेकड्यांच्या पायाशी कधीतरी पलिकडचा समुद्र खेळत असे. आताचा बॅ. नाथ पै मार्ग, म्हणजे जुना ‘रे रोड’ या ठिकाणापर्यंत समुद्राची व्याप्ती होती. १८९० ते १९२० च्या दरम्यान या टेकड्या तोडून, त्याच्यातून मिळालेल्या दगडा-मातीची समुद्रात भरणी केलेली आहे. त्या भरणीवरच वाडीबंदरपासून दारुखान्यापर्यंतची विविध बंदरं उभी आहेत.

वरच्या परिच्छेदात तुम्ही ‘छिनाल टेकडी’ हे नांव वाचून दचकला असाल ना? तर, ते त्या टेकडीचं मूळ नांव नव्हे. त्या टेकडीचं खरं नांव ‘सिग्नल हिल’. समुद्रातुन येणाऱ्या जहाजांना संधेस देण्याची काही तरी व्यवस्था या टेकडीवर असावी, म्हणून ती सिग्नल हिल. ह्या ‘सिग्नल’चं भाषांतर स्थानिक जनतेने ‘सिनाल’ केलं व नंतर ते ‘छिनाल’ असं लेकप्रिय झालं. आताही अनेक लोक, विशेषतः रिक्शा आणि टॅक्सीवाले, सिग्नलला ‘सिंगल’ बोलतात, तसं तेंव्हा ते छिनाल झालं. फ्रिअर बंदरचं नाही का फेर बंदर झालं, अगदी तसंच. सिग्नल हिलच्या जागी आता ‘रे रोड स्मशानभुमी’ आहे आणि स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘सिग्नल हिल अव्हेन्यू’ असं नांवही आहे. रस्त्याच्या नांवात टेकडी अद्याप शिल्लक आहे..!

माजगांवची भंडारवाडा हिल अजुनही उभी आहे. या टेकडीच्या माथ्यावर महापालिकेचा बगीचा तर पोटात वॉटर रिझर्वॉयर आहे.
माझगाव हिल या टेकडीवर एके काळी ‘बेल्वडेर’ नांवाची ब्रिटिश अधिकाऱ्याची बंगली होती. त्याच्या पत्नीचं, एलिझाबेथ ड्रेपरचं, तिच्या प्रियकराशी सूत जुळतं आणि ती एका रात्री दोरखंडाच्या सहाय्याने ह्या टेकडीचा उभा कडा उतरून खाली उभ्या असलेल्या बोटीतून पळून जाते, अशी ती कथा. आता ती टेकडी नाही. ही टेकडी म्हणजे भंडारवाडा हिलचा पूर्व उतारावरच एक टोक..

भंडारवाडा हिलवर उभं राहिलं की, कधी काळी अख्खी मुंबई व पलिकडची साष्टी नजरेच्या टप्पात यायची, अशी आठवण जेम्स कॅम्पबेल याने ‘चार्म्स ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्याच्या त्या लेखाचं नांवच मुळी ‘Panorama of Bombay from Bhandarwada Hill’ असं आहे. आता मात्र आजुबाजुच्या गगनचुंबी इमारतींमधे ह्या टेकडीला शोधावं लागतं..!

ज्या टेकडीमुळे, माजगांवच्या उत्तर भागाला ‘घोडपदेव’ हे नांव प्राप्त झालंय, त्या ‘घोडपदेव हिल’ची आणि हे नांव कसं पडलं त्याची कथा सांगतो आणि हा लेख संपवतो.

आज साधारणत: घोडपदेव मंदिरापासून ते न्यू हिन्द मिलचा परिसर म्हणजे पूर्वीची घोडपदेव हिल. आजची डी.पी. वाडी (धाकु प्रभुची वाडी) ह्या हिलच्या जागेवरच उभी आहे. माजगावची उत्तर हद्द म्हणजे घोडपदेव टेकडी. पुढे परळ आणि माजगावला विभागणारी लहानशी खाडी होती.

आजच्या माजगावापासून घोडपदेवपर्यंत पूर्वी कोळी आणि भंडाऱ्यांची वस्ती होती. हे इथले मूळ पुरुष. भंडारी समाज ताडा-माडाच्या आणि भातशेतीच्या लागवडीत, तर कोळी मासेमारीच्या. इथल्या समुद्रात मुबलक मासळी मिळत असे.

