..आणि माय ‘मुंबाई’च्या पोटी माझा पुनर्जन्म झाला…!

..आणि माय ‘मुंबाई’च्या पोटी माझा पुनर्जन्म झाला…!

मुंबई. देशातील अनेकांच्या स्वप्नातलं शहर, तसाच अनेकांची स्वप्नपूर्ती
करणारंही शहर. देशातील कोणत्याही कोपऱ्यातून डोळ्यात स्वप्न आणि मनगटात
जिद्द घेऊन मुंबईत येणाऱ्या कोणत्याही माणसाला, मुंबई आपल्या पदराखाली
घेते. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अबोल मदतही करते. मुंबई
कल्पवृक्षासारखी कल्पनगरी आहे. संपत्ती, समृद्धीची देवता महालक्ष्मी
समुद्रमंथनातून उगम पावली होती, अशी पुराणकथा आहे. मूळ सात बेटांच्या
स्वरूपात असलेली मुंबई नगरीही अशीच समुद्राच्या घुसळणीतून उगम पावली आणि
पाहता पाहता तिने देशाच्या लक्ष्मीचं स्वरूप प्राप्त केलं. मुंबई ही
समुद्रातून आणि समुद्रामुळे उगम पावलेली देशाची लक्ष्मी आहे. तशीच ती
अन्नपूर्णाही आहे. मुंबईच्या आश्रयाला येणारं कोणीही रात्री झोपताना
उपाशी राहत नाही, अशी हिची ख्याती.

‘अनंत हस्ते देस्ता मुंबापुरीने, घेशी किती दो करांनी’ अशी अवस्था मुंबईत
आलेल्या आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असलेल्या कोणाही व्यक्तीची
होते. अनेकांना अनेक रूपाने मुंबई पावली आहे. तिने अनेकांना अनेक गोष्टी
दिल्या आहेत. मला मात्र मुंबईने एक अतिशय आगळी वेगळी भेट दिली आहे, जिची
किंमत पैशांसारख्या नश्वर गोष्टीत करता येणंच शक्य नाही..!

माणूस कितीही मोठा झाला, पैसेवाला झाला तरीही त्याला ओळख नसेल तर त्या
मोठेपणाला काहीच अर्थ उरत नाही. ही ओळख मिळवायचा अनेकजण अनेक पद्धतीने
प्रयत्न करत असतात. त्यासाठी भलेबुरे मार्गही अवलंबत असतात. इतकं करून
त्यापैकी काही जणांना ओळख मिळतेही, ह्या ओळखीला आपण प्रतिष्ठा म्हणूनही
ओळखतो किंवा मिरवतो. ही प्रतिष्ठा खरी किंवा ओढून ताणून आणलेली किंवा
सांप्रतच्या कलियुगात चक्क खोटीही असू शकते. .

ही झाली सार्वजनिक ओळखीची गोष्ट एका माणसाला, अनेक कारणांनी, इतर काही
माणसांनी ओळखणे, ही त्या माणसाची सार्वजनिक ओळख झाली. अशी ओळख आपल्यापैकी
प्रत्येकाला असतेच. ह्या पलीकडील आणखी एक ओळख असते. त्या ओळखीची जाणीव
प्रत्येकाला असतेच असं नाही. पुन्हा ती ओळख काही फार महत्वाची असते,
असंही अनेकांना वाटत नाही. ती म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख पटणे. ‘मला
मुंबईने एक अतिशय आगळी वेगळी भेट दिलीय’ असं मी जे म्हटलं आहे, ते याच
ओळखीबद्दल. मुंबईने माझी मलाच ओळख करून दिली आहे. मी काय करू शकतॊ
ह्याची, मी किती उंच भरारी घेऊन शकतो ह्याची, माझ्यातील क्षमतांची ओळख
मला मुंबईने. आईने जन्म दिला. तिचे उपकार फेडणं अशक्य. तसंच आयुष्याच्या
एका टप्प्यावर मी कोण, कोऽहम् ह्या प्रश्नाचं उत्तर मला एका प्रसन्न
क्षणी मुंबईने दिलं, म्हणून तिच्याही उपकाराची फेड मला अशक्य. मला जन्म
दिला ती माझी आई, तर मला स्वतःचीच ओळख करून देऊन मला नव्याने जन्म दिला,
ती माझी ‘मुंबाई’..!

