टिळक ब्रिज, दादर..!

दादरचा टिळक ब्रिज

दादरचा टिळक ब्रिज. गेल्या पाच-सहा वर्षाचा त्याचा नि माझा सहवास. गेली पाच-सहा वर्ष मी रोज सकाळ-संध्याकाळ या ब्रिजवरून ये-जा करतो. टिळक ब्रिज, त्यावरुन अखंड वाहाणारी, सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी. पुलावर होणारं ते सततचं ट्राफिक जाम, पुलाच्या दोन्ही बाजुंच्या भिंतीवर सुरेख अक्षरांत रंगवलेल्या रिपब्लिकन पंक्षाच्या त्या जाहिराती, पहाटेच्या वेळी पुलावर भरणाऱ्या भाजी-पाल्याच्या घाऊक बाजारानंतर, पुलाच्या फुटपाथवर सकाळच्या वेळी होणारा तो भाजी-पाल्याचा चिखल आणि गेली काही वर्ष त्याची सततची चाललेली डागडुजी हे माझ्या नित पाहाण्यातलं दृष्य. हे सर्व पाहून मला या पुलाच्या क्षमतेविषयी कौतुकच वाटत आलंय. आपण आधुनिक काळात बांधत असलेले पुल बांधायला वीस-पंचवीस वर्ष लागत असली तरी, तो पडायला दोन-पांच वर्ष पुरेशी असतात, हा आपला अनुभव. त्यात हा कितीतरी वर्ष जुना पुल, अजूनही सक्षमपणे कार्यरत आहे, हे पाहून त्याच्याविषयी व तो बांधणाऱ्यांविषयी, माझ्या मनात कौतुक आणि कृतज्ञता अशा दोन्ही भावना दाटून येतात..!

हा पूल कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल हा प्रश्न नेहेमीच माझ्या मनात येत असे. पण येत असे नि जात असे, एवढंच होत असे. या पुलाची जन्मकहाणी शोधावी, असं काही वाटलं नव्हतं. शोधण्यासाठी नकळतपणे कारणीभूत ठरले, ते माझे दादरनिवासी स्नेही डॉ. अविनाश वैद्य..!

डॉ. वैद्यंशी गप्पा मारताना या पुलाचा विषय हमखास येत असे. रेल्वेचे अभ्यासक असणाऱ्या डॉक्टरांना या पुलाचं भारी कौतुक. तो लहानपणापासून त्यांचा सवंगडी असल्याने, त्यांना ही माहिती हवी होती. पण काही केल्या त्यांना हा पूल कधी व का बांधला, याची माहिती मिळत नव्हती. इंग्रजी अमलात बांधलेस्या इतर पुलांवर, त्या पुलांची माहिती देणारी पाटी असते. तशी या पुलावर कधी त्यांच्या पाहाण्यात आली नाही. माझ्याही पाहाण्यात आली नव्हती आणि नाही. त्यामुळे या पुलाविषयी काही माहिती मिळत नव्हती. ही माहिती डॉ. वैद्य यांनी मला विचारली आणि ती शाधून काढण्याचं बीज माझ्या मनात नकळतपणे रुजत गेलं.

माहिती शोधण्याची सुरुवात, अर्थातच, काही जाणकार व्यक्तींकडे विचारणा करून केली. त्या चौकशीत, सन १९२० च्या पुढेच, अशी मोघम उत्तरं मिळायची, पण ठोस अशी माहिती कुणाकडेही नव्हती. सन १९२० च्या पुढेच का, याचं उत्तरही मजेशीर असायचं. टिळक १९२० साली वारले आणि ज्या अर्थी या पुलाला टिळकांचं नांव दिलंय, त्या अर्थी हा पूल १९२० सालानंतर बांधला गेलाय, असा त्या उत्तरांमागचा तर्क असायचा. तसं असेलं तर मग, इंग्रजी अंमलात बांधल्या गेलेल्या, मुंबैतल्या इतर पुलांना-रस्त्यांना जशी करी रोड ब्रिज, आर्थर रोड ब्रिज, कॅरोल ब्रिज वा ग्रॅंट रोड, सॅंडहर्स्ट रोड अशीइंग्रज गव्हर्नरांची-अधिकाऱ्यांची नांवं आहेत, तसं नांव या पुलाला न देता, भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचं नांव का दिलं गेलं असावं, हा नविनच प्रश्न समोर उभा राहायचा आणि टिळक ब्रिज नेमका कधी व कुणी बांधला, हा मूळ प्रश्न बाजुला पडायचा..!

टिळक पुलाचा उल्लेख काही लेखांमधून माझ्या वाचनात आला होता, पण तो केवळ संदर्भ म्हणून. उदा. साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी, त्यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात लिहिल्या आहेत. सदरचा लेख, ‘मुंबई महानगरपालिके’च्या इमारतीस शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत मी वाचला होता. श्री. ना. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम कॉजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. टिळक ब्रिज नुकताच तयार झाला होता”. श्री. नांच्या लेखातला हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं..!

एवढ्यात, तरी दोन-तीन वर्ष झाली असतील या गोष्टीला, माझे एक दादर निवासी परिचित रस्त्यात भेटले. त्यानाही ही माहिती मी विचारली. त्यांच्या गेल्या चार पिढ्या दादरच्या ऐन बाजारपेठेत रहात  आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून वा आजोबांकडून टिळक ब्रिजच्या काही गोष्टी ऐकल्या असण्याची शक्यता असल्याने, त्यांच्याकडून काही माहिती मिळते का पाहावं, या उद्देशाने त्यांना विचारल. त्यांनी मला अगदीच निराश केल नाही. त्यांना टिळक ब्रिज कधी बांधला त्याची माहिती नव्हती, पण टिळक ब्रिज ज्या व्यक्तीने (कंत्राटदार) बांधला, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ते ओळखत होते आणि ते कुटुंबीय दादर मधेच राहत असल्याच. त्यांनी सांगितल. त्यांनी, त्या कुटुंबियांची आणि माझी भेट घालून देण्याचाही आश्वासन दिलं आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या.

परंतु ती भेट व्हायच्या पूर्वीच माशी शिंकली आणि कोविड-१९ चा प्रकोप झाला आणि देशात सर्वत्र lockdown सुरु झाला आणि तो पुढचा जवळपास वर्षभर राहिला. त्यात प्रवास करणं मुश्कील झालं, तिथे भेट कुठून व्हायची. ती राहिली ती राहिलीच. पुढे फोवरून मी चौकशी क्लारीत राहिलो, पण हा लेख लिहून होईपर्यंत ती भेट काही झाली नाही ती नाहीच. 

पुन्हा मी श्री. ना. पेंडसे यांच्या लेखावर लक्ष केंद्रित करण्याच ठरवल. अनेकांच्या बोलण्यात येणारं, टिळक ब्रिजच्या बांधकामाचं वर्ष १९२० च्या पुढेच, असा उल्लेख आता, पेंडसेंच्या लेखामुळे सन १९२५ पर्यंत मर्यादीत झाला. अर्थात आठवणी नेमक्या असतातच असं नाही. तरही दादरचा टिळक पूल १९२० ते १९२५, अशा पांच वर्षांच्या काळात कधीतरी बांधला गेलावा, हे स्पष्ट होतं. तरीही, नेमका कधी, हा प्रश्न उरलाच आणि त्याचं उत्तर शोधायच्या मागे मी लागलो आणि जी माहिती हाती लागली, ती मनोरंजक होती. केवळ मनोरंजकच नव्हे, तर त्यातून त्याकळच्या सामान्य लोकांची, शासन-प्रशसनाची, वर्गमानपत्रांची सार्वजनिक कामामधली दृष्टीही समजावून देणारी होती..!

दादरचा टिळक ब्रिज, त्याची त्या काळात निर्माण झालेली गरज, त्या काळातल्या लोकांची मागणी आणि त्याचं प्रत्यक्ष बांधकाम आणि नंतरचं त्याचं ‘टिळक ब्रिज’ असं झालेलं नामकरण, हा साधारणत: सन १८९० ते १९३०, असा साधारण ३० ते ४० वर्षांचा प्रवास आहे, वाचनांती माझ्या लक्षात आलं. आजही एखादं मोठं लोकोपयोगी बांधकाम करायचं म्हटलं, तर एवढा कालावधी लागतोच. फरक इतकाच की, हल्लीच्या काळात तेवढाच कालावधी घेऊन झालेलं बांधकाम, पुढच्या काही वर्षातच खिळखिळं होऊन जातं. तेंव्हाचं मात्र अजुनही टिकून आहे. तेंव्हा, म्हणजे साधारण १०० वर्षांपूर्वीच्या इंग्रजी अंमलात बांधलेल्या एखाद्या पुलाच्या बांधकामाची आयुर्मर्यादा संपल्याचं पत्र, इंग्लंडाहून आपल्याला येतं, तेंव्हा त्या कंपनीचं आणि त्यांच्या कामाच्या शिस्तिचं आपल्याला कोण कौतुक वाटतं. पण आपण त्यातून शिकतो काय, तर काहीच नाही. असो..!

आता, टिळक ब्रिज कधी बांधला, या आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू.

दादरला टिळक पुलाचा इतिहास शोधायचा, तर दोन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे, हा पूल बांधायची गरज का निर्माण झाली, हा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे, हा पूल कधी बांधला, हा..! यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळून जातं.

टिळक पूल बांधायची गरज का भासली, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं, तर आपल्याला एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मागे जावं लागेल. हा थोडक्यातला प्रवास अपरिहार्य आहे.

टिळक ब्रिज का बांधावा लागला-

एकोणीसाव्या शतकाचा मध्य संपताना, मुंबंईत दोन नवलाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे, दिनांक १६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणे, अशी देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली (*). आणि दुसरी म्हणजे, त्याच्य्या पुढच्याच वर्षी, म्हणजे सन १८५४ सालात, मुंबईच्या ताडदेव भागात पहिली कापड गिरण सुरू झाली (**). मुंबई बंदर नजिकच असल्याने, बोटींतून येणाऱ्या कापसाचा आणि नजिकच्या वस्तीतून होऊ शकणाऱ्या कामगारांच्या पुरवठ्यामुळे, सुरुवातीच्या गिरण्या सुरू झाल्या त्या गिरगांवानजिकच्या ताडदेवला. या दरम्याम मुंबईची लोकसंख्या होती साधारणत: २.५० लाखाच्या आसपास.

ताडदेवच्या बाहेर गिरणीने पहिलं पाऊल ठेवलं ते, लालबागला. सन १८६०मधे लालबागला ‘दि रॉयल स्पिनींग मिल्स’ स्थापन झाली आणि ‘गिरणगांवा’चा गर्भ अंकुरला. गतकाळातल्या या ‘दि रॉयल स्पिनिंग मिल्स’ला आज आपण सारे ‘दिग्विजय स्पिनिंग मिल्स’ म्हणून ओळखतो. पुढच्या ३०-३५ वर्षांत सुरू झालेल्या, जवळपास ६०-७० गिरण्यांपैकी, बहुतेक सर्व गिरण्या लालबाग-शिवडी- परळ-लोअर परेल-डिलाईल रोड-नायगांव या भागात होत्या. या गिरण्या जरी मध्य मुंबंईत उभ्या राहिल्या असल्या तरी, या गिरण्यांमधे कामाला आलेला कामगार राहात होता, तो प्रामुख्याने मांडवी-भायखळा-माजगांव भागात. सन १८५० च्या दरम्यान अडीच लाखावर असणारी मुंबईची लोकसंख्य, सन १८९५-९६च्या दरम्यान तिपटीपेक्षा जास्त वाढून, आठ ते साडे आठ लाखापर्यंत वाढली होती. आणि प्रामुख्याने ती वसली होती, ती क्रॉफर्ड मार्केट-मांडवी ते भायखळा-माजगांव पर्यंतच्या परिसरात..!

परंतु याचा अर्थ असा नाही, की भायखळ्याच्या पलिकडे अजिबात वस्ती नव्हती. किल्ल्यातला ब्रिटीश गव्हर्नर परळला राहायला आला होता. त्या मागोमाग बडे ब्रिटीश लष्करी व मुलकी अधिकारी, पारशी-गुजराती व्यापारी यांनी परेल-लालबाग भागात आपल्या प्रशस्त हवेल्या बांधल्या होत्या. दादाभाई पेस्तनजींचा ‘लालबाग’ बंगला आताच्या ‘हिला टॉवर’च्या जागी होता. त्यावरुनच त्या भागाला ‘लालबाग’ हे नांव मिळालं (#). लवजी नसरवानजी वाडीया यांची प्रशस्त हवेली ‘लवजी कॅसल’ होती, आताच्या ‘राजकमल स्टुडीओ’च्या जागी. इतर सामान्य लोकांची वस्ती लालबाग, परळ, नायगांव, शिवडी भागात होत होती, परंतु ती एकमेंकांपासून दूर असलेल्या, विखुरलेल्या लहान लहान वाड्यांच्या स्वरुपात. परळ, शिवडी ही गांवंच होती. परळ गांव तर आजही आपलं जुनं स्वरुप बरचसं टिकवून आहे आणि नायगांव नांवातच गाव आहे. शेत-वाड्या आणि त्याच्या आजुबाजुला वसलेल्या लहानलहान वस्त्या, असं ते स्वरुप होतं. आज वाड्या नामशेष झाल्या असल्या तरी, काही ठिकाणी त्या नावांमधे टिकून आहेत. उदा. घोडपदेवची डी.पी.वाडी, प्रभादेवीची नागु सयाजीची वाडी, लालबागची कल्याणदासवाडी, दादरची शिंदेवाडी व माधववाडी, नायगांवची मोराची वाडी इत्यादी. लालबागच्या मेघवाडीत तर आजही मळा पाहायला मिळतो व तेंव्हाची ग्रामिण मुंबई कशी दिलत असेल, याची थोडीशी कल्पना करता येते.

लालबाग, परळ, डिलाईल रोड, लोअर परेल, शिवडी, नायगांव परिसरात, जवळपाय वर्षाला दोन-तीन या वेगाने गिरण्या निघत होत्या. गिरणगांव हळुहळू आकाराला येत होता. लालबाग-परळच्या गिरण्या आता आणखी उत्तरेकडे, म्हणजे या गिरण्या दादर-प्रभादेवीच्या दिशेने कूच करत होत्या (१). सन १८६४ मधे प्रभादेवीच्या नजिक ‘धन मिल’ सुरु झाली. ही गिरणी ज्या ठिकाणी होती, तोच तो दादर-प्रभादेवीचा ‘धन मिल नाका’. त्याच वर्षी नायगांवला ‘नायगांव मिल’ सुरू झाली. सन १८८८ मधे शिवडीला ‘ज्युबिली’ व ‘युनियन’ अशा दोन गिरण्या सुरू झाल्या. १८८९ मधे दादर पश्चिमेला ‘सोराब वुलन मिल’ सुरू झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी दादर चौपाटीनजिक ‘टर्की रेड डाय गिरणी’ सुरू झाली. त्याच वर्षी प्रभादेवी येथे ‘बालादिना मिल’ सुरू झाली. सन १८९६मधे दादरला दोन गिरण्या एकदमच सुरू झाल्या. त्यातील एक ‘कोहिनूर’ नांयगावला, तर दुसरी ‘गोल्ड मोहोर’ दादर मेन रोडवर. या सर्व गिरण्या, गिररण्यांवर अवलंबून असलेले इतर उद्योग यात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती या परिसरात वाढत होती. या गिरण्यांच्या परिसरात काही खाजगी जमिन मालकांनी व काही गिरण्यांनी कामगारांसाठी चाळीही बांधल्या होत्या. या चाळींमधे राहायला सर्वच कामगार फार उत्सुक नसत, पण काही जण राहातही असत. रेल्वे-गिरण्या इत्यादीमुळे हळुहळू का होईना, भायखळा-माजगांव पलिकडच्या परळ, शिवडी, भोईवाडा-नायगांव, दादर परिसरात वस्ती वाढत होती. रेल्वे मार्गाच्या पूर्वेकडे असलेल्या परळच्या पुढची वस्ती होती, ती थेट दादर पश्चिमेला. दादर पूर्व अद्याप पाणथळ खाजण आणि त्यातच असलेल्या शेती-वाड्या असं काहीसं होतं.

गिरण्यां व इतर काही कारखान्यांतून काम करणाऱ्या बहुसंख्य कामगारांनी आपली राहाती जागा प्रामुख्याने माजगांव-मांडवी-भायखळा परिसरातली निवडली असली तरी, कारकुनी नोकरीत असलेल्या पांढरपेशांनी गिरगांव जवळ केलं होतं. जसजशी मुंबंई शहरातली गर्दी वाढू लागली, तसतशी ह्या पांढरपेशातल्या बहुसंख्यांकांनी, सुरु झालेल्या रेल्वेचा फायदा घेऊन, मधल्या लालबाग-परळला टांग मारून, थेट दादर पश्चिमेची वाट धरली होती. माहिम इलाख्याचाच भाग असलेल्या दादर पश्चिमेला जुन्या काळापासूनच बऱ्यापैकी वस्ती होती. ती ही आजच्या कबुतरखान्याच्या पुढे, पोर्तुगीज चर्चच्या आसपास. त्यात बक्कळ वाड्या होत्याव व त्या आजही आपलं नांव आणि बरचसं अस्तित्व व जुनं स्वरुप टिकवून आहेत. कबुतरखान्याच्या दक्षिणेला व पश्चिमेला असलेली ही वस्ती म्हणजे खरं दादर गांव. दादर येथे, आजुबाजुला सुरू झालेल्या कापड गिरण्या, मध्य रेल्वे (जुन्या काळातली GIP Railway) आणि पश्चिम रेल्वे (जुन्या जमान्यातली BB&CI Railway) दोन्ही रेल्वे स्टेशन्स, त्यामुळे कोटातल्या हापिसात कमी वेळात जायची झालेली सोय, यामुळेही दादर गांवात चाकरमान्यांची वस्ती व गर्दीही वाढत हेती.

त्यात भर पडली होती ती, आजच्या सन १८७९ मधे दादर पश्चिमेला सुरु झालेल्या ‘दादर डिस्टीलरी’मुळे (२). या डिस्टीलरीमधे ताडीपासून दारु गाळ्याचं काम होत असे. आजच्या कीर्तिकर मार्केटच्या जागी ही डिस्टिलरी होती. डिस्टीलरीत माल टाकायला नायगांव, परळ, शिवडी तर इकडे माहिम, दादर चौपाटीहून येणाऱ्या कष्टकऱ्यांच्या बैलगाड्यांची संख्या वाढायला लागली होती.

मध्य व पश्चिम रेल्वेचे मार्ग ओलांडून, पुर्वेकडून दादर पश्चिमेला येण्यासाठी किंवा उलट जाण्यासाठी त्या काळी एकच मार्ग होता. ‘दादर मेन रोड’ किंवा नुसताच ‘दादर रोड’. हा ‘दादर मेन रोड’. हा मार्ग सुरू होत होता, परळच्या पोयबावडीपासून. म्हणजे महानगरपालिकेच्या आजच्या ‘एफ साऊथ विभाग कार्यालया’पासून. पोयबावडीपासून निघालेला हा ‘दादर मेन रोड’, तसाच ‘हिन्दमाता’पर्यंत सरळ येऊन, तेंव्हाच्या व्हिन्सेन्ट रोडशी (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग) डाव्या बाजुला फारकत घेऊन, थेट आजच्या ‘कैलास लस्सी’ दुकानापर्यंत येत असे. ह्या रस्त्याला आज आपण ‘दादासाहेब फाळके रोड म्हणून ओळखतो.

कैलास लस्सी दुकानापाशी या दादर मेन रोडला, पुर्वेकडून नायगांवहून येणारा ‘नायगांव रोड’ मिळत असे आणि हे दोन्ही मार्ग त्याच ठिकाणाहून पुढचे दोन्ही रेल्वे मार्ग एकत्रितपणे ‘रेल्वे लेव्हल क्रॉसिंग’ ओलांडून, ‘दादर मेन रोड’ ह्याच नांवाने कबुतरखान्यापर्यंत जात. आज दादर पूर्वेहून रेल्वेमार्ग ओलांडून पश्चिमेला जाण्यासाठी किंवा उलट येण्यासाठी फुलबाजारानजिकचा जो ‘फुट ओव्हर ब्रिज’ ओलांडतो, त्या ठिकाणी पूर्वी ‘रेल्वे लेव्हल क्रॉसिंग’ होतं. मधले दोन्ही रेल्वेमार्ग ओलांडून इकडून तिकडे किंवा तिकडून येण्या-जाण्यासाठी असलेला, ह्या भागातील हा एकमेंव मार्ग होता. या लेव्हल क्रॉसिंगवर आता ताण येऊ लागला होता.

ही परिस्थिती आणखी बिकट होऊ लागली, ती साधारण १८९६ नंतर. इसवी सनाच्या १८९६च्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यासून मुख्या मुंबईत, (म्हणजे मांडवी-माजगांव-भायखळा हा दाटीवाटीच्या परिसरात) प्लेगची साथ उसळली. या साथीत मरणाऱ्या माणसांचा वेग एवढा भयानक होता की, आठवड्याला सरासरी २००० माणसं मरत होती. घरातल्या मेलेल्या एका माणसाला सरणावर जाळून परत येतायत तोवर, त्याच घरातलं दुसरं मयत तयारच असायचं. स्मशानांना उसंत नव्हती. सरणाच्या भट्ट्या २४ तास पेटत्या होत्या.

मरणाला घाबरून सर्वांना मुंबईबाहेर पळायची घाई लागली होती. कामगारांअभावी गिरण्या बंद पडत चालल्या होत्या. मुंबईतल्या जवळपास ७५ टक्के गिरण्या ह्या काळात बंद पडल्या होत्या. मुंबईच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येने तेंव्हा मुंबई सोडली होती. ज्यांना गाव होतं, त्यांनी गांव जवळ केलं. आणि उरलेल्यानी मुंबईबाहेर उपनगरांचा आसरा घेऊ केला. बरेच लोक १८९६ -१९०० या काळात सर्वात जास्त लोक मुंबईच्या बाहेर गेले, ते ठाण्याला. त्या खालोखाल लोक स्थिरावले, ते दादरला(४). तेंव्हा भायखळ्याच्या पुढे सर्व उपनगरंच होती. त्यातलं एक उपनगर म्हणजे दादर.

सन १८९६ नंत दादरला वाढू लागलेली वस्ती, पश्चिमेचा बाजार, डिस्टिलरी, रेल्वेमार्गांच्या मधलं देऊळ व त्यातलं गोधन, यामुळे या लेव्हल क्रॉसिंगहून रेल्वे मार्ग क्रॉस करुन, इथून तिथे व तिथून इथे येण्यात लोकांचा खोळंबा होऊ लागला. एव्हाना दोन्ही रेल्वेमार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. त्याचा परिणाम, लेव्हल क्रॉसिंगचं फाटक पूर्वीपेक्षा कमी वेळा उघडू लागलं होतं आणि ते जेव्हा उघडत असे, तेंव्हा बंदही चटकन होतं असे. उघडलेलं फाटक बंद होऊ नये यासाठी, पादचारी, फेरीवाले, बाजार करायला आलेले यांची इकडून फाटकं बंद व्हायच्या आत फाटक ओलांडायची एकच घाई होत असे. त्यातच बैलगाड्या. देवळाचं गो-धनही त्यातच. मोटारगाड्यानाही घाई. प्रत्येक वाहनचालकाला, पुढच्या गाडीला ओव्हरटेक करुन फाटक ओलांडायची घाई असे. त्यात समोरुन येणाऱ्या गाड्यांही तशाच घाईत असल्याने, लेव्हल क्रॉसिंग पार पाडणं म्हणजे मोठं दिव्य असे. भांडणं-मारामाऱ्या तर नित्याच्याच. कधी-कधी अपघातही होत असत. याचं उदाहरण म्हणून, दिनांक २६.०६.१८९८ रोजीच्या ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीकडे पाहाता येईल.

ही बातमी, दादर लेव्हल क्रॉसिंगवर झालेल्या एका अपघाताची आहे. मुंबई म्युनिसिपालीटीने, वांद्र्याच्या कत्तलखान्यात मारलेल्या जनावरांच्या मांसाची, वांद्रे व क्रॉफर्ड मार्केट येथे चढ-उतार करण्यासाठी गाडीवर जानू डेकलू या हमालाची नेमणूक केली होती. २४ जूनच्या रात्री सदर हमालाला, अशाच एका गाडीसोबत मुंबंईच्या दिशेने रवाना करण्यात आलं होतं. रात्र असल्याने जानू डेकलू गाडीच्या मागच्या बाजुला, खिडकीच्या बाहेर पाय ताणून आरामात झोपला होता. वांद्र्याहून माहिमचा कॉजवे ओलांडेपर्यंत, जानूचा डोळा लागला. मधला लेडी जमजेटजी मार्ग ओलांडून गाडी जेंव्हा दादर लेव्हल क्रॉसिंगवर आली, तेंव्हा फाटक उघडं असल्याने, ती फाटकातून पलिकडे जाण्यास निघाली. तेवढ्यात जानू डेकलूच्या गाडीच्या मागून येणाऱ्या गाडीने, फाटकतून जाताना जानू डेकलूच्या गाडीला उजवीकडून वेगात ओव्हरटेक केला. तो जानुच्या गाडीच्या इतक्या जवळून केला, की ती गाडी, बाहेर पाय काढून झोपलेल्या जानूच्या पायांना सापटून पुढे निघून गेली. ह्या अपघातात जानू डेकलूच्या दोन्ही पायांना गंभिर दुखापत झाली व त्याला लगेचंच जी. टी. हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.

प्लेगच्या साथीमुळे सरकारने शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला व त्यासाठी, सन १८९८-९९ मधे ‘सिटी ऑफ बॉम्बे इइंप्रुव्हमेंट ट्रस्ट (BIT)’ची स्थापना केली. या ट्र्स्ट मार्फत मुंबईची उपनगरांचा नियोजनबद्ध विकास हाती घेतला गेला आणि ‘दादर-माटुंगा विकास योजना क्रमांक ५’ राबवण्यास सुरुवात केली गेली. दादर पूर्व जन्माला येत गेलं, ते इथून पुढच्या २५-३० वर्षात. सरकारने हाती घेतलेली शहर सुधारणांची कामं, दोन्ही रेल्वेमार्गावर वाढलेली लोक्ल ट्रेन्सची वाहतूक, तान्सा-वैतरणा पाणी योजनेतून येऊ घातलेलं पाणी ह्याचा विचार करुन लोक उपनगरांचा आसरा घेऊ लागले होते. सर्वात जास्त पसंती होती, ती मुंबईच्या नजिक असलेल्या आणि दोन्ही रेल्वेंच्या संगमावर वसलेल्या दादर पश्चिमेला. दादर पूर्व अद्याप जन्माला यायचं होतं. इथून पुढे दादर म्हणजे, ‘दादर पश्चिम’ एवढं लक्षात ठेवावं.