समुद्र घोडपदेव टेकडीच्या पायापर्यंत होता त्याकाळी इथे जी टेकडी उभी होती, त्या टेकडीच्या माथ्यावरचा एक दगड बाहेर आला होता. लांबून त्याचा आकार घोड्याच्या मुखासारखा दिसत असे. माजगावचे कोळी जेंव्हा माझगांवपासून दूर खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आणि मासेमारी करून परत येत, तेंव्हा ही टेकडी आणि तिच्यावरचा तो घोड्याच्या तोंडासारखा दिसणारा दगड त्यांना दिसू लागला, की घर जवळ आल्याचा त्यांना आनंद होत असे. आपणही बाहेरगांवी जाऊन परत येताना घराजवळ आलो आणि गाडीतून आपल्याला ओळखीच्या खुणा दिसू लागल्या की, घरी न पोहोचताही आपल्याला घरी पोहोचल्यासारखं वाटून आनंद होतो ना, अगदी तसाच आनंद त्या कोळ्यानाही होत असे. दररोज मृत्यूशी गाठ असणारा कोळी समाज निसर्गाला देव मानतो, हे काही नवीन नाही. निसर्गपूजक असणाऱ्या कोळ्यांनी त्या दगडाला देव मानून, त्याचा आकार घोड्याच्या तोंडासारखा दिसतो म्हणून ‘घोडपदेव’ असं नांव दिलं असावं, अशी एक व्युत्पत्ती सागितली जाते. तशी ती पटण्यासारखी आहे.
कोळीच कशाला, आधुनिक काळातले आपणही एखाद्या दगडात किंवा झाडाच्या बुंध्यात गणपतीचा किंवा शिवलिंगाचा आकार दिसला, की त्याचा देव करून टाकतो, तसंच तेंव्हाही झालं असाव.

परंतु, ‘मुंबईचा वृत्तांत’ ह्या बाळकृष्ण आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे ह्यांनी १८९३ सालात लिहिलेल्या पुस्तकात, ‘घोडपदेव’ ह्या नावाबद्दल शंका उपस्थित करून, त्याचं उत्तरही दिलं आहे. लेखक लिहितात, ‘ह्या जागेस घोडपदेव म्हणण्याचे कारण असे दिसते की, लांबून पाहण्याबरोबर ह्या डोंगरीची आकृती घोड्याच्या आकाराची दिसते, असे कित्येक म्हणतात. पण, वास्तविक तिथे खडक मात्र आहे. तेंव्हा अर्थात ह्यांस ‘खडकदेव’ हे नांव चांगले शोभेल..!’  १८९३ मध्ये पुस्तक लिहिलेल्या लेखकाचं मत, हा खडकदेव म्हणून जास्त शोभेल, असं आहे.

लेखकाने ही टेकडी पाहिलेली असावी. कारण पुस्तक जरी १८९३ मधे प्रसिद्ध झालेलं असलं तरी, त्यातील लिखाणाची जमवाजमव त्यापुर्वीपासून चालू असणार. पुन्हा, घाडपदेव हिल १८९३ ते १९०८ च्या दरम्यान तोडण्यात आली. याचा अर्थ लेखकाने पुस्तक लिहिलं, त्या काळात ती तिथे असली पाहिजे आणि म्हणून लेखक सांगतात त्यानुसार तो ‘खडकदेव’ असा पाहिजे. घोडपदेव नाही.

जुन्या इंग्रजी पुस्तकांतूनही ह्याचा उल्लेख ‘Khadk Dev (Rock God)’ असा येतो. मग ह्या ‘खडकदेव’चं रुपांतर किंवा नामांतर ‘घोडपदेव’ कसं झालं, हा प्रश्न पडतो..! प्रश्नाचं उत्तर तर्काने सापडू शकतं. टेकडीच्या माथ्यावरच्या त्या दगडाला खडक देव म्हणोत वा घोडप देव, त्याचा संबंध कोळी समाजाशी होता, हे नक्की. असं असेल तर, कोळी लोकांसाठी कोकण किनारपट्टीवर ‘घोरपी’ असा एक शब्द आहे. टेकडीवर दिसणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला कोळी खडकदेव म्हणतात, हे लक्षात आल्यावर, ह्या देवाला समुद्रात जाणारे कोळी भजतात, म्हणून तो घोरप्यांचा देव, अर्थात ‘घोरप देव’, असा तर्क केल्यास चुकणार नाही.

गंमत म्हणजे मुंबई शहरावर लिहिल्या गेलेल्या काही जुन्या इंग्रजी पुस्तकातून, ह्या देवाचा उल्लेख ‘Ghorup Dev’ असाच आहे. ‘घोरपदेव’ मधल्या ‘र’ अक्षराचा उच्चार, काळाच्या ओघात ‘ड’ असा होऊन, घोडपदेव असा झाला असणार, हे जास्त पटण्यासारखं आहे.