आपल्याला इतर कुणी ओळखो, वा ना ओळखो, आपण स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं
असत. मी स्वतःला ओळखू शकलो ते मुंबाईमुळे..! हे कस घडलं, ते ही सांगतो.
अश्याच कधीतरी अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळात, माझ्यासमोर गोविंद
मडगावकरांनी लिहिलेलं ‘मुंबईच वर्णन’ हे पुस्तक आलं. अतिशय आकर्षक अश्या
जुन्या मराठीत लिहिलेल्या त्या पुस्तकाने मला अगदी झपाटून टाकलं. मी
अनेकदा त्या पुस्तकाचं वाचन केलं, पण मन भरेना. मग केवळ मुंबई शहर ह्या
विषयावर, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात लिहिल्या गेलेल्या
अनेक पुस्तकांचं वाचन केलं. त्या पुस्तकांतून दिलेल्या खुणांच्या शोधात
मी मुंबईभर भटकत गेलो आणि मडगावकरांच्या पुस्तकात गोठलेल्या १८६२ सालच्या
बोंबेचा शोध, २०१६-१७सालच्या मुंबईत घेत गेलो. १५०हुन अधिक वर्षांच्या
काळात अनेक जुन्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, तर काहींनी आपलं रुपडं
बदललं होत. काळासोबत हे व्हायचंच. असं असलं तरी जुन्याचा काही अंशी वास
त्या ठिकाणी होताच. मला तो जाणवत गेला आणि टाईम मशीनमध्ये बसून मला त्या
काळात गेल्याचा अनुभव येत गेला. तरीही मधला काळाचा पडदा दूर होऊ लागला
आणि मी अनुभवलेलं शब्दांत उतरत गेलं. शब्दांत उतरलेलं मी सोशल मिडीयावर
टाकत गेलो. ते वाचणाराना आवडत गेलं आणि अनेकांनी पुढे मुंबईकडे त्यांची
पाहण्याची दृष्टी बदलत गेल्याच कळवलं. त्यांना आपल्या मुंबईबद्दल वेगळंच
प्रेम निर्माण झालं. ह्या निमित्ताने, मला लिहिता येतं, हा शोध माझा मलाच
लागला आणि ‘कोऽहम्’चं उत्तर मला मिळालं. माझी मला ओळख पटली माझा जणू
पुनर्जन्मच झाला आणि तो मुंबईच्या पोटी झाला..! त्याक्षणी मुंबई माझी,
‘माय मुंबाई’ झाली..!!

मला लिहिता येतं, हा शोध लागला आणि माझी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच
बदलून गेली. आयुष्य सुंदर होतंच, ते अधिक देखणं भासू लागलं. अशा-निराशा,
दुःख-आनंद तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत जात असतात. मी ही त्याला अपवाद
नाही, पण मला पटलेल्त्या या माझ्याच ओळखीमूळे मी त्या पलीकडे पाहायला
शिकलो. हे मुंबईचे माझ्यावरचे उपकारच होते.

मुंबईने मला माझी ओळख पटवली. लिखाण करायला मुंबईने मला असंख्य विषय
पुरवले. त्यावर भरपूर लिखाण केलं. विविध विषयावर केलं, पण त्या लिखाणाचा
केंद्रबिंदू मुंबई होता. मुंबईचा इतिहास, मुंबईच्या गल्ल्या, रस्ते,
देवळं-मशिदी-चर्चेस,, मुंबईला घडवणारी त्याकाळातली माणसं, इतकंच कशाला
मुंबईची टॅक्सी, हातगाडीवरही लिहिलं. लिहिलेलं सोशल मिडीयाच्या
माध्यमातून लोकांसमोर ठेवत गेलो. ‘मुंबाई’चं ऐतिहासिक समृद्धपण इतरांनाही
माहित व्हावं आणि मुंबईच्या लेकरांची तिच्यवरची माया वाढावी, या साठी हा
प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी सफल होतोय, असही माझ्या लक्षात येत गेलं.
मी लिहू शकतो, हा शोध मला ज्या मुंबईमुळे लागला, तिच्यावरच लिहून तिच्या
माझ्यावरच्या अनंत उपकारांची अल्पशी फेड करण्याचा माझा हा प्रयत होता..

आज मी पूर्णपणे मुंबईमय झालेलो आहे. मीच मुंबई आहे अशी माझी भावना आहे.
मुंबई माझी दुसरी आई, माय मुंबाई आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने
मुंबईबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचं आवाहन केलं आणि माझ्या अनावर भावना
शब्दरूपात उतरत गेल्या. म.टा. ने घेतलेली स्पर्ध रद्द झाली किंवा कसे, ते समजलं नाही.
म्हणून साधारण वर्षभर वाट पाहून
त्याच माझ्या भावना
आपल्यासमोर ठेवल्या आहेत..!!

-नितीन साळुंके
9321811091
salunkesnitin@gmail.com

3 thoughts on “..आणि माय ‘मुंबाई’च्या पोटी माझा पुनर्जन्म झाला…!

  1. ‘मीच मुंबई आहे अशी माझी भावना आहे…’
    आपली ही तद्रूपताच फार मोलाची आहे.आपणाकडून असेच लेखन होत राहो.

    Liked by 1 person

Leave a comment