पुढच्या ५-१० वर्षात दादरला वस्ती व त्यामुळे गर्दी वाढत होती. जागांचे भाव सर्वच ठिकाणी वाढते होते. त्यात सर्वात कमी भाव होते, ते दादरचे. यामुळेही दादरकडे लोकांचा ओढा वाढत होता. सन १९०४ ते १९०७ या दरम्यान मुंबईत जागांचे भाव काय होते, ते दर्शवणारा तक्ता सोबत जोडला आहे, तो पाहाता दादरच्या जागांचा भाव लक्षात येईल (५).

माहिती संदर्भ – Gazetteer of Bombai City & Island, Volume I – 1904.

‘बीआयटी’ने मुंबई शहरात कोंडलेली गर्र्दी मोकळी करण्याच्या दृष्टीने शहराची आखणी करायला सुरुवात केली. मुंबईत समुद्रावरून येणारी मोकळी हवा खोलवर आता यावी म्हणून पूर्व-पश्चिम जाणारे रस्ते आखले. त्यातला मुंबंईत सर्वात पहिला तयार झालेला रस्ता म्हणजे ‘प्रिन्सेस स्ट्रिट’. दादर पूर्व-माटुंगा परिसरात भराव टाकून तयार केलेल्या जमिनिंवर स्वच्छ व मोकळी हवा, भरपूर उजेड व सांडपाणी वाहून जाण्यासाठीच्या सुविधा असलेली घरं बांधण्याची योजना आखली. त्यासाठी दादर-माटुंगा योजनेला ‘गार्डन सिटी स्किम’ असं नांव दिलं. मुख्य मुंबईतही कामगारांसाठी ट्रस्टने चाळी बांधल्या. या घरांना आपण आज ‘बीआयटी’ चाळी म्हणून ओळखतो. याच दरम्यान मुंबई ते दार दरम्यानच्या रेल्वे लाईन्सच्या पूर्व आणि पश्चिम, अशा दोन्ही बाजुंना कापड गिरण्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही बाजुंना ये-जा करणारी रहदारीही वाढली होती. ही ये-जा रेल्वे लाईन्सवर असणाऱ्या लेव्हल क्रॉसिंगवरून होत होती आणि सहाजिकच तिथे वाहतुक कोंडी होणं नित्याचंच झालं होतं. म्हणून नगरपालिका (तेंव्हा ‘महानगरपालिका’ झाली नव्हती) आणि दोन्ही रेल्वे कंपन्यांनी मिळून, मधला रेल्वेमार्ग ओलांडून पूर्व-पश्चिम रहदारी सुरळीत होण्यासाठी जवळपास सर्व रेल्वे स्टेशन्सच्या नजिक पुल बांधण्याची योजना आखून ती राबवण्यास सुरुवात केली;काही ठिकाणी पुल तयारही होत आले. तशाच एखाद्या पुलाची योजना दादरसाठीही होती, मात्र तो नक्की कधी बांधायचा, याची काही ठोस योजना नव्हती. दादरला गर्दी व रहदारी वाढलेली असली तरी, दादर उपनगरात येत असल्याने, तसं काहीसं दुर्लक्षितही होत.

दादर मेन रोडवरूल लेव्हल क्रॉसिंगवर बराच वेळ थांबावं लागत असल्यामुळे, दादरकर आता वैतागले होते. त्याच प्रमाणे बराच वेळ फाटक उघडं राहात असल्याने, रेल्वेचं वेळापत्रक बोंबलत असल्याने रेल्वे कंपन्याही अस्वस्थ होत होत्या. शेवटी जीआयपी रेल्वे कंपनीच्या चीफ इंजिनिअरने, १४ ऑक्टोबर, १९०८ मध्ये मुंबई नगरपालिकेच्या एक्झिक्युटीव्ह इंजिनिअरच्या मदतीने, दादर लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणाऱ्या पुलाचा प्रस्तावित आराखडा नगरपालिकेच्या कमिशनरकडे पाठवून दिला. रेल्वे व नगरपालिका, अशा दोघांनाही या पुलाची आवश्यकता पटत होती. पण नगरपालिकेने, या पुलासाठी ठरावच केला नव्हता आणि ठराव झाल्याशिवाय काम सुरू करता येत नव्हतं. म्हणून जीआयपी कंपनीच्या एजंटने, नगरपालिका आयुक्तांना तसं पत्र लिहून ठराव करण्याची सुचना केली होती. जर नगरपालिकेने ठराव केल्यास, रेल्वे कंपनी पुलाच्या बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाचा व इतर तांत्रिक तपशील नगरपालिकेकडे सादर करेल, असं त्या पत्रात म्हटलं होतं. हा पूल बांधण्यासाठी येणाऱ्या अंदाजे खर्च रु. ७,५५,७४५/- पैकी निम्मा खर्च, म्हणजे रुपये ६,६०,४१३/- नगरपालिकेने उचलावा, असंही या पत्रात म्हटलं होतं. या पत्राविषयीची माहिती आयुक्तांनी पालिरेच्या आम सभेत, पालिकेचे एक सदस्य हाजी युसूफ हाजी इस्माईल यांच्या विचारणेवरून दिली होती. सदर पत्राचा तपशील, दिनांक २६ एप्रिल, १९१० रोजीच्या ‘The Bombay Chrinicle’ या वृत्तपत्रात पान क्रमांक ६ वर प्रसिद्ध झाला होता-

सरकारी खलिते इकडून तिकडे आणि तिकडून आणखी पलिकडे येत होते, जात होते. लोक मरतही होते. अशीच एका अपघातात, केशव रघू नांवाचा, ४५ वयाचा रेल्वे हमाल लोकल ट्रेनखाली येऊन मरण पावला.

वाहतूक तुंबत होती, फाटक क्रॉस करणारांमधे भांडणं होत होती. सरकारी कागदी घोडे संथ गतीने हलत होते. लोकही कंटाळले होते. तात्पुरता उपाय म्हणून, दादरच्या प्रतिष्ठीत नागरिकांनी रेल्वे कंपन्यांना पत्र लिहून, फाटक बंद असेल तेंव्हा रेल्वे लाईन्स पार करु इच्छिणाऱ्या पादचाऱ्यांसाठी तरी ‘विकेट गेट्स’ खुली ठेवावीत, अशी सुचना करण्यास सुरुवात केली. असंच एक सुचना-पत्र दादरच्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे, डॉ. मोरेश्वर चिंतामण उपाख्य एम. सी. जावळे यांनी केली होती. डॉ. जावळे हे पुढे नगरसेवक (तेंव्हाच्या भाषेत नगरपिते) व नंतर नगरपालिकेचे महापौरही झाले(६).

पुढची दोन-तीन वर्ष पत्रा-पत्रीतच गेली. शेवटी झोपलेल्या सरकारने कुस बदलली. सन १९११ मधे, दोन्ही रेल्वे कंपन्यांचे प्रतिनिधी, इम्प्रुव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नगरपालिकेचे कमिशनर यांची दादर येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाबाबत बैठक झाली(१२). या बैठकीत सर्व अडचणींचं निराकारण करण्यात आलं आणि पुलाचा आराखड्याला अंतिम स्वरुप ठरवण्याक आलं. ऑगस्ट या बैठकीत सदर पुलाचा आराखडा मंजूर करण्यापूर्वी येत असलेल्या बारीक सारीक अडचणी व त्यांच्या निराकारणावर चर्चा झाली. परंतु तत्पुर्वी, १५ फेब्रुवारी १९१३ या दिवशी, मुंबई नगरपालिकेने, सन १९०८ मधे बांधायचं म्हणून ठरवलेल्या दादर ओव्हरब्रिजच्या बांधकामाला उशीर का होतोय, याची कारणे शोधावीत असा ठराव केला. मात्र लगेचंच पुढच्या ५ महिन्यांत नगरपालिकेच्या रोड समितीने (Road Committee), १९१३ च्या जुलै महिन्याच्या ६ तारखेला, दादरला बांधण्यात यावयाच्या प्रस्तावीत पुलाबाबत आपला अहवाल दिला. यानंतर लगेचंच, म्हणजे २१ जुलै १९१३ या दिवशी नगरपालिकेने दादरचा पुल बांधण्यासाठीचा ठराव मंजूर केला.

या अहवालात एका ऐवजी दोन पुल बांधायचा प्रस्ताव दिला होता व या दोन्ही पुलांच्या एकत्रित प्रकल्पाला ‘दादर ओवरब्रिज स्किम’ असं नांव देण्यात आलं होतं. या दोन पुलांपैकी एक पुल, दादर रोडच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात यावा आणि तो केवळ पादचाऱ्यांसाठीचा ‘फुट ओव्हर ब्रिज’ असावा, तर दुसरा पुल दादर स्टेशनच्या उत्तर दिशेला बांधण्यात यावा आणि हा पुल गाड्यांच्या वाहतुकीसाठी असावा, असा प्रस्ताव होता. या दोन पुलांपैकी, लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणाऱ्या पुलाचं नांव ‘दादर रोड ओव्हरब्रिज’ असं ठेवण्यात आलं;तर वाहतुकीसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाचं नांव, ‘दादर ओव्हरब्रिज’ असं ठेवण्यात आलं. यातला पहिला पुल म्हणजे, दादर फुल बाजारातून सुरु होऊन, कैलास लस्सीच्या दुकानापाशी उतरतो तो. आणि दुसरा, म्हणजे दादर स्टेशनच्या उत्तरेला बांधण्यात येणारा ‘दादर ओव्हरब्रिज’ म्हणजेच आपला सध्याचा ‘टिळक ब्रिज’. यापुढे आपण फक्त ‘टिळक ब्रिजविषयी'(च) माहिती घेणार आहोत.

कमिटीच्या अहवालात सुचवल्याप्रमाणे, दादरला बांधण्यात येणाऱ्या पुलांबाबत, नगरपालिका आयुक्त, दोन्ही, म्हणजे GIP आणि BBCI रेल्वे कंपन्यांचे एजंट आणि इंप्रुव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यात चर्चा झाली. आज जशा मुंबई शहराच्या विकासासाठी मुंबई महानगरपालिका, म्हाडा, एमएमआरडीए इत्यादी एकापेक्षा जास्त संस्था जबाबदार असतात, तशाच तेंव्हा तेंव्हा नगरपालिका आणि बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट(BIT) या संस्था होत्या. रेल्वे मार्गावरुन पुल जायचा असल्याने, दोन्ही रेल्वे कंपन्याही त्यात होत्यां आज मुंबई महानगरपालिका, म्हाडा आणि एमएमआरडीए या संस्था असून, त्यांच्यात एकमेकांच्या हद्दीवरून वाद असतात. एकमेकांच्या हद्दी या यंत्रणा काटेकोरपणे सांभाळतात. इतक्या काटेकोरपणे की, एकवेळ भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीन एकमेकांच्या हद्दवरुन समझोता करतील, पण या यंत्रणा नाही. तेंव्हाही तसंच होतं. म्हणून त्यांच्यात समन्वय होणं आवश्यक होतं. आणि त्यासाठीच त्यांच्या एकत्रित बैठक झाली.

या बैठकीत दोन्ही पुलासंबंधी काही तांत्रिक गोष्टी एकमताने ठरवण्यात आल्या (७). त्या म्हणजे, दोन्ही रेल्वे कंपन्या मिळून या पुलाचं बांधकाम करतील. पुलाची एकूण रुंदी ६० फूट असेल;ज्यात मधला ४० फुट रुदीचा रस्ता वाहनांसाठी असेल, तर पुलाच्या दोन्ही बाजुंना पादचाऱ्यांसाठी प्रत्येकी १० फुटांचे फुटपाथ बांधण्यात येतील. पुलाच्या दोन्ही दक्षिणोत्तर बाजुंना पुलावर येण्या-जाण्यासाठी पुटपाथ्सच्या बाजुला मार्ग असावेत. पुलाच्या बांधकामासाठी लागणारी नगरपालिकेच्या हद्दीतील जागा, नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, तर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टने यांच्या मालमत्तेतील लागेल तेवढी जागा पुलांसाठी उपलब्ध करून द्यावी. BBCI रेल्वे लाईन बाहेरचा तुळशी पाईप रस्ता (आता सेनापती बापट मार्ग) नगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने, त्याच्यावरून नगरपालिकेने वाद निर्माण करू नये. वाद झालाच, तर तो रेल्वे कंपन्या आणि नगरपालिकेने आपापसात सामंजस्याने मिटवावा. पुलांच्या प्रस्तावित जागेवर जर काही जमिनीखालील गटारे, पाईप्स वैगेरे असतील किंवा नव्याने टाकावे लागले, तर त्याची व्यवस्था नगरपालिकेने आपल्या खर्चाने करावी.

दादर मेन रोडवर बांधण्यात येत असणाऱ्या प्रस्तावित फूट ओव्हर ब्रिजच्या बांधकामाचा खर्च नगरपालिकेने करावा. तस्रच हा पुल बांधताना, दोन्ही रेल्वे लाईन्सच्या मध्ये असलेल्या श्री धर्मदेवेश्वराच देऊळ आणि तेथील दुकानांमध्ये जाण्या-येण्यासाठी आवश्यक त्या पायऱ्यांची (access) योजना करावी, जेणेकरून लोकांना तिथे ये-जा करणे सोयीचे होईल. हा पुल बांधून झाल्यावर तो रेल्वे कंपन्यांच्या ताब्यात द्यव आणि तेथून पुढे हा पुल रेल्वे कंपनीची मालमत्ता होईल व त्याची देखभाल-दुरुस्ती त्या कंपन्या करतील.

साधारण पाच वर्षांपूर्वीच्या अंदाजानुसार, दादर मेन रोड रेल्वे क्रॉसिंगच्याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित दादर ओव्हरब्रीजच्या बांधकामाच्या एकूण खर्चाचा अंदाज रुपये  ७,५५,७१५/- मात्र काढण्यात आला होता. त्यात रुपये ६,६०,४१३/- नगरपालिकेच्या वाट्याला येणार होता. परंतु सुधारित अंदाजानुसार, आता नगरपालिकेच्या वाट्याला रुपये ४,००,०००/- एवढाच खर्च येणार होता. नगरपालिकेच्या वाट्याचा खर्च कमी होण्याच एक्मेंव कारण म्हणजे, नव्याने बांधण्यात येणारा दादर ओव्हरब्रीज, लेव्हल क्रोसिंगच्या जागे ऐवजी, दादर स्टेशनच्या उत्तरेला बांधण्यात येणार होता. नवीन ठिकाणी लोकवस्ती फारशी नसल्याने, पुलासाठी जागा संपादन करणे, ड्रेनेजची हलवाहलवी करणे यात काहीच खर्च येत नसल्याने, हा खर्च कमी झाला होता. शिवाय नगरपालिकेच्या वाट्याला येणाऱ्या ४ लाखाच्या खर्चातच, लेव्हल क्रोसिंगच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या फुट ओव्हर ब्रिजचा खर्च अंतर्भूत होता.

नवीन बांधण्यात येणाऱ्या दादर ओव्हरब्रिजवर पूर्वेकडून येणारा रस्ता (म्हणजे आजच्या दादर टी. टी.वरून), इम्रुव्हमेन्ट ट्रस्टच्या मालकीच्या जागेतून येत होता. जर नगरपालिकेला हि जागा हवी असल्यास, नगरपालिकेला इम्रुव्हमेन्ट ट्रस्टला २८,००० रुपये द्यावे लागले असते. परंतु नवीन ओव्हर ब्रिज झाल्यानंतर, इम्रुव्हमेन्ट ट्रस्टच्या मलिकच्या जागेचा थेट संपर्क पूर्वेकडे होणार असल्याने, इम्रुव्हमेन्ट ट्रस्टच्या जागेची किंमत वाढणार होती आणि म्हणून ट्रस्टने हि जागा कोणताही मोबदला न घेता नगरपालिकेला ताब्यात द्यावी असे ठरले. या संपूर्ण चर्चेचा तपशिल दिनांक ७ जुलै १९१३ रोजीच्या ‘The Bombay Chronicle’ आणि ‘The Bombay Gazette’ या दोन्ही अग्रगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.

वर लिहिल्याप्पमाणे, जुलै १९१३ मधे संबंधीत यंत्रणांमधे बैठक झाली आणि पुलाचे आराखडे बनवायला सुरुवात झाली. दिनांक १५ जानेवरी १९१४ रोजी, नगरसेवक डॉ. जावळे यांनी नगरपालिकेत ठराव केला की, दादर ओव्हरब्रिजचे आराखडे तसार करताना दादरच्या नागरिकांच्या सुचना, गाऱ्हाणी, शंकाही ऐकून घेतल्या जाव्यात. ह्या ठरावास अन्य एक नगरसेवक डॉ. बाटलीवाला यांनी अनुमोदन दिलं व ठराव मंजूर झाला(८).

दादरच्या बहुसंख्य नागरिकांना हा पुल हवा होता. परंतु दादरवर प्रेम करणाऱ्या काही नागरीकांनी मात्र, ‘दादरला खरंच या पुलाची गरज आहे का’, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, या पुलामुळे दादरच्या सौंदर्याला बाधा येणार होती. कारण, एव्हाना दादरच्या पुर्वबाजुला इंम्प्रुव्हमेन्ट ट्रस्टने हाती घेतलेल्या ‘गार्डन सिटी’ प्रकल्पाला आकार येऊ लागला होता. दादरच्या पुढे पार माटुंग्यापर्यंत सर्व मोकळंच असल्याने, माटुंग्यापर्यंतंचा विस्तिर्ण परिसर सारं स्वच्छपणे नजरेच्या टप्प्यात येत असे. दूरवरचा सायनचा किल्ला, वडाळ्याच्या लहान लहान टेकड्या इथून दिसू शकत असत. ट्रस्टमार्फत दादर पूर्व-माटुंगा भागातली खाजणं बुजवबन तिथपर्यंतच्या जमिनीचं सपाटीकरण झालं होतं. हिन्दु कॉलनी, पारसी कॉलनी अद्याप जन्माला आलेल्या नसल्या तरी, त्यांची आखणी झाली होती. विस्तिर्ण रस्ते, शेजारी लावलेली झाडं, दूरवर दिसणारं ‘किंग्स सर्कल’, माटुंग्याला मधेच दिसणारं जीआयपी रेल्वेचं वर्कशॉप, माहिमच्या सोराब गिरणीचं धुरांड हे सारं एकीकडे, तर दुसरीकडे पश्चिम्च्या बाजुला, माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावरच दिसणारे आंब्या-नारळीचं घनदाट बन. मधे फार काही अडथळा नसल्याने, दादर स्टेशनातल्या पुलावर उभं राहिलं, की हे दूरवरचं मनोहारी दृष्य सहज दिसू शकत होतं. दादर ओव्हरब्रिज बांधला तर, हे सर्व दृष्य दिसेनासं होणार आहे, दादर ओव्हरब्रिजमुळे आजुबाजुचा निसर्ग खुजा होऊन जाईल, असं काही नागरिकांचं म्हणणं होतं. प्रश्न वाढत्या रहदारीचाच असेल तर, त्यासाठी दोन-तीन किलोमिटरवर तयार झालेला ‘एल्फिन्स्टन ब्रिज’ आहेच की, त्या पुलावरून लेडी जमशेटजी रस्त्यावर येता येतच, मग कशाला हवा हा नविन पुल, असंही त्यांचं म्हणणं होतं. राहता राहिला दादर रेल्वे क्रॉसिंगवर तुंबणाऱ्या गर्दीचा, तो प्रश्न जरा डोकं वापरून हाताळता येईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली होती. त्यासाठी त्यांनी चर्चगेट येथील लेव्हल क्रॉसिंग हाताळणीचं उदाहरणही दिलं होतं.

सन १९२५-२६ साली टिळक पुलावरून काढलेला हिंदू कॉलोनी परिसराचा फोटो. संदर्भ – श्रीमती उज्वला आगासकर, वस्छातू विशारद आणि याचित्र पत्रकार

मी, वरील परिच्छेदात जे काही लिहिलं आहे, त्यात जराही अतिशयोक्ती नाही. वरील मुद्द्यांचा अंतर्भाव असलेली, मिस्टर एस. एल. लोपेझ यांची, वर्तमानपत्रात दिनांक १९.०१.१९१४ आणि दिनांक २०.०२.१९१४ रोजी प्रसिद्ध झालेली दोन पत्र उपलब्ध आहेत. ती पत्र काही दादरप्रेमी नागरिकांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून पाहायला हरकत नाही. असाच विरोध काही वर्षांपूर्वी, दादर टि. टि.वरुन जाणाऱ्या ‘जगन्नाथ शंकरशेठ उड्डाणपूला’ला झाला होता. तेंव्हाही दादरप्रेमी नागरिकांनी, या उडाजणपुलामुळ, दादर टि.टि.च्या सौंदर्याला बाधा येईल, असं म्हटलं होतं. दादर टि.टि. परिसरातलं ब्रिटिशकालीन स्थापत्य सौंदर्य पाहिलं की, इथून जाणाऱ्या नागरिकांनी पुलालाठी का विरोध केला होता, ते लक्षात येतं..! असो.

इकडे दादरची परिस्थिती आणखी बिघडत होती. त्यात १९१४ सालात, डिस्टीलरीच्या समोरच्या बाजुला ‘कस्तुरचंद मिल’ सुरू झाली आणि तिथले कामगार, कापसाच्या गासड्या घेऊन येणाऱ्या बैलगाड्या, मिलमधून तयार माल घेऊन जाणाऱ्या गाड्या इत्यादींचा भार पुन्हा त्या लेव्हल क्रॉसिंगवर येऊ लागला. तिकडे नगरपालिका, रेल्वे कंपन्या आणि इंप्रुव्हमेन्ट ट्रस्टच्या यंत्रणा, एकत्रितपणे दादर ओव्हरब्रिजचे आराखडे तयार करण्यातच गुंतल्या होत्या. दादर व्यतिरिक्त इतर स्टेशन्सनजिकचे पुल तयार होऊन लोकांच्या सेवेतही आले होते. महालक्ष्मी स्टेशनजवळचा पुल वाहतुकीसाठी सुरु झाला होता. पलिकडच्या ‘एल्फिन्स्टन रोड’ स्टेशननजिकचा ‘एल्फिन्स्टन ब्रीज’ तयार झाला होता. तो कोणत्याही क्षणी रहदारीसाठी खुला केला जाण्याच्या बेतात होता. ‘करी रोड’चा ब्रिजच्या पुर्वेकडचा(भारतमाता सिनेमाकडे जाणारा) उतार तयार होत होता. ‘डिलाईल रोड’च्या पुलाच्या बांधकामासाठी जागेचं संपादन सुरू होतं(१०). दादरचा पुल मात्र अद्याप कागदावरही जन्मला नव्हता.

होता होता १९१५ साल उजाडलं आणि जवळपास अर्ध्याहून अधिक काळ तसंच गेलं. शेवटी जीआयपी रेल्वे कंपनीच्या इंजिनिअर्सनी तयार केलेले आणि बीबीसीआय रेल्वे कंपनीच्या प्रतिनिधींनी मान्यता दिलेले दादर ओव्हब्रिजचे आराखडे(plans) त्यावर्षाच्या ऑगस्ट महिन्यात नगरपालिकेला मिळाले. नगरपालिकेकडे प्लान्स आले, कागदावर का होईना, दादर ओव्हरब्रिज जन्माला आला एकदाचा..!

पण थांबा. या पुलाचा जन्म एवढा सोपा नव्हता. पुलाचे आराखडे नगरपालिकेच्या ताब्यात आले आणि पालिकेच्या लक्षात आलं की, या पुलाचं पश्चिमेकडील टोक प्लान्समधे ज्या ठिकाणी उतरलेलं दाखवलंय, ते त्या ठिकाणी उतरवण्यास मंजूरी द्यायची तर, नगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर त्या परिसरातल्या सर्व मालमत्ता ताब्यात घ्याव्या लागणार आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार. नगरपालिकेकडे तेवढ्या पैशाची तरतुद नसल्याने, काहीतरी अन्य उपाय शोधावा लागणार, असं लक्षात आलं.

आता काही काळ इथे थांबून, आजच्या टिळक पुलाच्या पश्चिम टोकाकडे येऊ. दादरच्या टिळक ब्रिजचं पूर्व बाजुचं टोक दादर टि टिपासून काही अंतरावर सुरू होतं, तर पश्चिमेकडचं टोक कोतवाल गार्डनपाशी आहे. आपण येता-जाता सहज निरिक्ष केलं तरीही आपल्या लक्षात येतं की, टिळक ब्रिज या ठिकाणी बाकीच्या इतर पुलासारखा संपत नाही. नं. चि. केळकर रस्त्यात हा ब्रिज विलिन होतो. एकिकडे प्लाझा तर दुसरीकडे कबुतरखान्याच्या दिशेने जाणारा रस्ता, इथुनच या पुलाचा पुर्वेकडे जाण्याचा चढ सुरू होतो. मधलं कोतवाल गार्डनही इतर गार्डन्ससारखं सपाट नसून उतार असलेलं आहे. याचं एकमेंव कारण म्हणजे, या परिसरातली दादरची पश्चिम बाजू, पूर्व बाजूपेक्षा काहीशी सखल आहे. आणि जर पुलाची पश्चिम बाजू, रेल्वे कंपन्यांकडून आलेल्या प्लान्सप्रमाणे बांधायची, तर हा पूल समोर असलेल्या (आताच्या) आरे. के. वैद्य मार्गावर उतरवावा लागला असता. त्यासाठी या ठिकाणी पूर्वापार असलेल्या मालमत्ता नगरपालिकेला ताब्यात घ्याव्या लागल्या असता व त्यास भरपूर खर्च आला असता. या साठी दुसरा उपाय म्हणजे, इकडे प्लाझा सिनेमापासून, तर तिकडे ‘धी गिरगाव पंचे डेपो’ यांच्या दुकानापासुनच्या जागेत भराव घालून, ती उंच करुन या संपूर्ण भागाची उंची टिळक पुलाच्या पश्चिम उताराशी मिळवावी. अर्थात त्यासाठीही काही खाजगी मालमत्ता ताब्यात घ्याव्या लागणार होत्या, पण तुलनेने कमी आणि त्यासाठीही खर्च येणार होता. म्हणून त्या प्रकारे प्लान्समधे दुरुस्ती करावी म्हणून नगरपालिकेंने ते प्लान्स पुन्हा रेल्वे कंपनीकडे पाठवून दिले.

नगरपालिकेने तशी भरणी करायचं ठरवलं तरी निधी हा लागणारच होता. त्याची तरतुद नसल्याने, पुलाचं काम रखडणार हे निश्चित हेतं. रेल्वे कंपन्या त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या पुलाचं काम करणार होत्या व पूर्व-पश्चिमेच्या बाजुंचं काम नगरपालिका करणार होती. रेल्वे कंपन्यांनी जरी पुलाचं काम करायचं ठरवलं किंवा केलं, तरी जोपर्यंत नगरपालिकेच्या हद्दीतलं पूर्व-पश्चिम बाजुंच्या उतारांचं काम होत नाही, तो पर्यंत पुल होणार नव्हता, हे आता स्पष्ट झालं.