पुढे ती टेकडी समोरच्या माझगांव इस्टेटमधे गडप झाली. तिथे बंदरं आली. ‘घोडपदेव हिल’मधली हिल गेली असली तरी, घोडपदेव नांव मात्र राहीलं. घोडपदेवाच्या मंदिरामुळे चिरंतन झालं.

नाथ पै मार्गावरचं घोडपदेव मंदिराचं प्रवेशद्वार

बॅ. नाथ पै मार्गावरच्या मंदिरात तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला दगडाच्या आकाराचा देव दिसेल. देवाच्या आजूबाजूला साधारण मोदकाच्या आकाराचे शेंदूर फसलेले बरेच लहान-मोठे दगड दिसतात. हे कदाचित समुद्राच्या लाटाच प्रतिक असावं. तळाच्या समुद्राच्या लाटांतून टेकडीवरचा घोडपदेव उगम पावला आहे, असंच ते पाहताना वाटतं.
एकदा फेरी मारा तिकडे.

नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
19.01.2022


संदर्भासाठी पुस्तकं-

1. The Origin of Bombay – Garsan Da Kunha

2. Bombay place-names and street-names; an excursion into the by-ways of the history of Bombay City – Samuel T. Shepphard

3. मुंबईचा वृत्तांत – बाळकृष्ण आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे
4. स्थल-काल – डॉ. अरुण टिकेकर
5. Indian Textile Journal – 1854 to 1954 – published by Bombay Mill Owbers Associatin.6. Bombay; Story of The Island City – Pusalkar & Dighe.

6. Rise of Bombay- S. M. Edwards

घोडपमंदिराचा गाभारा.
श्रीदेव घोडपदेव

देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आपण..

देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आपण..

आपल्या देशाने ब्रिटिशांशी लढून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळवलं, याचा आपल्याला कोण अभिमान असतो, नाही? पण या लढ्याविषयी, त्यात भाग घेतलेल्या व प्रसंगी प्राणाचं बलिदान दिलेल्यांविषयी आपल्याला फारच कमी माहिती असते.

आपण भारतीय फारच उत्सव प्रेमी असतो. अनेक उत्सव आपण साजरे करत असतो. त्यापैकीच ‘स्वातंत्र्यदिन’ हा देखील एक उत्सव बनून राहिला आहे. त्यातलं गांभिर्य पार हरवलं आहे..स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करताना, ते स्वातंत्र्य, १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या काळात किती जणांच्या बलिदानावर आधारलेलं आहे, हे मात्र आपण विसरतो.

आपल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती नेहरु, गांधी, मौलाना आझाद आणि अशीच काही आणखी नांवं या पलिकडे जात नाही. पण या लढ्यात अनेक सामान्य माणसांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, हे आपल्या गांवीही नसतं..!

हे लिहिण्याचं कारण म्हणजे, कालच मला अचानक सापडलेली, १८५७ ते १९४७ या दरम्यान झालेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या विरांची माहिती असलेली डिक्शनरी..!

सहज म्हणून ही डिक्शनरी चाळताना जी माहिती माझ्या समोर आली, ती आश्चर्य कारक होती. आपल्याला, दिनाॅक १२ डिसेबर १९३० साली परदेशी मालाच्या ट्रकखाली स्वतःला झोकून देऊन, हुतात्मा झालेल्या ‘बाबु गेनुं’विषयी ऐकून का होईना, पण माहिती असते. परंतु, आणखी एका बाबु गेनुंने, ‘छोडो भारक’ आंदोलनात दिनांक १३ सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांची गोळी छातीवर झेलून हौतात्म्य पत्करलेलं असतं, हे कुठे आपल्याला माहित असतं..!

या डिक्शनरीतील नांव A या इंग्रजी अक्षरापूसून सुरू होऊन Z या अक्षराने संपतात. A अक्षराने सुरू होणाऱ्यी नांवात साधारणतः दिड-दोनशे नांवं आहेत आणि त्यातली अर्धी अधिक अब्दुल, अबिद, अली, अहमद इत्यादी मुसलमानांची नांवं आहेत. देशात सध्या मुसलमानांविषयी जी द्वेषभावना जाणूनबुजून निर्माण केली जात आहे आणि देशवासीय त्या विखारी भावनेच्या आहारी जात आहेत, हे चांगलं नाही. ह्या देशाच्या स्वातंत्र्यात सर्वांचा समान वाटा आहे, हे अशी पुस्तकं वाचताना समजत जातं. म्हणून अशी पुस्तकं वाचायला हवीत.