प्रकरण फारच आस्ते कदम चाललं होतं. दादरकरांचा संताप अनावर होत होता, तरी त्यांनी अद्याप संयम बाळगला होता. दादरकरांनी दादरचा ओव्हरब्रिज लवकर बांधावा याची मागणी करायला सुरुवात केली. स्थानिक वर्तमानपत्रातून लोकांची मागणी उचलली जाऊ लागली(११). जो पर्यंत नविन ओव्हब्रिज तयार होत नाही तोवर, निदान पादचाऱ्यांना रेल्वेलाईन्स पार करण्यासाठी रेल्वेचा, त्यांच्या प्रवाशांकरता असलेला पूल वापरू द्यावा आणि त्या पुलाच्या दोन्ही बाजू वाढवून, त्या पूर्व आणि पश्चिम बाजुंच्या रस्त्यांशी जोडाव्यात, अशी मागणी दादरकरांकडून पुढे येऊ लागली. मात्र रेल्वे कंपन्यांनी, सदर पुल हा फक्त रेल्वेच्या प्रवाशांकरता असून, तो जर सर्वांना वापरायची परवानगी दिली, तर रेल्वेचे प्रवासी कोणते व पुल पार करणारे इतर लोक कोणते, यावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचं सांगून, दादरकरांची मागणी धुडकावून लावली. तसेच, लेव्हल क्रॉसिंगच्या दोन्ही बाजुंचा रस्ता फेरीवाल्यांनी अडवलेला असल्याने, रहदारीला अडथळा निर्माण होतो. यावर रेल्वे कंपन्यांनी मार्ग काढावा, या दादरकरांच्या विनंतीला, सदर बाब आमच्या हद्दीत येत नाही, त्यामुळे आम्ही पेलिस कमिशनरांना त्यात लक्ष घालण्यास विनंती करतो, असं सांगून दादरकरांची ही मागणीही धुडकावून लावली. अगदी आजही विविध प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांची एकमेकांची ‘हद्द’ यांच्यात किंचितही फरक पडलेला नाही. या सामान्य नागरिकांचं हीत भरडलं जातं, याचा त्यांना काही फरक पडत नाही. तेंव्हाही पडत नव्हता आणि आजही.

दादरकरांच्या संतापावर फुंकर घालण्यासाठी, नगरपालिकेने दिनांक ३० सप्टेंबर १९१७ रोजीच्या वर्तमानपत्रात,जाहीर नोटीस प्रसिद्ध करून, तीत पुलाला होत असणाऱ्या विलंबाची कारणंजनतेसमोर ठेवली(१३). सन १९१७-१८ या सालात दादर ओव्हर ब्रिजच्या बांधकामाच्या दृष्टीने विशेष असं काही घडलं नाही.  १९१८-१९ आणि १९१९-२० मधेही दादर ओव्हर ब्रिजचे आराखडे, पुलाचा पश्चिम उतार, तेथील रस्त्याशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने दुरुस्त करणे चालले होते. रेलेवे कंपन्यांकडे पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने, जवळपास सर्वच पुलांची कामे रखडली होती. मुंबई नगरपालिकेला डीलाइल रोड आणि दादर येथील पुलांच महत्व लक्षात येत होत, परंतु त्यानाही फार काही कर्ता येत नव्हता (१४).

सन १९२०-२१ मध्ये नगरपालिकेने दादर रोड फुट ओव्हर ब्रिज (कैलास लस्सी नजीकचा) बांधण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली, परंतु त्यासाठी काही खाजगी मालकीच्या मालमत्ता ताब्यात घ्याव्या लागणार होत्या. त्यासाठी Land Acquisition Officer (भू संपादन अधिकारी ) नेमण्यात आले. तिकडे बांधण्याच्या दृष्टीनेही तयारी सरू झाली.

१९२१ सालचा सप्टेंबर-ऑक्टोबर महिना सुरु झाला तो दादरकरांसाठी आनंदाची बातमी घेऊनच. बी बी सी आय रेल्वेने नवीन आराखडे मंजूर करून, त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या प्दादार ओव्हर ब्रिजचे प्राथमिक काम सुरु केले., तर तिकडे दादर रोड ओव्हर ब्रीज्साठी आवश्यक असणाऱ्या मालमत्ता नगरपालिकेने ताब्यात घेतल्या. फक्त तीन मालमत्ता धारक, त्यांना मिळणारा मोबदला समाधानकारक नसल्याने हाय कोर्टात गेले.

आता दादरच्या दोन्ही पुलांच काम व्यवस्थित मार्गी लागल होत. दादर फुट ओव्हर ब्रीज्साठी ताब्यात घेतलेल्या मालमत्तांचा नगरपालिकेने कब्जा घेतला. ज्या तीन मालमत्तांचे मालक हाय कोर्टात गेले होते, त्यांच्या पैकी एकाची तक्रार हाय कोर्टाने निकालात काढली आणि ती मालमत्ताही नगरपालिकेच्या ताब्यात आली. दादरच्या दोन्ही पुलाचे काम समाधानकारक रित्या पुढे सरकत असतानाच कुठेतरी माशी शिंकली. १९२३ च्या जानेवारी महिन्याच्या आरंभाला दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या पोलादाचा पुरवठा विस्कळीत झाला. काही काळ तो थांबलाही आणि पर्यायाने दोन्ही पुलांच्या बांधकामाची गती मंदावली.

पोलादाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे, दादरच्या दोन्ही पुलांच्या बांधकामाची मंदावलेली गती, पुढच्या दोन एक महिन्यात पोलाद पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा तेज झाली आणि मार्च १९२४ पर्यंत पुल तयार होत आले. फुट ओव्हर पुलाच्या पुर्व आणि पश्चिम बाजूकडील पायऱ्यांचे काम, अद्याप ताब्यात न आलेल्या तिथल्या मालमत्तांमुळे रखडले होते. नगरपालिकेच्या मालमत्ता संपादनाच्या विरुद्ध हाय कोर्टात गेलेल्या सर्व मालकांचे दावे हाय कोर्टाने फेटाळले आणि या मालमत्ता नगरपालिकेच्या ताब्यात आल्या. आता हा पूलही लवकर पूर्ण होऊन, नागरिकांच्या वापरासाठी खुला केला जाईल आणि खाली असलेल्या लेव्हल क्रॉसिंगवरील भार कमी होईल अशी चिन्ह दिसू लागली होती.

दादर ओव्हर ब्रिजचे काम मात्र जोरात सुरु होते. लवकरच हा पुल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे वाटू लागलं आणि तसं झालंही.

दिनांक १० सप्टेंबर १९२५ हा दिवस, दादरकरांसाठी आनंदाची बातमी घेऊनच उजाडला. या दिवशी ‘दादर ओव्हर ब्रिज’ नगरपालिकेने वाहनांसाठी आणि नागरिकांसाठीही खुला केला (१५). अर्थात या पुलाचं किरकोळ काम, जसं फुटपाथ तयार करणं, त्यावर लाद्या बसवणं वैगेरे अद्याप शिल्लक होतं, पण ते पुलावरील रहदारी सुरू असतानाही करता येण्यासारखं होतं.

फुल बाजाराकडील लेव्हल क्रॉसिंगवरचा वाहनांचा भार (Vehicular Traffic) एकदम कमी झाला. फुल बाजार-कैलास लस्सी नजीकचं दादर रोड लेव्हल क्रॉसिंग वाहनांसाठी बंद केल गेल. लेव्हल क्रॉसिंगवर पादचाऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेला फुट ओव्हर ब्रिज अद्याप पूर्ण न झाल्याने, लेव्हल क्रॉसिंग केवळ पादचाऱ्यासाठी खुलं ठेवलं गेलं.

दादर ओव्हरब्रिज पूर्ण होऊन दादरकरांच्या सेवेत रुजू झाला असला तरी, फुल बाजारानजीकचा फूट ओव्हर ब्रिज अजून रखडला होता. तो पुढे १९३०-३१ मध्ये पूर्ण झाला आणि दादरकरांसाठी खुला केला गेला. या ब्रिजवरून, दोन्ही रेल्वेंच्यामध्ये असलेल्या ‘श्री धर्म देवेश्वराच्’या देवळात येण्या-जाण्यासाठी या पुलावरून खास पायऱ्यांची तरतूद करण्यात आली, जी आजही पाहाता येतो. फुट ओव्हरब्रिज तयार झाल्याने, खाली असलेलं दादर रोड लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात आलं. मात्र त्यामुळे, श्री धर्मदेवेश्वराच्या देवळातल्या गायींच्या येण्या-जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर तोडगा काढण्यासाठी, रेल्वे कंपन्यांचे प्रतिनिधी, नगरपालिकेचे अधिकारी आणि देवळाचे विश्वस्त यांत चर्चा झाली. चर्चेच्या बऱ्याच फेरींअंती, गायींच्या येण्या-जाण्यासाठी दोन्ही रेल्वेनी पुलाच्या खालच लेव्हल क्रॉसिंग, काही अटी आणि शर्तींवर, सकाळी आणि संध्याकाळी काही वेळासाठी उघडण्याच मान्य केल(१६) आणि हा प्रश्न सुटला.

वरच्या परिच्छेदात थोडक्यात विषद केलेली ‘दादर रोड ओव्हरब्रिज’ची कथा आपण इथेच सोडून देऊ आणि आपल्या कथानायकाच्या, म्हणजे ‘दादर ओव्हरब्रिज’च्या, म्हणजेच ‘टिळक ब्रिजच्या’ पुढच्या कथेकडे वळू.

दादर ओव्हर ब्रीजच नामकरण “टिळक ब्रिज’ होताना – 

गुरुवार दिनांक १० सप्टेंबर १९२५ रोजी दादर ओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी सुरु झाला हे खर असलं तरी, तोवर त्याच नामकरण ‘टिळक ब्रिज’ असं झालं नव्हत. तो ओळखला जात होता, तो ‘दादर ओव्हर ब्रिज’ या नावानेच. अर्थात या पुलाच ‘टिळक ब्रिज’ अस नामकरण कराण्यासाठीच्या हालचाली पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर लगेचच सुरु झाल्या होत्या. इग्रजी अंमलात, देशी पुढाऱ्यांचं नांव एखाद्या सार्वजनिक रस्त्याला किंवा पुलाला देणं तेवढंसं सोपं नव्हतं. त्यासाठी नगरपालिकेच्या स्थानिक नगरपित्यांचं एकमत होणं आवश्यक होतं. दादर ओव्हरब्रिजचं नामकरणं ‘लोकमान्य टिळक ब्रिज’ असं व्हावं यासाठी मुंबई नगरपालिकेत एस. एल. सिलम आणि दादरचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजाराम केशव उपाख्य आर. के. वैद्य, मोहनलाल देसाई या नगरपित्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांना साथ मिळाली होती ती, आर. एस. अस्वले, जमनादास मेहता यांची.

या पुलाच नांव टिळक ब्रिज अस होण्यापूर्वी, नगरपालिकेत घनघोर चर्चा  झाली होती.  दिनांक २६ नोव्हेंबर १९२५ या दिवशी, नगरपिते एस. एल सिलम यांनी, दादर पूर्वेला नव्यानेच तयार केलेल्या रस्त्याला ‘लोकमान्य टिळक रोड’ असं नांव देण्याची सूचना केली (१७). नवीनच तयार झालेला हा रस्ता म्हणजे, वडाळ्याच्या चार रस्त्यावरून, वडाळा बस डेपो, पुढच बी इ एस टी. वर्कशॉप करत, खोदादाद सर्कलला वळसा घालून, टिळक ब्रिजच्या पुर्व पायथ्याशी येतो तो. ज्या दिवशी ही चर्चा झाली, तेंव्हा ‘टिळक ब्रिज’ पूर्ण झाला नव्हता, त्यामुळे त्यांनी ह्या रस्त्यासोबतच आणि नव्याने तयार होत असलेल्या दादर ओव्हर ब्रिजलाही टिळकांचे नांव द्यावे,  अशीही सूचना केली. या रस्त्याला आणि पुलाला टिळकांच नाव का द्यावं, याच कारण विषद करताना सिलम म्हणाले के, भविष्यात हा रस्ता नागरिकांकडून सर्वात जास्त वापरला जाणार आहे, ज्या प्रमाणे टिळकांनी आपल आयुष्य गरीब, कष्टकरी जनतेसाठी खर्ची घातलं, त्याच प्रमाणे हा रस्ता नागरिकांच्या उपयोगी येणार आहे. म्हणून ह्या रस्त्याला ‘लोकमान्य टिळकाचं’ नांव देन उचित होईल.

आर. के वैद्यांच्या मनात मात्र वेगळच काहीतरी होत. त्यांच्यामते ह्या रस्त्यापेक्षा लालबाग-परळसारख्या कामगार भागातल्या एखाद्या मोठ्या रस्याला टिळकांच नांव देणं उचित ठरेल. मात्र त्यांनी सिलम यांच्या सूचनेला हरकत न घेता, मुंबईतल्या एखाद्या अन्य व्यस्त रस्त्याला टिळकांच नांव द्यावं, ही आपली सूचना मांडून, हा मामला मुनिसिपाल कमिशनरांच्या विचारार्थ पाठवून द्यावा, असे सांगितले.  सिलम यांच्या सुचनेला अनुमोदन दिल.  दुसरे एक नगरपिते, आर. एस. अस्वले, यांनी अनुमोदन दिलं. एस. डी. नवलकर या नगरपित्यांनी सिलम यांच्या सूचनेला थेट हरकत घेतली नाही, मात्र जर का वैद्य यांना लोकमान्य टिळकांची स्मृती त्यांच्या वार्डात जपायची असेल तर, त्यांनी टिळकांचं नांव त्यांच्या शाळेला द्यावं. ते जास्त संयुक्तिक होईल. नवलकर यांच्या बोलण्याचा रोख, वैद्य यांच्या पुढाकाराने दादरला नव्याने सुरु केलेल्या शाळेकडे होता.

बी. एन गमाडीया नगरपित्याने वेगळाच मुद्दा मांडला. या नवीन रस्त्याला टिळकांच नांव दिलेलं टिळकांनाच अडचीत आवडणार नाही. कारण हा रस्ता, सिलम म्हणाले त्यानुसार, गरिबांच्या काहीच उपयोगाला येणार नाही. हा नवीन रस्ता जास्तकरून श्रीमंत आणि गाडीधारक वापरणार. त्यामुळे, उद्या ज्या रस्त्यावरून सुसाट गाड्या पळणार आहेत, त्या रस्त्याला गरिबांचे कैवारी समजल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकांचे नांव देणे योग्य होणार नाही, असं गामडीया म्हणाले.

गामडीया असे म्हणताच, सभागृहातले अन्य सदस्य खवळले. जमनादास मेहता आणि गामडीया यांच्यात वाक्युद्ध सुरु झालं. नगरपालिकेत या विषयावर चाललेली चर्चा वादाचे वळण घेत आहे असे पाहून, जे. बी. बोमन बेहराम यांनी, रस्ता आणि पुलाच्या नामकरणाचा विषय नगरपालिकेच्या रोड कमिटीकडे सोपवावा, अशी सूचना केली. बोमन बेहराम यांच्या सूचनेला मोहनलाल देसाई यांनी अनुमोदन दिल.

आता नगरपालिकेच्या कमिशनरानी चर्चेत हस्तक्षेप केला.  कमिशनर म्हणाले, वडाळा चार रस्त्यापासून दादर ओव्हरब्रीज पर्यंत येणाऱ्या मोठ्या आणि नवीन रस्त्याला ‘लोकमान्य टिळक रोड’ रस्ता असे नांव देण्याच्या सूचनेस, कमिशनर या नात्याने त्यांची काहीच हरकत नाही. त्यानाही ती सूचना आवडली असल्याच सांगून, तिचा विचार करता येईल असं सभागृहाला सांगितले. सभागृह संपता संपता, जमनादास मेहता म्हणाले की, जर दादर ओव्हर ब्रिजला आणि रस्त्याला लोकमान्य टिळकांच नांव देता येत नसेल तर, मुंबईतल्या दोन मोठ्या रस्त्यांना टिळकांच नांव द्याव. एक रस्ता ‘लोकमान्य रोड’ तर, दुसरा ‘टिळक रोड’. त्याने टिळकांचा सन्मान आणखी वाढेल, असं जमनादास मेहता म्हणाले.

त्यादिवशीच सभागृह तिथे स्थगित झाल.

त्यानानातर दोन महिन्यांनी, ७ जानेवारी १९२६ रोजी आर के वैद्य यांनी,  नगरपालिका कमिशनरानी, दादर ओव्हर ब्रीजच नामकरण ‘टिळक ब्रिज’ अस लवकरात लवकर करावं, असा  प्रस्ताव सभागृहासमोर सादर करण्याची नोटीस पाठवली. त्याप्रमाणे कमिशनरांनी सभागृसमोर प्रस्ताव सादर केला. तत्पूर्वी दादर ओव्हर ब्रीजच नामकरण ‘टिळक ब्रिज’ असा करण्याचा प्रस्ताव असल्याच, बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टलाही कळवण्यात आले. ट्रस्टला तो प्रस्ताव नामंजूर असण्याचा विषयच नव्हता. हा विषय संपूर्णपणे नगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने, त्यावर नगर पालिकेनेच निर्णय घ्यायचा होता. परंतु, प्रोटोकोल म्हणून ट्रस्टला कळविण्यात आले होते. कमिशनरांनी ठेवलेल्या या प्रस्तावावर, दिनांक १२ एप्रिल १९२६ या दिवशी नगरपालिकेत चर्चा झाली (१८).

चर्चेच प्रास्तविक करताना कमिशनर म्हणाले की, ‘लेडी जमशेटजी मार्गापासून सुरु होणारा दादर ओव्हर ब्रिज, विन्सेंट सर्कल (आताचा खोदादाद सर्कल) पार करून पुढे वडाळ्यापर्यंत जातो. या संपूर्ण मार्गाला लोकमान्य टिळकांचे नांव देण्यास काही हरकत नाही. परंतु हा रस्ता वडाळा येथे, थेट भाऊच्या धक्क्यावरून येणाऱ्या आणि पुढे किंग्स सर्कलपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला (आताचा ‘वडाळा चार रस्ता’ वा ‘रफी अहमद किडवाई मार्ग’) मिळतो.  भाऊच्या धक्क्यावरून सुरु होऊन किंग्स सर्कलला मिळणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याच्या जोड रस्ता म्हणून नव्याने बांधलेल्या दादर ओव्हर ब्रिज आणि पुढच्या रस्त्याला, वास्तविक, टिळकांसारख्या मोठ्या व्यक्तीचे नांव देणे उचित होणार नाही. त्या ऐवजी दादर ओव्हर ब्रिज ते वडाळा या जोडस्त्याला ‘बल्लार्ड रोड’ अस नांव देणे आणि टिळकांच नांव अन्य कुठल्यातरी मुख्य रस्त्याला देवे योग्य झाले असते. तथापि, नगरपालिका सदस्यांना जर का या  रस्त्याला टिळकांचे नांव देण्याची इच्छा असेल, ते नांव स्वीकारण्याची नगरपालिकेची तयारी आहे.” नगरपिते आर. के. वैद्य यांनी कमिशनाराच्या प्रस्ताविकाला विरोध करून, टिळकांच्या नांवाचा आग्रह धरला.

नगरपालिकेचे अन्य एक सदस्य, बैरामजी जीजीभोय यांनी दादर ओव्हरब्रीज आणि पुढच्या रस्त्याला टिळकांचे नांव देण्यास विरोध केला नाही,  मात्र भाऊचा धक्का ते किंग्स सर्कल पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला मुंबईचे आद्य गव्हर्नर ‘जेराल्ड ओंजीये (Gerald Aungier – गव्हर्नर पदाचा कालावधी 14 July 1669 to30 June 1677. ह्या ब्रिटीश गव्हर्नरने, आज दिसणाऱ्या मुंबईची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली आहे. ) यांचे नांव देण्याचा प्रस्ताव मांडला. असा प्रस्ताव मांडताना त्यांनी, ‘ Bombay one day would be one of the brightest jewels of the British Crown’ असे उद्गार काढल्याचे सांगून, मुंबईची सरावच क्षेत्रातली एकूण घोडदौड पाहता, त्यांचे म्हणणे खरे ठरल्याचे सांगितले.

बैरामजी जीजीभोय यांच्या म्हणण्याला बी. टी. देसाई या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. देसाई म्हणाले की, मुंबईतल्या रस्त्यांना ब्रिटीश गव्हर्नर्स आणि व्हाईसरायची नांव देण्याचे दिवस आटत सरलेत. या पुढे मुंबईच्या रस्त्याने नावं दिली जातील ती फक्त आणि फक्त भारतीय जनतेसाठी उभा आयुष्य खर्ची घालणाऱ्या लोकांची. हा नवीन दादर ओव्हरब्रीज आणि त्यापुढच्या रस्त्याला टिळकांचे नांव देण्याचा सभागृहाचा आग्रह असल्याचे, देसाई यांनी ठासून सांगितले. सभागृहाचा एकंदर कल पाहता, दादर ओव्हरब्रीज आणि त्या पुढे वडाळा चार रस्त्यापर्यंत जाणाऱ्या सरळ रस्त्याला ‘टिळक ब्रिज आणि टिळक रोड’ असे नांव देण्याचे नगरपालिकेने ठरवले आणि १९२६-२७ या सालात (नेमकी तारीख उपलब्ध नाही) दादर ओव्हर ब्रिजचे नामकरण ‘टिळक ब्रिज’ असे झाले (१९). 

दिनांक ३० जानेवारी १९२९ रोजी टिळक ब्रीजच रेलेवे कंपनीकडून नगरपालिकेकडे हस्तांतरण झाले. या दिवसापासून पुढे या पुलाची देखभाल-दुरुस्ती नगरपालिकेचे जबाबदारी झाली. नगरपालिकेला या पुलासाठी रुपये ५,१४,६४५ /- मात्रचा (दादर फुट ओव्हर ब्रिजच्या खर्चासहित) खर्च आला (२०). मूळ अंदाजपत्रकात रुपये ४ लाखाचा खर्च अपेक्षित होता. मात्र पुलाचा पश्चिमेकडील उतार, म्हणजे आजच्या कोतवाल गार्डननजीकचा, लेडी जमशेटजी रस्त्याशी जुळवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरणी करावी लागल्याने, खर्चात वाढ झाल्याचे दिसते. पुलाचे इंजिनिअर होते माकिंसोन (Makinson)

अगदी आजही टिळक ब्रिज नागरिकांच्या सेवेत आहे. अर्थात, त्याची अनेकदा दुरुस्ती केली गेली आहे. तरीही तो सक्षमपणे सेवा देत आहे. टिळक ब्रिज ते पार वडाळा बी इ एस टी डेपोवरून जात चार रस्त्याला मिळणारा रस्ता आजही ‘टिळक रोड(एक्स्टेन्शन)’ हे नांव धारण करून उभा आहे.

टिळक ब्रिजच्या खालीही पूर्वी एक अनधिकृत रेल्वे – क्रॉसिंग होतं . पादचारी मधले दोन्ही रेल्वेमार्ग ओलांडून इकडून तिकडे व तिकडून इकडे येत जात असत. इथून वाहन ये-जा करू शकत नसत. हा लोकांनी निर्माण केलेला शोर्टकट असावा. म्हणून तो अनधिकृत. टिळक ब्रिज पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग बंद झाला असावा.

येत्या काही वर्षात महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीच सुतोवाच केल आहे. कदाचित ते काम लगेचच सुरु केल जाईल. त्यानंतर हा ऐतिहासिक पुल दादरकरांच्या आणि मुंबईकारांच्याही नजरेसमोरून  नाहीसा होईल.  नवीन पुल उभा राहील. जुन्या पुलाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून हा लेखनप्रपंच..!

फोटो संदर्भ – ‘झी’ न्यूज, इंटरनेट.
  • @ नितीन साळुंखे

93218 11091

टीप – ‘टिळक पुला’संबंधीची ह्या लेखात न आलेल, जास्तीची आणि तेवढीच मनोरंजक माहिती, ब्रिजचं बांधकाम सुरु असतानाचे फोटो, त्या काळाच्या वर्तमानपत्रात ह्या पुलाच्या बांधकामाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रण इत्यादी माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

संदर्भ-

(*) भारतातील पहिली ट्रेन सन १८३७ म्धे मद्रासमधे, म्हणजे आताच्या चेन्नईमधे धावली. ही ट्रेन औद्योगिक व बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी बांधण्यात आली होती. मुंबईत सुरु झालेली रेल्वे, दुसऱ्या क्रमांकाची मात्र प्रवासी रेल्वे म्हणून पहिली.

संदर्भ-The Military Engineer in India- Vol. II- 1936- Author Lieut. Colonel E. W. Sandespage- pages 38 & 104.

(**) कावसजी नानाभांई दावर यांनी सुरू केलेली, ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ रुढ अर्थाने कापड गिरणी नव्हती. या गिरणी नामक कारखाण्यात फक्त कापूस पिंजणे आणि त्याचं सूत कातणे एवढीच कामे होत असत.

संदर्भ- Bombay industries : the cotton mill : a review of the progress of the textile industry in Bombay from 1850 to 1926 and the present constitution, management and financial position of the spinning and weaving factories.- Author S. M. Rutnagur-published in 1927

(#) Glimpses of old Bombay & Western India, with other papers- author James Douglas- Published in 1904. Page-111

(१) गिरण्या संदर्भ-BOMBAY INDUSTRIES;THE COTTON MILLS-Part I- Author S. M. Rutnagur-Published in the year 1927.

(२) डिस्टिलरी संदर्भ- The Gazetteer of Bombay City & Island-1909; Volume-III- Page 255-257.

(३) ‘दासावा’ संदर्भ- पुस्तक ‘मी व दादरचे सार्वजनिक जीवन’; लेखक-राजाराम केशव वैद्य- सन १९६३- पृष्ठ २२-२३.

(४) प्लेगच्या साथीतलं लोकांचं पलायन संदर्भ- The Gazetteer of Bombay City & Island-1909; Volume-I ; Page 349.

(५) दादर जागा दर संदर्भ- The Gazetteer of Bombay City & Island-1909; Volume-I ; Page 328.

(६) संदर्भ-पुस्तक ‘मी व दादरचे सार्वजनिक जीवन’; लेखक-राजाराम केशव वैद्य- सन १९६३- पृष्ठ ८५.

(७) बातमी- The Bombay Gazette; dated 07.07.1913; Page 3.

बातमी -The Bombay Chronicle; dated 07.07.2013; Page 8.

(८) बातमी- The Bombay Chronicle; dated 16.01.1914; Page 8.

(९) बातमी- The Bombay Chronicle; dated 19.01.1914; Page 10 & 25.02.1914; Page 8.

(१०) Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay- for the year 1913-14; Page 13 & 173.

(११) पारशी फायर टेम्पल कंपाऊन्ड, दादर पूर्व येथे राहाणाऱ्या, विष्णू ओक यांचे दिनांक २९.१२.२०१६ रोजीच्या, ‘The Bombay Chronicle’मधे पान क्रमांक ३ वर प्रसिद्ध झालेलं पत्र.

(१२) The Bombay Chronicle; dated 05.10.1917; Page 5

(१३) The Bombay Chronicle; dated 21.09.1917 ; Page 2

(१४) Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year 1918-19 & 1919-20. Pages ; ix, 9 and viii, ix, 11 & 155 respectively.

(१५). Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year १९२५-२६; Pages ; १५९.

(१६) Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year १९३१-३२ ; Pages ; १५९.

(१७) The Bombay Chronicle; dated २७.११.१९२५ ; Page ८ 

(१८) The Bombay Chronicle; dated १३.०४.१९२६ ; Page ७

(१९) Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year १९२६-२७ ; Pages ; १०, १४८.

(२०) Review by the Standing Committee of the Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year 1928-29 ; Pages ; १०, १४८.

दादरचं कोतवाल गार्डन आणि तेथील पहाटेचे भाजीवाले –

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा –

दादरचं कोतवाल गार्डन आणि तेथील पहाटेचे भाजीवाले –

दादरचा टिळक ब्रिज पश्चिमेकडे ज्या ठिकाणी उताराला लागतो, त्या उतारावरच महानगरपालिकेचं ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान’ आहे. अर्थात ह्या उद्यानाला वीर भाई कोतवाल याचं नांव दिलं गेलं ते खूप नंतर. दिनांक ३ मार्च १९४७ रोजी भरलेल्या तत्कालीन नगरपालिकेच्या सभेत, नगरपालिकेच्या विशेष समितीने, ‘दादरच्या टिळक ब्रिजच्या पश्चिम उतारावर असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे नांव ‘वीर हुतात्माभाई कोतवाल’ असे करावे हा ठराव मंजूर केला आणि तेंव्हापासून हे उद्यान ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान’ म्हणून ओळखू जाऊ लागले (1). परंतु तत्पूर्वी हे उद्यान, सुरुवातीचा काही काळ, ‘दादर ओव्हर ब्रिज पार्क’ आणि नंतर ‘दादर टिळक ब्रिज गार्डन’ या नावाने नगरपालिकेच्या दफ्तरात नोंदवलेले होते.

ह्या उद्यानाचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. पण त्यासाठी थोड मागे जाऊन पाहणं आवश्यक आहे.

ही गोष्ट आहे साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीची. सन १८९६ साल संपता संपता मुंबई शहरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला आणि हां हां म्हणता पुढच्या चार-दोन वर्षात त्यात हजारो माणसे मृत्युमुखी पडली. सरकार खडबडून जागे झाले आणि उपाययोजना करण्याच्या मागे लागले. औषधोपचार वैगेरे सुरु केले होतेच, पण सरकारने प्लेग कमिटी बनवून प्लेगच्या प्रदुर्भावामागे असलेली कारणे शोधून काढण्यचे ठरवले. त्यात अस्वच्छता, सांडपाण्याचा निचरा न होणं ही मुख्य कारणं पुढे आली. सरकारने त्या कारणांचं निराकारण करण्यासाठी, ‘दी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट (BIT)’ स्थापन करून लगेचंच शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. प्लेग ही त्याकाळात आलेली महामारीच होती, पण मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भावही नित्याचा होता. दरवर्षी मलेरीयाने शेकडो माणसं मृत्युमुखी पडत असत. मलेरियामागेही मुख्य कारण होतं, सांडपाण्याचा योग्य तो निचरा न होणं आणि त्या साचून राहिलेल्या सांडपाण्यात होणारी डासांची पैदास. थोडक्यात आता आलेला प्लेग काय किंवा नित्याचा मलेरिया काय, त्या मागे अस्वच्छता आणि त्यातून डांस-उंदीर-घुशींची पैदास होत राहाण आणि त्यातून रोगराईचा प्रसार होणं, हे मोठं कारण होतं.

मुंबईत सुरु झालेल्या गिरण्यांमुळे, मुंबईची ओळख जरी औद्योगिक शहर अशी बनत चालली असली तरी, मुंबईत अजूनही शेती होतं होती. शेती होत असल्यामुळे मुंबईत विहिरी आणि लहान मोठी तळी तर शेकड्यांनी होती. ह्या विहिरी आणि तळ्यांच्या आजूबाजूची पाणथळ, दलदलसम जागा म्हणजे डास-उंदीर-घुशींची आवडती ठिकाणं. तत्कालीन नगरपालिकेने उंदीर-घुशी आणि डासांचा बंदोबस्त करावा म्हणून ह्यातील बहुतेक तळी बुजवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामागे आणखीही एक कारण होत. ते म्हणजे मुंबईत सुरु झालेली नळ-पाणी योजना.

विहार, तुळशी आणि तानसा पाणी योजना सुरु होण्यापूर्वी मुंबईतल्या लोकांची पाण्याची गरज भागवली जात असे ती, मुख्यतः विहिरी आणि ठिकठिकाणी असलेल्या तळ्यांच्या माध्यमातून. औद्योगिकरणामुळे सतत वाढणाऱ्या मुंबईची तहान भागवण्यास पुढे पुढे ह्या विहिरी आणि तळी अपुरी पडू लागली. म्हणून ब्रिटीश सरकारने मुंबईनजीकच्या गावांत धरणं बांधून, तिथून मोठमोठ्या पाईपलाईन्सच्या माध्यमातून मुंबईत पाणी आणण्याची योजना आखली आणि ती कार्यान्वित केली. या योजनेचा पहिला टप्पा साकारला, तो ‘विहार योजने’चा. ही योजना १८६०-६१च्या सुमारास कार्यान्वित झाली आणि पुढच्या काहीच वर्षात तुळशी, पवई आणि तानसा इत्यादी पाणी योजना मुंबईत सुरु झाल्या. विसाव्या शतकाच्या प्रारंभाच्या दोनेक दशकातच मुंबईत नळाने पाणी येण्यास सुरुवात होऊ लागली आणि पुढे हळूहळू मुंबईकर नागरिकांचं, पाण्यासाठी असणारं विहिरी आणि तलावांवरचं अवलंबित्व कमी होऊ लागलं(2).

मुंबईत सुरु झालेली नळपाणी योजना, त्यानंतर तलाव-विहिरींची भासेनाशी झालेली गरज, अस्वच्छतेमुळे नेहेमीच उद्भवत असणाऱ्या मलेरिया, प्लेग वैगेरे आजारामुळे, सरकारने मुंबई शहरातील तलाव बुजवण्याचे ठरवून, त्याजागी उद्यानं, मैदानं तसेच सरकार आणि नगरपालिकेची सार्वजनिक कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. मुंबई शहरात ठिकठिकाणी असलेले तलाव बुजवून त्याठिकाणी सार्वजनिक उपयोगाच्या जागा निर्माण करण्यीस सुरुवात केली. घेतले. आपल्या डोळ्यासमोरची अशी नेहेमीची उदाहरणं सांगायची तर, माहीमच्या ‘श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरा’च्या सानिध्यात असलेला, ‘सिटी लाईट’ सिनेमाच्या समोरचा  ‘गोपी टॅंक’ बुजवून, त्यावर मार्केट बांधलं. गोपी टॅंक बुजवला गेला असला तरी, शिवाजी पार्क नॉर्थवरून, माहिम मार्केटला जाणाऱ्या रस्त्याच्या नांवात आजंही ‘गोपी टॅंक रोड’ टिकून आहे. तिथुनच थोड्या अंतरावर असलेल्या, माहीमच्या ‘श्रीशितलादेवी मंदिरा’च्या समोरच्या बाजूस असलेला लहानसा तलाव बुजवून, त्याजागी ‘पोस्ट ऑफिस’ बांधलं. ते आजही पाहाता येतं. ‘श्रीसिद्धिविनायक मंदिरा’च्या समोर असलेला ‘नर्दुल्ला टॅंक’ बुजवून तिथे बगीचा तयार केला, तर दादर पूर्वेला असलेल्या ‘नायगाव टॅंक’मध्ये भरणी करून तिथे ‘फायर ब्रिगेड स्टेशन’साठी जागा उपलब्ध करून दिली.

आपल्या दादरला असलेलं ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान’ असंच एका तलावाच्या जागेवर उभारलेले आहे.

आताच्या ‘वीर कोतवाल उद्याना’च्या जागेवर पूर्वी ‘हंसाळी टॅंक’ होता. मुंबईतल्या इतर तलावांप्रमाणे, हा तलावही तसा खूप जुना. तेंव्हाच्या दादरची मुख्य वस्ती होती, ती पोर्तुगीज चर्चच्या आसपास. आताचा ‘कबुतरखाना’ म्हणजे तेंव्हाच्या दादरचा मध्यबिंदू होता आणि आताचा टिळक पुल ही उत्तरेकडची हद्द होती(3). आज कोतवाल उद्याना समोर असलेला ‘आर. के. वैद्य’ रस्ता, त्या काळी ‘हंसाळी टॅंक लेन’ म्हणून ओळखला जात असे. शिवाजी पार्कनजीक असलेल्या समुद्रावर त्याकाळी चिटपाखरुही फिरकत नसल्याने, संध्याकाळी सूर्यास्तानंतर किनाऱ्यावर जाण्यास लोक घाबरत असत. त्यामुळे त्यातल्या त्यात निवांतपणे एकत्र येऊन गप्पा मारण्याचं ठिकाण म्हणजे ह्या हंसाळी तलावाचा काठ होता.

आज हा तलाव अस्तित्वात नाही. अगदी माहिमच्याच गोपी टॅंकप्रमाणे, तो रस्त्याच्या किंवा त्या परिसराच्या नांवातही अस्तित्वात नाही. पण या तलावाची एक खूण इथे आजही अस्तित्व टिकवून आहे. त्या खुणेचा इतिहास माहित नसल्याने, कधीकाळी या ठिकाणी तलाव अस्तित्वात होता, हे आपल्या लक्षातही येत नाही.

तुम्ही दादरला येता-जाता, कधीतरी कोतवाल उद्यानावरुन ये-जा केली असेल. या उद्यानाच्या शेजारी, ‘प्लाझा सिनेमा’च्या अगदी समोर असलेल्या वाहतुक बेटावर तुम्ही एका भाजीवाल्याचा सुरेख पुतळ्यावर आपली कधीतरी नजर गेली असेलच. त्या पुतळ्याकडे पाहून, हा पुतळा इथे कशासाठी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. किंवा नसेलही. तसा प्रश्न पडण्याचं काहीच कारण नाही. कारण या परिसराशी परिचित असणाऱ्या प्रत्येकाला, या ठिकाणी भल्या पहाटेपासून ताज्या भाज्या ठोक भावात विक्री करण्याचा उद्योग चालतो, हे माहित असतं. त्यामुळे, त्या परिसराची खूण म्हणून हा पुतळा इथे उभारला गेला असावा, असा अंदाज आपण तो पुतळा पाहून मनातल्या मनात बांधतो. आपण तसा अंदाज बांधला असेल, तर तो काही अगदीच चुकीचा होणार नाही.

कोतवाल उद्यानाच्या परिसरात दररोज पहाटे भरणारा भाजी बाजार, तसा दादर स्टेशनपासून दूर आहे. पुन्हा तो पुलावर आहे. तसाच तो पुलाच्या खाली, सेनापती बापट मार्गावरही आहे. दादरच्या टिळक पुलावरुन सेनापती बापट मार्गावर जाणासाठी, पिलाझा सिनेमाला लागुनच एक दगडी जीना आहे. तिथून खाली उतरलं, की थेट आपण रेल्वेलाईन शेजारच्या भाजी बाजारातच पोहोचतो. हा देखील मोठा भाजी बाजार आहे. प्लाझा सिनेमाच्या मागेही मंडई आहे. ही मंडई ज्या जागेवर आहे, तिथे पुर्वी भांडारे नांवाच्या व्यक्तीचं ‘श्रीनंद थिएटर’ होतं (4). थिएटर पत्र्याचं व अस्थायी स्वरुपाचं होतं, पण त्यात बालगंधर्व, पु. ल. देशपांडे वैगेरेंसारख्या दिग्गजांनी या थिएटरच्या रंगमंचावर अदाकारी केली होती. आज या ठिकाणीही भाजी बाजार आहे. या भाजीबाजाराच्या पलिकडे, थेट सेनापती बापट मार्गापर्यंत मळे आणि शेतीवाड्या होत्या

कोतवाल उद्यानाचा परिसरातला भाजी बाजार, तिथून जवळच असणारा नि टिळक पुलाच्या खाली, रेल्वेमार्गाच्या लगतच्या ‘सेनापती बापट मार्गा’वरचा भाजी बाजार, प्लाझा सिनेमामागची मंडई, ही ठिकाण अगदी एकमेंकाला लागून आहेत. मधला टिळक पुल जर क्षणभरासाठी डोळ्यांसमोरून अदृष्य केला, तर हा एकाच विशाल भाजी बाजाराचा भाग असल्याचं आपल्या लक्षात येईल..! हा जो भाजी बाजारााचा विशाल भाग आहे, हिच कोतवाल उद्यानाच्याजागी, कधीकाळी अस्तित्वात असलेल्या ‘हंसाळी तलावा’ची खूण आहे.

दादरला बीबीसीआय रेल्वे (BB & CI Railway- आजची पश्चिम रेल्वे) आणि जीआयपी रेल्वे (GIP Railway- आजची मध्य रेल्वे) अशा दोन्ही कंपन्यांच्या रेल्वेलाईन्स एकत्र येत असल्याने, दादर पुर्वीपासूनच महत्वाचं ठिकाण होतं. लालबाग-परळनंतरची सर्वात मोठी वस्ती होती, ती दादर पश्चिमेला. त्यामुळे इथे पहिल्यापासुनच बाजाराचं ठिकाण होतं. दादरच्या टिळक पुलावरच्यी आणि पुलाखालच्या भाजी बाजाराची मुळं इथे सापडतात.

दिनांक १६ एप्रिल १८५३ या दिवशी बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे धावली आणि मुंबईचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. मुख्य मुंबईत धडाधड गिरण्या सुरू होत होत्या आणि त्या भागात असलेली शेती त्या गिरण्यांखाली गडप होत होती. मुख्य मुंबईची लोकसंख्या वाढत होती व त्याचं प्रमाणात त्या लोकसंख्येची भाजी-दुधाची मागणीही वाढत होती. मुंबईतील लागवडीखालील जमिन कमी कमी होत गेल्याने, मुंबईतील लोकांना भाजी-तरकारी पुरवण्याची जबाबदारी दादर-माहिम परिसरातील आणि त्या पलिकडील उपनगरांतील मळेवाल्यांवर आली होती.

साधारण १८६७ च्या आसपास मुंबईत पहिली विरार लोकल सुरु झाली. वसई-विरारवरून दादरला लोकलने भाजी आणण्याची प्रथा तेंव्हापासून सुरु झाली असावी. भल्या पहाटेच मुंबईच्या दूरवरच्या उपनगरांतून, म्हणजे वसई-विरारहून, पहाटेच्या पहिल्या लोकल गाडीने येणारे भाजीवाले, तेंव्हा त्यांना ‘वसईवाले’ अस सर्रास म्हटल जायचं, या तलावाच्या काठावर एकत्र येत. सोबत आणलेली भाजी-फळे हंसाळी तलावाच्या पाण्यात स्वच्छ धूत आणि नंतर त्याची विक्री करत (5).

सन १९२० च्या आसपास हा तलाव बुजवला गेला. तिथे कधीकाळी तलाव होता, हे देखील अनेकांना माहित नाही. टिळक पुलाविषयी माहिती मिळवता मिळवता, अवचितच ही अनमोल माहिती माझ्या हाती लागली आणि कोतवाल उद्यानाच्या परिसरात होणाऱ्या भाजी विक्रीचं, मला पडलेलं गूढ उलगडलं. तलाव धरणीच्या पोटात गडप झाला असला तरी, त्या ठिकाणी होणाऱ्या पहाटेची भाजी विक्रीच्या स्वरुपात तो तलाव, ‘हंसाळी टॅंक’, इतिहासात लुप्त झालेल्या आपल्या पाऊलखुणा, जवळपास १००-१५० वर्ष अबोलपणे टिकवून आहे..! प्लाझा सिनेमासमोरच्या ट्राफिक आयलंड वर त्या भाजीवाल्याचं प्रतीकात्मक शिल्प उभारून, महापालिकेनेही त्या १००-१५० वर्षांच्या हिरव्यागार परंपरेचा उचित सन्मान केला आहे, अस म्हणता येईल..!

या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मुंबई शहरातील इतर तलावांप्रमाणे, ’हंसाळी टॅंक’ही बुजवला. तलाव बुजवण्यासाठी परिसरात असलेल्या सोराब मिल (नंतरची रुबी मिल), कोहिनूर मिल, कस्तुरचंद मिल आदी गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जाळलेल्या कोळशाचा राखेचा मोठ्याप्रमाणावर उपयोग केला गेला होता. कोळशाच्या राखेमुळे बुजवलेल्या तलावाच्या जागी जे मैदान तयार झाले, त्याच्या मातीचा रंग काळा दिसत असे. त्यामुळेदादरकर नागरिकांनी त्या मैदानाचे नांव ‘काळे मैदान’ असे ठेवले..! (6).

हा तलाव जेंव्हा बुजवण्यात आला, तेंव्हा टिळक ब्रिज अस्तित्वात नव्हता. त्याचा कागदावर जन्म होत होता. पुलाच्या पश्चिम बाजूचा उतार खूपच पुढे जात होता. म्हणून हंसाळी तलावाची भरणी करताना, ती पुलाच्या उताराशी जुळेल एवढी उंच करण्यात आली. आजही आपण जर नीट निरीक्षण केलं, तर लक्षात येईल की, दादरचा टिळक ब्रिज हा इतर ब्रिज सारखा रस्त्याला मिळालेला नसून, रस्ताच थोडा उंच होऊन पुलाच्या उताराला भेटायला गेला आहे. याच कारणाने, कोतवाल गार्डन नेहेमीसारखं जमिनीच्या समपातळीत नसून, ते उतारावर वसलेलं आहे. त्याला कारण टिळक ब्रिजच्या आराखड्यांमध्ये, ब्रिज उतरवण्यासाठी केलेला बदल. नगरपालिकेने हे गार्डन तयार केलं, तेच मुळी ‘टेरेस गार्डन’ प्रकाराने..!

सन १९२५ मधे टिळक ब्रिज वाहतुकीला खुला केला गेला (टिळक ब्रिजची संपूर्ण जन्मकहाणी माझ्या टिळक ब्रिजविषयीच्या लेखात वाचता येईल), तेंव्हा बुजवलेल्या हंसाळी तलावाच्या जागी केवळ मैदान होते. टिळक ब्रीजचही नामकरण अद्याप व्हायचं होत. टिळक ब्रीजच तेंव्हाच नांव होत, ‘दादर ओव्हरब्रीज’. म्हणून या ब्रिजच्या पश्चिम उतारावर असलेल्या या मैदानाला, त्याच्या मातीच्या रंगावरून लोकांनी दिलेलं नांव ‘काळे मैदान’ असं असलं तरी, सरकारी दफ्तरात याची नोंद ‘दादर ओव्हरब्रिज रिक्रिएशन ग्राउंड’ असं होतं. टिळक ब्रिजचं ‘टिळक ब्रिज’ अस नामकरण १९२८-२९ सालात झाल. तेंव्हाही हे मैदानाच होतं. तिथे बाग तयार करण्यात आली नव्हती.

हे काळे मैदान लोकांमध्ये खूपच लोकप्रिय होते. लोकांची एकमेकांना भेटण्याची ही जागा होती. ह्या ठिकाणी लहान सभाही होत असत. याच्या खुणा आजही दिसून येतात. दादरचं कोतवाल उद्यान अनेक ग्रामस्थ मंडळाच्या वार्षिक सभांच, अनेकांच्या गाठी-भेटीच ठिकाण आहे, त्याला असा इतिहास आहे.

याच काळे मैदानावर, १९२६ सालात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी महाराष्ट्रातला सर्वात पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला होता (7).

दिनांक २० जून १९२८ या दिवशी नगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर करून, या मैदानाच्या जागेवर बगीचा आणि लोकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला. अशी बाग आणि सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी रुपये १९,९८९/- मात्रच्या खर्चाची, ‘मे. मार्सलॅंड प्राईस ॲंड कंपनीची लिमिटेड’ निविदा मंजूर करण्यात आली आणि पुढच्या वर्षभरात टिळक ब्रिजच्या उतारावरच्या त्रिकोणाकृती ‘काळे मैदाना’त एक सुरेख बगिचा तयार करण्यात आला आणि या बगिच्याला ‘दादर ओव्हर ब्रिज गार्डन’ असे नांव देण्यात आले. १ मार्च १९३० या दिवशी हे गार्डन सार्वजनिक वापरासाठी खुलं करण्यात आलं (8).

तत्पुर्वी, १९२९ या वर्षात दादर ओव्हरब्रीजचं नामकरण ‘टिळक ब्रिज’ असं करण्यात आल्यावर, नगरपालिकेचे सदस्य पांडुरंग गणेश सहस्त्रबुद्धे यांनी, टिळक ब्रिजच्या पश्चिम उतारावर केलेल्या बगिच्याला ‘टिळक रिक्रिएशन ग्राउंड’ किंवा ‘टिळक बाग’ असे नांव द्यावे आणि त्या मैदानाच्या मध्यभागी, लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा पुर्व दिशेला तोंड करून बसवावा, अशी सूचना केली (9).

‘दादर ओव्हर ब्रिज गार्डन च नामकरण ‘टिळक ब्रिज गार्डन’ अस कराव ही सहस्त्रबुद्धेंची सूचना बहुदा मंजूर झाली असावी. कारण दिनांक ३१ मे, १९३० रोजी नगरपालिका उद्यान विभागाच्या अधीक्षकांनी, नगरपालिकेच्या कमिशनराना लिहिलेल्या पत्रात, या जागेचा उल्लेख ‘Tilak Bridge Garden near the Dadar Overbridge’ असा उल्लेख आहे (10) टिळकांचा अर्पुधपुतळाही त्या ठिकाणी बसवण्यात आला होता. परंतु साधारण १९४७-४९ या काळात तो तिथून हलवला गेला असावा, अशी माहिती पूर्वी त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी मला दिली. आता तो पुतळा नेमका कुठे आहे, याची निश्चित माहिती मिळत नाही. बागेत तशी कोणतीही पाटी/पुतळा किंवा त्याची खूण दिसून येतं नाही.

दादर ओव्हर ब्रिज गार्डन, अर्थात ‘टिळक ब्रिज गार्डन’ थोड्याच अवधीत लोकप्रिय झालं. १९३० सालात ह्या बागेत व्यायामाची नगरपालिकेतर्फे उपकरणं बसवण्यात आली.  ‘Tilak Bridge garden is becoming very popular and the sets of Gymnasium Apparatus fixed therein are a source of very popular attraction to children of the locality’ असा उल्लेख नगरपालिकेच्या १९३०-३१ च्या प्रशासकीय अहवालात वाचायला मिळतो(11).

अशी ही, आज प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या, परंतु पहाटेच्या भाजी बाजाराच्या रुपाने आजही जिवंत

असलेल्या, दादरच्या ‘हंसाळी टॅंक’ची आठवण. कधी त्याबाजुला जाणं झालं, तर मधली १०० वर्ष आणि त्या दरम्यान झालेला विकास नजरेआड करून, मनातल्या मनात त्या तलावाचं दर्शन जरूर घ्यायला विसरू नका..!

-नितीन साळुंखे

9321811091

19.10.2021

टिपा-

  1. मुंबई महानगरपालिका तेंव्हा ‘नगरपालिका’ असल्याने, तिचा उल्लेख ‘नगरपालिका’ असा केला आहे.
  2. ज्या पांडुरंग गणेश सहस्त्रबुद्धे यांनी, पुलावरच्या बागेस ‘टिळक बाग’ असं नांव द्यावं अशी सुचना नगरपालिकेस केली होती, त्या पांडुरंग गणेश सहस्त्रबुद्धे यांच्या पत्नी इंदिराबाई पांडुरंग सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ, १९३० सालात कोतवाल गार्डनमधे पाणपोयी उभारण्यात आली होती. ती आजही त्या ठिकाणी पाहाता येते. महानगरपालिका ह्या पाणपायीचं नुतनीकरण करणार असल्याचं ऐकलं. त्या वेळेस पां. ग. सहस्त्रबुद्धे व इंदिराबाई सहस्त्रबुद्धे यांची थोडक्यात माहिती असलेली पाटी महापालिका त्या ठिकाणी लावेल, अशी अपेक्षा आहे.

संदर्भ-

(१) ‘The Bombay Chronicle’ dt. 22 Feb., 1947; page 2. (ह्या वर्गमानपत्रात, ३ मार्च १९४७ रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या सभेत मताला येणाऱ्या विषयांची यादी दिली आहे.)

(2). Essay on ‘Water Supply Projects and Water Distribution System, Operation and Maintenance’ available on web.

(3) ‘मी व दादरचे सार्वजनिक जीवन’-लेखक राजाराम केशव उपाख्य आर. के. वैद्य.; पृष्ठ १३ ते १७.

(4) ‘तोच मी’- प्रभाकर पणशीकर; पृष्ठ १०५.

(5) ‘बहुरंगी बहुढंगी दादर’ – संपादक प्रकाश कामत- प्रकाशक ‘दादर सार्वजनिक वाचनालय’

(6) ‘Recognising & Preserving the Historic Identity of Dadar West’ – Essay by Mr. Vineet Datye.

(7) ‘माझी जीवनगाथा’- प्रबोधनकार ठाकरे आत्मकथन.

(8) Review of the Standing Committee of the Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year 1928-29’Page 8, 150, 155,

(9) – The Bombay Chronicle’, दिनांक १५ मार्च १९२९, पृष्ठ ५.

(10) & (11)– Letter No. G/270-A of 1930-31 from The Superintendent, Municipal Gardens to The Municipal Commissioner dated 31 May, 1930. Published in Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year 1929-30 on page No. 209.