अक्कल गहाण ठेवून ‘राजकीय धर्मांध’ बनत चाललेल्या ह्या आपल्या देशबांधवांनी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुसलमानांसहित सर्व धर्माच्या लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, याची माहिती करुन घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक हुतातम्याचं नांव, त्यीचं राहाण्याचं ठिकाण, बलिदानाचं ठिकाण व कारण इत्यादी माहिती ८-१० ओळीत यात दिलेला आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली ही डिक्शनरी, एकूण पांच खंडात आहे. त्यातला तिसरा खंड महाराष्ट्र, गुजरात आणि सिंध प्रांतातील स्वातंत्र्य विरांची माहिती देणारं आहे. सर्वांनी हे उत्सुकतेपोटी वाचणं आवश्यक आहे.

माझ्याकडे या तिसऱ्या खंडाची पीडीएफ आहे. कुणाला हवी असल्यास त्यांनी आपल्या व्हाट्सॲप क्रमांकावरुन, माझ्या व्हाट्सअॅप 9321811091 या क्रमांकावर मेसेज पाठवल्यास, त्यांना मी ही प्रत त्वरीत पाठवू शकेन.

-नितीन साळुंखे
9321811091

मला उमजलेले दत्त..

आज श्री दत्त जयंती..

मी जेव्हा आपल्या दैवतांचं चार हस्ती शंख-पद्म-चक्र-गदा किंवा तत्सम काहीतरी धारण केलेल्या पारंपारीक रुपाचा अर्थ शोधायचा जेंव्हा प्रयत्न करतो, तेंव्हा बरंच काहीतरी सापडतंय किंवा ती मुर्ती सांगू पाहातेय असं मला नेहेमी वाटतं. कारण ती केवळ एक ठराविक स्वरुपातली मुर्ती किंवा साचेबद्ध प्रतिमा नसून, आपल्या प्राचिन पुर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला त्यांचा काहीतरी महत्वाचा संदेश आहे, असं मला नेहेमी वाटतं. मुर्ती केवळ प्रतिक असतं. त्या प्रतिकामागचा अर्थ आपण घ्यायचा असतो. होतं नेमकं उलटं. आपण मुर्तीत(च) अडकतो, ती काय सांगू पाहातेय याकडे लक्ष देत नाही.

श्री अक्कलकोट स्वामींच्या ओवीरुप चरित्रात श्री दत्त महाराजांचं वर्णन, “चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।” असं केलंय. या श्लोकातील पहिल्या दोन ओळी दत्तगुरुंच्या तसबिरीत प्रत्यक्ष पाहाता येतात. आणि या दोन ओळीच मला ‘श्री दत्तां’चा खरा अर्थ सांगतात असं वाटतं.

चार वेद म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे ज्ञानाचं प्रतिक. पुस्तकांचं वाचन आपल्याला जगभराचंच कशाला, तर ब्रम्हांडाचंही ज्ञान देतं हे मी काही नव्यानं सांगायला नको. ‘चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन ।’ या ओळीत ग्रंथांना ‘श्वान’, म्हणजे कुत्र्याची उपमा दिली आहे. ज्याला एकदा जवळ केलं, की तो आपल्याला कधीच अंतर देत नाही.

कुत्रा हा प्रामाणिकपणाबद्दल प्रसिद्ध आहे. जर, वेद म्हणजे ग्रंथ, ग्रंथ म्हणजे ज्ञान असेल तर, ज्ञान म्हणजे श्वान, जे, ते प्राप्त करणाराशी प्रामाणिक राहातं, त्याच्या रात्रंदिन समिप राहातं, असा अर्थ लावला तर चुकणार नाही. म्हणून त्या मुर्तीला शरण जाऊन कर्मकांडात अडकणं म्हणजे केवळ दगडावर डोकं आपटणं आहे. तसं केल्यानं ‘मोक्ष’ प्राप्त होईल हा आपला गैरसमज आहे. त्यातून हाती लागेल, तो केवळ कपाळमोक्ष(च)..! म्हणून मुर्तीऐवजी ज्ञानाला शरण जाणं आवश्यक आहे. ते ज्ञान आपल्याला कधीच अंतर देणार नाही. ते ‘वसेल समीप रात्रंदिन’..! ज्ञानामुळे अज्ञानापासून मुक्ती मिळते आणि तोच खरा मोक्ष..!