दादरचा टिळक ब्रिज व कोतवाल गार्डन-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

दादरचा टिळक ब्रिज व कोतवाल गार्डन-

टिळक ब्रिज-

दादरचा टिळक ब्रिज. गेल्या पाच-सहा वर्षाचा त्याचा नि माझा सहवास. गेली पाच-सहा वर्ष मी रोज सकाळ-संध्याकाळ या ब्रिजवरून ये-जा करतो. टिळक ब्रिज, त्यावरुन अखंड वाहाणारी, सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी. पुलावर होणारं ते सततचं ट्राफिक जाम, पहाटेच्या वेळी पुलावर भरणाऱ्या भाजी-पाल्याच्या घाऊक बाजारानंतर, पुलाच्या फुटपाथवर सकाळच्या वेळी होणारा तो भाजी-पाल्याचा चिखल आणि गेली काही वर्ष त्याची सततची चाललेली डागडुजी हे माझ्या नित पाहाण्यातलं दृष्य. हे सर्व पाहून मला या पुलाच्या क्षमतेविषयी कौतुकच वाटत आलंय. आपण आधुनिक काळात बांधत असलेले पुल बांधायला वीस-पंचवीस वर्ष लागत असली तरी, तो पडायला दोन-पांच वर्ष पुरेशी असतात, हा आपला अनुभव. त्यात हा कितीतरी वर्ष जुना पुल, अजूनही सक्षमपणे कार्यरत आहे, हे पाहून त्याच्याविषयी व तो बांधणाऱ्यांविषयी, माझ्या मनात कौतुक आणि कृतज्ञता अशा दोन्ही भावना दाटून येतात..!

हा पूल कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल हा प्रश्न नेहेमिच माझ्या मनात येत असे. पण येत असे नि जात असे, एवढंच होत असे. या पुलाची जन्मकहाणी शोधावी, असं काही वाटलं नव्हतं. शोधण्यासाठी नकळतपणे कारणीभूत ठरले, ते माझे दादरनिवासी स्नेही डॉ. अविनाश वैद्य..!

डॉ. वैद्यंशी गप्पा मारताना या पुलाचा विषय हमखास येत असे. रेल्वेचे अभ्यासक असणाऱ्या डॉक्टरांना या पुलाचं भारी कौतुक. तो लहानपणापासून त्यांचा सवंगडी असल्याने, त्यांना ही माहिती हवी होती. पण काही केल्या त्यांना हा पूल कधी व का बांधला, याची माहिती मिळत नव्हती. इंग्रजी अमलात बांधलेस्या इतर पुलांवर, त्या पुलांची माहिती देणारी पाटी असते. तशी या पुलावर कधी त्यांच्या पाहाण्यात आली नाही. माझ्याही पाहाण्यात आली नव्हती आणि नाही. डॉ. वैद्य यांनी हा विषय माझ्या डोक्यात सोडला.

हा पूल कधी बांधला, याची इतर काही जाणकारांकडे चौकशी केली असता, सन १९२० च्या पुढेच, असं उत्तर मिळायचं. सन १९२० च्या पुढेच का, याचं उत्तरही मजेशीर असायचं. टिळक १९२० साली वारले आणि ज्या अर्थी या पुलाला टिळकांचं नांव दिलंय, त्या अर्थी हा पूल १९२० सालानंतर बांधला गेलाय, असा त्या उत्तरांमागचा तर्क असायचा. तसं असेलं तर मग, इंग्रजी अंमलात बांधल्या गेलेल्या, मुंबैतल्या इतर पुलांना-रस्त्यांना जशी करी रोड ब्रिज, आर्थर रोड ब्रिज, कॅरोल ब्रिज वा ग्रॅंट रोड, सॅंडहर्स्ट रोड अशीइंग्रज गव्हर्नरांची-अधिकाऱ्यांची नांवं आहेत, तसं नांव या पुलाला न देता, भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचं नांव का दिलं गेलं असावं, हा नविनच प्रश्न समोर उभा राहायचा आणि चिळक ब्रिज नेमका कधी व कुणी बांधला, हा मूळ प्रश्न बाजुला पडायचा..!

टिळक पुलाचा उल्लेख काही लेखांमधून माझ्या वाचनात आला होता, पण तो केवळ संदर्भ म्हणून. उदा. साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी, त्यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात लिहिल्या आहेत. सदरचा लेख, ‘मुंबई महानगरपालिके’च्या इमारतीस शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत मी वाचला होता. श्री. ना. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम कॉजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. #टिळकब्रिजनुकताचतयारझाला_होता”. पेंडशाच्या लेखातील हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं..!

वर लिहिल्याप्रमाणे, अनेकांच्या बोलण्यात येणारं, टिळक ब्रिजच्या बांधकामाचं वर्ष १९२० च्या पुढेच, असा उल्लेख आता, पेंडसेंच्या लेखामुळे सन १९२५ पर्यंत मर्यादीत झाला. म्हणजे, दादरचा टिळक पूल १९२० ते १९२५, अशा पांच वर्षांच्या काळात बांधला गेला असावा, हे स्पष्ट होतं. तरीही, नेमका कधी, हा प्रश्न उरतोच आणि त्याचं उत्तर शोधायच्या मागे मी लागलो आणि हाती येत गेली अतिशय मनोरंजक माहिती…!

ती माहिती मात्र माझ्या पुस्तकातच वाचावी लागेल बरं का..!

तो पर्यंत, माझ्या ब्लॉगवर https://wp.me/p7fCOG-e2 ‘दादर’विषयी जाणून घ्या

‘कितीक वर्सान लागलो आंगाक,मालवनी मुलकामधलो न्हिमरो वारो..!’

‘कितीक वर्सान लागलो आंगाक,
मालवनी मुलकामधलो न्हिमरो वारो..!’

दोन दिवसांसाठी म्हणून गेलेलो आम्ही, म्हणजे मी आणि ही, तब्बल सहा दिवस तिथे राहून आजच परतलो. अर्थात, माझ्या गांवी मी त्यातला जेमतेम दिड दिवसच राहीलो, आणि उर्वरीत दिवस मालवणात गुजरले..!

मी मालवण प्रथमच पाहिलं. किंबहूना मी मालवण पाहायचं ठरवूनच तिथे गेलो होतो. माझ्या गांवी जायचं, हे फक्त निमित्त होतं.

मी कायमचा मुंबैकर. अगदी जन्मापासून ते आजपर्यंत..! तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी विविध ठिकाणी अर्ज करताना, ‘कायमचा पत्ता’ असा एक रकाना असायचा. तिथे मात्र गांवचा पत्ता लिहिला जायचा. ते ही वडील सांगायचे म्हणून. ते सांगत, “मुंबई काही आपली कायमची नाही. आपण इथले भाडेकरु. आपला कायमचा पत्ता गांवचा आहे, तो लिहावा.”! तसा पत्ता मी लिहायचो. तात्पर्य, माझा नि गांवाचा संबंध तेोवर पत्त्यापुरताच होता. नंतर गांवी जाणं झालं, ते एखाद-दुसऱ्या वेळीच. इसवी सनाच्या २००८ नंतर मात्र सातत्याने गांवी जात राहीलो. अर्थातच कामानिमित्त. पण एवढं करुनही माझा नि गांवचा बहुतकरुन संबंध राहीला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात असलेल्या माझ्या गांवापुरताच..!

एवढं सगळ सांगण्याचं कारण असं की. अगदी क्वचितच जाणं झालं असल्यामुळे असेल कदाचित, पण मला माझ्या गांवाची तेवढीशी ओढ नाही. पण, आमच्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, मी पूर्वी कधीही न पाहिलेल्या मालवणची मात्र प्रचंड ओढ आहे. आणि ही ओढं आजची नाही, तर लहानपणापासूनची आहे. ही ओढ का निर्माण झाली, हे नेमकं सांगता येत नाही, पण माझ्या लहानपणी मला लाभलेल्या मालवणी शेजारामुळे असावा, असं मात्र मला वाटतं..!

लहानपणी बहुतेक सर्व शेजार मालवणी भाषीक. त्यांची गांवं वेगवेगळी, पण बोली मात्र मालवणीच. समोरची वेंगुर्लेकरांची कुमुची आई, त्यांच्या उजव्या बाजुला तावडे, तर डाव्या हाताला तळेकर. पुढे एक घर सोडून चव्हाण. माझ्या सख्ख्या शेजाराला सावंत, खोत, राणे, मिठबावकर. चाळीच्या दुसऱ्या शेड्याला पांचाळ, लब्दे. मागच्या बाजुला बोरकर. हे गोव्याचे. आपसात कोंकणी बोलणारे, पण आम्हा शेजाऱ्यांशी मात्र मालवणी. बोरकरांच्या शेजारी दळवी, त्यांच्या बाजुला मोडक. परिसरातला मित्र परिवारही केरकर, खराडे, धुरी, राणे इतियादी. परब, सनये, नारकर, कदम, नाईक, डिसोझा, फर्नांडीस, मेस्त्री, कोलते, पवार, आंगणे इत्यादीं आजुबाजूच्या प्रत्येक चाळीत होतेच. या पैकी प्रत्येकजण आपापल्या नोकरी-व्यवसायात शुद्ध मराठी बोलत असला तरी, आमच्यातला संवाद मालवणीतूनच व्हायचा. माझा जन्म, शिक्षण, सासुरवाड सर्व काही मुंबईतलं असुनही आणि मी गांवी फारसा कधी गेलो नसुनही मला मालवणी बोली बऱ्यापैकी, अगदी तिच्या हेलांसकट, बोलता येते. त्याचं कारण माझा हा मालवणी भाषिक शेजार. मला ‘मालवण’ या शब्दाने भुरळ घातली, ती तेव्हापासून..!

माझे हे शेजारी प्रसंगानुरूप आपापल्या गांवी जात असतं. अर्थात ‘गांवी जात’ हा प्रमाण भाषेतला शब्दप्रयोग झाला. ते मात्र ‘मुलकात’ जात असत. त्यामुळे, मुलुक म्हणजे मालवण, हे नविनच समिकरण त्या वयात डोक्यात बसलं. थोडक्यात मालवणी बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं गांव ‘मालवण’ असतं, असा माझा पक्का समज झाला होता. माझा गोंधळ तेंव्हा वाढे, जेंव्हा माझे वडील, आपलं गांव कोल्हापुर जिल्ह्यात आहे असं सांगत. पुढे तरुणपणी नोकरीच्या अर्जांवर ‘कायमच्या पत्त्या’च्या रकान्यात मी ‘मु.पो. खांबाळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर’ असं लिहित असल्याचं मला आताही आठवतं. पण माझी आई-वडील, घरी येणारे नातेवाईक बोलताना मात्र मालवणीच बोलत. गांव कोल्हापूर व भाषा मालवणी, हे काय नक्की काय प्रकरण आहे, हे मला त्या काळात उमजत नसे. कुणाला विचारण्याची सोयही नसे. प्रश्न विचारण्याची प्रथा नाही तरी आपल्यात नाहीच. असो.

पुढे थोडा (राजकीय दृष्ट्या)जाणता झाल्यावर मला समजलं की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मालवण हा एक तालुका आहे, म्हणून. तोवर माझा समज मालवण म्हणजे सिंधुदुर्ग असाच होता. पण तो एका मोठ्या जिल्ह्यातला, लहानसा भुप्रदेश आहे, हे समजूनही माझं मालवणविषयीचं आकर्षण बिलकूल आटलं नाही. उलट ते आणखी गडद झालं.

त्याला कारण म्हणजे, विविध कारणांनी माझ्या संपर्कात आलेली, मला माहित झालेली लेखन, काव्य, नाट्य, शिल्प, चित्र इत्यादी विविध क्षेत्रात उंची गाठलेली कलावंत मंडळी. यातील बहुसंख्य मालवणी होती. कलावंतच कशाला, अनेक निमित्तांनी आयुष्यात आलेल्या व नंतर माझ्याच झालेल्या माझ्या जवळपास सर्वच मालवण्यांमधे काहीतरी वेगळेपणा होता. बुद्धी तल्लख, जीभ काहीशी तिखट, पण आतल्या हुशारीचा हंध देणारी आणि कोणत्याही गोष्टीला असणाऱ्या आणि कुणालाही दिसणाऱ्या तीन मितींच्या पलिकडच्या अनेक मिती सहजपणे पाहाण्याचू दृष्टी असलेल्या मालवणी माणसांबद्दल, माझं कुतुहल दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. मालवणी मुलखात (माझ्या मते संपूप्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे ‘मालवणी मुलुख’) जन्माला येणारं प्रत्येक पोर हातात काही तरी कला व अंगात नाना कळा घेऊन जन्माला येतं, हा माझा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत चालला आणि मालवणी माती बरोबरच, मालवणी माणसांबद्दल माझी ओढ अधिक गहिरी होत गेली..!

तर, माझ्या मनात, त्याची अशी खास जागा असणारं असं हे मालवण पाहाण्याचा, व त्या भुमित दोन-तीन दिवस का होईना, राहाण्याचा योग वयाच्या ५६व्या वर्षी आला. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वैभववाडीला माझ्या गांवी जाण्याचं निमित्त करुन, मी थेट पोहोचलो तो मालवणात. एरवी गांवी कधी जाणं झालं, तर माझं कणकवलीत जाणं होतं. कणकवलीतील माझ्या मित्रांना, समविचारी लोकांना भेटणं, हा त्यामागे उद्देश असतो. पण कणकवलीच्या गडनदीची वेस ओलांडून, माझ्या मनात घर करून असलेल्या मालवणच्या दिशेने जाण्याची वेळ वा संधी कधी आली नव्हती. म्हणून यंदा गांवाहून थेट मालवणात जाण्याचं ठरवलं व तसं केलंही..!

फक्त जाता जाता रस्त्यात, वागद्यात माझे मित्र विजय उपाख्य विजय सावंत यांची यांती त्यांच्या घरात लहानशी भेट घेतली.तिथेच माझा आणखी एक उत्तम कवि असलेला मित्र दिपक पटेकर याची अचानकच भेट झाली. व्हि. के व दिपक यांच्याशी आणखी गप्पा मारण्याची तीव्र इच्छा असुनही, वेळे अभावी फार थांबता आलं नाही. तसंच कणकवलीतले माझे आणखी एक स्नेही श्री. उदय पंडीत यांनी, त्यांनी त्यांच्या घरी येण्याचं दिलेलं निमंत्रणही मला वेळेअभावीच स्वीकारता आले नाही.. मालवण मला साद घालत होतं..!

रात्री ९ वाजता मालवणात पोहोचलो. मालवणात माझे (माझे म्हणजे, मी व माझ्या ‘ही’चे. ही अर्धांगी असल्याने, दोघांचाही उल्लेख ‘माझे’मधे आहे, हे समजून घ्यावे, ही विनंती) पालक होते, माझे मित्र नितीन वाळके. नितीन वाळकेंना मी यापूर्वी फक्त एकदाच भेटलो होतो. ते ही काही मिनिटांपुरता. पण असं असलं तरी, आमची ओळख तशी दाट. सायीसारखी घट्ट व तशीच स्निग्धही. ही ओळख होती विचारांची. गेली काही वर्ष आम्ही काही समविचारी लोक सोशल मिडीयातून एकमेकांशी जोडले गेलो होतो. त्यातील कित्येकांना आजही पाहिलेलं नाही किंवा प्रत्यक्ष भेटलेलो नव्हतो/नाही. नितीनजी त्यापैकीच एक. मी मालवणला येतोय म्हटल्यावर, माझ्यापेक्षा जास्त उत्साह नितीनजींना झाला. त्यांनी तिकडे सर्व तयारी करुन ठेवली.

पुढच्या तीन दिवसांत नितीनजी व त्यांची सखी ‘टाटा टिआगो’ आमच्यासोबत होती. प्रथम डोळे भरून मालवण पाहून घेतलं. कुठेतरी वाचलेल्या व लक्षात पाहिलेल्या, (बहुतेक) कवी आ. ना. पेडणेकरांच्या कवितेतल्या दोन ओळी, ‘कितीक वर्सान लागलो आंगाक, मालवनी मुलकामधलो न्हिमरो वारो’ मी अनुभवल्या. अजुनही शहरीकरणाच्या खरजेचा स्पर्श न झालेलं मालवण, स्वच्छ, सुंदर व टुमदार वाटलं. दिवस श्रावणातल्या पावसाचे असल्याने की काय म्हणून, मालवण मला एखाद्या सुस्नात, ग्रामिण सैंदर्ववतीसारखं भासलं. मुंबईसारख्या शहरातल्या टावरांच्या जंगलातून आल्यामुळे, मालवणची बाजारपेठ पाहाताना मला चित्रपटाचा सेट पाहातोय की काय, असंच वाटत होतं. फळ्याफळ्यांचे दरवाजे असलेली लहानशी दुकानं. त्यात निवांत बसलेले व तेवढेच समाधानी दिसणारे मालक, दुकानांवर लावलेल्या जुन्या पद्धतीच्या वळणदार अक्षरांतल्या त्या पाट्या, इटुकले रस्ते आणि त्या रस्त्यावरची ‘कोविड’ची शांतता..!

नितीनजींनी मालवण शहरही आपलेपणानं दाखवलं. समजावून सांगितलं. माडा-आंब्यांच्या वाडीत लपलेली, लाल कौलांची टुमदार घरं, नेटकं अंगण, डोक्यावर दाट, गडद हिरव्या रंगाच्या झाडांचे मोर्चेल असलेले रस्ते. मी हे पाहाताना, ते तीन दिवसात समजून घेताना, एवढं हरवून गेलो की फोटो काढयचंच विसरलो. असंही कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी गेलं, की फोटो काढण्याच्या मी विरोधात आहे. ते दृष्य डोळ्यांना मनसोक्त पिऊन घ्यावं. हृदयात हळुहळू उतरवत न्यावं. पुन्हा त्या सुंदर दृष्याच्या पार्श्वभुमीवर आपलं चित्र, कॅमेऱ्याच्यी भिंगावर उपटसुंभासारखं उमटवायलाही मला नकोसं वाटतं (माझा अर्ध अंग नेमकं विरुद्ध विचार करतं). मालवणातही मी तेच केलं. त्यात नितीनजींसारखा बोलका जाणकार सोबत असल्याने संपूर्ण मालवण नीट अनुभवता आलं. संपूर्ण मालवण शहर, समुद्र किनारा मी अगदी अक्षपाद पद्धतीने, म्हणजे पायांत डोळे ठेवून पाहिलं. ज्या मातीची मला लहानपणापासून ओढ होती, त्या मातीला स्पर्श करुन मला काय वाडलं, हे मला शब्दांत नाही सांगता यायचं..! आणि हे सर्व घडून आलं, ते मित्रवर्य नितीन वाळकेंमुळे.

आता मी अधिर झालो होतो, ते मालववचणातल्या माझ्या सुहृदांना भेटण्यासाठी. पहिल्यांदा भेट दिली ती ‘बॅ. नाथ पै सेवांगणा’त असलेल्या ‘साने गुरूजी वाचन मंदिरा’ला. पहिल्यांदा तिथे असलेल्या हजारो पुस्तकांना भेटलो. पुस्तकं पाहिली, की मला कुणीतरी अगदी जवळचं भेटल्याचा भास होतो. मन तरल होतं. काळजी-विवंचना तेवढ्या काळापुरत्या अदृष्य होतात. तसंच तेंव्हाही झालं. त्यात, ते ग्रंथालंय चालवणाऱ्या, तिथल्या तेवढ्याच जाणकार व्यक्तींशी गप्पा झाल्या. पुस्तकांवर लहानशी चर्चाही झडली.

तिथेच श्रीमती चारुशीला देऊळकरांची भेट झाली. चारुशीलांशी माझा तसा परिचय होता, तो सामाजिक जाणीवांतून, त्यांनी केलेल्या प्रगल्भ लिखाणामुळे. त्या दिवशी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यांच्या त्या छोटेखानी कुडीतली विद्वत्ता, त्यांच्या साधेपणातही उजळून दिसत होती. त्याचं ठिकाणी जिल्ह्यातले मालवणस्थित कवी रुजारीयो उपाख्य बाबला पिंटोंशीही भेट झाली. पिंटोंच्या कवितांशी मी परिचित होतो. पण, सहाफुटी रांगड्या उंचीची, तेवढ्यात रांगड्या समुद्राशी दिवसरात्र खेळण्याची ताकद राखणारी, समुद्र नांगरणारी ही व्यक्ती एवढ्या तरल आणि आशयघन कविता करते, यावर दोन क्षण विश्वासच बसेना..अनेकदा आपल्याला विचाराने परिचित असलेल्या व्यक्तींचं, त्यांना कधी प्रत्यक्ष न भेटल्याने, आपल्या मनात एक कल्पनाचित्र उभं राहातं. परंतु, त्या व्यक्तींना प्रती अक्ष पाहाताना, ते चित्र एकदम वेगळ्याच असतात, असं लक्षात येतं. मला व्हाट्सॲपवर असलेल्या ‘डिपी’ पाहाण्याची फारशी सवय नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत हे अनेकदा घडतं, तसंच यावेळीही घडलं..!

नंतरची भेट झाली, ती डॉ. सुमेधा नांईक यांची. ती भेट थेट त्यांच्या कॉलेजातच झाली. तशा सोशल मिडीयावर आम्ही विविध विषयावर खूप चर्चा केलेल्या असल्या तरी, डॉ. नाईकांनाही प्रथमच भेटत होतो. खूप वर्षांनी कुठल्यातरी कॉलेजमधे जाण्याची त्या निमित्ताने संधी मिळाली. ‘कोरोना’मुळे कॉलेजात मुलांची वर्गळ नव्हती. परंतु, प्राध्यापक वर्ग मात्र सगळा हजर होता. डॉ. नाईक यांनी आपुलकीने माझा सर्वांशी परिचय करुन दिला. माझ्या मनातल्या ‘प्राध्यापका’च्या चित्राला छेद देणाऱ्या त्या तरुण प्राध्यापक व प्राध्यापिकां भेटून खूप छान वाटलं. लांब गंभीर चेहेरा नाही, कपाळावर विद्वत्तेच्या खोलआठ्या नाहीत की दुर्मुखलेपण नाही. तरुण, सळसळत्या विचारांचे आणि चर्चेसाठी कोणत्याही विषयांचे बंधन नाही, असे ते प्राध्यापक पाहून व त्यांच्याशी बोलून, येत्या पिढीचं वैचारीक भवितव्य तरी उज्वल आहे, अशी खात्री पटली..तिथेच माझे मित्र प्रा. हसन खान यांची अवचितच भेट झाली. काही हासभास नसताना झालेली आपल्या माणसाची भेट, मनाला अधिक आनंद देऊन जाते. पर्यावरण, निसर्ग यात रमणऱ्या, आपुलकीनं वागवचणाऱ्या हसन खान यांना भेटून मला अधिकच आनंद झाला. माझ्या आणखी एक वैचारीक स्नेही श्रीमती मेघना जोशीमॅडमही तिथेच जोशीही भेटल्या. किंबहुना त्या, त्यांच्या यजमानांसोबत मला भेटण्यासाठी मुद्दाम आल्या होत्या. मुख्याध्यापक पदावरून नुकत्याच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या जोशीबाई, आजही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत असतात. आपल्या लेखनातून मुलांचा बौद्धिक विकास करत असतात. डॉ. सुमेधा नाईक, त्यांचा सहकारी अध्यापकवर्ग आणि कॉलेजच्या प्राचार्य, या सर्वांनी आमचं हृद्यय स्वागत केलं..!

मुळचे मुंबैतले, पण आता मालवणात स्थाईक झालेले माझे अन्य एक मित्र श्री. प्रभाकर वाळवे यांची भेट झाली. प्रभाकरजींचं बीच रिसॉर्ट मालवणच्या चिवळा बीचवर आहे. ‘ट्रॉपीकल कबाना’ नांवाचं हे छोटेखानी रिसॉर्ट, अतिशय सुरेख, छोटेखानी आणि अगदी किनाऱ्याला लागून आहे. मला ते पाहाण्याची उत्सुकता होती. या वेळी जमलं नाही, पण पुढच्या वेळी मात्र मी तिथे राहायचं ठरवलं.

मालवणातल्या डॉ. विवेक रेडकरांचीही भेट झाली. ही त्यांची व माझी दुसरी भेट. पहिल्या भेटीत, हा माणूस डॉक्टर-लेखक आहे, की लेखक-डॉक्टर, हा मला पडलेला प्रश्न, त्यांच्या या दुसऱ्या भेटीत जास्तच कठीण झालं. डॉक्टर रेडकरांच्या बोटांत रोग्यांना बरं करायचं कौशल्य आहे. त्याहीपेक्षा अधिक कौशल्याने त्यांची बोटं शब्दांशी खेळतात. आरोग्याचे कडू घोट, डॉक्टर रेडकर विनोदाच्या आंबट-गोड आवरणातून कधी देतात, ते समजत नाही. मी आरोग्यावरचं कोणतंही लेखन वाचत नाही. उगाच घाबरवतं असलं लेखन. पण डॉक्टरांचं, ‘आरोग्याचं पोस्टमॉर्टेम’ हे पुस्तक, त्याला अपवाद आहे. मी आजवर पाहिलेल्या व वाचलेल्या एकमेंव पुस्तकापैकी ते पहिलं व शेवटचं..! असं लेखन करण्यासाठी केवळ निष्णात डॉक्टर असून चालत नाही, तर तेवढंच कुशल लेखकही असावं लागतं..डॉ. विवेक रेडकरांमधे डॉक्टर की लेखक, की लेखक की डॉक्टर असा, या दोन्हीमधली सीमारेषा ओळखता न येण्याजोगा संयोग झालेला मला दिसतो..

नितीनजी आम्हाला सावंतवाडी-कुडाळलाही घेऊन गेलो. आंबालीतली पर्यटनस्थळं तर त्यांनी आम्हाला दाखवलीच, पण दोन अतिशय महत्वाच्या तरुणांची भेटही त्यांनी घडवून आणली. गेली १५ वर्ष पश्चिम घाटतल्या जंगलात फुलपाखरांवर संशोधन करणारा हेमंत ओगले व त्याच ठिकाणी सापांच्या विषावर संशोधन करणारा वरुण सातोसे. ऐन उमेदीत हे दोन तरुण, भौतिक आमिषांना बळी न पडता तिथं संशोदन करतायत, हे पाहून मला कौतुक वाटलं.

आंबोलीतून परतताना माझे आणखी एक स्नेही डॉ. जयेंद्र परुळेकरांची भेट घेतली. हे लहान मुलांचे तज्ञ डॉक्टर. पण डॉक्टर कमी व समाजसेवक जास्त. डॉक्टर पेडीयाट्रीकमधले तज्ञ असल्याने, मुलांपेक्षा, पोरकटपणाने वागणारा सद्यस्थितीतला समाज व त्यावरचे उपाय, यावरच चर्चा झाली. तिथून येताना अस्मिता मॅडमना भेटलो. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मॅडमशी, वेळे अभावी फार गप्पा मारता आल्या नाहीत, याची रुखरुख लागली. अशीच रुखरुख सुविधा तिनईकरांच्य भेटीची लागली. मॅडम अवचितच रस्त्यात भेटल्या. त्यांनी घरी यायचं निमंत्रणही दिलं. मात्र त्यांच्याकडे जाता आलं नाही..!

आमचा मालवणचा मुक्काम संपत आला. नितीनजींसोबत कुडाळ रेल्वे स्टेशनवर जाण्यास निघालो आणि रस्त्यातच नितीनजींना ‘कोकण नाऊ’ वाहिनीच्या विजय शेट्टींचा फोन आला. जाता जाता आमच्या हस्ते, त्यांच्या चॅनेलने आयोजित केलेल्या भजन स्पर्धेतं उद्घाटन करून आम्ही मुंबईला जावं, असा निरोप मिळाला. विजय शेट्टी म्हणजे, वर ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलाय, त्या, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उंची गाठलेल्या व्यक्तींना आणि अशाच इतरही काही व्यक्ती, ज्यांना भेटण्याची इच्छा असुनही मला भेटता आलं नाही, अशा व्यक्तींना मला भेटवणारे महानुभाव. विजय शेट्टी नसते तर, या व्यक्ती माझ्या आयुष्यात कदाचित आल्याही नसत्या. त्यामुळे विजय शेट्टींना भेटणं आवश्यकच होतं..विजय शेट्टींना भेटल्याशिव माझी मालवण मुलुखगिरी पूर्ण होणं श्क्यच नव्हतं..

विजय शेट्टींना भेटलो. त्यांच्या विनंतीनुसार मी व माझ्या पत्नीने भजन स्पर्धेचं उद्घाडन केलं व आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो..

माझी ही मालवण भेट ज्यांच्यामुळे कायमची आठवणीत राहिल अशी झाली, त्या नितीन वाळकेविषयी मी कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर तो कृतघ्नपणा होईल. त्या चार दिवसात सकाळचा नाश्ता ते रात्रीचं जेवण, आमचं सर्वत्र फिरणं, नितीनजींसोबत झालं. नव्हे, त्यांनी ते प्रेमाने केलं. हल्लीच्या दिवसांत, कोण कोणासाठी इतकं करतं हो?

बरं नितीनजी काही हलक्यात घेण्याची गोष्ट नाही. अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या ‘चैतन्य’ नांवाची हॉटेल साखळी यशस्वीरित्या चालवणारे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे सचिव, जिल्ह्यातल्या समाजकारणातही तेवढेच कार्यरत असणारे श्री. निकीन वाळकेंनी, या चार दिवसात आपली सर्व कामं बाजुला ठेवून, आपला पूर्ण वेळ आम्हाला दिला. त्यांचे आभार मानणं जरी त्यांना आवडणार नसलं, तरी ते मानणं माझं कर्तव्य आहे. त्यांच्यामुळे मालवणचो न्हिमरो वारो आम्ही मन:पूत आमच्या अंगाखांद्यावर खेळू दिल्…!

धन्यवाद नितीनजी..!!

-नितीन साळुंखे
०५.०९.२०२१
9321811091

शिर्षकाच्या ओळी कवी आ. ना. पेडणेकरांच्या कवितेतल्या आहेत..!

टाईम मशिन..

टाईम मशिन..

श्री. अशोक राणेसर तयार करत असलेल्या ‘एक होतं गिरणगांव’ या डॉक्युमेंटरीसाठी, जुन्या संदर्भांच्या शोधात होतो. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विसाव्या शतकात गिरणगांवात बहरात आलेल्या, कामगार रंगभुमिवरच्या जुन्या व त्या काळात गाजलेल्या नाटकांच्या पुस्तकांचा माग काढत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलयाच पोहोचलो होते.

तिथे तर अलिबाबाची गुहाच समोर उघडी झाला. वसंत जाधव, वसंत दुदवडकर, आबासाहेब आचरेकर, ला. कृ. आयरे, कवि झेंडा, आत्माराम सावंत इत्यादी कामगार रंगभुमी गाजवलेल्या अनेक नाटककारांची अस्तल पुस्तकं पाहायला मिळाली. त्यात त्यावेळचे दुर्मिळ फोटोही मला सापडले, जे आमच्या डॉक्युमेंटरीसाठी अतिशय आवश्यक होते.

त्यातल्याच ‘पैजेचा विडा’ या, नाट्यकार जगदीश दळवींनी सन १९५३ सालात लिहिलेलं पुस्तक सापडलं. या पुस्तकात मला एक पत्ता सापडला. हा पत्ता होता, ‘जयवंत आणि कंपनी’, परळ, मुंबई १२, हा! ही फर्म त्याकाळात नाटकांसाठी लागणारे ऐतिहासिक, पौराणिक कपडे, पगड्या, जिरेटोप, चिलखतं, तलवारी आदी वस्तू भाड्याने देत असे..!

आता हा पत्ता होता १९५३ सालातला. ती कंपनी, तिचे मालक पांडुरंग गोविंद परब आणि त्यांचं कुटुंब सांप्रतच्या काळात त्या पत्त्यावर अस्तित्वात असेल की नाही, असल्यास त्याकाळातलं त्यांनी टिकवून ठेवलं असेल की नाही, अशी प्रश्नांची माळका समोर उभी राहिली. मुंबईत मराठी माणसाचं संपत चाललेलं अस्तित्व, मुंबई गिळंकृत करत चाललेला पुन:’विकासाचा’ काळकभिन्न राक्षस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या वस्तू जपून ठेवण्यातली आपल्या समाजाची एकूणच उदासिनता लक्षात घेता, माझ्यासमोर हे प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच होतं. पण म्हटलं, प्रयत्न तर करू, मिळाल तर घबाड मिळेल, नाही मिळाल्यास नविन माणसांना भेटल्याचा आनंद तर मिळेलच मिळेल. फेरी काही अगदीच फुकट जाणार नाही.

मी आणि माझ्या शोधमोहिमेतले नेहेमीचे मित्र श्री सुधीर मोरेंसोबत पत्ता शोधत काल संध्याकाळी त्या जागी गेलो. आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. ‘जयवंत आणि कंपनी’ आता ६७ वर्षांनंतर अस्तित्वात नसली तरी, ती चालवणाऱ्या परब यांचं कुटुंब त्याच खोलीत अजुनही राहात होतं. फ्लॅट, ब्लॉकच्या सांसर्गिक विषाणूपासून त्यांनी स्वत:ला यशस्वीरित्या वाचवलं होतं.

तिच दहा बाय दहाची जुनी खोली, खाली जुन्या काळातली दगडी फरशी, जुनाट, पण चकचकीत पॉलिश केलेली लाकडी कपाटं आणि त्या कपाटात खच्चून भरलेले तेच ते जुन्या जमान्यातले नाटकातले कपडे. सगळं नजरेसोर पाहून आम्ही हरखूनच गेलो. त्या खोलीत शिरताच, भोवतालचं आधुनिक जग लुप्त पावलं आणि आम्ही एकदम विसाव्या शतकाच्या मध्यावरच्या गिरणगांवात पोहोचलो. मी टाईम मशिनमधे शिरलो. गिरण्यांचे भोंगे कानात घुमू लागले. त्या खोलीतल्या एकुलत्या एक खिडकीतून दिसणारा पलिकडचा अजस्त्र, श्रीमंती टॉवर नाहीसा होईन, तिथे मला धुर ओकणारी गिरणीची चिमनी दिसू लागली. रस्त्यावरची लेंग्या-झब्ब्यातल्या गिरण कामगारांची लगबग दिसू लागली. वेळ संध्याकाळची होती. पहिली पाळी संपवून आलेल्या गिरण कामगारांची मनोरंजनाची ही वेळ. त्या मनोरंजनातला नाटक हा अविभाज्यभाग. नाटकाची तालिम नजरेसमोर तरळू लागली. लहानपणी गणपतीच्या मांडवात पाहिलेली ती नाटकं डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागली. नांदी ऐकू येऊ लागली. शिवाजी, संभाजी, जिजाऊ नजरेसमोर साकारू लागले. रणांगणावर यवनांसोबत लढणारे महाराजांन मला दिसू लागले, तलवारींचा खणखणाट, घोड्यांच्या टापा नि हत्तींचा चित्कार कानात घुमू लागले..!

ते जुने कपडे हातात घेताच, माझ्या मनाने गिरणगांवातल्या त्या सोनेरी गत इतिहासाशी थेट नात जोडून घेतलं होतं. खोलीच्या मालकीणबाई चहा घेऊन आल्या होत्या. त्यांची अवस्थाही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. मी भानावर आलो. सन १९५३मधला पत्ता शोधत, २०२१ साली कुणीतरी येईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यांना त्याचंच त्यांना अप्रुप वाटत होतं. त्यांचेही डोळे भरून आले होते.

मालक, त्यांना जीवापाड जपलेला तो एकेक अमुल्य कपडा निगुतीने काढून दाखवत होते. कामगार रंगभुमीवरच्या कितीतरी महान नट-नट्यांनी अंगावर मिरवलेले ते कपडे हळुवारपणे हाताळताना, मी नकळतच त्या काळात गेलो होतो. ‘जयवंत आणि कंपना’ आता अस्तित्वात नाही; नाटकासाठी कपडे भाड्याने देण्याचा व्चवसायही बंद करुन कैक वर्ष झालीयत. मात्र त्या कंपनीच्या मालकाच्या वंशजांनी ती आठवण मात्र जीवापाड जपली होती. आणि म्हणून आम्हाला ती अनुभवता आली..!

इथे येऊन दोन तास झाले होते. भानवर येऊन वर्तमानात आलो. इतिहासाचा निरोप घ्यायची वेळ आली. जाता जाता महाराजांचा जिरेटोप डोक्यावर घालून पाहायची इच्छा झाली. मी तो हातातही घेतला, पण डोक्यावर घालायला मन धजेना. नाटकातला असला म्हणून काय झालं, तो महाराजांचा जिरेटोप होता. तो परिधान करायची माझी काहीच पात्रता नाही, हे लक्षात घेऊन मी तो बाजुला ठेवला.

औरंगजेबाची पगडी मात्र मी घालून पाहिली.

तेंव्हाचाच हा फोटो..!

-नितीन साळुंखे
06.08.2021

शिष्य व्हा, गुरु ठायी ठायी आहेत..

शिष्य व्हा, गुरु ठायी ठायी आहेत..

गुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले प्रत्यक्ष गुरू. पण अप्रत्यक्ष, अपरिचित गुरू तर अगणीत असतात. ते देतच असतात, आपण किती घेतो आणि आपल्या वाटेला आलेला शिष्य धर्म कसा निभावतो याचा विचार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं गरजेचं ठरतं..

आमच्या मुंबईसारख्या शहरात रोज सकाळी कामासाठी बाहेर पडल्यापासून शिकायची सुरुवात होते. नेहेमीच्या बसचा कंडक्टर, बसमधूल प्रवासी, रिक्शावाला, लोकल प्रवासातील सहप्रवासी -यात प्रथम वर्गातले वेगळे आणि द्वितिय वर्गातले वेगळे-, नाक्या नाक्यावर लागलेले ‘काविळ’ झालेल्या तथाकथीत समाजसेवक, नेते यांचे बॅनर्स, रस्त्याने चालताना दिसणारी अगणित माणसं हे सारे सारे मला कसं वागावं आणि कसं वागू नये याचं अप्रत्यक्ष शिक्षण देत असतात. त्यांच्याकडून मी बरच काही शिकत असतो आणि स्वत:त ते मला देत असलेल्या अप्रत्यक्ष शिकवणीनुसार माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही बरीच सुधारणा अद्याप व्हायची बाकी आहे, याचा साक्षात्कार पुन्हा हेच चक्र दुसऱ्या दिवशी फिरताना होतो. साक्षात्कार आणि गुरूचा संबंध मला असा रोज नव्याने अनुभवायला मिळतो आणि मग मी दररोज या गुरुंच्या नव्याने प्रेमात पडत जातो..

अशाच एका रिक्शावाल्याने आपलं उदरभरण करणाऱ्या साधनाकडे, म्हणजे एखादा हातगाडीचा ठेला असो वा पानपट्टीची टपरी असो वा एखादं काॅर्पोरेट आॅफिस असो व अगदी हमाली असो, कसं पाहावं हे शिकवलं. त्याने त्याच्या रिक्शाला ‘चक्क ATM’ असं नांव दिलं होतं. जगातल्या सर्व ग्रंथांचा कीस पाडूनही रिक्शासाठी इतकं समर्पक नांव सुचलं नसतं, जे त्या सामान्य माणसाला सुचलं होतं. प्रेम असलं की असं छान छान सुचतं. आपले पोट भरणाऱ्या साधनाकडे प्रेमाने पाहावं हे त्या जेम तेम शिकलेल्या उत्तरप्रदेशी रिक्शावाल्याने मला शिकवलं. एका टॅक्सीवाल्याने गाडीचा हाॅर्न हा जनावरांना मागून येणाऱ्या गाडीपासून सावध करण्यासाठी असतो, माणसांसाठी नसतो, हे शिकवलं;वर ‘आजकल तो मन्सा न होने पर भी हारन बजाना पडता है साहब, क्या करे, आदमी जानवरसे भी बदतर हो गया है’ असं त्याचं अनुभवसिद्ध ज्ञानही साध्या सोप्या शब्दात दिलं. राजकारणी-भ्रष्ट अधिकारी समाजात कसं वागू नये याची शिकवण तर सकाळ संध्याकाळ देत असतात, ते ही गुरुच..!!

असं रोज काही ना काही आपल्याला शिकवून मला माझ्या शिष्यधर्माची सातत्याने याद दिलवणारे सर्वच मला गुरुस्थानी वाटतात. ‘मला समजते ते सर्व काही नाही’ हे माझं आवडतं वाक्य अशाच गुरुंची मला मिळालेली मोलाची शिकवण आहे. हे गुरू मला सातत्याने जमिनीवर राहाण्यास मदत करत असतात..

दररोज भेटणाऱ्या या सर्व गुरुंसारखाच पुस्तकं हा माझा महत्वाचा गुरू. सदा सर्वकाळ माझी संगत करणारा. लोक मुद्दाम टाईम अॅडजस्ट करून, आजुबाजूला जाहिरात करत ‘सत्संग’ करायला जातात. अलिकडे तर सत्संग हा स्टेटस सिंम्बीॅल झालाय हे पेप्रात येणाऱ्या जाहिरातींवरून समजतं. पण पुस्तकाचा सत्संग करायला कुठंही जावं लागत नाही. तेच बिचारं माझ्या झोळीत (पक्षी सॅकमधे. मी झोळीच वापरतो, म्हणून मी झोळी म्हणालो) निवांत बसून माझा संग करत सोबत प्रवास करत असतं. सोबत एखादं पुस्तक आहे ही भावनाच किती आश्वासक असते, हे ज्याने अनुभवलंय त्यांनाच कळेल. सतत सोबत करणारा, अबोल मार्गदर्शन करणारा पुस्तक हा एकमेंव गुरू. कोणतीही बंधनं नाहीत की बंधं नाहीत, व्रत नाही की सोहळे नाहीत की काहीच अवजड प्रथा-परंपरा नाहीत.

आपण कल्पना करू शकणार नाही एवढं सामर्थ्य या गुरुत आहे. मी माझ्या गुरुच्या या सामर्थ्याचा मन:पूत अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो. तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या साऱ्या- साऱ्याचा विसर पाडून क्षणात समाधी अवस्थेत नेणारा हा विलक्षण गुरु आहे. मेडीटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी स्वतःशी एकरूप होणं हा असतो, हे मला ऐकून माहित आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे. आणि ती समजूत जर खरी असेल, तर मी खात्रीने सांगू शकतो, की पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. मी ध्यान, योग, अध्यात्म यांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणारांना मिळत असेल, त्यापेक्षा मला पुस्तकातून मिळणारी अनुभूती त्या पेक्षा कणभरही कमी नाही. पुन्हा या गुरूशी रमणाम होण्यासाठी कोणतीही विशिष्ट जागा, उदबत्तीचा सुगंधी धूर, मंद प्रकाशयोजना, गूढ गंभीर स्वरातले मंत्रोच्चार किंवा आणखी काही इत्यादी कशाचीही गरज भासत नाही. पुस्तक गुरूशी एकरूप होऊन, त्या गुरूच्या हृदयीचे माझ्या हृदयी येण्यासाठी गर्दीचा रस्ता, रेल्वेचा फलाट, उडप्याच हॉटेल किंवा अगदी स्मशानही चालतं. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव होऊन गेलेल्या त्या संताना आला असेल तो असेल, पण या गुरूशी तादात्म्य पावण्याचा माझा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नाही. समाधी लागणं, मला वाटतं, यालाच म्हणत असावेत..!!.

या गुरुचं वैशिष्ट्य म्हणजे, याने ‘मी सर्वज्ञानी नाही’’ याची जाणीव माझ्यात सतत तेवत ठवली. एक पुस्तक वाचून मला काहीतरी समजतंय न समजतंय, तोवर दुसर त्याच विषयावरचं, परंतु वेगळी मांडणी असणारं पुस्तक हातात पडतं आणि ‘आपल्याला काही समजत नाही’ ही जाणीव आणखी तीव्र होते. मला वाटतं, आपल्याला काही समजत नाही किंवा आपल्याला जे जे समजतं असं वाटतं, ते सर्व काही नसतं, ही भावना आपल्यात निर्माण करून, ज्ञानाच्या दिशेने आणखी चार पावलं नेऊन आपली विचार शक्ती विकसित करणारा पुस्तकासारखा अन्य दुसरा गुरु नाही.

माझ्यातलं शिष्यत्व सतत जागतं ठेवणारा अनुभव हा माझा आणखी एक गुरु. कोणताही गुरु माणसाला शहाणा करतो, असं आपण म्हणतो. अनुभवाच्या बाबतीतही हे आपण म्हणू शकतो. ‘म्हणू शकतो’ हा शब्द प्रयोग करण्यामागे, अनुभवाने माणूस शहाणा होतोच असं नाही, हा अनुभव आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण म्हणूनच ठीक आहे. अन्यथा प्रत्यक्षात पुढच्यासही ठेच आणि मागच्यासही ठेचच, हा अनुभव आपल्याला वारंवार आला नसता. सध्या तर इथे आपण दुसऱ्याच्या सोडाच, स्वतःला लागलेल्या ठेचेतूनही काही शिकावयास तयार नाहीत, हे वारंवार सिद्ध होतंय. इथे गुरु चुकत नाही, तर शिष्य या नात्याने आपण चुकतो. गुरु मोठा असेल, तर शिष्यही त्याच तयारीचा लागतो. इथे कस लागतो तो आपल्यातल्या शिष्याचा. सध्याच्या सर्वत्र अविश्वास भरून राहिलेल्या काळात तर गुरूपेक्षा शिष्याची जबाबदारी खूप वाढलेली आहे. मोबाईलवर येणारे परंतु बुद्धीला न पटणारे मेसेजेस, नेत्यांच्या कोलांट उड्या, धार्मिक आणि जातीय उन्माद, आपल्या सर्वांच्यातच निर्माण झालेले पैशांचे अतोनात महत्व आणि त्यातून लयाला गेलेली माणुसकी ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वानुभावाच्या कसोटीवर घासून त्या प्रमाणे आपलं वर्तन करायची आपण शिष्य म्हणून आपली जबाबदारी आहे. खऱ्या-खोट्याची शहानिशा कशी करावी, हे अनुभव शिकवतच असतो, आपण शिकत नाही ह्याची खंत आहे.

येत्या मंगळवारी, म्हणजे १६ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. ह्या दिवशी गुरूच महात्म्य सांगणारे, गुरुकडून काहीतरी शिकलो म्हणून गुरुचे उपकार स्मरणाऱ्या हजोरो मेसेजेसचा धुंवाधार पाउस पडणार. पण गुरूने दाखवलेल्या मार्गावर त्यापैकी कितीजण चालताहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर पदरी निराशाच पडेल याविषयी मला तरी शंका नाही. आपण आजवरच्या आयुष्यात जे जे काही शिकलो, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही चांगलं शिकवलं त्या शिकवणुकी प्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हीच खरी गुरुदक्षिणा असेल.असं केलं तरच त्या गुरुपौर्णिमेला अर्थ..!!

गुरुपौर्णिमा हा केवळ शुभेच्छा (ह्या का देतात हे मला अद्याप समजलेलं नाही. एकाने तर गेल्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्याही शुभेच्छा दिल्या होत्या.) देण्याचा दिवस नाही, तर आपल्यापैकी प्रत्येक शिष्याने अंतर्मुख होऊन, आपण ज्या ज्या गुरुकडून जे जे काही शिकलो त्या प्रमाणे आपण स्वत: वागतो आहोत का, याचा विचार करण्याचा, आपल्यातलं. शिष्यत्व सतत जागतं आहे का हे तपासण्याचा दिवस आहे, अस मी समजतो..!!

-नितीन साळुंखे
9321811091
१३.०७.२०१९

प्रसिद्धी- ‘दै. रामप्रहर’, पनवेल-रायगड, रविवार दिनांक १४ जुलै, २०१९

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र-

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र-

महत्वाचं- ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापिठात (IGNOU)’ ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरु करणार, अशी बातमी आल्यापासून, तसा अभ्यासक्रम सुरू करावा की करु नये, ही चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर, मी सन २०१७ मधे एका वर्तमानपत्रासाठी लिहिलेला लेख, मला इथे पोस्ट करावासा वाटतो..!

सदर लेख मी तीन वर्षांपूर्वी लिहिलेला आहे आणि या तिन-एक वर्षात माझ्या विचारांत अमुलाग्र बदल झालेला आहे, ही गोष्ट हा लेख वाचाताना लक्षात ठेवावी, ही विनंती.

गत चार-पांच वर्षांपासून मी देव आणि धर्म या गोष्टींपासून खूप लांब गेलेलो आहे. किंबहूना मी या दोन्ही गोष्टी निरुपयोगी (काही लोकांच्या स्वार्थासाठी मात्र अतीव उपयोगी) आहेत, या निष्कर्षाप्रती आलेलो असून, मी या दोन्ही गोष्टी ठामपणे नाकारलेल्या आहेत. मात्र ‘ज्योतिष’ ह्या विषयासंबंधात मात्र मी स्वत:ही संभ्रमात आहे. ज्योतिषाची सांगड देव-धर्माशी घातली जाते व या लेखावरून, माझे वरचे विधान विसंगत वाटू शकते, म्हणून हा खुलासा करणं मला आवश्यक वाटतं..!

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र-

ज्योतिष ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषचाचं चर्वण करून करून चोथा झालाय अगदी. तरी पुन्हा पुन्हा नव्याने हा विषय चर्चिला जातोच. जो विषय चर्चेत असतो, त्या विषयाची लोकांना एकतर आवड असते किंवा नपड तरी असते. दोन्ही संदर्भात चर्चा ही होतेच. परंतू मी थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयांवर बोलणार आहे.

लिहीण्याची सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छीतो, की मी उगाच टिका करायची म्हणून किंवा एखाद्या विषयाची बाजू घ्यायची म्हणून घेत नाही, तसंच कोणत्याही विषयावर मी उगाच बोलायचं म्हणूनही बोलत नाही, तो माझा स्वभाव नाही. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ या संतवचनावार माझा विश्वास आहे. ज्या विषयाची बाजू घ्यायची किंवा ज्यावर टिका करायची, तर त्या विषयाचा मनाचं समाधान होईपर्यंत अभ्यास करून, मगच बाजू घ्यावी किंवा टीका करावी असं मला वाटतं.

ज्योतिषशास्त्राचंही तसंच आहे, मी सन १९८९ पासूनच मी या शास्त्राचा अभ्यासक आहे आणि या शास्त्राचा माझा अभ्यास अजुनही सुरुच आहे. याचा अर्थ ज्योतिषशास्त्रावर टिका करण्यास वा त्याची बाजू घेण्यास मी पात्र आहे असं मी समजतो. या शास्त्रावर टिका करणाऱ्यांपैकी शेकडा शंभर जणांचा या शास्त्राचा अभ्यास नसतो. दुसरे बोलतात म्हणून आपण बोलायचं आणि आपण पुरोगामी असल्याचं दाखवायचं, असा सर्व प्रकार आहे. मी मात्र जवळपास २६-२७ वर्ष अभ्यास करून मला जे आकलन झालं त्या आधारे मी पुढील गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. या शास्त्रावरची ही टिकाही नाही किंवा बाजूही घेतलेली नाही.

सुरुवात करताना ‘ज्योतिषशास्त्र’ या शब्दातील ‘शास्त्र’ या शब्दाविषयी बोलू. ‘शास्त्र’ हा शब्द आपल्या कुणाच्याही कानी पडला की, आपल्या डोळ्यांसमोर चटकन दिसतं ते ‘विज्ञान’..! सामान्य जीवनात आपण शास्त्र ह्या शब्दाची सांगड विज्ञान ह्या शब्दाशी घातली आहे. परंतु ‘ज्योतिष’ शब्दाच्या पुढच्या ‘शास्त्र’ ह्या शब्दाचा आणि विज्ञानाचा तसा काहीच संबंध नाही(त्यातला गणिती भाग वगळून). ज्योतिषशास्त्रातला शास्त्र हा शब्द विंज्ञानाशी संबंधीत नसून, ‘धर्मशास्त्रा’शी संबंधीत आहे. आणि म्हणून ज्योतिषशास्त्र व विज्ञान याची तुलना संभवत नाही.

दुसरं म्हणजे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांतील नेमक्या फरकाबद्दल थोडं बोलू. या दोघांतील सीमारेषा अत्यंत पुसट आहे आणि ती सीमा कोणती, हे सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्यावर किंवा मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यावर अवलंबून असते. एखाद्या देवळात जाऊन एखाद्याचं भलं झालं, तर त्या देवळातला तो देव त्या एखाद्याच्या अत्यंत श्रद्धेचा भाग बनतो, तर त्याची श्रद्धा ही दुसऱ्या एखाद्याच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा असते, कारण त्याला तो अनुभव आलेला नसतो. थोडक्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सबजेक्टीव्ह, वैयक्तिक अनुभवावरून ठरवायच्या टर्म्स आहेत असं म्हणतां येईल. आणखी एक उदाहरण देतो. हे उदाहरण अनेकांच्या भावना दुखावणारं असू शकेल याची मला कल्पना आहे, तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक अगदी स्पष्ट समजावून सांगण्यासाठी ते उदाहरण नाईलाजाने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यांच्या भावना दुखावतील, त्यांची मी आधीच क्षमा मागतो.