आता खुद्द ‘दत्त’ महाराजांबद्दल. दत्त हा शब्द इंग्रजीत लिहिला असता, तो ‘DATTA’ असा लिहावा लागतो. ह्या इंग्रजी शब्दाकडे नीट पाहा. तो सध्याचा परवलीचा शब्द, ‘DATA’ सारखा वाटतोय का? वाटतोय का म्हणजे काय, तो आहेच तसा. सध्याच्या अंतराळ युगात, ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..!.

इंग्रजी ‘डाटा’ला, मराठीत ‘विदा’ असा प्रतिशब्द आहे. हा ‘विदा’ शब्द पुन्हा ‘वेद’ या शब्दाशी साम्य सांगणारा आहे. म्हणजे पुन्हा, वेद म्हणजे ग्रंथाचं प्रतिक, ग्रंथ म्हणजे ज्ञानाचं प्रतिक आणि ज्ञान म्हणजे पुन्हा ‘डाटा’ म्हणजे दत्त, असा हा प्रवास होतो.

जेंव्हा आपण कंप्युटरसमोर बसून काही विषयांची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तेंव्हा तो एका क्षणात, विषय परस्पर विरोधी असले तरी, तो जगभरातून आपल्यासमोर आणून उभं करतो. या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदातील श्लोकातील नंतरच्या दोन ओळी, ‘ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।’ हेच तर सांगतात. मनासारखा प्रचंड वेग आणि मनासारखंच काही क्षणांत त्रिखंडात विहरुन, त्रिखंडातलं ज्ञान आपल्यासमोर सादर करणं, हे संगणकाला Dat(t)a मुळे शक्य होतं.

दत्तांचं वर्णन करणाऱ्या श्लेकातील आणखी काही ओळी,

“कामधेनू असोनि जवळी ।

हाती धरिली असे झोळी ।

जो पहाता एका स्थळी ।

कोणासही दिसेना ॥”

अशा आहेत. कामधेनू इच्छापूर्तीचं प्रतिक. ग्रंथ आपल्याला मनोवांछित विषयाचं ज्ञान करून देतात. जो ज्ञानाचा उपासक असतो, तो झोळी पसरूनच असतो. तो ज्ञानाचा याचक असतो. ‘याचक’ आणि ‘वाचक’ यातील साम्यही मला हेच सांगते. आणि ज्ञान कोणत्याही एका स्थळी कसं असेल, ते तर यत्र तत्र सर्वत्र पसरलेलं असतं. असं असुनही ते दिसत नाही, शोधावं लागतं, दत्तगुरूंची आळवणी ती हिच..!!

एकदा का ज्ञान प्राप्तीचं ध्यान लागलं, की मग आपण आपण उरत नाही. तना-मनाचं भान हरपतं. अवघ विश्व एकच होऊन, मी तू पणाचा लोप होतो. श्री दत्तांच्या आरतीत उगाच नाही म्हटलंय, की ‘डाटा डाटा ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ अशी समाधी लागायला वेळ लागत नाही आणि असं झालं की, मग आपण, आपोआप मुर्ती आणि कर्मकांडातून बाहेर पडतो आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग धरतो..!

थोडक्यात मला समजलेला दत्तांचा अर्थ म्हणजे ज्ञान.

आजच्या कंम्प्युटर युगात,’Datta’ म्हणजे ‘Data‘ ज्ञान..!

दत्त तारून नेतो की नाही, ते मला सांगता येणार नाही. माझ्या मते तो तसा तारुन नेत नाही. पण Data, Data असं ध्यान सागलं, तर ते मात्र निःसंशय तारुन नेतं. एकदा का Dataचा नाद लागला, की ‘संसारतापे अति शिणलो मी’ अशा निरुत्साही करणाऱ्या भावना कोसो दूर पळतात. काही थकलं भागलं जाणवत नाही. खऱ्या अर्थाने सतत काही तरी नविन समोर आणणारा, ताजंतवाना ठेवणारा गुरु म्हणजे ज्ञान, डाटा..!!

मला जाणवलेले श्री दत्तगुरू असे आहेत असं मी मानतो, तुम्ही मानावं असा माझा आग्रह नाही.

जय जय गुरुदेव dat(t)a..

-नितीन साळुंखे

9321811091

टीप- Data म्हणजे माहिती. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे मला समजतं. परंतु, माहिती म्हणजे ज्ञानाकडे जाणाऱ्या उन्नत मार्गावरची पहिली पायरी आहे, असं मी समजतो.