आपला बाप कोण, आई दाखवते तो, हा आपल्या सर्वांच्याच श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग असतो. बहुसंख्यांच्या बाबतींत हे खरंही असतं. तरीही इथे पुरावा दाखवा म्हणून सांगितलं जात नाही. नीट विचार केला, तर ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नव्हे काय? भावनेचा प्रश्न असल्यानं इथं कोणी पुरावा मागत नाही. पण तुरळक का होईना अशी उदाहरणं समाजात दिसतात, की एखाद्या मुलाचा बाप, ते मुल ज्याचं नांव बाप म्हणून लावते, तो असतोच असं नाही. परंतु त्या मुलाच्या दृष्टीने तोच त्याचा बाप असतो. ही त्या मुलाची श्रद्धा असते, तर खरं काय आहे त्याची माहिती असणाऱ्यांच्या दृष्टीने ती त्या मुलाची अंधश्रद्धा असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेची व्याख्या अशी व्यक्तीपरत्वे बदलत असते. म्हणून श्रद्धा नसलेल्यानी श्रद्धा असलेल्यावर टिका करताना सारासारविचारबुद्धीने करायला हवी. एखाद्या गोष्टीवरील श्रद्धेमुळे कुणाचं नुकसान होतं नसेल, तर उगाच अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून बोंब मारण्यात काही हंशील नाही. ज्योतिष हा असाच भावनेचा आणि म्हणून श्रद्धेचा प्रश्न आहे, ती अंधश्रद्धा आहे म्हणून उगाच बोलण्यात काय हशील..!

आता ज्योतिषशास्त्राविषयी. ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. किंबहुना ज्योतिषाचा आधार कधी ना कधी घेतला नाही, असा मनुष्य सापडणं दुर्मिळ. ज्यांना याचा अनुभव येतो, त्यांची यावर श्रद्धा बसते आणि ज्यांना येत नाही ते याला थोतांड म्हणतात. ज्योतिष हे असं औषध आहे, की जे भरल्या पोटावर कधीच खाल्लं जात नाही. हे रिकामी पोटीच घ्यायचं औषध आहे. तरी गंम्मत अशी, रिकामं पोट भरण्यासाठी ज्योतिष शास्त्राचं औषध घेतलेलेच, मग पोट भरलं, की ज्योतिष हे थोतांड आहे असं सांगत फिरतात. हे म्हणजे अन्नछत्रात जेवल्यावर जेवण अळणी होतं म्हणून नांवं ठेवण्यासारखं झालं.

आता रिकामी पोट म्हणजे काय, ते ही स्पष्ट करणे गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना उद्या माझ्या ताटात काय पडणार आहे इथपासून, ते मुळात पडणार तरी आहे की नाही इथपर्यंतंची शाश्वतता नसते, ते म्हणजे रिकामी पोट. थोडक्यात अशाश्वत, अस्थिर किंवा अनस्टेबल आयुष्य जगणाऱ्यांसाठी ज्योतिष हे व्हिटामिनसारखं किंवा इंजेक्शनसारखं काम करतं. उद्या काय घडणार आहे, याचं कुतुहल माणसाला फार पुरातन काळापासून आहे. या कुतुहलाचा शोध हे शास्त्र घेतं. अज्ञाताचा शोध घेणं हा माणसाचा आवडतां खेळ आहे. या खेळातूनच आजची आपली प्रगती झाली आहे. ‘चंद्र हवा मजं’ असा हट्ट धरलेल्या प्रभु रामचंद्राला थाळीतल्या चंद्राच्या प्रतिबिंबावर समाधान मानावं लागलं होतं, तर आज त्याच्या चंद्रावर माणसांच्या वसाहती करण्याच्या गोष्टी चालल्यात. चंद्राची पाण्यातली प्रतिमा ते प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवणं, हा मानवानं अज्ञाताच्या शोधातूनच गाठलेला टप्पा आहे. अर्थात यासाठी विज्ञानाचा आधार घेतला गेला. ज्योतिषशास्त्राचा तारतम्याने आणि विज्ञानाच्या श्रद्धेने आधार घेतला की अनेक बाबतीत चंद्राच्या शोधासारखेच उत्तम अनुभव येऊ शकतात. चंद्र पादाक्रांत करण्यासाठी विज्ञान कामाला येते, तर उद्या माझ्या नशिबात काय आहे हे शोधण्यासाठी ज्योतिष कामाला लागते. विज्ञान चंद्राचा पत्ता अचूक देतं, तर ज्योतिष नशिबातल्या भाकरीच्या चंद्राच्या प्राप्तीचा अंदाज देतं. विज्ञान हे सर्टन असतं, तर ज्योतिष हे अनसर्टनिटीचं शास्त्र असतं.

ज्यांच्या जीवनात स्थैर्य-विशेषकरून आर्थिक स्थैर्य- शांतता आहे असे लोक ज्योतिष शास्त्राला नांवं ठेवताना आढळतात. असे लोक सहसा पैसेवाले, हुद्देवाले असल्यानं, त्यांना ‘उद्या’ची फिकीर नसते. त्यांच्या मताचा समाजावर प्रभावही असतो. ते ज्योतिषशास्त्रावर टिका करतात म्हणून मग इतरही करतात. परंतु ज्यांच्या जीवनात वा व्यवसायात ‘अनसर्टनिटी’, उद्याची काळजी असते, अशा व्यक्ती मात्र ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. यांत हातावर पोट असणारे, निम्न स्तरातलं आयुष्य जगणारे, जुगारी, राजकारणी, चित्रपट व्यावसायीक या सारख्या व्यक्ती येतात. राजकारण, चित्रपट या सारख्या व्यवसायांत हमखास यशाची खात्री कुणालाच देतां येत नाही व म्हणून ज्योतिषशास्त्र अशा व्यवसायांत असणाऱ्यांना मोठा मानसिक आधार ठरतं व त्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करतं. हातावर पोट असणाऱ्यांचंही असंच अस्थैर्य त्यांना या शास्त्राचा आधार घेण्यास प्रवृत्त करतं. जुगाराचंही तसंच. बाकीचे जुगार सोडून द्या पण लग्न हा एक जुगार समजला जातो व तसा तो असतोही. म्हणून अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित लोकंही पत्रिका जमल्याशिवाय लग्नाला उभे राहात नाहीत. अगदी प्रेमविवाह करणारे कित्येक प्रेमवीर शेवटच्या क्षणाला पत्रिका बघण्याचा हट्ट धरतात. थोडक्यात उद्याच्या पोटात काय दडलंय, याचा वेध घेण्याचं काम ज्योतिष शास्त्र करतं. मनाला उभारी देण्याचं काम करणारं हे शास्त्र आहे. म्हणून मी या शास्त्राला व्हिटामिन्स किंवा इंजेक्शन असं म्हणतो.

ज्योतिषशास्त्र हे कल्पनेवर आधारीत शास्त्र आहे. कोणत्याही इतर शास्त्रापेक्षा हे जास्त वैयक्तिक आहे. कुंडलीतली बारा घरे, बारा राशी आणि बारा ग्रह यांच्या परम्युटेशन-काॅम्बिनेशनचा अर्थ लावून ज्योतिष सांगीतलं जातं. हा अर्थ समोरच्या व्यक्तीचं लिंग आणि वय पाहून सांगीतला जातो. इतर कोणत्याही शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राचे बेसिक नियम आणि व्याख्या सारख्याच असल्या, तरी त्यांचं अॅप्लिकेशन मात्र लिंग-वयपरत्वे बदलत असतं. उदा. मंगळ आणि शुक्र या ग्रहांची युती जर एखाद्या कुंडलीत असेल, तर या दोन्ही ग्रहांचे गुणधर्म अधिक ते ज्या घरात आहेत त्या घरावरून पाहील्या जाणाऱ्या गोष्टी यांचं मिश्रण करून सांगीतलं जातं. मंगळ हा पुरुष तर शुक्र हा स्त्री ग्रह मानला गेला आहे. तसंच शुक्र जलतत्वाचा तर मगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह. हे मिश्रण वर्णन करण्यासाठी कमालीची तरल कल्पनाशक्ती लागते. शुक्र हा अत्यंत रसिक, रोमान्स, शृंगारीक, भावनाप्रधान ग्रह समजला जातो तर मंगळ हा ग्रह गती, वेग, वासना, संताप तीव्रतेचा कारक समजतात. आता यांचं काॅम्बिनेशन कसं होईल, तर शुक्राच्या शृंगारीकतेला मंगळाच्या गतीची साथ मिळून, ती रसिकता केवळ वासनापूर्तीपर्यंतच मर्यादीत राहाते. रणांगणाचा राजा असलेला मंगळ, बेडरुमही रणांगणासारखीच वापरतो.

आता मंगळ-शुक्राचं हे किंवा असं फळ देताना समोरच्या व्यक्तीचं वय पाहावं लागतं. वर उल्लेखलेली फळं कुमार वयाच्या किंवा वयाची ६० ओलांडलेल्याला देऊन कसं चालेल? ही फळं तारुण्यावस्थेतील लोकांना देता येतील. स्त्रीयांना पुरषांसारखी फळ देता येत नाहीत, तर त्याना द्यायची फळं बऱ्यातदा पुरुषांच्या फळांच्या विपरीत असतात. इतर शास्त्रांपेक्षा ज्योतिषशास्त्र वेगळं ठरतं, ते इथंच. इतर शास्त्राचे नियम हे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. ते सर्वांना समान लागू होतात.

ज्योतिषशास्त्रातले नियम तेच असले तरी ते लागू करताना मात्र लिंग आणि वयपरत्वे लागू करावे लागतात आणि म्हणून याची टवाळीच जास्त होताना दिसते. हे तारतम्य ज्योतिषाने बाळगायचं असतं, नाहीतर बदनाम शास्त्र होतं. ह्या शास्त्राचा आवाका अत्यंत मोठा आहे, मी इथं थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय. आपल्याला समजलं नाही, तर तो दोष माझा.

आता मी या शास्त्राला इंजेक्शन का म्हणतो ते सांगतो आणि लेखाचा समारोप करतो. हरलेल्या, खचलेल्या मनाला ‘आणखी थोडा प्रयत्न कर आणि थोडी कळ राढं, भविष्य उज्वल’ आहे असा धिर देणारं हे शास्त्र आहे. माणूस त्या आशेवर प्रयत्न करत दिवस काढतो व पुढे तो यशस्वी होतोही. हे यश अर्थातच प्रयत्न आणि इच्छाशक्तीचं फळ असतं आणि ही इच्छाशक्ती जागृत करायचं काम ज्योतिषशास्त्र करतं. इंजेक्शन हे जसं थकलेल्या आजारी शरीराला लगेच उभं करतं आणि एकदा का शरीर उभं राहीलं, की त्याचा काॅन्फिडन्स आपोआप वाढतो व नंतर ते आपलं काम सहज करू शकतं. मग ते जगतं नेहेमीच्या अन्नावर. तसंच ज्योतिषाचं आहे. खचलेल्या मनाला काॅन्फिडन्स देण्याचं काम ज्योतिष करतं आणि एकदा का तो आला की पुढचं काम सोप असतं. इंजेक्शन शरीर उभं करतं, तर ज्योतिष मन उभं करत. शरीर एकदा का उभं राहीलं की मग इंजेक्शनची गरज लागत नाही, तसंच एकदा का मनाने उभारी घेतली, की सारखा ज्योतिषाच्या आधाराची गरज नसते. तशी ती सारखी घेऊही नये. काही गोष्टी जशा घडतील तशा घडू द्याव्यात. पण नाही, माणसं चुकतात ती नेमकी इथंच, ती एका अनुभवावरून त्याच्या नादी लागतात आणि उठ-सुट ज्योतिषाकडे धावतात आणि मग लबाड ज्योतिषी त्यांचा गैरफायदा घेतात आणि मग या पवित्र व्यवसायाचा ‘धेदा’ होतो व नंतर हा लोकांच्या हेटाळणीचा भाग होतो.

ज्योतिषाचा आधार जरूर घ्यावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये. इंजेक्शन कुठं कोण रोज घेतं?

-नितीन साळुंखे
9331811091
05.07.2017

गिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-

(भाग चौथा)

देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी

सन १८५४ मधे, ताडदेव येथील कावसजी नानाभॉय दावर यांच्या व मुंबईतल्याही पहिल्या गिरणीची, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ची, पायाभरणी झाली आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं, हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता पुढे-

मुंबईत गिरणी उभी करणं, हे कावसजींच धाडसंच होतं. कारण संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटीश/युरोपीयन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या, ५ लाख रुपयांच्या भाडवलाची उभारणीही मुंबईतल्या ५० धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वत:ला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही. पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नविन उपद्व्याप उताणा पडला तर, थेट रस्त्यावरच यायची पाळी, अशी सर्व परिस्थिती..! या परिस्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडसं नव्हे तर काय..! धाडसी तर कावसजी होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे होता, तो दुर्दम्य आत्मविश्वास..! त्या आत्मविश्वासातूनच धोका पत्करणं हे कदाचित त्यांच्या स्वभावात उतरलं असावं आणि त्यातूनच त्यानी या व्यवसायात शिरकाव केला असावा. नफा होईल की तोटा, तोटा झाल्यास, पुढे काय करायचं, याचा फारसा विचार त्यांनी केला नसावा..! धाडसी माणसं परिणामांचा असा विचार करत बसत नसतात, जे होईल ते नंतर पाहू, असा विचार करुन ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतात, मग त्यातून जे होईल ते होवो..! कावसजींनी त्यांच्या कृतीतून हेच दाखवून दिलं..!!

आणि पुढच्या वर्षभरातच कावसजींना त्यांनी पत्करलेल्या धोक्याचं भरभरून फळ मिळालं. कावसजींची ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ ही गिरणी कल्पनेपलिकडे यशस्वी झाली. त्याने कावसजींचा आत्मविश्वास दुणावला व लगेचंच त्यांनी, ताडदेव येथे आपल्या पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण, ‘दी बॉम्बे थ्रॉस्टल मिल(The Bombay Throstle Mill)’ उभारण्याचं जाहीर करुन कामास सुरुवात केली. सन १८५७ मधे ‘बॉम्बे थ्रॉस्टल (उच्चार-थ्रॉटल) मिल’ कार्यान्वित झाली. कावसजींची आणि मुंबई शहरातलीही ही दुसरी गिरणही जोमात सुरू आणि ‘पारशी तिकडे सरशी’ ही म्हण खरी झाली.

कावसजींच्या मुंबईतल्या या दोन गिरण्यांनी मुंबईत व देशात भविष्यात फोफावलेल्या गिरणी धंद्याचा पाया घातला. नविन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की, सन १८५४(१८५६) ते १८५७ मधे कावसजींच्या दोन गिरण्या सुरू झाल्यानंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १८६० पर्यंत, खुद्द मुंबईत ९ गिरण्यांची यंत्र धडधडायला लागली. हिच संख्या ४० वर्षांत ८४ इतकी झाली तर त्यापुढच्या पंचवीस वर्षात, म्हणजे १९२५ सालापर्यंत ती ९७ एवढी झाली. याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या ३३७ एवढी प्रचंड होती. सन १८५४ ते १९२५ पर्यंतच्या साधारण ७० वर्षांत देशभरात एकूण ३३७ कापड गिरण्या सुरू झाल्या याचा अर्थ, दर वर्षाला ४ गिरण्या होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांमागे एक गिरणी देशभरात कुठे न कुठे सुरू होत होती..!

शहरात ६ आणि उपनगर कुर्ला येथे १, अशा ७ गिरण्या सुरू झाल्या. सन १८६० सालात, मुंबई शहर व कुर्ला येथे मिळून एकूण ९ असलेल्या गिरण्यांची संख्या, पुढच्या १५ वर्षांत वाढून २८ झाली आणि तिच संख्या, एकोणीसावं शतक संपताना, म्हणजे सन १९०० सालात वाढून ८४ इतकी झाली. सन १९२५ मधे मुंबई व कुर्ला मिळून एकूण ९७ गिरण्या मुंबईत सुरू झाल्या. हे श्रेय, अर्थातच, सन १८५४ साली मुंबईतली पहिली गिरण काढणाऱ्या कावसजी नानाभॉय दावर यांचं..!

कावसजींनी सुरू केलेल्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ नंतर देशात गिरणीधंदा फोफावला असला तरी, कावसजींच्यापुर्वीही काही उद्योगी लोकांनी देशात कापड गिरणी सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्या बहादूर लोकांचे प्रयत्न फसले असतील किंवा त्यांना परिस्थितीने हवी तशी साथ दिली नसेल, पण त्यांचे प्रयत्न निश्चितच महत्वाचे होते. त्यांच्या त्या प्रयत्नांची गाथा आपल्याला थोडक्यात का होईना, पण माहित असणं आवश्यक आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय मुंबईत सुरु झालेल्या गिरण्यांच महत्व आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे कावसजींच्या व त्यानंतर मुंबईत सुरू झालेल्या गिरण्यांचा प्रवास कसकसा होत गेला, ते पाहाण्यापूर्वी आपण, देशात कापड गिरणी स्थापन करण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्याची थोडक्यात माहिती घेऊ..!

देशात कापड गिरणी सुरू करण्याचा सर्वात पहिला प्रयत्न झाला, तो सन १८१७-१८ मधे, आजच्या पश्चिम बंगालमधील (तेंव्हाचा Bengal Province), कलकत्त्यातहून (आजचा कोलकाता) २०-२५ किलोमिटर दूर असलेल्या, हुबळी नदीच्या काठावर असलेल्या ‘बावरीया’ या गांवात..! भारतातून कच्चा कापूस इंग्लंडला जातो व त्याचं कापड तयार होऊन पुन्हा भारतात परत येतो. त्यापेक्षा इथेच गिरणी टाकून तसं कापड तयार करण्याचा प्रयत्न केला, अगदी त्यासाठी गिरणी व त्यातील यंत्रसमुग्रीचा खर्च धरला तरी, ते प्रकरण २०-२५ टक्के स्वस्त ठरू शकते, असा हिशोब काही ब्रिटीश व्यावसायिकांनी केला आणि ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ या देशातल्या सर्वात पहिल्या कापड गिरणीची स्थापना केली..!

देशातल्या या पहिल्या गिरणीची माहिती घेण्यासाठी थोऽऽडं मागं जावं लागेल. ‘फोर्ट ग्लॉस्टर’ हा नांवाप्रमाणे किल्लाच. मुळातली ही डच इस्टेट. ‘युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ईन इंग्लंड’ (हे ‘ब्रिटीश ईस्ट कंपनीचं’ भावंड) या कंपनीच्या कॅप्टन अलेक्झांडर काईड (Kyd) या अधिकाऱ्याने दिनांक १ जुलै, १७९० मधे ही इस्टेट खरेदी केली. ही इस्टेट पुढे काही ब्रिटीश व्यापाऱ्यांनी गिरणी सुरू करण्यासाठी म्हणून खरेदी केली आणि त्यात असलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर’ या किल्ल्याचं रुपांतर, सन १८१७-१८ मधे, कापड गिरणीत करुन, तिला ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ असं नांव दिलं.

किल्ल्याचं रुपांतर गिरणीत केल्यामुळे, या गिरणीची बांधणी कारखान्यासारखी नसून, युरोपातल्या एखाद्या किल्ल्यासारखीच, परंतु घडीव दगडांच्या ऐवजी भाजक्या विटांची होती. भिंती तीन-तीन फूट जाडीच्या. शिवाय भिंतींना बाहेरून मजबूत कॉलम्सचा आधार. विचित्र पद्धतीची बांधणी असलेली ही गिरणी सुरू झाली अन् पुढच्या आठ-दहा वर्षातच बंदही पडली. ही गिरणी बंद होण्याचं कारण मात्र मजेशीर आहे. ते कारण म्हणजे, या गिरणीला जो परवाना (लायसन्स किंवा चार्टर) बंगाल सरकारने दिला होता, त्यात कापड गिरणी सोबतच, कॉफीचा मळा, डिस्टीलरी (फक्त रम तयार करण्याचा कारखाना), फाऊंड्री, तेलाचं गाळप आणि पेपर मिल सुरू करण्याचीही अट घालण्यात आली होती. त्यातला कॉफीचा मळा तर अगदी मस्टच होता. गिरणी धंद्याच्या अगदी विरुद्ध स्वरुपाचे व्यवसाय करणं भाग पडल्याने(च) असेल, पण तो द्राविडी प्राणायम न झेपल्याने सदर गिरणी बंद पडली, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे..!

ही गिरणी बंद होण्याची आणखीही काही कारणं काही अभ्यासक देतात. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे, ही गिरणी सुरू करण्यासाठी निवडलेलं चुकीचं ठिकाण. हे ठिकाण मुख्य शहर असलेल्या कलकत्त्यापासून २०-२५ किलो मिटर लांब होतं, शिवाय नदीच्या पलिकडे होतं. कलकत्त्याहून इथं यायचं म्हणजे पहिला रस्त्याने प्रवास व नंतर ‘डींगी’तून (लहान होडी) नदी ओलांडायची आणि तेव्हा गिरणी दिसणार. त्यावर तोडगा म्हणून जवळपासच्या गांवातले कामगार घ्यावेत, तर त्या शहरापासून दूरच्या गांवात योग्य ते कामगार मिळण्याची वानवाच असावी. त्यावर तोडगा म्हणून, ह्या गिरणीच्या मालकांनी आपला मायदेश इंग्लंड आणि स्कॉटलंड येथून तंत्रज्ञ, सुपरवायझर आणि कामगारही आणले. गिरणीत काम करायचं आणि तिथेच राहायचं. असं बरेच दिवस चाललं, पण कलकत्ताचं हवामान त्या थंड प्रदेशातील कामगारांना न झेपल्याने, ते मृत्युमुखी पडले आणि (कदाचित) तज्ञ कामगार नसल्याने, शेवटी गिरणीचीही तिच गत झाली.

या मिलच्या आवारात एक ख्रिश्चन दफनभुमी आहे. त्यात १५ थडगी आहेत. त्यातील १३ कबरींवरच्या पाट्या गहाळ झाल्या आहेत, मात्र दोन थडग्यांवरच्या पाट्या शाबूत असून, त्या वाचता येतात. त्यातील एका पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिल्समधील एक असिस्टंट जेम्स लॅंग याला, १४जुलै १८३५ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यू समयी त्याचं वय ३६ होतं; तर दुसऱ्या पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिलनधले अन्य एक असिस्टंट मिस्टर जास स्टिवनसन यांती पत्नी एलेन आणि त्यांची लहान मुलगी या दोघांनाही दिनांक १७ ऑगस्ट १८३७ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यूसमयी एलेनचं वय २३ वर्ष, तर तिच्या मुलीचं वय अवघ्या ५ दिवसांचं होतं..!

‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ आठ-दहा वर्षातच बंद पडली. पुढे तिच गिरणी, सन १८३२-३३ मधे ‘बावरीया कॉटन मिल्स (Bowreah Cotton Mills)’ या नांवाने सुरू झाली. ही गिरणी मात्र पुढे व्यवस्थित चालू राहिली.

भारतात सुरू झालेली ही सर्वात पहिली कापड गिरणी काही काळातच बंद पडलेली असली तरी, ती सुरू करण्याचं धाडस करणाऱ्या आणि त्यात काम करण्यासाठी आपला मायदेश सोडून इथे आलेल्या व आपल्या कर्मभुमीतच तरुण वयात देह ठेवणाऱ्या त्या कामगारांप्रती आपल्याला कृतज्ञ राहायला हवं..!

आणि हो, एक सांगायचंच राहिलं..! भारतात सुरू झालेल्या, ‘फोर्ट ग्लॉस्टर मिल्स’ या सर्वात पहिल्या कापड गिरणीत, युरोपियन का होईना, महिला कामगार पहिल्या दिवसापासून कामाला होत्या. त्या अर्थानेही ही गिरणी पहिली ठरते..!

या नंतरचा, देशात कापड गिरणी सुरू करण्याचा दुसरा प्रयत्न झाला, तो सन १८२८ मधे थेट देशाच्या दक्षिण टोकावर, पॉंडेचेरीमधे..!

त्याची कहाणी पुढच्या पाचव्या भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

17.06.2021

टिपा-

1. लेखात माहिती दिलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल्स’ बाबत फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. जी काही त्रोटक माहिती मिळाली, त्यातही संगती लागत नाही. पुन्हा, ‘फोर्ट ग्लॉस्टर’ पहिली की, ‘बावरीया’ पहिली यात तज्ञांमधे मतभेद आहेत. पण वरीलपैकी कोणतीही गिरणी पहिली असली तरी, देशातील पहिली गिरणी स्थापन करण्याचा मान बंगाल प्रांताला जातो, यावर मात्र तज्ञांचं एकमत आहे. आपणही तेवढंच ध्यानात घ्यावं, ही विनंती.

2. ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन’ मिल्सच्या जागेतच ‘बावरीआ’ गिरणी सुरु झाली, कि त्याच मिलच्या आवारात दुसर्या इमारतीत सुरु झाली, ह्या विषयी संभ्रम आहे. परंतु ‘बावरीआ’ मिलची इमारत स्वतंत्र असावी असा कयास करता येतो. फोर्ट ग्लॉस्टरच्या किल्ल्यासारख्या इमारतीत नव्याने गिरणी स्थापन करण्याचा वेडेपणा कुणी करणार नाही. म्हणून कदाचित ह्या दोन इमारतींना, काही ठिकाणी, ‘नॉर्थ मिल’ आणि ‘साऊथ मिल’ अस म्हटलं असावं.

3. ”फोर्ट ग्लॉस्टर’ गिरणीचे व्यवस्थापक/मालक ‘मे. फर्गसन ॲंड कंपनी’ हे होते आणि त्यांना ती गिरणी व सोबतची कॉफी मळा, डिस्टीलरी, तेलाची व पेपरची गिरण व्यवस्थित सांभाळता न आल्याने, देशातली ही पहिली गिरण दिवाळखोरीत गेली, असं भारतातील कापड गिरण्यावर अभ्यास केलेले मान्यवर तज्ञ मॉरीस डेव्हीड मॉरीस यांनी म्हटलंय.

संदर्भ-

1. Bombay Industries;The Cotton Mills- A review of the progress of the textile industries in Bombay from 1850-1928 & the present constitution- S. M. Rutnagur, 1928, pages- 8 to 10, 22 & 23;

2. The Emergence of An Industrial Labour Force in India; A Study of Bombay Cotton Mills, 1854-1947 – Morris David Morris, pages-22-26; notes on pages 22 & 23;

3. The Indian Textile Journal; Special Souvenir Number to mark the Centenary of the Cotton Textile Industry in India- 1854-1954; Edited by Jal S. Rutnagur, Pages – 6, 7, 108-110, 117-121, 125, 126; या लेखातले फोटो याच पुस्तकातून घेतले आहेत.

4. The Indian Textile Journal; Jubilee Souvenir-1890 to 1940; pages- 18,19;

5. Cotton Mill Industry in Bengal- Mukul Gupta. Issued by Government of Bengal, Department of Industries, Bulletin No. 75; year 1937; Pages-2 to 4, 12,13 & 67;

6. The Cotton Industry of India;Prospect & Retrospect- K. L. Govil -1937.

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा)

मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-

सन १८५१ सालात, मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीचे डोहाळे लागले, ते कावसजी नानाभॉय दावर या पारशी उद्योजकाला. मुंबईतले एक बडे पारशी व्यापारी असलेल्या कावसजी दावर यांच्या मनात मुंबईत एक कापड गिरणी सुरु करावी, हा विचार मूळ धरू लागला होता. असा विचार त्यांच्या मनात का यावा, या मागे कारणही तसंच होतं. पुढे जाण्यापूर्वी आपण त्या कारणाचा धावता आढवा घेऊ;कारण ते कारणंही तेवढंच महत्वाचं आहे..!

कावसजी दावर, त्या काळातल्या बहुतेक सर्वच पारशांप्रमाणे, सुखवस्तू घरात जन्माला आले. वडील नानाभाई यांचा देशातील कापूस उत्पादकांना भांडवल उपलब्ध करुन देणे आणि त्यांनी पिकवलेला कापूस इंग्लंडला निर्यात करणं आणि इंग्लंडहून तयार कपडा आयात करण्याचा ब्रोकींग पद्धतीचा व्यवसाय होता. ते दोन इंग्लिश फर्मसाठी भारत व चीन देशांत ब्रोकींग करत असत. वयाच्या १६ व्या वर्षी, म्हणजे सन १८३० सालात कावसजींनी वडीलांसोबत त्यांच्या व्यवसायात उमेदवारी करायला सुरुवात केली. शिक्षणाने कमी, परंतु व्यापारात तेज बुद्धी लाभलेल्या कावसजीनी लवकरच वडीलांच्या व्यवसायातले बारकावे शिकून घेतले. सन १८३७ मधे झालेल्या वडीलांच्या निधनानंतर, आपल्या मोठ्या बंधूंना, म्हणजे दिनशा दावर यांना, भागिदारीत घेऊन कावसजींनी वडीलांचा ब्रोकिंगचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. कावसजींच्या आता वाढू लागल्या होत्या. वडील बंधूंसवेत लवकरच त्यांनी वडील नानाभाई यांच्या नांवाने ‘नानाभाई फ्रामजी ॲंड कंपनी’ नांवाची स्वतंत्र फर्म काढून व्यवसायास सुरुवात केली. दुर्दैवाने लगेचंच त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्वच जबाबदार कावसजींवर येऊन पडली. अर्थात, त्याचा कावसजींना फायदाच झाला.

व्यापारात व्यवस्थित बस्तान बसल्यानं, जात्याच महत्वाकांक्षी आणि धाडसीही असलेल्या कावसजींना आता नवीन क्षितीजं खुणावू लागली होती. ब्रोकींगचा व्यवसाय सुरूच होता. त्यांनी बॅंकींग व्यवसायात उडी मारली. त्यानेळेस मुंबईतून होणाऱ्या व्यापारासाठी भांडवल पुरवणाऱ्या बॅंक ऑफ बॉम्बे, फोर्ब्स, रेमिन्ग्टनसारख्या काही खाजगी संस्था होत्या. पण मुंबईच्या भरभराटीला आलेल्या सर्वच व्यापारास त्या पुरे पडत नव्हत्या. म्हणून कावसजी आणि कामांसारख्या काही इतर बड्या व्यापाऱ्यांनी बॅंकींग क्षेत्रात सन १८४२ मधे स्थापन झालेल्या ‘ओरिएन्टल बॅंक कॉर्पोरेशन(जुनी ‘बॅंक ऑफ वेस्टर्न इंडीया’)’, ‘कमर्शिअल बॅंक ऑफ इंडीया (१८४५)’, ‘चार्टर्ड मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडीया, लंडन ॲंड चायना’ इत्यादीसारख्या वित्तीय संस्थांच्या स्थापनेत, इतर पारशी व ब्रिटीश व्यापाऱ्यांसमवेत कावसजींचा सहभाग होता.

कावसजींचं मुंबईतल्या व्यापारात होणाऱ्या बदलावर बारीक लक्ष असे व त्यातून आपल्याला काही नवी संधी मिळतेय का, याच्या ते सतत शोधात असत. त्यात त्यांच्या लंक्षात येऊ लागलं की, पूर्वी जी भारतीय कापसाला आणि भारतातील कुशल विणकरांनी हातमागावर विणलेल्य् सुती व रेशमी कपड्यांना जेवढी इंग्लंड आणि इतर काही पाश्चिमात्य देशांकडून जेवढी मागणी होती, तेवढी आता राहीलेली नाही. त्यामागे, इंग्लंडमधे अठराव्या शतकाच्या सहाव्या-सातव्या दशकातच सुरू झालेल्या यांत्रिक गिरण्या हे कारण असल्याचं, हुशार कावसजींनी नेमकं हेरलं होतं. त्याचा परिणाम त्यांना, त्यांच्या मूळच्या कॉटन ब्रोकींगच्या व्यवसायातही जाणवू लागला होता. इंग्लंडनेही केवळ भारतातून आयात होणाऱ्या कापसावरचं अवलंबित्व कमी करत आणलं होतं, त्यामुळे भारतातून होणारी कापसाची निर्यातही कमी कमी होऊ लागली होती. उलट इंग्लंडहून आपल्या देशात येणाऱ्या सुतात व सुती कपड्यात वाढ होऊ लागली होती. सन १८००-१८१० सालात इंग्लंडहून भारतात आलेल्या सुती मालाची किंमत, जी केवळ ७२ हजार रुपये होती, ती वाढून १८५० च्या सुमारास दिड कोटी रुपयांपर्यंत वाढली. मशिनच्या सहाय्याने इंग्लंडमधे सुबक कापड कमी वेळात, पण जास्त प्रमाणात तयार होऊ लागलं होतं. त्यामुळे इंग्लंडात तयार झालेला कपडा व मशीनवर कातलेलं सूत, इंग्लंडहून भारत व इतर देशात निर्यात करणं इंग्लंडला शक्य होऊ लागलं होतं. त्याचा (दुष्प)रिणाम भारतावर आणि इथल्या व्यापारावर, तसेच कारागिरांवरही होऊ लागला होता.

नेमकी हिच बाब कावसजीं दावर यांनी बरोबर हेरली आणि आपला कापूस व सूत इंग्लंडात जाऊन, तिथल्या गिरण्यांमधून कपडा बनून इथे येतो व त्यावर इंग्लिश व्यापारी व कारखानदार बक्कळ माया कमावतात, मग आपणच इकडे एखादी गिरणी स्थापन करुन तसा नफा का कमवू नये;शिवाय इथल्या बरोजगार असलेल्या कापूस उत्पादकांना आणि कुशल विणकरांनाही त्यायोगे रोजगार का मिळवून देऊ नये, असा विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागला.

पण मनात विचार येणं नि तो प्रत्यक्षात आणणं, यात प्रचंड फरक आहे. त्या काळात तर हे फारच अवघड. गिरणी उद्योगातलं देशात कुणीही माहितगार नाही. गिरणीच्या इमारतीचा आराखडा, गिरणीचं तंत्रज्ञान, त्यातील यंत्रसामग्री, ती चालवण्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ, गिरणीचं व्यवस्थापन इत्यादी अगदी प्राथमिक, परंतु अत्यंत महत्वाच्या गोष्टींसाठी परदेशावर, म्हणजे अर्थातच इंग्लंडवर अवलंबित्व होतं. पुन्हा इंग्लंडातले माहितगार मदत करतीलच हे कशावरून, ही शंका..! पुन्हा ती मदत मिळालीच, तर गिरणीची अजस्त्र यंत्र चालवण्यासाठी लागणारी उर्जा, कोळसा व लाकूड यांपासून मिळवायची आणि या गोष्टी मुंबईत आणायच्यात, तर समुद्रमार्गाने आणाव्या लागणार. ती मदत वेळेत मिळेल की नाही, ही देखील शंकाच होती. गिरणी धंद्यासाठी दोनच दोष्टी मुंबईत अनुकूल होत्या. भरपूर कापूस आणि सूत व कापडासाठीची मोठी बाजारपेठ..!!

पण समोर दिसणाऱ्या अडचणींचाच विचार करत बसलं, तर काहीच हाती लागणार नाही. काही नविन करायचं तर, धोका तर पत्करावा लागणारच. कावसजींनी सर्व शंका-कुशंका बाजुला ठेवत, इंग्लंडमधील गिरणी उद्योगातील तज्ञांसोबत पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांशी संपर्क साधल्यावर, त्यांना इंग्लंडमधील ओल्डहॅम शहरातील ‘मे. प्लॅट ब्रदर्स ॲंड कं. लिमिटेड(M/s. Platt Brothers & Co. Ltd.)’ या गिरण्यांसाठी मशिनरी उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रतिसाद दिला. मुंबईत गिरणी उद्योग सुरू केल्यास, तो भरभराटीला येऊ शकतो, हे त्यांना पचवून देण्यात कावसजी यशस्वी झाले आणि प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना गिरणीसाठी लागणाऱ्या इमारतीचे आराखडे आणि मशिनरी पुरवण्याचं मान्य केलं. एवढंच नव्हे, तर भविष्यात मुंबईतला गिरणीधंदा भरभराटीला येऊ शकतो, हे अचूक ओळखून, प्लॅट ब्रदर्सनी, कावसजींना त्यांचे मुंबईतले ‘एजंट’ म्हणूनही नेमून टाकलं..! हे साल होतं, सन १८५१..!!

सन १८५१ मधे कावसजींनी गिरणीचं ‘प्रॉस्पेक्टस’ वितरीत केलं आणि गिरणीसाठी योग्य अशी जागा पाहाण्यास सुरुवात केली. कावसजींनी आपल्या व मुंबईतल्या पहिल्या वहिल्या गिरणीसाठी जागा मुक्रर केली ती, आताच्या ग्रान्ट रोड नजिकच्या ताडदेव येथील. त्याला कारणंही तशीच होती. एकतर ही जागा तेंव्हा तशी बऱ्यापैकी मोकळी होती. तेंव्हाची लोकवस्ती एकटवली होती, ती किल्ल्याच्या आत किंवा बाहेरच्या बाजूला फार तर माजगांव-भायखळ्यापर्यंत. त्यामुळे ही जागा मुख्य लोकवस्तीपासून फार लांब व फार जवळही नव्हती. त्याने गिरणीत काम करण्यासाठी भविष्यात लागणाऱ्या मनुष्य बळाचा पुरवठा होऊ शकत होता. दुसरं कारण म्हणजे, त्यावेळच्या बहुतेक सर्व देशा-परदेशी श्रीमंत आसामींचा निवास असलेल्या ‘कंबाला हिल’च्या पायथ्याशी होती. त्यामुळे कारखान्यात जाणं-येणं सोयीचं होणार होतं.

सर्वात महत्वाचं कारण होतं ते, इथून जवळच असलेला ‘कुलाबा’ येथला मोठा कापूस बाजार किंवा कॉटन एक्स्चेंज. कुलाबा कॉजवेचं बांधकाम नुकतंच, म्हणजे १८३८ साली पूर्ण झाल्याने, मुंबईतलं, आताच्या हॉर्निमन सर्कलमधे कोंदटलेला कापसाचा बाजार-कॉटन ग्रीन-, सन १८४४ मधे, कुलाबा कॉजवेच्या बांधकामामुळे उपलब्ध झालेल्या प्रशस्त जागेत हलवण्यात आला होता. तिथून विपूल प्रमाणात गिरणीसाठी कापूस उपलब्ध होऊ शकत होता. गिरणीच्या बॉयलरसाठी लागणारं लाकूड तारवांतून गिरगांवच्या चौपाटीवर येत असे, तेंव्हा ते ही ठिकाण कुलाब्यापासून नजिकच होतं. कोळसातर मुंबईतल्या अनेक बंदरात उतरत होता व ती बंदरं ताडदेवपासून जवळच होती. एकुणात काय तर, इंधन, मालकांचा निवास व भविष्यात लागणारा कामगार वर्ग ताडदेवपासून हाकेच्या अंतरावर असल्याने, कावसजींनी आपल्या गिरणीसाठी ताडदेवची जागा निवडली.

प्लॅट ब्रदर्सनी इंग्लंडहून, एकूण २० हजार स्पिन्डल्स (टकळ्या किंवा चाती) मावतील एवढंया इमारतीचे आराखडे पाठवून दिले. सोबत त्यातले तज्ञही इंग्लंडहून आले. पिटर रश्कीन हा इंग्लंडातल्या लॅंकशायर (Lancashire) येथून, मुंबईतला गिरणी उद्योग उभारण्यासाठी आलेला सर्वात पहिला ब्रिटीश माणूस. गिरणीची पायाभरणी.

सन १८५२ मधे गिरणीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला नि जोरात काम सुरू झालं. पुढच्या दिड-दोन वर्षांत गिरण उभी राहिली आणि दिनांक ५ फेब्रुवारी १८५४ रोजी कावसजींच्या आणि मुंबईतल्याही पहिल्या गिरणीचं, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’उद्घाटन करण्यात आलं आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं आणि मुंबईच्या व देशाच्याही गिरणी उद्योगाची पायभरणी झाली..!

इथून पुढे मुंबईचा गिरणी उद्योग, या ना त्या कारणाने, देशातच नव्हे, तर जगभरात गाजत राहिला. गिरणी उद्योगावे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून जे स्थन मिळवून दिलं, ते अद्यापही तसंच शाबूत आहे..!!

पण एक सांगायचं राहिलंच, मुंबईतली कावसजींनी सुरू केलेली ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ मुंबईतली पहिली असली तरी, देशातली पहिली नव्हे बरं का..! या आधीही देशात गिरण्या उभारण्याचे उपद्व्याप काही उपद्व्यापी लोकांनी केले होते. कावसजींची गिरण देशातली पहिली नसूनही, देशातल्या गिरणी उद्योगाचे आणि एकुणच औद्योगिकरणाचं पितामह म्हणून कावसजींचा गौरव का केला जातो, आणि कावसजींच्या या गिरणीचं पुढे काय झालं त्याची कहाणी पुढच्या चौथ्या भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

08.06.2021

टीप- फोटो इंटरनेटवरून घेतलेले आहेत. कावसजी दावर यांच्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’चे फोटोही माझ्याकडे आहेत, पण ते पाहायला मिळतील मात्र राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीमधे.

संदर्भ-

1. The Gazetteer of Bombay City & Island- Nov. 2010 edition- S. M. Edwards, Vol. I -pages 434-436, 486;

2. Bombay Industries;The Cotton Mills- S. M. Rutnagur- 1927; page 9, 288;

3. The Emergence of An Industrial Labour Force in India; A Study of Bombay Cotton Mills, 1854-1947; Morris David Morris- 1965;pages-22-26;

4. Indian Textile Journal;Cetenary Souvenir- 1854-1954;pages-6-9, 124-127, 160-164,

5. Book – Parsi Lustre on Indian Soil- Vol I, 1939, H. D. Darukhanawala, page-426-427;

6. Bombay Industries;The Cotton Mills- S. M. Rutnagur- 1927;; Part II; Chapter- Cotton Trade of Bombay;page -456-457;

7. A Hundred Years of Cotton- M. L. Dantwala- Chapter VIII;

8. Shells from the sands of Bombay being my recollections & reminiscence- 1860 – 1875; Dinshaw E. Wachha; 1920; pages 435-438, 623;

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा)

कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-

मागच्या भागात आपण पाहिलं की, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत एकूण १०३ गिरण्या होत्या. आणि त्यातल्या जवळपास ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. मुंबईतल्या गिरण्यांनी मुंबईच्या नि देशाच्याही औद्योगिक विश्वाची पायाभरणी केली. मुंबंईकडे देशाच्या आर्थिक राजाधानीचा मान चालून आला, त्यानागे जी काही थोडकी कारणं होती, त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे, मुंबईतल्या कापड गिरण्या..!

मुंबईच्या पहिल्या गिरणीचा जन्म झाला, तो १८५४ सालात, कावसजी नानाभॉय दावर या पारशी उद्योजकाच्या कल्पनेतून. त्यासाठीच कावसजी दावर यांना मुंबंईतल्या आणि देशाच्याही गिरणी उद्योगाचे पितामह म्हटले जाते. त्याबद्दल आपण पुढे अधिक जाणून घेणारच आहेत, परंतु, पुढे जाण्यापुर्वी, म्हणजे मुंबईतली कावसजी दावर यांची पहिली गिरण अस्तित्वात येण्याच्या साधारणत: ७०-७५वर्ष अगोदरपासून, मुंबईच्या धरतीवर ‘गिरणी’ नांव धारण करणारा आणि कापसाशीच संबंध असणारा आणखी एक अर्ध-यांत्रिकी व्यवसाय अस्तित्वात होता, त्याची माहिती घेणं औचित्याचं ठरेल. औचित्याचं अशासाठी की, मुंबईतल्या गिरण्यांच्या जादुई विश्वात शिरण्यापूर्वी ओलांडावा लागणारा, प्रवेशद्वारावरचा तो उंबरठा आहे. त्यामुळे त्याला प्रथम नमन करणं आपलं कर्तव्य ठरतं..! हा व्यवसाय होता ‘कॉटन प्रेसिंग’चा. इंग्रजीत यासाठी ‘कॉटन स्क्रू’ असाही शब्द प्रयोग करत असत.

साधारण अठराव्या शतकाच्या मध्याच्या आसपास मुंबईत बंदर सुरू झालं आणि त्या बंदरातून निर्यात सुरू झाली. कापूस हा या निर्यातीमधला महत्वाचा ऐवज होता. साधारण सन १७५० पासूनच मुंबईपासून दूर असलेल्या प्रदेशातून समुद्रमार्गाने, गलबतं भरूनच्या भरून कापसाच्या गासड्या(Cotton Bales) मुंबईच्या बंदरात येत व त्या पुढे मोठमोठ्या जहाजातून युरोप खंडात वा चीनच्या दिशेने रवाना होत असत.

जेंव्बा निर्यातीसाठी कापूस मुंबईत येई, तेंव्हा त्याची एक गासडी सुमारे १०-१२ फूट उंचं आणि ५-६ फूट रुंदही असे. मुंबईतल्या व्यापाऱ्यांना फायदा होत असे, ते जास्तीत जास्त वजनाचा कापूस जहाजात भरून पाठवल्याने. आणि कापूस तर वजनाने बराच हलका आणि कमी वजनासाठीही जास्त जागा व्यापणारा असल्याने, तो परदेशात रवाना करताना, कमी वजनाचा कापूस जहाजातली जास्त जागा व्यापत असे आणि परिणामी व्यापाऱ्यांचं ‘नफे मे नुकसान’ होत असे. तसंच जहाज कंपनीचं आणि ज्या ठिकाणी कापूस पाठवायचा असे, तिकडच्या आयात करणाऱ्या कारखान्यांचंही त्यात नुकसान होत असे. असे होऊ नये म्हणून ‘कॉटन प्रेस’ची कल्पना जन्मली.

कॉटन प्रेस किंवा कॉटन स्क्रू म्हणजे एक साधे लोखंडी यंत्र (सुरुवातीला लाकडी. विशेषत: चिंचेच्या लाकडापासून बनवलेलं असे) असे. त्या यंत्रात-अंदाज येण्यासाठी सोबत फोटो दिलाय- कापसाची गासडी टाकून, त्या यंत्रावर असलेला लांब लाकडी दांडा(किंवा दांडे) गड्यांच्या मदतीने कळ फिरवला जाई. जेणेकरुन यंत्रातली आडवी, चौकोनी वा आयताकृती लोखंडी फळी, तिच्याखाली असलेल्या कापसाच्या गासडीवर, प्रचंड दाबाने दाबली जात असे आणि त्यामुळे १०-१२ फूट उंच व ५-६ फूट रुंद असणाऱ्या कापसाच्या गासडीचं आकारमान, जवळपास निम्म्यावर येई;पुन्हा वस्तुमानात फारशी काहीच घट होत नसे. म्हणजेच तेवढ्याच वजनाच्या दुप्पट गासड्या जहाजात भरून रवाना करता येत असत. यात मुंबईतले कापसाच्या व्यापारात असणारे पारशी-गुजराती सेठीये, कापसाची वाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्या आणि कापूस मागवणारे परदेशातले कारखानदार, असा દરેકનો ફાયદો..!

फायदा म्हणजे किती, त्याचं अतिशय समर्पक वर्णंन पुन्हा गोविंद नारायण मडगांवकरांनीच त्यांच्या ‘मुंबईचं वर्णनं’ या पुस्तकात केलंय. मडगांवकर म्हणतात, “चवदा मण कापूस ह्या गिरणीत घालून दाबला म्हणजे तो दगडासारखा घट्ट होऊन, त्याचा हात-दिड हात उंच आणि अडीच हात रुंद, असा बेतवार गठ्ठा तयार होऊन बाहेर पडतो. त्यामुळे व्यापारी लोकांस नोराबद्दल हजारो रुपये नफा होतो. ज्या जहाजांमधे पूर्वी सुमारे तीन हजार गठ्ठे लादले जात होते, त्यामधे आता असे दाबलेले गठ्ठे पाच-सहाहजार राहू लागले. त्यामुळे जहाजाच्या धन्याचे उत्पन्न वाढले. गिरणीमधे गठ्ठे बांधून तयार करुन घेण्यासाठी गिरणीमालकाला दर गठ्ठ्यास दीड रुपया द्यावा लागतो. एवढा खर्च होऊनही ह्यापासून व्यापाऱ्यांस प्रतिवर्षी लाखो रुपये नफा होऊ लागला”. एवढं म्हणून मडगांवकर पुढे नोंदवतात की, “सन १८०० मधे लवजी फ्यामिली ह्या जहाजाच्या धन्यास असे गाठलेले गठ्ठे भरल्यामुळे एका वर्षात ३२ हजार रुपये नोर जास्ती आला. याच प्रमाणे दुसऱ्या जहाजांसही नफा झाला. तसाच व्यापारी लोकांस कोणांस पंधरा, तर कोणास वीस हजार रुपये नफा होऊ लागला.”

कॉटन प्रेसची ही कल्पना तशी जुनीच, सन १६९४ मधली, पण तिने मुंबईत जोर पकडला, तो १७५० नंतर. सन १६९७ मधे मुंबईत असं, अगदी प्राथमिक स्वरुपाचं एकच लाकडी यंत्र होतं, पण ते लवकरच बंद पडलेलं होतं. नंतर ती संख्या हळुहळू वाढत गेली आणि यंत्रातही सुधार होत गेले. नंतर नंतर कॉटन प्रेस लोखंडाचे बनू लागले व वाफेवरही चालू लागले होते.

‘मुंबईचं वर्णन’ या आपल्या पुस्तकात, लेखक गोविंद नारायण मडगांवकर यांनी, या कॉटन प्रेस किंवा कॉटन स्क्रूसाठी ‘गिरण’ हा शब्द वापरात होता, असं म्हटलंय. अर्थात, हा शब्द त्या एका यंत्रासाठी होता आणि अशी कापूस दबाईची पाच-सहा यंत्र असलेल्या कारखान्यांना ‘गिरणींचा कारखाना’ असा समर्पक शब्द योजला होता.

मुंबईतला असा पहिला ‘गिरणींचा कारखाना’ सुरू झाला, तो सन १७७६ मधे. र्फोटमधे;आणि याचं श्रेयही, मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणी स्थापनेच्या श्रेयाप्रमाणेच, एका पारशी उद्योजकाकडेच जातं. त्यांचं नांव दादीभॉय नोशेरवानजी दादीसेठ..! मुंबईतली ‘दादीसेट अग्यारी’ स्थापन करणारे हेच ते दादीभॉय नोशेरवानजी..!

सन १८५४ साली मुंबईत जेंव्हा पहिली कापड गिरणी स्थापन झाली, तेंव्हा मुंबईत एकूण असे १३ ‘गिरणीचे कारखाने’ होते. एका कारखान्यात साधारण ५-६ गिरण्या, म्हणजे कॉटन स्क्रू किंवा प्रेस असत. एक गिरण चालवण्यासाठी साधारणत: ३० गड्यांची गरज असे. म्हणजे पाच-सहा गिरण्या असलेल्या एखाद्या कारखान्यात दोनेकशे गडी काम करत असत. हे गिरण्यांचे कारखाने जास्त करुन आताच्या कुलाबा कॉजवेच्या परिसरात व काही तुरळक फोर्ट विभागात होते.

पुढे पुढे कापूस ज्या महाराष्ट्रातील विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू इत्यादी प्रदेशात पिकत असे त्याच ठिकाणी असे कॉटन प्रेस स्थापन होऊ लागले. त्यामुळे त्यांचाही मुंबईपर्यंतचा वाहतूक खर्च कमी होऊ लागला आणि हळुहळू मुंबईतले कॉटन प्रेस कमी होऊ लागले आणि त्यांची जागा मुंबईतल्या कापड गिरण्यांनी घ्यायला सुरुवात झाली..!

त्यांची कहाणी पुढच्या भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

05.06.2021

टीपा-

1. कॉटन प्रेस कसे असत याची कल्पना यावी यासाठी इंटरनेटवरून घेतलेलं छायाचित्र सोबत दिलेलं आहे. त्यात दिसणारे आडवे दांडे गड्यांच्या मदतीने फिरवले जात असत व त्या प्रेसच्या खालच्या भागातल्या कापसाची गासडी दाबली जात असे.

2. मडगांवकरांनी ‘नोर’ असा शब्द वापरला आहे, तो भाडं या अर्थाने, की कमिशन या अर्थाने हे लक्षात येत नाही. नोरच्या शब्दाची स्पेलिंग नेमकी कशी करत ते ही समजत नाही.

3. मडगांवकरांच्या पुस्तकात मुंबईतला पहिला गिरणीचा कारखाना काढण्याचं श्रेय दादाभाई पेस्ननजी यांना दिलंय. ते बहुतेक दादीभॉय नौशेरवानजी हेच असावेत. कारण अन्य एका पुस्तकात मुंबईतला पहिला कॉटन प्रेस काढण्याचं श्रेय त्यांना दिलंय. पारशी माणसांच्या नावांतला गोंधळ, गोऱ्या साहेबांनी त्यांच्या स्पेलिंगमधे घातलेला आणि आपण काळ्या साहेबांनी इमानेइतबारे पुढे चालू ठेवलेला तो घोळ एवढा आहे की, आपणांस सापडलेला व आपण शोधत असलेला माणूस तोच आहे हे खात्रीने सांगता येत नाही. उदा. नौशेरवानजी म्हणजेच नुसेरवानजी की वेगळे, दादीभॉय व दादाभॉय एकच की वेगळे इत्यादी गोंधळ होतो.

संदर्भ-

1. ‘मुंबईचें वर्णन’-गोविंद नारायण मडगांवकर-आवृत्ती, सन २०१३-रिया प्रकाशन, कोल्हापूर-पृष्ठ संख्या २२७-२२८.

2. The Gazetteer of Bombay City & Island- Nov. 2010 edition- Vol. I -pages 32, 309, 332, 485, 497; Vol III-page 69.

3. Book – Parsi Lustre on Indian Soil- Vol I, 1939, H. D. Darukhanawala, page-34.

4. Handbook of the Bombay Presidency; With an account of Bombay City.-1881, Second Edition. -page-128.